या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday 19 December 2011

तुझ्या माझ्यात

                तुझ्या माझ्यात 
                प्रेमाचा स्पर्श 
                मनाचा हर्ष


                तुझ्या माझ्यात 
                एकमेकांचे भास 
                मिलनाची आस 


                तुझ्या माझ्यात 
                स्वप्नांचे दिवे 
                रोजच नवे


                तुझ्या माझ्यात 
                अबोली फुलली 
                लाली मम गाली 


                तुझ्या माझ्यात 
                नजरेचे धुंद खेळ 
                व्यापून सर्व वेळ 


                तुझ्या माझ्यात 
                हास्याचे ओघळणे 
                नदीचे खळखळणे


                तुझ्या माझ्यात 
                हळुवार वेदना 
                गोड संवेदना 


                तुझ्या माझ्यात 
                क्षणाचा दुरावा 
                जन्मात न यावा 


                तुझ्या माझ्यात 
                किती या भावना 
                आभाळात मावेना 


                 तुझ्या माझ्यात 
                 रोज बहरणारे प्रेम 
                 नित्याचाच नेम!                


                 

Friday 16 December 2011

मी तुझ्या मनी वसते

       रुसू नकोस माझ्यावर 
       दूर तुझ्यापासून असते 
       कारण तू माझ्या मनी 
       अन् मी तुझ्या मनी वसते 


       अबोल माझी प्रीती तुझ्यावर 
       मनात तुझ्याशीच बोलत असते 
       मनाला छळणारे प्रश्न 
       मनातल्या मनात तुलाच पुसते 


        प्रेम करतोस हसऱ्या मम चेहऱ्यावर 
        हसताना अवघडलेली असते 
        संवाद असतो मनात 
        तुझ्याच विनोदावर मी हसते 


        मनातल्या आपल्या प्रेमावर 
        तुझेच प्रेमगीत गात असते 
        तू मी आणि आपले प्रेम 
        स्वप्नातील त्या गावी दिसते   


        मिळेल सर्वकाही श्रद्धा देवावर 
        प्रेमाची ताकत मोठी असते 
        का आभाळ भरून आले कि 
        मन माझे मयूर बनून नाचते?  

Thursday 15 December 2011

माझ्या जीवनात फक्त तू

     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 


     तुझ्याशिवाय अपूर्ण मी
     तुजसवे परिपूर्ण मी 
     आकाशीच्या चंद्रासारखा 
     का असा दूर तू 
     
     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 


     तुझ्याशिवाय सुखही नकोसे 
     तुजसवे दु:खही हासे 
     जवळ असतोस मृगजळासारखा 
     का असा दूर तू 


     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 


     तुझ्याशिवाय शब्दही अपुरे 
     तुजसवे मन कवितेने भरे 
     भासतोस एका आनंदी गीतासारखा 
     का असा दूर तू 


     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 


     तुझ्याशिवाय गुलाबही गंधहीन 
     तुजसवे हरेक फुल जाते सुगंधून 
     फुलतोस का मी झोपल्यावर रातरानिसारखा 
     का असा दूर तू 


    माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
    माझ्या जीवनात फक्त तू 


    तुझ्याशिवाय जगते मी अर्थहीन 
    तुजसवे सुखावते माझे जीवन 
    वागतोस मनमौजी वाऱ्यासारखा 
    का असा दूर तू 


     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 


     येशील न होवून चंद्र पौर्णिमेचा 
     बरसशील न होवून पाऊस वळीवाचा 
     फूलशील न होवून कमळ कायमचा 
     राहशील न होवून प्रियकर जीवनभराचा 
     कारण 


     माझ्या स्वप्नात माझ्या मनात 
     माझ्या जीवनात फक्त तू 

Tuesday 6 December 2011

कथा कि व्यथा? एका कलिकेची !

     दवाचा तो पहिला थेंब उगाच कालिकेचे अंग अंग पुलकित करत होता नि सरसरून अंगावर शहारे आणत होता. रोज पहाटे त्याचा होणारा तो थंड स्पर्श तिलाही हवा असायचा ,दिवस संपून रात्र होऊन पहाटेच्या प्रतीक्षेत ती रोज असयाची ! पण सूर्य वर यायच्या  आधी ,पूर्वेला निळा,लाल ,केशरी रंगाच्या झिरमिळ्या दिसायच्या आधी अंधार बाजूला करत इतर झाडांचे आकार दिसायला लागले कि तिला शरमल्यासारखे व्हायचे ! कुणी पहिले तर उगाचच ती दवाला विचारायची ! तोही मग जास्तच रंगत यायचा नि तिच्या गुलाबी गालावर हळूच टिचकी मारायचा ,संपूर्ण शरीर ,कालिकेचे गोठवून टाकायचा ! तीही रंगून जायची आणि विसरून जायची बाजूचे सर्वकाही! आणि विरघळून जायची त्याच्या स्पर्शात ! कधी रंगाची झालर पसरली आणि कधी सूर्य वर आला याचे भानही नाही राहायचे तिला ! डोळे चोळत उठली कि वाटायचे तोही असेल इथेच पण तो चोर सूर्यदेवाचे आगमन होताच विरून जायचा हवेत ! व्यथित व्हायची पण इतरांची कौतुकाने भरलेली नजर उगाचंच तिचे मुखकमल आणखी उजळ बनवायची ! हे जादुभरले दिवस सुखाची आनंदाची उधळण करीत होते !
      प्रत्येकाला ,जो कोणी तिला पाहिल त्याला वाटायचे हिला मी माझ्याच फ्लॉवरपॉटची शोभा बनणार ! कुणीही जवळ आल तरी तिच्या सुगंधाने आणि सौंदर्याने मोहून जायचे . कुणाचेही अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत ,पाय  तिथे थबकायचेच ! अशी हि सुंदर गुलाब कलिका तिच्याच नादात असायची ,तिचा सुगंध नि सौंदर्य तिलाही मोहून टाकायचे आणि त्या लोभस आणि प्रिय दवाची तर सतत मनात कुठेतरी हजेरी असायची ,ती त्याच्याच स्वप्नात हरवून जायची ! तिचे त्याचे रोज पहाटेचे मिलन तिच्या रुपात अधिक भर घालत होते !आत्ता ती कलिका फुल बनू पाहत होती ! रोज पहाटे तो तीची एक एक पाकळी बाजूला घेत होता ,आता त्यांच्या प्रेमात अधिकच रंग आला होता ,तृप्तीच्या अनेक वाटा  त्यांना सापडल्या होत्या ! तिच्या उमलणाऱ्या प्रत्येक पाकळीबरोबर तिचे असंख्य चाहते रोज नवीन तयार होत होते लख्ख अश्या सूर्यप्रकाशात पण तिच्या जीवाला आवडणारा मात्र तो एकच होता ,तिचा लाडका दव....
    रोज उमलणारी कलिका,तिच्या सौंदर्यात आणि सुगंधात रोज पडणारी भर तिच्या आईच्या लक्षात येत होती ,आणि का ती बदलते आहे हेही तिला जाणवत होते ! आता कलिका रोज त्याची वाट पाहणे नि त्याच्या आठवणीत गुंतून जाने यातच हरवलेली ...प्रेमात असलेली ती, तिच्या रोमांचित आणि हर्षभरित आठवणी आणि तिच्यात भरत जाणारा सुगंध ,वाढत जाणारे सौंदर्य तिला स्वर्गसुखाची अनुभूती देत होते ...आणि ती दिवसाबरोबर आकर्षक होत होती ...पण आईला आता वेगळीच भीती वाटत होती ...ती म्हणजे तिच्यापासून दूर होण्याची ....कारण बहरात आलेले फुल दुसऱ्याचेच होते आतापर्यंत तिने अश्या कितीतरी कलीकांचे बलिदान दिले होते ... पण हि तिच्या जीवनातील सर्वोत्तम कलिका होती ...तिची आवडती कलिका ! 
      आज कलिकेने ठरवले होते कि काही झाले तरी ती दवाला विचारणार होती ,तो कधी निसर्गसाक्षीने तिला आपली बनवणार आहे ? सूर्यप्रकाशात तो तिला कधी माझी म्हणणार आहे ? तिला त्याच्या प्रेमाचा पूर्ण विश्वास होता ! रात्री ती झोपली नाही ,सुखाची प्रतीक्षा खूप मोठी असते कि भासते ? पण आजची रात्र खूप व्याकुळ गेली तिची ...प्रेमासाठी आसुसलेली ! पहाटे रोजच्या सवयीने दव आला आणि त्याने तिला बोलण्यासाठी ओठ उघडूच दिले नाहीत ...तीही विरघळली त्याच्या स्पर्शात जागी झाली तेव्हा सूर्याचे किरणरूपी हात तिला कुरवाळत होते नि सांगत होते गेला तो चोर आता तरी जागी हो !ती जागी झाली ,दव नाही हे पाहून विषन्न झाली आपोआप डोळ्यातील पाणी गालावर ओघळू लागले ,गालावरचे थेंब पानांवर पडू लागले ...तिची आई व्याकुळ झाली पण ...काय उपयोग ,तिची लाडकी कलिका आज तिला सोडून जाणार होती ...एका महालाची शोभा बनार होती ...तिच्या आईने खूप वेदना अनुभवल्या तिच्यापासून तुटताना पण तिच्या सुखासाठी ...? बरोबर थोडी पाने ,काही काटे दिले ...पाठराखण करायला ...आईच ती ! 
      तो सुंदर महाल ,जो संगमरवरी होता ..कलिकेचे डोळे दिपले ! खुश झाली ती खूप ,सुखाची चाहूल होती ती ! तिला ठेवण्यासाठी एक आकर्षक फ्लॉवरपॉट पाहून तर ती आनंदाने अधिक गुलाबी बनली . इतका सुंदर महाल आणि त्याहून सुंदर जोडीदार ,तिच्या आनंदाला सीमा नव्हती आज ...सुखाच्या संवेदनेने ती हुरळून गेली ,पण दवाने मारलेली टिचकीची आठवण  तिचे गाल आजही आरक्त करीत होती ...महालही तिच्या सुगंधाने आणि सौंदर्याने बहरला होता ! सुखाचे क्षण कापरासारखे उडून जातात... आज ती मागच्या रांगेत गेली कारण तिचा रंग आणि टवटवीत पण कमी झाला होता ..पण सुगंध तसाच ! रोज पाणी शिंपडले जायचे पण त्यात दवाचे प्रेम नव्हते ! भांड्यातले पाणी रोज बदलायचे पण आईचा स्पर्श नव्हता ,चकाकणारे दिवे सुंदर होते पण त्यात सूर्यकिरणांचा प्रेमळ स्पर्श नव्हता ...प्रेम आणि स्पर्शाशिवाय ती सुकू लागली ...आज तर ती कचर्याच्या टोपलीत गेली ! पण तिथेही तिने सर्व सडक्या कचर्याला सुगंधित केले ...तिचा स्वभावच तो ...तिथेही दुसर्याच्या म्हणजे कचर्याच्या सुखात ती सुखी होती ! 
     पण तिचा शेवटचा साथीदार सुगंध सुद्धा तिला सोडून गेला कारण ती आता कोरडी पडली होती ...आज रस्त्यावर पडलेल्या त्या मोहक कलीकेला सर्वजन तुडवत होते ...ते सर्वजन जे तिला काही दिवसापूर्वी आपल्या घराची शोभा बनवण्यास उत्सुक होते ...पण आज ती कलिका दु:खाणे आणि वेदनेने तळमळत होती ...आणि सुटकेसाठी आसुसली होती !!!!!    
  







Saturday 26 November 2011

माझे हसू

     माहेरी जाने म्हणजे प्रत्येक सासुरवाशिणीला एक आनंद सोहळा ! पण बऱ्याचदा काही अश्या गोष्टींसाठी जावे लागते कि .... मन उदास असते ! माझे माहेर तसे साधारण ३ तासाचा रस्ता .असेच एकदा आम्ही ,मी आणि यजमान कर्जतला (जि-अहमदनगर) चाललो होतो . एका दश्क्रीयाविधीला चाललो होतो ,माझ्या मनात असंख्य आठवणी रुंजी घालत होत्या आणि मी तशी जास्त दु:खी होत होते . आम्ही दोघेच गाडीत होतो आणि साधारण सकाळी ६ ची वेळ होती .संपूर्ण रस्त्याने ते विषय बदलून बोलण्याचा प्रयत्न होते पण मी काही गतआठवणीतून बाहेर येत नव्हते .त्यांनी सर्वप्रकारे मला समजावले पण मी काही केल्या बोलत नव्हते . शेवटी त्यांनी एफ एम चालू केले ,सकाळची वेळ होती ,भक्तिगीते चालू होती .पण माझी उदाशी संपत नव्हती कारण लहानपणापासून ज्यांनी फक्त माया लावली ,संस्कार दिले त्यांचे असे अपघाती निधन मन विषण्ण करत होते .त्या नादात सिद्धटेक मागे पडले . गाडी सावकाश चालली होती ,मी माझ्या विचारात आणि तेही प्रयत्न करून गप्प बसलेले ! एका वळणावर त्यांनी गाडी फास्ट केली ,थोडे घाबरल्याचे हावभाव केले ,मी बघत होते पण काही बोलले नाहि .मग अचानक त्यांनी ब्रेक दाबले गाडी थांबली ,काच खाली करून बाहेरच्या मुलाला घाबरून (अक्टिंग) विचारले ,''काय झाले रे ?'' मीहि थोडी घाबरले मला वाटले काहीतरी अघटीत घडले ! मी आता पुरती घाबरले ! त्या मुलालाही दम लागलेला ,तो २ मीनीट धापा टाकत होता .माझी अवस्था एकदम बिकट!
 ''काही नाही''तो मुलगा बोलला .
''मग पळायला काय झाले ?''
त्या मुलाने काय ओळखायचे ते ओळखले आणि दोघे हसू लागली !मला हि गोष्ट समजायला वेळ लागला ,तोपर्यंत गाडी पुढे आली होती .मग मीही हसायला लागले ! कारण तो मुलगा रनिंग करत होता सकाळी सकाळी ! मी हसले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले ! सुखं आणि दु :ख आयुष्यात चालूच असते ते कुणी बदलत नाही पण अश्या प्रकारे वाटून नक्की घेतात !

Monday 21 November 2011

रम्य त्या सांजवेळी

                   रांगेत उडती पक्षी
                   रेखित सुंदर नक्षी
                       रम्य त्या सांजवेळी
                       भिजलेल्या कातरवेळी

                   भिनला गंध मातीचा
                   घेतसे ठाव मनाचा
                        रम्य त्या सांजवेळी
                        भिजलेल्या कातरवेळी

                   वाटते आभाळी उडावे
                   रंगात केशरी न्हावे
                        रम्य त्या सांजवेळी
                        भिजलेल्या कातरवेळी

                   क्षितिजावर रंगांची होळी
                   कोण प्रेमयुगुल रंग उधळी
                         रम्य त्या सांजवेळी
                         भिजलेल्या कातरवेळी

                   पाणी नदीचे भासते शांत
                   जणू भास्करा त्या सामावित
                           रम्य त्या सांजवेळी
                            भिजलेल्या कातरवेळी

                   असावी प्रियाची साथ
                   आणि सुखाची बरसात
                            रम्य त्या सांजवेळी
                            भिजलेल्या कातरवेळी                

Saturday 19 November 2011

गोष्ट एका चिमण्याची !

        चिमणा आणि चिमणी ...त्यांची हि कहाणी ! प्रत्येक सजीव त्याच्या संवेदना घेऊन जन्माला येतो . त्याची सुख, दु:ख, वेदना ,हर्ष सर्वकाही त्याच्या बरोबर येते आणि त्याच्याबरोबर संपते . सर्वजन ,जे सजीव ते आपल्या भावना एकमेकांशी  वाटून घेतात फक्त त्या आपल्यासारख्या माणसाला कळत नाहीत ...कि बऱ्याचदा कळून घेत नाहीत ! पाठीत काठी घातली कि बैल कळवळत असेलच कि ...पण त्याच्या भावना आपण समजूनही दुर्लक्ष करतो, आणि त्याने पुढ जाव म्हणून मारताच राहतो ! तसच आपल्या उघड्या खिडकीतून येणाऱ्या चिमनीच ...दोन दाणे टिपायच्या आधीच तिला काही तरी भिरकावून मारलच समजा !
     बाळाच्या चाहुलीने दोन्ही जीव आनंदून गेले होते. ती अंडी उबवण्यात चिमणीचा पूर्ण दिवस जात होता. आणि तिची काळजी घेण्यात ,तिच्या चाऱ्याची सोय करण्यात त्या चीमण्याचा दिवस सरत होता .त्यांच्या उत्साहाला उधान आलं होतं .त्याचं जगणं आनंदाने व्यापून टाकले होते . त्या चिमणपाखराच्या येण्याच्या नुसत्या चाहुलीने तिच्या पंखामध्ये एक प्रेमाची उब भरून राहिली होती .ती आता आई होणार होती आणि तो बाप ! घरटे बांधताना त्यांनी चारही बाजूने जाड अशी आंब्याची फांदी राहील याची काळजी घेतली ,ते झाडही उंच असल्याने मुले वर येण्याचा प्रश्न नव्हता कारण माणसाचीच  जात आपल्याला संकट आहे याची त्यांना पुरेपूर जाणीव होती !
''चिमणे , घरटे झाले मनासारखे ! आणखी काय लागेल ग पिलाला ?''
''चिमण्या ,तू एव्हडे कष्ट घेतोस ,इथ बसून जीव व्याकुळ होतो रे !''
''अग,चिऊ तुला पण माहित आहे तू किती खपलीस आतापर्यंत घरट्यासाठी ते ? आता पिलुसाठी तर चाललंय हे ! मग का बर खिन्न होतेस ? आता तर तुझ्या आनंदाने आपल् पिलुही आनंदी जन्मणार आहे ! त्याच्या सुखासाठी तर आपण खपतोय ना ?''
''हो रे ,पण ''
''आता पण नाही नि बिन नाही ,मी चाललोय काळजी घे अंड्याची ,तो कावळा भारी खोडकर आहे ''
''बर बाबा , ये लवकर मी आणि आपल् येणारं पिलू तुझी वाट पाहू ! ''लाजत चिमणी बोलली .
    भुर्रर्र चिमणा उडाला .आज थोडे पुढे जाऊन पाहू आणखी काय वेगळ मिळाले तर आणू पिलासाठी . किती काळजी करते हि चिऊ ? तिच्यासाठी आणि पिलासाठी कष्ट घेणे काय थकवा देणार आहे त्याने तर मला आणखी  उत्साह वाटतो ! हे कसं समजत नाही तिला ? तिची काय चूक ? ती तर किती प्रेम करते माझ्यावर ! मागे असंच माझे पंख जखमी होते त्या माणसाच्या पिलाने पकडल होत मग त्याच्या कचाट्यातून बळेच जीव वाचवत निसटलो ! किती कष्ट पडले तिला पण तिचा थकवा  कधीच दाखवला नाही तिने ,उलट मला बर वाटावं म्हणून ती सतत उत्साही असायची !सगळे दाणे पण असे पौष्टिक आणायची कि दहा दिवसात ती जखम भरून आली ! अरे खाली ते पांढर काय दिसतंय त्या झाडाच्या फांद्यांना ? चल बघतोच .तो एका मोठ्या झाडावर पानामागे बसला . बऱ्याच बायका आणि पुरुष तिथे कापूस वेचत होती .तो बसलेल्या झाडाखाली एक मोठा ढीग झाला होता ,त्यावर त्या माणसाची पिले लोळत होती त्याला वाटलं हा कापूस नक्कीच मऊ असणार! अंड्याच्या खाली टाकला तर ? काड्या तरी रुतणार नाहीत चिऊला आणि पिलूला ... खूप लांब आहे पण नेउयाच ! भुर्रर्र करत चिमणा कापूस जितका नेने शक्य आहे तितका तो नेऊ लागला . चिमणी खूप खुश झाली ती मऊ दुलई पाहून! तो अनेक चकरा मारून दमला मात्र त्याचा उत्साह कमी होत नव्हता . 
''बस झालं आता ! छान दुलई आहे ''चिऊ 
''नाही ग अजून थोडे आणतो म्हणजे मग काळजीच मिटली ''
''अरे पण आभाळ लाल झालं ,उजेड संपेल आता ''
''अग् माणस तो कापूस घेऊन जातील ,आलो लगेच ''
''अरे ........''
तीच न ऐकताच तो भूर्रर्र उडाला !
तिथे सगळा कापूस पोत्यात भरून झाला होता .शेवटच पोत भरणे चालू होते ,प्रत्येकाला घाई होती घरी जाण्याची म्हणून एक एक पाटी कापसाची घाईने आत पडत होती . चीमण्याने भुर्र जाऊन आतला एक धागा उचलून उडायला आणि कापसाची भरलेली पाटी पडायला एकच वेळ ! त्यातून बाहेर येण्याचा असफल प्रयत्न .... वरून परत एक पाटी ....घुसमट .......मृत्यू .....चीउचे वाट पाहणे ...उपास ...विरह ...मृत्यू ....अंडी भेगाळलेली...पिलांचे येणे ...आई बापाशिवाय एकाकी जगणे ............

Thursday 17 November 2011

तीन दिसाचा संग तुझा!

                 देऊन गेला आसुसलेल्या माझ्या नजरेला 
            गुलाब पाण्याचा थंडावा 
            तीन दिसाचा संग तुझा!
            
            देऊन गेला रखरखत्या माझ्या शरीराला 
            थंड पावसाचा शिडकावा 
            तीन दिसाचा संग तुझा!
          
            देऊन गेला भुकेल्या माझ्या जिव्हेला 
            मधुर स्वादाच्या अनुभवा 
            तीन दिसाचा संग तुझा!


            देऊन गेला माझ्या थरथरत्या हाताला
            एक उबेचा स्पर्श नवा 
            तीन दिसाचा संग तुझा!


            देऊन गेला भरकटल्या माझ्या पायाला 
            एक रुपेरी मार्ग नवा 
            तीन दिसाचा संग तुझा!


            देऊन गेला तळमळनाऱ्या माझ्या मनाला 
            निशब्द प्रेमाचा ओलावा 
            तीन दिसाचा संग तुझा!   

मला भीती वाटते ...

     मला भीती वाटते .....जेव्हा कधी सुख हुरळून माझ्या पदराच्या दिशेने धाव घेतंय असं भासलं मी पदर पकडून बसून तशीच उभी राहिले ...सुख मात्र मला हुलकावणी देत दुसरीकडेच ...मी वेडी एका क्षणाची भुकेली पण उन वाराच मिळाला अन्न पाणी कधीच नाही ...विज्ञान शिकताना वाटायचं धन आणि ऋण सारखेच असल्याशिवाय वस्तू स्थिर राहायची नाही तसच आयुष्य असेल ...धन ऋण सारखेच मिळतील ...पण फक्त ऋण मिळूनही माझं आयुष्य इतकं स्थिर कसं आहे ! आश्चर्य आहे नाही ? मन सतत एकाच प्रश्नाचा पाठपुरावा करत असे विज्ञानाचा नियम माझ्या आयुष्यात चुकीचा का ठरला ? का मी अपवाद आहे ? अपवादाचा शिक्का घेऊन तशीच जगत आहे ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ...
    मला भीती वाटते ...कुणी दु:ख वाटून घेणारे भेटले कि त्याच्याही पाठीवर  नियतीने आसूड टाकला ...त्याचं दु:ख पाहून पाऊस डोळ्यात दाटला ...आईने  सांगितलेलं सुखं वाटावीत दु:ख स्वताची स्वतः भोगावी ...पण ती मिळायच्या आधीच ...ते कापरासारखं हवेत विरघळले तर काय करायचे हे सांगायचं आई कशी विसरलीस तू ? आताशा तिलाही विचारायची भीती वाटते...तिला दु:ख होईल म्हणून ! कापूर ओंजळीत यायच्या आधी विरघळला ...वास मात्र नाकापर्यंत आला ...त्यावर समाधान पावले ...नाही ...मनाची समजूत काढली तशी ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ...
    मला भीती वाटते ...कुणाचं सुख चोरून घेताना ...त्याचा काय दोष आहे ...ते  माझ्या प्राक्तनात नाही याचा ! शेवटी मलाच माहित वेदना काय असतात ,कशा सहन कराव्या लागतात आपल्या जवळचं ओरबाडले जाताना ! चोरी करणे पाप आहे हे पाहिलं मी समाजात जेव्हा कुणी शिक्षा भोगताना दिसलं ...माझ्या जवळचं ओढून घेणाऱ्याने ते पाप म्हणून का नाही दूर लोटलं? त्याला सुख मिळाले मला आनंद आहे ...पण ते अंगवळणी पडताना आभाळ मनी दाटलेले आहे ...पण ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ...
    मला भीती वाटते ...चुकून ,अपवादाने मिळत जेव्हा थोडं सुख ,एखादा अणु असावा जसा या भल्या मोठ्या पृथ्वीवर ! शोधत राहते अनेक गणितं मनात ठेऊन ...मिळाल्याची जाणीव होते पण बाकीचे दाखवायला टपलेले असतात ...मी कशी चूक आहे ते ... आणि सिद्धही करतात स्वताला ...मी मात्र सिद्धता शोधातच राहते ! कधी सापडेल मला ? सापडेल सापडेल मी मनाला दटावलं आहे ...पण ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ...
    मला भीती वाटते ... घामेजलेल्या माझ्या हातात जरी सुख आलं तरी नाही न जाणार निसटून ?  समुद्राच्या काठच्या त्या वाळूसारखं ...निसटतेहि ते ...मी विचार करते मी तर घट्ट आवळल्या मुठी ,मग काय बिघडलं? मला लाभणार नसेल तर का मला हुलकावणी देत हे ? प्रश्न मनात यायच्या आत ...मी त्याला समजावते गंधाळेल कधीतरी ती गुलाबी फुलांनी वाकलेली ,कागदी फुलांची वेल ! आणि सापडेल मला पाणी त्या भयानक वाळवंटात ...मृगजळामागे धावत आहे मी उर फुटेपर्यंत ...पण ...मी वेडी एका क्षणाची भुकेली फक्त ......................... 

Tuesday 15 November 2011

अव्यक्त !

 रोजची सकाळ स्मितासाठी प्रसन्न असायची , तिला कधी नाराज आणि दु:खी कधी कुणी बघितलं नव्हत ! सतत हसतमुख आणि गप्पा मारायला तर विचारू नका , पाच मिनिटाच्या संभाषणात ती इतकी आपली वाटायची कि परत माणूस भेटल तर बोलल्याशिवाय पुढ जातच नसे ! काही लोक पाण्यात विरघळनाऱ्या साखरेसारखी तर काही पाण्यात विरघळनाऱ्या मिठासारखे असतात! मीठ खारटपणा ठेऊन जात तर साखर गोडपणा ! दोन्ही कायम लक्षात राहतात पण एक वाईट म्हणून तर एक चांगल म्हणून! तशी हि साखर होती ! तिच्या गोडपनाणे ती प्रत्येकाची गोड आठवण असायची ! 
    ज्याच्या आयुष्यात कायम एक सुरक्षित चौकट असते त्याला जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत हे जग सुंदर भासतं आणि जगातली माणस प्रेमळ! तसच स्मिताच होतं,तिला तिच्या घरात प्रेम प्रत्येक नात्याकडून मिळाले.तशी तिला नाती पण सर्व मिळाली ,आत्या ,काका ,काकी ,मावशी ,मामा ,मामी ,भाऊ ,बहिण !आणि प्रत्येक नात्याने तिला भरभरून प्रेम आणि एक सुरक्षित आयुष्य दिले ! तिला बहिस्त जगाचे खरे रूप कळलेच नव्हते ! अशी हि एक आनंदी ,समाधानी मुलगी ! तिला बाहेर जाण्याची वेळ आली ते तिच्या उच्चशिक्षणासाठी! तिथेही तिच्या मनमोकळ्या स्वभावाने तिने सर्वांना आपलसं केलं नाही तर नवल ! 
     साधारण महिन्यापूर्वी तिची एक प्रोजेक्टच्या निमित्ताने एका सिनियरशी  ओळख झाली ,सौरभ तो ! सीनियर्स मध्ये तो सुंदर आणि सुस्वभावी मुलगा ,थोडा अलिप्त आणि अबोल ! काम आणि तो बाकी तो कुणाला जवळ करत नसे ! प्रत्येक कॉलेजमधली मुलगी त्याच्याशी मैत्री करायला उस्तुक पण तो काही कुणाला वाऱ्यालाही उभं करत नसे . इतर मुलींचं त्याच्या राजबिंड्या रुपाला पाहून जवळ येणं त्याला कधी भावलच नाही ! स्मिताने मात्र त्याच्या मुलींविषयीच्या कल्पनांना छेद दिला ! तो सिनियर होता पण ती कधी घाबरली नाही तिने शेवटी त्यालाच बोलत केल! त्यांची मैत्री चार पाच दिवसात एका सुंदर वस्त्राची घट्ट विन बनली ...आणि अशी बहरली कि .... मग फोनवर गप्पा कॉलेजबाहेर भेटणे ....तासन तास बरोबर घालवले तरी स्मिताला रात्री फोनवर बोलल्याशिवाय चैन पडत नसे ! 
''स्मिता , नक्की मैत्रीच आहे ना ?'' रूममेटचे प्रश्न ! 
'' तुम्ही दुसरा विचार करूच शकत नाही का ?''
''नाही ग ,रागावू नको पण तुझी ओढ पहिली कि वाटत ...''
''नको काही वाटून घेऊ , आम्ही फिरतोय म्हणजे मी त्याला आपल शहर दाखवत आहे . तो लांबचा आहे त्याच्या कंप्लीशन नन्तर तो आता जाणार आहे आणि परत नाही येणार ! आम्ही फक्त चांगल्या आठवणी गोळा करतोय ओ के ''
'' सॉरी पण जपून राहा .''
''बर येऊ ,त्याला रिझर्वेशन करायचं आहे उशीर होत आहे ,परवा जाणार आहे सौरभ ,बाय !''
धावत ती बाहेर आली तर सौरभ होताच . दोघांनी रिझर्वेशन करून पायीच रोडवर चालत राहिले ! दिवस मावळला पण त्यांचे पाय थकले नाहीत कि गप्पा संपल्या नाहीत ! रात्री हॉस्टेलवर जाताना ती अस्वस्थ होती पण तिला वाटायचं तो परत भेटणार नाही म्हणून कदाचित ... पण उद्याचा दिवस येउच नये आणि रात्र संपूच नये अस वाटतंय रे सौरभ हे तिने फोनवर त्याला सांगितलं .या विचारांमध्ये कधी झोप लागली ते तिला कळलेच नाही !
   सकाळी जडावलेल्या डोळ्यांनी ती उठली .आवरून कॉलेजमध्ये गेली.सौरभ आज रात्री आठच्या बसने जाणार होता म्हणून दुपारचं जेवण ते एकत्र घेणार होते . जेवताना त्याने मराठी गाण्यांची एक सी डी त्याने तिला भेट दिली . सतत बडबडणारी स्मिता शांत होती आणि सौरभ अस्वस्थ दिसत होता .....त्यांची दुपार अशीच अबोल गेली पण या अनामिक ओढीचा उलगडा मात्र तिला झाला नाही ....
  त्याचा प्रवास लांबचा म्हणून मध्ये काही खाऊ नकोस मी तुला डबा देते अस तिनेच बजावलं त्याला ! डबा घेऊन सात वाजता ती पोहचली सौरभ आलाच होता त्याचा मित्र होता बरोबर ,तिने डबा दिला आणि गाडी येण्याच्या दिशेने पाहू लागली .
'' आज बोलणार नाहीस , बडबडीच यंत्र बिघडल का ?''
''तू थांबू नाही शकत ?'' डोळ्याच पाणी पुसत तिने सवाल केला .
''तस काही कारण नाही ना ?''
''कारण शोधलं तर सापडेल कि !''
''नाही ग पण आई बोलावते आहे ''
''मीही थांब म्हणते ना !''
''सौरभ बस आली '' मित्राने आवाज दिला .मित्रानेच त्याच समान उचललं आणि गाडीत ठेवलं.
'' तू खरच थांब म्हणत असशील तर थांबतो '' सौरभ !
''नाही रे '' ती 
''चला बसा लवकर '' बस ड्रायव्हर 
सौरभने तिच्याकड पाहिलं तिचे पाणावलेले डोळे बघून तोही अस्वस्थ झाला ... तिने एक गुलाबाचं फुल दिल ...त्याने घेतलं ...
''थांबू का ?''
  कस सांगणार होती थांब म्हणून तीच प्रेम आहे हे कळल तिला ...पण त्याच काय त्यालाही वाटत असेल असंच ...नसेल तर ? तस नसेल तर ...तो काय विचार करेल माझ्याबद्दल ! नको व्यक्त व्हायला ...नको ....
''बाय ...''तिच्या नकळत ती बोलून गेली ...बस गेली ...ती पाठमोऱ्या बस कडे न पाहताच झप झप पावले टाकत ती निघाली  .... बेडवर पडून खूप खूप रडली ...रूममेट समजली काय ते !

