या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Thursday 4 February 2016

‘ मॅगझिनीमधून सुटतेय गोळी ’ बालिका ज्ञानदेव .

‘ मॅगझिनीमधून सुटतेय गोळी ’ बालिका ज्ञानदेव यांचा कवितासंग्रह आज वाचण्यात आला .  एकदा पुस्तक हाती घेतले आणि बालिकाजींच्या स्वतःबद्दलच्या पहिल्याच लेखात आपल्याला त्या जिंकून घेतात आणि उत्तम कांबळे यांच्या अभिप्रायाने तर कधी एकदा कवितेची पाने उघडते असे होऊन जाते . आणि वाचताना वाटतेही की डोंगर पोखरून उंदीर तर निघणार नाही ! पण जशी जशी वाचत गेले तशी ती मुक्तछंदातील साध्या , ओळखीच्या आणि रोजच्या वापरातील शब्दांनी गुंफलेली कविता काळजाचा ठाव घेते . प्रत्येक कविता त्यांनी भोगलेल्या वेदनेचा हुंकार तर वाटतेच पण पण जगलेलं आयुष्य इतक्या प्रामाणिकपणे मांडणारी ही पोलीस कवयित्री मनात जागा करून जाते , एक माणूस म्हणून !
   उत्तम कांबळे यांनी त्यांच्या विश्लेषणात कविता खूपच छान अशी समजावली आहे . अवघड शब्दांचे जंजाळ नसणारी ही कविता सर्वसामान्य माणसाला जवळची वाटावी अशीच आहे . ‘ ज्योतीरावतात्या’ या त्यांच्या पहिल्याच कवितेत पोलीस वर्दीच्या आतील संवेदनशीलता दिसते आणि मन त्यांच्याशी जोडले जाते .
ज्या बुधवारपेठेत
पोत्यात भरून आणायचे बाईला शिक्षणासाठी
तिथं धंद्यासाठी उतरताना बायांच्या गाड्या पाहून
चेचून घ्यावेसे वाटतात डोळे .....
किती व्याकुळ प्रतिक्रिया आहे ? खरंच ते पाहताना साधी सभ्य शिकलेली बाई डोळे झाकूनच घेईल पण त्यांना कवयित्रीला त्यांच्या ड्युटीमुळे याकडे डोळेझाक करताच येत नाही , परंतु तिचे संवेदनशील मन ड्युटीवर येताना घरी ठेऊन यायची गोष्ट नाहीच न ?
   पोलिसांबद्दल सर्वसामन्यांच्या मनात असलेली एक दरी , त्यांच्याकडे माणूस नाही तर कुणी कर्तव्यपरायण व्यक्ति म्हणून पाहण्याची लोकांची असलेली दृष्टी कवयित्रीला त्रास देते आणि ती आवाहन करते आम्हालाही माणूस म्हणून ओळख द्या कारण या वर्दीच्या आत तुमच्यासारखाच माणूस आहे मन घेऊन जगणारा ! आणि ते त्यांनी यथार्तपणे मांडले आहे ‘हसण्यामागचे कारण’ मध्ये . पोलीस म्हणून शूद्र अशा नजरेने पाहणारा हा समाज त्यांना हेलावून टाकतो आणि त्या शिवाजीराजांना दान मागतात लढण्याचे ‘मार्गदर्शन कराल का ?’ मध्ये ! ‘ नाती’ या कवितेत वर्दीशी कामासाठी नाते जोडणाऱ्या लोकांचा धिक्कार करते आहे तीच आणि सांगते नजरच बदलली सर्वांकडे
पाहण्याची जेंव्हा हा नात्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला ..
  वरिष्ठांकडून आणि काही वरवरच्या मनाने समाजसुधारक असलेल्या लोकांकडून जेंव्हा त्यांच्या कार्यतत्परतेबद्दल शंका व्यक्त झाली तेंव्हा त्यांनी वर्दीच्या आत माणूस आहे हे पोटतिडकीने सांगितले आहे ..या हजेर्या म्हणजे ..असाच अर्थ होतो याचा ..तेंव्हा कसं वाटलं असतं  साहेब ..यासारख्या कवितांमधून .ड्युटीच्या वेळी हजार होण्यासाठी एका बाईला करावी लागणारी धावपळ आणि तिची मुलांच्या संगोपनासाठी गैरहजर राहण्यामुळे झालेली अगतिकता त्यांनी अत्यंत प्रभावीपणे रेखाटली आहे ...शेड्युल आणि मन भरून येतं तुझ्या आठवणीने ..मध्ये ...
   लोकांनी केलेली वांझोटी चौकशी त्यांच्या त्रासाबद्दलची ‘ड्युटी’ त रेखाटली आहे . ‘सर लायसन द्या’ मध्ये उन्मत्त नागरिक अगदी हुबेहूब सांगितला आहे . ‘इतभर पोट’ मध्ये शरीरविक्रय करणारी अगतिक वेश्या मनाला अंतर्मुख करून जाते .आणि हीच कवयित्री सावध करते साऱ्यांना , की अन्याय करून दमला नसलात तरी मी आता शिकली आहे प्रतिकार करायला ..तेंव्हा सावधान ! सांगते नजर उंचावून .. ‘मॅगझिनीतून सुटतेय गोळी’त ...
  कष्टाने प्राप्त स्वातंत्र्याची विटम्बना पाहून सारे स्वातंत्र्यवीर रडताना दिसतात या संवेदनशील कवयित्रीला ..स्वातंत्र्य ..मध्ये . बाई म्हणून जगताना किती कशी अवहेलना झाली हे त्यांनी परंपरा , आई , गुमान मान्य करा , बिनडोक साले , परिवर्तन , बाईला नागवाण्याची सवय , सौदा , फस्टह्यांड , स्वतःला दोष देत मध्ये यथार्थ रेखाटली आहे .. फस्टह्यांड मधील एका प्रश्नाने तर कुत्सिक हसू येते या पुरुषप्रधान मानसिकतेचे ..ती आळ घेणाऱ्या पुरुषालाच विचारते , “मला एव्हढच सांगा , सेकंडह्यांड बाईला ओळखणारा तू फस्ट ह्यांड पुरुष कसा रे ?”
  भेटलेल्या मेहबूब च्या चेहऱ्यात तिला जगण्याची उकल होते आणि बाबा तुम्हीच सांगा मधील ‘ आता मागते तुमचा आधार
पण तुम्ही धर्मांतर तरी केलं
मी करू शकणार आहे का लिंगातर साऱ्या जणींच
हा प्रश्न हवालदिल करतो आणि स्रीच्या समाजातील विषम स्थानाबद्दल असलेली तिची अगतिकता दाखवतो ...
    पण खरे सांगू बालिकाजींची कविता कुठे भावते तर त्यांच्या पहिल्या पानावरील कविते ...या कवितेमध्ये ! समाजाचे काळे अंग दाखवून वाह वाह घेणाऱ्या , आणि क्षणोक्षणी प्रसवणार्या त्या वांझ कवितांचे सृजन करणाऱ्या कवींमध्ये बालिकाजी नाहीत हे पाहून विशेष आनंद होतो ! ती कविता मात्र पूर्ण देत आहे इथे ...
कविते ...
कविते तू आलीस ?
ये बस ..
खूप मिनत्या केल्यास
म्हणून हे वरवरचं बोचकं खोलते तुझ्याजवळ
अडगळीची खोली बंदच राहू दे
या वरवरच्या चिंध्या विस्कटते तुझ्याजवळ
हा नुसता तवंग आहे
तळ आणि गाळ राहू दे शाबूतच
फुरसतीने ये कधीतरी त्याच्यासाठी
तसं माझ्या जगण्याचं आणि भोगण्याचं
प्रदर्शन मांडायची हौस नाहीये मला
माझी अशीही इच्छा नाही
की , तू बोर्डावर जावस
लोकांनी वाह ! वाह ! म्हणावं , टाळ्या पिटावं तुझ्यावर
आणि बाजार भरवावास तू माझ्या नावानं
अशा कुटील हेतूने आली असशील तर ,
खबरदार ! माझ्या दारात पाऊलही नको टाकू टाकू
     बालिका ज्ञानदेव .
अशा या सच्च्या कवयित्रीचे या अप्रतिम आणि बोलक्या कवितासंग्रहासाठी मनपूर्वक आभार आणि एक बालिकाजी हा जर तवंग इतका काळजाला चिरणारा आहे तर आम्हाला प्रतीक्षा आहे तुमच्या तळागाळातील कवितेची !
  कवयित्री कॉनस्टेबल आहेत ..मी जेंव्हा कवितासंग्रह वाचून भारावून त्यांना संपर्क केला तेंव्हा त्यांनी आभार मानून ड्युटीसंपल्यावर बोलते असे सांगितले तेंव्हा अतिशय अभिमान वाटला या सावित्रीच्या लेकीचा ...सलाम बालिकाजी ...सलाम

      डॉ संध्या राम शेलार .  

1 comment:

Prat said...

नमस्कार
१५ भारतीय भाषांमधील मोबाईल ई-बुक्सचे एकमेव वितरक व प्रकाशक असलेले डेलीहंट यांचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याशी संपर्क साधत आहे. आपल्या ब्लॉगवरील साहित्य ई-बुक्स स्वरुपात प्रसिद्ध करण्यास आपण उत्सूक असाल तर आपल्याला मदत करायला आम्हाला आनंद होईल. आपले स्वतःचे लेखन असल्यास तेही आपण इथे प्रसिद्ध व वितरीत करू शकता. डेलीहंटवर तुम्ही हे साहित्य विकत किंवा मोफत ठेवू शकता. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. रितसर करारपत्र होऊन सर्व व्यवहार ऑनलाईन केले जातात. याशिवाय आम्ही बुक्स बुलेटीन नावाचा एक ब्लॉग चालवतो. त्यात तुम्ही लिखाण करू शकता. आमच्यासोबत काम करण्याची आपली इच्छा असल्यास आपण जरूर संपर्क साधा – pratik.puri@dailyhunt.in