या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday, 19 December 2011

तुझ्या माझ्यात

                तुझ्या माझ्यात 
                प्रेमाचा स्पर्श 
                मनाचा हर्ष


                तुझ्या माझ्यात 
                एकमेकांचे भास 
                मिलनाची आस 


                तुझ्या माझ्यात 
                स्वप्नांचे दिवे 
                रोजच नवे


                तुझ्या माझ्यात 
                अबोली फुलली 
                लाली मम गाली 


                तुझ्या माझ्यात 
                नजरेचे धुंद खेळ 
                व्यापून सर्व वेळ 


                तुझ्या माझ्यात 
                हास्याचे ओघळणे 
                नदीचे खळखळणे


                तुझ्या माझ्यात 
                हळुवार वेदना 
                गोड संवेदना 


                तुझ्या माझ्यात 
                क्षणाचा दुरावा 
                जन्मात न यावा 


                तुझ्या माझ्यात 
                किती या भावना 
                आभाळात मावेना 


                 तुझ्या माझ्यात 
                 रोज बहरणारे प्रेम 
                 नित्याचाच नेम!                


                 

Friday, 16 December 2011

मी तुझ्या मनी वसते

       रुसू नकोस माझ्यावर 
       दूर तुझ्यापासून असते 
       कारण तू माझ्या मनी 
       अन् मी तुझ्या मनी वसते 


       अबोल माझी प्रीती तुझ्यावर 
       मनात तुझ्याशीच बोलत असते 
       मनाला छळणारे प्रश्न 
       मनातल्या मनात तुलाच पुसते 


        प्रेम करतोस हसऱ्या मम चेहऱ्यावर 
        हसताना अवघडलेली असते 
        संवाद असतो मनात 
        तुझ्याच विनोदावर मी हसते 


        मनातल्या आपल्या प्रेमावर 
        तुझेच प्रेमगीत गात असते 
        तू मी आणि आपले प्रेम 
        स्वप्नातील त्या गावी दिसते   


        मिळेल सर्वकाही श्रद्धा देवावर 
        प्रेमाची ताकत मोठी असते 
        का आभाळ भरून आले कि 
        मन माझे मयूर बनून नाचते?  

Thursday, 15 December 2011

माझ्या जीवनात फक्त तू

     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 


     तुझ्याशिवाय अपूर्ण मी
     तुजसवे परिपूर्ण मी 
     आकाशीच्या चंद्रासारखा 
     का असा दूर तू 
     
     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 


     तुझ्याशिवाय सुखही नकोसे 
     तुजसवे दु:खही हासे 
     जवळ असतोस मृगजळासारखा 
     का असा दूर तू 


     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 


     तुझ्याशिवाय शब्दही अपुरे 
     तुजसवे मन कवितेने भरे 
     भासतोस एका आनंदी गीतासारखा 
     का असा दूर तू 


     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 


     तुझ्याशिवाय गुलाबही गंधहीन 
     तुजसवे हरेक फुल जाते सुगंधून 
     फुलतोस का मी झोपल्यावर रातरानिसारखा 
     का असा दूर तू 


    माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
    माझ्या जीवनात फक्त तू 


    तुझ्याशिवाय जगते मी अर्थहीन 
    तुजसवे सुखावते माझे जीवन 
    वागतोस मनमौजी वाऱ्यासारखा 
    का असा दूर तू 


     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 


     येशील न होवून चंद्र पौर्णिमेचा 
     बरसशील न होवून पाऊस वळीवाचा 
     फूलशील न होवून कमळ कायमचा 
     राहशील न होवून प्रियकर जीवनभराचा 
     कारण 


     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 

Tuesday, 6 December 2011

कथा कि व्यथा? एका कलिकेची !

     दवाचा तो पहिला थेंब उगाच कालिकेचे अंग अंग पुलकित करत होता नि सरसरून अंगावर शहारे आणत होता. रोज पहाटे त्याचा होणारा तो थंड स्पर्श तिलाही हवा असायचा ,दिवस संपून रात्र होऊन पहाटेच्या प्रतीक्षेत ती रोज असयाची ! पण सूर्य वर यायच्या  आधी ,पूर्वेला निळा,लाल ,केशरी रंगाच्या झिरमिळ्या दिसायच्या आधी अंधार बाजूला करत इतर झाडांचे आकार दिसायला लागले कि तिला शरमल्यासारखे व्हायचे ! कुणी पहिले तर उगाचच ती दवाला विचारायची ! तोही मग जास्तच रंगत यायचा नि तिच्या गुलाबी गालावर हळूच टिचकी मारायचा ,संपूर्ण शरीर ,कालिकेचे गोठवून टाकायचा ! तीही रंगून जायची आणि विसरून जायची बाजूचे सर्वकाही! आणि विरघळून जायची त्याच्या स्पर्शात ! कधी रंगाची झालर पसरली आणि कधी सूर्य वर आला याचे भानही नाही राहायचे तिला ! डोळे चोळत उठली कि वाटायचे तोही असेल इथेच पण तो चोर सूर्यदेवाचे आगमन होताच विरून जायचा हवेत ! व्यथित व्हायची पण इतरांची कौतुकाने भरलेली नजर उगाचंच तिचे मुखकमल आणखी उजळ बनवायची ! हे जादुभरले दिवस सुखाची आनंदाची उधळण करीत होते !
      प्रत्येकाला ,जो कोणी तिला पाहिल त्याला वाटायचे हिला मी माझ्याच फ्लॉवरपॉटची शोभा बनणार ! कुणीही जवळ आल तरी तिच्या सुगंधाने आणि सौंदर्याने मोहून जायचे . कुणाचेही अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत ,पाय  तिथे थबकायचेच ! अशी हि सुंदर गुलाब कलिका तिच्याच नादात असायची ,तिचा सुगंध नि सौंदर्य तिलाही मोहून टाकायचे आणि त्या लोभस आणि प्रिय दवाची तर सतत मनात कुठेतरी हजेरी असायची ,ती त्याच्याच स्वप्नात हरवून जायची ! तिचे त्याचे रोज पहाटेचे मिलन तिच्या रुपात अधिक भर घालत होते !आत्ता ती कलिका फुल बनू पाहत होती ! रोज पहाटे तो तीची एक एक पाकळी बाजूला घेत होता ,आता त्यांच्या प्रेमात अधिकच रंग आला होता ,तृप्तीच्या अनेक वाटा  त्यांना सापडल्या होत्या ! तिच्या उमलणाऱ्या प्रत्येक पाकळीबरोबर तिचे असंख्य चाहते रोज नवीन तयार होत होते लख्ख अश्या सूर्यप्रकाशात पण तिच्या जीवाला आवडणारा मात्र तो एकच होता ,तिचा लाडका दव....
    रोज उमलणारी कलिका,तिच्या सौंदर्यात आणि सुगंधात रोज पडणारी भर तिच्या आईच्या लक्षात येत होती ,आणि का ती बदलते आहे हेही तिला जाणवत होते ! आता कलिका रोज त्याची वाट पाहणे नि त्याच्या आठवणीत गुंतून जाने यातच हरवलेली ...प्रेमात असलेली ती, तिच्या रोमांचित आणि हर्षभरित आठवणी आणि तिच्यात भरत जाणारा सुगंध ,वाढत जाणारे सौंदर्य तिला स्वर्गसुखाची अनुभूती देत होते ...आणि ती दिवसाबरोबर आकर्षक होत होती ...पण आईला आता वेगळीच भीती वाटत होती ...ती म्हणजे तिच्यापासून दूर होण्याची ....कारण बहरात आलेले फुल दुसऱ्याचेच होते आतापर्यंत तिने अश्या कितीतरी कलीकांचे बलिदान दिले होते ... पण हि तिच्या जीवनातील सर्वोत्तम कलिका होती ...तिची आवडती कलिका ! 
      आज कलिकेने ठरवले होते कि काही झाले तरी ती दवाला विचारणार होती ,तो कधी निसर्गसाक्षीने तिला आपली बनवणार आहे ? सूर्यप्रकाशात तो तिला कधी माझी म्हणणार आहे ? तिला त्याच्या प्रेमाचा पूर्ण विश्वास होता ! रात्री ती झोपली नाही ,सुखाची प्रतीक्षा खूप मोठी असते कि भासते ? पण आजची रात्र खूप व्याकुळ गेली तिची ...प्रेमासाठी आसुसलेली ! पहाटे रोजच्या सवयीने दव आला आणि त्याने तिला बोलण्यासाठी ओठ उघडूच दिले नाहीत ...तीही विरघळली त्याच्या स्पर्शात जागी झाली तेव्हा सूर्याचे किरणरूपी हात तिला कुरवाळत होते नि सांगत होते गेला तो चोर आता तरी जागी हो !ती जागी झाली ,दव नाही हे पाहून विषन्न झाली आपोआप डोळ्यातील पाणी गालावर ओघळू लागले ,गालावरचे थेंब पानांवर पडू लागले ...तिची आई व्याकुळ झाली पण ...काय उपयोग ,तिची लाडकी कलिका आज तिला सोडून जाणार होती ...एका महालाची शोभा बनार होती ...तिच्या आईने खूप वेदना अनुभवल्या तिच्यापासून तुटताना पण तिच्या सुखासाठी ...? बरोबर थोडी पाने ,काही काटे दिले ...पाठराखण करायला ...आईच ती ! 
      तो सुंदर महाल ,जो संगमरवरी होता ..कलिकेचे डोळे दिपले ! खुश झाली ती खूप ,सुखाची चाहूल होती ती ! तिला ठेवण्यासाठी एक आकर्षक फ्लॉवरपॉट पाहून तर ती आनंदाने अधिक गुलाबी बनली . इतका सुंदर महाल आणि त्याहून सुंदर जोडीदार ,तिच्या आनंदाला सीमा नव्हती आज ...सुखाच्या संवेदनेने ती हुरळून गेली ,पण दवाने मारलेली टिचकीची आठवण  तिचे गाल आजही आरक्त करीत होती ...महालही तिच्या सुगंधाने आणि सौंदर्याने बहरला होता ! सुखाचे क्षण कापरासारखे उडून जातात... आज ती मागच्या रांगेत गेली कारण तिचा रंग आणि टवटवीत पण कमी झाला होता ..पण सुगंध तसाच ! रोज पाणी शिंपडले जायचे पण त्यात दवाचे प्रेम नव्हते ! भांड्यातले पाणी रोज बदलायचे पण आईचा स्पर्श नव्हता ,चकाकणारे दिवे सुंदर होते पण त्यात सूर्यकिरणांचा प्रेमळ स्पर्श नव्हता ...प्रेम आणि स्पर्शाशिवाय ती सुकू लागली ...आज तर ती कचर्याच्या टोपलीत गेली ! पण तिथेही तिने सर्व सडक्या कचर्याला सुगंधित केले ...तिचा स्वभावच तो ...तिथेही दुसर्याच्या म्हणजे कचर्याच्या सुखात ती सुखी होती ! 
     पण तिचा शेवटचा साथीदार सुगंध सुद्धा तिला सोडून गेला कारण ती आता कोरडी पडली होती ...आज रस्त्यावर पडलेल्या त्या मोहक कलीकेला सर्वजन तुडवत होते ...ते सर्वजन जे तिला काही दिवसापूर्वी आपल्या घराची शोभा बनवण्यास उत्सुक होते ...पण आज ती कलिका दु:खाणे आणि वेदनेने तळमळत होती ...आणि सुटकेसाठी आसुसली होती !!!!!    
  







Saturday, 26 November 2011

माझे हसू

     माहेरी जाने म्हणजे प्रत्येक सासुरवाशिणीला एक आनंद सोहळा ! पण बऱ्याचदा काही अश्या गोष्टींसाठी जावे लागते कि .... मन उदास असते ! माझे माहेर तसे साधारण ३ तासाचा रस्ता .असेच एकदा आम्ही ,मी आणि यजमान कर्जतला (जि-अहमदनगर) चाललो होतो . एका दश्क्रीयाविधीला चाललो होतो ,माझ्या मनात असंख्य आठवणी रुंजी घालत होत्या आणि मी तशी जास्त दु:खी होत होते . आम्ही दोघेच गाडीत होतो आणि साधारण सकाळी ६ ची वेळ होती .संपूर्ण रस्त्याने ते विषय बदलून बोलण्याचा प्रयत्न होते पण मी काही गतआठवणीतून बाहेर येत नव्हते .त्यांनी सर्वप्रकारे मला समजावले पण मी काही केल्या बोलत नव्हते . शेवटी त्यांनी एफ एम चालू केले ,सकाळची वेळ होती ,भक्तिगीते चालू होती .पण माझी उदाशी संपत नव्हती कारण लहानपणापासून ज्यांनी फक्त माया लावली ,संस्कार दिले त्यांचे असे अपघाती निधन मन विषण्ण करत होते .त्या नादात सिद्धटेक मागे पडले . गाडी सावकाश चालली होती ,मी माझ्या विचारात आणि तेही प्रयत्न करून गप्प बसलेले ! एका वळणावर त्यांनी गाडी फास्ट केली ,थोडे घाबरल्याचे हावभाव केले ,मी बघत होते पण काही बोलले नाहि .मग अचानक त्यांनी ब्रेक दाबले गाडी थांबली ,काच खाली करून बाहेरच्या मुलाला घाबरून (अक्टिंग) विचारले ,''काय झाले रे ?'' मीहि थोडी घाबरले मला वाटले काहीतरी अघटीत घडले ! मी आता पुरती घाबरले ! त्या मुलालाही दम लागलेला ,तो २ मीनीट धापा टाकत होता .माझी अवस्था एकदम बिकट!
 ''काही नाही''तो मुलगा बोलला .
''मग पळायला काय झाले ?''
त्या मुलाने काय ओळखायचे ते ओळखले आणि दोघे हसू लागली !मला हि गोष्ट समजायला वेळ लागला ,तोपर्यंत गाडी पुढे आली होती .मग मीही हसायला लागले ! कारण तो मुलगा रनिंग करत होता सकाळी सकाळी ! मी हसले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले ! सुखं आणि दु :ख आयुष्यात चालूच असते ते कुणी बदलत नाही पण अश्या प्रकारे वाटून नक्की घेतात !

Monday, 21 November 2011

रम्य त्या सांजवेळी

                   रांगेत उडती पक्षी
                   रेखित सुंदर नक्षी
                       रम्य त्या सांजवेळी
                       भिजलेल्या कातरवेळी

                   भिनला गंध मातीचा
                   घेतसे ठाव मनाचा
                        रम्य त्या सांजवेळी
                        भिजलेल्या कातरवेळी

                   वाटते आभाळी उडावे
                   रंगात केशरी न्हावे
                        रम्य त्या सांजवेळी
                        भिजलेल्या कातरवेळी

                   क्षितिजावर रंगांची होळी
                   कोण प्रेमयुगुल रंग उधळी
                         रम्य त्या सांजवेळी
                         भिजलेल्या कातरवेळी

                   पाणी नदीचे भासते शांत
                   जणू भास्करा त्या सामावित
                           रम्य त्या सांजवेळी
                            भिजलेल्या कातरवेळी

                   असावी प्रियाची साथ
                   आणि सुखाची बरसात
                            रम्य त्या सांजवेळी
                            भिजलेल्या कातरवेळी                

Saturday, 19 November 2011

गोष्ट एका चिमण्याची !

