या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Friday, 19 August 2011

पठ्ठी

   ''मरण येत नाही, म्हणून जगतेय!'' असे वाक्य अनेकांच्या तोंडी येत. खरोखर ते हतबल असतात का ? जगणं इतकं अवघड असू शकतं ? तसं पाहिलं तर कितीसं दु:ख आपण सहन करत असतो! कदाचित हो कदाचित नाही! दु:ख असताना मृत्यू कवटाळंण जितकं सोपं तितकं ते पार करून जाण अवघड! आणि ज्याला अवघडाची आस तो माणूस! मग आपण माणूसपण कस सोडू शकतो ? ज्या स्रिया पोटच्या पिलाला आपल्याबरोबर बळी द्यायला तयार होतात त्यांच्यासाठी............
     मळलेले कपडे पण वास न येणारे, केस विंचरलेले चेहरा काळाच पण धुतलेला, पदर खांद्यावर पण पूर्ण छाती पूर्णपणे न झाकणारा, मांडीवरची पोर साधारण पाच सहा महिन्याची. जवळच पाच वर्षाची दुसरी पोर. ''नंबर आला तुमचा चला ताई'' गडबडीने उठून आत केबिन मध्ये गेली. डॉक्टरांनी तपासून औषधे लिहून दिली अन ती बाहेर आली. ''औषध निम्मीच का आणलीत ताई?'' ''पैसा कमी हाय'' ''मग डॉक्टरांना सांगा'' ती परत आत गेली. 
     ''सगळी औषध घेतली नाहीस तर तुझ बाळ कस नीट होणार ताई? आधीच ते जास्त आजारी आहे, त्याला औषध लागतीलच.'' डॉक्टर.
     ''काय करू ताई, आठ दिसाच खाय प्यायचं सामान  भरून जे बाकी राह्यलं तेच्यामंदी हीच औषध आली''  
     ''तुझा नवरा कुठाय, बोलव त्याला'' 
     ''ताई हि पोरगी झाली त्यो मला सोडून गेला दुसरी बाई घेऊन, मी बा जवळ हाय तिथबी साव्तर आय हाय, उसतोडीच काम त्येंच्या संग करते, ती म्हणती दवा पाण्याला कुठून पैसा देऊ तीन पोर आन चौथी मी त्ये खायला तरी किती जनस्नी देणार आन त्यावर दवा म्हंजी लई झाल. आठ दिस झाल पोर आजारी हाय, आज पैस दिलं म्हणून आले.'' 
       डॉक्टरांना कससच झाल नि त्यांनी त्यांच्या जवळची औषधे त्या बाईला दिली.
    ''फी देऊ नको बाहेर मी सांगते त्यांना.''
    ''लई उपकार झाल ताई''
    ''मुलींच्या शिक्षणाचं काय'' दयेपोटी डॉक्टरांनी चौकशी केली.
    '' त्ये कस जमल ताई? आमी आठ नऊ महीन इकडच असतु. माझ्या या मोठ्या पोरीला आश्रम शाळेत घेतील काव ताई?''
    ''घेतील ना ती सहा वर्षाची होऊ दे नंतर टाक आश्रम शाळेत.''
     ती बाहेर गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात डॉक्टर म्हणाले ''पाठ थोपटली पाहिजे पठ्ठीची! अवघडलेल जगण तिनी सोप केलय!''   

Wednesday, 10 August 2011

मनात रुतलेले क्षण


 
        '' आई गं '' आनंद असो वा वेदना हे दोन शब्द ज्याच्या ओठी येत 
नसतील असा माणूस विरळ. प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात मोठी जागा 
कुणाची असेल तर ती आईची! प्रत्येक सुखाची पायरी आईपासून सुरु 
होते आणि दु:खाचा शेवट आईपाशी होतो. मनाच्या कुठल्या कोपर्यात 
दडली आहे इतर वेळी समजणार नाही पण सुख-दु:खाच्या वेळी ''आई गं '' 
हे दोन शब्द जिव्हेला कधी सजवून गेले ते कळतच नाही. आईबद्दल 
लिहिण्यासाठी शब्द जरी अपुरे नसतील तरी वेळ मात्र अपुरी आहे .(आत्ता तरी )       
        पायात रुतलेला काटा जसा घर करून जसा घर करून जातो तसे मनाला रुतलेला क्षणहि तसाच . पायाच कुरूप कमीत कमी भरून निघत, औषधउपचारांनी बरही होतं पण मनाची ती वेदना अचानक उद्भवली की.......
       त्या दिवशी mathचा तास संपायला उशीर झाला पळतच प्रयोगशाळेत गेले सगळेजण आले होते पण सर् अजून दिसत नव्हते. हायस वाटलं. सगळ्या मुली टेबलाजवळ बसलो. माधुरी कुठाय म्हणेपर्यंत धावत येणाऱ्या बाईसाहेब दिसल्या ''आई गं '' नेहीमिप्रमाणे ठेचाळली. ''लागल नाही ना'' नेहमीची सर्वांची प्रतिक्रिया! बर तरी हिच्या आई आमच्याच शाळेत होत्या!
     ''ये खरच आई किती नकळत येत ना?''इति सारिका.
     ''स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी,'' उमा.
     '' कुणाची आई कितीही वाईट असुदे मुलांसाठी ती सर्वस्व असते,'' मोहिनी.
     ''माझी आई जीवाची सखी,'' वैशाली.
    ''हमारी अम्मी की तो बातही अलग अम्मी की जान है हम,'' शबाना.
    ''माझ्या सर्व समस्यांच समाधान आहे आई,'' मी
    दीपा मात्र तोंड लपून बसलेली. सारीकाने  हलवलं पोरीच्या डोळ्यात पाणी! सगळ्यांच्या नजरा दिपावर खिळल्या. कुणाला अर्थबोध होत नव्हता.नेहमी जिच्या चेहऱ्यावर हास्य विलसत असतं ती दीपा आज रडत होती सर्वजनी आश्चर्याने बघत होत्या. तिने मनसोक्त रडून घेतल चेहरा लालबुंद झाला. हुसमरत ती बोलली ................
    ''मला आईच नाही गं!'' 

