या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Saturday 26 November 2011

माझे हसू

     माहेरी जाने म्हणजे प्रत्येक सासुरवाशिणीला एक आनंद सोहळा ! पण बऱ्याचदा काही अश्या गोष्टींसाठी जावे लागते कि .... मन उदास असते ! माझे माहेर तसे साधारण ३ तासाचा रस्ता .असेच एकदा आम्ही ,मी आणि यजमान कर्जतला (जि-अहमदनगर) चाललो होतो . एका दश्क्रीयाविधीला चाललो होतो ,माझ्या मनात असंख्य आठवणी रुंजी घालत होत्या आणि मी तशी जास्त दु:खी होत होते . आम्ही दोघेच गाडीत होतो आणि साधारण सकाळी ६ ची वेळ होती .संपूर्ण रस्त्याने ते विषय बदलून बोलण्याचा प्रयत्न होते पण मी काही गतआठवणीतून बाहेर येत नव्हते .त्यांनी सर्वप्रकारे मला समजावले पण मी काही केल्या बोलत नव्हते . शेवटी त्यांनी एफ एम चालू केले ,सकाळची वेळ होती ,भक्तिगीते चालू होती .पण माझी उदाशी संपत नव्हती कारण लहानपणापासून ज्यांनी फक्त माया लावली ,संस्कार दिले त्यांचे असे अपघाती निधन मन विषण्ण करत होते .त्या नादात सिद्धटेक मागे पडले . गाडी सावकाश चालली होती ,मी माझ्या विचारात आणि तेही प्रयत्न करून गप्प बसलेले ! एका वळणावर त्यांनी गाडी फास्ट केली ,थोडे घाबरल्याचे हावभाव केले ,मी बघत होते पण काही बोलले नाहि .मग अचानक त्यांनी ब्रेक दाबले गाडी थांबली ,काच खाली करून बाहेरच्या मुलाला घाबरून (अक्टिंग) विचारले ,''काय झाले रे ?'' मीहि थोडी घाबरले मला वाटले काहीतरी अघटीत घडले ! मी आता पुरती घाबरले ! त्या मुलालाही दम लागलेला ,तो २ मीनीट धापा टाकत होता .माझी अवस्था एकदम बिकट!
 ''काही नाही''तो मुलगा बोलला .
''मग पळायला काय झाले ?''
त्या मुलाने काय ओळखायचे ते ओळखले आणि दोघे हसू लागली !मला हि गोष्ट समजायला वेळ लागला ,तोपर्यंत गाडी पुढे आली होती .मग मीही हसायला लागले ! कारण तो मुलगा रनिंग करत होता सकाळी सकाळी ! मी हसले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले ! सुखं आणि दु :ख आयुष्यात चालूच असते ते कुणी बदलत नाही पण अश्या प्रकारे वाटून नक्की घेतात !

Monday 21 November 2011

रम्य त्या सांजवेळी

                   रांगेत उडती पक्षी
                   रेखित सुंदर नक्षी
                       रम्य त्या सांजवेळी
                       भिजलेल्या कातरवेळी

                   भिनला गंध मातीचा
                   घेतसे ठाव मनाचा
                        रम्य त्या सांजवेळी
                        भिजलेल्या कातरवेळी

                   वाटते आभाळी उडावे
                   रंगात केशरी न्हावे
                        रम्य त्या सांजवेळी
                        भिजलेल्या कातरवेळी

                   क्षितिजावर रंगांची होळी
                   कोण प्रेमयुगुल रंग उधळी
                         रम्य त्या सांजवेळी
                         भिजलेल्या कातरवेळी

                   पाणी नदीचे भासते शांत
                   जणू भास्करा त्या सामावित
                           रम्य त्या सांजवेळी
                            भिजलेल्या कातरवेळी

                   असावी प्रियाची साथ
                   आणि सुखाची बरसात
                            रम्य त्या सांजवेळी
                            भिजलेल्या कातरवेळी                

Saturday 19 November 2011

गोष्ट एका चिमण्याची !

        चिमणा आणि चिमणी ...त्यांची हि कहाणी ! प्रत्येक सजीव त्याच्या संवेदना घेऊन जन्माला येतो . त्याची सुख, दु:ख, वेदना ,हर्ष सर्वकाही त्याच्या बरोबर येते आणि त्याच्याबरोबर संपते . सर्वजन ,जे सजीव ते आपल्या भावना एकमेकांशी  वाटून घेतात फक्त त्या आपल्यासारख्या माणसाला कळत नाहीत ...कि बऱ्याचदा कळून घेत नाहीत ! पाठीत काठी घातली कि बैल कळवळत असेलच कि ...पण त्याच्या भावना आपण समजूनही दुर्लक्ष करतो, आणि त्याने पुढ जाव म्हणून मारताच राहतो ! तसच आपल्या उघड्या खिडकीतून येणाऱ्या चिमनीच ...दोन दाणे टिपायच्या आधीच तिला काही तरी भिरकावून मारलच समजा !
     बाळाच्या चाहुलीने दोन्ही जीव आनंदून गेले होते. ती अंडी उबवण्यात चिमणीचा पूर्ण दिवस जात होता. आणि तिची काळजी घेण्यात ,तिच्या चाऱ्याची सोय करण्यात त्या चीमण्याचा दिवस सरत होता .त्यांच्या उत्साहाला उधान आलं होतं .त्याचं जगणं आनंदाने व्यापून टाकले होते . त्या चिमणपाखराच्या येण्याच्या नुसत्या चाहुलीने तिच्या पंखामध्ये एक प्रेमाची उब भरून राहिली होती .ती आता आई होणार होती आणि तो बाप ! घरटे बांधताना त्यांनी चारही बाजूने जाड अशी आंब्याची फांदी राहील याची काळजी घेतली ,ते झाडही उंच असल्याने मुले वर येण्याचा प्रश्न नव्हता कारण माणसाचीच  जात आपल्याला संकट आहे याची त्यांना पुरेपूर जाणीव होती !
''चिमणे , घरटे झाले मनासारखे ! आणखी काय लागेल ग पिलाला ?''
''चिमण्या ,तू एव्हडे कष्ट घेतोस ,इथ बसून जीव व्याकुळ होतो रे !''
''अग,चिऊ तुला पण माहित आहे तू किती खपलीस आतापर्यंत घरट्यासाठी ते ? आता पिलुसाठी तर चाललंय हे ! मग का बर खिन्न होतेस ? आता तर तुझ्या आनंदाने आपल् पिलुही आनंदी जन्मणार आहे ! त्याच्या सुखासाठी तर आपण खपतोय ना ?''
''हो रे ,पण ''
''आता पण नाही नि बिन नाही ,मी चाललोय काळजी घे अंड्याची ,तो कावळा भारी खोडकर आहे ''
''बर बाबा , ये लवकर मी आणि आपल् येणारं पिलू तुझी वाट पाहू ! ''लाजत चिमणी बोलली .
    भुर्रर्र चिमणा उडाला .आज थोडे पुढे जाऊन पाहू आणखी काय वेगळ मिळाले तर आणू पिलासाठी . किती काळजी करते हि चिऊ ? तिच्यासाठी आणि पिलासाठी कष्ट घेणे काय थकवा देणार आहे त्याने तर मला आणखी  उत्साह वाटतो ! हे कसं समजत नाही तिला ? तिची काय चूक ? ती तर किती प्रेम करते माझ्यावर ! मागे असंच माझे पंख जखमी होते त्या माणसाच्या पिलाने पकडल होत मग त्याच्या कचाट्यातून बळेच जीव वाचवत निसटलो ! किती कष्ट पडले तिला पण तिचा थकवा  कधीच दाखवला नाही तिने ,उलट मला बर वाटावं म्हणून ती सतत उत्साही असायची !सगळे दाणे पण असे पौष्टिक आणायची कि दहा दिवसात ती जखम भरून आली ! अरे खाली ते पांढर काय दिसतंय त्या झाडाच्या फांद्यांना ? चल बघतोच .तो एका मोठ्या झाडावर पानामागे बसला . बऱ्याच बायका आणि पुरुष तिथे कापूस वेचत होती .तो बसलेल्या झाडाखाली एक मोठा ढीग झाला होता ,त्यावर त्या माणसाची पिले लोळत होती त्याला वाटलं हा कापूस नक्कीच मऊ असणार! अंड्याच्या खाली टाकला तर ? काड्या तरी रुतणार नाहीत चिऊला आणि पिलूला ... खूप लांब आहे पण नेउयाच ! भुर्रर्र करत चिमणा कापूस जितका नेने शक्य आहे तितका तो नेऊ लागला . चिमणी खूप खुश झाली ती मऊ दुलई पाहून! तो अनेक चकरा मारून दमला मात्र त्याचा उत्साह कमी होत नव्हता . 
''बस झालं आता ! छान दुलई आहे ''चिऊ 
''नाही ग अजून थोडे आणतो म्हणजे मग काळजीच मिटली ''
''अरे पण आभाळ लाल झालं ,उजेड संपेल आता ''
''अग् माणस तो कापूस घेऊन जातील ,आलो लगेच ''
''अरे ........''
तीच न ऐकताच तो भूर्रर्र उडाला !
तिथे सगळा कापूस पोत्यात भरून झाला होता .शेवटच पोत भरणे चालू होते ,प्रत्येकाला घाई होती घरी जाण्याची म्हणून एक एक पाटी कापसाची घाईने आत पडत होती . चीमण्याने भुर्र जाऊन आतला एक धागा उचलून उडायला आणि कापसाची भरलेली पाटी पडायला एकच वेळ ! त्यातून बाहेर येण्याचा असफल प्रयत्न .... वरून परत एक पाटी ....घुसमट .......मृत्यू .....चीउचे वाट पाहणे ...उपास ...विरह ...मृत्यू ....अंडी भेगाळलेली...पिलांचे येणे ...आई बापाशिवाय एकाकी जगणे ............

Thursday 17 November 2011

तीन दिसाचा संग तुझा!

                 देऊन गेला आसुसलेल्या माझ्या नजरेला 
            गुलाब पाण्याचा थंडावा 
            तीन दिसाचा संग तुझा!
            
            देऊन गेला रखरखत्या माझ्या शरीराला 
            थंड पावसाचा शिडकावा 
            तीन दिसाचा संग तुझा!
          
            देऊन गेला भुकेल्या माझ्या जिव्हेला 
            मधुर स्वादाच्या अनुभवा 
            तीन दिसाचा संग तुझा!


            देऊन गेला माझ्या थरथरत्या हाताला
            एक उबेचा स्पर्श नवा 
            तीन दिसाचा संग तुझा!


            देऊन गेला भरकटल्या माझ्या पायाला 
            एक रुपेरी मार्ग नवा 
            तीन दिसाचा संग तुझा!


            देऊन गेला तळमळनाऱ्या माझ्या मनाला 
            निशब्द प्रेमाचा ओलावा 
            तीन दिसाचा संग तुझा!   

मला भीती वाटते ...

