या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Wednesday 26 August 2015

अथांग

माझे अथांग हे जल
परि भरलेले मन
अर्पिलेले श्रीफल
बघ येई परतून

दैव देते खुप सारे
हवे तेव्हडेच घ्यावे
हाव कधी ना संपते
ज्याचे त्याला पुन्हा द्यावे

होय माणसा माणूस
तुला कळू दे रे रीत
प्रत्येकाला मिळो घास
नको वागू विपरित

मोठा हव्यास हा तुझा
घाल आवर रे त्याला
रिता होणार हा आहे
उद्या भरलेला पेला

कौतुक तुला भारी
माझ्या माघारी देण्याचे
भरल्या ओंजळीला
बंद मार्ग हे येण्याचे

नको ओंजळ फुलांची
नको दान श्रीफळाचे
नको दुर्घंदित करू
निर्माल्यने जल माझे
   संध्या .

Friday 21 August 2015

सुवर्णसंध्या ..माझी प्रेरणा

आदरणीय सुवर्णसंध्याजी ,

         गेले अनेक दिवस तुमच्याबद्दल लिहिणे मनात होते . पण आजच्या तुमच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लिहिण्यासारखा सुवर्णयोग नक्कीच कुठला नसेल ! मला तो दिवस आजही जसाच्या तसा आठवतो जेंव्हा तुम्ही माझ्या संवेदनशील असण्यावर दिलेली प्रतिक्रिया आणि माझ्या लेखनाचे केलेले कौतुक .. पुन्हा तेच सांगण्यासाठी केलेला फोन .. आज साऱ्यांनी तुमच्याबद्दल कौतुकाने लिहिले आहे ..आणि सारे किती सत्य आणि मनापासून नव्हे मनाच्या आतून लिहिलेय जागरकरांनी हे सांगणे न लगे .. तुम्ही आहातच तशा ! प्रत्येकजण जो तुम्हाला भेटेल त्याच्या मनात तुमच्याबद्दल नकळत आदरमिश्रितकौतुक उभे रहाते आणि खोलवर बिंबले जाते .. कायमचे ! मी आज इथे तुमचे माझ्या आयुष्यातील स्थान सांगणार आहे कारण तुमचे अनेक पैलू आहेत जे उलगडणे एका लेखात नक्कीच शक्य नाही .
     मी काही पहिल्यापासून लिहिणारी नाही किंवा आयुष्यातील इतर धावपळीला बाजूला ठेवून पूर्ण झोकून साहित्याचा व्यासंग करणारी कुणी विदुशीही नाही . आहे एक संसारात , व्यवसायात आणि नातेवाईकांच्या गराड्यात हरवलेली एक अशी स्री जिला तिच्या घराच्या चार भिंतीबाहेरील जग अपघातेनेच कळते . या सुरक्षित आयुष्यात असे अपघात घडले आणि मी संवेदनशील होवून लिहू लागले . त्यात माधुरी आणि सुजित दादांच्या माध्यमातून तुमच्याशी परिचय झाला आणि प्रेमाचे जिव्हाळ्याचे हे नाते माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम नाते बनले .. असेही प्रत्येक नात्याला नाव हवे असे काही नाही परंतु माझ्या मनात तुम्ही गुरुस्थानी असलेली मैत्रीण आहात ! जिथे जिव्हाळ्याचे सारे बोलूही शकते आणि जिथून सतत प्रेरणादायी , मार्गदर्शक , सर्वोत्तमाच्या निर्मितीसाठी लागणारे सारे काही मला मिळते . .. माझे लेखन फक्त भावनिक पातळीवर होते , ते कसे चांगले आहे हे तुम्ही आधी सांगितलेत आणि हळुवारपणे हेही समजावलेत कि ते अभ्यासपूर्ण असायला हवे .. कळत नकळत (त्या वेळी ) तुम्ही जे मार्गदर्शन केले , जे दुवे सांगितले लिहिण्यासाठी ते वाचल्यावर माझ्या लक्षात आले मी किती कुंपणात लिहित होते ,,त्या कुंपणाबाहेर जावून .. अभ्यासूपणे लिहून .. ज्या स्रीयांची दु:खे मी सांगत आहे त्यांना न्यायही मिळवून देऊ शकते .. त्याच वेळी तुमच्याबद्दल एक न कधी लयाला जाणारी आदरभावना मनात वृद्धिंगत झाली .. मैत्रीच्या नात्याने हळुवारपणे तुम्हीं माझ्या प्रेमळ गुरुही बनलात ..
          तुमच्या आयुष्यातील चढउतरांबद्दल मी सतत इतरांकडून ऐकत आले परंतु इतक्या वेळा संभाषण होवूनही तुम्ही कधीच ते बोलल्या नाहीत .. तुमची सर्व क्षेत्रातील अभ्यासू दृष्टी सतत तुमच्या बोलण्यातून मला दिसायची ..अभ्यासू दृष्टी तर सारेच जोपासतात परंतु तुम्ही कृतीतून त्याला आकार देत आहत यासारखी स्पृहणीय गोष्ट कुठलीच नसेल ..बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !
             स्वत:च्या मर्यादांना कधीच कुंपण होऊ देऊ नका , त्यांच्या बाहेरचे जग पाहण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे ..त्या मर्यादा ओलांडून पुढे जायलाच हवे आणि त्यातूनच स्व:उत्कर्ष साधणार आहे ..तुमच्या सांगण्यातून ..तुमच्या जगण्यातून मी हे नक्कीच घेत आहे .. आजवर कुंपणात गुंतलेली मी.. खरा खुरा प्रयत्न करत आहे स्वतःसाठी जगण्याचा ..अंगीच्या कलेला जोपासण्याचा .. तत्वांना मुरड न घालता त्यांचे संगोपन करण्याचा ..विवेकबुद्धी जागृत ठेवून नवे ते आत्मसात करून विवेकवादी विचारांनी समृद्ध होत विवेकपूर्ण समाजनिर्मित्तीत स्वतःच्या लेखनातून आणि कृतीतून भर घालण्याचा ... तुमची सदैव ऋणी असले मी तुम्ही दिलेल्या जीवनदृष्टीबद्दल ........
            तुमच्या आयुष्यातील या संस्मरणीय क्षणी माझ्या शुभेछ्या जरी यत्किंचित असतील तरी त्या नक्कीच माझ्या आतील आवाजाच्या आहेत .. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेछ्या ... आपल्या सर्व आकांक्षा पूर्ण होवोत आणि त्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच सदिछ्या ...
                               - डॉ. सौ . संध्या राम शेलार .
 सुवर्णसंध्याजी विषयी आमच्या व पु जागर वर आलेल्या काही वाढदिवसाच्या शुभेछ्या इथे देत आहे .

  डॉ . शिवाजी काळे -


कवी हनुमंत चांदगुडे -

डॉ . सुजित अडसूळ -
मा. सुवर्णसंध्याजी .
आज आपला वाढदिवस आहे .
आपण समाजासाठी , निसर्गासाठी , पर्यावरणासाठी जे काम करत आहात त्याला तोड नाही . येणारा प्रत्येक दिवस आपणास अखंड उर्जा देत राहो .
मराठी साहित्यात एक उत्तम समीक्षक म्हणून आपले स्थान आहे . नवोदित कवी व लेखकांना आपण सतत मार्गदर्शन करताना संदेश हि देता . त्यामुळे आपला फ्यानक्लब आपल्या प्रतिक्रियेची आतुरतेने प्रतीक्षा करतो .
घरच्या सर्व आघाड्या पेलत सर्वच प्रांतात आपण सहज वावरत असता .
आपणास दीर्घायुष्य लाभो आणि आपला प्रत्येक क्षण इतरांना जगण्याची प्रेरणा देवो . हीच शुभेछ्या ...

डॉ . शुभा लोंढे-
 सुवर्णसंध्याजी

एक दिलदार सखी
माझ्या जागराची शान
काय वर्णावा तिचा महिमा
वाखाणण्याजोगा अपूर्व बाणा
कवीच्या प्रेरणाची स्वर्णकिरण
करी सदर मार्मिक विश्लेषण
समीक्षक व्याख्याती किती हे आभूषण
भरकटलेल्या समाजाची आशा
प्रत्येकाच्या सुखदु:खांची मनीषा
लाखोंची प्रेरणा अन उत्कर्षा
स्ववेदनेला तारले हरल्या निराशा
निसर्गाचे देणे त्यांनीच बहरावे
पक्ष्यांच्या विकासा धडपडावे
पोषक सुखसोईने त्यांना उभारावे
संवर्धन निसर्गाचे आदर्श जोपासावे
मायेच्या ममतेने ममतेने करी
सर्वांच्या लिखाणाचे कौतुक
शब्द शब्दात झळके विलक्षण
तेजाचे अपार प्रेम स्नेह सहेतुक
सदैव बहरावी तुझी प्रतिभा
चमकावी बुद्धी तेजाची आभा
अनंत भरारी घेवून आकाशी
मनिषा तव उदंड आयुष्य लाभो
 डॉ शुभा प्रशांत लोंढे .

सुनिता -
सुवर्णसंध्याताई ,
तुमच्यासारख्या निसर्गप्रेमी व्यक्तीचा वाढदिवस श्रावणात असणे किती सुंदर योगायोग !  जगायला शिकवणाऱ्या श्रावणाने अशी तुमच्यासारखी संवेदनशील कर्तव्यदक्ष माणसे बहाल केली . आपली लेखणी सदैव बहरत राहो श्रावणातील हिरवाईसारखी ..तुम्ही आमच्या लेखणीची प्रेरणा आहात . तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ..आरोग्य लाभो ..

डॉ माधुरी बोथटे -


अशा अनेक शुभेछ्या आहेत वेळेअभावी इतक्याच सांगितल्या ..




Saturday 15 August 2015

उतराई

ज्यांनी माझ्या सुखाची
ईच्छा व्यक्त केली
त्यांनीच मला नेहमी
आहेत दुःखे दिली

दोष तुझा नाही
प्राक्तनच माझे
आयुष्यभर आहे
वाहने हेच ओझे

प्रेमाची जवळीक ती
नको ते देणे घेणे
पावसाच्या आधीच
नशीबी विरहगाणे

शरदाचे चांदणे
जीवनावर शिंपलेस
श्रावणसरींनी त्या
चिंब भिजवलेस

आभारी म्हणून तुला
ऋणांना नाही लाजवत
माफी जरूर दे मला
तुझे जीवन नाही सजवत
       संध्या .

Sunday 9 August 2015

बाळ

   
    आई हे जसे मुलांसाठी एक गजबजलेलं गाव असते तसे मुल आईसाठी गजबजलेलं शहर आहे म्हटले तरी चालेल . त्याची जन्मल्यापासूनची प्रत्येक बारीकसारीक गोष्ट आई आपल्या हृदयात जपून ठेवत असते , शेवटच्या श्वासापर्यंत ! आमची आजी वडील आत्या चुलते यांच्या जन्मापासूनच्या आठवणी सांगायच्या , मला नेहमी आश्चर्य वाटे आजी कसे इतके सारे ध्यानात ठेवत असेल ? तेही एक मुलाचे ठीक आहे तिला तर पाच मुले आणि लहानपणी तापाने गेलेला एक , अशा साऱ्यांच्या साऱ्या आठवणी ती सांगे ! पण आज जेंव्हा मी आई आहे एका दहा वर्षाच्या मुलाची तेंव्हा लक्षात येते कि कालची भाजी काय होती हे लक्षात न राहणारी मी बाळ लहान असताना त्याने पहिल्यांदा काय खाल्ले , त्याला काय आवडे , तो पहिला शब्द काय बोलला सारे सारे मनात जपून आहे एखाद्या अनमोल दागिन्यासारखे !
   परवा बातम्या पाहत होते , अचानक एक बातमी काळीज चिरून गेली .. एका सुशिक्षित , मोठ्या पदावर विराजमान असलेल्या आईने आपल्या १३ वर्षाच्या मुलाला bat ने मारून खून केला .. मन क्षणभर सुन्न झाले , असे वाटले कि उगीच टी व्ही वाले बातम्यांचा बाजार मांडून बसतात , स्वतःचा बाजार वाढवण्यासाठी ! पण प्रत्येक वाहिनीवर तीच बातमी ठळक अक्षरात झळकत होती . डोळे आपोआप गच्च झाले , मन एकदम अस्थिर बनले , क्षणभर काहीच सुचेना .. तशीच बसून राहिले थोडा वेळ .. काम बाकी होते पण मन कशातच लागत नव्हते .. बातम्यात दाखवलेले ते मुल ..किती निरागस ..कपाळाला गंध लावलेला तो फोटो .. अजून जीवनाच्या उंबरठ्यावर उभा असणारा तो बाळ काळाच्या पडद्याआड गेला होता ! आणि कसलेही भाव चेहऱ्यावर नसलेली , पोलीस स्टेशन मध्ये जमिनीवरच मांडी घालून बसलेली ती सुशिक्षित आई ! आई ........ किती सुमधुर शब्द आणि जगाचे सारे दु:ख जिच्या पदराखाली विलीन होते ती आई .. कशी , का धजावली असेल पोटच्या पिल्लाला मृत्युच्या दारी सोडायला ? तिच्या जाणीवा अशा कशा बधीर झाल्या असतील . मुलाला एक चापट मारली तर दिवसभर रडणारी मी .. .. लिहितानाही डोळे गच्च झालेत माझे ! असे कसे त्या माउलीचे हृदय दगड बनले असेल .. जी आई साऱ्या जगाच्या ९ महिने आधीपासून त्या जीवाशी सर्व शक्तीनिशी जोडली गेलेली असते तिने असे करावे ..किती कित्त्ती प्रेमाचे , मायेचे, आपुलकीचे, दु:खाचे , रागाचे क्षण त्या दोन जीवांनी एकत्र जगलेले असतात .. त्याच्या त्या जन्मलेल्या निरागस चेहऱ्यापासून ते त्याच्या त्या नाविन्यपूर्ण हालचाली , त्याची ती इवलीशी गोड प्रत्येक अवयवाची ठेवण , त्याची ती मऊशार कोवळी त्वचा .. अनेकदा त्याला स्पर्श करायला भाग पाडणारे ते त्याचे गोजिरे रूप ! काहीच आठवले नसेल तिला ? त्या कोवळ्या जीवाला मृत्युच्या दारी सोडताना ? कितीही मोठे झाले तरी लेकराच्या स्पर्शाने हुरळून जाणारे मातृहृदय कुठे ठेवले असेल तिने .. देवा तुला एकाच विनंती आहे , प्रार्थना आहे ..अगदी मनाच्या , हृदयाच्या आतून .. मुलाला , मुलीला आईचा बळी घेणारा बनवलेस ना , या कलीयुगातील  अनर्थ म्हणून तरी मी तुला दोष देणार नाही परंतु जिने जीवन दिले त्या मातेचे हृदय असे पाषाणाचे नको करूस ...
        माझ्या जीवनातील एक चांगली आठवण इथे सांगावीशी वाटते .. आई मुलासाठी काय असते आणि मुल आईसाठी किती आनंद असते .. रागाचे अनेक प्रसंग येतात आयुष्यात पण त्याच्या प्रेमळ स्पर्शात ते कसे विरघळून जातात ही  प्रत्येक आईची आठवण असते ...

                                 माझी आठवण
   गजर वाजत होता पण आज काही अंग उचलुच वाटत नव्हते बेडवरून. सकाळी आवरायची घाई नसली कि मन आपोआप आळशी होते. मग उगीच कंटाळा येतो , आणि लवकर उठावे लागते या गोष्टीचा रागही येतो . का बरं माणसाचे मन असे असेल ? आणि ज्या दिवशी कामाची धावपळ त्या दिवशी आपोआप जाग येते , पण आज काही केल्या उठून बसावे वाटेना . मग वाटले जाऊ देत आज शनिवार आहे कुठे शाळा आहे मुलांची झाला थोडा उशीर तर होऊ देत, अजून अर्धा तास तरी पडून राहते . पण आमचे सत्योम दादा नेमक्या वेळी आमच्या मनसुब्यांवर पाणी सोडणार हे ठरलेले . शाळा असेल त्या दिवशी सात वाजले तरी ओरडून उठवावे लागते आणि नसेल शाळा तर मग मात्र सरकार सहा च्या आधीच उठणार ! त्याला शाळा नसलेल्या दिवशी जाग का येते ? या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळाले नाही ! जसे कि आई जेवायला बसली कि लहान मुल का रडते ? कुत्र्याचे शेपूट सरळ का होत नाही ?.......अश्या अनेक प्रश्नांसारखे !
   आजही माझ्या झोपेच्या सुखाची वावडी करून सत्योम बाळ उडवणार हे मात्र नक्की , काही वेळा न इतका राग येतो असे वाटते पोराच्या दोन कानाखाली काढाव्या आणि गप्प पड म्हणून ओरडावे , पण मग प्रश्नांची अशी शृंखला सुरु होते कि झोपेचे खोबरे कधी झाले हेच कळत नाही !
“मम्मी” एक हात पोटावर टाकत बाळराजाच्या झोपेची सांगता झाली ! मग मात्र एकदम खुश होऊन पोराने हळूच माझ्या गालावर ओठांचा स्पर्श केला , जणू मोरपीस फिरले गालावर ! मी सुंदर स्वप्नातून जागी होतेय असे वाटले आणि मन एकदम प्रसन्न झाले !
“का रे पिलू ?”
“माझी मम्मी न मला खूप आवडते”
“?” कुतूहलाने मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहिले .
“या जगात माझी सर्वात सुंदर , सर्वात प्रिय गोष्ट कुठली असेल तर माझी मम्मी .” झोप उडाल्याचा राग कुठच्या कुठे निवळला ..झुळझुळ झऱ्याच्या नितळ पाण्यासारखे मन स्वच्छ झाले आणि खळखळ डोळ्यातून वाहू लागले .... 

Sunday 31 May 2015

व पू जागर शब्दांचा स्नेहमेळा

पहिला पाऊस , पहिलं प्रेम , पहिलं सारं काही मग त्याचा चांगला वाईट कसाही अनुभव आला तरी ते निरअतिशय सुंदर असतं . आठवणींच्या चांगल्या वाईट रसकथांनी भरलेलं आभाळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतच म्हटले तरी वावगे ठरणारच नाही . कधी तरल स्वर तर कधी कर्णकर्कश्य किंकाळी ...तर कधी दिर्घ शांतता .. पण जेव्हा ते  आठवणींनी भरून आलेलं आभाळ रितं होतं ना एखाद्या निवांत क्षणी तेव्हा नुसतं मनच उजळत नाही तर आत्म्यालाही ते प्रकाश देवून जातं ..
   माझ्याही आयुष्यातील सार्या पहिल्या आठवणी कधी पाऊस तर कधी रूक्षता देऊन जातात . पण त्यांच पहिलेपण अजून सरता सरत नाही .
असाच एक सुवर्णक्षण काल माझ्या आयुष्याला प्रगल्भ आणि अनुभवसमृद्ध करून गेला .दिग्गज  कवी लेखकांच्या त्या समृद्ध मैफीलीत माझे आयुष्य उजळत आहे असेच वाटत होते . मनाला प्रकाशमय करणारे ते क्षण मी पहिल्यांदा अनुभवत होते  . आयुष्य एका चौकटीत जगणारी मी त्या क्षणी वर्तुळातील मोकळीक जगत होते . खरंच फक्त भांबावले होते . गतीमान ह्रदयस्पंदनांना कसे आवरावे ?  कुणी पाहील का माझे बावरलेपण ? हेरलेच ! शुभाजी तुम्ही !
  हे पहिलं वहिलं  पुनवचांदणं त्याच्या शितल प्रकाशाने माझे जीवन परिपूर्ण करेल याबद्दल मन निशंक आहे ! 
  काल स्नेहमेळाव्यात प्रवेश करताना मन खुप कातर झालं होतं . परंतू त्या प्रेमभरल्या स्निग्ध स्वागताने जीव हरकून गेला . प्रत्येकजण ओळख करून घेताना कुणी खुप जीवलग आहे असेच मन वारंवार सांगत होते .  हा आपलेपणा आपण घरच्या कार्यक्रमातच अनुभवतो फक्त ! एका प्रेमळ घराचाच हा स्नेहमेळा होता .
    कवी हनुमंत चांदगुडे त्यांचे नाव आपोआपच मनात कायम होते त्यांची कविता वाचली की ! तशी मनात एक धाकधूक . . . किती मोठं वलय या नावाभोवती . . . ओळख होताना जाणवले त्यांचे माणुसपण . . विनम्र व्यक्तीमत्व ! ऊंचावर असणार्यांचे पाय हातभर हवेत असतात परंतू सरांचे पाय मात्र या लोकप्रियतेच्या ऊंचीवर असून जमिनीवर ... नव्हे जमिनीत रूतलेलेच ...
                        ऊंज पर्वतासारखी
                        माझी एक सवय आहे
                        हात जरी गगनाला
                        धरेत मूळ घट्ट आहे
यापेक्षा वेगळे तुम्ही नाहीच सर . आणि आमच्या कवितेच्या मदतीला धावून येणं ... खरंच तुमच्याबद्दल आदरयुक्त आपलेपणाच वाटतो आहे . तुमच्या काव्यप्रतिभेबद्दल तर आम्ही नवागताने काय बोलावे .. प्रत्येक ओळीनंतर फक्त वाह .... इतकेच !  तुमच्या अनुभवाचे आणि तुमचे आशिर्वाद  सदैव रहावे ईतकीच ईच्छा !
    डॉ शिवाजी काळे ... माझा जवळचा मित्र . त्याची काव्यप्रतिभा म्हणजे बांबूच्या त्या वनासारखी ... ऊगवतानाच आभाळ कवेत घेणारी . मी त्याला नेहमी म्हणायचे मला पहायचंय तुला मोठा कवी झालेलं .. त्याने पहिल्या मैफिलीतच गरूडभरारी घेतली . सलाम शिवाजी ... तुझ्या साठी एक वेगळा लेखच लिहायचा आहे ... एकच सांगते .. मला तुझी मैत्रीण म्हणवून घेणे अभिमान वाटतो ......
    कवी श्रीकुलजी ... अचानक दाटलेल्या मेघांनी बरसून सारं सौंदर्य क्षणात निर्माण करावं अशी तुमची कविता ... भेटताच आपलीशी वाटते . तुम्ही अचानक आलात आणि कवितेबरोबरच तुमचा आवाज किती मंञमुग्ध करतो याचा विलक्षण अनुभव मन स्पर्शून गेला ... एस टी महामंडळाची नोकरी करून समृद्ध ठेवलेली तुमची कविता म्हणजे अप्रतिम ...
    डॉ शुभाजी लोंढे .. आपका तो क्या कहना ... सही आवाज आणि  काव्य तर अप्रतिम ..
हिंदीवरची तुमची पकड कौतुकास पाञ आहेच ... तुमचं ते कौतुक करणं मनाला ऊभारी तर वाटतेच परंतू तुमचे प्रेमळ शब्द जीवाच्या जास्त जवळ आणतात तुमच्या ...
   कवयिञी डॉ रेवती संत ... सौंदर्य , रसिकता ,कल्पकतेचा , सर्जनाचा सुंदर मिलाफ म्हणजे रेवतीजी ... तुमची कविता मनाला भिडते . तुमचे प्रेमभरले शब्द तुमच्याशी जवळीक करण्यास भागच पाडतात . ..
     संगिताजी काकडे ... पाहताच ती बाला ... खरंच याचीच आठवण झाली ... आणि तुमचे वक्तृत्व भन्नाटच .. काय बोलणार .. मी लिहीते परंतू शब्द माझ्या वाणीपासून दूर पळतात .. तुम्ही मात्र शब्दांना अलगद निवडून कशा जिव्हेवर सजवता शिकवाल मला ? 
      कवी विपुलजी .. रसायन ... कवितेचेही रसायन असे जुळवता .. जीव कातर होतानाच हास्यकळ्या कधी पेरता तेच उमगत नाही .. तुमचे पुस्तक मिळवून नक्की वाचायचे आहे ...
     मेघाजी .. तुमची कविता इतकी आपली वाटते जणू मीच माझी भावना शब्दांकित करते आहे . तुमची उत्सुकता , ते भारावलेपण .. खरंच मनाचा एक कप्पा तुमचाच ..
     योगिताजी .. शब्द उणे तुमच्यापुढे .. शिघ्रकविता ... इतकी शिघ्र फक्त तुम्हीच ... सलाम ..
त्यातच तुमच्या स्वभावातील आपुलकी ... अधिक माणसे म्हणूनच तुमच्याशी जोडली जात असतील .. मीही जोडले गेले ..
                    माधुरी तुझ्या साठीच फक्त ... 
                   बहिणी बहिणी जन्मांतरीच्या
                    मैत्रीच्या नात्याने जोडलो
                   हसत खेळत रागवत रूसत
                   जणू गौरायाच घडलो
  गुरू आणि सौ गुरू तुम्ही खरंच इतके उत्साही जोडी पाहीलीच नव्हती.. तुमच्यासारखे रसिक असतिल तर काय हवे लिहीणार्यांना ...
  श्री आणि सौ जाधव छान जोडी . युवराजजी वक्तृत्व छानच .. तुम्ही देऊ केलेल्या संधीचा आम्हा नवागतांना नक्कीच फायदा होईल . धन्यवाद .
    डॉ सुवर्णसंध्याजी धुमाळ .. तुम्ही
काय काय बोलू तुमच्याबद्दल . खरंच समजत नाही . एक संपूर्ण लेख लिहीला तरी पुरेसे नसेल . तुमचे शब्द प्रेरणास्थान आहे आमचे .. आता इतकेच सांगेन .. तुमची जिवीधा परी आहे .
   सुहास एक चांगला मित्र तर आहेसच .. चारोळ्या .. तुझी शायरी वा ..
    विशालजी माने .. तुम्हाला लक्ष लक्ष प्रणाम .. तुमची चित्रकला .. तुमची दैदिप्यमान आशा ... प्रतिभेनेही तुमच्यापुढे लोटांगन घ्यावे अशी जिद्द ... आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत ... लवकर तुमचे चालण्याचे स्वप्न पुर्ततेस जाणार आहेच .....
  आता एक अशी जोडी ... वृषालीजी आणि दादा म्हणजे डॉ सुजित अडसूळ .. वृषालींजीनबद्दल आधीच एक पोस्ट टाकलेली आहेच . मैत्रीण .....
सुजित सर म्हणजे आम्हा सर्वाना जोडणारा दुवा . वैयक्तिक माझ्या तरी आयुष्यात व्यासपीठ लाभने तुमच्यामुळे शक्य झाले दादा . धन्यवाद ..
  प्रेमराज तुमचं कौतुक करावं तितकं कमीच .. तारूण्यातही अनुभव आणि बुद्धीमत्तेने खळखळ वाहणारा निर्मळ झरा . तुमच्या सर्व आकांक्षा फलित होवो हीच प्रार्थना ...
अशा या सर्वांच्या अथक परिश्रमातून साध्य झाला तो व पू जागर शब्दांचा चा स्नेहमेळा ...
    सर्वांचे पुन्हा पुन्हा आभार ... तुम्ही माझे पहिलेपण ऐकून त्याला भरपूर दाद दिलीत ... मला हे पहिलेपण नक्कीच प्रेरणादायी असेल .