Wednesday, 3 August 2011

वागीन

          ''आये ये आये, सांग ना बापूला मला बी ताईच्या वाणी साळत जायच हाय.''     
          '' आगं पर ती मालकाची पोर हाय, आपून गरीब माणसं सकाळच्याला खाललं तर रात्तच्याला मीळना!''     
          '' ती कवी जाती की ती कुठ लई तालेवाराची लेक हाय.''      
          '' नकु वाद घालू बग माज्यासंगं, उरिक लवकर दुगिनी चार पुती शेंगा काडल्या त चार घम्याली मिळत्यान.''       
            गावात सातविपतुरच शाळा हुती. संगीला तवर शिकावनं बापूला जमलं पण आता इस्टीनि तालुक्याला धाडायच म्हंजी सोपं नव्हत्. त्याला बी वाटायचं पर वाटत् तसं सगळ थोडच हुतं. संगी तशी कळाय लागलं तशी हुशार! कदी तिनी खेळ अन खाण्याचा हट्ट केला नव्हता. जी आसन ती भावंडासनी देणार राहिल तर घेणार. साळत बी नापास कवा झाली नाय. शाळा चालू झाल्याल्या महिना झाला रोज संगी आईला तेच सांगायची. ताराबाईचा नाईलाज हुता.       
            संगी दिसाया निटास, सरळ लांब नाक, कामानिवानी भुवया, तपकिरी डोळ् उभाट चेहरा! उंची कमीच पर पोर बघताच मनात भरणारी! कामाला वागीण जी सांगनार ती काम केलच बगा. सातवीची शाळा बंद झाली न आईनी तिला रानातल्या कामाला न्यायाची चालू झाली. कामाच्या बाया बी सांगायच्या संगीच्या आईला धाड तिला साळला पर संगीच्या आयेची काळजी येगळी हुती आसली देखणी पोर काय बाय येडं वंगाळ झालं म्हंजी? मायचं ती!
            कामाला जायच्या अगुदार शिळीला गवात आणायला संगीच जायाची आईला बी घरातल काम उरकुस्तवर जायाची वेळ व्हायाची. संगीला उशीर झाला घाईतच पळली मालकाच्या ऊसाचा बांध काय नवीन नव्हता. गवतात पाय आडाकला फुड सापदिशी मोठ्या काळ्या दगडाव पडणार की इक्रमनी तिचा हात धरला. दोग धापदिशी माग उसाच्या कटाला पडली.इक्रम्नी तिला लागून दिल नाय  अंगावरच झेलली. तिला काय बी कळायच्या आत त्यान तिला उसात ओढली.
            जागी झाली तवा सगळ्या आंगातून कळा निगल्या आये म्हणायला तोंडातनं सबुद निगणं आवगड झाल्त आयच्या मांडीवरच डोक उचलता उचलत नव्हत आयकड बघितलं डोल्यास्नी लागलेल्या धारा थाबायचं नावच घीनात थोडा जीव शांत झाला. आयेचा आधार घेत उठली पायापातूर रगात बघितलं न तिला काय झालं अंदाज इना निट पायल जी मोटा हंबरडा फोडला कुणाला म्हणूनश्यान ती आवरणा. आई बापू कपाळाला हात लाऊन बसली. गरीब बिचारी आणिक काय करणार हुती!
            पंधरा दिस झालं पर संगी काय हातरून सोडना. कुणी बोलाया लागल तर डोळ्यातून पाणी काढण्यापरीस दुसर काय बी करत न्हवती. डोक्यातून जात न्हव्हत् इक्रमदादान आस कामुन्श्यान करावा. ताई तर सांगायची आपून सगळी बहिण भावंड म्हणून!
           '' संगे, बग कोण आलं हाय, आता तरी बुलशील न्हव''
            ताई आत आली न संगी उठून तिच्या गळा पडून रडाय लागली. सगळी घटना संगीनं ताईसनी सांगितली. तशी रागान लाल झालेली ताई उठून उभी राह्यली,''संगे उगाच दादाच नाव घेऊ नगस, तुमा लोकास्नी खाया घालायचं न तुमी इनाकरण आमची बदनामी नग करूस.''
            कालवा ऐकून संगीची आय आत आली. आज पहिल्यांदाच सगल्यास्नी करणाऱ्याच्या नावाचा उलगाडा झाला पर आईन संगीच्या तोंडावर हात ठिवला. आंजरून गोंजरून निट समजावल. संगीच्या डोक्यात मातूर इक्रम आन ताईसाठी नुसता राग नव्हता तर आग व्हती.
          ''आग संगे घरात बसूनस्यान याड लागल तुला, काम नग करू पर रानात गेल्याव मन तरी रमल.''
          बळ बळ आज आईन तिला बाहेर काढली. रानात गेल्याव गप् बसल ती संगी कसली. मोकळ्या हवत तीच मन बी जरा मोकळ झालं. हातात खुरपं घेऊन ती बी कामाला लागली. आज परत पहिल्यावाणी समद्या बायांच्या फुडं. ताराबाईचा जीव इतक्या दिस उडाला व्हता. फुडं फुडं सरनाऱ्या संगीला बघून तीच डोळ काठापातूर वल व्हयाचं नी परत खुरप्याखालच तन बघत  मातीत मिसाळून जायचं ! 

          '' संगे आग संगे बग तुजी शिळी सुटली पळ लवकर''
          संगी खुरप टाकून धावली. मुकं जनवार दावं सुटल्यावर सगळ्या दिशा त्याच्याच की पिसाटासारखाच उधाळनार बगा. संगी धापा टाकीत बायांपासून लांबवर आली. जोराच्या वाऱ्याला बी आताच टायम गावला वय. ह्या शिळीला आता आशी मारल ना मनाचा नुसता चरफडा होत हुता. ''काय संगे बराय ना, मग काय चाललय आता कवा पडायचं आमच्या अंगावर? चल की आता'' हसत हसत इक्रम एकदम पुढ उभा ठाकला  संगीच्या सगळ्या अंगात दारारून मुंग्या आल्या रेखीव कपाळावर घामाच थेंब गोळा झालं हातपाय धरणीला धरीनात. ''संगे आग संगे काय झालं ग पळाया''  कमळामावशीच्या आवाजानी तीच धडधडणार काळीज थोड हालक झालं. माग बगीतल परत वळूस्तवर जसा आला तसा इक्रम गायब बी झाला. संगीन घाम पुसला नी कमळामावशीच्या मागणं चालू  लागली. 
          आता तिला हे रोजच झालं. एकटी दिसली की तिला गाठायचा नी वाईट वाकड बोलायचा. माणूस तरी सारक कवर जवळ राह्यच. तिच्या डोक्यातल्या आग मातूर आता तिच्याहि आवरन्यापलीकडे गेली . ह्या इक्रमनी मला डागाळली तरी त्याच मन भरना माजा जीव बी घेणार हाय का आता? आईला सांगावा तर ती बी गप् बस म्हणल. ह्याला धडा शिकवायला पायजेनच. पर त्याला शिव्या देऊन्बी लाज वाटणा. परत कुत्र्यासारका माग पुड हायच.
         ह्या वाऱ्याला काय मरी आली उठल्यापासून भना भना करतुया. आईलाबी ना कवा टायमात काम उरकायला जमल नाय. बाया न्ह्यारिला यीतील तरी हि घरची हलायची नाय. बस तशीच मी जात्ये आता! कवा कडवळ कापून व्हायचं परत खुरपायला बी जायचं हाय.   
इळयाला धार लावली झपा झपा पावलं टाकीत निगाली कडवाळाच्या रानात. भर भर  विळा चालू लागला निम्मा वाफा झाला नी मागण कवळ कमरेला पडली. झिडकारल तरी कवळ काय सुटना. तीन इक्रमचा स्पर्श वळाकला तिच्या डोक्यातली आग भडकली खापदिसी काय कळायच्या आत तीन इळा त्याच्या हाताव मारला. आज ह्याला नाय सोडणार! कमरची मिठी सैल झाली हात दाबीत त्यो खाली वाकला न संगीन सपा सपा इळयांनी जमल तिथ वार केला. रगताच्या चिळकांडया उडून तीच त्वांड लाल झालं पर ती थांबायच नाव घेत नव्हती. इक्रामच्या आरोळ्या ऐकून समदी कामाची मजूर पळत आल एकान संगीचा हात धरला न इळा काडून घेतला इक्रामच धड निपचित वाफ्यात पडल आन संगी आरडत व्हती.
                            '' वागीन हाय वागीन, त्या कुत्र्यासारका मागून वार करीत नाय फुडून चिरते!''    