     मला भीती वाटते .....जेव्हा कधी सुख हुरळून माझ्या पदराच्या दिशेने धाव घेतंय असं भासलं मी पदर पकडून बसून तशीच उभी राहिले ...सुख मात्र मला हुलकावणी देत दुसरीकडेच ...मी वेडी एका क्षणाची भुकेली पण उन वाराच मिळाला अन्न पाणी कधीच नाही ...विज्ञान शिकताना वाटायचं धन आणि ऋण सारखेच असल्याशिवाय वस्तू स्थिर राहायची नाही तसच आयुष्य असेल ...धन ऋण सारखेच मिळतील ...पण फक्त ऋण मिळूनही माझं आयुष्य इतकं स्थिर कसं आहे ! आश्चर्य आहे नाही ? मन सतत एकाच प्रश्नाचा पाठपुरावा करत असे विज्ञानाचा नियम माझ्या आयुष्यात चुकीचा का ठरला ? का मी अपवाद आहे ? अपवादाचा शिक्का घेऊन तशीच जगत आहे ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ...
    मला भीती वाटते ...कुणी दु:ख वाटून घेणारे भेटले कि त्याच्याही पाठीवर  नियतीने आसूड टाकला ...त्याचं दु:ख पाहून पाऊस डोळ्यात दाटला ...आईने  सांगितलेलं सुखं वाटावीत दु:ख स्वताची स्वतः भोगावी ...पण ती मिळायच्या आधीच ...ते कापरासारखं हवेत विरघळले तर काय करायचे हे सांगायचं आई कशी विसरलीस तू ? आताशा तिलाही विचारायची भीती वाटते...तिला दु:ख होईल म्हणून ! कापूर ओंजळीत यायच्या आधी विरघळला ...वास मात्र नाकापर्यंत आला ...त्यावर समाधान पावले ...नाही ...मनाची समजूत काढली तशी ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ...
    मला भीती वाटते ...कुणाचं सुख चोरून घेताना ...त्याचा काय दोष आहे ...ते  माझ्या प्राक्तनात नाही याचा ! शेवटी मलाच माहित वेदना काय असतात ,कशा सहन कराव्या लागतात आपल्या जवळचं ओरबाडले जाताना ! चोरी करणे पाप आहे हे पाहिलं मी समाजात जेव्हा कुणी शिक्षा भोगताना दिसलं ...माझ्या जवळचं ओढून घेणाऱ्याने ते पाप म्हणून का नाही दूर लोटलं? त्याला सुख मिळाले मला आनंद आहे ...पण ते अंगवळणी पडताना आभाळ मनी दाटलेले आहे ...पण ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ...
    मला भीती वाटते ...चुकून ,अपवादाने मिळत जेव्हा थोडं सुख ,एखादा अणु असावा जसा या भल्या मोठ्या पृथ्वीवर ! शोधत राहते अनेक गणितं मनात ठेऊन ...मिळाल्याची जाणीव होते पण बाकीचे दाखवायला टपलेले असतात ...मी कशी चूक आहे ते ... आणि सिद्धही करतात स्वताला ...मी मात्र सिद्धता शोधातच राहते ! कधी सापडेल मला ? सापडेल सापडेल मी मनाला दटावलं आहे ...पण ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ...
    मला भीती वाटते ... घामेजलेल्या माझ्या हातात जरी सुख आलं तरी नाही न जाणार निसटून ?  समुद्राच्या काठच्या त्या वाळूसारखं ...निसटतेहि ते ...मी विचार करते मी तर घट्ट आवळल्या मुठी ,मग काय बिघडलं? मला लाभणार नसेल तर का मला हुलकावणी देत हे ? प्रश्न मनात यायच्या आत ...मी त्याला समजावते गंधाळेल कधीतरी ती गुलाबी फुलांनी वाकलेली ,कागदी फुलांची वेल ! आणि सापडेल मला पाणी त्या भयानक वाळवंटात ...मृगजळामागे धावत आहे मी उर फुटेपर्यंत ...पण ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ......................... 

Tuesday 15 November 2011

अव्यक्त !

 रोजची सकाळ स्मितासाठी प्रसन्न असायची , तिला कधी नाराज आणि दु:खी कधी कुणी बघितलं नव्हत ! सतत हसतमुख आणि गप्पा मारायला तर विचारू नका , पाच मिनिटाच्या संभाषणात ती इतकी आपली वाटायची कि परत माणूस भेटल तर बोलल्याशिवाय पुढ जातच नसे ! काही लोक पाण्यात विरघळनाऱ्या साखरेसारखी तर काही पाण्यात विरघळनाऱ्या मिठासारखे असतात! मीठ खारटपणा ठेऊन जात तर साखर गोडपणा ! दोन्ही कायम लक्षात राहतात पण एक वाईट म्हणून तर एक चांगल म्हणून! तशी हि साखर होती ! तिच्या गोडपनाणे ती प्रत्येकाची गोड आठवण असायची ! 
    ज्याच्या आयुष्यात कायम एक सुरक्षित चौकट असते त्याला जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत हे जग सुंदर भासतं आणि जगातली माणस प्रेमळ! तसच स्मिताच होतं,तिला तिच्या घरात प्रेम प्रत्येक नात्याकडून मिळाले.तशी तिला नाती पण सर्व मिळाली ,आत्या ,काका ,काकी ,मावशी ,मामा ,मामी ,भाऊ ,बहिण !आणि प्रत्येक नात्याने तिला भरभरून प्रेम आणि एक सुरक्षित आयुष्य दिले ! तिला बहिस्त जगाचे खरे रूप कळलेच नव्हते ! अशी हि एक आनंदी ,समाधानी मुलगी ! तिला बाहेर जाण्याची वेळ आली ते तिच्या उच्चशिक्षणासाठी! तिथेही तिच्या मनमोकळ्या स्वभावाने तिने सर्वांना आपलसं केलं नाही तर नवल ! 
     साधारण महिन्यापूर्वी तिची एक प्रोजेक्टच्या निमित्ताने एका सिनियरशी  ओळख झाली ,सौरभ तो ! सीनियर्स मध्ये तो सुंदर आणि सुस्वभावी मुलगा ,थोडा अलिप्त आणि अबोल ! काम आणि तो बाकी तो कुणाला जवळ करत नसे ! प्रत्येक कॉलेजमधली मुलगी त्याच्याशी मैत्री करायला उस्तुक पण तो काही कुणाला वाऱ्यालाही उभं करत नसे . इतर मुलींचं त्याच्या राजबिंड्या रुपाला पाहून जवळ येणं त्याला कधी भावलच नाही ! स्मिताने मात्र त्याच्या मुलींविषयीच्या कल्पनांना छेद दिला ! तो सिनियर होता पण ती कधी घाबरली नाही तिने शेवटी त्यालाच बोलत केल! त्यांची मैत्री चार पाच दिवसात एका सुंदर वस्त्राची घट्ट विन बनली ...आणि अशी बहरली कि .... मग फोनवर गप्पा कॉलेजबाहेर भेटणे ....तासन तास बरोबर घालवले तरी स्मिताला रात्री फोनवर बोलल्याशिवाय चैन पडत नसे ! 
''स्मिता , नक्की मैत्रीच आहे ना ?'' रूममेटचे प्रश्न ! 
'' तुम्ही दुसरा विचार करूच शकत नाही का ?''
''नाही ग ,रागावू नको पण तुझी ओढ पहिली कि वाटत ...''
''नको काही वाटून घेऊ , आम्ही फिरतोय म्हणजे मी त्याला आपल शहर दाखवत आहे . तो लांबचा आहे त्याच्या कंप्लीशन नन्तर तो आता जाणार आहे आणि परत नाही येणार ! आम्ही फक्त चांगल्या आठवणी गोळा करतोय ओ के ''
'' सॉरी पण जपून राहा .''
''बर येऊ ,त्याला रिझर्वेशन करायचं आहे उशीर होत आहे ,परवा जाणार आहे सौरभ ,बाय !''
धावत ती बाहेर आली तर सौरभ होताच . दोघांनी रिझर्वेशन करून पायीच रोडवर चालत राहिले ! दिवस मावळला पण त्यांचे पाय थकले नाहीत कि गप्पा संपल्या नाहीत ! रात्री हॉस्टेलवर जाताना ती अस्वस्थ होती पण तिला वाटायचं तो परत भेटणार नाही म्हणून कदाचित ... पण उद्याचा दिवस येउच नये आणि रात्र संपूच नये अस वाटतंय रे सौरभ हे तिने फोनवर त्याला सांगितलं .या विचारांमध्ये कधी झोप लागली ते तिला कळलेच नाही !
   सकाळी जडावलेल्या डोळ्यांनी ती उठली .आवरून कॉलेजमध्ये गेली.सौरभ आज रात्री आठच्या बसने जाणार होता म्हणून दुपारचं जेवण ते एकत्र घेणार होते . जेवताना त्याने मराठी गाण्यांची एक सी डी त्याने तिला भेट दिली . सतत बडबडणारी स्मिता शांत होती आणि सौरभ अस्वस्थ दिसत होता .....त्यांची दुपार अशीच अबोल गेली पण या अनामिक ओढीचा उलगडा मात्र तिला झाला नाही ....
  त्याचा प्रवास लांबचा म्हणून मध्ये काही खाऊ नकोस मी तुला डबा देते अस तिनेच बजावलं त्याला ! डबा घेऊन सात वाजता ती पोहचली सौरभ आलाच होता त्याचा मित्र होता बरोबर ,तिने डबा दिला आणि गाडी येण्याच्या दिशेने पाहू लागली .
'' आज बोलणार नाहीस , बडबडीच यंत्र बिघडल का ?''
''तू थांबू नाही शकत ?'' डोळ्याच पाणी पुसत तिने सवाल केला .
''तस काही कारण नाही ना ?''
''कारण शोधलं तर सापडेल कि !''
''नाही ग पण आई बोलावते आहे ''
''मीही थांब म्हणते ना !''
''सौरभ बस आली '' मित्राने आवाज दिला .मित्रानेच त्याच समान उचललं आणि गाडीत ठेवलं.
'' तू खरच थांब म्हणत असशील तर थांबतो '' सौरभ !
''नाही रे '' ती 
''चला बसा लवकर '' बस ड्रायव्हर 
सौरभने तिच्याकड पाहिलं तिचे पाणावलेले डोळे बघून तोही अस्वस्थ झाला ... तिने एक गुलाबाचं फुल दिल ...त्याने घेतलं ...
''थांबू का ?''
  कस सांगणार होती थांब म्हणून तीच प्रेम आहे हे कळल तिला ...पण त्याच काय त्यालाही वाटत असेल असंच ...नसेल तर ? तस नसेल तर ...तो काय विचार करेल माझ्याबद्दल ! नको व्यक्त व्हायला ...नको ....
''बाय ...''तिच्या नकळत ती बोलून गेली ...बस गेली ...ती पाठमोऱ्या बस कडे न पाहताच झप झप पावले टाकत ती निघाली  .... बेडवर पडून खूप खूप रडली ...रूममेट समजली काय ते !

Thursday 10 November 2011

मेसेज

       धापा टाकत प्रतिभा पळत होती ....शेवटी एकदाची रेल्वे सापडली ती घाईने आत चढली पण क्षणात थोडी नर्व्हस झाली कारण तो डबा महिलांचा नव्हता . बसण्यासाठी जागा नव्हती ती उभीच होती . धावत येऊन रेल्वे पकडल्याचा आनंद मिळायच्या आधीच नव संकट दत्त म्हणून उभं! का असं होत असेल? कधी असं वाटत नकोच ती सुखं जी नवीन अवघड वाटेची चाहूल असतील ! कष्टाने मिळवलेल्या एखाद्या वस्तूचा वापर करायच्या आधीच ती बिघडावी ! जे मिळवलं ते कधी लाभलच नाही ! सटवाईने माझ्याच कपाळी असं नशीब का लिहावं ? जसं कळायला लागलं तसं प्रतिभाने हा प्रश्न अनेकदा स्वत:ला विचारला पण उत्तर कधी मिळाल नाही ! पण ज्या प्रश्नांची उत्तरे नसतात तेच प्रश्न माणसाला जास्त प्रिय !  
       पुढच्या स्टेशनला उतरून डबा बदलायचा हे ती ठरवून होती. म्हणून ती दरवाजाजवळ जाण्याच्या विचारात होती .पुढे सरकायला लागली तर पुढचा तरुण तिला पुढे जाऊ देत नव्हता,मागचा मागे सरू देत नव्हता . तिला दरदरून घाम फुटला ,हात पाय लटलटू लागले, संपूर्ण शरीर क्षणात घामाने ओलं होऊन एकदम थंड पडलं! पुढचा मार्ग ...विचार करायच्या आधी एकाने तिच्या कमरेला हात घातला, जिवाच्या आकांताने तिने तो झिडकारला पण ...तिचा जीव तो काय असणार दिवसातून एक चपाती फक्त ! तितक्यात पाठीमागून एक तरुण पुढे झाला आणि त्याने चौकडीला बाजूला व्हा म्हणून खुणावलं . 
''काय रे , कोण तुझी?''चौकाडीतल्या एकाने उर्मटपणे सवाल केला . त्याचा प्रश्न पूर्ण होण्याच्या आत एक दमदार ठोसा त्याच्या तोंडावर बसला ,नाकातून रक्त वाहायला लागलं , त्याची मानगुट धरून त्या तरुणाने स्वतःच आय कार्ड त्याच्या समोर धरलं.
''माफ करा साहेब .'' इतकाच बोलून तो बाजूला झाला. प्रतिभा मात्र थरथर कापत होती डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते . त्या तरुणाने पुढे होऊन तिला खिडकीजवळ जागा करून दिली आणि तो तिच्या शेजारी बसला.ती पुरती गर्भगळीत झाली होती ,अजूनही थरथर थांबत नव्हती .
'' मी इंस्पेक्टर अमोल गायकवाड, तुम्हाला भिण्याचे अजिबात कारण नाही , मी मुंबईपर्यंत आहे तुमच्या सोबत ,शांत व्हा !''
''धन्यवाद !'' इतकच बोलू शकली प्रतिभा , आणि डोळे पुसत बाहेर पाहू लागली. मनातलं काहूर मात्र अजून शांत होत नव्हत. आई आजारी पडली आणि सर्व कामे हि थोरली असल्यामुळे हिच्या अंगावर पडली ,पण तिने कधी ओझं मानलं नाही ,कर्तव्य समजून तिने सर्व जबाबदारी पेलली . काम बघून तिने पदवी संपादन केली . आईच आजारपण , प्रदीप आणि पल्लवीचे शिक्षण ,बाबांची नोकरी सगळं ती आत्मीयतेने करत होती ! स्वतासाठी मात्र तिच्या आयुष्यात जागा नव्हतीच ! इतर मुलींप्रमाणे तिला स्वप्नात राजकुमार कधीच दिसला नाही ! स्वप्न पडायला झोपच कधी पूर्ण झाली नाही...पदवी पूर्ण झाल्यावर तिला वाटायचं काहीतरी कोर्स करावा म्हणजे एखादी नोकरी बघता येईल ,तेव्हडाच हातभार ! आता पल्लावीची मदतही होत होती तिला, पण नियतीला काही वेगळच करायचं होतं...एक दिवस बाबा अपघातात गेले ...ती खूप खूप रडली ...प्रदीप ,पल्लवी आणि आई यांच्याकडे पाहून पुन्हा उभी राहिली ! बऱ्याच प्रयासाने तिला बाबांच्या जागी ,अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळाली ....पण रोज पुण्याला जा ये करावं लागणार होतं ! पण ती कुठल्या कष्टाला पाहून मागे फिरणार नव्हती !
''एक्सक्युज मी , हा घ्या चहा, पाणी देऊ का ?बर वाटतंय का आता ?''
''हो , बर वाटतय ,आणि नको आभारी आहे !''ती भानावर येत उत्तरली .
''अहो घाबरू नका ,मी काही गुंगीच औषध नाही देत तुम्हाला ,कमीत कमी समाजाचा रक्षक म्हणून तरी विश्वास ठेवा !''अमोल हसत बोलला .
''नाही हो ,तसं नाही पण मी चहा घेत नाही ,आणि मी कशाला अविश्वास दाखवेल ? उलट तुम्ही माझी खूप मदत केली आहे ,तुम्ही नसता तर ...''तिचे डोळे परत पाणावले .
''प्लीज रडू नका बुवा ,आणि एकदा चहा पिऊन तर बघा कसं फ्रेश वाटतंय ते .''
''बर घेते !'' हसत प्रतिभा उत्तरली.
''तुम्ही रोज अप डाऊन करता का ?''
''हो ''
''मी ,सुटी असल्यावर जातो घरी , तेव्हडाच आईला आनंद होतो , तू नाही आलास कि घर खायला उठत म्हणते !''
''तुम्ही कुठ असता ?''प्रतिभा कुतूहलाने विचारू लागली .
