या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Tuesday 3 May 2016

जात

प्रत्येक वेळी समाजाने एक समाज खलनायक म्हणून उभा केलाय . कधी ब्राह्मण , कधी मुस्लीम , कधी इंग्रज ...असे कितीतरी ! एखादा समाज खरंच इतका क्रूरकर्मा असतो का ? असेल तर का ? आणि ज्या एका काळात त्या त्या समाजाचे वर्चस्व कायम होते म्हणजे थोडक्यात तो सत्ताधीश राहिला त्या समाजातील साऱ्याच लोकांनी अन्यायाचा पाठपुरावा केला का ? जर ठराविक कट्टर असा वर्ग त्यात असेल तर काही प्रमाणात त्याच जातीतील सामान्य जीवन जगणारे लोकही त्यात होतेच ...हे वास्तव आहे . मग या वर्चस्व असलेल्या सामान्य वर्गाचा इतर समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय होता ? हा विचार कधीच कुणी करताना दिसत नाही .सरसकट त्या साऱ्या लोकांना एकाचा पारड्यात तोलले जाते आणि मग १०० मधील १० सत्ताधीश लोक अन्यायकारक आहेत मग बाकीचे ९० पण त्यात अक्षरशः भरडले जातात . प्रत्येक मनुष्यात एक वर्चस्ववादी मनीषा दडलेली असते . अगदी एखादा भिकारी सुद्धा जवळ बसलेल्या कुत्र्याकडे तुच्छतेने पाहताना दिसतो , असे का व्हावे ? भिकारी तर ना जातीने मोठा असतो ना पैशाने , तरीही तो त्याचे यत्किंचित अस्तित्व त्याच्यापेक्षा दुर्बल घटकावर वर्चस्व दाखवून तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो . हि वर्चस्वाची भावना प्रत्येक जीवात सुप्त किंवा प्रकट अवस्थेत आपण चहुबाजूला अनुभवतो . मग जे आपल्याही आत आहे ते न पाहता आपण खुशाल समोरच्या माणसाच्यातील तीच भावना ठळक करण्याचा प्रयत्न का करीत असतो ?  'आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट' हि म्हण जी सारखी कुणाच्या न कुणाच्या तोंडी असते किती सार्थ आहे .
       हे विचार मनात येण्याचे कारण , नागराज मंजुळे यांचा सैराट सिनेमा ! मी तो अजून पहिला नाही ! पण सोशल मिडीयावर फिरणाऱ्या बऱ्या वाईट पोस्ट वाचून उगीच एक  मराठा समाजाबद्दल लोकांच्या मनात असलेली तेढ चव्हाट्यावर आली आहे . मी जरी मराठा आहे तरी मला आमच्या समाजात खोलवर रुजलेल्या सरंजामशाही विचारांची खूप चीड आहे . पण म्हणून मी पूर्ण समाज धारेवर नाहीच धरू शकत . कारण त्यात ज्या  बाकीच्या चांगल्या सर्वसमावेशक वृत्ती आहेत मला नाही वाटत इतर कुठल्या वर्गात असतील . दोष , गुण हे सर्वच समाजाचा अविभाज्य भाग आहेत . त्याची तुलना चांगले वाईट या तराजूत व्हावी न कि हि जात ती जात अशी . याने फक्त जातीयवाद अधिक ठळक होत जातो आणि समाजमनावर बिंबवला पण जातो . मग इथे राजांचा , आंबेडकरांचा , फुलेंचा अपमान झाला आपण निषेध केला पाहिजे ..म्हणत ठराविक जात पुढे येणार नाही . कारण या सर्व महामानवांचे कार्य सर्व समाजासाठी होते ..प्रत्येक घटकाने या निषेधाचा भाग बनले तर आपोआप जात लयाला जाणार आहे . तिला रंगवून ती अधिक भडक करण्यापेक्षा त्या वृत्ती रंगवायला हव्यात . ते दोष रंगवायला हवेत . आणि याची खबरदारी प्रत्येक माणसाने घ्यावी ,तरच एक सर्वसंध राष्ट्र उदयाला येऊ शकते . नाहीतर या महामानवांनी ज्या सुदृढ समाजाचे स्वप्न पाहत  आयुष्य खर्ची घातले त्यांचे बलिदान व्यर्थ आहे .
                  डॉ संध्या राम शेलार .
हे सांगण्याचे कारण सैराट मध्ये पाटलांचे दुष्कृत्य दाखवताना  पार्श्वभूमीवर केलेला शिवाजी महाराजांच्या चित्राचा वापर ! राजे एका जातीसाठी कधीच मर्यादित नव्हते . बाकी चित्रपट शंभर नंबरी सोने आहे असे माझा चित्रपट पाहिलेला भाऊ संदीप सांगतो आणि fandry नंतर खरे पाहता मंजुळे यांच्या कामाची मीही चाहती आहे . 

No comments: