या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Thursday 8 October 2020

मनात ठाण मांडून बसणारा कवितासंग्रह , ' सगळं उलथवून टाकलं पाहिजे '

हार्मिस प्रकाशनने 'सगळं उलथवून टाकलं पाहिजे ' हा देवा झिंजाड यांचा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित केला आहे . तो मिळाल्यावर वाचायला थोडा वेळ लागला परंतु सुवर्णाताईने आधीच पुस्तकावर अभिप्राय त्यांच्या फेसबुक वॉलवर लिहिला होता तेंव्हाच पुस्तक वाचण्याची उत्सुकता होती . म्हणून जसा वेळ मिळेल तशी एक एक कविता वाचत गेले . टायघाल्या ही कविता आधीच वाचण्यात आणि ऐकण्यात होती . ग्रामीण जीवनात शेतकरी हा अविभाज्य भाग त्याच्या आयुष्याची परवड आणि त्याबद्दल शहरी मनाची असंवेदनशीलता याचे अगदी रांगड्या भाषेत वर्णन करणारी हि कविता तेंव्हाच मनाच्या कोपऱ्यात घर करून गेलेली . ' गाडग्यामडक्यात गोमतार साठविणाऱ्या अन रक्त आटवून बाटूक जगवणाऱ्या डोळ्यातलं पाणी दिसण्यासाठी गावठी गाईचंच काळीज लागतं '  गावातील जगणं जितकं पोटतिडकीने मांडले आले तितकेच रागाने कवी विचारतात  ' घराघरात भांडणं लावणाऱ्या एकता कपूर मालिका पाहताना ओघळणारं पाणी काय कामाचं ' 

   ग्रामीण जीवन रेखाटताना ग्रामीण स्त्री सर्वाधिक शोषित आहे . तिच्यावर केलेल्या बऱ्याच कविता कवीच्या संवेदनशील मनाची आणि त्यांनी सोसलेल्या वेदनांची साक्ष देतात . अगदी साध्या , रोजच्या जीवनातील दुर्लक्षित अशा वस्तूंचा / गोष्टींचा आधार घेत ग्रामीण स्त्रीच्या दुर्लक्षित वेदनांचे वर्णन कवी करतात . चुंबळ ही तशीच कविता . ' ओझ्याखालची चुंबळ आणि चुंबळीखालची बाई .. अवस्था दोघींची सारखीच होई ..' पुढे कवी म्हणतात , 'एकदा चपटी झाली कि कायमची अडगळीत फेकून दिली जाते .' हे यथार्थ असे स्त्रीजीवनाचे वर्णन आहे . कवीच्या डोळ्यांनी पाहिलेली ही स्त्री किती पुरूषहृदयांना हळवं करत असेल ?  

 बैल आणि शेतकरी यांच्यातील नातेही जितके विलोभनीय तितकेच हळवे आणि प्रेमळही असते . ' अर्धी बादली ' ही कविता त्याच नात्याचे मनाला स्पर्शून जाणारे वर्णन करते . कवीचा स्रियांसाठीचा आणि विशेषतः शोषित स्रियांबद्दलचा आशावाद अजून कायम आहे . म्हणून इंदिरा या त्यांच्या कवितेत ' आणि घडावी एखादी तरी इंदिरा गावाबाहेरच्या इंदिरा आवास योजनेतून .. ' . आताच्या दिखाऊ जमान्यात दिखाऊ गोष्टींचे जे स्तोम माजलेय त्याने महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्याही व्यापून टाकल्या आहेत . आणि म्हणून भीती वाटतेय कवीला , ते डीजे या कवितेत म्हणतात , 'ह्या दिखाऊपणाच्या भडक युगात डीजेवाले महापुरुषांपेक्षा सर्वश्रेष्ठ ठरतील .' कवी फक्त बंडखोर लेखन करून थांबत नाहीत तर म्हणतात , 'काहीतरी केलं पाहिजे सगळं उलथवून टाकलं पाहिजे ' माणसाचे आयुष्य जेंव्हा भोगत सहन करत वेदनेच्या अत्युच्य कड्यावर जाते तेंव्हा त्याला उलथवून टाकण्याची बदलवून टाकण्याची उर्मी झपाटून टाकते . हा कवितासंग्रह अशाच अत्युच्य वेदनांचा कडेलोट झाल्यावर निर्माण होणाऱ्या मनोअवस्थेतून साकार झालाय हे प्रत्येक कवितेत जाणवत राहते . ती वेदना ते कष्ट तो आशावाद आपल्या नेणिवेत साठत जातो . पांढरपेशा समाजावर ओढलेले ओरखडे आपल्या काळजावर कधी उमटतात हे समजतच नाही . कवीचे दुःख वेदना कधीच आपले होऊन जातात आणि उलथवून टाकण्याच्या , बदल करण्याच्या आशा उभारी घेऊ लागतात , उगवू लागतात मनातून ! 

   शहरी मनातील बोथट होत गेलेल्या संवेदनांची प्रचिती बऱ्याच कवितांमधून येते . कवीची शहर आणि ग्रामीण जीवनाची दरी दाखवण्याची आणि ती सांधण्याची तळमळ प्रत्येक कवितेत दिसते . ' केली जाते बेडवर पडल्या पडल्या बिनदिक्कतपणे समीक्षा गादीवाफ्यांवर भाजी खुडणाऱ्या हातांची ' .  श्रीमंत तुकडे अशीच एक कविता , ' पण होतात तेव्हा अनंत वेदना आतड्याला जेव्हा बघतो मी शिळ्या भाकरीचे श्रीमंत तुकडे डस्टबिनमधे ...' म्याकडोनाल्ड जातीच्या जिभा मधे कवी लिहीतात ' मिल्कशेक पिणार्या ह्या शहरी तोंडांना कधीच नाही कळणार गायीचे पाय बांधून पिशवीत भरून पाठवलेलं अमृत ..अन टूळटूळीत डोळ्यानं पहात पहात एका दुधाच्या घोटासाठी रडणारी लहान लहान वासरं '.डोळ्यात आपोआपच पाणी आणणारं हे काव्य काळजात ठाण मांडून बसतं ! 

आईच्या संस्कारात वाढलेल्या कवीला फक्त आईचं नाही तर सगळ्या बायांचं दुःख दिसतं आणि शब्दाशब्दातून थरथरत राहतं . चिंचा बोरी या प्रतिकात्मक रूपात त्या अवतरतात कवितेत . कधी चुंभळीचं आणि बाईचं दुःख एक होतं . कुमारी जी नासवली जाते याचे मनाला घायाळ करणारे काव्य उमटते ' गांडूरोग ' या कवितेत . ' कवटी फुटल्यावर तिची आई एकटीच गेली तडातडा चालत रानात झाडपाल्याचं औषध आणायला लेकीच्या कोवळ्या मायांगावर लावण्यासाठी ..'.भुंड्या हातांनी या कवितेत आलेली आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या बायकोची वेदना आणि तरीही हार न मानता तिचं आयुष्याला भिडणं निशब्द करून जातं ..कवीनं विचारलेला प्रश्न ' पण करते का कधी माती आत्महत्या ?'  विचार करायला भाग पाडतो . पुढे जाऊन उत्तरही कवीच देतात म्हणतात ' सावरत राहते त्याच्या स्वप्नातील शिवार तिच्या भुंड्या हातांनी ...' काळ्या आईला विकणार्या गुंठाधारकांवरही कवीच्या शब्दांचा आसूड वार करतो . कवी खेदाने म्हणतात ,' तरी म्हणत नाही तिला कुणी हल्ली काळी आई ह्या गुंठापुजकांच्या टोळीत ..'  ' पदर ' ही कविताही अशीच पाळीत नाकारलेल्या स्त्रीची व्यथा मांडणारी . ग्रामीण भागात देवीच्या उत्सवात अनेक बायका देवीला विटाळ होतो म्हणून पाळी आलेल्या बायकांना लांब बसवतात . कुठल्याच कामात आणि उत्सवात त्यांना सामील केले जात नाही . त्या स्त्री देवतांना प्रश्न विचारायला न भिणारा कवी म्हणतो , 'ऍलर्जी आहे का तुमच्या भरजरी पदराला ? पदर आलेल्या बायकांची ?'  पुढे जाऊन कवीच सांगतो , ' अगं ...अवघ्या जगाला जगवणारी माती मानत नाही विटाळ मग तू मातीपेक्षा मोठी आहेस का ? '.कावळा शिवला की ..ही कविताही याच आशयाची ..' पण कावळा शिवला की परत परत गोधड्या रूढीपरंपरांच्या दारात मारून मुटकून बसवल्या जातात .'  बांगडी कविताही स्त्रीच्या जीवनाचे वर्णन करणारी आहे . स्त्रीचे दुःख गरीब श्रीमंतीच्या बाहेरचे आहे . म्हणून कवी म्हणतात ,' गरीब असो वा श्रीमंत सदैव..त्याच परिघात किणकिणत राहते बांगडी ' . 

