या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday 30 March 2015

एक खांदा हवा



मलाही एक खांदा हवा
अश्रूंनी भिजवण्यासाठी
मरगळलेल्या मनाला
परत रिझवण्यासाठी...

धुत्कारल्या माझ्या जीवाला
विस्कटलेल्या या बटेला
विखुरलेल्या त्या माळेला
परत सजवण्यासाठी
मलाही एक खांदा हवा
अश्रूंनी भिजवण्यासाठी...

दु:खाला देण्या एक स्वल्प
उद्याच्या सुखाचे संकल्प
स्वप्नांचे रेखीव शिल्प
परत बनवण्यासाठी
मलाही एक खांदा हवा
अश्रूंनी भिजवण्यासाठी...

सृष्टीने दिलेलं औदार्य
अस्ताला निघालेला सूर्य
सोडून चाललेले धैर्य
मनी एकवटण्यासाठी
मलाही एक खांदा हवा
अश्रूंनी भिजवण्यासाठी ...
               -संध्या §

Sunday 1 March 2015

भांडण

   दिवस उगवताच आग ओकत येणारा दिनकर , धुलीकणांनी मलीन झालेल्या वृक्ष वेली , तप्त अशी मृत्तिका आणि इकडून तिकडे तहानेने व्याकुळ होवून पळणारे सजीव , वसुंधरेचे काळीज उद्विग्न करीत होते . पाखरांचे थवेच्या थवे झाडांच्या पानांची सावली शोधून दमून शेवटी माणसाच्या घरांचा आधार घेत होते . ते पण थोडा वेळ लगेच कुणी त्यांना तिथून हाकलून काढीत होते . असा क्रोधीत होता दिनकर कि दुपारी तर डोक्यात , पोटात , अंगावर आणि संपूर्ण सृष्टीवर जणू रखरख पेरीत होता . धुलीकणांनी कोंडलेले श्वास वृक्ष वेली जबरीने मोकळा करण्याचा असफल प्रयत्न करीत होती . कधी पवनाची कृपा झाली तर थोडा श्वास कसातरी मोकळा होत होता . आटलेले तलाव , नद्या अंगावरच्या भेगा सावरीत कशीतरीच दिसत होती . भेगाळलेल्या जमिनी कोरडा टाहो फोडीत होत्या… वसूचे काळीज अधिकच हळवे करीत होत्या ! थंडीच्या दिवसात इतका प्रेमळ असणारा दिनकर , त्याचा अचानक असा क्रोधाग्नी का भडकावा हेच तिला उमगत नव्हते . प्रेमाच्या गुलाबी थंडाव्यासारखा त्याचा क्रोधही सोसला असता तिने , परंतु लेकरांचा जीव घेणारा हा कसला राग ? लेकरे तर त्याचीही न ? मग ? कुठला बाप असा रागवत असेल कि स्वत:च्याच पिलांना होरपळून मारीत असेल ? तिच्या जीवाची मात्र खूप खूप उलघाल चालली होती . त्याला का असा वागतोस असे विचारले तर उगीच अधिक क्रोधीत व्हायचा … मन व्याकुळ झाले होते पण नेत्रात टिप्पूस उतरावा इतकेही जल तिच्यात बाकी नव्हते . किती हा क्रोध … बस करा दिनकर बस करा … नाही नाही आता गप्प बसून चालणार नाहीच … बोलावेच लागेल आपल्या लेकरांसाठी तरी बोलावेच लागेल … ते बाप असतील पण मी आई आहे … माझे हृदय फाटणार न त्या लेकरांची टाहो ऐकून ?
"दिनकरा , दिनकरा … का असे क्रोधीत झालात दिनकरा ?" डोळ्यात प्राण आणून वसूने शेवटी विचारलेच.
"तू मला विचारतेस वसू ? मला ?" कपलावरच्या रेषा अधिकच दीर्घ करत दिनकर तिच्यावरच प्रश्न फेकू लागला . तप्त झालेली वसू आता खूपच हळवी झाली … डोळ्यातील आर्जवे तो वाचू शकत होता , त्याने तो घायाळही झाला पण त्याचा क्रोध त्याहीपेक्षा जास्त होता .… तिच्या प्राणप्रियाला तिची तगमग समजू नये याचे अतीव दु:ख तिला कातर कातर करीत होते . तिचा श्वास अधिक अधिक वाढू लागला . पण येणारा तो वाराही तप्तच येत होता आणि तडफडणाऱ्या जीवांना जास्तीच वेदना देत होता . तिचा दोलायमान झालेला जीव शेवटी लेकारांपाशी येवून स्थिर होऊ लागला …. आणि कठोर होत तिने शेवटी त्याला प्रतिप्रश्न केलाच ,
"दिनकरा तुम्हाला नाही दिसत तुमच्या क्रोधाग्नीने होरपळणारी तुमची लेकरे ? त्यांचा जीव घेवूनच थांबणार आहात का तुम्ही ?"
