या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday 11 May 2020

शब्द शोधत जगावं

जगणं अवघडून उभं राहिलं की , 
आपलं आपणच उमजून घ्यावं  
आपल्याच प्रश्नांची उत्तरं शोधत 
बोलता बोलता निशब्द व्हावं 
जावं खोलवर रूतत भूतकाळात 
आणि शोधावित नव्यानं 
जगण्याची कारणं ..
सापडली ती तर जगणं आपली म्हणावं 
नाहीतर .....
सुर्योदयानं संपणार्या अंधाराला आठवावं 
फुटू द्यावेत धुमारे वाळलेल्या खोडावर 
सुर्योदयाची वाट पाहात ..शब्द शोधत जगावं ! 

Friday 8 May 2020

दारूबंदी आणि करोना

  परवापासून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे . सर्वत्र दारूदुकानांना चालू ठेवण्यासाठी मिळालेल्या शासकीय परवानगीमुळे समर्थनार्थ असमर्थनार्थ प्रतिक्रिया प्रत्येकजण मांडत आहे . ढासळनारी अर्थव्यवस्था हे कारण सरकारने दिले असले तरी चर्चा करणारे अनेक कारणे सांगत आहेत . कुणाला काळजी आहे अनेक दिवस दारू न मिळाल्याने होणार्‍या त्रासाची तर कुणाला वाटते दारू प्रमाणात पिल्याने काय होणार आहे ? दारू म्हणजे फळांचा रस तर आहे ! काहीजण दारूला प्रतिष्ठा देवू पाहत आहेत . अनेकांनी दारूचा इतिहास सांगून त्याची भलामन केली . आपले देवदेवता पितात , पूर्वज घ्यायचे वगैरे . कुणाला श्रमपरीहारासाठी हवी आहे . अनेकांनी मानसिक आरोग्याचे कारण पुढे केले . करोंनामुळे आलेले मानसिक तणाव कमी व्हावेत ही काहींची इच्छा आहे . काहीजनांना कुटुंबासोबत (बायको ) राहून होणार्‍या भांडणावर दारू हा इलाज वाटतो . सरकार म्हणते राज्याची बिकट आर्थिक अवस्था सावरण्यास दारूच्या विक्रीतुन मिळणारा महसूल गरजेचा आहे . दारू पिणारे , विकणारे आनंदात आहेत . अनेक विनोद केले जात आहेत . दारूडे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत वगैरे .

   ज्या देशाच्या इतिहासात महात्मा गांधी हे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते . ज्या गांधी विचारांनी भारताच्याच नाही तर त्यानंतर स्वतंत्र झालेल्या प्रत्येक देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली आहे . तळागाळातील प्रत्येक व्यक्ती जोवर दु:खात आहे अडचणीत आहे तोवर माझे कार्य चालूच राहील असे गांधीजी नेहमी म्हणत . गांधीजींचे दारूबंदीचे काम सर्वश्रूत आहेच . त्यांचे याविषयी योगदान खूप मोलाचे आहे . नशा केल्याने त्या व्यक्तीचे शारीरिक नुकसान तर होतेच परंतु त्यांच्या मुलांचे स्रियांचे अनन्वित छळ होतात . नशेमुळे क्रियाशीलता संपुष्टात येते . आर्थिक संकटाचा त्या कुटुंबाला सामना करावाच लागतो परंतु उपासमार सुद्धा होते . समाजातील शोषित स्रियांच्या जीवनात आनंद यावा , मुलाबाळांची उपासमार होऊ नये म्हणून गांधीजींनी दारूबंदीचेही आवाहन केले होते . या त्यांच्या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळत असे . असाच एक उल्लेख गांधीजींना लिहीलेल्या म्हैसूर राज्यातील होल्लीकेरी येथील एका पत्रलेखकाने केला आहे . तो म्हणतो , “माझ्या रानी परज जमातीच्या लोकांनी दीड महिन्यापासून ताडी व इतर मादक पेये पिण्याचे पुर्णपणे सोडून दिले आहे . कुणी जर नशा करण्याचा प्रयत्न केला तर गावाचे नाईक , यजमान आणि करभान यांच्याकडून दखल घेऊन कडक शासन केले जाते . यामुळे झोपड्यात आता भांडणे होत नाहीत . त्यांच्या बायका आनंदाची बातमी देतात . त्यांचा काळ शांततेत चालला आहे .” या पत्राला उत्तर देताना गांधीजी त्यांचे अभिनंदन करतात . शुद्धीकरण चळवळीतील त्यांच्या योगदानाचे कौतुक करतात . 1921 च्या चळवळीचा उल्लेख करून ते म्हणतात की त्यावेळी घडले त्याप्रमाणे पुन्हा हे लोक नशेकडे वळू नयेत म्हणून विशेष प्रयत्न करायला हवेत . त्यासाठी त्यांना चरख्याचा आश्रय घ्यायला लावायला हवा . त्यामुळे त्यांचे कापडावर खर्च होणारे पैसेही वाचतील आणि आर्थिकदृष्ट्या ते सक्षम होतील . दारुवर खर्च होणारा पैसा पण वाचेल . गांधीजी पुढे जावून हेही सांगतात की नशामुक्ती इतकेच ध्येय नाही तर व्यसनांचे उच्चाटण झाल्याचा अहवालही आपण द्याल याची मला उत्सुकता आहे .

  या पत्रानंतर बनसाडा संस्थांनातील रानी परज चौकशी समितीचा अहवाल आहे . तो वल्लभभाई पटेल यांनी या संस्थांनातील 47 गावांना भेटी देऊन काढला आहे . यात ते महाराजसाहेबांच्या प्रजेच्या प्रती केलेल्या चांगल्या कामांचा उल्लेख करतात . त्याचे गांधीजी कौतुकही करतात . परंतु ते महाराजसाहेबांना सांगतात , “ जोवर आपण दारूच्या व्यापारातून प्राप्ती करणे आवश्यक मानतात तोवर तुम्ही जे काही तुमच्या माणसांचे नि:संशय भले करीत आहेत ते वास्तविक न केल्यासारखे होत आहे . बनसाडा प्रदेशाला लागून असलेल्या ब्रिटिश , गायकवाड व धरमपुर या तीन शेजारी प्रदेशात दारूबंदी नसल्यामुळे तुमच्या संस्थांनाला दारूबंदीचे धोरण यशस्वी करणे अवघड जात आहे . ही गोष्ट खरी आहे . पण महान गोष्टी महान त्यागावाचून आणि महान उपाययोजना केल्यावाचून अमलात आणता येत नसतात . आपल्या संस्थांनाला संपूर्ण दारूबंदी जाहीर करून या कामी पुढाकार घेता येईल . इतकेच नव्हे तर शेजारच्या राज्यात दारूबंदीकरता चळवळ करणेही शक्य होईल . मुख्य गोष्ट दारूपासून मिळणारा महसूल सोडून देण्याला तयार होण्याची आहे . या बाबतीत लागलीच हाती घ्यायचा उपक्रम म्हणजे , मद्यपानाला बळी पडलेल्या जमातीत जोराचा मद्याविरोधी प्रचार चालविण्याव्यतिरिक्त हा महसूल इतर कोणत्याही कामी , मग ती कामे कितीही प्रशंसनीय असली तरी , वापरायचा नाही असे ठरविणे हा होऊ शकेल . कोणत्याही संस्थांनाला आपल्या लोकांनी या दुर्व्यसनाचा त्याग करावा असे मनापासून वाटत असेल , त्याला या दुर्व्यसनात लोळत पडणे कायद्याने अशक्य करून स्वस्थ बसता येणार नाही , त्याला त्या दुर्व्यसनाचे मूळ शोधून लोकांनी त्याचा त्याग करण्याविषयीचे शिक्षण त्यांना द्यावे लागेल . दारूबंदीचे कोणतेही धोरण जर मी सुचविलेल्या स्वरुपाच्या रचनात्मक कार्याच्या जोडीने अमलात आणण्यात आले तर त्या धोरणांचा परिणाम त्या लोकांची आणि त्यांच्याबरोबरच त्या संस्थानाची उतरोत्तर अधिक भरभराट होण्यातच खात्रीने होणार . संपूर्ण दारूबंदी अमलात आणण्याच्या दृष्टीने जगात हिंदुस्तान हाच सर्वात आशादायक देश आहे याचे साधे कारण आहे की , येथे व्यसनासक्ती ही प्रतिष्ठेची किंवा छानछौकीची गोष्ट मानली जात नाही आणि ती काही विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित आहे !” ( महात्मा गांधी यांचे संकलित वाङ्मय खंड 34 )

     वरील गोष्टीवरून आधी केलेल्या सर्व दारू / व्यसनविषयक समर्थनाची उत्तरे गांधीजींनी आधीच दिलेली आहेत . खरेतर उच्चमध्यमवर्ग सोडला तर दारू आणि इतर व्यसनांमुळे कुटुंबातील स्रिया आणि मुलांची होणारी परवड अत्यंत क्लेशकारक आहे . मागे काही दिवसापूर्वी अशीच एका सासू सून आलेल्या . त्या मुलीचा नवरा हातभट्टीची दारू पिल्याने गेला होता . त्या दोघीही सासूसुनेनी बरे झाले मेला कमीतकमी लेकरबाळांच्या मुखात घास जातोय आता अशी प्रतिक्रिया दिली . जेंव्हा एक आई आणि बायको अशी बोलत असेल तेंव्हा खरोखर त्यांना या व्यसनाधीन मुलाचा / नवर्‍याचा किती छळ सहन करावा लागत असेल याचा विचारही करवत नाही . बरे श्रमपरिहार म्हणून मजूर घेत असेल तर त्याच वेळी त्याची बायकोही तितकेच काम करत असते मग तिचा श्रमपरिहार कसा होणार ? काही आदिवासी स्रिया अशी व्यसने जरी करत असल्या तरी त्यांच्या मुलांचे होणारे शोषण कुणी का पाहू शकत नाही . बापाचे अनुकरण मुलगा नकळत्या वयात करू लागतो आणि वयाची पंचविशी होण्याआधीच संपतो . समाजातील तरुणांना निष्क्रिय करणारी दारू राजरोस मिळू लागली तर खरोखर आपल्या देशाची भरभराट होईल का ? आताच्या करोंनाच्या पार्श्वभूमीवर जर हे दारू पिऊन संतुलन हरवलेले लोक रस्त्यावर फिरून /पडून करोंनाचा प्रादुर्भाव वाढवणार नाही का ? आणि जर असे झाले तर आजवर ज्या लोकांनी प्रामाणिकपणे लॉकडावून पाळले , ज्या पोलिस डॉक्टर आणि इतर यंत्रणांनी स्व:ताचे जीव धोक्यात घालून सेवा दिली त्यांचे प्रयत्न मातीमोल होणार नाही का ?  एसी मध्ये बसून समर्थन करणारे यांना एकच आवाहन करावेसे वाटते की , त्यांनी अशाप्रकारे उध्वस्त होणार्‍या दहा कुटुंबाची तरी जबाबदारी घ्यावी आणि मग दारूबंदीला विरोध करावा . माझ्या एक वकील स्नेही दिलशाद मुझावर कोल्हापूरच्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालकल्याण समितीच्या सदस्य आहेत . त्या दारुमुळे होणार्‍या मुलांच्या आणि महिलांच्या दुर्दशेचे शोषणाचे वर्णन करीत होत्या . ऐकून ज्या गोष्टी अस्वस्थ करतात त्या जगताना त्या लोकांची काय अवस्था होत असेल . व्यसनाधीनतेमुळे वाढणारी गुन्हेगारी , घरगुती हिंसा याला शासन फक्त कायदे करून आळा घालू शकत नाही . कारण निम्यापेक्षा जास्त गुन्हे पोलिसांपर्यंत जातच नाहीत . जे जातात त्यातही न्याय मिळणारे कितीतरी अल्प आहेत . महसुलाचे कारण पुढे करणे योग्य नाही . महसुलाचे तेच एकमेव साधन नाही . आणि ज्यांच्या सोईसाठी हा महसूल गोळा होईल त्यांचे आणखी हाल वाढणार असतील तर याला अर्थ तरी काय ? हे म्हणजे पेशंट नाही म्हणून डॉक्टरने निरोगी माणसांच्या किडन्या  विकण्यासारखे झाले ! महसुलासाठी जर सरकार दारुविक्रीला परवानगी देत असेल आणि आर्थिक अडचणीचे कारण पुढे करत असेल तर सरकारला गांधीजींच्या त्या शब्दांची आठवण करून द्यावीशी वाटतेय , “ जोवर दारूच्या व्यापारातून प्राप्ती काढणे आवश्यक मानतात तोवर ते जे आपल्या लोकांचे नि:संशय भले करीत आहेत ते वास्तविक न केल्यासारखे होत आहे !”