या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday 9 January 2012

उपवास

    ''रमा, चल लवकर आज आपण बाहेर जाऊ ,किती वेळ लागेल आवरायला?'' समीर खुशीत होता आज ! त्याने ठरवले कि आजचा पूर्ण दिवस रमाबरोबर घालवायचा . तिने आतापर्यंत कसलीही अपेक्षा न ठेवता त्याची आणि त्याच्या प्रत्येक जवळच्यांना समाधानी ठेवले होते . तिच्या अस्तित्वाने घराचा प्रत्येक कोपरा सदा सर्वकाळ उजळलेला होता . लग्न होवून एक वर्ष झाले पण सामीरपेक्षा ती सर्वांच्या जवळची ! प्रत्येकाचे करताना ती दमत  नव्हती ,दमली तरी दाखवत नव्हती !
    स्री एकदा संसारात विरघळली कि तिला चार भिंतीबाहेरच विश्व जरी काही वेळ मिळाले तरी तिच्या कानात घरच्या राहिलेल्या कामांची गुंजारव चालू असते. ती मनाला वाटूनही घरच्या गोष्टी सोडू शकत नाही, मग तिला कोणी सांगो अगर न सांगो ती सदा न कदा तिच्या कामांच्या काळजीतच राहणार! तशीच रमा कधी ती आली सासरी आणि कधी विरघळून गेली तिच्या संसारात तिला कळलेच नाही ! सुखाच्या वाटेवर कधी काटे सापडले पण ती त्यांना बाजूला सारून पुढे चालतच राहिली न भिता आणि न रुसता रागावता ! समीर तसा मितभाषी आणि हि बडबडी पण तिच्या त्या शब्दांमध्ये तो गुंतून जायचा ,घरी असला तर तिच्या आजूबाजूला घुटमळत असायचा तिची अखंड बडबड ऐकत ! आईंना मात्र तिला सारखे बोलताना पहिले कि राग यायचा विनाकारणच त्या तसे तिला सांगतही काहीवेळ गप्प कि परत चालू ! तिच्या बोलक्या नि मनमोकळ्या स्वभावाने ती सर्वांची लाडकी वहिनी ,मामी ,सून ,नातसून आणि ताई तर झालीच पण समीरची प्रिय बायकोही झाली !
      पण प्रत्येक हात जसा पुढून उजळ आणि मागच्या बाजूने थोडातरी काळपट असतो तसा माणसाचा स्वभाव ,जसा चांगला तसा थोडा विचित्रहि असतोच ! रमाच्या मनात काही गोष्टी इतक्या घट्टपने मुरल्या होत्या कि ती त्या सोडायला कुठल्याही सबबीवर तयार नसायची. त्यातलीच एक सवय तिचा देवभोळेपणा ! काही खुट्ट झाले कि झाले तिचे देवाच्या मागे लागणे सुरु ....त्यात समीरला ताप जरी आला तरी ती घाबरून जायची आणि देव पाण्यात ठेवून बसायची ! समीरला हे असले वागणे रुचायचे नाही ,देवळात जावून हात न जोडणार्यापैकी तो एक पण बायकोचे हे असले वागणे तो जळफळत सहन करायचा! पण ती काही बदलत नव्हती ....
''काय हो असे ओरडताय,आधी दाराच्या आत तर याल कि नाही .''रमा .
''अग् आज मला पूर्ण दिवस सुट्टी आहे ,आज आपण बाहेर जाऊ आणि फिरू ,पिक्चर बघू बाहेरच जेवू ,नाहीतरी तुला अजून कुठे नेलेच नाही लग्न झाल्यापासून ,आवरतेस ना ,लवकर आटप.''
''अहो पण ,कस शक्य आहे ''
''काही सांगू नकोस मी खूप काही ठरवून आलो आहे ,कुठे कुठे जायचे काय पहायचे ,पिक्चरचे तिकीट पण आणले आहेत ,मी तुझे काही एक ऐकणार नाही .''
''मी काय म्हणते ,आपण उद्या जाऊ कि .''
''वेडी आहेस का बॉस काय रोज रोज थोडीच सुट्टी देणार आहे ?आणि तिकिटांचे काय ?''
''उद्या सुट्टी नसेल तर रविवारी जाऊ ,आणि तिकीट द्या कुणालाही ,भावोजी आहेत ताई आहेत जातील ते ''
''तू येणार आहेस का नाही ?'' आता मात्र समीर चांगलाच कावला होता ,तिने ओळखून घ्यायला हवे होते पण ती नेहमीप्रमाणे तिच्या कामात आणि नादात गुंग होती आणि काही विचार न करता ,त्याच्याकडे न पाहता ती बोलून गेली ''नाही जमणार हो ,माझी कामे संपणार नाहीत आणि माझा  उपवास आहे ,मंगळवार ,देवीच्या देवळात जायचे आहे परत सर्व आटोपल्यावर ,नाही येऊ शकत मी .तुम्ही अस करा न ताई आणि भावोजींना तिकिटे द्या आणि सुट्टी आहे तर घरी आराम करा एक दिवस ,मी काहीतरी चटपटीत खायला करते तुम्हाला करू न ?''
''मुर्ख बाई ,तू नको अक्कल शिकवू मला ,जा काय करायचे ते कर मी जातो बाहेर .'' आज प्रथमच अश्या भाषेत समीर बोलला ,रमाने त्याच्याकडे पहिले तर तो रागाने थरारत होता . या शब्दांनी रमाही दुखावली आणि सरसर गंगा डोळ्यातून गोबऱ्या गालावर ओघळू लागल्या ,नाकाचा शेंडा लाल झाला ती आता हुसमरू लागली पण समीर चांगलाच वैतागला नि पाय आपटीत घराबाहेर पडला ...
     प्रथमच समीरचा राग पाहून रमा चांगलीच भांबावली ,त्याला समजून सांगावे तर तो बाहेर गेल्याने तेही शक्य नव्हते ,काय करावे ते तिला सुचेचना. ती फक्त रडत राहिली दिवसभर ,काय चुकले माझे ? मी अचानक कशी जाणार होते ,घरातली कामे कुणी केली असती ? आईंना किती त्रास झाला असता ? समीर समजून का घेत नाहीत ? आपण दोघेच का आहोत घरात ? बाकीच्यांनाहि विचारयला हवे कि ,हे कळत कसे नाही ह्यांना ? एक न अनेक प्रश्न स्वताला विचारत आणि रडत ती पूर्ण दिवस घरकामे हातावेगळी करत होती .अनेक काटे तिने आतापर्यंत तिने बाजूला केले पण आज तिच्या प्रिय समीरचा राग कसा घालवायचा हा मोठा प्रश्न होता आणि आज तर संसारातले पहिले वहिले भांडण होते .ती खुपच एकटेपणा अनुभवत होती त्यात लागोपाठ आलेला उपवास ! शरीरापेक्षा मनाचा थकवा तिला जास्त जाणवत होता ...त्याच विचारात ती देवळात जावून आली ,आणखी नवस वाढविले तिच्या प्रिय पतीचा राग जावा म्हणून ,पण देव ऐकेल तर न ...एकवेळ देवाने ऐकले असते पण पतीदेव मात्र भलतेच भडकलेले !
''वहिनी नको ग काळजी करू ,किती रडशील ? येईल दादा परत ''
''अहो ताई आता तिन्हीसांज झाली ,का हो आले नाही हे अजून ,इतके हो काय चुकले माझे ?''
''काही नाही ग वहिनी तुझे काही चुकले नाही ,तू किती छान आहेस बर तो थोडावेळ रागावेल पण तुला पाहून त्याचा राग कुठच्या कुठे उडून जाईल बघ ,आधी तू फ्रेश हो आणि छान काहीतरी जेवण बनव, तुझे सौंदर्य आणि सुग्रास जेवण म्हटले तो खुश झालाच म्हणून समज !''
''हे हो काय ताई'' लाजत रमा म्हणाली खरी पण तिला हे प्रपोजल खुपच भावले ! खरच किती सुंदर असते हि नात्यांची विन एका धाग्याला गाठ पडली कि बाकीचे ती सोडवण्यासाठी लगेच धावून येतात ....जास्त धागे घेवून विणताना थोडे अवघडते पण विन अशी सुंदर बनते कि पाहणार्याने पाहत राहावे !
    रमा जोमाने कामाला लागली ,आणि काही तासात छान बेत केला तिने पण अजून समीरचा पत्ताच नव्हता ,आता मात्र तिचे राहिलेसाहिले अवसानसुद्धा गाळले ,सर्वांची जेवणे उरकली ती त्याची वाट पाहत तशीच थांबली ,आईंनी आणि बाबांनी आग्रह केला तिला जेवणाचा पण ती फक्त रडतच राहिली मग त्यांनीहि माघार घेतली .ती रडत तशीच झोपी गेली रात्री उशिरा बेलच्या आवाजाने जागी झाली तर समीर दारात ...तिच्याकडे एक कटाक्ष न टाकता सरळ त्याने बेडरूम गाठली आणि झोपी गेला तिला काही न विचारता ...ती त्याला जेवणाचे विचारू लागली ...ताट आणेपर्यंत तो झोपलेला ...उठवावे तर परत चिडायचे म्हणून ताट झाकून उपाशीच तीही शेजारी झोपली ......
     सकाळ अशीच अबोल चालू झाली, रमाची तर ताकतच नव्हती अवाक्षर काढण्याची कारण पहिल्यांदा ती समीरचा राग अनुभवत होती ...आज ताईनेच त्याला चहा नाश्ता दिला . 
''दादा तू बोललास वहिनीशी रात्री ,ती जेवली का ? कालचा तिचा उपवास ,रात्री आमच्याबरोबर नाही जेवली म्हणाली तू आल्यावर जेवेल !''
समीर ताईकडे बघायला लागला पण काही बोलला नाही परत ताईच सांगू लागली ,''दिवसभर रडत होती आई बाबा मी समजावले तेव्हा कुठे थोडी शांत झाली पण स्वयपाक करून परत एकटीच बसली कोणाशी बोलली पण नाही ''
''अग् पण मी रोज म्हणतो का हिला चल ,कालच म्हणालो न ,त्याचाही राग नाही ग पण ती उपवास म्हणली आणि माझे डोके भडकले ,काय ते तीच चालू असते देव जाने ,कधी वाटले जवळ जावे तर हिचा आपल् उपवास आहे ,सारखे ते देव धरून बसायचे ,मला काही किंमत आहे का ?''
''हो रे दादा ,पण तिच्या एका चुकीच्या गोष्टीसाठी तू तिचे शंभर चांगले गुण दृष्टीआड करतोस !हे चुकीचे नाही का ?''
''हो ग पण तिने थोडे समजून घेणे गरजेचे आहे न ''
''आहे तरी पण तू समजून घे ,खूप गोड आहे रे ती ! लगेच जा आणि बोल तिच्याशी नाहीतर दिवसभर ती जेवणार नाही ''
   समीरला उशीर झाला होता पण ती दिवसभर उपाशी राहिली असती ,तो हळूच तिच्या मागे जावून उभा राहिला तिला जवळ ओढत कानात कुजबुजला ,''सॉरी सोनू ,चुकलोच मी !''
''नाही हो ,मीच खूप वेंधळी आहे ,तुम्हाला समजूनच घेत नाही ,माझीच बडबड चालू ठेवते ,मला माफ करा ''आणि त्याला बिलगून परत रडू लागली .त्याने हळूच तिचे अश्रू पुसत मिस्कीलीने म्हणाला ,''पुढचा मंगळवार आपण दोघे उपवास करू चालेल ना ?'' ती मात्र गालातल्या गालात हसू लागली ...  

No comments: