मी आणि सत्योम असे
लिहिणे मला तसे अचानकच सुचले . तेही असे काही प्रसंग घडतात आमच्या दोघा माय
लेकरामध्ये कि लगेच कुणालातरी सांगावे असे वाटते . आज घडलेली गोष्ट उद्या आठवण
होईल , उद्या तो मोठा होईल कदाचित थोडे अंतर निर्माण होईल पण आजचा माझ्या अवती
भोवती घुटमळत फिरणारा माझा बाळ मला नक्कीच सदैव हवासा वाटेल ! जीवनातले सुखाचे ,
व्याकुळतेचे , रागाचे , भांडणाचे हे क्षण स्मृती बनून राहतील . पण हे अमृत माझ्या
मनात सतत जगण्याची आशा निर्माण करील , वेदनेच्या क्षणी फुंकर घालून थंडावा देतील ,
असे हे कधी त्याला मी शिकवलेले तर कधी त्याने मला शिकवलेले अमृतमय प्रसंग लिहून
ठेवायचे हे आणि पुन:पुन्हा ते वाचून त्या वेळेत जावून जगायचे ,किती सुंदर न !
पुन:पुन्हा आई व्हायचे ! आनंदाचे पंख लावून पुन्हा आभाळात उडायचे !
लहरेन मी , बहरेन मी
शिशिरातुनी उगवेन मी
एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन
मी
मस्त आहे न कल्पना ?
आज सकाळी लवकर उठले , आधी डबे करून मग
सत्योमसाठी आवरायला कमीत कमी एक तास तर लागतोच , म्हणजे सात वाजेपर्यंत डबे तयार
होणे गरजेचे ..आज लाईट जाणार लवकर मग अंघोळ उरकून मग डबे करावे हा विचार केला ,
आणि अंघोळ आवरली पण आता साडे सहा झाले उरकेल का डबा? झाली घाई चालू .. भाजी चपाती
दोन डब्यात आणि उरल्या एक डब्यात साबुदाण्याची खिचडी द्यायचे रात्रीच ठरले होते .
तसा साबुदाणा भिजत पण घातलेला .. भाजी उरकली ...पण आता सात वाजले ..
कसे आवरायचे याच
विचारात होते मी ,तो मागे येवून बसलेला मला कळलेच नाही .
माझे लक्ष नव्हते
..मग हळूच तो मागे आला आणि कमरेला मिठी मारली .. “अरे माझा ननुबाळ उठला ग माझा
पिल्लू , पण आवरा आता उशीर झाला खूप आधीच ..”
“थांब कि ग मम्मी..”
लाडात येवून म्हणाला , पण आता वेळ खूप थोडा होता त्याचे ऐकून जमणार नव्हते .
“सांगितले न आवर
म्हणून ..”खोट्या रागाने मी ओरडले ..मग मात्र घाईने ब्रश करायला स्वारी पळाली..
मला हसू आवरेना पण मोठ्याने हसले तर परत रुसून बसायचा म्हणून दाबले . मला आता वेळ
खूप कमी होता , बटाटा चिरून मग खिचडी बराच वेळ लागेल म्हणून ब्रश करून आलेल्या
पिलूला विचारले , “बाळा आज खिचडीत बटाटा नसेल तर चालेल न रे ?”
“टाक न ग बटाटा ,
शाळेत मुले नसतील तर कसे दिसेल सांग बरं?”
“रिकामे दिसेल ,
त्याशिवाय शाळेला अर्थच नाही”
“मग मम्मी
बटाट्याशिवाय खिचडी पण तशीच दिसेन कि गं”
पिलूचे हे शब्द ऐकले
आणि गुपचूप बटाटा चिरायला घेतला ...