"वसू तू मला भावनेच्या आहारी घालू नकोस पण आज जे ते भोगत आहेत त्यांच्याच कर्माची फळे आहेत , आणि इथे जर समज नाही दिली तर ते तुलाही घेवून नष्ट होतील ." क्रोधीत दिनकर हळवा झाला होता आणि त्याचे वसूबद्दलचे प्रेमच त्याला असे करणे भाग पाडत होते …
"माझ्या लेकरांसाठी माझे सर्वस्व संपले तरी चालेल मला ! आणि असेही त्यांच्याशिवाय अर्थच काय आहे हो धरेला ?" वसू फुरंगटून बोलली .
"वसू …. मातृप्रेमाने अंध होवून जावू नकोस … तुझा शेवट व्हायच्या आधी त्यांचा शेवट आहे मग तूच ठरव या स्वार्थी मानवासाठी तू आपल्या इतरही लेकरांचा बळी देणार आहेस का ?" क्रोधाने थरथरत दिनकर जवळजवळ ओरडलाच . त्याच्या ओरडण्याने कंपित होत वसुही अधिकच हट्टाला पेटली .
"म्हणजे मानवाने सारे केले … असे म्हणता … इतर लेकरांनी का भोगावे म्हणता आणि स्वतः काय करता हो … मानवाच्या आधी बाकीच्या जीवांनाच तुम्ही आधी वेठीस धरले आहे … आणि लेकरू चुकले म्हणून तुम्ही त्याचा जीवच घ्यावा हा कुठला न्याय ?"
"वसू … न्यायाची गोष्ट मला शिकवू नकोस … तू फक्त बघत राहा थोड्यांच्या जाण्याने जर सार्यांना सुख मिळणार आहे तर त्यासाठी थोड्यांचे बलिदान द्यायलाच हवे …." 
"मी माझ्या जीवात जीव आहे तोवर असे नाही होऊ देणार … मग तुम्ही दुरावलात तरी चालेल मला !" कठोर शब्दात वसूने दिनकरला ऐकवले खरे पण आतून ती उसवत चालली होती , तिचे हृदय आक्रंदत होते … प्रियाच्या विरहविचारांनी विदीर्ण होत होते …. वरून वज्राप्रमाणे कठीण दिसणारी वसू आतून ढवळून निघाली होती … परंतु लेकरांसाठी असेही निर्णय घ्यावे लागतीलच … स्वतःच्या प्रेमाचा बळी द्यावाच लागेल … नाही नाही मी आता माझ्या पिल्लांना न्याय मिळवून देणारच …
"वसू … वसू अशी नको करू … अग मी का कुणी त्यांचा शत्रू आहे …. ठीक आहे … जशी तुझी इच्छा . पण एक लक्षात ठेव माझ्याशिवाय तुही जिवंत राहू शकणार नाहीस आणि तुझी माझी पिलेही … "आधी हळवा झालेला दिनकर पुन्हा कठोर होऊन तिला धमकावत बोलला .
"तुमच्यासोबत राहून मरण्यापेक्षा तुमच्याशिवाय मरणे पत्करू आम्ही … कमीत कमीत बापाचा आधार नव्हता म्हणून जीव गेला असे तरी म्हणतील सारे !" रागाने थरथरत असलेली वसुही आता प्रत्येक शब्दाला शब्द फेकत होती .
"तुही माणसाच्या स्रीसारखी वागू लागलीस न ? पण लक्षात ठेव या साऱ्या विनाशाला माणसाच्या मुर्खपणासारखे तुझे आंधळे प्रेमही कारणीभूत असेल … " रागाने रक्तवर्णी होत दिनकर बोलत होता . त्याचा तांबूस चेहरा रागाने आणि दु:खाने लालबुंद झाला होता .
"मी तरी मानवी स्रीसारखे वागत आहे पण तुम्ही तर मार्जर नरासारखे स्वतःच्या पिलांनाच गिळायला निघालात … " फणकाऱ्याने  वसू बोलली आणि धुळीचे लोट पुन्हा उधळू लागली … जेणेकरून या कठोर प्रियाचे तोंडही तिला दिसू नये .
"वसू  ……. " रागाने चरफडत दिनकर असंख्य तप्त किरणे धरेकडे फेकत राहिला … तरीही त्याचा क्रोध अजून वाढतच होता .  वसूच्या सर्वांगाची लाही लाही होऊ लागली . दिनकर वसुची सारी लेकरे आडोसा शोधात लपू लागली … आणि या आपल्या मातापित्याच्या भांडणात आपला जीव तर जाणार नाही ना ? या भीतीने वसूच्या कुशीचा आधार घेवू लागली …. धुळीच्या लोटांनी वसू साऱ्यांना पांघरून घालू लागली पण ते तप्त पांघरून त्यांना अधिक कासावीस करू लागले . शेवटी वसूने तिच्या भावांना निरोप पाठवून बोलावून घेतले .
