या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday, 19 September 2011

श्रद्धांजली

चार दिवसापूर्वी माझ्या सासरच्या नात्यातील एका आजींच अचानक अल्पश्या आजाराने निधन झालं. तसं पाहिलं तर जन्ममरण हे कुणासाठी थांबलेल किंवा चुकलेल नाही पण काही व्यक्ती अस आयुष्य जगलेल्या असतात कि हि त्यांच्या जाण्याची घटना तिऱ्हाईत मानसाला अस्वस्थ करून जाते. या आजींच्या बाबतीत असाच काहीस घडल. परिसरातील त्यांना ओळखणारी जवळजवळ सर्वचजन तळमळली, त्यात मीही आलेच. त्या खूप जवळच्या नव्हत्या पण त्यांनी आमच् नातं जवळच बनवलं होतं. जितक्यावेळा त्या भेटल्या तेव्हा त्या आपलेपणाने जिव्हाळ्याने बोलल्या! गुलाबाच्या फुलासारखं काट्याच्या वेदना स्वत:जवळ ठेऊन भोवताल सुगंधित करणाऱ्यांपैकी त्या एक ! आयुष्यभर फक्त दु:ख सोसनाऱ्या, कुटुंबाची सर्व जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या, स्वताची दु:ख कधीच त्यांनी  दया किंवा मदत मिळवण्यासाठी वापरली नाहीत.
   लग्न झाल्यानंतर एक मुलगा आणि मुली पदरात टाकून जोडीदार अर्ध्यावर टाकून देवाला प्रिय झाले. नंतर छोट्या दीर जावांना सांभाळत आणि स्वताची मुले सांभाळत संसार पुढे नेला. मुलाच लग्न केलं तेही लहान तीन मुलं आणि शांत संय्यमी सून ठेऊन देवाला प्रिय झाले. पुत्रवियोग सहन करत नातवंड मोठी केली व्यवहार कुशलतेने , कष्टाने शेती करून इतर दीरानच्या बरोबरीला संसार नेऊन ठेवला. हे करत असताना सर्व नातेवाईकांच्या सुख दु:खात त्या सहभागी झाल्या. जळणाऱ्या ज्योतीसारख वेदना सहन करत प्रकाश मात्र सर्वाना दिला . दारातल्या तुळशी सारखं आयुष्य जगत तुळशीच्या ओट्यावर मृत्यूला त्यांनी जवळ केलं !
 मी कविता करत नाही पण त्यांच्यासाठी सुचलेल्या या ओळी खाली देत आहे.

             एक आत्मा आयुष्यभर फक्त दु:ख झेललेला
             कधीचा एक अश्रू तिने पापण्यांवर पेललेला
             अश्रुना मुभा नव्हती गालावर ओघळून मुक्त होण्याची
             त्या आत्म्याला ताकत हवी होती फाटलेलं आभाळ पेलण्याची

             उन पडलं वादळ आलं पाऊस आला
             पिलांना पंखाखाली घेणारी पक्षीण ती
             आयुष्यातील दु:खांसमोर
             दत्त म्हणून उभी ठाकनारी वाघीण ती

             रडण्याला आणि दु:खाला
             तिनं कधीच बळ बनू दिल नाही
             हसण्याणचं मानसं जिंकायची
             जिंकायच्या दिश्याही दाही

             अश्या या छत्रछायेला आपण
             जरी आज पारखे झालो
             नजर तिची घारीची तशीच आहे
             आपण मात्र नतमस्तक होऊन वाकलो.

Thursday, 8 September 2011

देवदूत

 गाठ मग ती शरीराच्या कुठल्याही भागात असो मनपटलावर एक भीतीची लकेर उमटवून जाते. असाच प्रसंग काल  परवा मीही अनुभवला. कॅन्सर विषयी भीती सर्वांच्या मनात असते आणि तस काही आपल्याला होऊ शकत अशी जाणीव जरी झाली तरी मन सैरभैर होऊन जात सगळ जग अचानक भकास वाटू लागत, जीवनात भरलेला सुगंध अचानक वार्याच्या झोताबरोबर उडून जातो. असा प्रसंग शत्रूलाही लाभू नये इतपर्यंत भावना मन व्यापून टाकतात.
   वीस दिवस झाले असतील साधारण एकाएकी एक गाठ जाणवली. वेदना नव्हती पण गाठ तशी मोठी होती . आता कळली किती दिवसापासून असेल सांगण जरा कठीणच कारण वेदना नव्हती . चाचपून पाहिलं इतर ठिकाणी हलत होती पण खालच्या बाजूने चिकटलेली भासली.दहा दिवस थोडीफार औषधे घेऊन बघितली पण काहीच फरक नाही मग डॉक्टरांना दाखवायचं ठरलं वेळे प्रमाणे रुबी हॉस्पिटलच्या कॅन्सर विभागात पोहचलो डॉ अनुपमा माने यांना दाखवायचं ठरलं डॉ बाह्य रुग्ण तपासणी विभागात होत्या माझ्या अगोदर एक आजी होत्या कदाचित त्यांच्या त्या जुन्या पेशंट असतील. डॉ बाहेर आल्या त्या आजींची स्मित करत विचारपूस केली अर्ध्या तासात परत येते ऑपरेशन आहे सांगून निघून गेल्या . वेळ लागेल म्हणून चौफेर नजर फिरवली . एक मुलगी तिच्या आई वडिलांसोबत होती डोक्याला भुवयांना अजिबात केस नव्हते कदाचित किमो थेरपी चालू असावी आई वडील तिला हव नको ते विचारत होते पण चैतन्य हरवलेला तिचा चेहरा अंगावर शहारे उभे करत होता! माझ्या ह्यांनी हि गोष्ट ओळखली आणि ते माझ मन त्यांच्या बोलण्यात गुंतवण्याचा असफल प्रयत्न करू लागले!                                                                                
    तिच्या शेजारी एक जोडप बसलेलं यजमान एकदम शरीराने मनाने खचलेले आणि शेजारी बसलेली बायको डोळ्याच्या कडेपर्यंत आलेले अश्रू गालावर ओघळू न देण्याच्या असफल प्रयत्नात! काही लोकांच्या चेहऱ्यावर नीट झाल्याच समाधान आणि काहीतरी अवयव गमावल्याच दु:ख दोन्ही भावना एकत्रित लपंडाव खेळताना! कुणाच्या नाकात असलेली नळी काहींना त्यांच्या पासून किळस आल्यामुळे दूर बसण्यासाठी प्रेरित करत होती त्याच वेळी माझ मन मात्र यांचे आता किती दिवस राहिले असतील या विचाराने गर्भ गळीत झालेले! मन खिन्न होत आज मी सुपात असेल नि उद्या या जात्यात आले तर ? शरीरात एक वेदना पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत विजेसारखी चमकून गेली डोळे मिटून मी यांचा हात पकडला. 
  आमचा नंबर आला आत जाताच एका गोड स्मितहास्याने डॉक्टरांनी आमच् स्वागत केल . माझ्या थोडा जीवात जीव आला . त्यांनी शांतपणे सर्व रिपोर्ट पहिले नि काही प्रश्न विचारले त्या मधेच स्मित करत शांतपणे विचारत होत्या . माझ्या मनावरचा ताण हळू हळू कमी होत होता . तपासून झाल्यावर त्यांनी विशेष नाही यावर शिक्कामोर्तब केल पण भविष्यात त्रास नको म्हणून काही तपासण्या करून आपण ती गाठ काढून टाकू असा सल्ला दिला. त्यांनी जराही न वैतागता (नाही तर काही डॉक्टरांना प्रश्न विचारणारे पेशंट नको असतात ) अगदी प्रेमाने प्रत्येक शंकेच निरसन केल.दोन दिवसापूर्वी आम्ही ती गाठ काढून टाकली . आज मन आणि शरीर या दोनही वरचा ताणरूपी पडदा हटला आहे . मन प्रसन्न आहे. याच सर्व श्रेय जात माझ्या अस्थिर मनस्थित साथ देणाऱ्या माझ्या यजमानांना, माझ्या कुटुंबियांना आणि देवदूत होऊन भेटलेल्या डॉ अनुपमा माने यांना! डॉ मानेन सारखे देवदूत माझ्या सारख्या संभ्रमात असणाऱ्या प्रत्येक पेशंटला भेटोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !   

Sunday, 4 September 2011

शिक्षक दिन

    आज सकाळपासून सत्योमचा गृहपाठ करून घ्यायचं हे लक्षात होतच कारण दोन दिवसाच्या  सुटीनंतर सोमवारची शाळा त्याच्या आठवणीत आणून द्यावी लागते. दादाला विचारल तर तो म्हणाला कि शिक्षक दिनाच कार्ड करायला सांगितलं आहे. त्या दोघांनी कार्ड करायला घेतली पण मी मात्र माझ्या शाळेच्या आठवणीत हरवले. 
    तस चौथीच्या अगोदरच विशेष काही आठवत नाही पण काही कविता त्याही नाचून गाऊन म्हणत असू म्हणून. खऱ्या आठवणी पाचविपासुनच्या! पाचवीत आलो पण शिक्षक मात्र तेच कारण आमच्या गावात सातवीपर्यंत शाळा होती मग पहिलीपासून सातवी पर्यंत एकच वर्ग शिक्षक! आमचे काळदाते गुरुजी! प्रत्येक विध्यार्थ्याच प्रेमाने त्यांनी नामकरण केलेल. ते जेव्हड मन लाऊन शिकवत तितक ते विद्यार्थ्याला समजून घेत. त्यांच्या प्रत्येक चांगल्या वाईट हालचालींवर लक्ष ठेवत. माझ नाव त्यांनी चिंधी अस ठेवलेल कारण माझ नाव ( माहेरच )  संध्या म्हणून संधी -चिंधी अस! त्यांच्या ह्या नामकरणाचा कधी राग नाही आला तितका जीव ते आम्हाला लावत आईच्या ममतेने जपत! तेव्हा बाक नव्हते बसायला एकामागे एक जमिनीवर बसाव लागत असे. एकदा ते इतिहास शिकवत होते मी मात्र माझ्या पुढे बसलेल्या मुलीची वेणी घालत होते ! त्यांनी हे बघितलं मला जवळ बोलावलं हात पुढे करायला लावला जोरात छडी मारली. त्यावेळी मी त्यांना विनवत  होते गुरुजी मला मारू नका माझ लक्ष आहे तुम्ही पाहिजे ते विचारा पण कश्याच काय त्यांना राग अनावर झाला होता. मारल्यावर मग मला विचारल माझ बरोबर उत्तर ऐकून ते मात्र अस्वस्थ झाले. शाळा सुटल्यावर जवळ बोलून त्यांनी हात हातात घेतला म्हणायला लागले लक्ष देत जा! चिंधे जास्त लागल नाही ना ? त्यावेळी त्यांचे डोळे पानवले होते! तेव्हा पासून मी कधी तास चालू असताना कुणाची वेणी घातली नाही ! सातवीत असताना काळदाते गुरुजींची बदली झाली तेव्हा निरोप समारंभाच्या भाषणात प्रत्येक विध्यार्थी रडत रडत भाषण करत होता! अश्या शिक्षकांची शिक्षक दिनी तर नक्कीच आठवण होते.     

Friday, 19 August 2011

पठ्ठी

   ''मरण येत नाही, म्हणून जगतेय!'' असे वाक्य अनेकांच्या तोंडी येत. खरोखर ते हतबल असतात का ? जगणं इतकं अवघड असू शकतं ? तसं पाहिलं तर कितीसं दु:ख आपण सहन करत असतो! कदाचित हो कदाचित नाही! दु:ख असताना मृत्यू कवटाळंण जितकं सोपं तितकं ते पार करून जाण अवघड! आणि ज्याला अवघडाची आस तो माणूस! मग आपण माणूसपण कस सोडू शकतो ? ज्या स्रिया पोटच्या पिलाला आपल्याबरोबर बळी द्यायला तयार होतात त्यांच्यासाठी............
     मळलेले कपडे पण वास न येणारे, केस विंचरलेले चेहरा काळाच पण धुतलेला, पदर खांद्यावर पण पूर्ण छाती पूर्णपणे न झाकणारा, मांडीवरची पोर साधारण पाच सहा महिन्याची. जवळच पाच वर्षाची दुसरी पोर. ''नंबर आला तुमचा चला ताई'' गडबडीने उठून आत केबिन मध्ये गेली. डॉक्टरांनी तपासून औषधे लिहून दिली अन ती बाहेर आली. ''औषध निम्मीच का आणलीत ताई?'' ''पैसा कमी हाय'' ''मग डॉक्टरांना सांगा'' ती परत आत गेली. 
     ''सगळी औषध घेतली नाहीस तर तुझ बाळ कस नीट होणार ताई? आधीच ते जास्त आजारी आहे, त्याला औषध लागतीलच.'' डॉक्टर.
     ''काय करू ताई, आठ दिसाच खाय प्यायचं सामान  भरून जे बाकी राह्यलं तेच्यामंदी हीच औषध आली''  
     ''तुझा नवरा कुठाय, बोलव त्याला'' 
     ''ताई हि पोरगी झाली त्यो मला सोडून गेला दुसरी बाई घेऊन, मी बा जवळ हाय तिथबी साव्तर आय हाय, उसतोडीच काम त्येंच्या संग करते, ती म्हणती दवा पाण्याला कुठून पैसा देऊ तीन पोर आन चौथी मी त्ये खायला तरी किती जनस्नी देणार आन त्यावर दवा म्हंजी लई झाल. आठ दिस झाल पोर आजारी हाय, आज पैस दिलं म्हणून आले.'' 
       डॉक्टरांना कससच झाल नि त्यांनी त्यांच्या जवळची औषधे त्या बाईला दिली.
    ''फी देऊ नको बाहेर मी सांगते त्यांना.''
    ''लई उपकार झाल ताई''
    ''मुलींच्या शिक्षणाचं काय'' दयेपोटी डॉक्टरांनी चौकशी केली.
    '' त्ये कस जमल ताई? आमी आठ नऊ महीन इकडच असतु. माझ्या या मोठ्या पोरीला आश्रम शाळेत घेतील काव ताई?''
    ''घेतील ना ती सहा वर्षाची होऊ दे नंतर टाक आश्रम शाळेत.''
     ती बाहेर गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात डॉक्टर म्हणाले ''पाठ थोपटली पाहिजे पठ्ठीची! अवघडलेल जगण तिनी सोप केलय!''   

Wednesday, 10 August 2011

मनात रुतलेले क्षण


 
        '' आई गं '' आनंद असो वा वेदना हे दोन शब्द ज्याच्या ओठी येत 
नसतील असा माणूस विरळ. प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात मोठी जागा 
कुणाची असेल तर ती आईची! प्रत्येक सुखाची पायरी आईपासून सुरु 
होते आणि दु:खाचा शेवट आईपाशी होतो. मनाच्या कुठल्या कोपर्यात 
दडली आहे इतर वेळी समजणार नाही पण सुख-दु:खाच्या वेळी ''आई गं '' 
हे दोन शब्द जिव्हेला कधी सजवून गेले ते कळतच नाही. आईबद्दल 
लिहिण्यासाठी शब्द जरी अपुरे नसतील तरी वेळ मात्र अपुरी आहे .(आत्ता तरी )       
        पायात रुतलेला काटा जसा घर करून जसा घर करून जातो तसे मनाला रुतलेला क्षणहि तसाच . पायाच कुरूप कमीत कमी भरून निघत, औषधउपचारांनी बरही होतं पण मनाची ती वेदना अचानक उद्भवली की.......
       त्या दिवशी mathचा तास संपायला उशीर झाला पळतच प्रयोगशाळेत गेले सगळेजण आले होते पण सर् अजून दिसत नव्हते. हायस वाटलं. सगळ्या मुली टेबलाजवळ बसलो. माधुरी कुठाय म्हणेपर्यंत धावत येणाऱ्या बाईसाहेब दिसल्या ''आई गं '' नेहीमिप्रमाणे ठेचाळली. ''लागल नाही ना'' नेहमीची सर्वांची प्रतिक्रिया! बर तरी हिच्या आई आमच्याच शाळेत होत्या!
     ''ये खरच आई किती नकळत येत ना?''इति सारिका.
     ''स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी,'' उमा.
     '' कुणाची आई कितीही वाईट असुदे मुलांसाठी ती सर्वस्व असते,'' मोहिनी.
     ''माझी आई जीवाची सखी,'' वैशाली.
    ''हमारी अम्मी की तो बातही अलग अम्मी की जान है हम,'' शबाना.
    ''माझ्या सर्व समस्यांच समाधान आहे आई,'' मी
    दीपा मात्र तोंड लपून बसलेली. सारीकाने  हलवलं पोरीच्या डोळ्यात पाणी! सगळ्यांच्या नजरा दिपावर खिळल्या. कुणाला अर्थबोध होत नव्हता.नेहमी जिच्या चेहऱ्यावर हास्य विलसत असतं ती दीपा आज रडत होती सर्वजनी आश्चर्याने बघत होत्या. तिने मनसोक्त रडून घेतल चेहरा लालबुंद झाला. हुसमरत ती बोलली ................
    ''मला आईच नाही गं!'' 

Wednesday, 3 August 2011

वागीन

          ''आये ये आये, सांग ना बापूला मला बी ताईच्या वाणी साळत जायच हाय.''     
          '' आगं पर ती मालकाची पोर हाय, आपून गरीब माणसं सकाळच्याला खाललं तर रात्तच्याला मीळना!''     
          '' ती कवी जाती की ती कुठ लई तालेवाराची लेक हाय.''      
          '' नकु वाद घालू बग माज्यासंगं, उरिक लवकर दुगिनी चार पुती शेंगा काडल्या त चार घम्याली मिळत्यान.''       
            गावात सातविपतुरच शाळा हुती. संगीला तवर शिकावनं बापूला जमलं पण आता इस्टीनि तालुक्याला धाडायच म्हंजी सोपं नव्हत्. त्याला बी वाटायचं पर वाटत् तसं सगळ थोडच हुतं. संगी तशी कळाय लागलं तशी हुशार! कदी तिनी खेळ अन खाण्याचा हट्ट केला नव्हता. जी आसन ती भावंडासनी देणार राहिल तर घेणार. साळत बी नापास कवा झाली नाय. शाळा चालू झाल्याल्या महिना झाला रोज संगी आईला तेच सांगायची. ताराबाईचा नाईलाज हुता.       
            संगी दिसाया निटास, सरळ लांब नाक, कामानिवानी भुवया, तपकिरी डोळ् उभाट चेहरा! उंची कमीच पर पोर बघताच मनात भरणारी! कामाला वागीण जी सांगनार ती काम केलच बगा. सातवीची शाळा बंद झाली न आईनी तिला रानातल्या कामाला न्यायाची चालू झाली. कामाच्या बाया बी सांगायच्या संगीच्या आईला धाड तिला साळला पर संगीच्या आयेची काळजी येगळी हुती आसली देखणी पोर काय बाय येडं वंगाळ झालं म्हंजी? मायचं ती!
            कामाला जायच्या अगुदार शिळीला गवात आणायला संगीच जायाची आईला बी घरातल काम उरकुस्तवर जायाची वेळ व्हायाची. संगीला उशीर झाला घाईतच पळली मालकाच्या ऊसाचा बांध काय नवीन नव्हता. गवतात पाय आडाकला फुड सापदिशी मोठ्या काळ्या दगडाव पडणार की इक्रमनी तिचा हात धरला. दोग धापदिशी माग उसाच्या कटाला पडली.इक्रम्नी तिला लागून दिल नाय  अंगावरच झेलली. तिला काय बी कळायच्या आत त्यान तिला उसात ओढली.
            जागी झाली तवा सगळ्या आंगातून कळा निगल्या आये म्हणायला तोंडातनं सबुद निगणं आवगड झाल्त आयच्या मांडीवरच डोक उचलता उचलत नव्हत आयकड बघितलं डोल्यास्नी लागलेल्या धारा थाबायचं नावच घीनात थोडा जीव शांत झाला. आयेचा आधार घेत उठली पायापातूर रगात बघितलं न तिला काय झालं अंदाज इना निट पायल जी मोटा हंबरडा फोडला कुणाला म्हणूनश्यान ती आवरणा. आई बापू कपाळाला हात लाऊन बसली. गरीब बिचारी आणिक काय करणार हुती!
            पंधरा दिस झालं पर संगी काय हातरून सोडना. कुणी बोलाया लागल तर डोळ्यातून पाणी काढण्यापरीस दुसर काय बी करत न्हवती. डोक्यातून जात न्हव्हत् इक्रमदादान आस कामुन्श्यान करावा. ताई तर सांगायची आपून सगळी बहिण भावंड म्हणून!
           '' संगे, बग कोण आलं हाय, आता तरी बुलशील न्हव''
            ताई आत आली न संगी उठून तिच्या गळा पडून रडाय लागली. सगळी घटना संगीनं ताईसनी सांगितली. तशी रागान लाल झालेली ताई उठून उभी राह्यली,''संगे उगाच दादाच नाव घेऊ नगस, तुमा लोकास्नी खाया घालायचं न तुमी इनाकरण आमची बदनामी नग करूस.''
            कालवा ऐकून संगीची आय आत आली. आज पहिल्यांदाच सगल्यास्नी करणाऱ्याच्या नावाचा उलगाडा झाला पर आईन संगीच्या तोंडावर हात ठिवला. आंजरून गोंजरून निट समजावल. संगीच्या डोक्यात मातूर इक्रम आन ताईसाठी नुसता राग नव्हता तर आग व्हती.
          ''आग संगे घरात बसूनस्यान याड लागल तुला, काम नग करू पर रानात गेल्याव मन तरी रमल.''
          बळ बळ आज आईन तिला बाहेर काढली. रानात गेल्याव गप् बसल ती संगी कसली. मोकळ्या हवत तीच मन बी जरा मोकळ झालं. हातात खुरपं घेऊन ती बी कामाला लागली. आज परत पहिल्यावाणी समद्या बायांच्या फुडं. ताराबाईचा जीव इतक्या दिस उडाला व्हता. फुडं फुडं सरनाऱ्या संगीला बघून तीच डोळ काठापातूर वल व्हयाचं नी परत खुरप्याखालच तन बघत  मातीत मिसाळून जायचं ! 

