या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Friday 2 June 2017

पोरकी

            पोरकी

अनवाणी पाय भाजून त्याला फोडे उठतील असा तापलेला रस्ता अघळपघळ पसरला होता . दुतर्फा घरांची ओळ एकमेकींत घुसल्यासारखी भासत होती पण चिटपाखरूही बाहेर दृष्टीला पडत नव्हते . उन असे होते कि सावल्याही अंग चोरून शरीरांच्या खाली लुप्त होत होत्या . अचानक येणारी हलकी वावटळ धूळ उडवीत होती . थोड्या वेळात शांत होत पुन्हा धुळीचे लोट घरांच्या , झाडांच्या अंगावर बसून त्यांचा श्वास गुदमरून टाकत होती . लांब लांब उसासे टाकत सारेजण उद्विग्न नजरेने एकमेकांना पाहत होती . हातपाय हलविण्याची शक्ती मात्र कुणाच्याच अंगात नव्हती .लोळागोळा झालेले हे रस्ते अचानक एखादी गाडी गेली कि फुत्कारून उठत आणि पुन्हा मेल्यासारखे शांत पडून राहत . या थोरल्या उन्हात झपझप पावले टाकत मनीषा चालली होती . शक्यतो ती इकडेतिकडे पहात कधीच चालत नसे तिचे चालणे अगदी नाकासमोर ! पहिल्यापासून तिला कुणाच्या भानगडीत नाक खुपसायला , उगीच कुणाचे तरी काही लहान सहान गोष्टीचे चर्वण करायला अजिबात आवडायचे नाही . तिचे घर ,शेत ,दोन मुले , नवरा आणि अपंग सासू याव्यत्यरिक्त तिचे बोलणे कामाशिवाय कुणाशी होत नसे .

  किराणा दुकान जिथून ती तिचा महिन्याचा किराणा भरून घेत असे ते घरापासून लांब होते . ती दुकानात पोहचली तोवर घामाने डबडबून गेली होती . गल्ल्यावर काका बसलेले आणि काकू दारात दळण निवडत बसली होती. दुपारची वेळ असल्याने गिऱ्हाईक नव्हतेच . तिथेच ओट्यावर असलेल्या कट्ट्यावर मनीषा विसावली . उन्हाने लाल झालेला चेहरा सारखा पदराने पुसत होती . वाऱ्याने आणि पदर खालीवर करून केस विस्कटले होते मात्र कपाळावरची केसांची कमान तशीच होती . मधला लांबलचक भांग आणि तिचा तो उभट चेहरा या दोन्हीमुळे केसांची ती चित्र काढल्यासारखी ठेवण अगदी नक्षीदार कमानिसारखी दिसत होती . दोन मुलांची आई होती पण अजूनही खुपच सुंदर दिसायची मनीषा , रंग थोडा बदलला होता आणि चेहऱ्यावर उठलेले वांगाचे दाग सोडले तर तिच्या दिसण्यात काही बदल नव्हता . तशीच काटकुळी , दोन्ही बाळंतपणात ती अजिबात सुधारली नव्हती , कशी सुधारणार होती मुल जन्मल्याच्या पाचव्या दिवशी उठून तिला घरकाम करावे लागे . सासू अपंग आणि तिलाही आई वडील नव्हते , शेजारणी पाच दिवसापेक्षा जास्त दिवस करत नव्हत्या . ना शेक ना शेगडी , खायला भरपूर असे पण कामात तिला वेळच व्हायचा नाही . जाता येत जे मुखात पडेल त्यावर तिचा दिवस संपायचा . नवरा तरी करून काय करणार त्यालाही नोकरी करून घरची चार पाच एकर जमीन करावी लागे , म्हणजे दोघेही भरपूर कष्ट करीत . दुकानदार काका काकूला तिच्याबद्दल खास आपुलकी ! कारणही तसेच होते , ती काकूच्या बहिणीच्या नंदेची मुलगी , या गावात या काका काकू शिवाय कुणीच तिच्या माहेरचे नाते सांगणारे नव्हते . आई बाप लहानपणी गेले , भाऊ आणि वहिनीच्या हाताखाली सारे बालपण संपले . स्नेहाचा जराही गंध नसलेली वहिनी आणि सदा दारिद्र्यात असलेला भाऊ यामुळे माहेर लग्न झाले तेंव्हाच तुटलेले ! तिला स्नेहाची उब मिळाली ती फक्त या काका काकुजवळ ! म्हणून कुठल्याही अडचणीला ती त्यांच्याकडे धाव घेई . अबोल नवरा आणि सदा दुखण्याने कातावलेली सासू यांच्याकडून स्नेहाची अपेक्षा तिने लग्नानंतर आठवड्यातच सोडून दिली . तिचे हे दु:खी आयुष्य पाहून काका काकू हळहळत , यापलीकडे तेही काही करू शकत नव्हते ! कष्ट कष्ट आणि कष्ट यात ती तिच्या भावना आणि शरीर या गोष्टीही जपाव्या लागतात हे पूर्ण विसरून गेली होती ...

“का गं मनीषा , इतक्या उन्हाची का आलीस ?” गुढग्यावर हात टेकून उठत काकू तिला म्हणाल्या .

“परत चार वाजता गवताला जायचंय काकू , म्हणून म्हटले जावून यावे आताच , संध्याकाळी स्वयपाकाला तेल नाही .” अजूनही ती पदराने घाम पुसत होती .

“किती कष्ट करतेस ,थोडे स्वताकडे पण पाहत जा .” तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत काकू म्हणाल्या .

“तुमच्यापासून काय लपलेय का काकू , आता तर फक्त कष्टांचीच साथ जीवनभर !” तप्त रस्त्याकडे विषण्णपणे पाहत राहिली ती ! तिच्या मनात पण आगीचा डोंब उसळला होता . बाहेरची तप्तता काहीच नव्हती तिच्यापुढे . रिकामा ग्लास काकूने काढून घेतल्याचे पण तिला कळले नाही .

“असे नको म्हणू बेटा , उन्हानंतर सावली येतेच ना ? एकदिवस तुझाही असेल !” काका तिला समजावत होते . परंतु त्यानीही तिच्या आयुष्यात सावली येईल हि आशा सोडून दिली होती . जे काही कानोकानी समजत होते त्यावरून तिचे आयुष्य सुखी व्हायला फक्त काही चमत्कारच आवश्यक होता . आणि त्यांना माहीतच होते या कलीयुगात देवही चमत्कार करू शकत नाही . कसे होईल या पोरीचे अशी हळहळ व्यक्त करण्याखेरीज काहीही करणे त्या उभयतांच्या हाती नव्हते .

  तिची शून्यात हरवलेली नजर पुन्हा काकुकडे वळली . काकू काही बोलणार तोवर तिने पूर्वपदावर येत सामानाची यादी काकांच्या हातात दिली .

“हे सारे द्या बर काका , पण बिल त्यांचा पगार झाला कि मिळेल , चालेल ना ?”

“चालेले बाळा , का नाही चालणार ? तू तर आमची मुलगीच आहेस .” काका हसून बोलले पण त्यांचा मुलगी म्हणण्यामागे तिने व्यक्त व्हावे हाच उद्देश होता . काका काकूची स्नेहार्द नजर तिच्या मनात खळबळ माजवत होती . तीही भिंती आणि तुळशीपुढे व्यक्त होऊन थकली होती . तिलाही वाटे कुणी माणूस भेटावे ज्याने माझे दु:ख फक्त ऐकून तरी घ्यावे . असे मनात कुढत राहिले तर ...कधीतरी नक्कीच वेडी होईन ! आत्महत्येचा विचार अनेकदा आला तिला पण मुलांचे चेहरे तिला तसे करू देत नव्हते . खरच तिच्याशिवाय कोण होते मुलांना तरी ? पुन्हा शून्यात नजर गुंतवत ती अबोल झाली . काकू तिच्या जवळ जाऊन बसल्या . ओट्यावर उन नव्हते पण उन्हाच्या झळा तिथेही जाणवत होत्याच .

“काका सामान काढतील तोवर चल आत आपण सरबत घेऊ , खूप दमलीस . जेवलीस का पण ?”

“हो जेवले काकू , न जेवून कसे चालेले .” एक लांब उसासा सोडला तिने .

“हो ते पण आहे , नको खूप कुढत जाऊ , कुणालाच कष्ट चुकत नाहीत.” आत जाता जाता दोघी बोलत होत्या . तिला बसायला बसकर देत काकू स्वयंपाकाच्या ओट्याजवळ गेल्या . दोघेच घरात असल्याने ते स्वयंपाकघर नेटके होते . धुळीचा , जळमटे यांचा मागमूसही नव्हता . काकूंची दोन्ही मुले नोकरीसाठी बाहेर होती . घर मुले नातवंडे आली कि फुलून उठे . पण सुट्टीपुरतेच हे सुख त्यांच्या नशिबी होते . पण त्यातही समाधान शोधायचे दोघे . या जगात नाईलाजास्तव समाधान मानणाऱ्यांची संख्या अफाट आहे . या तिच्या विचारांबरोबर तिच्या चेहऱ्यावर एक केविलवाणे स्मित झळकले .

“खर सांगू काकू , आता मी जगणेच सोडून दिलेय . काय चांगले काय वाईट , इतरांनी आपल्याशी कसे वागावे हे ठरवणे मी कधीच सोडून दिले . कुणी राग केला तरी राग येत नाही आणि कुणी जिव्हाळ्याने बोलले तरी सुख नाही वाटत . अश्रू आता माझ्या डोळ्यांचा पत्ता कधी कधीच शोधत येतात . मुलांना पोरकेपण येऊ नये म्हणून आजचा दिवस उद्यावर ढकलणे इतकेच माझ्या जीवनात उरले आहे . आणि हे विचारांचे जंजाळ पुन्हा माझे चित्त विचलित करू नये म्हणून हा कामाचा व्याप वाढवते . जोपर्यंत थकून आपोआप झोप येत नाही तोपर्यंत कष्ट करणे इतकेच मनाशी ठरवले आहे . बघू किती दिवस असे चालू राहते . आता कश्याचीच ओढ राहिली नाही .” पुन्हा खोलात नजर गेली तिची .

“दु:ख आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे . म्हणून त्यापासून दूर पळून किंवा त्याकडे पाठ फिरवून जगणे योग्य नाही .”

“दु:ख जेंव्हा अगतीकतेच्या दारात नेवून सोडते ना तेंव्हा या असल्या वचनांना काही अर्थ राहत नाही काकू !” पुन्हा केविलवाणे हसू तिच्या मुखावर उमटले .

“इतकी हतबल नको होवूस बेटा ,प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते .”

“नाही काकू , उत्तर असते प्रश्नाला पण कधी कधी ते आयुष्याच्या शेवटीही कळत नाही . कधी ते उत्तर शोधण्याची इच्छाच मरून जाते ,आणि कधी कळते पण इतके क्लिष्ट असते कि ते समजूनही अंगवळणी पडत नाही . माझेही असेच झालेय .”

“असे नको हरूस बेटा , आपण सारे बंडूला समजावू तो नक्की ऐकेल बघ .”

“ऐकेल ? किती वेडी कल्पना आहे काकू तुमची! मी एक सांगू , तो आपण बोलू ते ऐकून घेईल , अगदी तुम्हाला प्रत्युत्तर पण करणार नाही .” छद्मी हसत मनीषा बोलली . तिचे हे हसू पाहून काकूच्या काळजात मात्र चर्र झाले . प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहण्याशिवाय त्यांना दुसरे काही उत्तरच सुचले नाही .

“काकू तुम्हाला वाटते न कि ते ऐकून घेऊन त्यांच्या कर्माबद्दल पश्चाताप करतील , हळहळ करतील आणि मग तसे वागणे सोडून देतील ?” काकूंनी फक्त मान हलवली .

“असे बिलकुल काही होणार नाही , त्यांना त्यांच्या या कुकर्माची लाज बिलकुल वाटत नाही , जराही खेद नाही , आपण कुणाचे जीवन फक्त उध्वस्त नाही करत तर कोळून पितोय याचा यत्किंचीतही खेद त्यांना नाही . उलट असे तुमच्यासमोर वागताना जे चोरून चालले आहे ते उघड चालू होईल . अशा माणसांची सदसद्विवेकबुद्धी बुद्धी सर्वथा लोप पावलेली असते .” विषण्णतापूर्वक मनीषा बोलत होती . काकूने हातात दिलेला सरबताचा ग्लास लगोलग रिकामा करत ती पुन्हा बोलू लागली .

“एक महिना होत आला , ज्या गोष्टींची कुणकुण लागली त्या गोष्टी सत्य आहेत का ते पडताळून पहावे वाटले , पाहिलेही आणि समोर आले ते एक नग्न सत्य ! मला हि गोष्ट माहित नव्हती तोपर्यंत ती माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न होत असे , पण एकदा माहित झाले आणि राजरोस सारे व्यवहार चालू झाले . पाहणारल्या लाज वाटते परंतु यांना वाटत नाही ! अज्ञानत सुख असते हे वचन सार्थ आहे , जोवर मला काही ठावूक नव्हते किंवा फक्त शंका होती ते कळल्यावर जे राजरोस व्यवहार चालू झाले ! यावरून हेच सिद्ध झाले ना ? कुणी सांगेताई बंडू सोबत आम्ही एक बाई पहिली , कधी त्यांचा फोन रात्री एक वाजेपर्यंत चालू राही , मी विचार करायचे असेल कुणी शाळेतील मित्र , पण किती मनाला समजावले तरी वाटत राही कोण असेल ? मित्र कि मैत्रीण ? असे पूर्वी कधी कुणाशी बोलताना मी त्यांना कधी पाहिले नव्हते . एकदा खूप मन घट्ट करून त्यांना विचारले कोणाशी बोलता इतके ? दिवसभर कंटाळा नाही का येत ? भीत भीतच विचारले , वाटले कदाचित माझ्यावर वैतागेल पण झाले उलटेच ! मला जवळ घेत म्हणाले माझा एक मित्र आहे , बाहेर होता खूप दिवसांनी भेटलाय ! त्यांच्या त्या प्रेमळ स्पर्शात सर्व शंका गवतात वाट दिसेनाशी व्हावी तश्या नाहीश्या झाल्या ! किती मधुरता असते त्या स्पर्शात , जणू साऱ्या वेदनांचा शेवट त्यात होतो ! परंतु ते मृगजळ होते ...त्यामागे मला माझ्या आयुष्याच्या वाळवंटात धावत राहायचे हेच माझे प्राक्तन आहे ते मला तेंव्हा उमजले नाही . ते सुख रातराणीच्या सुगंधासारखे तेव्हड्या रात्रीपुरतेच माझ्या आयुष्यात होते याची त्यावेळी जराही कल्पना मला नव्हती . दुसऱ्या दिवशी शेजारची एक बाई मला धुणे धुवायला गेले आडावर तेंव्हा सांगत होती , मनीषा जरा जपून बर यांनी काल बंडूला एका बाई सोबत पाहिले ! तू गरीब गाय आहेस असा आंधळा विश्वास ठेवशील आणि कुणी तुझा संसार चोरून नेईन तुला कळणार पण नाही . तेंव्हापासून मी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊन होते . रोज देवाला वेड्यासारखी प्रार्थना करे कि सारे खोटे असू दे ! माणसाचे मन आणि सश्याचे काळीज एकाच गोष्टीपासून बनले असतील , जेंव्हा भीतीचे शंकेचे ढग दाटतात तेंव्हा आपोआप ते लुकलुक करायला लागते ! माझीही अशीच धडधड दिवसरात्र चालू राही ! पहिल्यांदा विचारले तेंव्हा त्यांनी प्रेमाने समजावले पण दुसऱ्या वेळी धावून आले अंगावर , आत्या तिथेच होत्या त्याही घाबरल्या पण दिवसरात्र सेवा करणाऱ्या माझ्या सुनेवर का रे रागावतो असे एका शब्दाने त्यांना फटकारले नाही !” लांब उसासा घेत डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना थोपवण्याचा असफल प्रयत्न करत मनीषा जमिनीत नजर खुपसून बसली .

“शकुताईकडून हि अपेक्षा नव्हती ! त्यांनी तुला आधार देणे न्यायाचेच होते .” तिच्या पाठीवर मायेने थोपटत काकूने तिची बाजू उचलून धरली .

“काय न्याय काय अन्याय याची त्यांना थोडीही चाड नाही . माझा तो बाब्या बाकी सारे ...कसे सहन करू काकू ? घराचे वासेही फिरले होते माझ्या . किती आत्मीयतेने मी माझा माझा म्हणून संसार करत होते पण तिथे बसण्यापुरती जागाही माझ्या मालकीची नाही ! मी त्यांना कधीही एका शब्दाने नाही दुखावले . सतत त्यांच्या अपंगत्वाचे ओझे मी माझ्या मानगुटीवर वाहत राहिले , एका शब्दाने कधी त्या गोष्टीबद्दल नाही बोलले . पण मलाच कळत नाही मी कुठे कमी पडले . मुलाबद्दल इतकी माया आणि मी ? कुणीच नव्हते का त्यांची ? कि नाते बदलले म्हणून चुका चुका होत नाहीत का ? मीही जर चुकले असते तर त्या इतक्या निष्क्रीय राहिल्या असत्या ? ज्या खांद्यावर विश्वासाने डोके टेकावे ते अस्तित्वातच नसावेत ! याच्याइतके उद्विग्न करणारे काहीच नसेल जगात , मी कुठल्यातरी खोल दरीत कोसळत आहे असेच वाटले तेंव्हा ! अश्रूंची संततधार मुकपणे माझ्या डोळ्यातून वाहताना पाहूनही त्यांच्यातील माणूस जागे नाही झाले . त्या दिवशी पहिल्यांदा मार खाल्ला मी ! मारण्याबद्दल खेद नव्हता फक्त होता तो सासूबाईंनी दाखवलेल्या निष्क्रियतेबद्दल !” उद्विग्नपणे ती बोलत होती . चेहऱ्यावरची हरेक शीर ती बोलताना उडत होती . ठसठसणारी एखादी जखम मोकळी झाल्यावर जसे हलके वाटते तसे तिला बोलून झाल्यावर वाटू लागले .

“काकू , त्या दिवशी दिवसभर मी उपाशी झोपून राहिले पण कुणी माझ्याजवळ आले नाही . शेवटी आकाश शाळेतून आल्यावर म्हणाला ‘आई बरे नाही का तुला ? डोके दुखत असेल तर दाबून देऊ का ?’ त्याच्या या बोलण्याने दिवसभर हृदयात उसळणारा बंदिस्त सागर मोकाट सुटल्यासारखा डोळ्यातून वाहू लागला . खरंच कुणासाठी नाही पण माझ्या मुलांसाठी मला जगावेच लागेल . गोठ्यातून भुकेने व्याकुळ ढोरांचे ओरडणे आता कुठे माझ्या कानात घुमले . आकाशला काही नाही असे समजावण्यात माझी जी धावपळ झाली ते वर्णन करणे कठीणच ! त्याने माझ्या कुशीतून त्याची सुटका करवून घेतली आणि माझ्या डोळ्यांचे पाणी पुसत राहिला . किती माया होती त्याच्या स्पर्शात ! मी मग सगळे विचार झटकून त्याला खायला दिले आणि गोठ्यात ढोरांना चारा टाकायला गेले .”

“असे किती दु:ख असले तरी लेकरांच्या निरागस चेहऱ्यात ते हरवून जाते बघ , म्हणून जे सुख कुणाची मुलगी , बायको म्हणून घेताना वाटत नाही न त्यापेक्षा कितीतरी मोठे सुख वाटते आई ...म्हणून घेताना !”

“किती खरे आहे ना हे मला त्या दिवशी खूप प्रकर्षाने जाणवले . त्याच लेकरांसाठी आता माझे जगणे असेल ! त्या दिवसानंतर आत्या दोन दिवस माझ्याशी बोलल्याच नाहीत . मी मात्र जीवनाला एक नवीन ध्येय मिळाल्यासारखे झपाटल्यासारखे काम करत राहिले . डोक्यातील विचारांचे काहूर तसेच उंच उंच जावून पुन्हा जमिनीचा ठाव घेत होते. प्रत्यक्ष दु:खासोबत जगणे जितके दु:सह्य असते त्यापेक्षा कितीतरी जास्त कठीण असते ते दु:ख आयुष्यात येणार या शंकेसोबत जगणे ! त्या शंकांनी गर्भगळीत होऊन जातो जीव ! त्या दिवसानंतर चार पाच दिवस तो अबोला चालू होता . माझ्याकडे बघून ते दुसरीकडे तोंड वळवत , ते पाहून वाटायचे हेही सोसेल जीवाला पण तुमचा विश्वासघात नाही हो सोसवत , काय कमी ठेवले होते मी तुमच्या आयुष्यात म्हणून तुम्ही हे असला मार्ग निवडलात? वाटायचे हे फक्त शंकांचेच धुके असावे , सत्याचा सूर्य उगवला कि तेही निघून जावे दूर दूर ! पण तो धूर होता काकू , माझ्या संसाराला लागलेल्या आगीचा धूर ! जो नाक बंद करून माझा श्वास गुदमरवणार होता ! माझं उरलेलं आयुष्य त्याच्या काजळीने गडद काळे करणार होता ...माझ्या लेकरांचे भविष्य धुसर करणारा धूर ...काकू ..” तिला पुढे शब्दही उच्चारणे कठीण झाले . ती फक्त रडत राहिली ...काकुनी तिला जवळ घेतले , बाहेरून थंड वाटणारा कुकर उघडला कि त्याचे वाफेने जीव कोंडला आहे असे वाटावे तसे काकूंना तिच्या वेदनांचा तो कोंडमारा उघडल्याने वाटू लागले , त्यांचाही जीव आता गुदमरू लागला होता .. तिला समजावण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करण्याचा वांझोटा प्रयत्न त्या करत राहिल्या . त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या ....वेळ सर्व आवळलेल्या दोऱ्या ढिल्या करत जातो इतकेच काकूंच्या जीवाला आता वाटत होते ... आशा माणसाच्या मनाला अगदी कडेलोटाच्या वेळीही सावरून नेते , कदाचित म्हणूनच माणूस पुन्हा नव्याने उभारी घेत असेल राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखे !

“तो धूरही आयुष्यातून जाईल असे वाटायचे , वाटायचे कि असू देत चुका करतो तो माणूस असतो , त्याला माफ करणारही माणूसच असतो ...विस्तवाची राख होईल आणि पुन्हा सारे पूर्वपदावर येईल ...पण त्या ज्वाला आहेत काकू ज्वाला ! कदाचित माझ्या चितेच्या ज्वालेबरोबरच थंड होणार आहेत ...दिवस संपायचा रात्रही संपायची पण माझे विचार आणि उसासे संपत नव्हते . कधी मन निश्चयाने भरून यायचे वाटायचे या अपमानाचा बदला घ्यावा , या नवऱ्याला अशी अद्दल घडवावी कि पुन्हा यालाच काय पण जगातल्या कुठल्याही नवऱ्याला बायकोचा घात करायच्या आधी त्याचाच अवसानघात होईल , पुन्हा वाटयचे काय होईल काही केले तरी ? आपल्या मर्यादा ओळखून पाउल टाकणेच शहाणपणाचे होईल . भावाचे वागणे , वहिनीचे तुसडेपण आठवले कि मनाचे सारे खेळ मनातच संपायचे . कितीही केले तरी माझे माहेर माझे नाही हे मी केंव्हाच जाणले आहे . तो रस्ता बंद झाला कि दुसरी पायवाटसुद्धा माझ्या आयुष्यात नाही . मग कुठे जायचे ? असे मनात आले कि हातपायच गळून जायचे ...” हतबल मनीषा काकुकडे केविलवाणी पाहत होती . काकूच्या नजरेत मात्र अश्रुंचे तळे उभे राहिले होते . त्यांच्या मनात मनिषाचे आई वडील किती चांगले होते या आठवाणे साकारलेले ते तळे मनीषाने त्यांच्याकडे विषण्ण मनाने पाहिल्याबरोबर खळखळ वाहू लागले .

“तुझे आई बाप असते तर ....असा अपमान होताच त्यांनी तुला कधीच नेली असती ...आणि ते असते तर ...या बंडूची पण इतकी हिम्मत झाली नसती . समाज इतका वाईट आहे एखादा जीव अगतिक आहे म्हटल्यावर सारे त्याचा छळ करू पाहतात ..” डोळ्यातील पाणी पुसत काकू बोलल्या .

“आई बाबा असते तर ...पण ते नाहीत ना आज काकू ....” तिचे अस्फुट रडणे आता अस्फुटपणाच्या सीमा पार करून गेले . तिला आवरणे आता काकूला कठीण होत होते . इतका वेळ त्यांचे बोलणे बाहेरून ऐकणारे काका आत आले .

“बेटा आवर स्वतःला आणि आम्ही आहोत दोघे नसले तुझे आई बाबा तरी .. असे एकटे नको समजू . नाही तुझे आई बाप होऊ शकलो तरी तुला आधार नक्की देऊ . जेंव्हा कधी तुला असे वाटेल कि आता मरणाशिवाय काही मार्ग नाही तेंव्हा एक दार विसरू नकोस तुझ्या काका काकूचे !” साऱ्यांचे काळीज भरून येत होते . इतका वेळ दाटलेले ढग डोळ्यांमधून वाहत होते . प्रेमाच्या ओलाव्याने साऱ्या वेदना हलक्या होतात . मनिषाचे मनही शांत होत होते . तिने काकांकडे एक कृतज्ञापूर्ण कटाक्ष टाकला .

“त्यानंतर मी काम करत राहिले . त्या दिवशी रविवार होता दोन्ही मुलांना सुट्टी होती . ते बाहेर गेले होते आणि आत्या शेजारी . मी माझ्या कामात आणि विचारात होते . आकाश रडत आला . मी विचारले काय झाले म्हणून तर म्हणू लागला ‘आई आता आपण गरीब होणार ?’ मी हसून विचारले का रे बाळा असे का विचारतो ? आपण का गरीब होऊ ? तर म्हणाला रोहितची आई म्हणत होती त्याच्या बाबांना कि बंडू आता घरात पैसे नाही देणार मग कशी करेल बिचारी मनीषा ? खरच का गं आई असे होणार ? त्याच्या या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते होते ते फक्त तेच तेच प्रश्न ! थोडावेळ मी गप्प राहिले त्याचे डोळे पुसत राहिले . काय समजावणार होते त्याला मी ? मलाच कळत नव्हते . असे काही नाही सांगात ती वेळ तर मी निभावून नेली पण ? त्या रात्री मीच पुढे होऊन त्यांना विचारले तुम्ही आम्हाला असे वाऱ्यावर तर नाही ना सोडून जाणार ? माझे जाऊ देत पण मुले तर तुमच्याच रक्ताची आहेत त्यांचा तरी विचार करा . त्यावर त्यांनी जी रुक्ष प्रतिक्रीया दिली तिने तर माझा जीवच हलवून सोडला . ते मुलांना कधी अडचण येऊ देणार नव्हते . दर महिन्याचा पगार आईकडे न देता मला देणार होते .. म्हणजे ? म्हणजे त्यांच्या आयुष्यात नक्की दुसरी स्री होती ! एक समाधान होते आकाशच्या शंकेप्रमाणे आम्ही गरीब होणार नव्हतो !” खिन्नपणे मनीषा बोलत होती .

“काकू नंतर मीही त्यांच्याशी बोलणे सोडून दिले .आधी असे वाटे कि कदाचित मीच शंका घेते , त्यांचे तसे काही नसेल त्यानाही माझ्या अशा वागण्याचा त्रास होत असेल पण त्या दिवशी असे बोलले आणि सारे प्रश्न माझ्या दृष्टीने संपले होते . त्या नंतर तीन दिवसांनी रोहितची आई म्हणजे माझी जाव लागते , ती आली धावतच आली , मला चल म्हणाली मी गेले तिच्या सोबत तर भावोजी म्हणाले बंडू आणि ती बाई देवळाच्या मागच्या बागेत आहेत , चला तुम्ही , मी भावोजींच्या गाडीवर बसून गेले ..खरे आता विचार येतो जायला नकोच होते ...पण त्या दिवशी गेले . ती दोघे गळ्यात गळे घालून निर्लज्जपणे तेथे बसली होती . मला पाहून ते उभे राहिले  पण मी मात्र घेरी येऊन तिथेच पडले . घरी कशी आले मला माहित नाही . त्या दिवशी ते मात्र घरी आलेच नाहीत . पोरांचे तोंड पाहून मी सारी कामे केली मुलांना जेऊ घालून झोपवले पण सारे यांत्रिकपणे ! दुसऱ्या दिवशी ते घरी आले मला विचारले पण बरे आहे का ? मी हो म्हटले , त्यांच्या पायावर पडून त्यांना विनंती केली कृपा करून तुम्ही आमच्या जीवनात परत या माझी दया करा . पण त्या दगडाला घाम नाही फुटला . ते तेंव्हा मात्र निग्रहाने संगत होते ‘ काही झाले तरी मी रेश्माला अंतर देणार नाही . तुम्हाला काही कमी पडणार नाही पण तुला तिचे असणे मान्य करावे लागेल’ त्यांच्या या बोलण्याने माझे त्यांच्या आयुष्यातले स्थान मला कळले होते . खरंच तसे पाहता ती बाई माझ्यापेक्षा सुंदर होती असेही काही नव्हते मग असे का झाले ? मी कुठे कमी पडले ? मला कुठल्याच प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते . आता एक करणे जरुरीचे होते ते म्हणजे मुलांच्या या संस्कारक्षम वयात त्यांना या घटनेपासून दूर ठेवायचे होते . म्हणून मग मी माझ्या भावनांना आवर घालून त्यांना एक अट घातली , म्हटले जे काही करायचे ते मुलांच्यापासून दूर ! त्यांना तुमच्या या वागण्याची जराही कुणकुण नको लागायला , इतकाच उपकार करा ! त्यांनी हि गोष्ट कबुल केली…तेंव्हापासून मनात हे सारे घेऊन जगते आहे ...कदाचित असेच जगावे लागेल ....शेवटी नशीब ...नशीब नशीब म्हणते पण खरेच का हो काकू हेच माझे नशीब आहे का ? कि माझी अगतिकता आहे ... मी खरंच बाकी काही मार्गच नसल्याने या नशिबाच्या चक्रात अडकली आहे . रोज सर्व काम करते , दोन घासही पोटात ढकलते जगते .दिवस संपतो काकू पण तिन्ही सांज झाली ना मनात काहूर उठते ...रोज आभाळाला जाऊन भिडते ...झोप तर केंव्हाच मला विसरून गेली आहे ...या अगतिकतेमुळे काळीज पोकळ झालंय असे वाटते ..उरातली ती पोकळी मनाला पोखरत राहते ..डोळ्यांच्या दारावाटे अश्रू होऊन बाहेर येते ...आणि रात्रभर उशी भिजवत राहते ...” खिन्न नजरेने ती जमिनीत नजर खुपसून बसली होती . एक पाय गुढग्यात वाकवून डोके त्यावर टेकलेले ..अश्रू ओघळत जमीन भिजवत होते ...

   बराच वेळ ती अशीच रडत राहिली . काकू काका डोळे टिपत होते ,आज त्यांना या आईबपाविना पोरीचे आईबाप व्हायचे होते . दोघांच्या मनात ही एकच गोष्ट खेळत होती . काकू पुढे होऊन तिला मायेने जवळ घेत बोलू लागल्या .

“बेटा खूप सोस्तेस तू पण एक सांगते आम्ही दोघे आहोत तोवर तुझ्यासाठी कधीही हे दरवाजे बंद नाही होणार . आता भिंतीना न बोलता आमच्या दोघांजवळ तुझे मन मोकळे करत जा . नवरा नाही असेच समज त्याचे तुझ्या आयुष्यातील असणे पुसून टाक म्हणजे त्याच्या नसण्याची जाणीव तुला त्रासदायक होणार नाही . हा हा म्हणता मुले मोठी होतील ...तारुण्याचे हे दिवस मावळतीला झुकतील तेंव्हा बंडूही परतेल . मुलांनी तुझे कष्ट पहिले आहेत , दु:खही जाणतील ,आणि म्हणून कधीच तुला दुखावणार नाहीत . आणि एक सांगू कुणीच जाणणार नाही तेंव्हा आम्ही आहोत ! तुझे आई बाप !” काकाही प्रत्येक शब्दाला हुंकार भरत डोळे पुसत होते ...

   तिने उठून दोघांच्याही पायांना स्पर्श केला . घड्याळात चार वाजायला आले होते . तिला पुढच्या कामाची ओढ होती . मनात उंच उंच उडणारे विचार तळाशी गेले होते आणि जडवलेले काळीज हलके झाले होते ...चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आले होते . उठून तिने सामानाच्या पिशव्या उचलल्या .

“आईबापाच्या घरी येऊन राहायची वेळ नाही येणार पण त्यांचे असणे इतका हुरूप देईन कि संकटांचे डोंगरही हसत पार होतील ...” हसून तिने काका काकुकडे पाहिले आणि चालू लागली . उन्हे थोडी कलली होती . त्यांची दाहक किरणे आता पोळत नव्हती . आता वारे होते पण धूळ उडवत नव्हते ... घरांवर साचलेले धुलीकण बाजूला घेऊन जात होते ...झाडांचाही श्वास आता मोकळा झाला होता ...मनीषा पायाखालच्या जमिनीला पाहत झपझप चालत होती ....

        डॉ संध्या राम शेलार