या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Wednesday, 10 February 2016

जोहार -सुशील धसकटे यांची एक वास्तवदर्शी कादंबरी

‘जोहार’ एक असा शब्द जो काळाच्या ढिगाखाली गाडला गेला . साठ हजार वर्षांची ओळख सांगणारा हा शब्द !  अर्थ साधा , ‘ नमस्कार’ इतकाच पण त्याला वापरताना ‘मायबाप’ जोडले संत चोखोबा यांनी ..आणि त्याची ओळख दीनवाणी गरीबाची हाक झाली .. मी पुस्तक वाचायला घेतले , अजून सुरवात करीतच होते , ओपीडी जसा वेळ मिळेल तशी वाचत असते मी , मग पुस्तक टेबलवरच असते , अनेक जणांनी तो शब्द वाचला आणि प्रतिक्रिया दिली ..काय डॉ काय वाचताय , आता कुठे उकरून काढता ..आता कुणी दीनवाणे नाही आणि नम्र सुद्धा नाही ! उकरून काढता ? हे मनात घोळत राहिले , आणि जशी वाचत गेले तशी उकरून काढलेली ही मुळे मला दिसू लागली .
 तिसऱ्या प्रकरणातील शेवटचे मल्हारेया सीक्षापण वाचले आणि साऱ्या गोष्टींची उकल झाली . मल्हारच्या मनातील खळबळ , मुळांना सोडून उंच वाढणाऱ्या समाजाने उडवलेली त्याच्या प्रश्नातून व्यक्त होते आणि सर्वज्ञ गोसावी (श्री चक्रधर स्वामी ) यांनी  केलेलं त्याचे विश्लेषण अत्यंत मर्मभेदी वाटले मला ..कारण तिथेच त्या कादंबरीची उंची लक्षात आली आणि तिला मुळांना घट्ट करणारी ही सामाजिक कादंबरी मनात अनेक तरंग निर्माण करून गेली . ते सर्वाज्ञांनी  केलेलं विवेचन मुद्दाम इथे द्यावे वाटते ..
सर्वज्ञ  म्हणतात , “ बुड नाइ : त्याले आधारू कायसेनि ? : शेंडा उंच भासे : वरवर : अल्पायुषी : तकलादू : जादा टिकत ना : बुड म्हणजे मूळ : नाळ : तेणे जितुके खोलखोल खोल : तितुकी समृद्धीची ओल चिरंतन : सत्वयुक्त : टिकावू : म्हणून बुडाची जाणीव होआवी की :”
 आजच्या भरकटलेल्या समाजव्यवस्थेचे परिपूर्ण चित्रण विश्लेषणासह लेखकाने कादंबरीत केले आहे , आणि तेही ग्रामीण , समजणाऱ्या बोली भाषेत ..म्हणून माझ्यासारख्या शहरी , ग्रामीण भागाचा अनुभव घेणार्याला तर ती जास्त भिडते . वास्तववादी चित्रण करताना लेखकाने कुठलीही अतिशोयोक्ती तर केली नाहीच पण जिथे ते सत्य नागडे करू शकतील तिथे न बुजता त्यांनी केले आहे ..म्हणूनही ही कादंबरी वास्तव शब्दांकित करते . आजच्या समाजातील अराजकता ही समाजाने मुळांची जोपासना न करता फक्त आभाळाला आपले केल्यामुळे आहे . आणि इथेच माणसाने त्याच्या आणि सर्व सृष्टीच्या विनाशाची बीजे पेरली आहेत .
    माझ्या वरील सांगण्यावरून असे वाटेल की लेखकाचे विचार प्रतिगामी तर नाहीत ? पण सांगतांना अत्यंत आनंद वाटतोय की प्रतिगामी आणि पुरोगामी दोन्ही मधील चांगल्याची सांगड घालूनच चिरंतन समृद्ध संस्कृती निर्माण होऊ शकते आणि त्यासाठी मानवतावादी दृष्टीकोन ठेवणे जास्त उचित असेल . आजच्या समाजच्या चंगळवादी भूमिकेवर टीकास्र सोडतानाच ते समाजातील जास्त आणि कमीचा फटका या समाजव्यवस्थेला कसा बसत आहे हेही सांगतात . इतके सांगतांना कुठेही कादंबरी रटाळवाणी होत नाही . फक्त शिकवण न राहता ती कादंबरी आहे , ही जाणीव प्रत्येक ठिकाणी येते .
  शहरी आणि ग्रामीण भागातील विरोधाभास रेखाटताना कुठेही त्यात अतिरंजन तर जाणवत नाहीच , पण वास्तव जास्त जवळ जावून पाहत आहोत असेच वाटते . दिशाहीन समाजाचे चित्रण करताना राजकारण , शिक्षणक्षेत्र ,साहित्य, कृषिक्षेत्र आणि समाजतील बीभत्स रूप प्रत्येक ठिकाणी चित्रित होते . या कादंबरीत ग्रामीण भागातील , मल्हार या विध्यार्थ्याचे एम ए  ते एम फील पर्यंतचे वर्णन आहे . त्याचे मित्र आणि तो यांच्यातील संभाषण जेंव्हा समाजातील अंदाधुंद दाखवते त्याच वेळी त्या मुलांची त्याला विरोध करून पुढे जाण्याची मानसिकता जास्त कौतुकास्पद आहे ..समाजातील विषमतेने , सामाजिक प्रश्नांनी , जातिभेदाच्या स्तोमाने विचलित झालेली ही तरुण मने मांडताना कुठेही एकसुरीपणा नाहीच पण त्यांच्या मनातील गोंधळ ,आणि शंका लेखकाने बारकाव्याने मांडल्या आहेत .
 ग्रामीण महाराष्ट्रातील पाणीटंचाई , गरिबी , नैतिक मूल्यांना दिली जाणारी मूठमाती , राजकारणासाठी होणारी समाजाची दिशाहीन फरफट , स्रीयांच्या पिळवणूकी बरोबर स्री स्वातंत्र्याच्या नावाखाली  होणारी कुटुंबाची होरपळ सांगताना कुठेही एकांगीपण जाणवत नाही . अशी ही समाजाचे सर्व बाजूंनी विवेचन करणारे लेखन आहे आणि हे वास्तववादी लेखन म्हणूनच मनाला अस्वस्थ करून तर जातेच पण विचार करायलाही भाग पाडते . आणि हेच या कादंबरीचे यश आहे . लेखकाची मुळांना न सोडता होणाऱ्या सामाजिक परिवर्तनाची आस प्रत्येक ठिकाणी लक्ष वेधून घेते ..कारण सर्वज्ञ गोसाव्याच्या सांगण्यानुसार समृद्धी असलेला समाज उंच गेला तरी मुळे किती खोलवर रुजली आहेत यावरच त्याचे चिरंतन अस्तित्व टिकणार आहे !
    भुषण राक्षे यांनी , ‘महानुभाव - वारकरी , महात्मा फुले - शाहू - शिंदे - सयाजीराव - गांधी - साने गुरुजी - आंबेडकर - लोहिया - शरद पाटील - नेमाडे या विचार परंपरेचे बोट घट्ट पकडून , त्यांना स्वतः च्या जाणीव - नेणिवेत मुरवत मल्हारने भवतालच्या अशाश्वत - आभासी वास्तवात मिसफीट होऊनही सकारात्मक तेने केलेल्या स्वतंत्र प्रवासाची ही हकीकत प्रत्येकालाच अस्वस्थ करणारी व प्रत्येकासमोर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे …’  या सार्थ शब्दात सांगितले आहे या कादंबरीबद्दल !
         डॉ संध्या राम शेलार .

