या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday 11 June 2018

दहावीचे मार्क ..वास्तव कि फुगवटा ?

          मागील आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर झाला आणि सर्वत्र शुभेछ्यांचा वर्षाव पडू लागला . अगदी काही विद्यालयांचा निकाल तर १०० % लागला . सोशल मिडीयावर तर अनेक निकाल पोस्ट होऊ लागले . बहुतेक विध्यार्थी हे ८० % च्या वर गुण मिळवलेले  होते . २०१७ -१८ या शैक्षणिक वर्षात संपूर्ण महाराष्ट्रातून १६,२८,६१३ विध्यार्थी परीक्षेला बसले होते . त्यापैकी ४,०३,१३७ विध्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत , ५,३८,८९० विध्यार्थी प्रथम श्रेणीत ; ४,१४,९१४ विध्यार्थी द्वितीय श्रेणीत ; ९९,२६२ विध्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत . राज्यात एकूण १२५ विध्यार्थ्यांना १०० % गुण आहेत . ६३,३३१ विध्यार्थ्यांना ९० % पेक्षा जास्त गुण आहेत . संपूर्ण महाराष्ट्राचा  निकाल हा ८९.४१ % इतका लागला आहे . अशा प्रकारे निकाल लागण्याची ही पहिलीच वेळ नाही . गेली काही वर्ष ही एक परंपराच निर्माण झाली आहे . २० वर्षापूर्वी बहुतेक शाळांत प्रथम क्रमांक हा ८० -९० % च्या दरम्यानच असायचा . परंतु आज सगळ्याच शाळांमधून ९० % चा हा आकडा १० तरी विद्यार्थ्यांनी पार केलेला असतोच ! आश्चर्य म्हणजे निम्म्या मुलांना प्राविण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त असते . खरोखर आजचा विध्यार्थी इतका हुशार झाला आहे का ? कि हा मार्कांचा फुगवटा आहे ? असे प्रश्न उपस्थित व्हावेत इतकी परीस्थिती कठीण निर्माण झाली आहे का ? हो तर का ?
   निकालानंतर सोशल मिडीयावर अनेक मेसेज फिरत राहिले . काही जुन्या आठवणींना उजाळा देणारे , काही विनोदी तर काही या फुगवट्याबद्दल शंका उपस्थित करणारे होते . अनेक जाणकार यावर चर्चाही करत होते . आणि त्यांना मुलांच्या भविष्याविषयी काळजीही वाटत होती . कितीतरी जण मुलांच्या डोक्यावर टांगलेल्या स्पर्धेने व्याकुळ होत होते तर कुणाला त्यांचे कोमेजणारे बालपण व्यथित करीत होते . तरीही ही स्पर्धा नाकारणे बहुतेक लोकांना स्वतःसाठीही शक्य नव्हते . असे का झाले याचा विचार करायला आज पालकांनाही वेळ नाही आणि त्यामुळे थोडावेळ व्यथित होणार्या समाजालाही नाही . मग त्या प्रश्नामधून बाहेर पडण्याची उपाययोजना होणे तर अधिक क्लिष्ट होत चालले आहे . बुद्धीला श्रेष्ठत्व देताना श्रमाची प्रतिष्ठा कमी होत चालली आहे . आजही बंद दाराआड काम करणाऱ्याला श्रेठत्व दिले जात आहे . आणि कष्टापासून तरुणांना दूर नेले जातेय . आरोग्यसंपन्न आयुष्य ही संकल्पना नामशेष होऊन संपन्न आयुष्य हेच सर्वांचे ध्येय होतेय . आर्थिक संपन्नता प्राप्त करणे इतकेच ध्येय मुलांच्याही पुढे ठेवले जात आहे . कुणीही पालक मुलांना मैदानी खेळ खेळवण्यासाठी उत्सुक नसतात , शाळांचे निकाल टक्क्यांमध्ये पाहून मुलांना शाळेत प्रवेश घेतला जातो . शाळेचे मैदान किती मोठे आहे हे पहायलाही कुणाला वेळ नसतो . काही शाळा तर गुराढोराप्रमाणे मुलांना वर्गामध्ये कोंबत असतात .  शेळ्यामेंढ्या सारखी पळणारी ही मुले खरोखर एक सुदृढ समाज निर्माण करू शकतील ? हा प्रश्न सतत मनाला पोखरत राहतो !
   या मागच्या कारणांचा जर पाठपुरावा केला तर एक भयाण अशी व्यवस्था यामागे असल्याचे दिसते . सारे अगदी बेमालूमपणे घडवून आणले जात आहे . या धूळफेकीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही . पालकांना आपले पाल्य ८० % च्या घरात गेले कि अनेक मोठी स्वप्ने दिसू लागतात . कारण त्यांच्या वेळी हे मार्क वर्गात पहिल्या आलेल्या विध्यार्थ्याचे असत आणि तो आज कुठेतरी तथाकथित यशस्वी असतो . पालकांच्या अपूर्ण स्वप्नांना पुन्हा पालवी फुटू लागते . मोठी स्वप्ने मोठी रक्कम मागतात . त्यासाठी हे पालक राबराब राबतात . पाल्य ८० % मिळवते . मग पालक डॉक्टर , इंजिनियर , सरकारी अधिकारी आणि तत्सम मोठ्या पदांची अपेक्षा बाळगून मुलांना स्पर्धेत उतरवत राहतात . त्यासाठी भलीमोठी जाहिरात करणारे क्लासेस त्यांच्या स्वप्नांना आणखी प्रोत्साहन देत राहतात . मग क्लासची अधिक फी त्यांच्यासाठी उद्याच्या यशाचे (?) हप्ते  ठरते . कुणीही आपल्या पाल्याच्या बुद्धिमत्तेचा आवाका तपासण्याचा प्रयत्न करीत नाही ,कारण त्याच वेळी सारे पालक आपला आर्थिक आवाका निर्माण करण्यात व्यस्त असतात . मागे एकदा असेच एका सहकार्यांना दुसरा मुलगा झाल्यावर मी सहज प्रश्न केला आता भरपूर मालमत्ता करावी लागेल ? त्यावर त्यांनी एक छान प्रतिप्रश्न केला, ‘ आपणच जर सारे करून ठेवले तर मुलांनी काय करायचे ?’ वास्तविक हा प्रश्न प्रत्येक पालकांना पडायला हवा !
  बरं इतका आटापिटा करूनही मुले बारावी परीक्षेत अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत . दहावीत सर्वाधिक गुण मिळवणारी मुले बारावीत लांब फेकली जातात . अटीतटीने जरी मार्क मिळवले तरी ते अपेक्षेपेक्षा खूप कमी असतात . NEET , IIT JEE , AIIMS , MHTCET यासारख्या परीक्षेत तर खूप कमी मुले टिकतात . आणि जी जवळपास गेलेली असतात ती पुन्हा स्वप्नांच्या मागे लागतात . भलीमोठी डोनेशनची रक्कम घेऊन . बरीच मुले तिथेही टिकत नाहीत . ज्यांना हे करणे शक्य नाही त्यांना सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न खुणावू लागते . MPSC UPSC करणारी बरीच मुले हे बारावीत कमी मार्क असल्याने डॉक्टर इंजिनिअर होता न आलेली असतात . तीही या स्पर्धेत मागे पडतात .
  यात सगळ्यात बिकट अवस्था होते ती ग्रामीण युवकांची ! एकतर शेती किंवा मजुरी करणाऱ्या ग्रामीण लोकांना भरमसाठ फी भरणे अशक्य असते . शेतीच्या अविश्वासू उत्पन्नावर जगणे किती अवघड आहे हे या मुलांनी आधीच अनुभवलेले असते . त्यात एखादा यशस्वी झालेला त्यांना संपन्न उद्याची स्वप्न दाखवत असतो . अभ्यासाच्या बोज्यामुळे ही मुले शेतीपासून आधीच दुरावलेली असतात . आणि आईवडीलही मुलांना शेतीत उतरू देण्याच्या मानसिकतेत नसतात . कारण शेतीचे सारेच रामभरोसे . शेवटी काही मुले यशस्वी होतात परंतु जवळजवळ ८० % मुले ही काहीही न मिळवता माघारी येतात . अशा मुलांपुढे आयुष्य आ वासून उभे असते , कष्ट करणारे आईबाप थकलेले असतात . जबाबदारी आता या मुलांवर असते . छानछौकी राहण्याची सवय , लग्नाच्या घोडेबाजारात नसलेली पत ,आणि शेतीची कामेही येत नाहीत , इतर औद्योगिक शिक्षणही घेतलेले नसते .त्यात  आरोग्याकडे आजवर केलेले दुर्लक्ष त्यांना शारीरक दृष्ट्याही कमजोर ठेवते . कष्टाची कामे करणे अशक्य होऊन जाते . ही निराशा या मुलांचे आयुष्य कोमेजून टाकते . आणि व्यसनाधीनता त्यांना पोखरून टाकते . यशाने सुरु झालेली ही अयशस्वी कारकीर्द घेऊन ही मुले उद्वेग आणणारे , नाकर्तेपणाचे आयुष्य जगत राहतात . हे कुठेतरी थांबायला हवे . दहावीच्या मार्कांचा हा कृत्रिम फुगवटा या नव्या पिढीचे कधीही भरून न येणारे मानसिक शारीरक नुकसान करतो आणि उरतो एक पोखरलेला समाज !
     शिक्षणसंस्थांचे बाजारीकरण आणि कोचिंग क्लासेसचे स्तोम या गोष्टी जर यामागे असतील तर वेळीच याला आळा घालायला हवा . नाहीतर राजकारण्याचे कुरण होणारी शिक्षणक्षेत्रे कधीही उज्ज्वल भारत घडवू शकणार नाही! यात जितकी जबाबदारी शासनाची आहे त्याहीपेक्षा जास्त जबाबदारी पालकांची आहे . कारण आपलं मुल हे स्पर्धेचं घोडं बनवायचं कि एक संवेदनशील समाजप्रती जागरूक माणूस ते आपणच ठरवायचं आहे .  

2 comments:

dr mohan said...

GREAT !

Unknown said...

It's true