        चिमणा आणि चिमणी ...त्यांची हि कहाणी ! प्रत्येक सजीव त्याच्या संवेदना घेऊन जन्माला येतो . त्याची सुख, दु:ख, वेदना ,हर्ष सर्वकाही त्याच्या बरोबर येते आणि त्याच्याबरोबर संपते . सर्वजन ,जे सजीव ते आपल्या भावना एकमेकांशी  वाटून घेतात फक्त त्या आपल्यासारख्या माणसाला कळत नाहीत ...कि बऱ्याचदा कळून घेत नाहीत ! पाठीत काठी घातली कि बैल कळवळत असेलच कि ...पण त्याच्या भावना आपण समजूनही दुर्लक्ष करतो, आणि त्याने पुढ जाव म्हणून मारताच राहतो ! तसच आपल्या उघड्या खिडकीतून येणाऱ्या चिमनीच ...दोन दाणे टिपायच्या आधीच तिला काही तरी भिरकावून मारलच समजा !
     बाळाच्या चाहुलीने दोन्ही जीव आनंदून गेले होते. ती अंडी उबवण्यात चिमणीचा पूर्ण दिवस जात होता. आणि तिची काळजी घेण्यात ,तिच्या चाऱ्याची सोय करण्यात त्या चीमण्याचा दिवस सरत होता .त्यांच्या उत्साहाला उधान आलं होतं .त्याचं जगणं आनंदाने व्यापून टाकले होते . त्या चिमणपाखराच्या येण्याच्या नुसत्या चाहुलीने तिच्या पंखामध्ये एक प्रेमाची उब भरून राहिली होती .ती आता आई होणार होती आणि तो बाप ! घरटे बांधताना त्यांनी चारही बाजूने जाड अशी आंब्याची फांदी राहील याची काळजी घेतली ,ते झाडही उंच असल्याने मुले वर येण्याचा प्रश्न नव्हता कारण माणसाचीच  जात आपल्याला संकट आहे याची त्यांना पुरेपूर जाणीव होती !
''चिमणे , घरटे झाले मनासारखे ! आणखी काय लागेल ग पिलाला ?''
''चिमण्या ,तू एव्हडे कष्ट घेतोस ,इथ बसून जीव व्याकुळ होतो रे !''
''अग,चिऊ तुला पण माहित आहे तू किती खपलीस आतापर्यंत घरट्यासाठी ते ? आता पिलुसाठी तर चाललंय हे ! मग का बर खिन्न होतेस ? आता तर तुझ्या आनंदाने आपल् पिलुही आनंदी जन्मणार आहे ! त्याच्या सुखासाठी तर आपण खपतोय ना ?''
''हो रे ,पण ''
''आता पण नाही नि बिन नाही ,मी चाललोय काळजी घे अंड्याची ,तो कावळा भारी खोडकर आहे ''
''बर बाबा , ये लवकर मी आणि आपल् येणारं पिलू तुझी वाट पाहू ! ''लाजत चिमणी बोलली .
    भुर्रर्र चिमणा उडाला .आज थोडे पुढे जाऊन पाहू आणखी काय वेगळ मिळाले तर आणू पिलासाठी . किती काळजी करते हि चिऊ ? तिच्यासाठी आणि पिलासाठी कष्ट घेणे काय थकवा देणार आहे त्याने तर मला आणखी  उत्साह वाटतो ! हे कसं समजत नाही तिला ? तिची काय चूक ? ती तर किती प्रेम करते माझ्यावर ! मागे असंच माझे पंख जखमी होते त्या माणसाच्या पिलाने पकडल होत मग त्याच्या कचाट्यातून बळेच जीव वाचवत निसटलो ! किती कष्ट पडले तिला पण तिचा थकवा  कधीच दाखवला नाही तिने ,उलट मला बर वाटावं म्हणून ती सतत उत्साही असायची !सगळे दाणे पण असे पौष्टिक आणायची कि दहा दिवसात ती जखम भरून आली ! अरे खाली ते पांढर काय दिसतंय त्या झाडाच्या फांद्यांना ? चल बघतोच .तो एका मोठ्या झाडावर पानामागे बसला . बऱ्याच बायका आणि पुरुष तिथे कापूस वेचत होती .तो बसलेल्या झाडाखाली एक मोठा ढीग झाला होता ,त्यावर त्या माणसाची पिले लोळत होती त्याला वाटलं हा कापूस नक्कीच मऊ असणार! अंड्याच्या खाली टाकला तर ? काड्या तरी रुतणार नाहीत चिऊला आणि पिलूला ... खूप लांब आहे पण नेउयाच ! भुर्रर्र करत चिमणा कापूस जितका नेने शक्य आहे तितका तो नेऊ लागला . चिमणी खूप खुश झाली ती मऊ दुलई पाहून! तो अनेक चकरा मारून दमला मात्र त्याचा उत्साह कमी होत नव्हता . 
''बस झालं आता ! छान दुलई आहे ''चिऊ 
''नाही ग अजून थोडे आणतो म्हणजे मग काळजीच मिटली ''
''अरे पण आभाळ लाल झालं ,उजेड संपेल आता ''
''अग् माणस तो कापूस घेऊन जातील ,आलो लगेच ''
''अरे ........''
तीच न ऐकताच तो भूर्रर्र उडाला !
तिथे सगळा कापूस पोत्यात भरून झाला होता .शेवटच पोत भरणे चालू होते ,प्रत्येकाला घाई होती घरी जाण्याची म्हणून एक एक पाटी कापसाची घाईने आत पडत होती . चीमण्याने भुर्र जाऊन आतला एक धागा उचलून उडायला आणि कापसाची भरलेली पाटी पडायला एकच वेळ ! त्यातून बाहेर येण्याचा असफल प्रयत्न .... वरून परत एक पाटी ....घुसमट .......मृत्यू .....चीउचे वाट पाहणे ...उपास ...विरह ...मृत्यू ....अंडी भेगाळलेली...पिलांचे येणे ...आई बापाशिवाय एकाकी जगणे ............