Wednesday, 20 July 2011

कळकटलेलं आयुष्य

        ''मीरा, ऐ मीरा चल ना आता, कीती वेळ लावतेस?'' रोहीणी नाराजीत मीराला बोलवू लागली. तीच्या उत्तराची वाट न पाहता मीराचा टिफिन उचलून ती कॅन्टीनकडे  चालू लागली. मीराने पटकन टेबल आवरलं धावत रोहीणीला   गाठलं, नेहमीच्या कोपऱ्यातल्या टेबलावर दोघीही जाऊन बसल्या. तशी त्यांची ओळख या ऑफिसमध्ये कामाला लागल्यापासून, साधारण दोन वर्ष झाली. दोघींच्या स्वभावात टोकाची तफावत पण मैत्री.. खूप घट्ट! दोघी गावाकडून आलेल्या, मीरा तिच्या मामाकडे राहत होती तर रोहीणी होस्टेलमध्ये! दोघी आई वडिलांपासून दूर, एकटेपणा जाणवायचा पण त्या एकमेकींचा भक्कम आधार होत्या.
      दहा मिनिट झाली तरी रोहीणी एक शब्दही बोलत नव्हती. जेवणही मनापासून करत नव्हती, कुठेतरी हरवलेली. शेवटी शांततेचा भंग करत मीरा म्हणाली,''कुठे हरवलीस? झालं काय ते तर सांगशील? माझं काही चुकलं का?''
        ''नाही, नाही,'' भानावर येत रोहीणी पुटपुटली.
        काहीतरी बिघडलय हे मीराने हेरलं होतं.. तिला बोलतं करणं गरजेचं होतं, नाहीतर ही बया परत झोपेच्या गोळ्या चालू करील. आता कुठेतरी गाडी रुळावर आली होती, तर परत हीच गप्प बसणं चालू झालं मीरा मनाशीच विचार करत होती.
        ''रोहीणी, मला नाही सांगणार''
        ''मीरा, तसं नाही गं पण मला कंटाळा आलाय आता वाटतं बस झालं हे रहाटगाडगं''
         ''अग, पण असं म्हणून कसं चालेल''
         ''मग, काय करू तूच सांग, थोडा तरी बदल नको का गं?''
        ''हो, मान्य आहे पण एवढी चांगली नोकरी सोडून चालेल का? नोकऱ्या काय रस्त्यावर मिळतात का?''
        ''नाही गं''
        ''पटतय ना, मग असं का वागतेस?''
        ''तुला नाही कळणार, तु काय घरी गेलीस कि मामाची मुलं आहेत, मामा मामी आहेत, दिवसभरचा कामाचा ताण घराच्या वातावरणात विरघळून जात असेल.''
         ''असं तुला वाटतं, मी रोज येताना माझा डबा तर करतेच पण मामाचा मामाच्या मुलीचा पण करते आणि घराचा स्वयपाक पण आवरून येते, एक दिवस जमलं नाही तर मामी चार दिवस बोलत नाही, बोल आता! आणि हो घरी गेल्यावर मुलांच्या अभ्यासासाठी टीवी बंद, कपड्यांना इस्त्री करणं आणि अशी बरीच काम, कधी झोपेची वेळ होते कळतसुद्धा नाही, परत सकाळी उठण्याची धास्ती! माझा दिवस कुठे सुरु होतो नि कसा संपतो? या राहटगाडग्याचा विचार करायला वेळच कुठे आहे?''
         ''तुला वेळ नाही पण मला आहे ना?''
         ''वेळ घालवण्यासाठी या शहरात कमी का गोष्टी आहेत?''
         ''हो,पण मला ह्या वेळ घालवू गोष्टी नको आहेत. ज्याने मनाला सुख समाधान मिळेल असं काहीतरी....''
         ''ती गोष्ट तुझ्याजवळ येऊन तुला सांगणार आहे का? माझ्यात तुझं सुख आहे म्हणून, तूच ते शोधायला नको का? तू जर भोवताली डोळे उघडे ठेऊन पाहिलस तर प्रत्येक गोष्टीत तुला आनंदच गवसेल त्यासाठी तुला तुझ्या डोळ्यावर आलेला आळसाचा पडदा काढावा लागेल!''
          ''झालं तुझं तत्वज्ञान चालू''
         ''रोहीणी, ए रोहीणी, एक ऐक ना,तू चिडू नकोस पण तूच विचार कर जे विचार तुला दु:खाच्या दरीत लोटताहेत ते सोडून दे ना! प्रत्येक क्षण जगायला शीक! जेव्हा तुझ्या मनातलं हे निराश विचारांचं मायाजाल तू धुडकावशील तेव्हा तुला भोवतालच्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक कामात एक प्रेरणा लाभेल जी तुझं आयुष्य नक्कीच सुखमय करेल, आनंदी करेल! तेव्हा तुला,
                                 पावसाच्या प्रत्येक थेंबात,माणसाच्या प्रत्येक शब्दात 
                                 गर्दीतल्या प्रत्येक मुलात,बागेतल्या प्रत्येक फुलात 
                                 तुझ्या प्रत्येक कामात,आणि मेसच्या रोजच्या डब्यात...
                                 तुझ्या मनाचा आनंद गवसेल!
उत्साही राहिल कि सगळ जग आपलं वाटू लागतं, झोपेनं शरीराचा थकवा जाईल पण मनाचं काय? मनाचा थकवा घालंवत ते फक्त मनापासून केलेलं काम! आणि जो माणूस काम करतो तोच सर्वांना प्रिय असतो!तू गोड बोललीस तर बाकीचे तुला समजून घेतील, तुझ्याशी चांगलं वागतील, पण प्रत्येकवेळी तुझं रागावणं तुला माणसांपासून दूर घेऊन जाईल! तू जसं सर्वाना देशील तेच सर्वजन तुला देतील. मग तुला उशिरा येणाऱ्या बसचा राग येणार नाही नि रागवनाऱ्या बॉसचाही नाही.आपल्यातला उत्साह आनंद दुसऱ्यालाही उत्साही आनंदी बनवतो, या विचारांनी आपलं आयुष्य नक्कीच जगण्याजोग वाटेल. तुला आठवत असेल न्युटनने सांगितलेले नियम फक्त वस्तूनाच लागू होतात असं नाही माणसांही होतात. कुठला सांग बर?''
           ''actions & reactions are equal & apposits''
           '' कळतंय ना मग वर्तनात कधी आणणार ?''
           ''चल अगदी आत्तापासून'' 
      सुट्टी संपायला पाचच मिनिट होते.बोलण्याच्या नादात त्या जेवणही विसरल्या,घाईने जेवून त्यांनी धावत ऑफिस गाठलं. आपापलं टेबल पकडलं आणि कामाला लागल्या. रोहिणीचा उत्साह सर्वांच लक्ष्य वेधून घेत होता. भरून आलेलं आभाळ पाऊस पडून गेल्यावर जसं निरभ्र दिसत तसं तेज आज रोहिणीचा चेहरा उजाळत होतं!जेवणानंतर काम करताना रोज डुकल्या खाणारी रोहीणी प्रत्येक काम आज प्रसन्न मनाने उरकत होती.आज वेळेवर काम उरकलं, सुट्टी झाली. आज बस चुकणार नव्हती. मीराचे शब्द आठवत ती बस थांब्यावर आली. रोजचा कंटाळवाणा बस थांबा आज नकोसा वाटत नव्हता. ''का बर?'' रोहीणी मनालाच म्हणाली मैत्रिणीचे प्रेमाचे दोन शब्दही दु:खाच्या दरीतून बाहेर काढायला पुरेशे असतात नाही का?
     जवळच एक कळकटलेल्या कपड्यांचा माणूस, नाही भिकारीच तो! पण त्याच्या हातात भांड नव्हत कि काखेला मळलेल्या कपड्यांची पिशवी नव्हती. कदाचित तो वेडा असावा. साधारण चाळीसच्या घरातील तो वेडा, का बर वेडा झाला असावा? मनाशीच रोहिणीने प्रश्न केला पण उत्तर मिळणार होतं का? सुरवातीला त्याला पाहून तिला कससच झालं पण नंतर त्याच्या हालचाली ती न्याहाळू लागली. तो स्वताशीच काहीतरी बोलत होता. भाषा परिचयाची नव्हती, तिला काही समजल नाही.
      त्याने भोवतालचा सर्व कचरा हाताने गोळा केला आणि जवळच्या कचराकुंडीत टाकला.त्याची साफसफाई रोहीणी भान हरखून बघत  होती तिला बस गेलेली कळलीच नाही. सर्व जागा स्वच्छ झाल्यावर वेड्याने तिच्यापुढे हात पसरला, पोटाकडे हात दाखवत भूख लागल्याची खुण केली. तिने दहा रुपये त्याच्या हातावर टेकवले पण त्याने ते परत केले. तिने जवळच्या गाडीवरून केळी घेऊन वेड्याला दिली, मग स्वारीने ती आनंदाने घेतली, अधाश्यासारखी खाल्ली, पुढे चालू लागला.
      आत्ता कुठे बाई भानावर आल्या, बस गेल्याची जाणीव झाली पण खंत नव्हती. आज तिला जीवन समृद्ध करण्याची एक सोपी पायवाट सापडली होती. तीच मन समाधानाने ओसंडत होतं! डोळ्यासमोरून वेडा हलत नव्हता! जर एक भान नसलेला एक माणूस जग सुंदर करण्याच्या मागे लागला आहे तर आजचे आपण तरुण बुद्धी आणि शरीर शाबूत असताना आपलं जीवन आनंदमय करू शकत  नाही? का बर? करू शकतो! नक्की करू शकतो! गरज आहे ती फक्त मनावरच निराशेच मळभ हटवण्याची! मीराचेच शब्द तिच्या मनात प्रतिध्वनित होत होते.....आज एका कळकटलेल्या आयुष्याने तिला तीच आयुष्य सुखी करण्याची नवी उमेद दिली होती.......  

Monday, 6 June 2011

माझे बाबा

              माझे बाबा  सदैव असलेलं प्रेरणास्थान, आजच्या या बाबांच्या दिवशी त्यांच्या चरणी नमन!
           मला आजही तो दिवस आठवतो, एक भगव्या कपड्यातील साधू भिक्षा मागण्यासाठी आले होते. त्या दिवशी शाळेला सुट्टी असल्याने मी घरीच होते. आई कामात, तिने मला पोत्यातील ज्वारी घेऊन साधुबाबाना द्यायला सांगितले. 
 मी ती भिक्षा दिली आणि नेहमीच्या सवईने त्यांनी मला आशीर्वाद दिला, ''चांगला नवरा मिळू दे!'' 
 त्याच वेळी मळ्यातून आलेले,''बाबा माझ्या मुलीला आधी खूप शिकण्याचा, डॉक्टर होण्याचा आशीर्वाद द्या,                  आणि नंतर चांगल्या नवर्याचा.''
         त्या वेळी साधारण मी पाचवीत होते, त्याच वेळी निग्रह केला, कितीही कष्ट पडले तरी चालेल पण डॉक्टर व्हायचाच. तसं प्रत्येक पाल्याबाबत आई वडील हीच स्वप्न पाहतात, पण माझे बाबा आठवी पर्यंत शिकलेले एक शेतकरी आहेत. माझ्या त्या छोट्या खेडेगावातील मी पहिली महिला डॉक्टर आहे. त्या वेळी काहीही सोयी नसताना माझ्या बाबांनी मला हे स्वप्न दाखवलं! आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली.
         आज मला कसलीही अडचण वाटली तरी प्रथम त्यांची आठवण होते. त्यांनी दिलेला सल्ला मला प्रत्येक द्वंद्वातून बाहेर काढतो. त्यांचा एक एक शब्द मला प्रेरणा देऊन जातात.
         त्यांच्या प्रमाणे माझे सासरेही मला माझ्या बाबांप्रमाणेच आहेत. त्यांच्या मुलीला माई म्हणतात म्हणून आम्ही दोन्ही सुना मोठी माई , बारकी माई! आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही न दुखावणारे आमचे सासरे नेहमी मला वडीलच भासले.
          त्या दोघांसाठी परमेश्वर चरणी आज एकच मागणं.........
''त्यांना आरोग्यपूर्ण, दीर्घायुष्य लाभो! आणि त्यांच्या प्रेमाची, मायेची सावली अशीच आमच्या आयुष्यात राहो!''

Friday, 3 June 2011

उगविला नारायण

     पहाटे उठून अंघोळ करून गच्चीत मस्त विलायची टाकून केलेला चहाचा कप हातात घेऊन, थंड हवेची झुळूक अंगावर घेत चहाच्या प्रत्येक घोटाबरोबर भोवतालची रम्य पहाट अनुभवणं काय मस्त ना? खर तर आपण आवर्जून पहाटे उठणं तेही गोड अशी साखरझोप मोडून! नको रे बाबा असच वाटतं पण एकदा तरी हे करावंच. संध्याकाळची रात्र होणं जेवढं मनमोहक तेवढंच किंवा त्यापेक्षा जरा जास्तच रात्रीचा उष:काल होणं प्रेरणादायी. तसं शहरात कदाचित हि पहाट अनुभवान अवघड पण खेड्यात ....
      शहरातील अंगण जरी हरवलं असलं तरी खेड्यात ते अबाधित आहे. अंगणात सडा घालणारी सुवासिनीसुद्धा अजूनही दिसते. शेणाने सरावलेला तो ओटा आणि त्यावर घातलेली ती सुंदर रांगोळी नक्कीच पाहणार्याचा दिवस सुखाचा करून जाते. 
                                           सकाळच्या पारी काय अंगना तुजी घाई
                                            पारोश्या केरावर देव देईनात पाई
                                           सकाळच्या पारी अंगण झाडायाचा परिपाट 
                                            माझिया दाराहून सत्यनारायनाची वाट
       अंधार हळू हळू दूर होत जातो उजाडताना सूर्य उगवण्याच्या आधीच त्याची लाल सोनेरी रंगाच्या किरणांची उधळण संपूर्ण विश्वावर करतो. घरांच्या भिंतींवर पडणारे ते किरण त्या सुवासिनीला कशाची बरं आठवण करून देतात. आपण नाही कल्पना करू शकत. कारणही तसंच आहे, त्या गरीब बापड्या माऊलीच जीवन म्हणजे तिचं कुंकू! तिला त्या कुन्काची लालीमाच मोहिनी घालणार!
                                          उगविला नारायण माझ्या वाड्याच्या लाल भिती
                                           शिळ्या कुंकवाला गं बाई माझ्या लाली किती 
       तुम्ही कधी पाहिलंय का उगवणाऱ्या सूर्याला जी किरणं आभाळात पसरतात अगदी चित्रात जशी रेषांनी दाखवतो तशी. एखाद्या लहान बाळाच्या सोनेरी जावळासारखी!
                                           उगविला नारायण उगवातानी तान्हं बाळ
                                            शिरी गं त्याच्या सोनियाचं जावयाळं  
      सूर्य उगवण्याच्या वेळी घरातील देवपूजा आटोपून ती सुवासिनी जगाला प्रकाश देणाऱ्या राविराजाला कधी विसरत नाही. त्याला ओवाळल्या शिवाय तिचा दिवसच सुरु होत नाही. तुळशीला पाणी घालून, तिला हळदी कुंकू वाहून, ओवाळून नमस्कार करणे आणि सूर्यदेवाला नमस्कार करणे हा तिचा परिपाठच! मग तिच्या या हळदी कुंकवाच्या कार्याक्रमाशिवाय त्या सूर्यनारायणाचा तरी पाय पुढे जाईल का?
                                         उगविला नारायण वरतं जायची तुम्हा ओढ 
                                         हळदी कुंकवासाठी बाई म्या तहकूब केलं थोडं
      थोड्या वर येणाऱ्या सूर्याची किरणं आता तेजानं तळपायला लागली आहेत. हि तेजस्वी किरणं पाण्यावर पडली कि पाण्याचे थेंब हिरे भासतात, तशीच ती अंगनात काम करणाऱ्या सुवासिनीच्या चुड्यावर पडली तर तो  चुडा हिर्यांचा होईल कि नाही!
                                        उगविला नारायण किरण टाकितो झाडावरी 
                                        रतन गं बाई राधायाच्या चुड्यावारी
       अशी हि नयनरम्य सकाळ का करणार नाही दिवस सुखाचा आणि समृद्धीचा? अशी खेड्यातील प्रभात नक्कीच सुप्रभात असते!
                 

Tuesday, 17 May 2011

एका लग्नाची गोष्ट

   एका लग्नाची गोष्ट, तसं पाहिलं तर प्रत्येक तरुण-तरुणीच्या मनातील एक उत्कंठेचा, जिव्हाळ्याचा क्षण. पण प्रत्येकाच्या आयुष्यात सुखच आणेल याची ग्वाही नाही. माझ्या या कथेतही असंच दुःख एका तरुणाच्या आयुष्यात या विवाहाने निर्माण केले आहे.
    पहाटेचे तीन झाले पण नानी काही झोपू शकल्या नव्हत्या. संसाराची गाडी अर्ध्यात सोडून नानांनी काढता पाय घेतला होता. या घटनेला अजून वर्ष व्हायचं आहे. चोरपावलांनी नानाच आजारपण कधी त्यांच्या संसारात दाखल झाल ते नानीला कळल नाही.दोन मुल मोठा संजू आणि छोटा विकास, नानाच कुकुटपालन,त्याबरोबर शेती, संजू आय आय टी करून नुकताच एका खासगी कंपनीत लागलेला, विकासच बारावीच वर्ष चांगल मजेत चालाल होतं. एक दिवस दुपारची वेळ अचानक नाना हाक मारू लागले, '' सुनिता, सुनिता ..'' नानी धावत बैठकीत आल्या.
''अरे देवा, काय झालं? असा का करता?'' हा हा म्हणता नानाचा भलामोठा देह धरणीला आडवा झाला. नानीनं मोठ्याने आवाज देऊन आण्णा, काकी, तात्या सर्वांना गोळा केलं. जीपमध्ये टाकून जवळच्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी पुढची चिठी दिली. तसाच पुण्याला, एका खासगी मोठ्या हॉस्पिटलात दाखल केलं. मेंदूच्या कॅन्सरच निदान झालं. केवळ आठ दिवसात नानांनी आटोपत घेतलं...
    नाना गेल्या पासून नानीने अनेक रात्री जागून काढल्या, पण आज झोप न येण्याच कारण वेगळाच, आज संजूच लग्न! वडील गेल्यानंतर वर्षभरात लग्न उरकायला भटजींनी सांगितलं म्हणून घाईने मुलगी बघून सहा महिन्यानंतर लगेच लग्नाची तारीख धरली. नानींना सुनेच्या येण्याचा आनंद वाटत होता पण नानांच्या नसण्याच दु:ख जास्त. संजू तर सैरभैर कुटुंबाची जबाबदारी, आणि जीवनातल्या त्या सुखद क्षणाचं स्वागत. सहजीवनातील स्वप्नसुंदरीच आगमन, आणि नानांच्या नसण्याच दु:ख. कश्यात बुडाव हेच त्याला कळत नव्हत. त्याने फक्त तीनदा शीतल बघितली होती. तशी शीतल नाकीडोळी नीटस, रंगाने उजळ, उंच, दहावी शिकलेली, पाहताच पसंत पडावी अशी. दोनतीनदा पाहिलेली तिची छबी संजूचे मन उजळून टाकत होती. स्वप्न सुखद करीत होती. 
    नानीने उठून अंघोळ करून चूल पेटवली. चहाच आधन ठेवलं. बाकीचे उठून आवरू लागले. लग्न साडेबाराच असल्याने लवकर निघणे गरजेचे होते. करावल्यांच्या बांगड्यांची किणकिण, धावपळ आणि बडबड साऱ्या घरात चैतन्य पसरवत होत्या. आण्णा कडाडले, ''ताई,माई संजूच आवरा, नवरदेवाची मळी काढा. साडेसहा वाजता नवरदेवाला न्यायला गाडी येणार आहे, तुमी पण आवरून तयार असा.'' तशी आणखीन धावपळ वाढली.
बरोबर वेळेला गाडी आली, लांबचा प्रवास असल्याने लवकर निघणे जरुरी होते. पहिल्या गाडीत संजुबरोबर २-३    करवल्या, ३-४ करवले , काकी, २ आत्या आणि एक मामा बसले. बाकी वऱ्हाड  बसने येणार होते. 
   नऊच्या दरम्यान पहिली गाडी कार्यालयात पोहचली. वधुकडच्या सुवासिनी पुढे होऊन वराला ओवाळत होत्या सनईच्या चौघड्यांच्या, फटाक्यांच्या आवजात वरपक्ष्याचे स्वागत झाले. वराचे मित्रमंडळ चेष्टा मस्करी करत होते. या चैतन्याने भरलेल्या वातावरणात कार्यक्रम पुढे सरकत होता. साखरपुडा सुरु झाला. प्रथमच वधु समोर आली मोरपंखी रंगाच्या जरीची किनार असलेल्या साडीत, नेटक्या मेकअप मध्ये शीतल खूप लोभसवाणी दिसत होती. संजूला तिला पाहताच अंगावरून हजारो मोरपीस फिरल्याचा भास झाला. विधी चालू असताना त्याच सर्व लक्ष शीतलकडेच, तिच्याबरोबरच्या सुखस्वप्नात विचारांच्या झोपाळ्यावर झुलत होतं. साखरपुडा आटोपला, नवरी दिलेली साडी नेसून आली. भटजींनी पूजा केली, पाच सुवासिनी पुढे होऊन नवरीची ओटी भरली. शीतलने वाकून सर्वाना नमस्कार केला.
    हळदीच्या कार्यक्रमाला सुरवात झाली. नंतरच वर्हाड आलं होतं. पांढरा कुर्ता पायजमा  टोपी आणि कपाळाचा गंध लावलेला संजू पाहून, आजीला नानाची आठवण झाली. तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू ओघळू लागले. संजू हुबेहूब पित्यासारखाच, नानाच पुढे बसल्याचा भास होई. हिरवी काठपदराची साडी नेसलेली शीतल नजर लागावी अशी छान दिसत होती,थोडी बावरलेली अधिकच रूप खुलवत होती. मोत्याच्या मुंडावळ्या लावलेली नवरा नवरी सगळ्यांच्या नजरा वेधून घेत होती. हळद लावायला सुरवात झाली प्रत्येक सुवासिनी येऊन आधी नवरदेवाला हळदी कुंकू लाऊन नंतर डोक्यावर  गालांना हाताना पायांना हळद लाऊ लागल्या.नंतर नवरीला तश्याच प्रकारे हळद लावत. विजुदादाच्या वहिनीने संजूच्या तोंडात हळद कोंबली मग काय सगळ्या करावाल्यांचा गोंधळच चालू झाला. जे ते एकमेकांना हळद लाऊ लागले.विजुदादाच्या वहिनीला तर सर्व कर्वल्यानी मागे पळून पळून हळद लावली. या मस्तीत नवरी मात्र जास्तच बावरायला लागली. पण शीतलची मोठी बहिण तिला सावरू लागली. संजूला थोडं खटकलं, तो मेहुणीला म्हणालाही,''मस्तीची सवय नाही का? आमच्याकड सगळ्यांना चेष्टा करायची सवय आहे, तुम्ही हि सवय करून घ्या.'' मेहुनीही म्हणाली,''नाही दाजी, होईल तिलाही सवय होईल.'' तिने वेळ निभाऊन नेली पण संजूच समाधान झालं नाही. या गडबडीत हळद संपली. 
   लग्नाची वेळ जवळ आल्याने, घाईत नवरदेवाचा संपूर्ण पोशाख केला. वेळ कमी असल्याने मांडवातील अंघोळीचा कार्यक्रम रद्द केला. नवरदेव सजून घोड्यावर चढला, त्याला मनातून सारख वाटत होतं हे घडलं ते नानीला सांगाव त्याची नजर नानीला शोधात होती पण त्या कुठे दिसल्याच नाही. घोड्यावर चढल्यावर ती एक अशाही मावळली. कुणाला काही सांगावे का नाही हे त्याला सुचेना. उगाच काही अडचण नसेल तर गैरसमज व्हायचा. नवरदेव मारुतीरायाच दर्शन घेऊन आला पण त्याच्या मनातील विचारांचं वादळ काही थांबल नाही. नाना असते तर त्याच मन भरून आल... 
    सनईच्या  सुरांमध्ये वधु वर लग्न मंडपात येऊन उभी राहिली. शीतल आता खूपच सुंदर दिसत होती आणि शांतपणे गालातल्या गालात मंद हसत होती. तिचा तो स्मितहस्यातली छबी बघून संजूच्या मनातील वादळ शांत झालं. त्याच त्यालाच शरमल्यासारख झालं. मंगलअष्टकांच्या मंगलमय गजरात आणि सनईच्या मंजुळ स्वरात  विवाह पार पडला. त्यानंतर सप्तपदी होम सर्व विधी आटोपले. विवाह पार पडला. 
     नवरीच्या पाठवणीची वेळ तशी प्रत्येक लग्नातील भावपूर्ण वेळ. ज्या घरी मुलगी लहानाची मोठी होते, सर्वांची लाडकी असते, तिच्या प्रत्येक इछ्या पूर्ण करण्यासाठी जीवच रान केलं जातं अशा घराला सोडून जाताना  प्रत्येक मुलगी साश्रूपूर्ण मनाने निरोप देत घेत असते. परत परत जाऊन आई वडील भाऊ बहिण  सर्वांच्या गळ्यात पडून रडत असते. शीतलने असं काहीच केलं नाही उलट मोठ्या बहिणीला ती सामानाबद्दल विचारात होती. दु:खाचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर नव्हता. सर्वांनाच आश्चर्य वाटलं. पण बोललं कुणीच नाही...
   नवरा नवरी परतीच्या वाटेला लागली. घरी आल्यावर दोघांच ओवाळून स्वागत करण्यात आल माप ओलांडून  नवरी आत आली. आत आल्यावर कावरी बावरी बघायला लागली. कोपर्यात घुसू लागली बहिणीला बिलगु लागली. नानीला थोडं विचित्र वाटू लागलं. जश्या बायका नवरी पाहायला येऊ लागल्या आणि गर्दी वाढु लागली तशी शीतल जास्त अस्वस्थ झाली आणि वेड्यासारखे हावभाव करू लागली. नानी घाबरल्याच, ''हिला काय झालं?'' विचारातच होत्या ती भांडे फेकून देऊ लागली. संजू नानीच ओरडण ऐकून धावतच आला. तत्क्षणी त्याला झालेल्या फसवणुकीची जाणीव झाली. नानी मटकन खाली बसल्या रडू लागल्या. तोपर्यंत शीतलच्या मोठ्या बहिणीने तिला दुसर्या खोलीत नेऊन एक गोळी देऊन शांत झोपवल. तिची मोठी बहिण बाहेर येऊन माफी मागू लागली, पण संजू नानी सर्वजण स्तभ्ध होती. त्यांच्यावर परत एकदा आभाळ कोसळलं होतं..........