या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Wednesday 28 March 2012

जॉगिंग ग्रुप

      ''अलका , ए अलका अग उठ न ,किती वेळ झाला तो गजर वाजतो आहे .'' माधवराव चष्मा उशीखाली चाफत बोलले . पण काकी काही उठण्याच्या मनस्थितीत नव्हत्या उलट काकांना समजावत म्हणाल्या ,''अहो असे काय करता , आता काही ऑफिसला जायचे नाही ,कालच रिटायर झालात तुम्ही ..आता उशिरापर्यंत झोपायची सवय करा , लवकर उठून तरी काय करणार ?'' काकींच्या या प्रश्नावर माधवरावांना काही उत्तर सुचले नाही . हाती आलेला चष्मा घालून तसेच येवून खिडकीत उभे राहिले . माधवराव आयुष्यात कधी काम नाही म्हणून कंटाळवाणे दिवस घालवणाऱ्यानपैकी नव्हते ..आजच्या तरुणाला लाजवेल असे चैतन्य त्यांच्या नसांमध्ये भिनलेले होते .. म्हणूननच काकींचे बोलणे त्यांनी फक्त ऐकले आणि डोक्यातून बाजूला केले .. 
      असे बसून चालणार नाही ..काहीतरी करणे गरजेचे आहे ..नाही तसे पर्याय शोधला तर मोकळे मन भूताटकिचे घर बनायला वेळ लागणार नाही ... माझ्या आवाक्यातले एकतरी काम असेलच  कि ? पैश्यासाठी नाही पण वेळ घालवण्यासाठी किंवा एखादा छंद म्हणून का असेना ..कारण अश्या बऱ्याच गोष्टी आयुष्यात करायच्या राहून गेल्या वेळ नाही म्हणून , मग आता वेळ आहे तर करू या ती पूर्ण ! लगेच गडबडीने त्यांनी अंघोळ आवरून स्वताच चहा करून घेतला आणि चप्पल पायात सरकवत म्हणाले ,''अलका मी येतो ग जरा फिरून , आलो तासाभरात .'' काकींनी डोळे उघडले आणि मनाशीच पुटपुटल्या ,''गप्प बसतील ते माधवराव कसले ?'' आणि काकांचा असा एकेरी उल्लेख केला म्हणून मनाशीच लाजल्या ..
     डोळ्यांवर चष्मा , कुर्ता पायजमा आणि मागे बांधलेले हात ..इकडे तिकडे न्याहाळत माधवराव रस्त्याच्या कडेने चालत होते , सकाळची वेळ असल्याकारणाने रस्ता तसा निर्मनुष्यच होता ..कुठेतरी एखाद्या वाहनाची ये जा ,तर कधी एखादी सायकल चाललेली . एखादी ओळखीची व्यक्ती दिसली कि मधून मधून मागे बांधलेले हात समोर जोडून नमस्कार करत अगदी रमत गमत माधवराव चालत होते ... इतका मोकळा श्वास ते आज प्रथम अनुभवत होते .. न कसली घाई न कसली गडबड ..जिथपर्यंत पाय दमत नाहीत तिथपर्यंत चालायचे ...बस ...फक्त चालायचे ..
      घरी खुशीत आलेल्या आपल्या नवऱ्याला पाहून काकी ओळखून गेल्या कि आता हि स्वारी रोज सकाळी फिरायला जाणार ..पण याचे त्यांना समाधान वाटले कि करमणुकीचे एक साधन तर मिळाले यांना .. आता हा रोजचा नियमच बनला .सकाळी काही दिवस माधवराव एकटेच फिरायला जात पण आठ दहा दिवसांनी त्यांचे सहकारी वाढले . मग महिनाभरात तेरा जणांचा एक ग्रुप तयार झाला ,ते इतर वेळीही एकत्र येऊ लागले . मग काय एक क्रिकेट टीम तयार झाली ,नामकरण झाले ''जॉगिंग ग्रुप '' कारण ते भेटले ते जॉगिंगमुळे ... सगळ्यांचे स्वभाव भिन्न पण एकत्र अगदी लहान मुलांप्रमाणे वावरत ,तसेही म्हातारपण म्हणजे परतून आलेले बालपणच कि ..मग हळू हळू त्यांनी समाजकार्य चालू केले अगदी गल्ली ,रस्त्यांची सफाई पासून ते वर्गणी करून काही कार्यक्रम ठेवणे ... एक न अनेक .. या वयातही तरुणांप्रमाणे त्यांची मैत्रीही बहरत होती .. अगदी कॉलेजमधल्या मुलांनप्रमाणे ..
      एका कार्यक्रमाचे आयोजन चालू होते .. पण माधवराव आणि सावंत काकांचे एकमत होत नव्हते .. बोलण्याबोलण्यात वाद वाढत गेला .. आवाजाची वाढलेली धार पाहून थिटेनाना बोलले, ''नका भांडू रे लहान मुलांसारखे , काहीतरी सुवर्णमध्य काढू आपण , आणि काय रे माधव आपण पिकली पाने कधी गळून जाऊ नाही रे कळणार मग वाईट वाटत राहील पण भेट नाही . आजचा दिवस सुखाचा करणे हेच फक्त आपल्या हातात ,गोड बोलायला वेळ नाही जिथे तिथे भांडता काय रे .. आणि खिळखिळी झालेली हि शरीरे मनाच्या चैतन्यामुळे तग धरून आहेत तर परत चैतन्य हरवून बसायचे का ? सांगा सावंत .'' आता मात्र शांतपणे सर्वजन थिटे नानांचे बोलणे ऐकत होते , सगळेच काहीवेळ स्तब्ध झाले ...अंतर्मुख झाले . सर्वांच्या मनावरील पकड पुन्हा आवळत थिटे नाना बोलू  लागले ,'' खरच नाही असे वाटत तुम्हा सर्वांना कि किती आयुष्य बाकी आहे आणि आपल्याला हसायला वेळ नाही मग भांडण काढून पुन्हा रडायचे ते का ? आज बहरलेला तरु उद्या निष्पर्ण होणार आहे , कोपऱ्यावरच्या पडक्या वाड्याची जागा उंच इमारत घेणार आहे .. जे आज आहे ते उद्या असेलच असे नाही मग या जॉगिंग ग्रुप मधला एकेकजन गळून जाणार आहे .. नका रे असे करू आजचा दिवस जगून घ्या ... '' नाना उठले आणि काठी टेकवत चालू लागले .. सगळे निशब्द होवून नाना गेलेल्या दिशेकडे पाहत राहिले .. हळूहळू प्रत्येकजण उठून गेले , माधवराव मात्र बराच वेळ तिथेच बसून राहिले आणि या क्षणभंगुर आयुष्याबद्दल विचार करत राहिले .. खरच मी आज दुखावलेली माणसे .. त्यांना बोललेले शब्द पुन्हा माघारी घेऊ नाही शकत मग का असे कटू बोलावे .. ज्याचे त्याचे विचार वेगळे ,संदर्भ वेगळे मग मी म्हणतो तेच योग्य आहे असे का मानावे प्रत्येकाने ..नाही मी सावंत काकांची माफी मागेल मी जरा जास्तच बोललो म्हणून ...
    माधवराव सावंतांच्या घरी गेले , दार वाजवायच्या आत सावंत बाहेर आले पण त्यांचा चेहरा बावरलेला होता ,''माधवराव चला लवकर , नानांना हॉस्पिटलमध्ये नेले आहे . जवळच हॉस्पिटल असल्याने सर्वजन तिथे जमा झालेले . पण सर्व संपले होते .. उपचार मिळण्यापूर्वीच नानांचे जीवनकार्य आटोपले होते ... माधवराव आज प्रथम खूप रडले ..त्याना स्वताच्या भावना आवरणे कठीण जात होते .. सावंत त्यांच्या जवळ आले आणि पुन्हा दोघांना हुंदका दाटून आला .. एकच विचार मनात येत होता ..
                        आज बहरलेला तरु उद्या निष्पर्ण होणार आहे 
                        कोपऱ्यावरच्या पडक्या वाड्याची जागा उंच इमारत घेणार आहे ....




 

No comments: