या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Wednesday 10 October 2012

नाते तुझे अन माझे

नाते तुझे अन माझे
हृदयातून अंकुरले
प्रेमाच्या सहवासाने
उमलून फुल झाले

सावलीच्या आवडीने
चिमण्या विसावला तू
शीतल मम सावलीने
 पाखरा हरखला तू

माझिया छायेचा पिला
तुज असा मोह झाला
सुगंधी मज फुलांची
ओढ तुझ्या अंतरीला

चिमण्याच्या बाळलीला
बघण्यात दंग झालो
निरागस या हास्याला
पाहण्यात गुंग झालो

क्षणांमध्ये मधुर त्या
बेधुंद असा जगलो
सह्जीच वार्धक्या त्या
विसरून बघ गेलो

अंत समयास परी
काळ नाही विसरला
गेली पर्ण पुष्पे सारी
मम देह शुष्क झाला

तू व्याकुळल्या पाखरा
घिरट्या नकोस घालू
लाभणार नाही आता
सुखाचा हिरवा शालू !!!

       दोन प्रसंग मला या कवितेची प्रेरणा देवून गेले , हे प्रसंगही बऱ्याच अंतराने घडले जवळजवळ दोन तीन महिन्याच्या पण असे मनात गुंतून राहिले कि दुसरा घडला आणि कविता पूर्ण करून गेला . एकदा अशीच संध्याकाळी मागच्या गच्चीत बसले होते . थोड्या अंतरावर एक निष्पर्ण झाड होते . मावळता दिवस पाहत बसलेली , दिवस मावळून गेलेला आणि अंधार होत होता . शक्यतो या वेळी पक्षी नसतात आभाळात फिरणारे म्हणजे नव्हतेच . पण एक पाखरू त्या निष्पर्ण झाडावर घिरट्या घालत होते . म्हणजे जायचे , परत यायचे असे अनेकदा म्हणजे लक्षात येण्यासारखे जवळजवळ वीस पंचवीस वेळा तरी असेल .
       या नंतर मी थोडे कडवे मनात तयार केलेले त्याच वेळी आणि घरात येवून पुन्हा एका वहीवर उतरून काढले . तीनेक महिने झाले या गोष्टीला , ओपीडीत पेशंट पाहत होते . एक बाबा आले ८० वय असेल आत आले एकटेच होते . त्यांना टेबलवर चढून झोपणे अशक्य होते मदतीशिवाय . सिस्टर आणि मी मदत करून वर चढवले आणि तपासून त्यांना औषध द्यायचे होते पण त्यांना ब्लड प्रेशर साठी एक गोळी चालू ठेवणे गरजेचे होते हे त्यांच्या ध्यानात नाही राहायचे म्हणून मी सिस्टरला सांगितले त्यांचे कुणी बसले असेल तर बोलाव त्यांना सांगते , तर बाबा रडायला लागले . " बाई , काय सांगू तुला आता पर्यंत तीन चार वेळा मी आलो तर कुणीच नसते सोबत , मुलांना गरज नाही म्हाताऱ्याची नातवंडे येतात अरे बाबा चल चल करून तर दारात सोडून निघून जातात . एक मुलगी आहे तुझ्यासारखी देते येत जाता पैसे त्यावर चालतो दवापानी . माझ्या नावावर भरपूर जमीन आहे , उस जातो पोरांच्या नावे पैसे पण त्यांच्या खात्यावर , जमीन दुसऱ्या कुणाला कष्टायला दिली तर किती पण पैसे येतील पण कुठे म्हातारपणी असं भांडत बसू , आणि हसू करून घेऊ भावकीत . बर आहे झाकली मुठ सव्वा लाखाची , कधीतरी जायचे असेच !" ते घिरट्या घालणारे पाखरू चमकून गेले मनात आणि ती वही काढून मी पूर्ण केली कविता !
       प्राण्यांना पण केलेल्या उपकाराची जाण असतें माणसाला ती कधी येईल ?

Monday 8 October 2012

का कुणास ठाऊक ?

    अनिमिष नेत्रांनी तो खळाळता समुद्र न्याहाळत होती स्मृती ! उनाड वारा सागराच्या पोटात हळुवार गुदगुल्या करत होता आणि तो रत्नाकरही लहान मुल होवून खळखळून हसत होता , भोवती कुणी पाहते आहे याचे भानच जणू नव्हते त्याला ! जसा तो हसे पवनराजा आणखी चेकाळत होता , त्या दोघांची मस्ती मात्र संपत नव्हती , ती प्रत्येक लाटेत उमटत होती आणि ती चहाडखोर लाट ते येवून किनाऱ्याला सांगत होती ..स्मृती मात्र त्या लाटेला समजावत होती ..' अगं लहान मोठ्या कुणीही आनंद असाच उपभोगायचा असतो निर्मल मनाने !प्रत्येक जीवाला ती जणू ओढच असते बघ ..निखळ हास्याची ! कुणी या निर्मल हसण्याला मनाच्या अश्या एका अडगळीच्या कप्प्यात फेकून देते तर कुणी नयनात साठवून ठेवते ! आणि जीवनातील प्रत्येक क्षणात मुखकमलावर सांडून देते !' ती लाटही मग समाधानाने तिच्या पायाखालची रेत घेवून पुन्हा सागरात परतली !
     स्मृती जणू आईची झेरॉक्स कॉपीच होती , पण तिच्या अंतरंगातील कोमल निर्मल विचार हि ती स्मृतीच्या हृदयात पेरून ती कधीच स्मृतीला पोरकी करून गेली होती , स्मृतीचे बालपण भर दुपारच्या त्या रुक्ष आणि रखरखीत रस्त्याप्रमाणे करून ! खूप मोजकी प्रेमाची आपुलकीची नाती तिच्या आयुष्यात होती , दुपारी असणाऱ्या विरळ वाहतुकीसारखी ...दुपारी तळपणारा सूर्य जसे फोड उठवतो त्या काळ्या डांबरीवर तशी रोज नव्यानेw येणारी दु:ख्खे तिच्या मनावर वेदनांनचे फोड उठवत होती ..तिच्या मनाला रोज अधिक कठोर बनवत होती ! एखादे वाहन थांबावे तसे लोक तिच्या आयुष्यात येत होते पण काही स्वार्थ ठेवूनच , बिघडलेली गाडी ग्रीस आणि घाण ठेवून जाते तशी ती माणसे तिला वेदना ठेवून निघून जायची ...तिच्या भावनांना अधिक कठोर करत आणि तिचे हसणे हिरावून घेत ...या रखरखीत आयुष्यात आईचे शब्द तिला श्रावणसरी होवून भिजवत , मग वेदनाही ती हसत रिचवत जात होती , पुढे पुढे चालत होती ! सरींचा तो थंड स्पर्श तिला आठवण  द्यायचा तिच्या आईच्या मायाळू मनाने तिच्यावर शिंपलेल्या शब्दांचा , ते शब्द ती उराशी कवटाळून होती , कुठल्याही क्षणी ती ते विसरत नसायची . आईने सांगितलेले , 'बेटा खूप शिक ..शिक्षणाने सर्व मिळेल तुला ,आदर ,धन , समाधान , ज्ञान आणि प्रेमही .' याच एका आश्वासनावर ती कष्ट करत होती . मात्र कष्टाचे उठणारे व्रण तिला कठोर बनवत होते .. कठोर शब्द ..कठोर चेहरा .. कठोर शिस्त ...
       कष्टाचा मार्ग कितीही काटेरी असला तरी, तो कधी अश्या विजयी वळणावर येवून स्थिरावतो ,तिथे घामाचे  मोती होतात ! जसे उष्णतेने पाण्यापासून ढगांचा पुंजका होतो आणि थंडीने बर्फ ...दोन्ही शुभ्र ..प्रत्येक नजर कौतुकाने त्यावर स्थिरावते, त्या जीवाला झालेल्या कष्टांचा विसर पाडते ...आणि ते मन अतिआनंदाने समाधानाने फुलत जाते ! काही क्षणांसाठी ! परत घाम ..मेघाचे पाणी ...बर्फाचे पण पाणी ...कष्टाच्या मार्गावर विसावलेला जीव पुन्हा ते सुखाचे वळण सोडून पुढे चालू लागतो ..किती क्षणभर सुख ! स्मृतीने तेही अनुभवले जेंव्हा ती दहावीत पहिली आली ..बारावीत आली ...आणि कला शाखेच्या पदवीत तर पूर्ण विद्यापीठात पहिली आली ! तिच्या कष्टाचे भरभरून फळ वरचा तिला देत होता मात्र एकटेपणाचा शाप तिचे आयुष्य व्यापून उरला होता !
       आता काकाची आणि मामाची मुले मोठी झाली होती ..त्यांच्या दृष्टीने ती आपले पडेल ते काम करणारी ताई होती फक्त ! मामाकडे बिनसले कि काकाकडे आणि काकू काही बोलली कि मामी , हि तिची ससेहोलपट मात्र थांबत नव्हती निलगिरीच्या ताडमाड झाडाप्रमाणे जास्त वारा आला कि जमिनीला टेकायला यायची, आता मोडते कि काय असा भास व्हायचा ..आणि वादळ शमले कि पुन्हा पहिल्यासारखी ताठ उभी राहायची !
         तिच्या वाढत जाणाऱ्या वयाबरोबर वाढत जाणारे रूप तिला शाप भासावे असे प्रसंग तिच्या आयुष्यात उभे राहत गेले . उमलणाऱ्या हजारी मोगऱ्याच्या सुगंधाप्रमाणे असणाऱ्या तिच्या प्रेमभरल्या भावना तिने कधी दिसू मात्र दिल्या नाही , वरचे रूप तिला इतके क्लेशदायक होते तर तिच्या सुगंधित मनाचा दरवळ पसरला तर तिला खुड्णारे अनेक हात जन्माला येतील हि भीती तिच्या जीवाचा थरकाप करत होती . सागरातील लाटांप्रमाणे उसळणाऱ्या प्रेमभावनांना तिने इतके कोंडून टाकले कि एखाद्या डबक्यासारखे स्वरूप त्याला आले . एखाद्या व्यक्तीने सुंदर पुष्प समजून जवळ जाण्याचा प्रयत्न करावा आणि गुलाबाच्या फुलाला हात घालायच्या आधी काटेच टोचावे अशी अवस्था व्हायची तिच्या जवळ जाणाऱ्या तरुणाची . तिच्या शब्दांनी घायाळ झालेला तो युवक परत त्या रस्त्याला कधी जायचा नाही ! तिच्या या स्वभावाला शाळेतले सर्वजन ओळखून होते म्हणून कामाशिवाय तिच्याशी बोलणे सर्वजण टाळायचे . काकूला मात्र वाटायचे कसे होईल या पोरीचे ? लग्न होईल कि नाही ? कोण हिला जवळ करणार ? स्मृती मात्र ओळखून होती हे वांझोटे प्रेम ! कारण कितीही वेळा ती बोलली तरी किती  प्रेम आणि तळमळ या बोलण्यात आहे याचे मोजमाप इतक्या दिवसाच्या सहवासात स्मृतीने केले होते ! पण विनातक्रार ती या लोकांबरोबर आयुष्य काढत होती ...
         एकदम डोंगळे निघावेत आणि थोड्या वेळाने आले तसे गुडूप व्हावे तसे सकाळी मोकळे असलेले शाळेचे पटांगण क्षणात भरून जायचे आणि बेल झाली कि पुन्हा मोकळे व्हायचे , अश्या अनेक विचित्र कल्पना स्मृतीच्या मनात येवून जायच्या आणि मनाशीच ती हसायची मात्र चेहऱ्यावर उमटू देत नव्हती . डोंगळयाप्रमाणे अस्ताव्यस्त आयुष्य असलेली ती अकरावी बारावीची मुले मुली स्मृतीला भासायची , न गेलेल्या जीवनाचे दु:ख न येणाऱ्या आयुष्याची चिंता ! आलेला दिवस इतर मुलांबरोबर काहीतरी कीडमिड करण्यात संपवीत होती . या घोळक्यात अर्पितासारखी काही होती ज्यांना काही शिकण्याचा ध्यास होता आणि त्यासाठी ती धडपडत होती ...पण क्वचित ... कानाच्या भिंती फाडत जाईल अशी कर्णकर्कश्य बेल वाजली कि सारे डोंगळे एकामागे एक त्या दोन मजली  शाळेच्या इमारतीत लुप्त होवून जायचे . मग फक्त हळू आवाज कानात घुमत राहायचे ..एकमेकात गुंतलेली गुंतवळ जणू ..ते आवाज ओळखण्याचा प्रयत्न हि करायची स्मृती पण त्या आवाजाचे शब्द काही तिला उमगायचे नाही . नंतर हा शब्द ओळखण्याच्या खेळ बोर होई तिला .
    जे ते शिक्षक वर्गावर गेले कि हे सगळे आवाज शांत होवून जायचे . स्मृतीलाही पहिला तास ठरलेला होता ..सोम मंगळ बुध आकराविवर आणि उरलेले दिवस बारावी . स्मृती ला खूप आवडायचे शिकवायला , मराठी भाषेचे भांडार विध्यार्थ्यांपुडे खुले करताना एका अनामिक प्रेरणेने ती भारलेली असायची . मुलेही भारल्यासारखी तिचे शब्द कानात साठवायची . प्रत्येक कविता वा पाठ वा व्याकरणहि नाविण्याने शिकवणे ,त्याच्या मुळाशी जाणे आणि उमजेल अश्या भाषेत शिकवणे सर्व मुलांना आवडायचे . ती मुलांची आवडती स्मृती म्याडम  होती पण फक्त वर्गाच्या आत बाहेर गेली कि परत ती दगड बनून जायची . वर्गाच्या नंतर कुणी शंका विचारायला आले कि असे फटकारायची कि परत त्या मुलाची हिम्मत नाही व्हायची असा आगावूपणा करण्याची !
      त्या दिवशी तिचे पेपर चेकिंग चे काम जास्त वेळ चाललेलं , उद्याच लगेच पेपर द्यायचे होते . असेही घरी गेल्यावर तिला ते जमणार नव्हते , स्टाफरूम मध्ये बसून बराच वेळ तिचे हे काम चाललेले , वेळेचे भानच नाही आले तिला . जेंव्हा सर्व स्टाफरूम शांत झाली तेंव्हा उरलेले काम घरी घेवून जाण्याशिवाय पर्याय नव्हता . तिने तसाच उरलेला गठ्ठा पर्स मध्ये भरला पण छत्री हाती नाही लागली तिला म्हणजे नेहाने घेतली . या पोरीला कळत कसे नाही माझी अडचण होईल , कमीत कमी सांगण्याचे तर सौजन्य हवे . काही बोलले तर काकू आकाश पाताळ एक करते , आता काय करू ? बाहेर आभाळ गच्च झालेलं आता कोसळेल या बेतात ! क्षणभर विचारात गुंतली पण संकटे तिच्या मार्गात कधी अडथळा झाली नव्हती हे तर किती शुल्लक ! लगेच तिने भिजतील अश्या वस्तू प्लास्टिक पिशवीत भरल्या आणि पर्स मध्ये टाकल्या आणि एक समाधान तिच्या चेहऱ्यावर उमटले , अगदी क्षणभर , आकाशातल्या विजेसारखे ! कुणी पाहत तर नाही न हे विचार पुन्हा तिला स्तब्ध करून गेले . काहीतरी चोरल्यासारखे तिचे मन अपराधी बनून राहिले ! आनंद चोरल्याचा अपराध ! ती आजूबाजूला पाहत बस स्टोप कडे चालू लागली . झोपेत शांत पहुडलेलं बाळ उठून इतके उद्योग करते याचे आश्चर्य एका आईला वाटावे तसे शाळेत शांत असणारी मुले हुंदाडताना बाहेर पहिली कि स्मृतीला तसेच वाटे , मग ती मनाशीच हसायची , पण पुसटशी लकेर तिच्या गोऱ्यापान नितळ चेहऱ्यावर दिसायची नाही . स्वताच्या भावना आताच ठेवायची कला मात्र ती आई गेल्यापासुनच शिकली होती . जणू त्या कोवळ्या वयात पुढच्या जीवनाची चित्रे तिनी तेंव्हाच पहिली होती !
      आज पाऊस चालू हता रिमझिम आणि बसही नव्हती येत , ती वाट पाहून कंटाळून गेली . ते मधेच ठिबकणारे स्टोप चे छत ,ते गंजलेल्या पत्र्याचे पडणारे तपकिरी पाणी तिच्या ड्रेसवर डाग पडत आहेत हे लक्षात येताच ती बाहेर येवून उभी राहिली . आता मात्र गार वारा पण तिला छेडू लागला , ती थरथरत तशीच उभी होती . एक सफेद गाडी तिच्याजवळ सावकाश येवून थांबली .
" म्याडम , म्याडम या न प्लीज ." अर्पिता होती ती !
" नको गं येईल बस आता , thanks !" तिलाही माहित होते बस उशिरा आहे पण असे सहजी कुणाचे उपकार कसे घ्यायचे , परतफेड करावी लागतेच न कधीतरी . पण आता अर्पिता खुपच आग्रह करत राहिली , त्यांच्या या संभाषणात ड्रायव्हिंग सीट वर बसलेल्या युवकाने सहभाग घेतला
" चला न सोडतो खरेच ." तो सभ्यपणे म्हणाला .
म्हणजे नक्कीच तो ड्रायव्हर नव्हता , ओझरत्या नजरेने तिने त्याला न्याहाळले . उंच ,थोडा सावळाच ...जरा जास्तच सावळा ...तसा थोडा काळा , पण रुबाबदार आणि देखणा दिसत होता .
" म्याडम हा माझा शरददादा , अरे दादा या माझ्या स्मृती म्याडम , मराठी खूप छान शिकवतात "
"अग् बास , नंतर सांग , आधी त्यांना आत तर येऊ देत , बघ पाऊस पडतोय वरून "
मग मात्र दोघा बहिण भावाचे बोलणे तिला मोडवले नाही , तसेही त्यांना तिच्या घरावरून पुढे जायचे होते . ती मागच्या सीटवर बसली , अर्पिता खूप खुश होती , तिच्या सर्वात आवडत्या म्याडमला ती मदत करत होती आणि त्याहीपेक्षा महत्वाचे त्यांनी ती मदत स्वीकारली होती ! त्यात भर म्हणजे तिच्या आवडत्या कृष्णकमळाला आज फुल येणार होते , टपोरी झालेली कळी पण तिने पाहिलेली सकाळी . कधी कधी सगळ्याच गोष्टी कश्या बरे एकत्र येवून आनंद द्विगुणीत करत असतील ! आले तर सुखाचे एकापाठोपाठ एक क्षण येत राहतात , फुलराणीच्या डब्यासारखे ! तिचा निरागस हर्ष स्मृती न्याहळत होती ,
                                  लहानपण देगा देवा
                                  मुंगी साखरेचा रवा
                                  ऐरावत रत्न थोर
                                  त्याशी अंकुशाचा मार
     मघाशी अंगाला झोंबणारा पाऊस आता काचेतून कसा आल्हाददायक भासत होता , मनात अनेक कवितांचे पेव तयार करत होता , तशी तिला आवड होती यमक जुळवायची पण पूर्ण कविता करण्याच्या भानगडीत ती पडली नाही कधी . तिला अर्पिता काही विचारात होती ती उत्तरे पण देत होती , पण मनातले विचार मात्र संपत नव्हते ... जणू दोन जीवने ती जगत होती त्या क्षणी ..
आता मात्र अर्पिताचा शरददादा तिच्यावर रागवला ," किती प्रश्न विचारतेस , शाळेत उत्तरे देवून आधीच कंटाळल्या असतील त्या आणि तू तोच पाठ बाहेर पण चालू ठेव "
स्मृतीच्या मनातही हेच होते पण उपकाराखाली दबलेली ती बोलू शकत नव्हती आणि त्या अल्लड मुलीला दुखवावे असे पण तिला अजिबात वाटत नव्हते , आवडत्या व्यक्तीचा त्रासही हवासा का वाटतो माणसाला !
" असू देत लहान आहे अजून ती ." स्मृतीने तिचे समर्थन केले , " आम्हाला पण सवय असतेच कि शाळेचे पेपर घरी नेवून तपासायची " या तिच्या बोलण्यावर शरद खळखळून हसला , अगदी त्याच्या निरागस बहिणीला शोभेल असे ! खरंच त्या दोघा बहिण भावात तिला एक गोष्ट सारखी जाणवली , ते त्यांचे निरागस चेहरे जणू एक छानस  गिफ्ट दिले होते देवाने त्यांना जन्माला घालताना ! पण तो हसला का माझ्या बोलण्यावर ? असे काय होते हसण्यासारखे ? चौकातून गाडी वळली आणि तिला जाणीव झाली घर जवळ आल्याची मग तिने शेजारी पडलेली पर्स उगीच नीट करत मांडीवर घेतली आणि ओढणी सावरत राहिली . घर आल्याची खुण तिने अर्पिताला केली .
 " दादा गाडी थांबव न , त्यांना उतरायचे आहे " अर्पिता .
" हो थांबतो हं " गाडी रस्त्याच्या बाजूला घेत तो बोलला . ती उतरली .
" आभारी आहे " तिने आभार मानले पण घरी या म्हणने कटाक्षाने टाळले . तिलाही माहित होते , त्यांना घरी नेले तर साधारण शंभरेक प्रश्नांची उत्तरे तिला द्यावी लागणार होती . अशी एक न अनेक बहाणे होत राहिले आणि अर्पिताची जवळजवळ आठ दहा वेळा तिने लिफ्ट घेतली .
      मावळणाऱ्या सूर्याचे केशरी किरण स्टोप जवळच्या झाडांच्या फांद्यातून झिरपत होते , ते अंगावर घेत अशीच ती बसची वाट पाहत थांबलेली . का कुणास ठावूक पण मनात शरदचे विचार झिम्मा खेळत होते आणि एक थंड वाऱ्याची लहर अंगावरून गेल्यासारखे सुखावत पण होते . किती छान आहेत शरद , आई वडील नाहीत तरी ते दोघांची जागा घेवून ते अर्पिताला सांभाळत आहेत . नोकरी तर होतीच पण घरहि एखाद्या चपखल गृहिणीसारखे सांभाळत आहेत . त्यांच्या या धावपळीत त्यांनी स्वताचे भावनिक रूपही तसेच जोपासले आहे . त्यांचे वाचन तर किती आहे , मराठी इंग्रजी सर्व ते वाचतात , म्हणूनच तर ती त्यांच्याशी बोलती झाली . त्यांच्या त्या ज्ञानाने तर ती किती प्रभावित झाली , कुणाला वाटणार पण नाही कि इंजिनिअर आहेत तरी इतके मराठी जाणतात . ती त्याच्याच विचारात गुंतलेली होती आणि सावकाश येवून शरदची गाडी तिच्याजवळ येवून थांबली . पण पुढे अर्पिता नव्हती ! मग मात्र ती थोडी मागे सरकली .
" या ना " पुढचे दार उघडत शरद सभ्यपणे म्हणाला .
" नको , येईल हो बस आता " स्मृतीला त्याच्या एकट्याबरोबर जाणे जरा अवघडल्यासारखे वाटले आणि ते भाव तिच्या नकळत चेहऱ्यावर उमटलेही , आज तिच्या मनाने बुद्धीवर ताबा मिळवला होता ! का कुणास ठावूक ? ती त्याचा आग्रह मोडू शकली नाही आणि आज ती अर्पिताच्या जागी पुढे बसली , त्यांच्या शेजारी ! स्मृतीचे बावरलेपण ती लपवू शकत नव्हती. पण आज तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे रंग तो आरश्यात पाहू शकत नव्हता कारण आज ती शेजारी होती त्याच्या ! चिखलात मनसोक्त नाचून झाल्यावर जसे पाय दुखरे बनतात तसे तिचे पाय उगीच दुखरे बनले होते , पायांना गोळे वर सरकत होते का कुणास ठावूक ? बाहेरच्या गाड्यांचे आवाज कानावर आदळत होते , गाडीत मात्र पूर्ण शांतता...
" तुम्हाला भीती वाटली का आज ? कि या एकट्या पुरुषाबरोबर कसे जावे " शांतता भंग करत शरद बोलला , मघाशी त्याने तिच्या मुखकमलावर लज्जेचे भाव टिपले होते ..
" नाही तसे काही नाही " ती भानावर येत बोलली .
" तुम्हाला खोटे बोलता येत नाही " शरद हसत म्हटला .
" नाही मी खोटे कुठे बोलले ?" थोडी लाजत ती बोलली . सर्वांसमोर वाघीण असणारी स्मृती आज गाय कशी झाली होती ! प्रश्नाचे उत्तर ती दुसऱ्या मनात शोधात होती ...
" मग रोज मी जो निर्विकार चेहरा मी आरश्यात न्याहाळायचो ,त्या मुखकमलावर आज लज्जेचे भाव का उमटले मी बसा म्हटल्यावर ?" आरष्याकडे इशारा करत तो बोलला .
आता मात्र स्मृतीचे हळदीच्या रंगाचे गाल गुलाबाच्या पाकळ्या कुस्करल्या सारखे गुलाबी बनले , का कुणास ठावूक ?
ती उगीच पायाची बोटे एकमेकांवर घासत राहिली त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता , आणि तोही मनाशी हसला कारण त्यालाही हेच अपेक्षित होते . एखादी नवयुवती तिचे गुपित उघड झाल्यावर भांबावून जाते तशी स्मृतीची अवस्था तो तिरप्या नजरेने न्याहळत होता, दोनच मिनिटात चौक येणार आणि गाडी वळणार होती , त्यांचा तो सुगंधित , उल्हासित सहवास संपणार होता ..
" उद्या रविवार आहे , तुम्हाला पण सुट्टी आहे आणि मला पण . मला तुमच्याशी काही बोलायचे आहे , इथल्या जवळच्या बीच वर याल का ?"
ती गप्प होती . तोच पुढे आजिजीने बोलला ," प्लीज या ना , काही गोष्टी वेळेत नाही झाल्या तर उगाच आयुष्य भरकटत जाते , आणि असेही आपल्या दोघांच्या मनातले गुज आपल्या दोघांनाच शेअर करावे लागेल , कारण आपल्यासाठी बोलणारे कुणीच नाही , हो ना ?"
" हो येईल मी " स्मृती बोलली पण तिचे हात ओलेच होत होते .
" मग उद्या चार वाजता प्लीज ," तो काही जिंकल्याच्या आनंदाने आर्जव करत राहिला .
      काळ घरीं आल्यापासून ती वेगळ्याच धुंद विचारात मग्न होती , तिचे हळुवार दुसरे मन तिला सारखे प्रश्न विचारात होते , काय बोलायचे असेल त्यांना ? ते  प्रेमाचा उच्चार करतील का त्यांच्या  बोलण्यात कि असेच वेळ घालवण्यासाठी बोलावले असेल त्यांनी ? पण कसे बोलले ते काल , म्हणे रोज मी तुला न्याहाळत होतो आरश्यात , निर्विकार आहे म्हणे मी , कसे असे इतके कडू स्पष्टपणे बोलतात ते ? तो माझा हात हातात घेईल त्या उसळत्या सागरसाक्षीने , विचारानेच हृदयात कळ उमटते आहे , प्रत्यक्ष काय होईल ? एक ना अनेक रोज प्रत्येक प्रश्नाचे उत्तर क्षणात देणारी स्मृती तिच्या दुसऱ्या मनाला हेही विचारात होती , मी आज निरुत्तर कशी ?
      आज तो क्षण अनुभवणार होती ज्या क्षणाची तिच्या दुसऱ्या मनाने इतके दिवस वाट पाहिली होती , कुणाला कळू न देता एका योगीनिसारखी... उसळणारा समुद्र जो रोज तिला भेडसावणारा वाटायचा आज खूप हळवा , प्रेमळ आणि भावपूर्ण वाटत होता , आज तिचे मनहि त्याच्या लाटांशी बोलत होते , का कुणास ठावूक ? आज तिच्या जीवाला ओढ लागली होती सुखांची , सुखाच्या क्षणांची , त्या लाटांचे थंड तुषार तिला पुन:पुन्हा रोमांचित करत होते , इतकी गुंग होती कि तिच्यामध्ये जणू फुलात विरघळलेला सुगंध ! शरद जवळ येवून बसल्याची चाहूलहि तिला जाणवली नाही ...
" स्मृती " तिने चमकून पहिले , शरद तिच्या अगदी जवळ वाळूत येऊन बसला होता .
" कुठे हरवलीस इतकी ? पण खरे सांगू तुझे हे तुझ्यात विरघळणे मला खूप भावते , आणि तुझ्याबरोबर तुझ्या त्या विश्वात मी पाय ठेवावा असे सारखे वाटत ," एका चिरंतन ओढीने तो तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता . तीही गुंतून राहिली त्याच्या नजरेत आणि हृदय कानात एकवटून ऐकू लागली त्याला , अशी कशी भारली ती आज , का कुणास ठावूक ?
" तुझ्या त्या स्वप्नील डोळ्यात मला असेच गुंतून राहावे वाटते , तुझ्याबरोबरच्या सहजीवनाच्या विचारांत मी नकळत गुंगून जातो आणि माझ्या भोवती तुझे अस्तित्व शोधत राहतो , भेटलीस तेंव्हापासून खोलवर रुतलीस आणि आता अशी रुजलीस मनात कि तुझ्याशिवाय क्षणही शाप वाटतो , खरंच का ग स्मृती प्रेम असं असतं मला कुणी सांगितलच नाही पण तू भेटलीस तसे असेच वाटते कि हेच प्रेम आहे , आई वडिलांनी दिलेले प्रेम कळावे या आधीच ते गेले आणि रुक्ष जीवन जगलो अर्पितासाठी , पण तू भेटलीस आणि निष्पर्ण पांगारयाला रक्तवर्णी फुलांचा बहर यावा तसे माझे मन बहरले " तो बोलायचा थांबला तरी तशीच ती त्याच्या नजरेत नजर गुंतवून बसून राहिली . एक लाट त्यांच्या पायात येऊन गुंतली आणि त्यांना भानावर आणत पुन्हा खिदळत समुद्रात परतली . ती उगीच लाजली आणि पायाची बोटे न्याहाळू लागली , त्या गौररंगी बोटांवर आता काळसर वाळूचे कण तिचा रंग किती सुंदर आहे हे दाखवू लागले . ती काहीच बोलत नव्हती पण शरद मात्र बांध फुटून वाहणाऱ्या पाण्यासारखा अस्वस्थ होता आणि बोलत होता . वास्तवात येत तो जरा प्रक्टीकली बोलू लागला ,
" स्मृती मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो , तू जर माझ्या आयुष्यात आलीस तर तुला सुखी आनंदी करण्याचाच अविरत प्रयत्न करील , पण तरी मला वास्तव जे तुला थोडे विचित्र वाटेल ते तुझ्यापासून लपवायचे नाही . त्यानंतर तुझे जे काही उत्तर असेल ते मी आनंदाने स्वीकारेन , तुझा नकार सांगताना मला काय वाटेल याचा विचार करू नको कारण जीवन कितीही स्वप्नील विचारांनी भरलेले असले तरी ते वास्तवातच जगावे लागते "
त्याचे हे रुक्ष बोलणे हवेत विहरणाऱ्या स्मृतीला उगीच कडू कारले तोंडात ठेवल्यासारखे भासले , पण क्षणात त्याने डावा पाय गुढग्यापर्यंत उघडा केला आणि खिन्न होऊन सांगू लागला ,
" आई बाबा ज्या अपघातात गेले तो अपघात माझा डावा पायही घेऊन गेला आणि या कृत्रिम पायाने मी चालता झालो . मला माहित आहे तुलाही मी आवडतो पण प्रत्येक आवडणाऱ्या व्यक्तीची एक अशी गोष्ट असते कि ती दु:ख देवून जाते . म्हणून मी स्वताला बरेच आवरले पण जेंव्हा तुझे माझ्यासाठी आरक्त झालेले गाल पाहिले तेंव्हा राहवले नाही . मग ठरवले कितुला वास्तव मान्य असेल तर तुझ्याबरोबर मला माझे आख्खे आयुष्य जगायचे , पण निर्णय सर्वस्वी तुझा असेल ."
त्याचे बोलून झाले होते पण क्षणभर सर्व शांत होते फक्त तो सागर उसळत होता आणि लाट किनाऱ्याला आणत होता ...ती हे सर्व ऐकताना फक्त शरदला पाहत होती आणि तिची दोन्ही मने आज प्रथमच विचारविरहित बनली होती ! अगदी स्वच्छ शुभ्र कोऱ्या कागदासारखी , तिच्याही नकळत अश्रूंची फुले तिच्या हळदीरंगाच्या गालावर ओघळू लागली आणि ती शरदच्या कुशीत शिरून त्याला घट्ट बिलगली ,त्याचे बाहुही तिच्या भोवती गुंफले गेले आपोआप ...दोन दुख्खी मने आज सुखाने भरून वाहत होती ...
पायाखाली लाट येत होती आणि समुद्रात थोडी रेती घेऊन परत होती ....का कुणास ठाऊक ??