भगिनीचा निरोप मिळताच प्रथम पवन धावतच आला , मागोमाग मेघानेही हजेरी लावली . तिने तिची सारी व्यथा  कोरड्या पडलेल्या नेत्रांनी आणि ओलावलेल्या शब्दांनी दोघांना ऐकवली . तिच्या शरीराच्या दाहाचा आधी इलाज करायचे दोघांनी ठरवले आणि पवनाच्या मदतीने मेघाने तिच्याभोवती अभ्राचे अच्छादन तयार केले . क्षणात वसू दिनकराच्या नजरेआड झाली . मावळतीला झुकलेल्या दिनकराच्या मनातही कातरवेळीची हुरहूर दाटून आली आणि लांब उसासे टाकत तो फक्त म्हणाला , "वसू … "
" वसुताई , तू हि गोष्ट आधीच आमच्या कानी घालायला हवी होती ." डोळ्यातली आसवे टिपत पवन म्हणाला.
"हो वसुताई , पण जाऊ देत अजूनही वेळ गेलेली नाही . आपण वरुणाला बोलावू आणि आधी तहानलेल्या लेकरांना थोडा ओलावा देवूत . " मेघाने पवानाच्या शब्दांना होकार भरत आपले म्हणणे मांडले . त्याचा सल्ला दोघानाही पटला . कारण तहानेने व्याकुळ झालेल्या लेकरांना आधी शांत करणे गरजेचे होते .
   वसुताईच्या मायेखातर आलेल्या वरुणाने स्वतःचे काम चोख बजावले आणि सारे नियम धाब्यावर बसवत उन्हाळ्यात पाऊस बरसू लागला . व्याकुळ झालेल्या जीवांना मात्र आता कुठे हायसे वाटू लागले . त्यांची चूक अजूनही माणसाच्या लक्षात आली नव्हती . आईच्या पदराआड सारी सुरक्षित होती . आताची वेळ टळली होती परंतु भविष्यातील अनेक अडचणी कश्या सोडवायच्या हा खूप मोठा प्रश्न होता .
  तीन चार दिवस झाले मेघाचे अच्छादन अजूनही तसेच होते . आणि दिनकराची उष्णता नव्हती म्हणून वरुणाला बरसणे भाग होते . इतक्या दिवसात दिनकराचा काहीच निरोप नव्हता . आठ दिवस झाले तरी दिनकराचा काहीच निरोप येत नव्हता . व्याकुळ वसू मात्र ओलावल्या नेत्रातून अविरत टिपे गाळत होती . तिचे शांत मन आता दिनकराच्या भेटीसाठी धावा करत होते . गारठलेली माणसे आजारी होऊन तर कुणी काठ सोडून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याबरोबर वाहून तर कुणी गारपीटमध्ये सापडून मरत होती . वसूचे विरहाने आणि दु:खाने व्याकुळ हृदय फक्त टिपे गाळण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत . पश्चातापाने दग्ध मन बाहेरच्या गरव्यानेही थंड होत नव्हते . राहिल्यासाहिल्या झाडांची पानेही आता पिवळी पडली होती . त्यांना गरज होती पित्याच्या प्रेमाची पण …. प्राण्यांनी तर कधीचे शेवटचे श्वास मोजायला सुरुवात केली होती .
     'वसू अजून किती दिवस तू असा खोटा अभिमान कुरवाळत बसणार आहेस ? तुम्हा दोघांच्या हट्टापायी आजून किती जीव जाणार आहेत ? पण दिनकरानेही आपल्या लेकरांचे रक्षण करायला हवेच न ? किती साद घालीत आहेत हि माणसे सूर्यदेवाला पण कसे यांचे हृदय पिळवटत नसेल ? पण मी का बोलावत नाही दिनकराला ? मीच साद घालायला हवी …. खरच … आणि वसू पवनाच्या गळी पडून हुस्मरून रडू लागली . ….
"दिनकरा … पुरे आता … माझ्यासाठी नको पण लेकरांसाठी …"
आणि चमत्कार व्हावा तसा काही वेळात पोपटी रंगाचे वस्र ल्यालेल्या वसुला आपल्या शीतल कोवळ्या किरणांनी आलिंगन देत दिनकराचे आगमन झाले . वसुला वेढलेल्या मेघाने कधीच आपला मुक्काम हलवला होता आणि पवन हलक्या थंडाव्याचा शिडकाव दोघांच्या अंगावर करत त्यांना चिडवत होता … मात्र दोघांच्या मनात एकच काळजी सलत होती … यातून मानवाने काही बोध घेतला असेल का ?