 असा हा कवी देवा झिंजाड यांचा कवितासंग्रह नक्कीच वेगळा आहे . ग्रामीण शहरी जीवन , ग्रामीण स्त्री जीवन , मुर्दाड समाजव्यवस्था , राजकीय उदासीनता , स्त्रीयांच्या जीवनातील व्यथा , उतारवयात आलेली लाचारी अशा अनेक प्रश्नांना आपल्यासमोर मांडतो हा कवितासंग्रह ! आणि कवी आता बदल हवा ही जाणीव मनामनात पेरतात ..सगळं उळथवून टाकलं पाहिजे म्हणत मनात ठाण मांडून बसते ती देवा झिंजाड यांंची कविता !. संग्रही  असावाच असा कवितासंग्रह ..जो या दिशाहीन काळात उलथवून उभं राहण्याची प्रेरणा देईल !

   डॉ संध्या राम शेलार . 


Sunday 4 October 2020

बीज

वेदनांनी आताशा कुशीत घेतलंय प्रेमानं 
अनेक दिवसांचा विरह , 
तितक्याच आवेगाने ओढलंय जवळ 
अजून कोवळ्या नात्याला पक्व व्हायचंय 
मग रूजेल वेदनेचं बीज माझ्या कुशीत ..
अलवार हलत डूलत राहील आत 
मला करेल अलिप्त माझ्याचपासून 
जगण्यालाही वेदनांचं वलय येईल 
सारी मळमळ रोजच पडेल बाहेर 
वांती झाली तरी काहीतरी सतत जळजळत राहील 
आतल्या आत ...छळत राहील ..
नंतर मात्र ओकारी नकोशी होईल 
मळमळीला आता निशब्द व्हावे लागेल 
त्या ताणाने फटफटतील शीरा 
ह्रदयाची कळ मात्र वाढत राहील ! 
आता मोठं झालं असेल बीज वेदनेचं 
मला कुरतडत कुरतडत ..
त्याने आपलं जीवन साकारलं असेल ! 
पोखरून गेलेली मी ...
असह्य कळांनी आता मरणाला टेकलेली ..
अत्युच्च वेदनेचा डोह मला टाकील व्यापून ..
शेवटी सगळं शांत होईल ..
नव्या पहाटेला आभा व्यापून जाईल ...
मात्र एक वेदना पुन्हा जन्म घेईल !
          डॉ संध्या राम शेलार . 
         
                   

 

Monday 14 September 2020

माझी पहिली गझल

मला गझल हा कविताप्रकार आधीपासूनच आवडतो . त्याची लयबद्धता , शेर , मतला ..आणि अतीमहत्वाचे आशय ! पण मी प्रथमपासूनच आळशी आहे . हा स्वभावगुण आहे . जोवर काम अंगावर पडत नाही तोवर ते माझ्याकडे केवीलवाणे बघत असते . आता करायलाच हवे ही स्थिती आली की ते काम पुढे सरकते . लिहीण्यात तसेच ..सहजपणे आणि आता लिहिले नाही तर जमणार नाही ( म्हणजे डोक्यात विचारांची गर्दी मावणार नाही ) तेव्हाच ते लिहीले जाते . माझ्या बर्याच कविता कथा रात्री लिहिल्याशिवाय झोप लागणार नाही अशा परिस्थितीत लिहील्या गेल्या आहेत . असो . हे आळसपुराण खुप मोठे आहे . तर गझल मला आवडते . डॉ शिवाजी काळे माझा फ्रेंड ..छान गझल लिहीतो . मला त्या वाचून नेहमी वाटे आपणही लिहायला हवे ..पण वृत्त आणि मात्रा यांच्यासोबत काही माझे जुळत नव्हते . मेंदूला इतका जबरा ताण ...अशक्य . एकदा अशीच एक कविता लिहीली ( अर्थात रात्रीच ) . काकांची (काकासाहेब वाळुंजकर सर माझ्या काकांचे मित्र )या काही दिवसातच ओळख झालेली .  त्यांना ती कविता पाठवली . आणि विचारले ही गझल होऊ शकते का ? काही वेळात काकांचा रिप्लाय आला ..गझल लिहीण्याचे नियम आणि एकूणच गझलेबद्दल बरेचकाही ..अगदी उदाहरणासहीत.! ..ती कविता गझल होत नव्हती . हे वाच म्हणून त्यांनी बरेच मार्गदर्शन केले . अनेकदिवस असेच गेले . तीन चार दिवसापूर्वी असेच विचार डोके सोडेनात . रात्री चार ओळी लिहिल्याच पण आता गझलेची तोंडओळख झाली होती . मी त्या चारच ओळी काकांना पाठवल्या आणि काकांचा रिप्लाय चांगला आला थोडेफार बदल सुचवले आणि दोन दिवसांनी मी पुन्हा पुर्ण गझल तयार केली . थोडे बदल करून माझ्या पहिल्या गझलेवर शिक्कामोर्तब झाले ! माझी पहिली गझल तयार झाली ! माझ्यासाठी हा क्षण खुप आनंदाचा आहे ... खरंच आहे , खरे गुरूच मठ्ठ आळशी शिष्यही समजेल असे शिकवू शकतात . आयुष्याच्या या टप्प्यात शिकणे किती अवघड असते सांगायची गरज नाही . आपण इतके सहज समजावणारे शिक्षक असतील तर सारेच सोपे होते . इतक्या कामाच्या व्यापात मी गझल करू शकले ते काकांमुळेच . काका निवृत्त प्राचार्य आहेत . त्यांच्या हाताखाली अनेक यशस्वी विद्यार्थी तयार झालेत . मला त्यांचे मार्गदर्शन मिळाले यासाठी सदैव त्यांच्या ऋणात राहीन ! धन्यवाद काका . 

Monday 7 September 2020

मी एक स्त्री आहे !

मी एक स्त्री आहे ! 
मला नकोय वेगळेपण त्यासाठी
मला वेगळी रांगही नकोय
आणि नकोय वेगळी सीट बसमधली 
वेगळा डबा रेल्वेचा ..
आदराची भीकही नको 
आणि नकोय नागवं करणं चौकाचौकातून 
(आता तसंही चौक नाही लागत 
लागते गलिच्छ , स्वार्थांध निलाजरी बुद्धी आणि मोबाईल वा टीव्हीची स्क्रीन )
मला नकोय आई म्हणून मखरात बसणं 
आणि बायको म्हणून पायाखाली तुडवणं 
मला नकोय लेक होऊन सर्वांचं कौतुक 
आणि नकोय घरादाराच्या अब्रुचं ओझं माझ्या एकटीच्याच डोक्यावर ! 
माझंही मुक्त आकाश हवंय मला ..
जिथे जबाबदारीही माझी असेल 
आणि परिणामही असेल माझाच ! 
           डॉ संध्या राम शेलार 

Monday 11 May 2020

शब्द शोधत जगावं

जगणं अवघडून उभं राहिलं की , 
आपलं आपणच उमजून घ्यावं  
आपल्याच प्रश्नांची उत्तरं शोधत 
बोलता बोलता निशब्द व्हावं 
जावं खोलवर रूतत भूतकाळात 
आणि शोधावित नव्यानं 
जगण्याची कारणं ..
सापडली ती तर जगणं आपली म्हणावं 
नाहीतर .....
सुर्योदयानं संपणार्या अंधाराला आठवावं 
फुटू द्यावेत धुमारे वाळलेल्या खोडावर 
सुर्योदयाची वाट पाहात ..शब्द शोधत जगावं ! 

Friday 8 May 2020

दारूबंदी आणि करोना

  परवापासून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे . सर्वत्र दारूदुकानांना चालू ठेवण्यासाठी मिळालेल्या शासकीय परवानगीमुळे समर्थनार्थ असमर्थनार्थ प्रतिक्रिया प्रत्येकजण मांडत आहे . ढासळनारी अर्थव्यवस्था हे कारण सरकारने दिले असले तरी चर्चा करणारे अनेक कारणे सांगत आहेत . कुणाला काळजी आहे अनेक दिवस दारू न मिळाल्याने होणार्‍या त्रासाची तर कुणाला वाटते दारू प्रमाणात पिल्याने काय होणार आहे ? दारू म्हणजे फळांचा रस तर आहे ! काहीजण दारूला प्रतिष्ठा देवू पाहत आहेत . अनेकांनी दारूचा इतिहास सांगून त्याची भलामन केली . आपले देवदेवता पितात , पूर्वज घ्यायचे वगैरे . कुणाला श्रमपरीहारासाठी हवी आहे . अनेकांनी मानसिक आरोग्याचे कारण पुढे केले . करोंनामुळे आलेले मानसिक तणाव कमी व्हावेत ही काहींची इच्छा आहे . काहीजनांना कुटुंबासोबत (बायको ) राहून होणार्‍या भांडणावर दारू हा इलाज वाटतो . सरकार म्हणते राज्याची बिकट आर्थिक अवस्था सावरण्यास दारूच्या विक्रीतुन मिळणारा महसूल गरजेचा आहे . दारू पिणारे , विकणारे आनंदात आहेत . अनेक विनोद केले जात आहेत . दारूडे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत वगैरे .

   ज्या देशाच्या इतिहासात महात्मा गांधी हे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते . ज्या गांधी विचारांनी भारताच्याच नाही तर त्यानंतर स्वतंत्र झालेल्या प्रत्येक देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली आहे . तळागाळातील प्रत्येक व्यक्ती जोवर दु:खात आहे अडचणीत आहे तोवर माझे कार्य चालूच राहील असे गांधीजी नेहमी म्हणत . गांधीजींचे दारूबंदीचे काम सर्वश्रूत आहेच . त्यांचे याविषयी योगदान खूप मोलाचे आहे . नशा केल्याने त्या व्यक्तीचे शारीरिक नुकसान तर होतेच परंतु त्यांच्या मुलांचे स्रियांचे अनन्वित छळ होतात . नशेमुळे क्रियाशीलता संपुष्टात येते . आर्थिक संकटाचा त्या कुटुंबाला सामना करावाच लागतो परंतु उपासमार सुद्धा होते . समाजातील शोषित स्रियांच्या जीवनात आनंद यावा , मुलाबाळांची उपासमार होऊ नये म्हणून गांधीजींनी दारूबंदीचेही आवाहन केले होते . या त्यांच्या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळत असे . असाच एक उल्लेख गांधीजींना लिहीलेल्या म्हैसूर राज्यातील होल्लीकेरी येथील एका पत्रलेखकाने केला आहे . तो म्हणतो , “माझ्या रानी परज जमातीच्या लोकांनी दीड महिन्यापासून ताडी व इतर मादक पेये पिण्याचे पुर्णपणे सोडून दिले आहे . कुणी जर नशा करण्याचा प्रयत्न केला तर गावाचे नाईक , यजमान आणि करभान यांच्याकडून दखल घेऊन कडक शासन केले जाते . यामुळे झोपड्यात आता भांडणे होत नाहीत . त्यांच्या बायका आनंदाची बातमी देतात . त्यांचा काळ शांततेत चालला आहे .” या पत्राला उत्तर देताना गांधीजी त्यांचे अभिनंदन करतात . शुद्धीकरण चळवळीतील त्यांच्या योगदानाचे कौतुक करतात . 1921 च्या चळवळीचा उल्लेख करून ते म्हणतात की त्यावेळी घडले त्याप्रमाणे पुन्हा हे लोक नशेकडे वळू नयेत म्हणून विशेष प्रयत्न करायला हवेत . त्यासाठी त्यांना चरख्याचा आश्रय घ्यायला लावायला हवा . त्यामुळे त्यांचे कापडावर खर्च होणारे पैसेही वाचतील आणि आर्थिकदृष्ट्या ते सक्षम होतील . दारुवर खर्च होणारा पैसा पण वाचेल . गांधीजी पुढे जावून हेही सांगतात की नशामुक्ती इतकेच ध्येय नाही तर व्यसनांचे उच्चाटण झाल्याचा अहवालही आपण द्याल याची मला उत्सुकता आहे .

  या पत्रानंतर बनसाडा संस्थांनातील रानी परज चौकशी समितीचा अहवाल आहे . तो वल्लभभाई पटेल यांनी या संस्थांनातील 47 गावांना भेटी देऊन काढला आहे . यात ते महाराजसाहेबांच्या प्रजेच्या प्रती केलेल्या चांगल्या कामांचा उल्लेख करतात . त्याचे गांधीजी कौतुकही करतात . परंतु ते महाराजसाहेबांना सांगतात , “ जोवर आपण दारूच्या व्यापारातून प्राप्ती करणे आवश्यक मानतात तोवर तुम्ही जे काही तुमच्या माणसांचे नि:संशय भले करीत आहेत ते वास्तविक न केल्यासारखे होत आहे . बनसाडा प्रदेशाला लागून असलेल्या ब्रिटिश , गायकवाड व धरमपुर या तीन शेजारी प्रदेशात दारूबंदी नसल्यामुळे तुमच्या संस्थांनाला दारूबंदीचे धोरण यशस्वी करणे अवघड जात आहे . ही गोष्ट खरी आहे . पण महान गोष्टी महान त्यागावाचून आणि महान उपाययोजना केल्यावाचून अमलात आणता येत नसतात . आपल्या संस्थांनाला संपूर्ण दारूबंदी जाहीर करून या कामी पुढाकार घेता येईल . इतकेच नव्हे तर शेजारच्या राज्यात दारूबंदीकरता चळवळ करणेही शक्य होईल . मुख्य गोष्ट दारूपासून मिळणारा महसूल सोडून देण्याला तयार होण्याची आहे . या बाबतीत लागलीच हाती घ्यायचा उपक्रम म्हणजे , मद्यपानाला बळी पडलेल्या जमातीत जोराचा मद्याविरोधी प्रचार चालविण्याव्यतिरिक्त हा महसूल इतर कोणत्याही कामी , मग ती कामे कितीही प्रशंसनीय असली तरी , वापरायचा नाही असे ठरविणे हा होऊ शकेल . कोणत्याही संस्थांनाला आपल्या लोकांनी या दुर्व्यसनाचा त्याग करावा असे मनापासून वाटत असेल , त्याला या दुर्व्यसनात लोळत पडणे कायद्याने अशक्य करून स्वस्थ बसता येणार नाही , त्याला त्या दुर्व्यसनाचे मूळ शोधून लोकांनी त्याचा त्याग करण्याविषयीचे शिक्षण त्यांना द्यावे लागेल . दारूबंदीचे कोणतेही धोरण जर मी सुचविलेल्या स्वरुपाच्या रचनात्मक कार्याच्या जोडीने अमलात आणण्यात आले तर त्या धोरणांचा परिणाम त्या लोकांची आणि त्यांच्याबरोबरच त्या संस्थानाची उतरोत्तर अधिक भरभराट होण्यातच खात्रीने होणार . संपूर्ण दारूबंदी अमलात आणण्याच्या दृष्टीने जगात हिंदुस्तान हाच सर्वात आशादायक देश आहे याचे साधे कारण आहे की , येथे व्यसनासक्ती ही प्रतिष्ठेची किंवा छानछौकीची गोष्ट मानली जात नाही आणि ती काही विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित आहे !” ( महात्मा गांधी यांचे संकलित वाङ्मय खंड 34 )

     वरील गोष्टीवरून आधी केलेल्या सर्व दारू / व्यसनविषयक समर्थनाची उत्तरे गांधीजींनी आधीच दिलेली आहेत . खरेतर उच्चमध्यमवर्ग सोडला तर दारू आणि इतर व्यसनांमुळे कुटुंबातील स्रिया आणि मुलांची होणारी परवड अत्यंत क्लेशकारक आहे . मागे काही दिवसापूर्वी अशीच एका सासू सून आलेल्या . त्या मुलीचा नवरा हातभट्टीची दारू पिल्याने गेला होता . त्या दोघीही सासूसुनेनी बरे झाले मेला कमीतकमी लेकरबाळांच्या मुखात घास जातोय आता अशी प्रतिक्रिया दिली . जेंव्हा एक आई आणि बायको अशी बोलत असेल तेंव्हा खरोखर त्यांना या व्यसनाधीन मुलाचा / नवर्‍याचा किती छळ सहन करावा लागत असेल याचा विचारही करवत नाही . बरे श्रमपरिहार म्हणून मजूर घेत असेल तर त्याच वेळी त्याची बायकोही तितकेच काम करत असते मग तिचा श्रमपरिहार कसा होणार ? काही आदिवासी स्रिया अशी व्यसने जरी करत असल्या तरी त्यांच्या मुलांचे होणारे शोषण कुणी का पाहू शकत नाही . बापाचे अनुकरण मुलगा नकळत्या वयात करू लागतो आणि वयाची पंचविशी होण्याआधीच संपतो . समाजातील तरुणांना निष्क्रिय करणारी दारू राजरोस मिळू लागली तर खरोखर आपल्या देशाची भरभराट होईल का ? आताच्या करोंनाच्या पार्श्वभूमीवर जर हे दारू पिऊन संतुलन हरवलेले लोक रस्त्यावर फिरून /पडून करोंनाचा प्रादुर्भाव वाढवणार नाही का ? आणि जर असे झाले तर आजवर ज्या लोकांनी प्रामाणिकपणे लॉकडावून पाळले , ज्या पोलिस डॉक्टर आणि इतर यंत्रणांनी स्व:ताचे जीव धोक्यात घालून सेवा दिली त्यांचे प्रयत्न मातीमोल होणार नाही का ?  एसी मध्ये बसून समर्थन करणारे यांना एकच आवाहन करावेसे वाटते की , त्यांनी अशाप्रकारे उध्वस्त होणार्‍या दहा कुटुंबाची तरी जबाबदारी घ्यावी आणि मग दारूबंदीला विरोध करावा . माझ्या एक वकील स्नेही दिलशाद मुझावर कोल्हापूरच्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालकल्याण समितीच्या सदस्य आहेत . त्या दारुमुळे होणार्‍या मुलांच्या आणि महिलांच्या दुर्दशेचे शोषणाचे वर्णन करीत होत्या . ऐकून ज्या गोष्टी अस्वस्थ करतात त्या जगताना त्या लोकांची काय अवस्था होत असेल . व्यसनाधीनतेमुळे वाढणारी गुन्हेगारी , घरगुती हिंसा याला शासन फक्त कायदे करून आळा घालू शकत नाही . कारण निम्यापेक्षा जास्त गुन्हे पोलिसांपर्यंत जातच नाहीत . जे जातात त्यातही न्याय मिळणारे कितीतरी अल्प आहेत . महसुलाचे कारण पुढे करणे योग्य नाही . महसुलाचे तेच एकमेव साधन नाही . आणि ज्यांच्या सोईसाठी हा महसूल गोळा होईल त्यांचे आणखी हाल वाढणार असतील तर याला अर्थ तरी काय ? हे म्हणजे पेशंट नाही म्हणून डॉक्टरने निरोगी माणसांच्या किडन्या  विकण्यासारखे झाले ! महसुलासाठी जर सरकार दारुविक्रीला परवानगी देत असेल आणि आर्थिक अडचणीचे कारण पुढे करत असेल तर सरकारला गांधीजींच्या त्या शब्दांची आठवण करून द्यावीशी वाटतेय , “ जोवर दारूच्या व्यापारातून प्राप्ती काढणे आवश्यक मानतात तोवर ते जे आपल्या लोकांचे नि:संशय भले करीत आहेत ते वास्तविक न केल्यासारखे होत आहे !” 


Wednesday 8 April 2020

मला का वाटलं !

मला का वाटलं ....
माझी वेदना तुझ्या डोळ्यातून झरत होती ..
कुठेतरी खोलवर आतमधे जी सलत  होती ...
न सांगायचे ठरवलेही होते ..
मला न्याय नकोच आहे आता ...
मरणाने शांतपणे यावं आणि कुरवाळत जवळ घ्यावं ..
इतकीच आस होती ...
माझे अश्रूही  गेलेत सुकून ...
मागत नाहीत ते मुक्तीचं दान हल्ली ...
पण फिरतात माझ्या कणाकणात ....
बारीकशी सल होऊन ...
झुरतात ते दिवसरात्र ...
विझलेली आग होऊन ...
संपलेल्या आयुष्याची इतकीच खूण बाकी होती ...
तरीही मला का वाटलं ...
माझी वेदना तुझ्या डोळ्यातून झरत होती ...
जीवनाच्या यशाचा लिहीला जाईल इतिहास जेव्हा ...
अपयशाची कारणे माझ्या मातीआड गाडली जातील ...
हीच एक आशा मला पुनःपुन्हा सावरत होती ...
डॉ संध्या शेलार .