या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !
Showing posts with label आठवणी. Show all posts
Showing posts with label आठवणी. Show all posts

Sunday, 9 August 2015

बाळ

   
    आई हे जसे मुलांसाठी एक गजबजलेलं गाव असते तसे मुल आईसाठी गजबजलेलं शहर आहे म्हटले तरी चालेल . त्याची जन्मल्यापासूनची प्रत्येक बारीकसारीक गोष्ट आई आपल्या हृदयात जपून ठेवत असते , शेवटच्या श्वासापर्यंत ! आमची आजी वडील आत्या चुलते यांच्या जन्मापासूनच्या आठवणी सांगायच्या , मला नेहमी आश्चर्य वाटे आजी कसे इतके सारे ध्यानात ठेवत असेल ? तेही एक मुलाचे ठीक आहे तिला तर पाच मुले आणि लहानपणी तापाने गेलेला एक , अशा साऱ्यांच्या साऱ्या आठवणी ती सांगे ! पण आज जेंव्हा मी आई आहे एका दहा वर्षाच्या मुलाची तेंव्हा लक्षात येते कि कालची भाजी काय होती हे लक्षात न राहणारी मी बाळ लहान असताना त्याने पहिल्यांदा काय खाल्ले , त्याला काय आवडे , तो पहिला शब्द काय बोलला सारे सारे मनात जपून आहे एखाद्या अनमोल दागिन्यासारखे !
   परवा बातम्या पाहत होते , अचानक एक बातमी काळीज चिरून गेली .. एका सुशिक्षित , मोठ्या पदावर विराजमान असलेल्या आईने आपल्या १३ वर्षाच्या मुलाला bat ने मारून खून केला .. मन क्षणभर सुन्न झाले , असे वाटले कि उगीच टी व्ही वाले बातम्यांचा बाजार मांडून बसतात , स्वतःचा बाजार वाढवण्यासाठी ! पण प्रत्येक वाहिनीवर तीच बातमी ठळक अक्षरात झळकत होती . डोळे आपोआप गच्च झाले , मन एकदम अस्थिर बनले , क्षणभर काहीच सुचेना .. तशीच बसून राहिले थोडा वेळ .. काम बाकी होते पण मन कशातच लागत नव्हते .. बातम्यात दाखवलेले ते मुल ..किती निरागस ..कपाळाला गंध लावलेला तो फोटो .. अजून जीवनाच्या उंबरठ्यावर उभा असणारा तो बाळ काळाच्या पडद्याआड गेला होता ! आणि कसलेही भाव चेहऱ्यावर नसलेली , पोलीस स्टेशन मध्ये जमिनीवरच मांडी घालून बसलेली ती सुशिक्षित आई ! आई ........ किती सुमधुर शब्द आणि जगाचे सारे दु:ख जिच्या पदराखाली विलीन होते ती आई .. कशी , का धजावली असेल पोटच्या पिल्लाला मृत्युच्या दारी सोडायला ? तिच्या जाणीवा अशा कशा बधीर झाल्या असतील . मुलाला एक चापट मारली तर दिवसभर रडणारी मी .. .. लिहितानाही डोळे गच्च झालेत माझे ! असे कसे त्या माउलीचे हृदय दगड बनले असेल .. जी आई साऱ्या जगाच्या ९ महिने आधीपासून त्या जीवाशी सर्व शक्तीनिशी जोडली गेलेली असते तिने असे करावे ..किती कित्त्ती प्रेमाचे , मायेचे, आपुलकीचे, दु:खाचे , रागाचे क्षण त्या दोन जीवांनी एकत्र जगलेले असतात .. त्याच्या त्या जन्मलेल्या निरागस चेहऱ्यापासून ते त्याच्या त्या नाविन्यपूर्ण हालचाली , त्याची ती इवलीशी गोड प्रत्येक अवयवाची ठेवण , त्याची ती मऊशार कोवळी त्वचा .. अनेकदा त्याला स्पर्श करायला भाग पाडणारे ते त्याचे गोजिरे रूप ! काहीच आठवले नसेल तिला ? त्या कोवळ्या जीवाला मृत्युच्या दारी सोडताना ? कितीही मोठे झाले तरी लेकराच्या स्पर्शाने हुरळून जाणारे मातृहृदय कुठे ठेवले असेल तिने .. देवा तुला एकाच विनंती आहे , प्रार्थना आहे ..अगदी मनाच्या , हृदयाच्या आतून .. मुलाला , मुलीला आईचा बळी घेणारा बनवलेस ना , या कलीयुगातील  अनर्थ म्हणून तरी मी तुला दोष देणार नाही परंतु जिने जीवन दिले त्या मातेचे हृदय असे पाषाणाचे नको करूस ...
        माझ्या जीवनातील एक चांगली आठवण इथे सांगावीशी वाटते .. आई मुलासाठी काय असते आणि मुल आईसाठी किती आनंद असते .. रागाचे अनेक प्रसंग येतात आयुष्यात पण त्याच्या प्रेमळ स्पर्शात ते कसे विरघळून जातात ही  प्रत्येक आईची आठवण असते ...

                                 माझी आठवण
   गजर वाजत होता पण आज काही अंग उचलुच वाटत नव्हते बेडवरून. सकाळी आवरायची घाई नसली कि मन आपोआप आळशी होते. मग उगीच कंटाळा येतो , आणि लवकर उठावे लागते या गोष्टीचा रागही येतो . का बरं माणसाचे मन असे असेल ? आणि ज्या दिवशी कामाची धावपळ त्या दिवशी आपोआप जाग येते , पण आज काही केल्या उठून बसावे वाटेना . मग वाटले जाऊ देत आज शनिवार आहे कुठे शाळा आहे मुलांची झाला थोडा उशीर तर होऊ देत, अजून अर्धा तास तरी पडून राहते . पण आमचे सत्योम दादा नेमक्या वेळी आमच्या मनसुब्यांवर पाणी सोडणार हे ठरलेले . शाळा असेल त्या दिवशी सात वाजले तरी ओरडून उठवावे लागते आणि नसेल शाळा तर मग मात्र सरकार सहा च्या आधीच उठणार ! त्याला शाळा नसलेल्या दिवशी जाग का येते ? या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळाले नाही ! जसे कि आई जेवायला बसली कि लहान मुल का रडते ? कुत्र्याचे शेपूट सरळ का होत नाही ?.......अश्या अनेक प्रश्नांसारखे !
   आजही माझ्या झोपेच्या सुखाची वावडी करून सत्योम बाळ उडवणार हे मात्र नक्की , काही वेळा न इतका राग येतो असे वाटते पोराच्या दोन कानाखाली काढाव्या आणि गप्प पड म्हणून ओरडावे , पण मग प्रश्नांची अशी शृंखला सुरु होते कि झोपेचे खोबरे कधी झाले हेच कळत नाही !
“मम्मी” एक हात पोटावर टाकत बाळराजाच्या झोपेची सांगता झाली ! मग मात्र एकदम खुश होऊन पोराने हळूच माझ्या गालावर ओठांचा स्पर्श केला , जणू मोरपीस फिरले गालावर ! मी सुंदर स्वप्नातून जागी होतेय असे वाटले आणि मन एकदम प्रसन्न झाले !
“का रे पिलू ?”
“माझी मम्मी न मला खूप आवडते”
“?” कुतूहलाने मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहिले .
“या जगात माझी सर्वात सुंदर , सर्वात प्रिय गोष्ट कुठली असेल तर माझी मम्मी .” झोप उडाल्याचा राग कुठच्या कुठे निवळला ..झुळझुळ झऱ्याच्या नितळ पाण्यासारखे मन स्वच्छ झाले आणि खळखळ डोळ्यातून वाहू लागले .... 

Monday, 23 June 2014

गुरु !

    काही क्षण असे येतात , क्षणात  संपूनही  जातात , कधी संपले हे कळायच्या आत ते भूतकाळ होतात . असे काही निखारे पदरात टाकून जातात कि का झाले ? कसे झाले ? असे केले असते तर टाळले गेले असते का ? मला आज सुचते आहे तेंव्हा का नसेल सुचेल ? प्रश्न आणि अनेक उत्तरे परंतु ती उत्तरे द्यायची वेळही निघून गेलेली ! पण ती वेळच अशी येते कि सारी बुद्धी त्यावेळी निकामी होती काय ? किंवा कसली अशी भूल पडली त्या वेळी ? या प्रश्नांनी आधी मन हैराण होते आणि मग उदासीन ! उदासी इतकी अमर्याद असते कि आपल्या जीवनाला निरर्थक ठरवण्यापर्यंत मनाची मजल जाते .
     खरच जीवन निरर्थक आहे का ? कुणाच्या जीवनातील अस्तित्वामुळे त्याला अर्थ येतो का ? कुणाच्या नाराज होण्याने ते तिथेच थांबते का ? या प्रश्नांची उत्तरे नाहीपाशी येऊन थांबतात ! जर याचे उत्तर नाही आहे तर जीवनातील अर्थ म्हणजे काय ? तो त्याला कसा द्यायचा ? हि विद्या या मनुष्याला कोण शिकवणार ? कि जीवनाच्या शेवटीच हे सत्य उमगणार का ? आणि जर तेंव्हा हे कळणार असेल कि आपण का जगतो तर तेंव्हा वेळ निघून गेलेली असेलच न ?
   हे जीवनाचे सार , सत्य वेळेआधी उलगडणे हि आजच्या तरी काळाची गरज झाली आहे ...समाजात कलीने पाय रोवलेले असताना या आयुष्याच्या नावेला पैलतीर दाखवणारा असा एकच  आहे आणि तो आहे तो परमात्मा ! पण तो भेटणार कसा ? अनेक तपे करूनही त्याची प्राप्ती नाही ! पण त्याच दयाळू ईश्वराने हे ज्ञान उलगडून दाखवले गीतेमध्ये ! तीच गीता माणसाला  जीवनाचा खरा अर्थ सांगते . जे अनेक प्रयोगांनी शास्त्रज्ञांना उमजले नाही ते गीता सांगते . पण गीतेचे हे क्लिष्ट ज्ञान मराठीत समजावले ते जगद्गुरू ज्ञानेश्वर माउलींनी ! आणि तेच अमृत अनुभव सामान्यजनांना भरवले ते गुरूंनी !
    मी माझे रोजचे काम आणि नाती सांभाळण्यात अशी कसरत करत होते कि त्यापलीकडे काही विश्व आहे हेच जणू काही मला ज्ञात नव्हते . परमेश्वराची आराधना करायची ती आपली भौतिक सुखे प्राप्त करण्यासाठी इतकेच मी करत होते . हे प्राप्त झाले कि ते दे म्हणून त्याची आराधना , उपास ,यात्रा यातच जीवन  अडकून पडलेले . हे करत असताना देवाने मला हे दिले नाही म्हणून त्याचा दु:स्वास करण्यापर्यंत मन धजले . पण या कर्मकांडातून बाहेरचा मार्ग दाखवला आमच्या परमपूज्य गुरूंनी ! ह.भ.प. गोरखनाना शेलार ! आम्ही त्यांना फक्त नाना म्हणायचो . तसे पहिले तर त्यांचे फक्त एकच प्रवचन मी ऐकले . ते भेटले मला ते प्रत्येक वेळी पेशंट म्हणून . पण त्या काही मिनिटांच्या भेटीत ते असे काही सांगत कि ते मनाला स्पर्शून जाई . प्रत्येक वेळी असे काहीतरी शिकवून जात , कि त्या वेळी ते उमजत नसे परंतु जेंव्हा निवांत त्यांच्या बोलण्याचा विचार करत बसे तेंव्हा कळायचे कि नाना आपल्याला शिकवून गेले !
    मागच्या गुरुपौर्णिमेच्या वेळी माझी मनोमन खूप इच्छा होती कि नाना सर्वांना अनुग्रह देतात मग मी पण या वेळी घेणार . बाकीच्या जाणाऱ्यांना मी मला न्या म्हणून सांगितलेही परंतु गाडी दारात आली आणि माझ्याकडे  डिलेव्हरीसाठी एक पेशंट आली . मन खूप हिरमुसले , परंतु मी न जाता ते पेशंट पहिले . त्यानंतर साधारण दोन दिवसांनी नाना आजारी असल्याने आमच्याकडे आले . मी मनातील खंत बोलून दाखवली . मला अनुग्रह हवा होता . नानांनी बाकीच्या गोष्टी बोलून झाल्यावर शेवटी सांगितले तुमची हि सेवा हीच ईशसेवा आहे ! त्या वेळी मला काही समजले नाही , परंतु रात्री झोपेची आराधना करत असता तो प्रसंग पुन्हा आठवला आणि मला माझा अनुग्रह मिळाला !
    त्यानंतर बऱ्याचदा ते घरी आले अनेक विषयांवर चर्चा झाली . मी एक ज्ञानेश्वरीची प्रत आणली होती आणि देव्हाऱ्यात ठेवली होती . ती नानांनी पहिली . आम्ही त्यांना विचारत होतो काय वाचत जाऊ म्हणून , त्यांनी सांगितले ज्ञानेश्वरी ! नाही जमले वाचायला तर फक्त रोज एकदा डोके टेकवा त्यावर !
    मला नेहमी आश्चर्य वाटे कि एक सोफ्टवेअर इंजिनिअर या मार्गाकडे वळू शकतो आणि तेही त्यामध्ये इतके गाढ ज्ञान संपादन करू शकतो तेही नोकरी सांभाळून !
    एका दशक्रिया विधीला गेले असता तिथे मला एक हरिपाठाचे एक पुस्तक भेट मिळाले . मी या आधी हे पुस्तक पाहिलेही नव्हते , फक्त ऐकून होते . ते त्या वेळी मी तसेच ड्रोवर मध्ये टाकले , नंतर अश्याच एका निवांत वेळी मी वाचू लागले . जास्त काही समजत नव्हते परंतु वाचले . नंतर नाना सर्दी आहे म्हणून दवाखान्यात आले . त्या वेळी नानांनी विचारले काही वाचता का ? त्यांना नमस्कार करत मी म्हटले नाना हरिपाठ वाचते पण समजत नाही .. नाना बोलले कि समजत नसेल तरी वाचत राहा ...नक्की समजेल . ते त्यांचे शेवटचे शिकवणे ठरले . त्या आजाराने ए आर डी एस चे रूप घेतले आणि त्यातच नानांची प्राणज्योत मालवली . ....
                      माझिया मनीचा जाणोनिया भाव तो  करी उपाव गुरुरावो //१ //
                       आवडीचा मंत्र सांगितला सोपा / जेणे नोहे गुंफा कोठे काही //२//

Wednesday, 10 August 2011

मनात रुतलेले क्षण


 
        '' आई गं '' आनंद असो वा वेदना हे दोन शब्द ज्याच्या ओठी येत 
नसतील असा माणूस विरळ. प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात मोठी जागा 
कुणाची असेल तर ती आईची! प्रत्येक सुखाची पायरी आईपासून सुरु 
होते आणि दु:खाचा शेवट आईपाशी होतो. मनाच्या कुठल्या कोपर्यात 
दडली आहे इतर वेळी समजणार नाही पण सुख-दु:खाच्या वेळी ''आई गं '' 
हे दोन शब्द जिव्हेला कधी सजवून गेले ते कळतच नाही. आईबद्दल 
लिहिण्यासाठी शब्द जरी अपुरे नसतील तरी वेळ मात्र अपुरी आहे .(आत्ता तरी )       
        पायात रुतलेला काटा जसा घर करून जसा घर करून जातो तसे मनाला रुतलेला क्षणहि तसाच . पायाच कुरूप कमीत कमी भरून निघत, औषधउपचारांनी बरही होतं पण मनाची ती वेदना अचानक उद्भवली की.......
       त्या दिवशी mathचा तास संपायला उशीर झाला पळतच प्रयोगशाळेत गेले सगळेजण आले होते पण सर् अजून दिसत नव्हते. हायस वाटलं. सगळ्या मुली टेबलाजवळ बसलो. माधुरी कुठाय म्हणेपर्यंत धावत येणाऱ्या बाईसाहेब दिसल्या ''आई गं '' नेहीमिप्रमाणे ठेचाळली. ''लागल नाही ना'' नेहमीची सर्वांची प्रतिक्रिया! बर तरी हिच्या आई आमच्याच शाळेत होत्या!
     ''ये खरच आई किती नकळत येत ना?''इति सारिका.
     ''स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी,'' उमा.
     '' कुणाची आई कितीही वाईट असुदे मुलांसाठी ती सर्वस्व असते,'' मोहिनी.
     ''माझी आई जीवाची सखी,'' वैशाली.
    ''हमारी अम्मी की तो बातही अलग अम्मी की जान है हम,'' शबाना.
    ''माझ्या सर्व समस्यांच समाधान आहे आई,'' मी
    दीपा मात्र तोंड लपून बसलेली. सारीकाने  हलवलं पोरीच्या डोळ्यात पाणी! सगळ्यांच्या नजरा दिपावर खिळल्या. कुणाला अर्थबोध होत नव्हता.नेहमी जिच्या चेहऱ्यावर हास्य विलसत असतं ती दीपा आज रडत होती सर्वजनी आश्चर्याने बघत होत्या. तिने मनसोक्त रडून घेतल चेहरा लालबुंद झाला. हुसमरत ती बोलली ................
    ''मला आईच नाही गं!''