Thursday, 4 February 2016

‘ मॅगझिनीमधून सुटतेय गोळी ’ बालिका ज्ञानदेव .

‘ मॅगझिनीमधून सुटतेय गोळी ’ बालिका ज्ञानदेव यांचा कवितासंग्रह आज वाचण्यात आला .  एकदा पुस्तक हाती घेतले आणि बालिकाजींच्या स्वतःबद्दलच्या पहिल्याच लेखात आपल्याला त्या जिंकून घेतात आणि उत्तम कांबळे यांच्या अभिप्रायाने तर कधी एकदा कवितेची पाने उघडते असे होऊन जाते . आणि वाचताना वाटतेही की डोंगर पोखरून उंदीर तर निघणार नाही ! पण जशी जशी वाचत गेले तशी ती मुक्तछंदातील साध्या , ओळखीच्या आणि रोजच्या वापरातील शब्दांनी गुंफलेली कविता काळजाचा ठाव घेते . प्रत्येक कविता त्यांनी भोगलेल्या वेदनेचा हुंकार तर वाटतेच पण पण जगलेलं आयुष्य इतक्या प्रामाणिकपणे मांडणारी ही पोलीस कवयित्री मनात जागा करून जाते , एक माणूस म्हणून !
   उत्तम कांबळे यांनी त्यांच्या विश्लेषणात कविता खूपच छान अशी समजावली आहे . अवघड शब्दांचे जंजाळ नसणारी ही कविता सर्वसामान्य माणसाला जवळची वाटावी अशीच आहे . ‘ ज्योतीरावतात्या’ या त्यांच्या पहिल्याच कवितेत पोलीस वर्दीच्या आतील संवेदनशीलता दिसते आणि मन त्यांच्याशी जोडले जाते .
ज्या बुधवारपेठेत
पोत्यात भरून आणायचे बाईला शिक्षणासाठी
तिथं धंद्यासाठी उतरताना बायांच्या गाड्या पाहून
चेचून घ्यावेसे वाटतात डोळे .....
किती व्याकुळ प्रतिक्रिया आहे ? खरंच ते पाहताना साधी सभ्य शिकलेली बाई डोळे झाकूनच घेईल पण त्यांना कवयित्रीला त्यांच्या ड्युटीमुळे याकडे डोळेझाक करताच येत नाही , परंतु तिचे संवेदनशील मन ड्युटीवर येताना घरी ठेऊन यायची गोष्ट नाहीच न ?
   पोलिसांबद्दल सर्वसामन्यांच्या मनात असलेली एक दरी , त्यांच्याकडे माणूस नाही तर कुणी कर्तव्यपरायण व्यक्ति म्हणून पाहण्याची लोकांची असलेली दृष्टी कवयित्रीला त्रास देते आणि ती आवाहन करते आम्हालाही माणूस म्हणून ओळख द्या कारण या वर्दीच्या आत तुमच्यासारखाच माणूस आहे मन घेऊन जगणारा ! आणि ते त्यांनी यथार्तपणे मांडले आहे ‘हसण्यामागचे कारण’ मध्ये . पोलीस म्हणून शूद्र अशा नजरेने पाहणारा हा समाज त्यांना हेलावून टाकतो आणि त्या शिवाजीराजांना दान मागतात लढण्याचे ‘मार्गदर्शन कराल का ?’ मध्ये ! ‘ नाती’ या कवितेत वर्दीशी कामासाठी नाते जोडणाऱ्या लोकांचा धिक्कार करते आहे तीच आणि सांगते नजरच बदलली सर्वांकडे
पाहण्याची जेंव्हा हा नात्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला ..
  वरिष्ठांकडून आणि काही वरवरच्या मनाने समाजसुधारक असलेल्या लोकांकडून जेंव्हा त्यांच्या कार्यतत्परतेबद्दल शंका व्यक्त झाली तेंव्हा त्यांनी वर्दीच्या आत माणूस आहे हे पोटतिडकीने सांगितले आहे ..या हजेर्या म्हणजे ..असाच अर्थ होतो याचा ..तेंव्हा कसं वाटलं असतं  साहेब ..यासारख्या कवितांमधून .ड्युटीच्या वेळी हजार होण्यासाठी एका बाईला करावी लागणारी धावपळ आणि तिची मुलांच्या संगोपनासाठी गैरहजर राहण्यामुळे झालेली अगतिकता त्यांनी अत्यंत प्रभावीपणे रेखाटली आहे ...शेड्युल आणि मन भरून येतं तुझ्या आठवणीने ..मध्ये ...
   लोकांनी केलेली वांझोटी चौकशी त्यांच्या त्रासाबद्दलची ‘ड्युटी’ त रेखाटली आहे . ‘सर लायसन द्या’ मध्ये उन्मत्त नागरिक अगदी हुबेहूब सांगितला आहे . ‘इतभर पोट’ मध्ये शरीरविक्रय करणारी अगतिक वेश्या मनाला अंतर्मुख करून जाते .आणि हीच कवयित्री सावध करते साऱ्यांना , की अन्याय करून दमला नसलात तरी मी आता शिकली आहे प्रतिकार करायला ..तेंव्हा सावधान ! सांगते नजर उंचावून .. ‘मॅगझिनीतून सुटतेय गोळी’त ...
  कष्टाने प्राप्त स्वातंत्र्याची विटम्बना पाहून सारे स्वातंत्र्यवीर रडताना दिसतात या संवेदनशील कवयित्रीला ..स्वातंत्र्य ..मध्ये . बाई म्हणून जगताना किती कशी अवहेलना झाली हे त्यांनी परंपरा , आई , गुमान मान्य करा , बिनडोक साले , परिवर्तन , बाईला नागवाण्याची सवय , सौदा , फस्टह्यांड , स्वतःला दोष देत मध्ये यथार्थ रेखाटली आहे .. फस्टह्यांड मधील एका प्रश्नाने तर कुत्सिक हसू येते या पुरुषप्रधान मानसिकतेचे ..ती आळ घेणाऱ्या पुरुषालाच विचारते , “मला एव्हढच सांगा , सेकंडह्यांड बाईला ओळखणारा तू फस्ट ह्यांड पुरुष कसा रे ?”
  भेटलेल्या मेहबूब च्या चेहऱ्यात तिला जगण्याची उकल होते आणि बाबा तुम्हीच सांगा मधील ‘ आता मागते तुमचा आधार
पण तुम्ही धर्मांतर तरी केलं
मी करू शकणार आहे का लिंगातर साऱ्या जणींच
हा प्रश्न हवालदिल करतो आणि स्रीच्या समाजातील विषम स्थानाबद्दल असलेली तिची अगतिकता दाखवतो ...
    पण खरे सांगू बालिकाजींची कविता कुठे भावते तर त्यांच्या पहिल्या पानावरील कविते ...या कवितेमध्ये ! समाजाचे काळे अंग दाखवून वाह वाह घेणाऱ्या , आणि क्षणोक्षणी प्रसवणार्या त्या वांझ कवितांचे सृजन करणाऱ्या कवींमध्ये बालिकाजी नाहीत हे पाहून विशेष आनंद होतो ! ती कविता मात्र पूर्ण देत आहे इथे ...
कविते ...
कविते तू आलीस ?
ये बस ..
खूप मिनत्या केल्यास
म्हणून हे वरवरचं बोचकं खोलते तुझ्याजवळ
अडगळीची खोली बंदच राहू दे
या वरवरच्या चिंध्या विस्कटते तुझ्याजवळ
हा नुसता तवंग आहे
तळ आणि गाळ राहू दे शाबूतच
फुरसतीने ये कधीतरी त्याच्यासाठी
तसं माझ्या जगण्याचं आणि भोगण्याचं
प्रदर्शन मांडायची हौस नाहीये मला
माझी अशीही इच्छा नाही
की , तू बोर्डावर जावस
लोकांनी वाह ! वाह ! म्हणावं , टाळ्या पिटावं तुझ्यावर
आणि बाजार भरवावास तू माझ्या नावानं
अशा कुटील हेतूने आली असशील तर ,
खबरदार ! माझ्या दारात पाऊलही नको टाकू टाकू
     बालिका ज्ञानदेव .
अशा या सच्च्या कवयित्रीचे या अप्रतिम आणि बोलक्या कवितासंग्रहासाठी मनपूर्वक आभार आणि एक बालिकाजी हा जर तवंग इतका काळजाला चिरणारा आहे तर आम्हाला प्रतीक्षा आहे तुमच्या तळागाळातील कवितेची !
  कवयित्री कॉनस्टेबल आहेत ..मी जेंव्हा कवितासंग्रह वाचून भारावून त्यांना संपर्क केला तेंव्हा त्यांनी आभार मानून ड्युटीसंपल्यावर बोलते असे सांगितले तेंव्हा अतिशय अभिमान वाटला या सावित्रीच्या लेकीचा ...सलाम बालिकाजी ...सलाम

      डॉ संध्या राम शेलार .  

Monday, 25 January 2016

खरंच गुलामगिरी संपली आहे का ?

“उठा स्वतंत्र भारताच्या नागरिकांनो , साडे पाच वाजले ..साडे सहा ला तर बस येईल .” बाळाच्या अंगावरची रजई ओढत मी म्हणाले खरी पण इतक्या गारठ्यात त्याला उठवणे मलाही जीवावर आले होते . त्याने पुन्हा पांघरून ओढून घेतले .
“अरे , आज २६ जानेवारी पिलू , शाळेत नाही का जाणार तू ? आज ध्वजारोहण करायचे ना ?” लगेच गडबडीत स्वारी उठून बसली .
“तुला रात्री सांगितले ते ध्यानात आहे ना मम्मी ?” डोळे चोळतच स्वारी बोलू लागली .मीही तोंड वाकडे करून विचारले नजरेनेच काय रे ?
“अशी कशी विसरते तू ? अगं मम्मी मी नाही का सांगितले आणि तू प्रॉमिस पण केलेस की ध्यानात ठेवीन .” तक्रारीचा सूर उंच झाला जरा .
“बरं बाबा , मी तरी काय काय ध्यानात ठेवणार रे , सॉरी पण तू कित्ती गोष्टी सांगतो , सगळ्या नाही लक्षात राहत बघ .” त्याने मग लाडीगोडी लावत जवळ येत सांगितले ,  “अगं , आपल्या दवाखान्याशेजारी एकही झेंडा पडलेला दिसायला नको , दिसला तर मग उचलून ठेवशील असे म्हणाली ना तू ?” मग माझ्या मेंदूत क्लिक झाले . होरे मी म्हणाले खरी ..त्यावेळीच त्याने आणखी एक हट्ट केला होता ..तू तुझा व्हाटस अप चा प्रोफाईल बदलून तिरंगा लावायचा . पण माझ्या एका प्रश्नाने त्याला थोडे गडबडून टाकले . का रे बाळा , फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलाच देशावर प्रेम करायचे का ? तो थोडावेळ चुळबुळ करत राहिला आणि मग म्हणाला , नाहीच गं , मग तू असे कर की वर्षभर तुझा प्रोफाईल तिरंगा ठेव ! किती सोपे उत्तर शोधले रे बाळा तू ..पण इतके सोपे नाहीच सर्व ! फक्त तिरंग्याचा अवमान न करणे इतकीच देशभक्ती का ? किती संकुचित जगतो आहोत आपण ..देश म्हणजे काय ? तो फक्त सरहद्दीतच कायम करायचा का ? की सरहद्दीच्या आतील सर्व जीव समानतेचा धडा गिरवत जगत आहेत यावर देश कायम करायचा ..ही जी माणसामाणसातील दरी आहे ती सरहद्दीच्या बाहेर का संपते ? माणूस म्हणून आपले काहीच अस्तित्व नाही का या भूतलावर ? एक ना अनेक प्रश्नांनी धिंगाणा माझ्या मनात चालू केला , अरे पण विचारात हरवून जमणार नव्हतेच मला ! मुलांचे आवरून त्यांना दूध देवून गाडी येण्याच्या वेळी तैय्यार केले . मुले गेलीही ..पण काम चालू असताना त्या एकांत शांत वातावरणात शाळेच्या पटांगणातून लता मंगेशकरांच्या आवाजात ‘ जरा याद करो कुर्बानी .’ ऐकू येत होते . आणि मन असह्य अशा घालमेलीत अडकून पडले . हाताने काम चालूच होते , परंतु मनाने मी कामात नव्हतेच . बाहेर गेले  , पक्षांना चारा टाकायला आणि भांड्यात स्वच्छ पाणी भरून ठेवायला ..रोजचीच सवय दोन तीन वर्षापासूनची म्हणून सारी कामे अगदी व्यवस्थित चालू होती जरी मन कामात नव्हते ! दोन तीन कावळे लगेच जवळ येवून उभे राहिले त्यांना भांडे धुवून त्यात पाणी टाकेपर्यंत पण दम निघत नव्हता तर्री मी आज लवकर सारे करीत होते . तसाही पक्षांचा दिवस पहाटेच सुरु होतो म्हणजे त्यांना भूक लागणारच ना ? आणि मी मनाशीच हसले ..माणसाने सृष्टीचे गणित आपल्याच ठेक्यावर का चालवले असेल ? पण तरी किती सुधारणा झाली तरी निसर्ग माणसाला हुलकावणी देतोच आणि तोच श्रेष्ठ आहे हे वारंवार दाखवतो . पण हे समजेल त्याला ! मला तरी समजते का ? या प्रश्नावर मात्र मन अधिक गहिऱ्या खाईत जातेय असेच वाटले .
  मी भांडे धुवून पाणी ओतनारच होते रस्त्यावर की एक बैलगाडी येताना दिसली , त्यांच्यावर उडू नये म्हणून मी कावळ्यांची घाई डावलून थांबले (थोडे सौजन्य अजून अबाधित आहे !) दोन लहान लेकरे , दोघे तरुणच म्हणावे की पोरकट या संभ्रमात पडावे असे नवराबायको , आणि एक मळकटलेल्या आणि केसांचा पुंजका न विंचरलेल्या म्हातारीच्या (?) ओझ्याने वाकलेली ती मरतुकडी बैलजोडी गाडी ओढत पळत होती . अजून सातही वाजले नव्हते , गारठ्याने कुडकुडावे इतकी थंडी हवेत होती , सूर्याचे आगमन झाले होते पण तोही कदाचित पांघरून ओढून बसला होता , कुडकुडत ! सकाळी उठायला नकार देणारे माझे मन त्या टोळीवाल्या लोकांना उसतोडीला जाताना पाहून थोडे बावरले . किती पहाटे हे नित्यादि कर्म आवरून पोटाच्या सोयीसाठी बाहेर पडलेत , अगदी या पक्षांसारखेच ! खरे तर हा गरीब आणि पोटापाण्यासाठी भटकंती करणारा माणूसच अजून निसर्गाला धरून वागतोय नाहीतर आपण ? चंगळवादाच्या भोवर्यात अडकून पडलोय ! काल एक पुस्तक वाचताना , मार्स्कवाद ,कम्युनिस्ट , समाजवाद असे अनेक भयंकर शब्द वाचले ..भयंकरच कारण मला त्याचा अर्थच माहीत नाही ..काय आहे हे ? कम्युनिस्ट विचारवंतांची हत्या वगैरे खूप वाचनात येते आताशा पण सारे डोक्याला फेर्या मारून निघून जाते ..आजही मी डॉ असून मला समाजवाद माहीत नाही ! त्याची रुजलेली खोल मुळे माहीत नाहीत ! का मी जाणूनच घेवू इच्छित नाही ? गांधीबाबा वाचला रे तुला फक्त पुस्तकाची पाने पालटत वाचत गेले ..तुझे अस्तित्व त्या पानापानात न शोधताच ! सत्याचे प्रयोग वाचले ..तुझ्याच आश्रमातून विकत आणले होते ..भारावले काहीवेळ तुझ्या त्या त्यागासाठी पण काय झाले ..दोन तीन तासानंतर पूर्ववत झाले सारे .. पैसे नाहीत तर दवाखान्यात का आलात असे विचारण्यापर्यंत मजल गेली माझी तुला वाचतानाच ! हे लिहितानाही डोळे ओले झालेत पण खरे सांगू हेही वांझच विचार आहेत बघ ..मनाला कोंडून जगतोय गांधीबाबा आम्ही , चंगळवादाचा पुरस्कार करीत ! आज ६७ वा प्रजासत्ताक साजरा करताना एकाही चंगळवाद्याच्या मनात काहीच खुपत नाही ..ना तुझे आख्खे आयुष्य समाजासाठी स्वातंत्र्यासाठी वाहने ना त्या असंख्य अशा स्वातंत्र्यनायाकांचे आयुष्य स्वातंत्र्यासाठी झुगारून देणे ! त्यांच्या रक्तावर पोसलेली आमची चंगळवादी मने पुन्हा गुलामगिरीची परक्यांची अस्रे घेऊन आपल्याच बांधवांना ठेचण्यासाठी सज्ज झालीत गांधीबाबा ! गुलामगिरी खरंच संपलीय का ? की अजूनही आहे अबाधित त्या मग्रूर मनात ? ज्यांच्या पूर्वजांचा बळी गेला गुलामगिरी झुगारताना आज त्यांचे वंशज आम्ही पुन्हा तीच गुलामगिरी गरीब ,शोषितांवर लादायला सज्ज आहोत .. त्या वेळेत आणि आज  काहीच फरक नाही गांधीबाबा , फक्त परिमाणे बदलली आहेत . तेंव्हा जास्त ताकदवान राजा होता आणि आज जास्त पैसेवाला झालाय फक्त ! मी नेहमी विचारते कुणी टोळीवाले , उसतोडीचे पेशंट आले की कुठला रे बाबा तुम्ही ...त्यांनी मग मराठवाडा विदर्भातील वेगळ्यावेगळ्या गावांची नावे सांगावी ..अशीच काही गावे आहेत ही भर माझ्या ज्ञानात पडते इतकेच ..अलीकडे थोडे वाचून वाचून संवेदनशीलता (सामाजिक) जपणारे मन बावरते थोडेसेच पण फी घेऊन स्याम्पलची औषधे देण्यापुरतेच ! स्वतःच्या हितासाठी संवेदनशीलता जपणारी आपली मने कधी प्रगल्भ होणार हा वांझोटा विचार मनात कुरवाळत ..हो पण यांच्याच कष्टावर गाडी , बंगले आणि प्रॉपरटी घेणारा हा सुशिक्षित समाज कधीच आत्मपरीक्षण करणार नाही का ? की दोन चार रुपडे फेकले की आपण मोकळे झालो का दानवीर म्हणून घ्यायला ...या कष्टकऱ्यांच्या जीवनात ज्या दिवशी हास्य उमलेल तो दिवस खरा प्रजासातक असेल ! शक्य आहे का हे ..हे वांझोट्या विचार्वांतांनो आणि पैसा , प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेच्या मागे पळणाऱ्या आपल्या सारख्या त्यांच्या कष्टावर आपली पोटे पोसणाऱ्या बांडगुळांनो एकदाच मनाला हे विचारून बघायचे का ?
आज खरंच लाज वाटतेय मला , पहिल्यांदा ..माझ्याच गुलामगिरीची ! कारण कामाची बाई आली नाही तर नित्यादि कर्मे करायलाही बावरणारे माझे मन गुलामच नाही का ? सवयीचे गुलाम , चंगळवादाचे गुलाम !

        डॉ संध्या राम शेलार . 

Sunday, 17 January 2016

वाटेवरले वारकरी

 आयुष्याच्या वाटेवर भेटणारे बरेचजण असतात , कुणी एकदा दिसतात पुन्हा कधीच न दिसण्यासाठी . कुणी सोबत चालतात आणि आपल्या मनाचा कप्पा व्यापतात कधी कळतंच नाही , कुणी अनेकवर्षानंतर अनापेक्षितपणे भेटतात आणि पूर्वीसारखी पुन्हा जवळची होतात . कुणी पूर्वी पाहिलेली , पण कधीच संवाद न केलेली , अशी भेटतात आणि आपलीशी होतात . कुणी हृदयात हळवी किनार ठेवून गेलेली पुन्हा समोर उभी ठाकतात आणि मनातील हुरहूर कधी काहूर होते कळतंच नाही . काही तर अशी असतात ,कि हृदय व्यापून आयुष्यभरासाठी ओरखडे ठेऊन जातात . आयुष्याच्या या अनोळखी वाटेवर उद्या काय असेल कुणाला कळलंय का कधी ? हो पण हे सारेजण जीवन विचारांनी, आचारांनी, अनुभवांनी  समृद्ध करून जातात काही सावल्या आणि पाऊलखुणा ठेवून ! असेही हे वाटेवरचे वारकरी माझ्या आयुष्याला नेहमीच शिकवत , समृद्ध करीत गेले . काहींनी हृदयाचे हळवे कोपरे असे व्यापले कि त्यांच्या आठवणी सुद्धा मला आनंदी करतात . हर्षाची ही मोरपिसे आयुष्यभर अशीच खोलवर मनात रुजवून , रुतवून घ्यावीत . काही न मागता देणारी अशीही नाती भेटली आणि काही कितीही घेऊन पुन्हा हात करणारी पण ! पण तरी दोन्हीत आनंद आहे खरंच आहे . अश्याच या वाटेवरच्या वारकऱ्यांना मी लिहिणार आहे . नव्हे लिहायला हवेच , कारण हे करताना त्यांनी दिलेले सुखदुःखाचे क्षण अनुभवताना आजच्या वेदना कमीच वाटतील हो न ?

भिजलेलं मन

तुझ्या असण्याने
गहिवरलेले आयुष्य
माझी मी उरलीच नव्हते
प्रत्येक क्षणावर
तुझीच मोहर
तुझ्याशी खेळलेला तो
नजरबंदीचा खेळ
शब्दांनी सजण्याआधी
संपलेली ती वेळ
उद्याची वचने
आजच घेतलेली
स्वप्नांची तोरणे
पापण्यात सजलेली
सुखाच्या वेलींनी
गाव माझं सजलेलं
प्रेमात तुझ्या
मन होतं भिजलेलं
  डॉ संध्या राम शेलार .

Saturday, 9 January 2016

नारळाचे पाणी

       
स्मिता एकदम वर्गात शिरली आणि बाहेरच्या उन्हाच्या काहिलीतून आतल्या कलकलाटात येताच तिचे डोके अगदी चक्रावून गेले . किती बोलतात या मुली ? आजी म्हणते आम्हा बहिणींना ‘ काय भोर्ड्याहो तुमची कलकल बंद होते का नाही ? का रात्र अशीच जाणार ?’ आजीला तरी दोन चार भोरड्या आहेत पण इथे थोड्या नाहीत साठ!!! खरंच या पोरींना कंटाळा कसा नसेल येत बोलायचा ? एकीचे दुसरीला तरी ऐकू जात असेल का ? आणि काय बोलत असतील ? खूप राग येत होता स्मिताला सार्यांचा .
“किती बोलता ग ?” शेवटी तिने न राहवून सार्यांना विचारलेच .
“तू पण बोलतेस बर , उगी आव आणू नको शहाण्याचा ..” उमा हसत होती .
“बर ..” मग मात्र स्मिताही हसून मान्य आहे म्हणत मानेला झटका देत बोलली . खरच आहे कि ! आपल्या कलकलीचा थोडाच आपल्याला त्रास होतो !
पण तरीही तिचा मूड आज ठीक नव्हताच . किती लिखाण देतात चौधरी सर , लिहून लिहून जीव दमून जातो . पण त्यांना काय आहे फक्त प्रश्न वाचायचे आणि आणि सार्या मुलींचे लिहिलेले चेक तरी करतात कि काय कोण जाने ? रात्री झोपच नाही होत यामुळे , आणि शिवाय त्यांना हे कळायला नको का कि आम्हाला बाकीचे पण विषय आहेत अभ्यास करायला ? आणि फक्त इतिहास भूगोल करून थोडेच आम्ही दहावी पास होणार ? त्यांना पडले आहे त्यांच्या विषयाचा चांगला निकाल आला पाहिजे याचे पण आम्ही काय घाण्याचे बैल थोडेच आहोत . शिवाय सार्या मुली , शिक्षेच्या भीतीने बिचार्या करतात . करतील नाही तर काय करतील , त्या सुकुमार हातावर पट्टीचे वळ उमटवताना त्यांना थोडेच काही वाटत असेल ? किती निष्ठुर आहेत न सर ... त्यांच्या मुलांशी तरी नीट बोलत असतील कि काय कुणास ठावूक ? महामुनी बाई सांगतात कि नारळाची करवंटी जरी कडक असली तरी आतले पाणी किती सुमधुर असते ! फणसाचे काटे जरी असले तरी गर कसा जिव्हेला तृप्त करतो . पण या सरांचा असा गोडवा कधी दिसलाच नाही . सतत आठ्या कपाळावर आणि नाकावर ओघळलेला चष्मा पाहूनच त्यांची भीती वाटते. त्यांना हसता येत असेल का ? या प्रश्नाने मात्र स्मिताने तिच्या मनातच डोक्यात टपली मारून घेतली आणि स्वत:शीच हसली . हसण्याशिवाय या जगात माणूस जिवंत तरी राहिल का ?
“ये चौधरी सर आले ..” एकजण म्हणाली आणि वर्गात भयाण शांतता पसरली . स्मिता पळत जावून तिच्या बाकावर जावून बसली . आज मंजुश्री तिच्या आधी येऊन बसलेली . तिला आश्चर्य वाटले पण विचारायच्या आधीच सर वर्गात आले पण . खाली मान घालून बसलेली मंजुश्री काही उठली नाही , मग तर स्मिताला जास्तच आश्चर्य वाटले . काय झाले या पोरीला ? आधीच होमवर्क पूर्ण नसते हिचे म्हणून सरांची नेहमीची टार्गेट ती आणि आज जर पहिले सरांनी तर बिचारीचे काय होईल ? स्मिताने हलवण्यासाठी तिच्या गालाला हात लावला तर ओला झाला कि हात ! अरे देवा म्हणजे हि रडते आहे ...बिचारी पुन्हा सावत्र आईने काहीतरी त्रास दिला म्हणायचा . बिचारी तिथून आगीतून निघते आणि इथे फुपाट्यात पडते ! काही जीव असे प्राक्तन घेवून जन्माला का येत असतील ? पण यांची कीव करणेही चुकीचे ..त्यात मंजुश्रीची तर नक्कीच करू नये . किती वसकन बोलते हि ? कुणाच्याही अंगावर धावून जाते . कुणी काही म्हणयला तिला तर हि डाफरलीच समजा ..म्हणून तिला एकही मैत्रीण नाही या अख्या वर्गात . का असे करत असेल ती ? माझ्या विचारक्षमतेच्या बाहेरचे आहे हे सारे ..पण हिनेही थोडे परिस्थितीशी जुळवून घेणे अपरिहार्य आहे पण या मंजुश्रीला समजेल तर शपथ ..का रडत असेल हि ?
“येस सर ..” अरे देवा नशीब मी हजेरी दिली नाही तर ...सर एकदा लक्ष नसले तर पुन्हा किती गयावया करा पण हजर  मांडीत नाहीत ...चौधरी सर !!!
“मंजुश्री ...ये मंजुश्री...” हळू आवाजात मी तिला हाक मारली आणि हलवत राहिले .
“येस सर ..” तिने आता मात्र उठून प्रेझेंटी दिली .चेहरा लालबुंद झालेला , आणि त्यावरच्या पुटकुळ्या तर आणखी उठावदार झाल्या . नाकाचा तोलांब शेंडा गाजरासारखा  गुलाबी लाल झाला होता . आवाजात एक खोल लय होती . कुठेतरी मधेच तो कंप पावत होता . सरांनीही वर मान करून तिच्याकडे पहिले आणि नाकावरचा चष्मा वर सारत पुन्हा हजेरीपुस्तकात डोके खुपसले . स्मिता मात्र हादरून गेली . काय झाले असेल हिला ??
    तो पूर्ण तास ती मंजुश्रीच्या विचारात गढून गेली . मंजुश्रीही अधून मधून डोळे पुसत होती . नाक पुसून आणि डोळे पुसून तिचा रुमाल पुराओला झाला होता . स्मिता कधीच रुमाल बाळगत नव्हती . मंजुश्री तिला अनेकदा म्हणायचीही कि रुमाल का नाही ठेवत ? तर तिचे उत्तर तयार असे मी रडत नाही आणि शेंबडीही नाही , त्यावर ती खळखळून हसे . पण मंजुश्रीला यात काही हसण्यासारखे आहे असे कधी वाटत नव्हते आणि ती फक्त तोंड फिरवत असे आणि म्हणे यात काय हसायचे ? कशाला पण हसू नये स्मिता , बाकीचे म्हणतील कि वेडी आहे का ? स्मिता मनात म्हणे वेडी म्हटले न तरी चालेल मला मंजूश्री पण कुणी कधी मानुसघानी म्हणू नये यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील . पण मनातच कारण असे जर स्मिता समोर बोलली तर मंजुश्री दोन दिवस तरी अबोल झाली असती आणि शेवटी स्मितालाच लहान बापाची होऊन तिची माफी मागावी लागली असती . स्मिताचा स्वभावच होता तो कि ती कोणाला अबोल पाहू शकत नव्हती आणि कितीही मोठा अपराध असेल समोरच्या व्यक्तीचा तरी ती माफ करायला कधीही मागेपुढे पाहत नव्हती .. तिच्यासाठी नाते हे तिच्या अहंकारापेक्षा मोठे होते !!
     एकदाचा तास संपला आणि आज विशेष म्हणजे चौधरी सरांनी कुठलेही प्रश्न विचारले नव्हते आणि होमवर्क पण दिले नव्हते फक्त शिकवले होते ...आतापर्यंत मनात गर्दी करून राहिलेले प्रश्न स्मिता आता मंजुश्रीला विचारू लागली .
“काय झाले मंजुश्री तुला ? का रडतेस सांग तरी ..” स्मिताने अलगद तिच्या केसांवरून हात फिरवून तिला विचारले . तिच्या त्या मायेच्या स्पर्शाने मंजुश्री हुंदके देत रडू लागली आणि अलगद तिच्या गळ्यात पडली . इतक वेळ विचारांनी चक्रावून गेलेली स्मिता तिचे अश्रू पाहून आणखीच हळवी झाली आणि तिच्याही डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली. थोडा वेळ तिने मंजुश्रीला रडू दिले , मग हलकेच तिचे डोके वर उचलून तिला भरल्या डोळ्यांनी पहिले . स्मिताच्या डोळ्यात पाणी पाहून मंजुश्री मात्र आतून हलली आणि स्मिताचे डोळे पुसू लागली .
“माझ्याकडून एक चूकच झाली बघ स्मिता , पण मी शपथ घेवून सांगते मी जाणून बुजून नाही केली ग ...”
स्मिता तिला डोळ्यानेच काय म्हणून विचारले , कारण तिला वाटले आपले शब्दही आता ओले होऊनच बाहेर येतील ..
“अग मी आज लवकर आले मला भूमितीचे मागचे लिहून काढायचे होते , तुझ्याकडून म्हणूनच मी काल वही नेली पण रात्री मी लगेच झोपले आणि सकाळी तर तुला माहित आहे मला स्वतःचा डबा करावा लागतो . मग वाटले इथे काही लिहिणे शक्य नाही म्हणून लवकर आले . मी लिहित होते . वर्तुळ काढताना माझ्या हातून कर्कटक निसटले आणि अर्पिताच्या पायावर उडून लागले .. वरून पडल्याने ते तिच्या पायात घुसले ..खरंच स्मिता मी मुद्दाम नाही ग मारले ..” आणि पुन्हा मंजुश्री रडू लागली ..
“अरे देवा इतकेच ? आणि यासाठी तू रडतेस मंजुश्री ? अर्पिताला सांगायचे न कि मी मुद्दाम नाही केले ..माफी मागायची ..”स्मिताला हसावे कि रडावे हेच कळत नव्हते ..काय वेडी मुलगी यासाठी रडते ..अर्पिता काय राक्षस आहे का कि हिला खावून टाकेन ? वेडीच आहे ...
“स्मिता इतके सोपे असते तर मी रडले असते का ग ?”
“मग झाले काय असे अवघड ,,आणि सांगायला इतका वेळ लावला ..” प्रश्नार्थक नजरेने आणि वैतागल्या चेहऱ्याने ती मंजुश्रीकडे पाहू लागली .
“अर्पिताचे आणि माझे काल शाळा सुटताना भांडण झाले होते ..ते माझ्या लक्षात पण नव्हते ग ..आणि अर्पिता म्हणतेय कि तू मुद्दाम कालचा कसूर काढण्यासाठी आज असे केले ..खरच स्मिता मी माझ्या मृत आईची शपथ घेवून सांगते असे माझ्याकडून अजाणतेपणी झाले ...” आणि पुन्हा मंजुश्रीच्या डोळ्यातून अश्रुधारा उसळत बाहेर येऊ लागल्या ..
“हो मंजूश्री , तू आईची शपथ नको घेवूस ..मी जाणते तू खोटे बोलत नाहीस ..पण बघ बर कुठल्याही मुलीशी पटवून न घेणे किती त्रासदायक झाले ..तू तुझा मीपणा कुरवाळत बसलीस आणि सारे तुझ्यापासून दूर होत गेले . थोडे कुठे तरी आपल्या अभिमानाला मुरड घालावी लागते ..समाजाबरोबर राहायचे तर समाजासारखे राहावे लागते ग ..कुणी थोडे बोलले म्हणून त्याला लगेच दूर लोटू नये किंवा मनात जरी राग आला तरी तो ओठांना पण माहित करू नये . मग कुणीच आपले राहत नाही ..एखादी व्यक्ती संपूर्ण चांगली असूच शकत नाही आणि तिच्या गुणदोषासकट आपण जेंव्हा तिला स्वीकारतो तेंव्हाच एखादे नाते मार्गक्रमण करू लागते ..म्हणशील लागली म्हातारी प्रवचन द्यायला ..पण खरे सांग मी जे म्हणते ते पटते न तुला ?” तिचा हात घट्ट दाबत स्मिता तिला म्हणाली . अश्रुनी गच्च चेहरा वर उचलत मंजुश्रीने मान हलवून होकार दिला . तिच्या चेहरा स्पष्ट सांगत होता चुकले मी स्मिता ...तिचे व्याकुळ डोळे तिच्या चुकीच्या स्वभावाची  माफी मागत होते..तिचे मन पश्चातापाने भरून आले होते ..डोळ्यात दाटलेले ढग मात्र पुढच्या ..शिक्षेच्या भीतीने धास्तावले होते ..
“असू देत आपण अर्पिताला सांगू ..तिची माफी मागू ..मी सांगते तिला ती माझे नक्की ऐकेल ..” तिच्या केसातून हात फिरवत स्मिता तिला समजावत होती ..
“सारे संपले स्मिता ...मी तिचे पाय पकडले तरी तिने ऐकले नाही ..ती मुख्याध्यापक बाईकडे गेली आणि तक्रार केली ..त्यावेळी म्याडम खूप ओरडल्या मला ..अशी खुनशी मुलगी नको शाळेत म्हणाल्या ..त्यांनी चौधरी सर ठरवतील असेही सांगितले ..आता काय होईल ग स्मिता ? सर तर मला जराही माफ नाही करणार ..”आणि मंजुश्री आता धाय मोकलून रडू लागली .. तिचे कढत अश्रू स्मिताला अस्वस्थ करत होते . स्मिता समजत होती इतके हे प्रकरण सहज नव्हते . मंजुश्रीला तिचा दाखला हातात मिळणार होता ..डायरेक्ट शाळा सोडावी लागणार होती .. आता मात्र स्मिता चक्रावून गेली ..या नकळत घडलेल्या चुकीचे इतके मोठे प्रायश्चित ? आज जर मंजुश्रीला काढले शाळेतून तर तिचे शिक्षण इथेच थांबणार होते ..ती खूप हुशार होती असे नाही पण शिकण्याचा तिचा अधिकार एका नकळत , अजाणतेपणी झालेल्या चुकीचा बळी ठरणार होता ..तिचे आयुष्य बदलणार होते ..
“नको रडू मंजुश्री ...आपण सांगू सरांना ..मी सांगेन ..” स्मिताचे डोळेही वाहू लागले . तिला समजत नव्हते कि खरच या शब्दांना काही अर्थ आहे का ? का मी उगीच बोलते आहे .चौधरी सर कुणाचही ऐकणार नाहीत . आणि शिक्षक कुणी यामध्ये पडणार नाहीत . चौधरी सरांचा शब्द शेवटचा ..आणि या पाषाणहृदयी सरांना मंजुश्रीच्या भविष्याशी काहीच देणे घेणे नाही . त्यांच्या काळजाला पाझर फुटणे अशक्यप्राय आहे .. बिचारी मंजुश्री ..इतक्यात शाळेचे शिपाई मंजुश्रीला बोलवायला आले . ती आता भीतीने थरथरत होती ..लालबुंद झालेला तो चेहरा आणि तिचे थरथरणारे अंग ..पडते कि काय असेच क्षणभर वाटले . पण जाने भाग होते ..ती तशीच जड पावलांनी चालत जाऊ लागली ..मधेच बाकाचा आधार घेत होती ..तिची अशी दयनीय स्थिती पाहून पुरा वर्ग शांत झाला . सार्यांच्या नजरा तिच्याकडे होत्या . साऱ्यांच्या डोळ्यात भीतीचे सावट दिसत होते आणि अर्पिता मात्र छदमी हसत होती . हे पाहताच स्मिताच्या तळपायाची आग मस्तकात शिरली ..आणि ती ताडकन उठून अर्पिताकडे आग ओकणारा कटाक्ष टाकून मंजुश्रीच्या मागे गेली ..मंजुश्रीच्या आधी जावून ती सरांच्या पुढ्यात उभी ठाकली ..ती काय बोलणार आहे हे तिलाच कळत नव्हते पण ती खूप निश्चयी चेहऱ्याने तिथे उभी होती ..
“सर मला कळते कि याविषयी मी बोलू नये ..तुम्ही जी शिक्षा याबद्दल मला द्याल ती मला मान्य आहे .पण तुम्हाला माझे बोलणे ऐकावे लागेलच आणि हे ऐकून तुम्ही तुमचा निर्णय द्यावा . मंजुश्री चुकली ..खरच चुकली पण अजाणतेपणी ..तिच्या डोक्यात काहीच राग नव्हता अर्पिता बद्दल ..मलाही आधी असेच वाटले कि कालच्या भांडणाचे तर नाही न तिने उसने फेडले ..पण नाही सर मंजुश्री रागीट आहे , अलिप्त राहते ती कुणाशी जमवूनही घेत नाही पण ती क्रूर नाही सर ..फक्त तिला परिस्थितीशी जुळवून घेता येत नाही ..याला कारण तिच्या घरातील तिचा होणारा छळ कारणीभूत आहे . ज्या मुलीला आईची छाया नाही तिला चांगले वाईट कोण सांगणार .. सावत्र आई फक्त तिचा उपयोग करते ..तिचा छळ करते म्हणून मंजुश्रीला सारे जगच मतलबी वाटते ..आणि काय चूक आहे सर असे वाटले तर ? पण आज जेंव्हा तिला तिच्या या अलीप्ततेचा दुष्परिणाम दिसला तेंव्हा तिचे तिलाच समजेल ..अनुभव जे काही शिकवतो ते काळजात रुतते सर ..आणि हे रुतलेले तिला बदलणार आहे . आपण जर तिला बदलायला चान्स नाही दिला तर तिचे आयुष्य कसे सावरेल सांगा न सर ? आणि आपण माणूस आहोत ...चुका न करायला देव नाही .तिच्याहीकडून नकळत चूक घडली पण त्याची अशी , शाळेतून काढण्याची शिक्षा देवून आपण काय मिळवणार सर ? हो ती खूप काही गमावणार ..तिचे शिक्षण इथेच थांबणार ..लग्न होणार पण स्वभाव बदलणार नाही ..कारण ती शिकणारच नाही माफ करणे काय असते ? ती एक क्रूर मुलगी नाही हो पण क्रूर स्री नक्की बनेल ..पण याउपर तुम्ही तिला माफ केलेत तर तिला सुधारण्याचा चान्स मिळेल तिलाही कळेल कि प्रेमाने राहिले तर जग आपलेच असते अगदी सख्खे आपले ..नाती बनवताना पहिला धडा असतो समोरच्या व्यक्तीची आजूबाजूची परस्थिती बऱ्याचदा त्याच्या वागण्याचे प्रतिबिंब असते ..आणि त्या सर्व गोष्टींचा विचार करून , स्व:ताला त्याजागी ठेवून आपण कसे वागलो असतो हा विचार करून मगच समोरच्याला माफ करायचे का ? हे ठरवावे ..आणि माफितून कुणाचे आयुष्य बदलणार असेल कुणी सुधारणार असेल , कुणाला खरंच झालेल्या चुकीचे परिमार्जन करायचे असेल तर तिला माफ करणे देवाचे नाही माणसाचे कर्तव्य आहे .. म्हणून सर चुकतो तो देव आणि सारासार विचार करून चुकीला माफ करतो तो देवमाणूस !” एका दमात स्मिता सारे बोलून गेली काय बोलली तिला काही आठवत नव्हते , मात्र सारे शरीर थरथरत होते भीतीने आणि दु:खाने ! इतका वेळ खाली पाहून बोलणारी स्मिता सरांकडे पाहू लागली ..तिच्या डोळ्यात गर्दी केलेले अश्रू सरांच्याही डोळ्यात दाटले होते ..आभाळ गच्च झाले होते ! सरांनी स्मिताच्या डोक्यावरून हात फिरवला ..आणि रुमालाने डोळे टिपले ..पाषाणाला पाझर फुटला होता ..नारळाच्या पाण्याची आणि फणसाच्या गराची आठवण स्मिताला झाली ..खर आहे महामुनी म्याडम ...प्रत्येक कठोर माणूस खूप हळवा असतो !

                          

Wednesday, 26 August 2015

अथांग

माझे अथांग हे जल
परि भरलेले मन
अर्पिलेले श्रीफल
बघ येई परतून

दैव देते खुप सारे
हवे तेव्हडेच घ्यावे
हाव कधी ना संपते
ज्याचे त्याला पुन्हा द्यावे

होय माणसा माणूस
तुला कळू दे रे रीत
प्रत्येकाला मिळो घास
नको वागू विपरित

मोठा हव्यास हा तुझा
घाल आवर रे त्याला
रिता होणार हा आहे
उद्या भरलेला पेला

कौतुक तुला भारी
माझ्या माघारी देण्याचे
भरल्या ओंजळीला
बंद मार्ग हे येण्याचे

नको ओंजळ फुलांची
नको दान श्रीफळाचे
नको दुर्घंदित करू
निर्माल्यने जल माझे
   संध्या .

Friday, 21 August 2015

सुवर्णसंध्या ..माझी प्रेरणा

आदरणीय सुवर्णसंध्याजी ,

         गेले अनेक दिवस तुमच्याबद्दल लिहिणे मनात होते . पण आजच्या तुमच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लिहिण्यासारखा सुवर्णयोग नक्कीच कुठला नसेल ! मला तो दिवस आजही जसाच्या तसा आठवतो जेंव्हा तुम्ही माझ्या संवेदनशील असण्यावर दिलेली प्रतिक्रिया आणि माझ्या लेखनाचे केलेले कौतुक .. पुन्हा तेच सांगण्यासाठी केलेला फोन .. आज साऱ्यांनी तुमच्याबद्दल कौतुकाने लिहिले आहे ..आणि सारे किती सत्य आणि मनापासून नव्हे मनाच्या आतून लिहिलेय जागरकरांनी हे सांगणे न लगे .. तुम्ही आहातच तशा ! प्रत्येकजण जो तुम्हाला भेटेल त्याच्या मनात तुमच्याबद्दल नकळत आदरमिश्रितकौतुक उभे रहाते आणि खोलवर बिंबले जाते .. कायमचे ! मी आज इथे तुमचे माझ्या आयुष्यातील स्थान सांगणार आहे कारण तुमचे अनेक पैलू आहेत जे उलगडणे एका लेखात नक्कीच शक्य नाही .
     मी काही पहिल्यापासून लिहिणारी नाही किंवा आयुष्यातील इतर धावपळीला बाजूला ठेवून पूर्ण झोकून साहित्याचा व्यासंग करणारी कुणी विदुशीही नाही . आहे एक संसारात , व्यवसायात आणि नातेवाईकांच्या गराड्यात हरवलेली एक अशी स्री जिला तिच्या घराच्या चार भिंतीबाहेरील जग अपघातेनेच कळते . या सुरक्षित आयुष्यात असे अपघात घडले आणि मी संवेदनशील होवून लिहू लागले . त्यात माधुरी आणि सुजित दादांच्या माध्यमातून तुमच्याशी परिचय झाला आणि प्रेमाचे जिव्हाळ्याचे हे नाते माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम नाते बनले .. असेही प्रत्येक नात्याला नाव हवे असे काही नाही परंतु माझ्या मनात तुम्ही गुरुस्थानी असलेली मैत्रीण आहात ! जिथे जिव्हाळ्याचे सारे बोलूही शकते आणि जिथून सतत प्रेरणादायी , मार्गदर्शक , सर्वोत्तमाच्या निर्मितीसाठी लागणारे सारे काही मला मिळते . .. माझे लेखन फक्त भावनिक पातळीवर होते , ते कसे चांगले आहे हे तुम्ही आधी सांगितलेत आणि हळुवारपणे हेही समजावलेत कि ते अभ्यासपूर्ण असायला हवे .. कळत नकळत (त्या वेळी ) तुम्ही जे मार्गदर्शन केले , जे दुवे सांगितले लिहिण्यासाठी ते वाचल्यावर माझ्या लक्षात आले मी किती कुंपणात लिहित होते ,,त्या कुंपणाबाहेर जावून .. अभ्यासूपणे लिहून .. ज्या स्रीयांची दु:खे मी सांगत आहे त्यांना न्यायही मिळवून देऊ शकते .. त्याच वेळी तुमच्याबद्दल एक न कधी लयाला जाणारी आदरभावना मनात वृद्धिंगत झाली .. मैत्रीच्या नात्याने हळुवारपणे तुम्हीं माझ्या प्रेमळ गुरुही बनलात ..
          तुमच्या आयुष्यातील चढउतरांबद्दल मी सतत इतरांकडून ऐकत आले परंतु इतक्या वेळा संभाषण होवूनही तुम्ही कधीच ते बोलल्या नाहीत .. तुमची सर्व क्षेत्रातील अभ्यासू दृष्टी सतत तुमच्या बोलण्यातून मला दिसायची ..अभ्यासू दृष्टी तर सारेच जोपासतात परंतु तुम्ही कृतीतून त्याला आकार देत आहत यासारखी स्पृहणीय गोष्ट कुठलीच नसेल ..बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !
             स्वत:च्या मर्यादांना कधीच कुंपण होऊ देऊ नका , त्यांच्या बाहेरचे जग पाहण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे ..त्या मर्यादा ओलांडून पुढे जायलाच हवे आणि त्यातूनच स्व:उत्कर्ष साधणार आहे ..तुमच्या सांगण्यातून ..तुमच्या जगण्यातून मी हे नक्कीच घेत आहे .. आजवर कुंपणात गुंतलेली मी.. खरा खुरा प्रयत्न करत आहे स्वतःसाठी जगण्याचा ..अंगीच्या कलेला जोपासण्याचा .. तत्वांना मुरड न घालता त्यांचे संगोपन करण्याचा ..विवेकबुद्धी जागृत ठेवून नवे ते आत्मसात करून विवेकवादी विचारांनी समृद्ध होत विवेकपूर्ण समाजनिर्मित्तीत स्वतःच्या लेखनातून आणि कृतीतून भर घालण्याचा ... तुमची सदैव ऋणी असले मी तुम्ही दिलेल्या जीवनदृष्टीबद्दल ........
            तुमच्या आयुष्यातील या संस्मरणीय क्षणी माझ्या शुभेछ्या जरी यत्किंचित असतील तरी त्या नक्कीच माझ्या आतील आवाजाच्या आहेत .. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेछ्या ... आपल्या सर्व आकांक्षा पूर्ण होवोत आणि त्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच सदिछ्या ...
                               - डॉ. सौ . संध्या राम शेलार .
 सुवर्णसंध्याजी विषयी आमच्या व पु जागर वर आलेल्या काही वाढदिवसाच्या शुभेछ्या इथे देत आहे .

  डॉ . शिवाजी काळे -


कवी हनुमंत चांदगुडे -

डॉ . सुजित अडसूळ -
मा. सुवर्णसंध्याजी .
आज आपला वाढदिवस आहे .
आपण समाजासाठी , निसर्गासाठी , पर्यावरणासाठी जे काम करत आहात त्याला तोड नाही . येणारा प्रत्येक दिवस आपणास अखंड उर्जा देत राहो .
मराठी साहित्यात एक उत्तम समीक्षक म्हणून आपले स्थान आहे . नवोदित कवी व लेखकांना आपण सतत मार्गदर्शन करताना संदेश हि देता . त्यामुळे आपला फ्यानक्लब आपल्या प्रतिक्रियेची आतुरतेने प्रतीक्षा करतो .
घरच्या सर्व आघाड्या पेलत सर्वच प्रांतात आपण सहज वावरत असता .
आपणास दीर्घायुष्य लाभो आणि आपला प्रत्येक क्षण इतरांना जगण्याची प्रेरणा देवो . हीच शुभेछ्या ...

डॉ . शुभा लोंढे-
 सुवर्णसंध्याजी

एक दिलदार सखी
माझ्या जागराची शान
काय वर्णावा तिचा महिमा
वाखाणण्याजोगा अपूर्व बाणा
कवीच्या प्रेरणाची स्वर्णकिरण
करी सदर मार्मिक विश्लेषण
समीक्षक व्याख्याती किती हे आभूषण
भरकटलेल्या समाजाची आशा
प्रत्येकाच्या सुखदु:खांची मनीषा
लाखोंची प्रेरणा अन उत्कर्षा
स्ववेदनेला तारले हरल्या निराशा
निसर्गाचे देणे त्यांनीच बहरावे
पक्ष्यांच्या विकासा धडपडावे
पोषक सुखसोईने त्यांना उभारावे
संवर्धन निसर्गाचे आदर्श जोपासावे
मायेच्या ममतेने ममतेने करी
सर्वांच्या लिखाणाचे कौतुक
शब्द शब्दात झळके विलक्षण
तेजाचे अपार प्रेम स्नेह सहेतुक
सदैव बहरावी तुझी प्रतिभा
चमकावी बुद्धी तेजाची आभा
अनंत भरारी घेवून आकाशी
मनिषा तव उदंड आयुष्य लाभो
 डॉ शुभा प्रशांत लोंढे .

सुनिता -
सुवर्णसंध्याताई ,
तुमच्यासारख्या निसर्गप्रेमी व्यक्तीचा वाढदिवस श्रावणात असणे किती सुंदर योगायोग !  जगायला शिकवणाऱ्या श्रावणाने अशी तुमच्यासारखी संवेदनशील कर्तव्यदक्ष माणसे बहाल केली . आपली लेखणी सदैव बहरत राहो श्रावणातील हिरवाईसारखी ..तुम्ही आमच्या लेखणीची प्रेरणा आहात . तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ..आरोग्य लाभो ..

डॉ माधुरी बोथटे -


अशा अनेक शुभेछ्या आहेत वेळेअभावी इतक्याच सांगितल्या ..