या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Friday 19 February 2016

शिकवण

   मुलांची निरागसता ही एक दैवी देणगी म्हणावी का ? कि या भवतालचे वातावरण मनात न रुजल्याने झालेली एक चांगली गोष्ट म्हणावी ? दोन्ही गोष्टी  एकच कि ! निर्माता देताना सारे कोरे , निर्मळ आणि स्वच्छ देतो पण ही सुखासीनतेकडे झुकलेली मानवी जमात ते फक्त घाणरडे करण्याच्याच मागे लागली आहे का असे वाटावे इतके या निसर्गनिर्मित गोष्टींना गलिच्छतेकडे नेत आहे . बरे याच्यात त्यांची हानीच आहे पण ...ज्यांना समजले ते काही करत आहेत पण तितके पुरेसे नाही नक्कीच ! कारण चारजणांनी घाण करावी आणि एकाने काढावी असे आहे हे . असे विचार माझ्या मनात उगीच कधीच घिरट्या घालीत नाहीत ; प्रत्येक वेळी काही घडते आणि विचारांची शृंखला चालू होते ..आजही तसेच काहीसे झाले .
     शनिवार तसा माझ्यासाठी थोडा सुखाचा , कारण त्या दिवशी थोडे जास्तवेळ झोपायला मिळते , मुलांची सुट्टी अशी आईसाठी चांगली असते ..पण कसले सुख सहजी थोडेच लाभते ! मुले मात्र त्या दिवशी आवर्जून लवकर उठतात , निरागसता दुसरे काय ! माझी सकाळची घाई चालू होती . गेम खेळता खेळता (कॉम्पुटरवर ) आमचा चिरंजीव मागे आला ..मी चपात्या लाटत होते , म्हणजे त्याच्याकडे बघणेही शक्य नसते ..कान मात्र मोकळे असतात .
"मम्मी एक प्रश्न विचारू ?" सत्योम . आता काही वेगळे नको विचारायला या विचाराने मी काळजीत पडले . पण तरी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पहिले .
"अगं , मला एक सांग कि , जर मी प्रेसिडेंट झालो .." माझे डोळे आपोआप विस्फारले . अरे देवा हे काय नवीन आता ..
"अगं म्हणजे गेम मध्ये गं ! " त्याने लगेच स्पष्टीकरण दिले . तो पाचवीत गेल्यापासून त्याला माझ्या चेहऱ्यावरचे भाव कळू लागले आहेत . बऱ्याच गोष्टी तो बोलायच्या आधी ओळखतो .
"बर मग .." मला आता बोलण्याशिवाय पर्याय नव्हता . काम मात्र चालू ठेवले .
" अगं , समजा मी प्रेसिडेंट म्हणून दोन गोष्टीपैकी एक निवडायची असे झाले तर मी कुठली निवडावी हे सांग."
"बर , विचार त्या दोन गोष्टी .." माझी उत्कंठा थोडी ताणली गेली .
"म्हणजे बघ , एक निर्णय असेल कि भुकेलेल्यांना अन्न धान्याची सोय करणे आणि दुसरा निर्णय असेल कि क्यान्सरग्रस्तांना उपचार मोफत देणे ." अरे बापरे , बराच गहन प्रश्न आहे . या माझ्या सत्योमने जिथे भूक काय असते हेच अनुभवले नाही तिथे याला या गोष्टीचे गांभीर्य कुठून येणार ? पण माझ्या मनात एक विचार चमकून गेला , याच्याकडूनच उत्तर काढायचे कमीत कमी मला याची संवेदनशीलता लक्षात येयील ..
"बाळा , तूच सांग बरे तुला काय वाटते काय जास्त महत्वाचे ? भूक कि उपचार ?" त्याने जरा वेळ माझ्याकडे पहिले ..थोडावेळ तो तसाच विचार करीत राहिला , आता मला खात्री वाटू लागली  कि हा क्यान्सरला महत्व देणार ..
"मम्मी , मला वाटते आजाराने मरणाऱ्यापेक्षा भुकेने मरणे जास्त वाईट ! मग मी आधी भूक नाहीशी करेल .." माझे डोळे आता पाणावले होते . माझ्या मनासारखे उत्तर दिले म्हणून नाही तर त्याच्या आत दयेसोबत सद्सद्विवेक वाढीला लागलाय हे पाहून ..खरंच मी हे कधी त्याला शिकवले नाहीच , पण मग ही त्याची दृष्टी भोवताल पाहून निर्माण होतेय याबद्दल समाधान वाटले . मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवावा म्हणून हात पुढे केला , त्याच्या डोक्याला पांढरे पीठ लागेल म्हणून त्याने पटकन बाजूला सारला ; आणि खट्याळ हसून तो पळून गेला ..आताही त्याने माझ्या डोळ्यातील आनंद पहिला होता आणि ओळखलाही होता .
    मी मात्र विचारात गढून गेले . या निरागस मनावर संस्कार कसे करायचे हा प्रश्न मला नेहमी छळत राही , त्याबरोबर दुसरा प्रश्न मी याला चांगले संस्कार देऊ शकेल का ? मी त्याला समजवावे म्हणजे तो हे समजेल ? कुणाचे मार्गदर्शन घ्यावे ? कुठली पुस्तके वाचावी त्यासाठी ? अशा अनेक गोष्टी माझ्या मनात नेहमी येत . पण त्याच्या वडिलांना म्हटले तर म्हणत आपण करीत राहायचे ..आपल्याला कुणी कसे वागावे हे शिकवले का ? आपण शिकत गेलोच न ? मग कशाला असा विचार करते ..अहो पण ...आपल्याला कुठे इतकी समज होती या वयात , आणि किती चंचलता आहे त्याच्यात सहा महिन्याचा असल्यापासून ! किती प्रचंड उर्जा आहे त्याच्यात , ती जर चुकीच्या मार्गाकडे वळली तर ? ते हसत आणि निघून जात ..त्यांनी कसली खात्री होती मुलांबद्दल मला उमजत नव्हते ..गेम खेळायला मिळाली नाही तर सर्वांवर चिडणारा , धिंगाणा करणारा सत्योमच मला दिसत राही ..कधी कधी तो दादावर धावून पण जातो , मग मला जास्तच काळजी वाटते . पण आजचे हे शहाणपणा आणि विवेकबुद्धीने दिलेले उत्तर ऐकले आणि मन आनंदून गेले . एक थंड शिडकावा अंगभर पसरून गेला .
"मम्मी , अगं बाहेर बघ तुझे पक्षी कसे ओरडत आहेत .." तो बाहेर खेळून आत आला होता .
"अरे हो रे , मी विसरले आज त्यांना पाणी आणि चारा ठेवायला ..ठेवते बघ ."
"तू विसरली गं , पण त्यांचे पोट थोडेच विसरेल .." आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला . दोघांनी घाईने भांडे धुतले आणि त्यात पाणी टाकून थोड्या शिळ्या चपात्या चुरगळून शेजारी ठेवल्या ...लगेच चिमण्या , कावळे आणि नेहमी येतात ते एकदोन वेगळे पक्षी तिथे पाण्याभोवती आणि अन्नाभोवती जमा झाले !
                           डॉ संध्या राम शेलार .

Sunday 14 February 2016

माणूस असणं

“राधे , ए राधे ....कुठे मेलीस गं  रांडे ...तुझं मढ बसवलं ..तुझी आय येणार का बाप गं ? कोण ह्यो शेणकुर करणार ..श्याण पार xxx आलं न ढोरांच्या ..”  आक्काबाईने सुनेच्या अंगावरचं घोंगड फेकून दिलं . ग्यानबा आणि राधा बावचळून उठली खरी पण कपड्यांची आवराआवर करताना दोघांची चांगलीच बेंबळ झाली . आक्काबाईला एकच पोरगा , ग्यानबा ..चार महिन्यापूर्वी त्याचं लग्न झालेलं , शेजारच्याच जामगावच्या राधेसोबत . आक्काबाईला ग्यानबा झाला आणि तिचा नवरा कुठे गेला कुणालाच तपास नाही वीस वर्ष तिने लोकांची मजुरी करून पैशाला पैसा जोडला , दोन खोल्यांचं घर बांधून घेतलं , पत्र्याचंच घर पण नेटकं ! गावातून शिंदे वस्तीकडे जाताना कच्च्या रस्ताच्या वरच्या अंगाला ..पूर्वेकडे घराचं दार , दारात तीन चार ढोरं होती , दुभती गाय एकच आणि ती पण गावरान , मग काय दूध घरचं टाकून डेरीला घालणे शक्यच नव्हते , एक लिटर दुधातून डेरीला काय देणार ? जसा ग्यानबा कळीत झाला तसा त्याने शाळा सोडून ढोरांच्या मागे हिंडणे चालू झाले . आक्काबाईला पण त्याच्या न शिकण्यावर आक्षेप नव्हताच , उलटपक्षी तो लवकर हाताखाली आला यातच तिला आनंद होता . घराच्या चार ढोरांच्या जोडीला आणखी काही ढोरांच्या राखोळ्या तिने मिळवल्या , त्यांचे महिन्याचे पैसे ती घेऊ लागली आणि अशा प्रकारे ग्यानबाचे ज्ञान सोडून कष्ट करणे चालू झाले . पैशाने पैसा जोडत आक्काबाईनेही काही उभेच केले , आणि तेही तिच्या लाडक्या ग्यानबासाठी ! झोपडीचे घर झाले ..एक दुचाकी दारात आली ..वर्षानुवर्षे पाण्याआभावी पडीक असलेली जमीन बागायती व्हावी म्हणून आक्काबाईने एक विहीरही खणून घेतली पण तीही पावसातच ओली राही ..मग चार पाच महिन्याच्या पाण्यावर जेव्हडी तरकारी होई तेव्हडीच ती ग्यानबाला हाताशी घेऊन करे , या तिच्या कष्टांवर आज ती गरिबांच्या यादीतून मध्यमवर्गीय गटात आली होती . तिच्या या धोरणी आणि कष्टाळू वृत्तीचे सर्व गावाला कौतुक होतेच पण तिच्या भांडकुदळ आणि कडक स्वभावाची झळ न लागलेला गावकरी सापडणे थोडे अशक्यप्राय होते .
“आगं आई ...अशी गं काय करती ..तिला बरं नाही म्हणून झोपली ती ..रातभर तापानी फणफणत होती ..आता कुठं डोळा लागला व्हता बघ ..” ग्यानबाच्या या बोलण्यात आईच्या अशा वागण्याबद्दलची नाराजी स्पष्ट दिसत होती ..
“आहाहा ..मोठा आला बायकुचा पुळका करणारा ..आई कधी आजारी म्हणून नाय दिसली रं तुला ..आन मेल्या तिला रांडला ताप व्हता मंग मुडद्या तुला उठाया काय रोग आलाता व्हय ..बसतो आपला बायकुच्या उबला दिवस वर आला तरी ..” आक्काबाईचं डोकं जास्तच भडकलं आणि नाही ते ती बोलून गेली ..बोलल्यावर जीभ दाबून उपयोग नव्हता , जर तिने माघार घेतली तर अशीच सून डोक्यावर वरवंटा फिरवणार या भीतीने तिला अनेक दिवस ग्रासले होतेच त्यात आज हा असा उलटून बोलतो , नक्की राधाच हे शिकवते त्याला , याची खात्री झाली आक्काबाईला ..तशीच तडतडत ती तिथून निघून गेली ..जातानाही तिने सुनेच्या आईबापाचा उद्धार करणे सोडले नव्हतेच ..
  दोन तीन दिवस असेच धुसफुसत गेले आणि एके दिवशी सकाळीच आक्काबाईची धाकटी पुण्याची बहिण आली . येताच तिने आक्काबाईला मिठी मारली आणि दोघी बहिणी हमसून रडू लागल्या . ग्यानबा आणि राधेला याचा काहीच उलगडा होत नव्हता ..घाईने ती पाणी घेऊन आली ..आणि त्या मावससासूच्या पुढे तिने तांब्या धरला . विमलबाईने तो घेतला , खाकरून खोकरून तिने गुळणा केला आणि तोंडावरून पाण्याचा हात फिरवून तिने नाक तोंड वाकडे करत राधेच्या हाती ठेवला . तिचे असे बघणे पाहून राधा पटकन घरात शिरली आणि चहापाण्याला लागली , स्वयपाक करणेही चालूच होते . ग्यानबाला मात्र पुण्याची विमलमावशी पाहून भलताच आनंद झाला आणि तो नेहमीप्रमाणे तिच्या पिशव्या उचकू लागला .
“आक्का तुझं प्वार एव्हडा वाढला पण एरंडच बघ ..लगीन झालं तरी त्याची पहिली खोड काय गेली नाय ..” हसून कौतुकाने भेळीचा पुडा त्याच्या हातात ठेवत मावशी त्याला जवळ घेऊन गालगुच्च धरू लागली . ग्यानबाने चलाखीने तिच्या हातात्तून सुटका केली स्वतःची आणि तसाच पळत आत गेला . एका परातीत भेळ सोडली आणि त्याने ओट्यावर बसून आक्का मावशीच्या पुढे खायला चालू केले . इतक्यात राधा चहा घेऊन आली आणि लग्नात आलेले ते नवे कप चहाने भरून त्या तिघांपुढे मांडले . आक्काबाई डोळे वटारून राधेकडे पाहत काही खुणावू लागली . राधेने ते लगेच ओळखले आणि गडबडीने मावशी आणि आक्काच्या पाया पडली ..
“राहू दे बघ पोरी , तू पाया नाय पडली तर माझं पाय नाय सुजायचं बघ ..इतकीच नेमाची होती तर आल्या आल्या कळू नाय व्हय ..” तिच्या डोक्यावर आशिर्वादाऐवजी अशी मुक्ताफळे उधळत हात मात्र ठेवला . राधेने ग्यानबाकडे पाहिले आणि तशीच आत गेली . आनंदाने फुललेला ग्यानबाच चेहरा असा पडलेला पाहून दोघी बहिणींच्या पोटात कालवले ..
“ग्याना , लेकरा आमी का वैरी हाव तुझे , पर या नव्या पोरींच्या सांगण्यानी कितीतरी संसार वाया जात्यात बघ ..आन तुझ्या आईला जर का तिनी नाय पाह्यलं  , तर कोण हाय तिचं ? तूच सांग बाबा ..म्हणून अशी परक्याची पोर लेकरं होऊनश्यान आपली होऊसतर आपणच दापया हवी बघ . आन आमचं काय सुदिक म्हणणं नाय , तू तुझा जीव लाव पर आक्का दापती तिला तर आक्काचा तेव्हडा वचक राहू दे पोरा नायतर वावडी होऊन कधी संसार तुझ्या भोळ्या माणसाचा उडून जाईल ते बी उमगणार नाही बघ ..” त्याच्या जवळ बसत विमलमावशीने डायरेक्ट मुद्याला हात घातला . कारण आक्काबाईने तिला फक्त ग्यानबाला समजून सांगायला निरोप देवून बोलावली होती . आणि तीही तिचे काम करण्यात बरीच यशस्वी झाली होती . भावनिक साद घालून दोघी बहिणींनी ग्यानबाला चांगलेच गोल केले , तशा त्या वाईट नव्हत्याच , दोघीही प्रेमळ होत्या , त्यांचे जीव लावणेच आजवर ग्यानबाने अनुभवले होते म्हणून आईचे  त्या दिवशीचे  वागणे पाहून तोही बराच बावरला होता . आणि आज या दोघी बहिणी समाज्याचे अनुभव सांगून त्याला शहाणे करीत होत्या (की कान फुंकत होत्या ?) त्यांच्या वांझ भीतीपायी ! राधेचा कानोसा घेत दोघींनी त्याची समजूत (?) काढली आणि दोघी बहिणी निश्चिंत होऊन हसल्या . त्यांचे हसणे पाहून ग्यानबाला काहीतरी खुपले पण त्याच्या आईची बऱ्याच दिवसानंतर अशी हसरी मुद्रा पाहून तोही सुखावला .
   त्या दिवशी आपले कार्य समाप्त करून विमलमावशी गेली खरी पण ग्यानबा मात्र राधेपासून जरा फटकून वागू लागला ..आईच्या समोर तरी ..आक्काबाईला पण आपली ही मोहीम यशस्वी झाल्याचा परिपूर्ण आनंद देत राहिला ..नवऱ्याचे वागणे बघून राधा जरा धास्तावली होती ..
“आक्काबाई ...” मोठी आरोळी देत रखमाबाई ओट्यावर बसती झाली . हातातली परडी खाली ठेवत पुन्हा एकदा तिने आरोळी दिली , “अंबाबाईचा जोगवा ssss” राधा आवाज ऐकून धावतच बाहेर आली आणि परडीवाली , गळ्यात कवड्यांच्या माळा घातलेली बाई बघून ती धावतच आत जावून दोन्ही हातात मावेल इतके पीठ घेऊन आली . तिने परडीच्या लहान टोपलीत पीठ घातले आणि त्या बाईला वाकून नमस्कार करती झाली ..आक्काबाईच्या सुनेच्या या शहाणपणाने ती बाई बरीच सुखावली ...
“वर्सात कृष्ण बागडू दे अंगणात ..” म्हणून तोंडभरून आशीर्वाद दिला . इतक्यात आक्काबाईपण धावतच आली शेजारच्या घरून , ग्यानबा कधीच ढोरांच्या मागे गेला होता .
“गुरुमाउली .......”म्हणून आक्काबाईने लगोलग पाय धरले रखमाबाईचे ..आक्काबाईच्या डोईवर हात ठेऊन काही आशिर्वादाचे शब्द पुटपुटत गुरुमाउलीने डोळे मिटून घेतले ..
“गुरुमाई , एक सांगणं होतं ..” घाबरत , रखमाबाईच्या ध्यानस्त मुद्रेकडे पाहून लाचार शब्दात आक्काबाईने प्रश्न केला . रखमाबाईने हळूच पापण्या उघडल्या आणि नजरेनेच काय असा प्रतिप्रश्न केला .
“माई . सहा महिने झालं ..सूनचा महिना एळेला हजर होतुय , आता तिच्यासंगच्या पोरी पोटुशी हायेत ..” रखमाबाईने मान हलवली आणि हवेत बोटे फिरवली ..थोडा वेळ तशीच बसून राहिली .
“हुं ..हुं ...” असा आवाज करीत रखमाबाई घुमू लागली आणि आणि आक्काबाई अशी बावरली की तिला काही सुचेना आधी ..घुमण्याचा आवाज वाढू लागला .आता घुमणारी रखमाबाई हात एकमेकांत घट्ट करून जागेवरच डुलू लागली . जोराने मानेला झटके देवू लागली . तोवर पळत जाऊन आक्काबाई पंचपाळ घेऊन कुंकू रखमाबाईच्या कपाळाला लावण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत राहिली ..शेवटी तिने ते लावलेच , जवळच्या परडीला हळद कुंकू वाहून तिने आणि राधेने मनोभावे परडी आणि रखमाबाईला नमस्कार केला ..त्या डोके वर करताच थोडी शांत झालेली रखमा पुन्हा जोराने घुमू लागली . हात खाली वर करीत राहिली , परंतु तिने एकमेकांत घट्ट रुतवलेली बोटे मात्र सोडली नाहीतच पण ती जास्त घट्ट करीत गेली .. मानेला झटका देऊन रखमाने केसांचा अंबाडा कधीच मोकळा केला होता . पुढे मागे उडणारे ते केस , तो घुमण्याचा आवाज , गुढग्यावर येवून पुन्हा खाली पडणे , कपाळाला पसरून लागलेले ते कपाळभर कुंकू याने साधारण पन्नाशीची , म्हातारपणाकडे झुकलेली ही काळीसावळी रखमा अधिकच भयंकर दिसू लागली . भेदरलेली राधा मागे सरू लागली तसे आक्काबाईने तिला पुढे ओढून घेतले आणि पाया पडायला खुणावले ..बिचारी राधा , सासूचे मोठे डोळे आणि रखमाचा हा अवतार पाहून ती पुरतीच घाबरली . तरी ती रखमाच्या पायाशी झुकली ..रखमा आता अधिकच घुमत राहिली ..हा सारा प्रकार पाहून आजूबाजूच्या बायका गोळा झाल्या आणि त्याही रखमाचे पाय धरू लागल्या , कुणी कुंकू लावू लागल्या .
“गुरुआई ...माझ्या घरचा वंश कधी वाढल ..” शेवटी आक्काबाईने धाडस करून विचारले ...
“हुं ...हुं ...हुं ...आक्के ...हुं ..हुं ..तुझी सून ...हुं हुं हुं ...मावलाया वलंडून गेली हाय ..हुं हुं हुं ...त्यांचा कोप हाय ..हुं हुं हुं ..तिच्या माहेरच्या ...हुं हुं हुं ..मावलाया लई कडक हायेत ..हुं हुं हुं ..तिथं गावाच्या वरच्या बाजूच्या वढ्यात हायेत ...हुं हुं हुं हुं ..तिला इचार गिल्ती का तिकडं ..हुं हुं हुं हुं  ..” आक्काबाईने सुनेकडे पाहिले , राधेने मान हलवली ..आणि आक्का पुन्हा रखमाच्या पायावर पडली ..
“गुरुआई ,  चूक झाली तिच्याकडनं ..माफी करा ..लेकरू हाय ..अल्लड हाय चुकायचं ..तुम्ही आय हाय सरव्यांची ..उपाय सांगा ..पर नाडू नगा माझ्या पोरीला ..” आणि आक्का पटापट रखमाचे पाय धरू लागली ..राधा मात्र पुरती गोंधळली होती , तिची ही कडक सासू क्षणात मऊ लोण्याचा गोळा झाली होती . तिच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव दाटले आणि अनिमिष नेत्रांनी ती पुढचे नाट्य पाहू लागली ..तिने अनेकदा अशा घुमणाऱ्या बायका मरीबाईच्या पुढं पहिल्या होत्या पण अशी बोलणारी जोगवेकरीन ती प्रथम पहात होती .
“हुं हुं हुं ......” करीत रखमा जास्तच घुमू लागली आणि आक्का जास्तच भेदरली ..पुन्हा आक्काने रखमाचे पाय घट्ट धरले आणि तिला विनवणी करू लागली . आपल्या कडक सासूला असे नम्र होताना पाहून राधा मात्र मनातून आनंदित झाली होती ..
“हुं हुं हुं ...आक्के ...हुं हुं हुं ...मावलायांच्या सवास्नी घाल ..हुं हुं हुं ...तेबी तिथं जावून ...हुं हुं हुं हुं ...ह्या महिन्यात करशील तर पुढच्या महिन्याला सून बाहेर बसायची नाही ...हुं हुं ....” एक लिंबू हातात देत आक्का तिच्या पटापट पाया पडत राहली ..आणि बोटांनी गुंतलेल्या हातात लिंबू फोडून रखमा हळू हळू शांत होत गेली ...जसे सारे संपले तशा बायका पांगल्या आणि अवघडलेली रखमा स्वतःला आवरून पुन्हा पुढच्या घरी गेली ...आरोळी देत ..
“अंबाबाईचा जोगवा ..” आक्का आणि राधा मात्र एकमेकींकडे पाहत राहिल्या ..
   सारे सोपस्कार करून दोघी सासूसुना आल्या ..राधा आनंदात होती कारण तीन चार महिन्यातून ती माहेरी गेली होती . आक्का मात्र महिना पालटण्याची वाट बघू लागली . राधा तिच्या वेळेला पुन्हा बाहेर बसली ..आणि आक्काने डोक्याला हात लावला ..वर्ष झाले ग्यानबाच्या लग्नाला परंतु राधेच्या महिन्याची तारीख मात्र बदलत नव्हती ..प्रत्येक वेळी ती बाहेर बसली की आक्काबाई कपाळ झोडू लागली ..हळूहळू ती राधेवर चिडून जाऊ लागली . ग्यानबा नाही पाहून ती तिला मारूही लागली . ग्यानबा आता सोबत्यांची लेकरे घेऊन उबगला होता , त्याला स्वतःचे लेकरू हवे होते ! तो आता राधेपासून दुरावत गेला ..आणि त्यांच्यातला हा दुरावा वाढल्याने ..राधाही सुकून गेली . महिना काही चुकत नव्हता आणि तिचा महिना आला की कुणी मेल्यासारखी दोघांची तोंडे पाहून राधा कोमेजू लागली . सासूचा जाच होताच आता नवऱ्याचा वाढू लागला ..रखमा येत होती , जोगवा मागत होती पण आक्का गुरुमाई ला दोष न देता राधेलाच त्रास देत होती ..नवेनवे सारे उपाय करून झाले ..राधाने या जाचाने अन्नपाणी कमी केले तशी आल्या वेळी टचटचलेली राधा अधिकच कमजोर झाली आणि सारखी आजारी पडू लागली .. मुलाची आशा सोडाच पण राधीचा दवाखानाच या माय लेकरांच्या नाकी नऊ आणू लागला . आक्काबाई दिवसरात्र स्वतःच्या आणि ग्यानबाच्या प्रारब्धाला कोसत होती . आला दिवस जात होता . आताशा राधीच्या आई बापाचे येणे पण कमी झाले . हळूहळू राधा औषधाशिवाय अंथरुणात तळमळू लागली , आक्काबाई काय तिला दवाखाना दाखवत नव्हतीच ...राधेची शरीरयष्टी अधिकच खालावली . एक दिवस स्वयपाकाच्या जागी चालेल्या मायलेकरांच्या गोष्टी राधेने ऐकल्या आणि त्याच जागी ती बसली . तिचे भविष्यच अंधारात घिरट्या मारू लागले आणि अशक्त राधी कधी त्याच जागी बेशुद्ध झाली हे कुणालाच कळले नाही .
“अंबाबाईचा जोगवा ....” एक हाक तिच्या कानी पडली आणि ती उठून बसली , म्हणजे कालपासून ती त्याच जागी पडली होती ! तिने तोंडाला पाणी लावले आणि बाहेर आली अजूनही रखमा आणि तिची सासू एकमेकींच्या कानाला लागून काही बोलत होत्या . तिने स्वतःचे आवरून अंघोळ केली , बाहेर आली तरी दोघी काही बोलत होत्या . अंघोळ करून ती परडीच्या पाया पडली , \रखमा आणि आक्काबाईच्या पण ...दोघींनी तिच्याकडे लक्ष दिलेच नाही ..काही मनात ठेवून ती निश्चयी मुद्रेने आत मात्र गेली . तिच्या उजळलेल्या चेहऱ्याचे आकलन मात्र कुणालाच झाले नाही आणि तिची ती शांत मुद्रा पाहून दोघीही बावरल्या ...
    त्यानंतर तीन चार दिवस राधा बरीच उत्साही दिसत होती . तिच्यातील या बदलाने मायलेकरांच्या कपाळाला आठ्या पडत होत्या ..त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या मनसुब्यांवर पाणी तर पडणार नाही ही काळजी दोघांना सतावत होती . आता राधा रोज स्वयपाक , घरकाम करू लागली . त्यांच्या टोमण्यांना न जुमानता खाऊ लागली . तशी दोघा मायलेकरांची घालमेल वाढू लागली ..
“राधे ..इकड यी ...” ग्यानबाने जोरात हाक मारली . राधा त्याला जेवायला वाढून नुकतीच बाहेर कपडे वाळायला घालत होती .तिलाही भूक लागली होती म्हणून घाईने आवरत होती . तेवढ्यात ग्यानबाची हाक ऐकून ती आत पळत आली ..तिला पाहताच तिच्या नवऱ्याने भांडे कोपऱ्यात भिरकावले ..आणि कडाडला .
“रांडीचे , तुला मीठ किती टाकायचं हे बी कळत नाही का ?” आणि तो पुढे होऊन खरकट्या हाताने तिला बडवू लागला . ती तशीच बाहेर धावली , सासूला येताना पाहून त्याच जागी ओट्यावर बसली , नवरा चुलीचं लाकूड पाठीत घालणार तोच तिने रखमाबाई सारखी बोटे एकमेकांत गुंतवली आणि गुढग्यावर येऊन घुमू लागली ...
“हुं हुं हुं ......” आक्काबाई धावतच ओट्यावर आली आणि घरातून पंचपाळ घेऊन आली . तिला कुंकाचा मळवट भरू लागली ..पण हलणारी राधा तिला आवरत नव्हती . थोडी शांत होत राधेने कुंकू लावून घेतले . आणि पुन्हा जोराने घुमू लागली . इतक्यात साऱ्या शेजारणी धावतच आल्या . ग्यानबा रखमाबाईला बोलवून आणायला गाडीवर गेला . पाचच मिनिटात रखमा तिथे परडी घेऊन हजार झाली ..आणि राधेच्या अंगातील देव पाहून गालात हसली ...
“ देवा ...काय चुकलं माकलं सांगा ..” रखमा राधेच्या पायावर झुकली . राधा आता जास्तच जोराने घुमत होती सारे केस फिसकटून तिच्या चेहऱ्यावर आले होते .
“देवा माफी करा ..चुकी सांगा ..” रखमा आणि आक्का दोघी तिला विनवत होत्या ...
“हुं हुं हुं ....रखमे ...हुं हुं हुं ..”
“जी देवा ..”
“हुं हुं हुं तुला कसली विद्या दिली म्या आन त्वा गं द्वाडानी काय केलं ..”
“सांगा देवा ..चूक आसल तर माफी करा ..”
“हुं हुं हुं ..तुला देव कळना ..हुं हुं ..त्याची परडी आणल्यापरीस ती नीट व्हत नाय ..तुला कळाया नको ..हुं हुं हुं”
“चुकलं आई ..उपाय सांगा ..”
“हुं हुं हुं ..राधीची परडी आणा ..हुं हुं हुं ..”
“आई , तुमी सांगा ते करू ..”आक्काबाई पुढे होऊन म्हणाली . राधीच्या अंगात जास्तच जोर आला ..
“हुं हुं हुं ..आक्के ...”
“आई सांगा , चुकी माफ करा ..” आक्काबाई विनवणी करू लागली . ग्यानबा एका बाजूला बसून सारे विस्फारित डोळ्यांनी पाहत होता .
“हुं हुं हुं ..राधीचा देव केल्याशिवा तिला प्वार व्हणार नाय ..हुं हुं हुं ..”
“तुमी सांगला त्या करीन आई ..”
“हुं हुं हुं ...परडी आण आधी , देवधर्म कर ..हुं हुं हुं...” आक्काबाई हात जोडून राधेच्या पुढे बसली होती .
“हुं हुं हुं ..तिलाबी प्वार होईन ..हुं हुं हुं पर दम धरा ...हुं हुं हुं ..”
“जी आई ...”
“आधी देव करा ...हुं हुं हुं ..” राधेने जोराचा आवाज केला आणि ती पुन्हा जोराने घुमू लागली .आता मात्र रखमा पुढे आली , तिने राधाच्या हाती लिंबू दिले , राधेने ते एका दाबत चुरा करून टाकले ..आणि हळूहळू शांत होत गेली ...ती तशीच खाली कोसळली . आक्काबाई , रखमाबाई पुढे झाल्या आणि तिच्या केसांना आवरू लागल्या ...झोपेचे सोंग घेतलेली राधा मात्र मनात हसत होती , आणि रखमा पण !
      डॉ संध्या राम शेलार .

ही कथा लिहिताना एक कविता मनात घर करून होती .
  माणूस असणं
तू मला दगड म्हणालास
परी मी दुभंगले नाही
मग मी छिन्नी हातोडा झाले
आणि सोलत बसले स्वतःला
रंग , रूप , आकार येईपर्यंत
आता तू मला देवी म्हणतोस
आणि रोज फुलं वाहतोस
माझं माणूस असणं
कधी मान्यच नाही का तुला ?
  - किरण केंद्रे .
किती सार्थ शब्द आहेत ..आजही ग्रामीण भागात असलेल्या शोषित स्रीला असाच देवाचा आधार घेऊन जगावे लागते आहे . आणि जेंव्हा अशी असहाय स्री असे कर्मकांडाचे मार्ग निवडते तेंव्हा मला तिचा आदर वाटतो ..कारण निराधार अशी ती अबला देव जरी तारून नेत नसला तरी त्याचे नाव मात्र तिला तारून नेते ..ग्रामीण जीवनातील ही अंधश्रद्धा संपवायची असेल तर आधी स्री शिक्षण झाले पाहिजे आणि स्रीशोषण थांबले पाहिजे !

            -डॉ संध्या राम शेलार .

Wednesday 10 February 2016

जोहार -सुशील धसकटे यांची एक वास्तवदर्शी कादंबरी

‘जोहार’ एक असा शब्द जो काळाच्या ढिगाखाली गाडला गेला . साठ हजार वर्षांची ओळख सांगणारा हा शब्द !  अर्थ साधा , ‘ नमस्कार’ इतकाच पण त्याला वापरताना ‘मायबाप’ जोडले संत चोखोबा यांनी ..आणि त्याची ओळख दीनवाणी गरीबाची हाक झाली .. मी पुस्तक वाचायला घेतले , अजून सुरवात करीतच होते , ओपीडी जसा वेळ मिळेल तशी वाचत असते मी , मग पुस्तक टेबलवरच असते , अनेक जणांनी तो शब्द वाचला आणि प्रतिक्रिया दिली ..काय डॉ काय वाचताय , आता कुठे उकरून काढता ..आता कुणी दीनवाणे नाही आणि नम्र सुद्धा नाही ! उकरून काढता ? हे मनात घोळत राहिले , आणि जशी वाचत गेले तशी उकरून काढलेली ही मुळे मला दिसू लागली .
 तिसऱ्या प्रकरणातील शेवटचे मल्हारेया सीक्षापण वाचले आणि साऱ्या गोष्टींची उकल झाली . मल्हारच्या मनातील खळबळ , मुळांना सोडून उंच वाढणाऱ्या समाजाने उडवलेली त्याच्या प्रश्नातून व्यक्त होते आणि सर्वज्ञ गोसावी (श्री चक्रधर स्वामी ) यांनी  केलेलं त्याचे विश्लेषण अत्यंत मर्मभेदी वाटले मला ..कारण तिथेच त्या कादंबरीची उंची लक्षात आली आणि तिला मुळांना घट्ट करणारी ही सामाजिक कादंबरी मनात अनेक तरंग निर्माण करून गेली . ते सर्वाज्ञांनी  केलेलं विवेचन मुद्दाम इथे द्यावे वाटते ..
सर्वज्ञ  म्हणतात , “ बुड नाइ : त्याले आधारू कायसेनि ? : शेंडा उंच भासे : वरवर : अल्पायुषी : तकलादू : जादा टिकत ना : बुड म्हणजे मूळ : नाळ : तेणे जितुके खोलखोल खोल : तितुकी समृद्धीची ओल चिरंतन : सत्वयुक्त : टिकावू : म्हणून बुडाची जाणीव होआवी की :”
 आजच्या भरकटलेल्या समाजव्यवस्थेचे परिपूर्ण चित्रण विश्लेषणासह लेखकाने कादंबरीत केले आहे , आणि तेही ग्रामीण , समजणाऱ्या बोली भाषेत ..म्हणून माझ्यासारख्या शहरी , ग्रामीण भागाचा अनुभव घेणार्याला तर ती जास्त भिडते . वास्तववादी चित्रण करताना लेखकाने कुठलीही अतिशोयोक्ती तर केली नाहीच पण जिथे ते सत्य नागडे करू शकतील तिथे न बुजता त्यांनी केले आहे ..म्हणूनही ही कादंबरी वास्तव शब्दांकित करते . आजच्या समाजातील अराजकता ही समाजाने मुळांची जोपासना न करता फक्त आभाळाला आपले केल्यामुळे आहे . आणि इथेच माणसाने त्याच्या आणि सर्व सृष्टीच्या विनाशाची बीजे पेरली आहेत .
    माझ्या वरील सांगण्यावरून असे वाटेल की लेखकाचे विचार प्रतिगामी तर नाहीत ? पण सांगतांना अत्यंत आनंद वाटतोय की प्रतिगामी आणि पुरोगामी दोन्ही मधील चांगल्याची सांगड घालूनच चिरंतन समृद्ध संस्कृती निर्माण होऊ शकते आणि त्यासाठी मानवतावादी दृष्टीकोन ठेवणे जास्त उचित असेल . आजच्या समाजच्या चंगळवादी भूमिकेवर टीकास्र सोडतानाच ते समाजातील जास्त आणि कमीचा फटका या समाजव्यवस्थेला कसा बसत आहे हेही सांगतात . इतके सांगतांना कुठेही कादंबरी रटाळवाणी होत नाही . फक्त शिकवण न राहता ती कादंबरी आहे , ही जाणीव प्रत्येक ठिकाणी येते .
  शहरी आणि ग्रामीण भागातील विरोधाभास रेखाटताना कुठेही त्यात अतिरंजन तर जाणवत नाहीच , पण वास्तव जास्त जवळ जावून पाहत आहोत असेच वाटते . दिशाहीन समाजाचे चित्रण करताना राजकारण , शिक्षणक्षेत्र ,साहित्य, कृषिक्षेत्र आणि समाजतील बीभत्स रूप प्रत्येक ठिकाणी चित्रित होते . या कादंबरीत ग्रामीण भागातील , मल्हार या विध्यार्थ्याचे एम ए  ते एम फील पर्यंतचे वर्णन आहे . त्याचे मित्र आणि तो यांच्यातील संभाषण जेंव्हा समाजातील अंदाधुंद दाखवते त्याच वेळी त्या मुलांची त्याला विरोध करून पुढे जाण्याची मानसिकता जास्त कौतुकास्पद आहे ..समाजातील विषमतेने , सामाजिक प्रश्नांनी , जातिभेदाच्या स्तोमाने विचलित झालेली ही तरुण मने मांडताना कुठेही एकसुरीपणा नाहीच पण त्यांच्या मनातील गोंधळ ,आणि शंका लेखकाने बारकाव्याने मांडल्या आहेत .
 ग्रामीण महाराष्ट्रातील पाणीटंचाई , गरिबी , नैतिक मूल्यांना दिली जाणारी मूठमाती , राजकारणासाठी होणारी समाजाची दिशाहीन फरफट , स्रीयांच्या पिळवणूकी बरोबर स्री स्वातंत्र्याच्या नावाखाली  होणारी कुटुंबाची होरपळ सांगताना कुठेही एकांगीपण जाणवत नाही . अशी ही समाजाचे सर्व बाजूंनी विवेचन करणारे लेखन आहे आणि हे वास्तववादी लेखन म्हणूनच मनाला अस्वस्थ करून तर जातेच पण विचार करायलाही भाग पाडते . आणि हेच या कादंबरीचे यश आहे . लेखकाची मुळांना न सोडता होणाऱ्या सामाजिक परिवर्तनाची आस प्रत्येक ठिकाणी लक्ष वेधून घेते ..कारण सर्वज्ञ गोसाव्याच्या सांगण्यानुसार समृद्धी असलेला समाज उंच गेला तरी मुळे किती खोलवर रुजली आहेत यावरच त्याचे चिरंतन अस्तित्व टिकणार आहे !
    भुषण राक्षे यांनी , ‘महानुभाव - वारकरी , महात्मा फुले - शाहू - शिंदे - सयाजीराव - गांधी - साने गुरुजी - आंबेडकर - लोहिया - शरद पाटील - नेमाडे या विचार परंपरेचे बोट घट्ट पकडून , त्यांना स्वतः च्या जाणीव - नेणिवेत मुरवत मल्हारने भवतालच्या अशाश्वत - आभासी वास्तवात मिसफीट होऊनही सकारात्मक तेने केलेल्या स्वतंत्र प्रवासाची ही हकीकत प्रत्येकालाच अस्वस्थ करणारी व प्रत्येकासमोर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे …’  या सार्थ शब्दात सांगितले आहे या कादंबरीबद्दल !
         डॉ संध्या राम शेलार .

Thursday 4 February 2016

‘ मॅगझिनीमधून सुटतेय गोळी ’ बालिका ज्ञानदेव .

‘ मॅगझिनीमधून सुटतेय गोळी ’ बालिका ज्ञानदेव यांचा कवितासंग्रह आज वाचण्यात आला .  एकदा पुस्तक हाती घेतले आणि बालिकाजींच्या स्वतःबद्दलच्या पहिल्याच लेखात आपल्याला त्या जिंकून घेतात आणि उत्तम कांबळे यांच्या अभिप्रायाने तर कधी एकदा कवितेची पाने उघडते असे होऊन जाते . आणि वाचताना वाटतेही की डोंगर पोखरून उंदीर तर निघणार नाही ! पण जशी जशी वाचत गेले तशी ती मुक्तछंदातील साध्या , ओळखीच्या आणि रोजच्या वापरातील शब्दांनी गुंफलेली कविता काळजाचा ठाव घेते . प्रत्येक कविता त्यांनी भोगलेल्या वेदनेचा हुंकार तर वाटतेच पण पण जगलेलं आयुष्य इतक्या प्रामाणिकपणे मांडणारी ही पोलीस कवयित्री मनात जागा करून जाते , एक माणूस म्हणून !
   उत्तम कांबळे यांनी त्यांच्या विश्लेषणात कविता खूपच छान अशी समजावली आहे . अवघड शब्दांचे जंजाळ नसणारी ही कविता सर्वसामान्य माणसाला जवळची वाटावी अशीच आहे . ‘ ज्योतीरावतात्या’ या त्यांच्या पहिल्याच कवितेत पोलीस वर्दीच्या आतील संवेदनशीलता दिसते आणि मन त्यांच्याशी जोडले जाते .
ज्या बुधवारपेठेत
पोत्यात भरून आणायचे बाईला शिक्षणासाठी
तिथं धंद्यासाठी उतरताना बायांच्या गाड्या पाहून
चेचून घ्यावेसे वाटतात डोळे .....
किती व्याकुळ प्रतिक्रिया आहे ? खरंच ते पाहताना साधी सभ्य शिकलेली बाई डोळे झाकूनच घेईल पण त्यांना कवयित्रीला त्यांच्या ड्युटीमुळे याकडे डोळेझाक करताच येत नाही , परंतु तिचे संवेदनशील मन ड्युटीवर येताना घरी ठेऊन यायची गोष्ट नाहीच न ?
   पोलिसांबद्दल सर्वसामन्यांच्या मनात असलेली एक दरी , त्यांच्याकडे माणूस नाही तर कुणी कर्तव्यपरायण व्यक्ति म्हणून पाहण्याची लोकांची असलेली दृष्टी कवयित्रीला त्रास देते आणि ती आवाहन करते आम्हालाही माणूस म्हणून ओळख द्या कारण या वर्दीच्या आत तुमच्यासारखाच माणूस आहे मन घेऊन जगणारा ! आणि ते त्यांनी यथार्तपणे मांडले आहे ‘हसण्यामागचे कारण’ मध्ये . पोलीस म्हणून शूद्र अशा नजरेने पाहणारा हा समाज त्यांना हेलावून टाकतो आणि त्या शिवाजीराजांना दान मागतात लढण्याचे ‘मार्गदर्शन कराल का ?’ मध्ये ! ‘ नाती’ या कवितेत वर्दीशी कामासाठी नाते जोडणाऱ्या लोकांचा धिक्कार करते आहे तीच आणि सांगते नजरच बदलली सर्वांकडे
पाहण्याची जेंव्हा हा नात्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला ..
  वरिष्ठांकडून आणि काही वरवरच्या मनाने समाजसुधारक असलेल्या लोकांकडून जेंव्हा त्यांच्या कार्यतत्परतेबद्दल शंका व्यक्त झाली तेंव्हा त्यांनी वर्दीच्या आत माणूस आहे हे पोटतिडकीने सांगितले आहे ..या हजेर्या म्हणजे ..असाच अर्थ होतो याचा ..तेंव्हा कसं वाटलं असतं  साहेब ..यासारख्या कवितांमधून .ड्युटीच्या वेळी हजार होण्यासाठी एका बाईला करावी लागणारी धावपळ आणि तिची मुलांच्या संगोपनासाठी गैरहजर राहण्यामुळे झालेली अगतिकता त्यांनी अत्यंत प्रभावीपणे रेखाटली आहे ...शेड्युल आणि मन भरून येतं तुझ्या आठवणीने ..मध्ये ...
   लोकांनी केलेली वांझोटी चौकशी त्यांच्या त्रासाबद्दलची ‘ड्युटी’ त रेखाटली आहे . ‘सर लायसन द्या’ मध्ये उन्मत्त नागरिक अगदी हुबेहूब सांगितला आहे . ‘इतभर पोट’ मध्ये शरीरविक्रय करणारी अगतिक वेश्या मनाला अंतर्मुख करून जाते .आणि हीच कवयित्री सावध करते साऱ्यांना , की अन्याय करून दमला नसलात तरी मी आता शिकली आहे प्रतिकार करायला ..तेंव्हा सावधान ! सांगते नजर उंचावून .. ‘मॅगझिनीतून सुटतेय गोळी’त ...
  कष्टाने प्राप्त स्वातंत्र्याची विटम्बना पाहून सारे स्वातंत्र्यवीर रडताना दिसतात या संवेदनशील कवयित्रीला ..स्वातंत्र्य ..मध्ये . बाई म्हणून जगताना किती कशी अवहेलना झाली हे त्यांनी परंपरा , आई , गुमान मान्य करा , बिनडोक साले , परिवर्तन , बाईला नागवाण्याची सवय , सौदा , फस्टह्यांड , स्वतःला दोष देत मध्ये यथार्थ रेखाटली आहे .. फस्टह्यांड मधील एका प्रश्नाने तर कुत्सिक हसू येते या पुरुषप्रधान मानसिकतेचे ..ती आळ घेणाऱ्या पुरुषालाच विचारते , “मला एव्हढच सांगा , सेकंडह्यांड बाईला ओळखणारा तू फस्ट ह्यांड पुरुष कसा रे ?”
  भेटलेल्या मेहबूब च्या चेहऱ्यात तिला जगण्याची उकल होते आणि बाबा तुम्हीच सांगा मधील ‘ आता मागते तुमचा आधार
पण तुम्ही धर्मांतर तरी केलं
मी करू शकणार आहे का लिंगातर साऱ्या जणींच
हा प्रश्न हवालदिल करतो आणि स्रीच्या समाजातील विषम स्थानाबद्दल असलेली तिची अगतिकता दाखवतो ...
    पण खरे सांगू बालिकाजींची कविता कुठे भावते तर त्यांच्या पहिल्या पानावरील कविते ...या कवितेमध्ये ! समाजाचे काळे अंग दाखवून वाह वाह घेणाऱ्या , आणि क्षणोक्षणी प्रसवणार्या त्या वांझ कवितांचे सृजन करणाऱ्या कवींमध्ये बालिकाजी नाहीत हे पाहून विशेष आनंद होतो ! ती कविता मात्र पूर्ण देत आहे इथे ...
कविते ...
कविते तू आलीस ?
ये बस ..
खूप मिनत्या केल्यास
म्हणून हे वरवरचं बोचकं खोलते तुझ्याजवळ
अडगळीची खोली बंदच राहू दे
या वरवरच्या चिंध्या विस्कटते तुझ्याजवळ
हा नुसता तवंग आहे
तळ आणि गाळ राहू दे शाबूतच
फुरसतीने ये कधीतरी त्याच्यासाठी
तसं माझ्या जगण्याचं आणि भोगण्याचं
प्रदर्शन मांडायची हौस नाहीये मला
माझी अशीही इच्छा नाही
की , तू बोर्डावर जावस
लोकांनी वाह ! वाह ! म्हणावं , टाळ्या पिटावं तुझ्यावर
आणि बाजार भरवावास तू माझ्या नावानं
अशा कुटील हेतूने आली असशील तर ,
खबरदार ! माझ्या दारात पाऊलही नको टाकू टाकू
     बालिका ज्ञानदेव .
अशा या सच्च्या कवयित्रीचे या अप्रतिम आणि बोलक्या कवितासंग्रहासाठी मनपूर्वक आभार आणि एक बालिकाजी हा जर तवंग इतका काळजाला चिरणारा आहे तर आम्हाला प्रतीक्षा आहे तुमच्या तळागाळातील कवितेची !
  कवयित्री कॉनस्टेबल आहेत ..मी जेंव्हा कवितासंग्रह वाचून भारावून त्यांना संपर्क केला तेंव्हा त्यांनी आभार मानून ड्युटीसंपल्यावर बोलते असे सांगितले तेंव्हा अतिशय अभिमान वाटला या सावित्रीच्या लेकीचा ...सलाम बालिकाजी ...सलाम

      डॉ संध्या राम शेलार .