या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !
Showing posts with label प्रासंगिक. Show all posts
Showing posts with label प्रासंगिक. Show all posts

Friday, 8 May 2020

दारूबंदी आणि करोना

  परवापासून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे . सर्वत्र दारूदुकानांना चालू ठेवण्यासाठी मिळालेल्या शासकीय परवानगीमुळे समर्थनार्थ असमर्थनार्थ प्रतिक्रिया प्रत्येकजण मांडत आहे . ढासळनारी अर्थव्यवस्था हे कारण सरकारने दिले असले तरी चर्चा करणारे अनेक कारणे सांगत आहेत . कुणाला काळजी आहे अनेक दिवस दारू न मिळाल्याने होणार्‍या त्रासाची तर कुणाला वाटते दारू प्रमाणात पिल्याने काय होणार आहे ? दारू म्हणजे फळांचा रस तर आहे ! काहीजण दारूला प्रतिष्ठा देवू पाहत आहेत . अनेकांनी दारूचा इतिहास सांगून त्याची भलामन केली . आपले देवदेवता पितात , पूर्वज घ्यायचे वगैरे . कुणाला श्रमपरीहारासाठी हवी आहे . अनेकांनी मानसिक आरोग्याचे कारण पुढे केले . करोंनामुळे आलेले मानसिक तणाव कमी व्हावेत ही काहींची इच्छा आहे . काहीजनांना कुटुंबासोबत (बायको ) राहून होणार्‍या भांडणावर दारू हा इलाज वाटतो . सरकार म्हणते राज्याची बिकट आर्थिक अवस्था सावरण्यास दारूच्या विक्रीतुन मिळणारा महसूल गरजेचा आहे . दारू पिणारे , विकणारे आनंदात आहेत . अनेक विनोद केले जात आहेत . दारूडे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत वगैरे .

   ज्या देशाच्या इतिहासात महात्मा गांधी हे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते . ज्या गांधी विचारांनी भारताच्याच नाही तर त्यानंतर स्वतंत्र झालेल्या प्रत्येक देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली आहे . तळागाळातील प्रत्येक व्यक्ती जोवर दु:खात आहे अडचणीत आहे तोवर माझे कार्य चालूच राहील असे गांधीजी नेहमी म्हणत . गांधीजींचे दारूबंदीचे काम सर्वश्रूत आहेच . त्यांचे याविषयी योगदान खूप मोलाचे आहे . नशा केल्याने त्या व्यक्तीचे शारीरिक नुकसान तर होतेच परंतु त्यांच्या मुलांचे स्रियांचे अनन्वित छळ होतात . नशेमुळे क्रियाशीलता संपुष्टात येते . आर्थिक संकटाचा त्या कुटुंबाला सामना करावाच लागतो परंतु उपासमार सुद्धा होते . समाजातील शोषित स्रियांच्या जीवनात आनंद यावा , मुलाबाळांची उपासमार होऊ नये म्हणून गांधीजींनी दारूबंदीचेही आवाहन केले होते . या त्यांच्या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळत असे . असाच एक उल्लेख गांधीजींना लिहीलेल्या म्हैसूर राज्यातील होल्लीकेरी येथील एका पत्रलेखकाने केला आहे . तो म्हणतो , “माझ्या रानी परज जमातीच्या लोकांनी दीड महिन्यापासून ताडी व इतर मादक पेये पिण्याचे पुर्णपणे सोडून दिले आहे . कुणी जर नशा करण्याचा प्रयत्न केला तर गावाचे नाईक , यजमान आणि करभान यांच्याकडून दखल घेऊन कडक शासन केले जाते . यामुळे झोपड्यात आता भांडणे होत नाहीत . त्यांच्या बायका आनंदाची बातमी देतात . त्यांचा काळ शांततेत चालला आहे .” या पत्राला उत्तर देताना गांधीजी त्यांचे अभिनंदन करतात . शुद्धीकरण चळवळीतील त्यांच्या योगदानाचे कौतुक करतात . 1921 च्या चळवळीचा उल्लेख करून ते म्हणतात की त्यावेळी घडले त्याप्रमाणे पुन्हा हे लोक नशेकडे वळू नयेत म्हणून विशेष प्रयत्न करायला हवेत . त्यासाठी त्यांना चरख्याचा आश्रय घ्यायला लावायला हवा . त्यामुळे त्यांचे कापडावर खर्च होणारे पैसेही वाचतील आणि आर्थिकदृष्ट्या ते सक्षम होतील . दारुवर खर्च होणारा पैसा पण वाचेल . गांधीजी पुढे जावून हेही सांगतात की नशामुक्ती इतकेच ध्येय नाही तर व्यसनांचे उच्चाटण झाल्याचा अहवालही आपण द्याल याची मला उत्सुकता आहे .

  या पत्रानंतर बनसाडा संस्थांनातील रानी परज चौकशी समितीचा अहवाल आहे . तो वल्लभभाई पटेल यांनी या संस्थांनातील 47 गावांना भेटी देऊन काढला आहे . यात ते महाराजसाहेबांच्या प्रजेच्या प्रती केलेल्या चांगल्या कामांचा उल्लेख करतात . त्याचे गांधीजी कौतुकही करतात . परंतु ते महाराजसाहेबांना सांगतात , “ जोवर आपण दारूच्या व्यापारातून प्राप्ती करणे आवश्यक मानतात तोवर तुम्ही जे काही तुमच्या माणसांचे नि:संशय भले करीत आहेत ते वास्तविक न केल्यासारखे होत आहे . बनसाडा प्रदेशाला लागून असलेल्या ब्रिटिश , गायकवाड व धरमपुर या तीन शेजारी प्रदेशात दारूबंदी नसल्यामुळे तुमच्या संस्थांनाला दारूबंदीचे धोरण यशस्वी करणे अवघड जात आहे . ही गोष्ट खरी आहे . पण महान गोष्टी महान त्यागावाचून आणि महान उपाययोजना केल्यावाचून अमलात आणता येत नसतात . आपल्या संस्थांनाला संपूर्ण दारूबंदी जाहीर करून या कामी पुढाकार घेता येईल . इतकेच नव्हे तर शेजारच्या राज्यात दारूबंदीकरता चळवळ करणेही शक्य होईल . मुख्य गोष्ट दारूपासून मिळणारा महसूल सोडून देण्याला तयार होण्याची आहे . या बाबतीत लागलीच हाती घ्यायचा उपक्रम म्हणजे , मद्यपानाला बळी पडलेल्या जमातीत जोराचा मद्याविरोधी प्रचार चालविण्याव्यतिरिक्त हा महसूल इतर कोणत्याही कामी , मग ती कामे कितीही प्रशंसनीय असली तरी , वापरायचा नाही असे ठरविणे हा होऊ शकेल . कोणत्याही संस्थांनाला आपल्या लोकांनी या दुर्व्यसनाचा त्याग करावा असे मनापासून वाटत असेल , त्याला या दुर्व्यसनात लोळत पडणे कायद्याने अशक्य करून स्वस्थ बसता येणार नाही , त्याला त्या दुर्व्यसनाचे मूळ शोधून लोकांनी त्याचा त्याग करण्याविषयीचे शिक्षण त्यांना द्यावे लागेल . दारूबंदीचे कोणतेही धोरण जर मी सुचविलेल्या स्वरुपाच्या रचनात्मक कार्याच्या जोडीने अमलात आणण्यात आले तर त्या धोरणांचा परिणाम त्या लोकांची आणि त्यांच्याबरोबरच त्या संस्थानाची उतरोत्तर अधिक भरभराट होण्यातच खात्रीने होणार . संपूर्ण दारूबंदी अमलात आणण्याच्या दृष्टीने जगात हिंदुस्तान हाच सर्वात आशादायक देश आहे याचे साधे कारण आहे की , येथे व्यसनासक्ती ही प्रतिष्ठेची किंवा छानछौकीची गोष्ट मानली जात नाही आणि ती काही विशिष्ट वर्गापुरतीच मर्यादित आहे !” ( महात्मा गांधी यांचे संकलित वाङ्मय खंड 34 )