          '' संगे आग संगे बग तुजी शिळी सुटली पळ लवकर''
          संगी खुरप टाकून धावली. मुकं जनवार दावं सुटल्यावर सगळ्या दिशा त्याच्याच की पिसाटासारखाच उधाळनार बगा. संगी धापा टाकीत बायांपासून लांबवर आली. जोराच्या वाऱ्याला बी आताच टायम गावला वय. ह्या शिळीला आता आशी मारल ना मनाचा नुसता चरफडा होत हुता. ''काय संगे बराय ना, मग काय चाललय आता कवा पडायचं आमच्या अंगावर? चल की आता'' हसत हसत इक्रम एकदम पुढ उभा ठाकला  संगीच्या सगळ्या अंगात दारारून मुंग्या आल्या रेखीव कपाळावर घामाच थेंब गोळा झालं हातपाय धरणीला धरीनात. ''संगे आग संगे काय झालं ग पळाया''  कमळामावशीच्या आवाजानी तीच धडधडणार काळीज थोड हालक झालं. माग बगीतल परत वळूस्तवर जसा आला तसा इक्रम गायब बी झाला. संगीन घाम पुसला नी कमळामावशीच्या मागणं चालू  लागली. 
          आता तिला हे रोजच झालं. एकटी दिसली की तिला गाठायचा नी वाईट वाकड बोलायचा. माणूस तरी सारक कवर जवळ राह्यच. तिच्या डोक्यातल्या आग मातूर आता तिच्याहि आवरन्यापलीकडे गेली . ह्या इक्रमनी मला डागाळली तरी त्याच मन भरना माजा जीव बी घेणार हाय का आता? आईला सांगावा तर ती बी गप् बस म्हणल. ह्याला धडा शिकवायला पायजेनच. पर त्याला शिव्या देऊन्बी लाज वाटणा. परत कुत्र्यासारका माग पुड हायच.
         ह्या वाऱ्याला काय मरी आली उठल्यापासून भना भना करतुया. आईलाबी ना कवा टायमात काम उरकायला जमल नाय. बाया न्ह्यारिला यीतील तरी हि घरची हलायची नाय. बस तशीच मी जात्ये आता! कवा कडवळ कापून व्हायचं परत खुरपायला बी जायचं हाय.   
इळयाला धार लावली झपा झपा पावलं टाकीत निगाली कडवाळाच्या रानात. भर भर  विळा चालू लागला निम्मा वाफा झाला नी मागण कवळ कमरेला पडली. झिडकारल तरी कवळ काय सुटना. तीन इक्रमचा स्पर्श वळाकला तिच्या डोक्यातली आग भडकली खापदिसी काय कळायच्या आत तीन इळा त्याच्या हाताव मारला. आज ह्याला नाय सोडणार! कमरची मिठी सैल झाली हात दाबीत त्यो खाली वाकला न संगीन सपा सपा इळयांनी जमल तिथ वार केला. रगताच्या चिळकांडया उडून तीच त्वांड लाल झालं पर ती थांबायच नाव घेत नव्हती. इक्रामच्या आरोळ्या ऐकून समदी कामाची मजूर पळत आल एकान संगीचा हात धरला न इळा काडून घेतला इक्रामच धड निपचित वाफ्यात पडल आन संगी आरडत व्हती.
                            '' वागीन हाय वागीन, त्या कुत्र्यासारका मागून वार करीत नाय फुडून चिरते!''    

Wednesday, 20 July 2011

कळकटलेलं आयुष्य

        ''मीरा, ऐ मीरा चल ना आता, कीती वेळ लावतेस?'' रोहीणी नाराजीत मीराला बोलवू लागली. तीच्या उत्तराची वाट न पाहता मीराचा टिफिन उचलून ती कॅन्टीनकडे  चालू लागली. मीराने पटकन टेबल आवरलं धावत रोहीणीला   गाठलं, नेहमीच्या कोपऱ्यातल्या टेबलावर दोघीही जाऊन बसल्या. तशी त्यांची ओळख या ऑफिसमध्ये कामाला लागल्यापासून, साधारण दोन वर्ष झाली. दोघींच्या स्वभावात टोकाची तफावत पण मैत्री.. खूप घट्ट! दोघी गावाकडून आलेल्या, मीरा तिच्या मामाकडे राहत होती तर रोहीणी होस्टेलमध्ये! दोघी आई वडिलांपासून दूर, एकटेपणा जाणवायचा पण त्या एकमेकींचा भक्कम आधार होत्या.
      दहा मिनिट झाली तरी रोहीणी एक शब्दही बोलत नव्हती. जेवणही मनापासून करत नव्हती, कुठेतरी हरवलेली. शेवटी शांततेचा भंग करत मीरा म्हणाली,''कुठे हरवलीस? झालं काय ते तर सांगशील? माझं काही चुकलं का?''
        ''नाही, नाही,'' भानावर येत रोहीणी पुटपुटली.
        काहीतरी बिघडलय हे मीराने हेरलं होतं.. तिला बोलतं करणं गरजेचं होतं, नाहीतर ही बया परत झोपेच्या गोळ्या चालू करील. आता कुठेतरी गाडी रुळावर आली होती, तर परत हीच गप्प बसणं चालू झालं मीरा मनाशीच विचार करत होती.
        ''रोहीणी, मला नाही सांगणार''
        ''मीरा, तसं नाही गं पण मला कंटाळा आलाय आता वाटतं बस झालं हे रहाटगाडगं''
         ''अग, पण असं म्हणून कसं चालेल''
         ''मग, काय करू तूच सांग, थोडा तरी बदल नको का गं?''
        ''हो, मान्य आहे पण एवढी चांगली नोकरी सोडून चालेल का? नोकऱ्या काय रस्त्यावर मिळतात का?''
        ''नाही गं''
        ''पटतय ना, मग असं का वागतेस?''
        ''तुला नाही कळणार, तु काय घरी गेलीस कि मामाची मुलं आहेत, मामा मामी आहेत, दिवसभरचा कामाचा ताण घराच्या वातावरणात विरघळून जात असेल.''
         ''असं तुला वाटतं, मी रोज येताना माझा डबा तर करतेच पण मामाचा मामाच्या मुलीचा पण करते आणि घराचा स्वयपाक पण आवरून येते, एक दिवस जमलं नाही तर मामी चार दिवस बोलत नाही, बोल आता! आणि हो घरी गेल्यावर मुलांच्या अभ्यासासाठी टीवी बंद, कपड्यांना इस्त्री करणं आणि अशी बरीच काम, कधी झोपेची वेळ होते कळतसुद्धा नाही, परत सकाळी उठण्याची धास्ती! माझा दिवस कुठे सुरु होतो नि कसा संपतो? या राहटगाडग्याचा विचार करायला वेळच कुठे आहे?''
         ''तुला वेळ नाही पण मला आहे ना?''
         ''वेळ घालवण्यासाठी या शहरात कमी का गोष्टी आहेत?''
         ''हो,पण मला ह्या वेळ घालवू गोष्टी नको आहेत. ज्याने मनाला सुख समाधान मिळेल असं काहीतरी....''
         ''ती गोष्ट तुझ्याजवळ येऊन तुला सांगणार आहे का? माझ्यात तुझं सुख आहे म्हणून, तूच ते शोधायला नको का? तू जर भोवताली डोळे उघडे ठेऊन पाहिलस तर प्रत्येक गोष्टीत तुला आनंदच गवसेल त्यासाठी तुला तुझ्या डोळ्यावर आलेला आळसाचा पडदा काढावा लागेल!''
          ''झालं तुझं तत्वज्ञान चालू''
         ''रोहीणी, ए रोहीणी, एक ऐक ना,तू चिडू नकोस पण तूच विचार कर जे विचार तुला दु:खाच्या दरीत लोटताहेत ते सोडून दे ना! प्रत्येक क्षण जगायला शीक! जेव्हा तुझ्या मनातलं हे निराश विचारांचं मायाजाल तू धुडकावशील तेव्हा तुला भोवतालच्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक कामात एक प्रेरणा लाभेल जी तुझं आयुष्य नक्कीच सुखमय करेल, आनंदी करेल! तेव्हा तुला,
                                 पावसाच्या प्रत्येक थेंबात,माणसाच्या प्रत्येक शब्दात 
                                 गर्दीतल्या प्रत्येक मुलात,बागेतल्या प्रत्येक फुलात 
                                 तुझ्या प्रत्येक कामात,आणि मेसच्या रोजच्या डब्यात...
                                 तुझ्या मनाचा आनंद गवसेल!
उत्साही राहिल कि सगळ जग आपलं वाटू लागतं, झोपेनं शरीराचा थकवा जाईल पण मनाचं काय? मनाचा थकवा घालंवत ते फक्त मनापासून केलेलं काम! आणि जो माणूस काम करतो तोच सर्वांना प्रिय असतो!तू गोड बोललीस तर बाकीचे तुला समजून घेतील, तुझ्याशी चांगलं वागतील, पण प्रत्येकवेळी तुझं रागावणं तुला माणसांपासून दूर घेऊन जाईल! तू जसं सर्वाना देशील तेच सर्वजन तुला देतील. मग तुला उशिरा येणाऱ्या बसचा राग येणार नाही नि रागवनाऱ्या बॉसचाही नाही.आपल्यातला उत्साह आनंद दुसऱ्यालाही उत्साही आनंदी बनवतो, या विचारांनी आपलं आयुष्य नक्कीच जगण्याजोग वाटेल. तुला आठवत असेल न्युटनने सांगितलेले नियम फक्त वस्तूनाच लागू होतात असं नाही माणसांही होतात. कुठला सांग बर?''
           ''actions & reactions are equal & apposits''
           '' कळतंय ना मग वर्तनात कधी आणणार ?''
           ''चल अगदी आत्तापासून'' 
      सुट्टी संपायला पाचच मिनिट होते.बोलण्याच्या नादात त्या जेवणही विसरल्या,घाईने जेवून त्यांनी धावत ऑफिस गाठलं. आपापलं टेबल पकडलं आणि कामाला लागल्या. रोहिणीचा उत्साह सर्वांच लक्ष्य वेधून घेत होता. भरून आलेलं आभाळ पाऊस पडून गेल्यावर जसं निरभ्र दिसत तसं तेज आज रोहिणीचा चेहरा उजाळत होतं!जेवणानंतर काम करताना रोज डुकल्या खाणारी रोहीणी प्रत्येक काम आज प्रसन्न मनाने उरकत होती.आज वेळेवर काम उरकलं, सुट्टी झाली. आज बस चुकणार नव्हती. मीराचे शब्द आठवत ती बस थांब्यावर आली. रोजचा कंटाळवाणा बस थांबा आज नकोसा वाटत नव्हता. ''का बर?'' रोहीणी मनालाच म्हणाली मैत्रिणीचे प्रेमाचे दोन शब्दही दु:खाच्या दरीतून बाहेर काढायला पुरेशे असतात नाही का?
     जवळच एक कळकटलेल्या कपड्यांचा माणूस, नाही भिकारीच तो! पण त्याच्या हातात भांड नव्हत कि काखेला मळलेल्या कपड्यांची पिशवी नव्हती. कदाचित तो वेडा असावा. साधारण चाळीसच्या घरातील तो वेडा, का बर वेडा झाला असावा? मनाशीच रोहिणीने प्रश्न केला पण उत्तर मिळणार होतं का? सुरवातीला त्याला पाहून तिला कससच झालं पण नंतर त्याच्या हालचाली ती न्याहाळू लागली. तो स्वताशीच काहीतरी बोलत होता. भाषा परिचयाची नव्हती, तिला काही समजल नाही.
      त्याने भोवतालचा सर्व कचरा हाताने गोळा केला आणि जवळच्या कचराकुंडीत टाकला.त्याची साफसफाई रोहीणी भान हरखून बघत  होती तिला बस गेलेली कळलीच नाही. सर्व जागा स्वच्छ झाल्यावर वेड्याने तिच्यापुढे हात पसरला, पोटाकडे हात दाखवत भूख लागल्याची खुण केली. तिने दहा रुपये त्याच्या हातावर टेकवले पण त्याने ते परत केले. तिने जवळच्या गाडीवरून केळी घेऊन वेड्याला दिली, मग स्वारीने ती आनंदाने घेतली, अधाश्यासारखी खाल्ली, पुढे चालू लागला.
      आत्ता कुठे बाई भानावर आल्या, बस गेल्याची जाणीव झाली पण खंत नव्हती. आज तिला जीवन समृद्ध करण्याची एक सोपी पायवाट सापडली होती. तीच मन समाधानाने ओसंडत होतं! डोळ्यासमोरून वेडा हलत नव्हता! जर एक भान नसलेला एक माणूस जग सुंदर करण्याच्या मागे लागला आहे तर आजचे आपण तरुण बुद्धी आणि शरीर शाबूत असताना आपलं जीवन आनंदमय करू शकत  नाही? का बर? करू शकतो! नक्की करू शकतो! गरज आहे ती फक्त मनावरच निराशेच मळभ हटवण्याची! मीराचेच शब्द तिच्या मनात प्रतिध्वनित होत होते.....आज एका कळकटलेल्या आयुष्याने तिला तीच आयुष्य सुखी करण्याची नवी उमेद दिली होती.......