Wednesday 27 May 2015

नकोसा पाऊस

आताशा पाऊस नकोसा होतो
थंडावा असा अंगावर येतो
उगीच काळीज कोरीत जातो

तुझ्या श्वासांचा स्पर्श आठवतो
हळु ह्रदयी लय वाढवतो
तनाची उब कानात काढतो
आताशा ...

डोळ्या तुझ्या असा मेघ दाटतो
प्रितीत मजला चिंब करतो
क्षणिक सारे ! तिथेच मी थिजतो
आताशा .....

पाऊस मग पुन्हा चेकाळतो
मनी असे ओरखडे ओढतो
आठवांनी जीव थरथरतो
आताशा ....

जाता जाता हूरहूर लावतो
काहूर हे काळजात दाबतो
निर्माल्यस्मृती नदीत सोडतो
आताशा ....

   संध्या 

Monday 11 May 2015

विनवणी

कधी उगवल सांग
माझ्या अंगनी दिवस
देवाजीच आता सांग
कधी संपल अवस


झालं निजुर व पाय
मिरुगाला धाडा जरा
करा किरपा इतकी
ढेकळांची साय करा.....

दारी हंबरे गोधन
आत स्फुंदते धनीन
नका बघू अंत देवा
गरिबाची लाज ठेवा

माझं चुकलं माकलं
माफी देवाजीच्या दारी
लिंब चिंच न जांभळ
लावीन जी बांधावरी

नाही सांगत मी खोटं
पाणी दाटलं डोळ्यांत
मातनार आता नाही
चुक आलीय ध्यानात

हात जोडून व देवा
इतुकीच विनवणी
लेकरांच्या मुखामंदी
पडूद्या की अन्नपाणी

   सौ गितांजली शेलार 

Monday 30 March 2015

एक खांदा हवा



मलाही एक खांदा हवा
अश्रूंनी भिजवण्यासाठी
मरगळलेल्या मनाला
परत रिझवण्यासाठी...

धुत्कारल्या माझ्या जीवाला
विस्कटलेल्या या बटेला
विखुरलेल्या त्या माळेला
परत सजवण्यासाठी
मलाही एक खांदा हवा
अश्रूंनी भिजवण्यासाठी...

दु:खाला देण्या एक स्वल्प
उद्याच्या सुखाचे संकल्प
स्वप्नांचे रेखीव शिल्प
परत बनवण्यासाठी
मलाही एक खांदा हवा
अश्रूंनी भिजवण्यासाठी...

सृष्टीने दिलेलं औदार्य
अस्ताला निघालेला सूर्य
सोडून चाललेले धैर्य
मनी एकवटण्यासाठी
मलाही एक खांदा हवा
अश्रूंनी भिजवण्यासाठी ...
               -संध्या §

Sunday 1 March 2015

भांडण

   दिवस उगवताच आग ओकत येणारा दिनकर , धुलीकणांनी मलीन झालेल्या वृक्ष वेली , तप्त अशी मृत्तिका आणि इकडून तिकडे तहानेने व्याकुळ होवून पळणारे सजीव , वसुंधरेचे काळीज उद्विग्न करीत होते . पाखरांचे थवेच्या थवे झाडांच्या पानांची सावली शोधून दमून शेवटी माणसाच्या घरांचा आधार घेत होते . ते पण थोडा वेळ लगेच कुणी त्यांना तिथून हाकलून काढीत होते . असा क्रोधीत होता दिनकर कि दुपारी तर डोक्यात , पोटात , अंगावर आणि संपूर्ण सृष्टीवर जणू रखरख पेरीत होता . धुलीकणांनी कोंडलेले श्वास वृक्ष वेली जबरीने मोकळा करण्याचा असफल प्रयत्न करीत होती . कधी पवनाची कृपा झाली तर थोडा श्वास कसातरी मोकळा होत होता . आटलेले तलाव , नद्या अंगावरच्या भेगा सावरीत कशीतरीच दिसत होती . भेगाळलेल्या जमिनी कोरडा टाहो फोडीत होत्या… वसूचे काळीज अधिकच हळवे करीत होत्या ! थंडीच्या दिवसात इतका प्रेमळ असणारा दिनकर , त्याचा अचानक असा क्रोधाग्नी का भडकावा हेच तिला उमगत नव्हते . प्रेमाच्या गुलाबी थंडाव्यासारखा त्याचा क्रोधही सोसला असता तिने , परंतु लेकरांचा जीव घेणारा हा कसला राग ? लेकरे तर त्याचीही न ? मग ? कुठला बाप असा रागवत असेल कि स्वत:च्याच पिलांना होरपळून मारीत असेल ? तिच्या जीवाची मात्र खूप खूप उलघाल चालली होती . त्याला का असा वागतोस असे विचारले तर उगीच अधिक क्रोधीत व्हायचा … मन व्याकुळ झाले होते पण नेत्रात टिप्पूस उतरावा इतकेही जल तिच्यात बाकी नव्हते . किती हा क्रोध … बस करा दिनकर बस करा … नाही नाही आता गप्प बसून चालणार नाहीच … बोलावेच लागेल आपल्या लेकरांसाठी तरी बोलावेच लागेल … ते बाप असतील पण मी आई आहे … माझे हृदय फाटणार न त्या लेकरांची टाहो ऐकून ?
"दिनकरा , दिनकरा … का असे क्रोधीत झालात दिनकरा ?" डोळ्यात प्राण आणून वसूने शेवटी विचारलेच.
"तू मला विचारतेस वसू ? मला ?" कपलावरच्या रेषा अधिकच दीर्घ करत दिनकर तिच्यावरच प्रश्न फेकू लागला . तप्त झालेली वसू आता खूपच हळवी झाली … डोळ्यातील आर्जवे तो वाचू शकत होता , त्याने तो घायाळही झाला पण त्याचा क्रोध त्याहीपेक्षा जास्त होता .… तिच्या प्राणप्रियाला तिची तगमग समजू नये याचे अतीव दु:ख तिला कातर कातर करीत होते . तिचा श्वास अधिक अधिक वाढू लागला . पण येणारा तो वाराही तप्तच येत होता आणि तडफडणाऱ्या जीवांना जास्तीच वेदना देत होता . तिचा दोलायमान झालेला जीव शेवटी लेकारांपाशी येवून स्थिर होऊ लागला …. आणि कठोर होत तिने शेवटी त्याला प्रतिप्रश्न केलाच ,
"दिनकरा तुम्हाला नाही दिसत तुमच्या क्रोधाग्नीने होरपळणारी तुमची लेकरे ? त्यांचा जीव घेवूनच थांबणार आहात का तुम्ही ?"
"वसू तू मला भावनेच्या आहारी घालू नकोस पण आज जे ते भोगत आहेत त्यांच्याच कर्माची फळे आहेत , आणि इथे जर समज नाही दिली तर ते तुलाही घेवून नष्ट होतील ." क्रोधीत दिनकर हळवा झाला होता आणि त्याचे वसूबद्दलचे प्रेमच त्याला असे करणे भाग पाडत होते …
"माझ्या लेकरांसाठी माझे सर्वस्व संपले तरी चालेल मला ! आणि असेही त्यांच्याशिवाय अर्थच काय आहे हो धरेला ?" वसू फुरंगटून बोलली .
"वसू …. मातृप्रेमाने अंध होवून जावू नकोस … तुझा शेवट व्हायच्या आधी त्यांचा शेवट आहे मग तूच ठरव या स्वार्थी मानवासाठी तू आपल्या इतरही लेकरांचा बळी देणार आहेस का ?" क्रोधाने थरथरत दिनकर जवळजवळ ओरडलाच . त्याच्या ओरडण्याने कंपित होत वसुही अधिकच हट्टाला पेटली .
"म्हणजे मानवाने सारे केले … असे म्हणता … इतर लेकरांनी का भोगावे म्हणता आणि स्वतः काय करता हो … मानवाच्या आधी बाकीच्या जीवांनाच तुम्ही आधी वेठीस धरले आहे … आणि लेकरू चुकले म्हणून तुम्ही त्याचा जीवच घ्यावा हा कुठला न्याय ?"
"वसू … न्यायाची गोष्ट मला शिकवू नकोस … तू फक्त बघत राहा थोड्यांच्या जाण्याने जर सार्यांना सुख मिळणार आहे तर त्यासाठी थोड्यांचे बलिदान द्यायलाच हवे …." 
"मी माझ्या जीवात जीव आहे तोवर असे नाही होऊ देणार … मग तुम्ही दुरावलात तरी चालेल मला !" कठोर शब्दात वसूने दिनकरला ऐकवले खरे पण आतून ती उसवत चालली होती , तिचे हृदय आक्रंदत होते … प्रियाच्या विरहविचारांनी विदीर्ण होत होते …. वरून वज्राप्रमाणे कठीण दिसणारी वसू आतून ढवळून निघाली होती … परंतु लेकरांसाठी असेही निर्णय घ्यावे लागतीलच … स्वतःच्या प्रेमाचा बळी द्यावाच लागेल … नाही नाही मी आता माझ्या पिल्लांना न्याय मिळवून देणारच …
"वसू … वसू अशी नको करू … अग मी का कुणी त्यांचा शत्रू आहे …. ठीक आहे … जशी तुझी इच्छा . पण एक लक्षात ठेव माझ्याशिवाय तुही जिवंत राहू शकणार नाहीस आणि तुझी माझी पिलेही … "आधी हळवा झालेला दिनकर पुन्हा कठोर होऊन तिला धमकावत बोलला .
"तुमच्यासोबत राहून मरण्यापेक्षा तुमच्याशिवाय मरणे पत्करू आम्ही … कमीत कमीत बापाचा आधार नव्हता म्हणून जीव गेला असे तरी म्हणतील सारे !" रागाने थरथरत असलेली वसुही आता प्रत्येक शब्दाला शब्द फेकत होती .
"तुही माणसाच्या स्रीसारखी वागू लागलीस न ? पण लक्षात ठेव या साऱ्या विनाशाला माणसाच्या मुर्खपणासारखे तुझे आंधळे प्रेमही कारणीभूत असेल … " रागाने रक्तवर्णी होत दिनकर बोलत होता . त्याचा तांबूस चेहरा रागाने आणि दु:खाने लालबुंद झाला होता .
"मी तरी मानवी स्रीसारखे वागत आहे पण तुम्ही तर मार्जर नरासारखे स्वतःच्या पिलांनाच गिळायला निघालात … " फणकाऱ्याने  वसू बोलली आणि धुळीचे लोट पुन्हा उधळू लागली … जेणेकरून या कठोर प्रियाचे तोंडही तिला दिसू नये .
"वसू  ……. " रागाने चरफडत दिनकर असंख्य तप्त किरणे धरेकडे फेकत राहिला … तरीही त्याचा क्रोध अजून वाढतच होता .  वसूच्या सर्वांगाची लाही लाही होऊ लागली . दिनकर वसुची सारी लेकरे आडोसा शोधात लपू लागली … आणि या आपल्या मातापित्याच्या भांडणात आपला जीव तर जाणार नाही ना ? या भीतीने वसूच्या कुशीचा आधार घेवू लागली …. धुळीच्या लोटांनी वसू साऱ्यांना पांघरून घालू लागली पण ते तप्त पांघरून त्यांना अधिक कासावीस करू लागले . शेवटी वसूने तिच्या भावांना निरोप पाठवून बोलावून घेतले .
भगिनीचा निरोप मिळताच प्रथम पवन धावतच आला , मागोमाग मेघानेही हजेरी लावली . तिने तिची सारी व्यथा  कोरड्या पडलेल्या नेत्रांनी आणि ओलावलेल्या शब्दांनी दोघांना ऐकवली . तिच्या शरीराच्या दाहाचा आधी इलाज करायचे दोघांनी ठरवले आणि पवनाच्या मदतीने मेघाने तिच्याभोवती अभ्राचे अच्छादन तयार केले . क्षणात वसू दिनकराच्या नजरेआड झाली . मावळतीला झुकलेल्या दिनकराच्या मनातही कातरवेळीची हुरहूर दाटून आली आणि लांब उसासे टाकत तो फक्त म्हणाला , "वसू … "
" वसुताई , तू हि गोष्ट आधीच आमच्या कानी घालायला हवी होती ." डोळ्यातली आसवे टिपत पवन म्हणाला.
"हो वसुताई , पण जाऊ देत अजूनही वेळ गेलेली नाही . आपण वरुणाला बोलावू आणि आधी तहानलेल्या लेकरांना थोडा ओलावा देवूत . " मेघाने पवानाच्या शब्दांना होकार भरत आपले म्हणणे मांडले . त्याचा सल्ला दोघानाही पटला . कारण तहानेने व्याकुळ झालेल्या लेकरांना आधी शांत करणे गरजेचे होते .
   वसुताईच्या मायेखातर आलेल्या वरुणाने स्वतःचे काम चोख बजावले आणि सारे नियम धाब्यावर बसवत उन्हाळ्यात पाऊस बरसू लागला . व्याकुळ झालेल्या जीवांना मात्र आता कुठे हायसे वाटू लागले . त्यांची चूक अजूनही माणसाच्या लक्षात आली नव्हती . आईच्या पदराआड सारी सुरक्षित होती . आताची वेळ टळली होती परंतु भविष्यातील अनेक अडचणी कश्या सोडवायच्या हा खूप मोठा प्रश्न होता .
  तीन चार दिवस झाले मेघाचे अच्छादन अजूनही तसेच होते . आणि दिनकराची उष्णता नव्हती म्हणून वरुणाला बरसणे भाग होते . इतक्या दिवसात दिनकराचा काहीच निरोप नव्हता . आठ दिवस झाले तरी दिनकराचा काहीच निरोप येत नव्हता . व्याकुळ वसू मात्र ओलावल्या नेत्रातून अविरत टिपे गाळत होती . तिचे शांत मन आता दिनकराच्या भेटीसाठी धावा करत होते . गारठलेली माणसे आजारी होऊन तर कुणी काठ सोडून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याबरोबर वाहून तर कुणी गारपीटमध्ये सापडून मरत होती . वसूचे विरहाने आणि दु:खाने व्याकुळ हृदय फक्त टिपे गाळण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत . पश्चातापाने दग्ध मन बाहेरच्या गरव्यानेही थंड होत नव्हते . राहिल्यासाहिल्या झाडांची पानेही आता पिवळी पडली होती . त्यांना गरज होती पित्याच्या प्रेमाची पण …. प्राण्यांनी तर कधीचे शेवटचे श्वास मोजायला सुरुवात केली होती .
     'वसू अजून किती दिवस तू असा खोटा अभिमान कुरवाळत बसणार आहेस ? तुम्हा दोघांच्या हट्टापायी आजून किती जीव जाणार आहेत ? पण दिनकरानेही आपल्या लेकरांचे रक्षण करायला हवेच न ? किती साद घालीत आहेत हि माणसे सूर्यदेवाला पण कसे यांचे हृदय पिळवटत नसेल ? पण मी का बोलावत नाही दिनकराला ? मीच साद घालायला हवी …. खरच … आणि वसू पवनाच्या गळी पडून हुस्मरून रडू लागली . ….
"दिनकरा … पुरे आता … माझ्यासाठी नको पण लेकरांसाठी …"
आणि चमत्कार व्हावा तसा काही वेळात पोपटी रंगाचे वस्र ल्यालेल्या वसुला आपल्या शीतल कोवळ्या किरणांनी आलिंगन देत दिनकराचे आगमन झाले . वसुला वेढलेल्या मेघाने कधीच आपला मुक्काम हलवला होता आणि पवन हलक्या थंडाव्याचा शिडकाव दोघांच्या अंगावर करत त्यांना चिडवत होता … मात्र दोघांच्या मनात एकच काळजी सलत होती … यातून मानवाने काही बोध घेतला असेल का ?

Tuesday 17 February 2015

ताक

  ताक ! हि अशी गोष्ट कि लहानपणी ती प्रत्येक घरात असणारच ! आज दुधाचेच भेटणे मुश्कील तर ताकाची काय व्यथा ..चहा आला तरी त्यात थोडे दुध जास्त पाणी . बळेच तो पाण्याचा चहा नरड्याखाली ढकलायचा . शहरात तर हीच स्थिती . खेड्यांमध्ये थोडी बरी परिस्थिती , कमीतकमी तिथे पिशवीचे दुध नसते . तशी मी अश्या गावात राहते जिथल्या मातीला खेड्याचा सुगंध आहे आणि आभाळाला शहराचा रंग आहे ! म्हणून  पाणी न मिसळेले दुध आम्हाला सहज उपलब्ध आहे . आणि त्यावर साय तर अशी जाड चांगली येते . पण माझे तोंड बांधलेले आहे कारण वजन ! बरे लेकरांना दुध गाळून दिले तरच पिणार , मग काय त्या सायीचे विसर्जन प्रत्येक दिवशी दह्यात . मला साय खायला खूप आवडायची , म्हणजे आवडते पण . लहानपणी आईची नजर चुकवून चुलीवर कोळशाच्या धगीवर उकळणारे ते दुध आणि त्यावर आलेली ती साय भेटली कि अमृत भेटल्याचा आनंद ! आज चणे आहेत पण दात गेले .. मग आता माझ्याकडे साधारण आठवड्यात दह्याचे पातेले भरते . मग ताक !
          ताक करणे खरच म्हणजे खरंच खूप आनंददायी असते . अगदी कृष्णाच्या गोकुळात गेल्याचा भास होतो. दह्याचे पातेले फ्रीजमधून बाहेर काढले कि पहिली आठवते माझी आजी . रंगाने उजळ , नऊवारी साडी , चोळी घातलेली , चेहऱ्यावर म्हातारपणाच्या खुणा भरगच्च , पण एक लाजरे हसू त्यांना षोडशीपेक्षाही सुंदर करत होते . अशी माझी आजी ताक करायला लागली कि जणू मथुरेची यशोदा भासे . मागच्या दारातल्या आंब्याच्या झाडाला रवी अडकवण्याची दोरी होती . स्वच्छ सारवलेली जमीन आणि एका डब्यात आजी ताक करे . ती रवीची लयबद्ध हालचाल , आणि डब्यातल्या ताकाचे त्याबरोबर उसळणे . जणू एखादी लावण्यवती रस्त्याने ठुमकत चालत आहे आणि भोवतालची गर्दी उगीच आनंदाने , हर्षाने  उसळत आहे ! अलगद त्या लोण्याने डोके वर काढावे आणि आजीने ते मोठ्या नजाकतीने , हातांवर नाचवत वर काढावे . ते धुवून घेणे हि पण एक कलाच बर का ! कारण ते हाताला चिकटलेले लोणी , मऊ अगदी सोडवत नाही पण हळुवारपणे ते पातेलेल्या पुसत राहावे . बोटांच्या मध्ये साचलेले ते लोणी लहानपणी जेंव्हा आजी भावाला चाटावी  न तेंव्हा मी लहान का नाही याचा खूप खेद होई , आणि मग वाटे मी रांगत असेल तेंव्हा आजी मलाही चाटवत असेल ! शेवटी ती तो गोळा फिरवत फिरवत मस्त गोल करायची . त्यात बोट घालणे म्हणजे एक मनात रुंजी घालणारी खोडी ... पण ते केल्याशिवाय मी काही हलत नसायची ...मग हळूच ते बोट तोंडात ..काय चव होती ...सांगणे तसे अवघडच ! पण आठवले न कि मनीमानसी आनंद दाटतो .. आणि एक स्मिताची रेषा चेहऱ्यावर उमटते , आजही !
         आताही जेंव्हा जेंव्हा मी ताक करते तेंव्हा मला हे सारे जसेच्या तसे चित्रपट पहावा तसे नजरेसमोरून जाते .. हे वाचणाऱ्या किती जणींनी हा हर्ष अनुभवला असेल , ताक करण्याचा पण मी जेंव्हा ताक करत असते तेंव्हा फक्त एक स्मित असते मनात आणि मुखावर .. मग कुणीतरी म्हटलेले आहे , 'ताक करणारी स्री  पहिली ना गोकुळातली ती समाधानी यशोदा आठवते , एक सुखी , समाधानी स्री आठवते ...' हे सत्य आहे सख्यानो ! एकदा ताक करून पहाच ...गोकुळात आहात असे वाटेल ! 


Friday 13 February 2015

एक मैत्रीण

    प्रत्येकाच्या जीवनात सुखदु:खाचे लपंडाव चालूच राहतात . पण माझ्यासारखे काही असतात ज्यांना होऊन गेलेल्या घटना , भोगून झालेले दु:ख पुन्हा पुन्हा आठवून कष्टी होणारे . सतत झाले ते आठवून आज  शून्य जगत  राहिले . सारे आप्तेष्ट त्याची जाणीव करत . जीवन प्रवाही आहे , थांबू नये असेही सांगत . पण सारखे स्वताचे आयुष्य कुणापुढे उघड करत राहावे असे खचितच कुणाला वाटत नाही . नवरा , आई वडील आणि प्रियजन आपल्या या निराश विचारांनी कष्टी होतील म्हणून त्यांना सांगवत नाही . मला नाही माहित कि प्रत्येकाच्या आयुष्यात असे होते कि नाही परंतु मला बऱ्याचदा अश्या घटनांना सामोरे जावे लागते . अश्या क्षणी गरज असते अश्या एका नात्याची जे जवळ तर असते पण आपल्या रोजच्या जीवनाचा भाग नसते . आणि मैत्रीशिवाय असे कुठले नाते आहे असे मला वाटत नाही !
     मग अशीच एक मैत्रीण भेटली व्हाटस अपवर , तिच्या happy quotes या ग्रुपवर ! रोज सकाळी मनाला उभारी देतील असे तिचे quotes वाचून आपोआप मन शांत होते . रोजच्या व्यापात होरपळून जाणारे जीवन पुन्हा उमलून येते . कधी मन निराश होते कि मी इतके कष्ट घेते सार्यांसाठी तरी कुणाला त्याचे काहीच नाही ! तेंव्हा ती सांगते निष्काम कर्मच खरा आनंद देते , आणि मन पुन्हा स्वच्छ होते . कधी कुणी जवळच्या व्यक्तीने दुखावले असते ...खूप खूप राग येतो ! तेंव्हा हळूच सांगते स्वतःसाठी जग कि ग ! कधी उगाच रागाची रेषा चेहरा भरून टाकते , मग ती सांगते हास्याने स्वतःचे आणि सभोवताली असलेल्या साऱ्यांचे जीवन उजळून टाक ! वेदना काळजाला कापते तेंव्हा ती म्हणते जिथे सुख सर्वदा थांबत नाही तिथे दु:खाची काय बिशाद !
           धन्यवाद माझ्या न भेटलेल्या मैत्रिणी .....तुझ्यासाठी हे काव्यपुष्प !


एक मैत्रीण

एक मैत्रीण मला आंतरजालावर भेटलेली
तिथेच तिच्या सुजनत्वाची ओळख पटलेली

सुखदु:खात आजवर हरवलेली हयात
दु:खाचा भ्रम फक्त रुतलेला मनात
सुखाचे कवडसे दाखवून मला गेलेली
एक मैत्रीण ...

नैराश्य कवटाळले सोडून दिली उमेद
कालच्याच रस्त्यावर शोधत होते प्रमोद
अभिनव पथाचा ठाव देऊन गेलेली
एक मैत्रीण ....

अवहेलनेने विदीर्ण झाले जेंव्हा काळीज
दडलेली आहे तुझ्याही अंतरात वीज
स्व: साठी जगून बघ , सांगून मला गेलेली
एक मैत्रीण ...

जिथे असशील , तिथे चांदणी होऊन रहा
रुसलेल्या क्षणी जन्माचे मोल सांगत जा
दुवा , राहो तुझ्या जीवनात पुष्पे उमललेली
एक मैत्रीण ...
               संध्या §


      

Wednesday 4 February 2015

तूच एक

तुझ्यासाठी असतील कैक
माझ्यासाठी तूच एक
तू खूप साहिलस मला
खिदळताना पाहिलस मला
तू सावरलस , कधी ऐकवलंस
माझ्यासोबत धडपडलास पण
आणि हातातला हात सोडलास
शेवटी दुरावलास सुद्धा ...
तुझ्यासाठी असतील रे कैक
माझ्यासाठी फक्त तूच तू एक
मी तिथेच कोसळले , पुरती संपले
तुझ्याचसाठी निशीदिन तरसले
उठून धावले , पुन्हा धडपडले
धूळ होऊन धुळीत मिसळले
वारा आला , अंगाला स्पर्शून गेला
डोळे उघडले समोर पहिले रे तुला
बेफाम झाले , पुन्हा धावू लागले
तुझ्यामागे ..
दम नाही रे लागला
एका जागी तू उभा राहिलास
अन हात पसरलेस माझ्याकडे
मी पुन्हा धावले जिवाच्या आकांताने
न्हाऊ घालणार होते प्रेमाच्या स्पर्शाने
मी हात लावला ,
तू मात्र तसाच हात पसरून उभा
मी तुझा चेहरा ओंजळीत धरला
तू माझ्याकडे बघत नव्हतास
नजर दुसरीकडेच लावून होतास
तिथे ती होती हात तुझ्याकडे पसरून
दोघे बिलगलात अस्तित्व माझे विसरून
मी मागे फिरले , रडत कुढत तुला दुषणे देत
एका जागी ठेचाळले
माती बाजू करून पहिले
तर ....
तिथे माझा निष्प्राण देह होता ...
पाहून खूप हसले , वेड्यासारखी
ऐकणारे कुणी नव्हते तरी
मोठ्याने ओरडून म्हटले ...
बघ बघ ..
तुझ्यासाठी असतील रे कैक
पण माझ्यासाठी न फक्त तूच आणि तूच एक ....

         -संध्या §.