     वरील गोष्टीवरून आधी केलेल्या सर्व दारू / व्यसनविषयक समर्थनाची उत्तरे गांधीजींनी आधीच दिलेली आहेत . खरेतर उच्चमध्यमवर्ग सोडला तर दारू आणि इतर व्यसनांमुळे कुटुंबातील स्रिया आणि मुलांची होणारी परवड अत्यंत क्लेशकारक आहे . मागे काही दिवसापूर्वी अशीच एका सासू सून आलेल्या . त्या मुलीचा नवरा हातभट्टीची दारू पिल्याने गेला होता . त्या दोघीही सासूसुनेनी बरे झाले मेला कमीतकमी लेकरबाळांच्या मुखात घास जातोय आता अशी प्रतिक्रिया दिली . जेंव्हा एक आई आणि बायको अशी बोलत असेल तेंव्हा खरोखर त्यांना या व्यसनाधीन मुलाचा / नवर्‍याचा किती छळ सहन करावा लागत असेल याचा विचारही करवत नाही . बरे श्रमपरिहार म्हणून मजूर घेत असेल तर त्याच वेळी त्याची बायकोही तितकेच काम करत असते मग तिचा श्रमपरिहार कसा होणार ? काही आदिवासी स्रिया अशी व्यसने जरी करत असल्या तरी त्यांच्या मुलांचे होणारे शोषण कुणी का पाहू शकत नाही . बापाचे अनुकरण मुलगा नकळत्या वयात करू लागतो आणि वयाची पंचविशी होण्याआधीच संपतो . समाजातील तरुणांना निष्क्रिय करणारी दारू राजरोस मिळू लागली तर खरोखर आपल्या देशाची भरभराट होईल का ? आताच्या करोंनाच्या पार्श्वभूमीवर जर हे दारू पिऊन संतुलन हरवलेले लोक रस्त्यावर फिरून /पडून करोंनाचा प्रादुर्भाव वाढवणार नाही का ? आणि जर असे झाले तर आजवर ज्या लोकांनी प्रामाणिकपणे लॉकडावून पाळले , ज्या पोलिस डॉक्टर आणि इतर यंत्रणांनी स्व:ताचे जीव धोक्यात घालून सेवा दिली त्यांचे प्रयत्न मातीमोल होणार नाही का ?  एसी मध्ये बसून समर्थन करणारे यांना एकच आवाहन करावेसे वाटते की , त्यांनी अशाप्रकारे उध्वस्त होणार्‍या दहा कुटुंबाची तरी जबाबदारी घ्यावी आणि मग दारूबंदीला विरोध करावा . माझ्या एक वकील स्नेही दिलशाद मुझावर कोल्हापूरच्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालकल्याण समितीच्या सदस्य आहेत . त्या दारुमुळे होणार्‍या मुलांच्या आणि महिलांच्या दुर्दशेचे शोषणाचे वर्णन करीत होत्या . ऐकून ज्या गोष्टी अस्वस्थ करतात त्या जगताना त्या लोकांची काय अवस्था होत असेल . व्यसनाधीनतेमुळे वाढणारी गुन्हेगारी , घरगुती हिंसा याला शासन फक्त कायदे करून आळा घालू शकत नाही . कारण निम्यापेक्षा जास्त गुन्हे पोलिसांपर्यंत जातच नाहीत . जे जातात त्यातही न्याय मिळणारे कितीतरी अल्प आहेत . महसुलाचे कारण पुढे करणे योग्य नाही . महसुलाचे तेच एकमेव साधन नाही . आणि ज्यांच्या सोईसाठी हा महसूल गोळा होईल त्यांचे आणखी हाल वाढणार असतील तर याला अर्थ तरी काय ? हे म्हणजे पेशंट नाही म्हणून डॉक्टरने निरोगी माणसांच्या किडन्या  विकण्यासारखे झाले ! महसुलासाठी जर सरकार दारुविक्रीला परवानगी देत असेल आणि आर्थिक अडचणीचे कारण पुढे करत असेल तर सरकारला गांधीजींच्या त्या शब्दांची आठवण करून द्यावीशी वाटतेय , “ जोवर दारूच्या व्यापारातून प्राप्ती काढणे आवश्यक मानतात तोवर ते जे आपल्या लोकांचे नि:संशय भले करीत आहेत ते वास्तविक न केल्यासारखे होत आहे !” 


Monday, 11 June 2018

दहावीचे मार्क ..वास्तव कि फुगवटा ?

          मागील आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर झाला आणि सर्वत्र शुभेछ्यांचा वर्षाव पडू लागला . अगदी काही विद्यालयांचा निकाल तर १०० % लागला . सोशल मिडीयावर तर अनेक निकाल पोस्ट होऊ लागले . बहुतेक विध्यार्थी हे ८० % च्या वर गुण मिळवलेले  होते . २०१७ -१८ या शैक्षणिक वर्षात संपूर्ण महाराष्ट्रातून १६,२८,६१३ विध्यार्थी परीक्षेला बसले होते . त्यापैकी ४,०३,१३७ विध्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत , ५,३८,८९० विध्यार्थी प्रथम श्रेणीत ; ४,१४,९१४ विध्यार्थी द्वितीय श्रेणीत ; ९९,२६२ विध्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत . राज्यात एकूण १२५ विध्यार्थ्यांना १०० % गुण आहेत . ६३,३३१ विध्यार्थ्यांना ९० % पेक्षा जास्त गुण आहेत . संपूर्ण महाराष्ट्राचा  निकाल हा ८९.४१ % इतका लागला आहे . अशा प्रकारे निकाल लागण्याची ही पहिलीच वेळ नाही . गेली काही वर्ष ही एक परंपराच निर्माण झाली आहे . २० वर्षापूर्वी बहुतेक शाळांत प्रथम क्रमांक हा ८० -९० % च्या दरम्यानच असायचा . परंतु आज सगळ्याच शाळांमधून ९० % चा हा आकडा १० तरी विद्यार्थ्यांनी पार केलेला असतोच ! आश्चर्य म्हणजे निम्म्या मुलांना प्राविण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त असते . खरोखर आजचा विध्यार्थी इतका हुशार झाला आहे का ? कि हा मार्कांचा फुगवटा आहे ? असे प्रश्न उपस्थित व्हावेत इतकी परीस्थिती कठीण निर्माण झाली आहे का ? हो तर का ?
   निकालानंतर सोशल मिडीयावर अनेक मेसेज फिरत राहिले . काही जुन्या आठवणींना उजाळा देणारे , काही विनोदी तर काही या फुगवट्याबद्दल शंका उपस्थित करणारे होते . अनेक जाणकार यावर चर्चाही करत होते . आणि त्यांना मुलांच्या भविष्याविषयी काळजीही वाटत होती . कितीतरी जण मुलांच्या डोक्यावर टांगलेल्या स्पर्धेने व्याकुळ होत होते तर कुणाला त्यांचे कोमेजणारे बालपण व्यथित करीत होते . तरीही ही स्पर्धा नाकारणे बहुतेक लोकांना स्वतःसाठीही शक्य नव्हते . असे का झाले याचा विचार करायला आज पालकांनाही वेळ नाही आणि त्यामुळे थोडावेळ व्यथित होणार्या समाजालाही नाही . मग त्या प्रश्नामधून बाहेर पडण्याची उपाययोजना होणे तर अधिक क्लिष्ट होत चालले आहे . बुद्धीला श्रेष्ठत्व देताना श्रमाची प्रतिष्ठा कमी होत चालली आहे . आजही बंद दाराआड काम करणाऱ्याला श्रेठत्व दिले जात आहे . आणि कष्टापासून तरुणांना दूर नेले जातेय . आरोग्यसंपन्न आयुष्य ही संकल्पना नामशेष होऊन संपन्न आयुष्य हेच सर्वांचे ध्येय होतेय . आर्थिक संपन्नता प्राप्त करणे इतकेच ध्येय मुलांच्याही पुढे ठेवले जात आहे . कुणीही पालक मुलांना मैदानी खेळ खेळवण्यासाठी उत्सुक नसतात , शाळांचे निकाल टक्क्यांमध्ये पाहून मुलांना शाळेत प्रवेश घेतला जातो . शाळेचे मैदान किती मोठे आहे हे पहायलाही कुणाला वेळ नसतो . काही शाळा तर गुराढोराप्रमाणे मुलांना वर्गामध्ये कोंबत असतात .  शेळ्यामेंढ्या सारखी पळणारी ही मुले खरोखर एक सुदृढ समाज निर्माण करू शकतील ? हा प्रश्न सतत मनाला पोखरत राहतो !
   या मागच्या कारणांचा जर पाठपुरावा केला तर एक भयाण अशी व्यवस्था यामागे असल्याचे दिसते . सारे अगदी बेमालूमपणे घडवून आणले जात आहे . या धूळफेकीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही . पालकांना आपले पाल्य ८० % च्या घरात गेले कि अनेक मोठी स्वप्ने दिसू लागतात . कारण त्यांच्या वेळी हे मार्क वर्गात पहिल्या आलेल्या विध्यार्थ्याचे असत आणि तो आज कुठेतरी तथाकथित यशस्वी असतो . पालकांच्या अपूर्ण स्वप्नांना पुन्हा पालवी फुटू लागते . मोठी स्वप्ने मोठी रक्कम मागतात . त्यासाठी हे पालक राबराब राबतात . पाल्य ८० % मिळवते . मग पालक डॉक्टर , इंजिनियर , सरकारी अधिकारी आणि तत्सम मोठ्या पदांची अपेक्षा बाळगून मुलांना स्पर्धेत उतरवत राहतात . त्यासाठी भलीमोठी जाहिरात करणारे क्लासेस त्यांच्या स्वप्नांना आणखी प्रोत्साहन देत राहतात . मग क्लासची अधिक फी त्यांच्यासाठी उद्याच्या यशाचे (?) हप्ते  ठरते . कुणीही आपल्या पाल्याच्या बुद्धिमत्तेचा आवाका तपासण्याचा प्रयत्न करीत नाही ,कारण त्याच वेळी सारे पालक आपला आर्थिक आवाका निर्माण करण्यात व्यस्त असतात . मागे एकदा असेच एका सहकार्यांना दुसरा मुलगा झाल्यावर मी सहज प्रश्न केला आता भरपूर मालमत्ता करावी लागेल ? त्यावर त्यांनी एक छान प्रतिप्रश्न केला, ‘ आपणच जर सारे करून ठेवले तर मुलांनी काय करायचे ?’ वास्तविक हा प्रश्न प्रत्येक पालकांना पडायला हवा !
  बरं इतका आटापिटा करूनही मुले बारावी परीक्षेत अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत . दहावीत सर्वाधिक गुण मिळवणारी मुले बारावीत लांब फेकली जातात . अटीतटीने जरी मार्क मिळवले तरी ते अपेक्षेपेक्षा खूप कमी असतात . NEET , IIT JEE , AIIMS , MHTCET यासारख्या परीक्षेत तर खूप कमी मुले टिकतात . आणि जी जवळपास गेलेली असतात ती पुन्हा स्वप्नांच्या मागे लागतात . भलीमोठी डोनेशनची रक्कम घेऊन . बरीच मुले तिथेही टिकत नाहीत . ज्यांना हे करणे शक्य नाही त्यांना सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न खुणावू लागते . MPSC UPSC करणारी बरीच मुले हे बारावीत कमी मार्क असल्याने डॉक्टर इंजिनिअर होता न आलेली असतात . तीही या स्पर्धेत मागे पडतात .
  यात सगळ्यात बिकट अवस्था होते ती ग्रामीण युवकांची ! एकतर शेती किंवा मजुरी करणाऱ्या ग्रामीण लोकांना भरमसाठ फी भरणे अशक्य असते . शेतीच्या अविश्वासू उत्पन्नावर जगणे किती अवघड आहे हे या मुलांनी आधीच अनुभवलेले असते . त्यात एखादा यशस्वी झालेला त्यांना संपन्न उद्याची स्वप्न दाखवत असतो . अभ्यासाच्या बोज्यामुळे ही मुले शेतीपासून आधीच दुरावलेली असतात . आणि आईवडीलही मुलांना शेतीत उतरू देण्याच्या मानसिकतेत नसतात . कारण शेतीचे सारेच रामभरोसे . शेवटी काही मुले यशस्वी होतात परंतु जवळजवळ ८० % मुले ही काहीही न मिळवता माघारी येतात . अशा मुलांपुढे आयुष्य आ वासून उभे असते , कष्ट करणारे आईबाप थकलेले असतात . जबाबदारी आता या मुलांवर असते . छानछौकी राहण्याची सवय , लग्नाच्या घोडेबाजारात नसलेली पत ,आणि शेतीची कामेही येत नाहीत , इतर औद्योगिक शिक्षणही घेतलेले नसते .त्यात  आरोग्याकडे आजवर केलेले दुर्लक्ष त्यांना शारीरक दृष्ट्याही कमजोर ठेवते . कष्टाची कामे करणे अशक्य होऊन जाते . ही निराशा या मुलांचे आयुष्य कोमेजून टाकते . आणि व्यसनाधीनता त्यांना पोखरून टाकते . यशाने सुरु झालेली ही अयशस्वी कारकीर्द घेऊन ही मुले उद्वेग आणणारे , नाकर्तेपणाचे आयुष्य जगत राहतात . हे कुठेतरी थांबायला हवे . दहावीच्या मार्कांचा हा कृत्रिम फुगवटा या नव्या पिढीचे कधीही भरून न येणारे मानसिक शारीरक नुकसान करतो आणि उरतो एक पोखरलेला समाज !
     शिक्षणसंस्थांचे बाजारीकरण आणि कोचिंग क्लासेसचे स्तोम या गोष्टी जर यामागे असतील तर वेळीच याला आळा घालायला हवा . नाहीतर राजकारण्याचे कुरण होणारी शिक्षणक्षेत्रे कधीही उज्ज्वल भारत घडवू शकणार नाही! यात जितकी जबाबदारी शासनाची आहे त्याहीपेक्षा जास्त जबाबदारी पालकांची आहे . कारण आपलं मुल हे स्पर्धेचं घोडं बनवायचं कि एक संवेदनशील समाजप्रती जागरूक माणूस ते आपणच ठरवायचं आहे .  

Tuesday, 3 May 2016

जात

प्रत्येक वेळी समाजाने एक समाज खलनायक म्हणून उभा केलाय . कधी ब्राह्मण , कधी मुस्लीम , कधी इंग्रज ...असे कितीतरी ! एखादा समाज खरंच इतका क्रूरकर्मा असतो का ? असेल तर का ? आणि ज्या एका काळात त्या त्या समाजाचे वर्चस्व कायम होते म्हणजे थोडक्यात तो सत्ताधीश राहिला त्या समाजातील साऱ्याच लोकांनी अन्यायाचा पाठपुरावा केला का ? जर ठराविक कट्टर असा वर्ग त्यात असेल तर काही प्रमाणात त्याच जातीतील सामान्य जीवन जगणारे लोकही त्यात होतेच ...हे वास्तव आहे . मग या वर्चस्व असलेल्या सामान्य वर्गाचा इतर समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय होता ? हा विचार कधीच कुणी करताना दिसत नाही .सरसकट त्या साऱ्या लोकांना एकाचा पारड्यात तोलले जाते आणि मग १०० मधील १० सत्ताधीश लोक अन्यायकारक आहेत मग बाकीचे ९० पण त्यात अक्षरशः भरडले जातात . प्रत्येक मनुष्यात एक वर्चस्ववादी मनीषा दडलेली असते . अगदी एखादा भिकारी सुद्धा जवळ बसलेल्या कुत्र्याकडे तुच्छतेने पाहताना दिसतो , असे का व्हावे ? भिकारी तर ना जातीने मोठा असतो ना पैशाने , तरीही तो त्याचे यत्किंचित अस्तित्व त्याच्यापेक्षा दुर्बल घटकावर वर्चस्व दाखवून तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो . हि वर्चस्वाची भावना प्रत्येक जीवात सुप्त किंवा प्रकट अवस्थेत आपण चहुबाजूला अनुभवतो . मग जे आपल्याही आत आहे ते न पाहता आपण खुशाल समोरच्या माणसाच्यातील तीच भावना ठळक करण्याचा प्रयत्न का करीत असतो ?  'आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट' हि म्हण जी सारखी कुणाच्या न कुणाच्या तोंडी असते किती सार्थ आहे .
       हे विचार मनात येण्याचे कारण , नागराज मंजुळे यांचा सैराट सिनेमा ! मी तो अजून पहिला नाही ! पण सोशल मिडीयावर फिरणाऱ्या बऱ्या वाईट पोस्ट वाचून उगीच एक  मराठा समाजाबद्दल लोकांच्या मनात असलेली तेढ चव्हाट्यावर आली आहे . मी जरी मराठा आहे तरी मला आमच्या समाजात खोलवर रुजलेल्या सरंजामशाही विचारांची खूप चीड आहे . पण म्हणून मी पूर्ण समाज धारेवर नाहीच धरू शकत . कारण त्यात ज्या  बाकीच्या चांगल्या सर्वसमावेशक वृत्ती आहेत मला नाही वाटत इतर कुठल्या वर्गात असतील . दोष , गुण हे सर्वच समाजाचा अविभाज्य भाग आहेत . त्याची तुलना चांगले वाईट या तराजूत व्हावी न कि हि जात ती जात अशी . याने फक्त जातीयवाद अधिक ठळक होत जातो आणि समाजमनावर बिंबवला पण जातो . मग इथे राजांचा , आंबेडकरांचा , फुलेंचा अपमान झाला आपण निषेध केला पाहिजे ..म्हणत ठराविक जात पुढे येणार नाही . कारण या सर्व महामानवांचे कार्य सर्व समाजासाठी होते ..प्रत्येक घटकाने या निषेधाचा भाग बनले तर आपोआप जात लयाला जाणार आहे . तिला रंगवून ती अधिक भडक करण्यापेक्षा त्या वृत्ती रंगवायला हव्यात . ते दोष रंगवायला हवेत . आणि याची खबरदारी प्रत्येक माणसाने घ्यावी ,तरच एक सर्वसंध राष्ट्र उदयाला येऊ शकते . नाहीतर या महामानवांनी ज्या सुदृढ समाजाचे स्वप्न पाहत  आयुष्य खर्ची घातले त्यांचे बलिदान व्यर्थ आहे .
                  डॉ संध्या राम शेलार .
हे सांगण्याचे कारण सैराट मध्ये पाटलांचे दुष्कृत्य दाखवताना  पार्श्वभूमीवर केलेला शिवाजी महाराजांच्या चित्राचा वापर ! राजे एका जातीसाठी कधीच मर्यादित नव्हते . बाकी चित्रपट शंभर नंबरी सोने आहे असे माझा चित्रपट पाहिलेला भाऊ संदीप सांगतो आणि fandry नंतर खरे पाहता मंजुळे यांच्या कामाची मीही चाहती आहे . 

Monday, 25 January 2016

खरंच गुलामगिरी संपली आहे का ?

“उठा स्वतंत्र भारताच्या नागरिकांनो , साडे पाच वाजले ..साडे सहा ला तर बस येईल .” बाळाच्या अंगावरची रजई ओढत मी म्हणाले खरी पण इतक्या गारठ्यात त्याला उठवणे मलाही जीवावर आले होते . त्याने पुन्हा पांघरून ओढून घेतले .
“अरे , आज २६ जानेवारी पिलू , शाळेत नाही का जाणार तू ? आज ध्वजारोहण करायचे ना ?” लगेच गडबडीत स्वारी उठून बसली .
“तुला रात्री सांगितले ते ध्यानात आहे ना मम्मी ?” डोळे चोळतच स्वारी बोलू लागली .मीही तोंड वाकडे करून विचारले नजरेनेच काय रे ?
“अशी कशी विसरते तू ? अगं मम्मी मी नाही का सांगितले आणि तू प्रॉमिस पण केलेस की ध्यानात ठेवीन .” तक्रारीचा सूर उंच झाला जरा .
“बरं बाबा , मी तरी काय काय ध्यानात ठेवणार रे , सॉरी पण तू कित्ती गोष्टी सांगतो , सगळ्या नाही लक्षात राहत बघ .” त्याने मग लाडीगोडी लावत जवळ येत सांगितले ,  “अगं , आपल्या दवाखान्याशेजारी एकही झेंडा पडलेला दिसायला नको , दिसला तर मग उचलून ठेवशील असे म्हणाली ना तू ?” मग माझ्या मेंदूत क्लिक झाले . होरे मी म्हणाले खरी ..त्यावेळीच त्याने आणखी एक हट्ट केला होता ..तू तुझा व्हाटस अप चा प्रोफाईल बदलून तिरंगा लावायचा . पण माझ्या एका प्रश्नाने त्याला थोडे गडबडून टाकले . का रे बाळा , फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलाच देशावर प्रेम करायचे का ? तो थोडावेळ चुळबुळ करत राहिला आणि मग म्हणाला , नाहीच गं , मग तू असे कर की वर्षभर तुझा प्रोफाईल तिरंगा ठेव ! किती सोपे उत्तर शोधले रे बाळा तू ..पण इतके सोपे नाहीच सर्व ! फक्त तिरंग्याचा अवमान न करणे इतकीच देशभक्ती का ? किती संकुचित जगतो आहोत आपण ..देश म्हणजे काय ? तो फक्त सरहद्दीतच कायम करायचा का ? की सरहद्दीच्या आतील सर्व जीव समानतेचा धडा गिरवत जगत आहेत यावर देश कायम करायचा ..ही जी माणसामाणसातील दरी आहे ती सरहद्दीच्या बाहेर का संपते ? माणूस म्हणून आपले काहीच अस्तित्व नाही का या भूतलावर ? एक ना अनेक प्रश्नांनी धिंगाणा माझ्या मनात चालू केला , अरे पण विचारात हरवून जमणार नव्हतेच मला ! मुलांचे आवरून त्यांना दूध देवून गाडी येण्याच्या वेळी तैय्यार केले . मुले गेलीही ..पण काम चालू असताना त्या एकांत शांत वातावरणात शाळेच्या पटांगणातून लता मंगेशकरांच्या आवाजात ‘ जरा याद करो कुर्बानी .’ ऐकू येत होते . आणि मन असह्य अशा घालमेलीत अडकून पडले . हाताने काम चालूच होते , परंतु मनाने मी कामात नव्हतेच . बाहेर गेले  , पक्षांना चारा टाकायला आणि भांड्यात स्वच्छ पाणी भरून ठेवायला ..रोजचीच सवय दोन तीन वर्षापासूनची म्हणून सारी कामे अगदी व्यवस्थित चालू होती जरी मन कामात नव्हते ! दोन तीन कावळे लगेच जवळ येवून उभे राहिले त्यांना भांडे धुवून त्यात पाणी टाकेपर्यंत पण दम निघत नव्हता तर्री मी आज लवकर सारे करीत होते . तसाही पक्षांचा दिवस पहाटेच सुरु होतो म्हणजे त्यांना भूक लागणारच ना ? आणि मी मनाशीच हसले ..माणसाने सृष्टीचे गणित आपल्याच ठेक्यावर का चालवले असेल ? पण तरी किती सुधारणा झाली तरी निसर्ग माणसाला हुलकावणी देतोच आणि तोच श्रेष्ठ आहे हे वारंवार दाखवतो . पण हे समजेल त्याला ! मला तरी समजते का ? या प्रश्नावर मात्र मन अधिक गहिऱ्या खाईत जातेय असेच वाटले .
  मी भांडे धुवून पाणी ओतनारच होते रस्त्यावर की एक बैलगाडी येताना दिसली , त्यांच्यावर उडू नये म्हणून मी कावळ्यांची घाई डावलून थांबले (थोडे सौजन्य अजून अबाधित आहे !) दोन लहान लेकरे , दोघे तरुणच म्हणावे की पोरकट या संभ्रमात पडावे असे नवराबायको , आणि एक मळकटलेल्या आणि केसांचा पुंजका न विंचरलेल्या म्हातारीच्या (?) ओझ्याने वाकलेली ती मरतुकडी बैलजोडी गाडी ओढत पळत होती . अजून सातही वाजले नव्हते , गारठ्याने कुडकुडावे इतकी थंडी हवेत होती , सूर्याचे आगमन झाले होते पण तोही कदाचित पांघरून ओढून बसला होता , कुडकुडत ! सकाळी उठायला नकार देणारे माझे मन त्या टोळीवाल्या लोकांना उसतोडीला जाताना पाहून थोडे बावरले . किती पहाटे हे नित्यादि कर्म आवरून पोटाच्या सोयीसाठी बाहेर पडलेत , अगदी या पक्षांसारखेच ! खरे तर हा गरीब आणि पोटापाण्यासाठी भटकंती करणारा माणूसच अजून निसर्गाला धरून वागतोय नाहीतर आपण ? चंगळवादाच्या भोवर्यात अडकून पडलोय ! काल एक पुस्तक वाचताना , मार्स्कवाद ,कम्युनिस्ट , समाजवाद असे अनेक भयंकर शब्द वाचले ..भयंकरच कारण मला त्याचा अर्थच माहीत नाही ..काय आहे हे ? कम्युनिस्ट विचारवंतांची हत्या वगैरे खूप वाचनात येते आताशा पण सारे डोक्याला फेर्या मारून निघून जाते ..आजही मी डॉ असून मला समाजवाद माहीत नाही ! त्याची रुजलेली खोल मुळे माहीत नाहीत ! का मी जाणूनच घेवू इच्छित नाही ? गांधीबाबा वाचला रे तुला फक्त पुस्तकाची पाने पालटत वाचत गेले ..तुझे अस्तित्व त्या पानापानात न शोधताच ! सत्याचे प्रयोग वाचले ..तुझ्याच आश्रमातून विकत आणले होते ..भारावले काहीवेळ तुझ्या त्या त्यागासाठी पण काय झाले ..दोन तीन तासानंतर पूर्ववत झाले सारे .. पैसे नाहीत तर दवाखान्यात का आलात असे विचारण्यापर्यंत मजल गेली माझी तुला वाचतानाच ! हे लिहितानाही डोळे ओले झालेत पण खरे सांगू हेही वांझच विचार आहेत बघ ..मनाला कोंडून जगतोय गांधीबाबा आम्ही , चंगळवादाचा पुरस्कार करीत ! आज ६७ वा प्रजासत्ताक साजरा करताना एकाही चंगळवाद्याच्या मनात काहीच खुपत नाही ..ना तुझे आख्खे आयुष्य समाजासाठी स्वातंत्र्यासाठी वाहने ना त्या असंख्य अशा स्वातंत्र्यनायाकांचे आयुष्य स्वातंत्र्यासाठी झुगारून देणे ! त्यांच्या रक्तावर पोसलेली आमची चंगळवादी मने पुन्हा गुलामगिरीची परक्यांची अस्रे घेऊन आपल्याच बांधवांना ठेचण्यासाठी सज्ज झालीत गांधीबाबा ! गुलामगिरी खरंच संपलीय का ? की अजूनही आहे अबाधित त्या मग्रूर मनात ? ज्यांच्या पूर्वजांचा बळी गेला गुलामगिरी झुगारताना आज त्यांचे वंशज आम्ही पुन्हा तीच गुलामगिरी गरीब ,शोषितांवर लादायला सज्ज आहोत .. त्या वेळेत आणि आज  काहीच फरक नाही गांधीबाबा , फक्त परिमाणे बदलली आहेत . तेंव्हा जास्त ताकदवान राजा होता आणि आज जास्त पैसेवाला झालाय फक्त ! मी नेहमी विचारते कुणी टोळीवाले , उसतोडीचे पेशंट आले की कुठला रे बाबा तुम्ही ...त्यांनी मग मराठवाडा विदर्भातील वेगळ्यावेगळ्या गावांची नावे सांगावी ..अशीच काही गावे आहेत ही भर माझ्या ज्ञानात पडते इतकेच ..अलीकडे थोडे वाचून वाचून संवेदनशीलता (सामाजिक) जपणारे मन बावरते थोडेसेच पण फी घेऊन स्याम्पलची औषधे देण्यापुरतेच ! स्वतःच्या हितासाठी संवेदनशीलता जपणारी आपली मने कधी प्रगल्भ होणार हा वांझोटा विचार मनात कुरवाळत ..हो पण यांच्याच कष्टावर गाडी , बंगले आणि प्रॉपरटी घेणारा हा सुशिक्षित समाज कधीच आत्मपरीक्षण करणार नाही का ? की दोन चार रुपडे फेकले की आपण मोकळे झालो का दानवीर म्हणून घ्यायला ...या कष्टकऱ्यांच्या जीवनात ज्या दिवशी हास्य उमलेल तो दिवस खरा प्रजासातक असेल ! शक्य आहे का हे ..हे वांझोट्या विचार्वांतांनो आणि पैसा , प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेच्या मागे पळणाऱ्या आपल्या सारख्या त्यांच्या कष्टावर आपली पोटे पोसणाऱ्या बांडगुळांनो एकदाच मनाला हे विचारून बघायचे का ?
आज खरंच लाज वाटतेय मला , पहिल्यांदा ..माझ्याच गुलामगिरीची ! कारण कामाची बाई आली नाही तर नित्यादि कर्मे करायलाही बावरणारे माझे मन गुलामच नाही का ? सवयीचे गुलाम , चंगळवादाचे गुलाम !

        डॉ संध्या राम शेलार . 

Friday, 21 August 2015

सुवर्णसंध्या ..माझी प्रेरणा

आदरणीय सुवर्णसंध्याजी ,

         गेले अनेक दिवस तुमच्याबद्दल लिहिणे मनात होते . पण आजच्या तुमच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लिहिण्यासारखा सुवर्णयोग नक्कीच कुठला नसेल ! मला तो दिवस आजही जसाच्या तसा आठवतो जेंव्हा तुम्ही माझ्या संवेदनशील असण्यावर दिलेली प्रतिक्रिया आणि माझ्या लेखनाचे केलेले कौतुक .. पुन्हा तेच सांगण्यासाठी केलेला फोन .. आज साऱ्यांनी तुमच्याबद्दल कौतुकाने लिहिले आहे ..आणि सारे किती सत्य आणि मनापासून नव्हे मनाच्या आतून लिहिलेय जागरकरांनी हे सांगणे न लगे .. तुम्ही आहातच तशा ! प्रत्येकजण जो तुम्हाला भेटेल त्याच्या मनात तुमच्याबद्दल नकळत आदरमिश्रितकौतुक उभे रहाते आणि खोलवर बिंबले जाते .. कायमचे ! मी आज इथे तुमचे माझ्या आयुष्यातील स्थान सांगणार आहे कारण तुमचे अनेक पैलू आहेत जे उलगडणे एका लेखात नक्कीच शक्य नाही .
     मी काही पहिल्यापासून लिहिणारी नाही किंवा आयुष्यातील इतर धावपळीला बाजूला ठेवून पूर्ण झोकून साहित्याचा व्यासंग करणारी कुणी विदुशीही नाही . आहे एक संसारात , व्यवसायात आणि नातेवाईकांच्या गराड्यात हरवलेली एक अशी स्री जिला तिच्या घराच्या चार भिंतीबाहेरील जग अपघातेनेच कळते . या सुरक्षित आयुष्यात असे अपघात घडले आणि मी संवेदनशील होवून लिहू लागले . त्यात माधुरी आणि सुजित दादांच्या माध्यमातून तुमच्याशी परिचय झाला आणि प्रेमाचे जिव्हाळ्याचे हे नाते माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम नाते बनले .. असेही प्रत्येक नात्याला नाव हवे असे काही नाही परंतु माझ्या मनात तुम्ही गुरुस्थानी असलेली मैत्रीण आहात ! जिथे जिव्हाळ्याचे सारे बोलूही शकते आणि जिथून सतत प्रेरणादायी , मार्गदर्शक , सर्वोत्तमाच्या निर्मितीसाठी लागणारे सारे काही मला मिळते . .. माझे लेखन फक्त भावनिक पातळीवर होते , ते कसे चांगले आहे हे तुम्ही आधी सांगितलेत आणि हळुवारपणे हेही समजावलेत कि ते अभ्यासपूर्ण असायला हवे .. कळत नकळत (त्या वेळी ) तुम्ही जे मार्गदर्शन केले , जे दुवे सांगितले लिहिण्यासाठी ते वाचल्यावर माझ्या लक्षात आले मी किती कुंपणात लिहित होते ,,त्या कुंपणाबाहेर जावून .. अभ्यासूपणे लिहून .. ज्या स्रीयांची दु:खे मी सांगत आहे त्यांना न्यायही मिळवून देऊ शकते .. त्याच वेळी तुमच्याबद्दल एक न कधी लयाला जाणारी आदरभावना मनात वृद्धिंगत झाली .. मैत्रीच्या नात्याने हळुवारपणे तुम्हीं माझ्या प्रेमळ गुरुही बनलात ..
          तुमच्या आयुष्यातील चढउतरांबद्दल मी सतत इतरांकडून ऐकत आले परंतु इतक्या वेळा संभाषण होवूनही तुम्ही कधीच ते बोलल्या नाहीत .. तुमची सर्व क्षेत्रातील अभ्यासू दृष्टी सतत तुमच्या बोलण्यातून मला दिसायची ..अभ्यासू दृष्टी तर सारेच जोपासतात परंतु तुम्ही कृतीतून त्याला आकार देत आहत यासारखी स्पृहणीय गोष्ट कुठलीच नसेल ..बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !
             स्वत:च्या मर्यादांना कधीच कुंपण होऊ देऊ नका , त्यांच्या बाहेरचे जग पाहण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे ..त्या मर्यादा ओलांडून पुढे जायलाच हवे आणि त्यातूनच स्व:उत्कर्ष साधणार आहे ..तुमच्या सांगण्यातून ..तुमच्या जगण्यातून मी हे नक्कीच घेत आहे .. आजवर कुंपणात गुंतलेली मी.. खरा खुरा प्रयत्न करत आहे स्वतःसाठी जगण्याचा ..अंगीच्या कलेला जोपासण्याचा .. तत्वांना मुरड न घालता त्यांचे संगोपन करण्याचा ..विवेकबुद्धी जागृत ठेवून नवे ते आत्मसात करून विवेकवादी विचारांनी समृद्ध होत विवेकपूर्ण समाजनिर्मित्तीत स्वतःच्या लेखनातून आणि कृतीतून भर घालण्याचा ... तुमची सदैव ऋणी असले मी तुम्ही दिलेल्या जीवनदृष्टीबद्दल ........
            तुमच्या आयुष्यातील या संस्मरणीय क्षणी माझ्या शुभेछ्या जरी यत्किंचित असतील तरी त्या नक्कीच माझ्या आतील आवाजाच्या आहेत .. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेछ्या ... आपल्या सर्व आकांक्षा पूर्ण होवोत आणि त्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच सदिछ्या ...
                               - डॉ. सौ . संध्या राम शेलार .
 सुवर्णसंध्याजी विषयी आमच्या व पु जागर वर आलेल्या काही वाढदिवसाच्या शुभेछ्या इथे देत आहे .

  डॉ . शिवाजी काळे -


कवी हनुमंत चांदगुडे -

डॉ . सुजित अडसूळ -
मा. सुवर्णसंध्याजी .
आज आपला वाढदिवस आहे .
आपण समाजासाठी , निसर्गासाठी , पर्यावरणासाठी जे काम करत आहात त्याला तोड नाही . येणारा प्रत्येक दिवस आपणास अखंड उर्जा देत राहो .
मराठी साहित्यात एक उत्तम समीक्षक म्हणून आपले स्थान आहे . नवोदित कवी व लेखकांना आपण सतत मार्गदर्शन करताना संदेश हि देता . त्यामुळे आपला फ्यानक्लब आपल्या प्रतिक्रियेची आतुरतेने प्रतीक्षा करतो .
घरच्या सर्व आघाड्या पेलत सर्वच प्रांतात आपण सहज वावरत असता .
आपणास दीर्घायुष्य लाभो आणि आपला प्रत्येक क्षण इतरांना जगण्याची प्रेरणा देवो . हीच शुभेछ्या ...

डॉ . शुभा लोंढे-
 सुवर्णसंध्याजी

एक दिलदार सखी
माझ्या जागराची शान
काय वर्णावा तिचा महिमा
वाखाणण्याजोगा अपूर्व बाणा
कवीच्या प्रेरणाची स्वर्णकिरण
करी सदर मार्मिक विश्लेषण
समीक्षक व्याख्याती किती हे आभूषण
भरकटलेल्या समाजाची आशा
प्रत्येकाच्या सुखदु:खांची मनीषा
लाखोंची प्रेरणा अन उत्कर्षा
स्ववेदनेला तारले हरल्या निराशा
निसर्गाचे देणे त्यांनीच बहरावे
पक्ष्यांच्या विकासा धडपडावे
पोषक सुखसोईने त्यांना उभारावे
संवर्धन निसर्गाचे आदर्श जोपासावे
मायेच्या ममतेने ममतेने करी
सर्वांच्या लिखाणाचे कौतुक
शब्द शब्दात झळके विलक्षण
तेजाचे अपार प्रेम स्नेह सहेतुक
सदैव बहरावी तुझी प्रतिभा
चमकावी बुद्धी तेजाची आभा
अनंत भरारी घेवून आकाशी
मनिषा तव उदंड आयुष्य लाभो
 डॉ शुभा प्रशांत लोंढे .

सुनिता -
सुवर्णसंध्याताई ,
तुमच्यासारख्या निसर्गप्रेमी व्यक्तीचा वाढदिवस श्रावणात असणे किती सुंदर योगायोग !  जगायला शिकवणाऱ्या श्रावणाने अशी तुमच्यासारखी संवेदनशील कर्तव्यदक्ष माणसे बहाल केली . आपली लेखणी सदैव बहरत राहो श्रावणातील हिरवाईसारखी ..तुम्ही आमच्या लेखणीची प्रेरणा आहात . तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ..आरोग्य लाभो ..

डॉ माधुरी बोथटे -


अशा अनेक शुभेछ्या आहेत वेळेअभावी इतक्याच सांगितल्या ..




Monday, 26 September 2011

आण्णांच्या आंदोलनाने मला काय दिले?

  ''मम्मी , ए मम्मी मला न स्केल घ्यायची आहे पैसे दे न दादाजवळ.'' उठल्यापासून सत्योमच एकच मागण चालल होत. मी मात्र त्या दोघांचे आणि सारिका आत्याचा डबा करण्याच्या घाईत होते. ते झाल नि डबे , बाटल्या भरून सत्योमला अंघोळ घालायला गेले. परत त्याची भुणभुण चालू झाली. खर तर दादा सांगत होता पहिलीत स्केल लागत नाही, उगाच हि मुल मारामाऱ्या करतात, म्हणून मी दुर्लक्ष्य करत होते पण तो काही केल्या मागणी मागे घेत नव्हता. शेवटी मी शेवटच अस्र बाहेर काढल हात वरचा खाली येईपर्यंत बाळ कडाडला,''बघ आ मम्मे मी उपोषण करीन!'' मला हसाव कि रडावं हेच कळेना. दादाला पैसे दिले नि छोटी स्केल घ्यायला सांगितली.
     नेहमी स्वताच्या मागण्या रडून, आदळ आपट करून मान्य करून घ्यायचा प्रसंगी तोड फोड करायची वेळ आली तरी करायचा. पण आजचा हा अवतार बघून मी निशब्द झाले. आण्णांच आंदोलन जेव्हापासून चालू होत तेव्हापासून आमचा news chanal बंद नव्हता. त्यात आमची चर्चाही तो ऐकत असे. मुलांच्या मनात घर करून बसलेल्या या गोष्टी अचानक अश्या पुढे येतात कि आपण निरुत्तर होऊन जातो.
     आण्णांच्या आंदोलनाने देशाला काय दिल यापेक्षा तरुणांना, उगवत्या पिढीला एक नवी दिशा दिली. ती अशी कि फक्त हिंसाचाराने प्रश्न सुटत नाहीत तर ते वाढत जातात अनेकदा मनुष्यहानी, वित्तहानीहि  होते, देशाच तसच आंदोलनकर्त्याचहि न भरून येणार नुकसान होत. या उलट अहिंसेच्या मार्गाने जरी काही मिळाल नाही तरी काही हानी तर होत नाही. गांधीजींनी दाखवलेला हा अहिंसेचा मार्ग आपण जरी विसरलो होतो तरी आण्णांनी तो परत दाखउन दिला आहे,आणि यशस्वी झालेला सर्व जगाने पाहिला आहे. म्हणून  आण्णांनचे शतश: आभार ! 

Monday, 19 September 2011

श्रद्धांजली

चार दिवसापूर्वी माझ्या सासरच्या नात्यातील एका आजींच अचानक अल्पश्या आजाराने निधन झालं. तसं पाहिलं तर जन्ममरण हे कुणासाठी थांबलेल किंवा चुकलेल नाही पण काही व्यक्ती अस आयुष्य जगलेल्या असतात कि हि त्यांच्या जाण्याची घटना तिऱ्हाईत मानसाला अस्वस्थ करून जाते. या आजींच्या बाबतीत असाच काहीस घडल. परिसरातील त्यांना ओळखणारी जवळजवळ सर्वचजन तळमळली, त्यात मीही आलेच. त्या खूप जवळच्या नव्हत्या पण त्यांनी आमच् नातं जवळच बनवलं होतं. जितक्यावेळा त्या भेटल्या तेव्हा त्या आपलेपणाने जिव्हाळ्याने बोलल्या! गुलाबाच्या फुलासारखं काट्याच्या वेदना स्वत:जवळ ठेऊन भोवताल सुगंधित करणाऱ्यांपैकी त्या एक ! आयुष्यभर फक्त दु:ख सोसनाऱ्या, कुटुंबाची सर्व जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या, स्वताची दु:ख कधीच त्यांनी  दया किंवा मदत मिळवण्यासाठी वापरली नाहीत.
   लग्न झाल्यानंतर एक मुलगा आणि मुली पदरात टाकून जोडीदार अर्ध्यावर टाकून देवाला प्रिय झाले. नंतर छोट्या दीर जावांना सांभाळत आणि स्वताची मुले सांभाळत संसार पुढे नेला. मुलाच लग्न केलं तेही लहान तीन मुलं आणि शांत संय्यमी सून ठेऊन देवाला प्रिय झाले. पुत्रवियोग सहन करत नातवंड मोठी केली व्यवहार कुशलतेने , कष्टाने शेती करून इतर दीरानच्या बरोबरीला संसार नेऊन ठेवला. हे करत असताना सर्व नातेवाईकांच्या सुख दु:खात त्या सहभागी झाल्या. जळणाऱ्या ज्योतीसारख वेदना सहन करत प्रकाश मात्र सर्वाना दिला . दारातल्या तुळशी सारखं आयुष्य जगत तुळशीच्या ओट्यावर मृत्यूला त्यांनी जवळ केलं !
 मी कविता करत नाही पण त्यांच्यासाठी सुचलेल्या या ओळी खाली देत आहे.

