या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Thursday 17 November 2011

मला भीती वाटते ...

     मला भीती वाटते .....जेव्हा कधी सुख हुरळून माझ्या पदराच्या दिशेने धाव घेतंय असं भासलं मी पदर पकडून बसून तशीच उभी राहिले ...सुख मात्र मला हुलकावणी देत दुसरीकडेच ...मी वेडी एका क्षणाची भुकेली पण उन वाराच मिळाला अन्न पाणी कधीच नाही ...विज्ञान शिकताना वाटायचं धन आणि ऋण सारखेच असल्याशिवाय वस्तू स्थिर राहायची नाही तसच आयुष्य असेल ...धन ऋण सारखेच मिळतील ...पण फक्त ऋण मिळूनही माझं आयुष्य इतकं स्थिर कसं आहे ! आश्चर्य आहे नाही ? मन सतत एकाच प्रश्नाचा पाठपुरावा करत असे विज्ञानाचा नियम माझ्या आयुष्यात चुकीचा का ठरला ? का मी अपवाद आहे ? अपवादाचा शिक्का घेऊन तशीच जगत आहे ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ...
    मला भीती वाटते ...कुणी दु:ख वाटून घेणारे भेटले कि त्याच्याही पाठीवर  नियतीने आसूड टाकला ...त्याचं दु:ख पाहून पाऊस डोळ्यात दाटला ...आईने  सांगितलेलं सुखं वाटावीत दु:ख स्वताची स्वतः भोगावी ...पण ती मिळायच्या आधीच ...ते कापरासारखं हवेत विरघळले तर काय करायचे हे सांगायचं आई कशी विसरलीस तू ? आताशा तिलाही विचारायची भीती वाटते...तिला दु:ख होईल म्हणून ! कापूर ओंजळीत यायच्या आधी विरघळला ...वास मात्र नाकापर्यंत आला ...त्यावर समाधान पावले ...नाही ...मनाची समजूत काढली तशी ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ...
    मला भीती वाटते ...कुणाचं सुख चोरून घेताना ...त्याचा काय दोष आहे ...ते  माझ्या प्राक्तनात नाही याचा ! शेवटी मलाच माहित वेदना काय असतात ,कशा सहन कराव्या लागतात आपल्या जवळचं ओरबाडले जाताना ! चोरी करणे पाप आहे हे पाहिलं मी समाजात जेव्हा कुणी शिक्षा भोगताना दिसलं ...माझ्या जवळचं ओढून घेणाऱ्याने ते पाप म्हणून का नाही दूर लोटलं? त्याला सुख मिळाले मला आनंद आहे ...पण ते अंगवळणी पडताना आभाळ मनी दाटलेले आहे ...पण ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ...
    मला भीती वाटते ...चुकून ,अपवादाने मिळत जेव्हा थोडं सुख ,एखादा अणु असावा जसा या भल्या मोठ्या पृथ्वीवर ! शोधत राहते अनेक गणितं मनात ठेऊन ...मिळाल्याची जाणीव होते पण बाकीचे दाखवायला टपलेले असतात ...मी कशी चूक आहे ते ... आणि सिद्धही करतात स्वताला ...मी मात्र सिद्धता शोधातच राहते ! कधी सापडेल मला ? सापडेल सापडेल मी मनाला दटावलं आहे ...पण ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ...
    मला भीती वाटते ... घामेजलेल्या माझ्या हातात जरी सुख आलं तरी नाही न जाणार निसटून ?  समुद्राच्या काठच्या त्या वाळूसारखं ...निसटतेहि ते ...मी विचार करते मी तर घट्ट आवळल्या मुठी ,मग काय बिघडलं? मला लाभणार नसेल तर का मला हुलकावणी देत हे ? प्रश्न मनात यायच्या आत ...मी त्याला समजावते गंधाळेल कधीतरी ती गुलाबी फुलांनी वाकलेली ,कागदी फुलांची वेल ! आणि सापडेल मला पाणी त्या भयानक वाळवंटात ...मृगजळामागे धावत आहे मी उर फुटेपर्यंत ...पण ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ......................... 

No comments: