या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Wednesday, 28 March 2012

जॉगिंग ग्रुप

      ''अलका , ए अलका अग उठ न ,किती वेळ झाला तो गजर वाजतो आहे .'' माधवराव चष्मा उशीखाली चाफत बोलले . पण काकी काही उठण्याच्या मनस्थितीत नव्हत्या उलट काकांना समजावत म्हणाल्या ,''अहो असे काय करता , आता काही ऑफिसला जायचे नाही ,कालच रिटायर झालात तुम्ही ..आता उशिरापर्यंत झोपायची सवय करा , लवकर उठून तरी काय करणार ?'' काकींच्या या प्रश्नावर माधवरावांना काही उत्तर सुचले नाही . हाती आलेला चष्मा घालून तसेच येवून खिडकीत उभे राहिले . माधवराव आयुष्यात कधी काम नाही म्हणून कंटाळवाणे दिवस घालवणाऱ्यानपैकी नव्हते ..आजच्या तरुणाला लाजवेल असे चैतन्य त्यांच्या नसांमध्ये भिनलेले होते .. म्हणूननच काकींचे बोलणे त्यांनी फक्त ऐकले आणि डोक्यातून बाजूला केले .. 
      असे बसून चालणार नाही ..काहीतरी करणे गरजेचे आहे ..नाही तसे पर्याय शोधला तर मोकळे मन भूताटकिचे घर बनायला वेळ लागणार नाही ... माझ्या आवाक्यातले एकतरी काम असेलच  कि ? पैश्यासाठी नाही पण वेळ घालवण्यासाठी किंवा एखादा छंद म्हणून का असेना ..कारण अश्या बऱ्याच गोष्टी आयुष्यात करायच्या राहून गेल्या वेळ नाही म्हणून , मग आता वेळ आहे तर करू या ती पूर्ण ! लगेच गडबडीने त्यांनी अंघोळ आवरून स्वताच चहा करून घेतला आणि चप्पल पायात सरकवत म्हणाले ,''अलका मी येतो ग जरा फिरून , आलो तासाभरात .'' काकींनी डोळे उघडले आणि मनाशीच पुटपुटल्या ,''गप्प बसतील ते माधवराव कसले ?'' आणि काकांचा असा एकेरी उल्लेख केला म्हणून मनाशीच लाजल्या ..
     डोळ्यांवर चष्मा , कुर्ता पायजमा आणि मागे बांधलेले हात ..इकडे तिकडे न्याहाळत माधवराव रस्त्याच्या कडेने चालत होते , सकाळची वेळ असल्याकारणाने रस्ता तसा निर्मनुष्यच होता ..कुठेतरी एखाद्या वाहनाची ये जा ,तर कधी एखादी सायकल चाललेली . एखादी ओळखीची व्यक्ती दिसली कि मधून मधून मागे बांधलेले हात समोर जोडून नमस्कार करत अगदी रमत गमत माधवराव चालत होते ... इतका मोकळा श्वास ते आज प्रथम अनुभवत होते .. न कसली घाई न कसली गडबड ..जिथपर्यंत पाय दमत नाहीत तिथपर्यंत चालायचे ...बस ...फक्त चालायचे ..
      घरी खुशीत आलेल्या आपल्या नवऱ्याला पाहून काकी ओळखून गेल्या कि आता हि स्वारी रोज सकाळी फिरायला जाणार ..पण याचे त्यांना समाधान वाटले कि करमणुकीचे एक साधन तर मिळाले यांना .. आता हा रोजचा नियमच बनला .सकाळी काही दिवस माधवराव एकटेच फिरायला जात पण आठ दहा दिवसांनी त्यांचे सहकारी वाढले . मग महिनाभरात तेरा जणांचा एक ग्रुप तयार झाला ,ते इतर वेळीही एकत्र येऊ लागले . मग काय एक क्रिकेट टीम तयार झाली ,नामकरण झाले ''जॉगिंग ग्रुप '' कारण ते भेटले ते जॉगिंगमुळे ... सगळ्यांचे स्वभाव भिन्न पण एकत्र अगदी लहान मुलांप्रमाणे वावरत ,तसेही म्हातारपण म्हणजे परतून आलेले बालपणच कि ..मग हळू हळू त्यांनी समाजकार्य चालू केले अगदी गल्ली ,रस्त्यांची सफाई पासून ते वर्गणी करून काही कार्यक्रम ठेवणे ... एक न अनेक .. या वयातही तरुणांप्रमाणे त्यांची मैत्रीही बहरत होती .. अगदी कॉलेजमधल्या मुलांनप्रमाणे ..
      एका कार्यक्रमाचे आयोजन चालू होते .. पण माधवराव आणि सावंत काकांचे एकमत होत नव्हते .. बोलण्याबोलण्यात वाद वाढत गेला .. आवाजाची वाढलेली धार पाहून थिटेनाना बोलले, ''नका भांडू रे लहान मुलांसारखे , काहीतरी सुवर्णमध्य काढू आपण , आणि काय रे माधव आपण पिकली पाने कधी गळून जाऊ नाही रे कळणार मग वाईट वाटत राहील पण भेट नाही . आजचा दिवस सुखाचा करणे हेच फक्त आपल्या हातात ,गोड बोलायला वेळ नाही जिथे तिथे भांडता काय रे .. आणि खिळखिळी झालेली हि शरीरे मनाच्या चैतन्यामुळे तग धरून आहेत तर परत चैतन्य हरवून बसायचे का ? सांगा सावंत .'' आता मात्र शांतपणे सर्वजन थिटे नानांचे बोलणे ऐकत होते , सगळेच काहीवेळ स्तब्ध झाले ...अंतर्मुख झाले . सर्वांच्या मनावरील पकड पुन्हा आवळत थिटे नाना बोलू  लागले ,'' खरच नाही असे वाटत तुम्हा सर्वांना कि किती आयुष्य बाकी आहे आणि आपल्याला हसायला वेळ नाही मग भांडण काढून पुन्हा रडायचे ते का ? आज बहरलेला तरु उद्या निष्पर्ण होणार आहे , कोपऱ्यावरच्या पडक्या वाड्याची जागा उंच इमारत घेणार आहे .. जे आज आहे ते उद्या असेलच असे नाही मग या जॉगिंग ग्रुप मधला एकेकजन गळून जाणार आहे .. नका रे असे करू आजचा दिवस जगून घ्या ... '' नाना उठले आणि काठी टेकवत चालू लागले .. सगळे निशब्द होवून नाना गेलेल्या दिशेकडे पाहत राहिले .. हळूहळू प्रत्येकजण उठून गेले , माधवराव मात्र बराच वेळ तिथेच बसून राहिले आणि या क्षणभंगुर आयुष्याबद्दल विचार करत राहिले .. खरच मी आज दुखावलेली माणसे .. त्यांना बोललेले शब्द पुन्हा माघारी घेऊ नाही शकत मग का असे कटू बोलावे .. ज्याचे त्याचे विचार वेगळे ,संदर्भ वेगळे मग मी म्हणतो तेच योग्य आहे असे का मानावे प्रत्येकाने ..नाही मी सावंत काकांची माफी मागेल मी जरा जास्तच बोललो म्हणून ...
    माधवराव सावंतांच्या घरी गेले , दार वाजवायच्या आत सावंत बाहेर आले पण त्यांचा चेहरा बावरलेला होता ,''माधवराव चला लवकर , नानांना हॉस्पिटलमध्ये नेले आहे . जवळच हॉस्पिटल असल्याने सर्वजन तिथे जमा झालेले . पण सर्व संपले होते .. उपचार मिळण्यापूर्वीच नानांचे जीवनकार्य आटोपले होते ... माधवराव आज प्रथम खूप रडले ..त्याना स्वताच्या भावना आवरणे कठीण जात होते .. सावंत त्यांच्या जवळ आले आणि पुन्हा दोघांना हुंदका दाटून आला .. एकच विचार मनात येत होता ..
                        आज बहरलेला तरु उद्या निष्पर्ण होणार आहे 
                        कोपऱ्यावरच्या पडक्या वाड्याची जागा उंच इमारत घेणार आहे ....




 

Monday, 5 March 2012

पुन्हा जगताना

तुम्ही कधी पाहिलंय स्वताला पुन्हा वाढताना
स्वप्न उराशी घेवून जीवनाचा डोंगर चढताना

आईच सारे विश्व ,तिच्याच भोवती रमताना
मला हे दे आणून बाबा,नाही दिले कि रुसताना
तुम्ही पाहिलंय कधी स्वताला मनमौजी जगताना
स्वप्न उराशी घेवून जीवनाचा डोंगर चढताना

शाळेचा कंटाळा ,दांडी मारून खेळण्यात गुंतताना
राहिलेली शेवटची गोळी मित्रांसोबत एकत्र खाताना
तुम्ही पाहिलंय स्वताला असा आनंद गोळा करताना 
स्वप्न उराशी घेवून जीवनाचा डोंगर चढताना

शाळेतल्या विनोदावर घरी येवून पोटभर हसताना
दादाने मारले बाबा रागावले आईच्या कुशीत रडताना
तुम्ही पाहिलंय स्वताला इतके निरागस वागताना
स्वप्न उराशी घेवून जीवनाचा डोंगर चढताना

मी मात्र बघितलय स्वताला पुन्हा वाढताना
माझ्या पिलासोबत पुन्हा त्याच गोष्टी बघताना
पुन्हा तीच सुखे तीच दु:ख्खे तेच प्रेम उपभोगताना
स्वप्न उराशी घेवून जीवनाचा डोंगर चढताना



धन्यवाद माझ्या प्रिय बाळ सत्योम , गेलेले निरागस आयुष्य पुन्हा तुझ्यासोबत जगणे तुझ्यामुळे शक्य झाले. आजच्या वाढदिवसाच्या अगणित शुभेछ्या तुझ्यासाठी !  


                                               झोपेत जेवताना सत्योम !

Saturday, 3 March 2012

स्वप्नात हरवलेलं मन

स्वप्नात हरवलेले एक मन
वास्तवाचे नव्हते जराही भान 
एका प्रेमळ शब्दाने भारले तिला 
नव्हती कमतरता मग सुखाला

त्याचे असणे 
प्रेमाची हिरवळ 
सुगंधाचा दरवळ 
भावनांची दाटी 
फक्त त्याच्यासाठी 

त्याचे नसणे 
जीवाची होरपळ 
भेटीसाठी तळमळ 
उठता विरहाचे रान 
उडून जाती तिचे प्राण 

स्वप्नातून मन जागं झालय
त्याने वास्तवाचं भान दिलय
सुखाने त्याचं घर भरलंय
त्याच्या सहवासात मन रमलय!   


Thursday, 9 February 2012

मी अन तू

मी खळखळनारी नदी 
तू स्थिर समुद्र
मी गहिवरली कातरवेळ 
तू शांत रात्र 

मी भरकटली कविता 
तू तिचा गहिराअर्थ 
मी असह्य किंकाळी 
तू एक हाक आर्त 

मी उमलते कमळ
तू  मंद दरवळ 
मी वारा उनाड 
तू न हलणारे झाड 

मी काळजाची धडधड 
तू ह्रिदयीची कळ गोड 
मी उतरणीचा घाट
तू वळणाची पायवाट 

मी लुकलुकती तारका लोभस 
तू उगवणारा चंद्र सावकाश
मी एक अवखळ कल्पना
तू मनीची गंभीर भावना

वरून दिसले जरी वेगळेपण
एकमेकांसाठीच बनलो आपण
म्हणून मलाही पटते,
तुझे मीपण माझे तुपण
खरच नाही वेगळे आपण 

Monday, 6 February 2012

आहे सर्व तरी

आहे सुंदर घर आंगण,
पण रांगोळ नाही.
फुलला छान बगीचा.
तुळस कोमेजून जायी.

आहे सुंदर देव्हारा,
पण देव पारशेच राही.
आहे गाण्यांचा गोंगाट फार,
तुझे गुणगुणणे नाही.

आहे स्वच्छ फरशी,
पण थोडी  धूळ आहे बाकी.
शर्टावरचा  एक डाग,
का तुझी वाट पाही.

ओळखतात सर्व मला,
पण जाणणारे कुणी नाही.
आहेत मानसे  नाती नाही,
घर आहे पण घरपण नाही.

जपले मुद्दाम एक व्यसन,
तुझ्या धाकाची वाट पाही.
तू नसली तरी चालू आहे जगणे,
मग का मन तुझी वाट पाही ?




आपण बदलायला हवं

वेळ आली आहे ,
आतातरी आपण बदलायला हवं
पैसे घेवून मत विकणे थांबवायला हवं

सरंजामशाही डोईजड होत आहे
आपल्या अस्तित्वालाच छेद देत आहे
लोकशाहीच रोप वाढवायलाच हवं
पैसे घेवून मत विकणे थांबवायला हवं

आपलं मत आपली अस्मिता आहे
तीच नसेल तर जगणेच व्यर्थ आहे
आपलं जीवन आता तरी सावरायला हवं
पैसे घेवून मत विकणे थांबवायला हवं

 भाषा चालू आहे अरेरावीची
अस्फुट भावना कोंडल्या मनीची
आता तरी स्वताला उघड मांडायला हवं
पैसे घेवून मत विकणे थांबवायला हवं

आज आपल्या अजून हातात आहे
आज सुपात उद्या जात्यात आहे
आता तरी क्षणाच्या लोभाला आवरायला हवं
पैसे घेवून मत विकणे थांबावायला हवं

अस्वस्थ समाजमन व्यक्त व्हायला हवं
वेळ आली आहे ,
आतातरी आपण बदलायला हवं
खरच मनापासून वाटतं,
पैसे घेवून मत विकणे थांबवायला हवं ........

Friday, 3 February 2012

तू अन मी

माझे तुपण
अन तुझे मीपण
खरेच सांग
वेगळे आहोत का आपण


रुतला काटा जरी
वेदना तुझ्या उरी
माझ्यासाठी जगते
मरते  कितीदा तरी.


पाठ फिरवली तरी
ठेवून आशा  न्यारी
तेवत ठेवली ज्योत
दुःखाच्या वादळवारी


आला सांजवारा
वारला दु:खाचा पसारा
माझ्यासाठी जगलीस
हाती घेवून निखारा


कळले मला प्रेम तुझे
तुझ्यासाठी झुरले मनहि माझे
खर सांगतो एकच स्वप्न पहिले
असावे छान घरटे तुझे नि माझे


म्हणून तुला विचारतो
माझे तुपण
अन तुझे मी पण
खरेच सांग
वेगळे आहोत आपण?