             एक आत्मा आयुष्यभर फक्त दु:ख झेललेला
             कधीचा एक अश्रू तिने पापण्यांवर पेललेला
             अश्रुना मुभा नव्हती गालावर ओघळून मुक्त होण्याची
             त्या आत्म्याला ताकत हवी होती फाटलेलं आभाळ पेलण्याची

             उन पडलं वादळ आलं पाऊस आला
             पिलांना पंखाखाली घेणारी पक्षीण ती
             आयुष्यातील दु:खांसमोर
             दत्त म्हणून उभी ठाकनारी वाघीण ती

             रडण्याला आणि दु:खाला
             तिनं कधीच बळ बनू दिल नाही
             हसण्याणचं मानसं जिंकायची
             जिंकायच्या दिश्याही दाही

             अश्या या छत्रछायेला आपण
             जरी आज पारखे झालो
             नजर तिची घारीची तशीच आहे
             आपण मात्र नतमस्तक होऊन वाकलो.

Sunday, 4 September 2011

शिक्षक दिन

    आज सकाळपासून सत्योमचा गृहपाठ करून घ्यायचं हे लक्षात होतच कारण दोन दिवसाच्या  सुटीनंतर सोमवारची शाळा त्याच्या आठवणीत आणून द्यावी लागते. दादाला विचारल तर तो म्हणाला कि शिक्षक दिनाच कार्ड करायला सांगितलं आहे. त्या दोघांनी कार्ड करायला घेतली पण मी मात्र माझ्या शाळेच्या आठवणीत हरवले. 
    तस चौथीच्या अगोदरच विशेष काही आठवत नाही पण काही कविता त्याही नाचून गाऊन म्हणत असू म्हणून. खऱ्या आठवणी पाचविपासुनच्या! पाचवीत आलो पण शिक्षक मात्र तेच कारण आमच्या गावात सातवीपर्यंत शाळा होती मग पहिलीपासून सातवी पर्यंत एकच वर्ग शिक्षक! आमचे काळदाते गुरुजी! प्रत्येक विध्यार्थ्याच प्रेमाने त्यांनी नामकरण केलेल. ते जेव्हड मन लाऊन शिकवत तितक ते विद्यार्थ्याला समजून घेत. त्यांच्या प्रत्येक चांगल्या वाईट हालचालींवर लक्ष ठेवत. माझ नाव त्यांनी चिंधी अस ठेवलेल कारण माझ नाव ( माहेरच )  संध्या म्हणून संधी -चिंधी अस! त्यांच्या ह्या नामकरणाचा कधी राग नाही आला तितका जीव ते आम्हाला लावत आईच्या ममतेने जपत! तेव्हा बाक नव्हते बसायला एकामागे एक जमिनीवर बसाव लागत असे. एकदा ते इतिहास शिकवत होते मी मात्र माझ्या पुढे बसलेल्या मुलीची वेणी घालत होते ! त्यांनी हे बघितलं मला जवळ बोलावलं हात पुढे करायला लावला जोरात छडी मारली. त्यावेळी मी त्यांना विनवत  होते गुरुजी मला मारू नका माझ लक्ष आहे तुम्ही पाहिजे ते विचारा पण कश्याच काय त्यांना राग अनावर झाला होता. मारल्यावर मग मला विचारल माझ बरोबर उत्तर ऐकून ते मात्र अस्वस्थ झाले. शाळा सुटल्यावर जवळ बोलून त्यांनी हात हातात घेतला म्हणायला लागले लक्ष देत जा! चिंधे जास्त लागल नाही ना ? त्यावेळी त्यांचे डोळे पानवले होते! तेव्हा पासून मी कधी तास चालू असताना कुणाची वेणी घातली नाही ! सातवीत असताना काळदाते गुरुजींची बदली झाली तेव्हा निरोप समारंभाच्या भाषणात प्रत्येक विध्यार्थी रडत रडत भाषण करत होता! अश्या शिक्षकांची शिक्षक दिनी तर नक्कीच आठवण होते.     

Monday, 6 June 2011

माझे बाबा

              माझे बाबा  सदैव असलेलं प्रेरणास्थान, आजच्या या बाबांच्या दिवशी त्यांच्या चरणी नमन!
           मला आजही तो दिवस आठवतो, एक भगव्या कपड्यातील साधू भिक्षा मागण्यासाठी आले होते. त्या दिवशी शाळेला सुट्टी असल्याने मी घरीच होते. आई कामात, तिने मला पोत्यातील ज्वारी घेऊन साधुबाबाना द्यायला सांगितले. 
 मी ती भिक्षा दिली आणि नेहमीच्या सवईने त्यांनी मला आशीर्वाद दिला, ''चांगला नवरा मिळू दे!'' 
 त्याच वेळी मळ्यातून आलेले,''बाबा माझ्या मुलीला आधी खूप शिकण्याचा, डॉक्टर होण्याचा आशीर्वाद द्या,                  आणि नंतर चांगल्या नवर्याचा.''
         त्या वेळी साधारण मी पाचवीत होते, त्याच वेळी निग्रह केला, कितीही कष्ट पडले तरी चालेल पण डॉक्टर व्हायचाच. तसं प्रत्येक पाल्याबाबत आई वडील हीच स्वप्न पाहतात, पण माझे बाबा आठवी पर्यंत शिकलेले एक शेतकरी आहेत. माझ्या त्या छोट्या खेडेगावातील मी पहिली महिला डॉक्टर आहे. त्या वेळी काहीही सोयी नसताना माझ्या बाबांनी मला हे स्वप्न दाखवलं! आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली.
         आज मला कसलीही अडचण वाटली तरी प्रथम त्यांची आठवण होते. त्यांनी दिलेला सल्ला मला प्रत्येक द्वंद्वातून बाहेर काढतो. त्यांचा एक एक शब्द मला प्रेरणा देऊन जातात.
         त्यांच्या प्रमाणे माझे सासरेही मला माझ्या बाबांप्रमाणेच आहेत. त्यांच्या मुलीला माई म्हणतात म्हणून आम्ही दोन्ही सुना मोठी माई , बारकी माई! आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही न दुखावणारे आमचे सासरे नेहमी मला वडीलच भासले.
          त्या दोघांसाठी परमेश्वर चरणी आज एकच मागणं.........
''त्यांना आरोग्यपूर्ण, दीर्घायुष्य लाभो! आणि त्यांच्या प्रेमाची, मायेची सावली अशीच आमच्या आयुष्यात राहो!''