''शिवाजीनगर पोलीस स्टेशन !''
''काय , मीही तिथेच आहे ,वेधशाळेत क्लार्क आहे .''
''गुड , भेट होणार म्हणायचं आपली परत !''
''हो ''
''काही आक्षेप नसेल तर नाव समजेल आपलं?''
''नक्की , मी प्रतिभा,प्रतिभा कदम. ''
''छान !''मनाशीच हसत अमोल म्हणाला .
''काय ?''
'' काही नाही, कोण कोण आहे घरी ?''
''आई ,छोटा भाऊ प्रदीप ,बहिण पल्लवी ''
''वडील ?''
''ते सहा महिन्यापूर्वी अपघातात गेले .''
''ओ नो .''
.
.
.
मग दर शनिवारी ते एकत्र येऊ लागले आणि सोमवारी एकत्र जाऊ लागले!प्रतिभा अमोलच्या आई बाबांकडे जाऊ लागली .अमोलनेही तिच्या घरच्यांशी जवळीक केली . एका छोट्या ओळखीच्या बीजाचे रुपांतर प्रेमाच्या एका सुंदर वेलीत कधी झाले ते दोघांना उमगलेच नाही ...आज सुट्टी आहे म्हणून अमोलच्या आई तिच्या आईला भेटायला येणार होत्या . तिने हि गोष्ट फक्त आईला सांगितली होती .ती घर नीटनेटक आवरून आईजवळ बसली ,तितक्यात पल्लवी पळत आली ,''ताई अमोल आलेत !'' आणि एक चिमटा काढून वेडावत पळून गेली . त्यांच्यातल्या नात्याची चाहूल आता मुलांनाही लागली होती . आणि म्हणूनच आईला प्रतीभाच्या लग्नाची घाई झाली होती ,तसं ती म्हनालीही होती प्रतिभाला ! 
''येऊ का आत प्रतिभा ?''अमोलच्या आईच्या खणखणीत आवाजाबरोबर प्रतिभा घाईने बाहेर आली .
''या ना आई .''
''आणि मी '' अमोल पुढे होत बोलला. त्याला पाहून उगाचच रेल्वेचं इंजिनाची धडधड छातीत जाणवली, रोज ती त्याला भेटायची पण आजच्याइतकी अस्वस्थता तिला कधी जाणवली नव्हती. चहा -पाणी झालं,अमोलच्या आई तिच्या आईची चौकशी करत होत्या .इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या .अमोल मात्र एकटक तिच्याकडे पाहत होता आणि ती कधी नजर टाकत होती आणि कधी चुकवत होती ,पायाच्या अंगठ्याने उगाचंच फरशीवर घासत होती . 
''प्रतीभाची आई , मी आज वेगळ्याच कारणासाठी आले आहे .''
''बोला न ताई '' आईने अजीजीने विचारले .
''मी अमोलसाठी प्रतिभाला मागणी घालायला आले आहे  , हा पण तुम्हाला काही आक्षेप नसेल तर !''
''नाही हो , आक्षेप कसा असेल !''
प्रतिभा मात्र विस्मयाने अमोलकडे पाहू लागली ,हे होणार याची तिला कल्पना होती पण असं अचानक ...
    प्रदीप बाहेरून आला .आईने त्याला जवळ बोलावून दुपारचा प्रसंग सांगितला .सर्वांना तो खुश होईल अशी अपेक्षा होती पण तो काहीच बोलत नव्हता आणि खाली मान घालून बसला .प्रतिभा किचनमध्ये होती तिला ऐकू जाईल अस मोठ्याने प्रदीप आईला बोलू लागला ,''मला वाटलच हि असंच स्वार्थ साधणार ,तीच झालं ! आपलं काय ? बाबांच्या जागी हि लागली कामाला, लग्नानंतर पगार देणार नवऱ्याला , माझी पदवी झाली पण नोकरी नाही ,तुझं आजारपण काय करायचं सांग ?''
''अरे प्रदीप ,असं का बोलतो ? तिने काय असंच रहायचं का ? एकदा वय झालं कि कोण करणार ताईशी लग्न ? चांगल स्थळ आहे ! आणि लागेल कि तुला नोकरी ? ''
''कर काय करायचं ते , शेवटी मीच वाईट !भीक मागायला लागेल तेव्हा कळेल ?'' तावातावाने तो बाहेर निघून गेला . प्रतिभाचा सकाळपासून फुललेला चेहरा क्षणात काळवंडला. पुन्हा तोच प्रश्न तिला सतावू लागला.मीच का ? आज तिचे अश्रुही आटले होते . ज्यांच्यासाठी कधी सुखाला जवळ फिरकू दिल नाही ,त्यांनी असं बोलावं! का मला सुख लाभत नाही ? आता कुठे खळखळून हसायला शिकले होते तर ...क्षणात विचार आला सांगाव अमोलला नको म्हणून ...नको ते सुख मला ...फोन हातात घेतला ,तर अमोलचा एक मेसेज आलेला -
  Treat every one wid love ,
   Even those who hurt u ,
   Not b'coz they r not nice,
   Simply b'coz u r not bad....!!!
मेसेज वाचून तशीच उशीत डोक खुपसून रडू लागली...मनमोकळ ...तिने लगेच अमोलला फोन केला. 
''हेलो ''
''हाय स्विटी!''
''मी हि नोकरी सोडली तर चालेल ?''
''मीही तेच सांगणार होतो तुला ! आणि हो ती जागा प्रदीपला मिळवून देऊ म्हणजे त्याच्या नोकरीचा प्रश्न सुटेल !''
''थांक्यू अमोल ,आता माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे ...आता माझ्या आयुष्यात फक्त सुखच येणार आहे ...हो न अमोल ?''
अमोल काही अर्थबोध झाला नाही पण तो ठामपणे उदगारला ,''नक्की स्विटी ,अगदी नक्की ...मी तुला फक्त सुखच देणार आहे !''

Sunday 6 November 2011

काट्याच्या झाडावरचं फुल

           रुतणारे दगड आणि बोचणारे काटे संपतील का कधी? जीवनाशी पैजा  घेत चालतेच आहे एका निवाऱ्याची आणि निवांत विसाव्याची वाट बघत ..... देवालाही साकडं घातलं दे मला प्रेमाचा पाऊस ज्यात भिजून आत्तापर्यंतच्या वेदना ,थंडाव्यासाठी आसुसलेल्या, तुझा स्पर्श होताच उडून जाऊ दे त्या रुईच्या म्हातारीसारख्या माझ्या दृष्टीपलीकडे .........पण तोही नाही बरसला ....वाटल असेल काही काम माझ्याही पेक्षा गरजेच ...कदाचित माझ्याही वरचढ असेल त्याचं दु:ख ....परत येशीलच कि .... मी वाट पाहीन ...तसंही वाट पाहून मिळालेलं सुख किती गोड असतं ते त्या चातकानी सांगितलं होत मला ! या उल्हासित आठवाणे परत व्यापून टाकल मन माझं...बारा महिने नाही त्याही पेक्षा जास्त प्रतिक्षेची तयारी केली त्याने ! त्या रसभरीत स्वप्नांनी प्राण पेरले कणा कणात ! उद्या नक्की माझ्या दारात सुखाचं झाड उगवणार होत ! स्वप्नांच्या या गरुडावर स्वार होऊन कधीच गेलं ते विश्वाच्या भ्रमनासाठी! त्याला वरून सगळ सुजल सफल दिसत होत ! थंडगार आंब्याचं झाड , रसरसलेल्या फळांनी बहरलेलं, वाटलं जावं जवळ त्याच्या ...गेले तिथं एका फांदीवर विसावलेही ...भळभळ वाहणारी जखम तिथेही होती ...विचारलं त्या आंब्याच्या झाडाला ....इतका सुखी तू रसरसलेली फळ आणि थंड हिरवी पान काय दु:ख आहे तुला ? माझ्या फळांसाठी मारतात दगड मुलं आणि करतात रक्तबंबाळ मला .. या जखमा वागवत मीही मोठा झालो ! लहान असताना वाटायचं फळ आल कि काय सुख पण आता ....कधी फळे संपतील याची वाट पाहतोय .........डोळ्यांच्या कडा पुसत उठले ! परत जागेवर आले ...आता ठरवलंय नाही वाट पाहणार सुखाची ,प्रेमाची ....जर भेटणार असेल याहीपेक्षा मोठी वेदना तर नको कोसळू पावसा ...आज उमलेलं फुल उद्या सुकनारच कि ! म्हणून जगून घेणार आहे मी आज ....आता ठरवलंय त्या दगडांना आणि काट्यांना कवेत घेऊन खेळणार आहे त्या वाऱ्याशी ! आणि झेपावणार आहे आभाळाकडे त्यालाही कधीतरी दया येईलच कि ..........
         

Saturday 5 November 2011

पिसाळलेला

      धाय मोकलून रडत होती सुनिता .काय करणार कारभाऱ्याला काय बी उप्योग होणार नाही म्हनत्यात दागदर. आस कस होईल म्हणावं त्यास्नी? सकाली त चांगला व्हता पाणी गीलता नाय येत म्हणत व्हता . आस काय बाय बरलत सुनिनी आख्खा भिलवाडा गोला केला ....दिउरुसी म्हणत व्हता त्यो वड्याला गेला तवा त्या बुडून मेल्याल्या किसन्यानी त्येला झपाटला इयक कोंबड आन रोट टाकायला सांगितला त्ये बी केलं पर आज त्येस्नी पाणी बी गली उतरणा मग मालक ऐकना त्येनी गाडीवर टाकला नी दवा आणायला नेला पर आस कसं दागदर म्हनत्यात त्येचा उल्गाडा तिला होत न्हवता ती मोठ्यान रडून झुम्बरीच्या गळ्यात पडत व्हती आन कारभारी मातूर सव्ताला घरात डांबून घेऊन अंधारात जाऊन बसत व्हता . मधीच पाणी मागायचा नी कुणी गिलास फुड केला कि मोठ्यान आरडत दारामाग लपायचा.........
       म्हाद्या भिल कामाला वाघ गडी, पाहिल्यापास्न एकाच मालकाकड टिकून व्हता . मालक बी त्येच्यावर सगळ काम टाकून निर्धास्त व्हता .त्येच्या या इमानापायी मागल तवा मालक पैका देयचा. सुनी आन त्येची आय , कवा पटल नाय म्हणून मोठा पोरगा भाऊ झाला आन त्येनी वायली चूल मांडली . नन्तर त्येला मनी , संत्यु आन भिंगरी झाली . सगल्या पोरास्नी त्यो सालत धाडीत व्हता . सवता मरुस्तवर काम करायचा पर पोरास्नी कवा कुणाचा बांध चढू दिला नाय त्येनी .
        पंधरा दिस झालं उसाचं पाणी रातभर देऊन म्हाद्या घरी निगाला तवा कायतर पायास्नी मऊ लागलं कुई आवाज आला त्यो बी लई बारीक खाली नजर गिली त एक कुत्र्याच पिलू .. का कुणास माहित पर त्येला दया आली  नी त्येनी त्ये पिलू घरी नेलं त्येस्नी भाकर टाकली ,पाणी पाजल. भिंगरी पळत आली आन पिलासंग खेळाया लागली . भाऊ ,मनी बी गोला झाली . म्हाद्यानी तवर सगळ आवरून भाकर खाल्ली आन संग भांधून बी घीतीली . बाहीर आला त सगळी पोरं त्या कुत्र्याला छळीत व्हती त्येनी पोर हाकाल्ली पिलू झापाखाली झाकून कामाला गेला . दुपारी आला त मनिनी पिलू काढाल व्हतं पिलाच तंगड धरून वढीत व्हती त्ये पिलू मातर किविलवान क्या क्या करीत व्हतं . मनी तंगड वढायची आन संत्या कान वढायचा आता पिलू गुरगुर कराया लागल आन वाचकून संत्याला चावल संत्यानी सोडलं त मनिला चावल . मनिला चावल म्हणून महादूनी धरून फेकाया लागला त त्येला बी धरलं कि ! संत्यानी एक चिपाड आणल आन कुत्र्याला माराय लागला कसं बस सुनिनी त्ये सोडावल आन झापाखाली डालल. सगळी जिकड तिकड झाली . सुनिनी सांजच्याला झापाखाली थुडी भाकर आन पाणी सरकवलं . 
     सकाळ्च्याला सालत जायच्या आन कामाला जायच्या घाईत कुणी कुत्र्याकड फिरकल नाय आन कालचा राग आन भ्याबी होतंच कारण पिलू बारीक व्हतं पर लचक चांगलं मोठ काढाल व्हतं! सुनीच काम आवरलं , कुत्र्याच ध्यान झालं म्हनुन्श्यान झाप काढला त कुत्र गपगार , हलून बघितलं पर त्ये काय हलणा . दुपारी महादू आला त्येला दाखिवल . महादुला त्ये बघून घाम फुटला . त्येनी काय ते वलिकल . त्याच पायी मालकच घर घाटल आन मालाकाकून पैका घितला . मनी आन संत्याल्या संग घेऊन तालुक्याचा दवाखाना गाठला . पैका कमी पडला म्हणून त्येनी संत्या आन मनिला सुई घीतली त्यो मातूर तसाच आला . आज उद्या करून त्येची सुई घियाची राउन गिली . कामाच्या नादात त्यो बी इसरून गेला . 
       पाच दिसापासून त्यो खायचा कमी पडला . सुईच्या भ्यापायी इलाज कराय नको म्हणायचा . मालक सवता नेतो म्हणाला पर ह्यो काय गेला नाय . सुनिनी भगत बी केला पर म्हाद्या काय उलगडणा . दार लाऊन बसाय लागला ,पाणी घिना मग मालकांनी गाडीत टाकला आन दवाखान्यात नेला . गाडीत बसला पर डोळ् खुल करून उजेड त्येन बगितला नाय . दागदरनी तपासला आन सुनीला इचारल कुत्र चावल व्हत का ? सुनी म्हणली हाव चावल व्हत कि !  दागदरनी मालकाला आत बोलून सांगितलं त्यो पिसाळलेला हाय , एक दिवस फक्त !
         मालकांनी घरात आणून टाकला ,सुनीच्या हातात पैका ठीवला आन डोल्यास्नी पंच्या लाऊन निगुन गेल ...सुनी मातर आरडत व्हती , म्हाद्याला  भान नव्हत ,पोर टकामका बगत हुती आन भिलवाडा वाट बगत व्हता म्हाद्या कवा मरायचा ... त्येंना माहीत व्हत ह्यो चुकून आपल्याला चावला त आपल बी काय खर नाय . एक म्हातारी उठली आन दाराला भाहीरून कडी घातली आन सुनिजवळ येऊन बसली ....

Wednesday 2 November 2011

भारतीयाला अभिमान वाटावा अस काही

बऱ्याच दिवसानंतर एक चांगलं पुस्तक हाती लागल आहे 'किमयागार ' ! अच्युत गोडबोलेंनी पहिल्या लेखात प्राचीन भारताचे विज्ञानाला असलेले  योगदानाचे वर्णन केले आहे . त्यातील काही गोष्टी माहित आहेत पण त्याचा  पूर्ण इतिहास वाचताना आश्चर्य तर वाटतेच पण उस्तुकता ताणली जाते . आपल्या पूर्वजांचे हे विस्तृत ज्ञान तेही इतर जगाच्या आधी! अभिमान वाटतो .
    इ.स .पूर्व १५०० या सुमारास लिहिली गेलेली 'शल्वसुत्रे' या शल्वसुत्रांमध्ये पायथागोरसचा सिद्धांत लिहिलाय , पाय ची किंमत सांगितली आहे पण कारण दिलेलं नाही . महर्षी कणाद यांनी ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात अणुविषयी तर्क केले होते . शून्याची कल्पना भारताने जगाला दिली आहे ! पाचव्या शतकातील आर्यभट्ट यांनी पृथ्वी गोल आहे ,स्वताच्या अक्षाभोवती फिरते आणि सूर्याभोवतीहि फिरते हेही जगाच्या आधी सांगितलं विशेष म्हणजे पृथ्वीचा परीघ त्यांनी गणिताने काढला (३९७३६किमी) आज तो ३९८४३किमी इतका आहे ,याच्याही पुढे जाऊन एका वर्षात ३६५ दिवस ,६ तास ,१२ मिनिटे आणि ३० सेकंद असतात हेही काढाल होतं!
      याशिवाय १२ व्या शतकातील भास्कराचार्य यांचेही गणितात खूप मोठे योगदान आहे ! वैद्यकीय शाखेत आयुर्वेद तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेते ! वेदकाळातील विद्यापीठे ,तक्षशिला,नालंदा आणि वाराणसी !
        लेखकांनी याविषयी आनंद व्यक्त केला आहे पण यानंतर आतापर्यंत खुंटलेल्या प्रगतीबद्दल खेदही व्यक्त केला आहे !