Thursday 10 November 2011

मेसेज

       धापा टाकत प्रतिभा पळत होती ....शेवटी एकदाची रेल्वे सापडली ती घाईने आत चढली पण क्षणात थोडी नर्व्हस झाली कारण तो डबा महिलांचा नव्हता . बसण्यासाठी जागा नव्हती ती उभीच होती . धावत येऊन रेल्वे पकडल्याचा आनंद मिळायच्या आधीच नव संकट दत्त म्हणून उभं! का असं होत असेल? कधी असं वाटत नकोच ती सुखं जी नवीन अवघड वाटेची चाहूल असतील ! कष्टाने मिळवलेल्या एखाद्या वस्तूचा वापर करायच्या आधीच ती बिघडावी ! जे मिळवलं ते कधी लाभलच नाही ! सटवाईने माझ्याच कपाळी असं नशीब का लिहावं ? जसं कळायला लागलं तसं प्रतिभाने हा प्रश्न अनेकदा स्वत:ला विचारला पण उत्तर कधी मिळाल नाही ! पण ज्या प्रश्नांची उत्तरे नसतात तेच प्रश्न माणसाला जास्त प्रिय !  
       पुढच्या स्टेशनला उतरून डबा बदलायचा हे ती ठरवून होती. म्हणून ती दरवाजाजवळ जाण्याच्या विचारात होती .पुढे सरकायला लागली तर पुढचा तरुण तिला पुढे जाऊ देत नव्हता,मागचा मागे सरू देत नव्हता . तिला दरदरून घाम फुटला ,हात पाय लटलटू लागले, संपूर्ण शरीर क्षणात घामाने ओलं होऊन एकदम थंड पडलं! पुढचा मार्ग ...विचार करायच्या आधी एकाने तिच्या कमरेला हात घातला, जिवाच्या आकांताने तिने तो झिडकारला पण ...तिचा जीव तो काय असणार दिवसातून एक चपाती फक्त ! तितक्यात पाठीमागून एक तरुण पुढे झाला आणि त्याने चौकडीला बाजूला व्हा म्हणून खुणावलं . 
''काय रे , कोण तुझी?''चौकाडीतल्या एकाने उर्मटपणे सवाल केला . त्याचा प्रश्न पूर्ण होण्याच्या आत एक दमदार ठोसा त्याच्या तोंडावर बसला ,नाकातून रक्त वाहायला लागलं , त्याची मानगुट धरून त्या तरुणाने स्वतःच आय कार्ड त्याच्या समोर धरलं.
''माफ करा साहेब .'' इतकाच बोलून तो बाजूला झाला. प्रतिभा मात्र थरथर कापत होती डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते . त्या तरुणाने पुढे होऊन तिला खिडकीजवळ जागा करून दिली आणि तो तिच्या शेजारी बसला.ती पुरती गर्भगळीत झाली होती ,अजूनही थरथर थांबत नव्हती .
'' मी इंस्पेक्टर अमोल गायकवाड, तुम्हाला भिण्याचे अजिबात कारण नाही , मी मुंबईपर्यंत आहे तुमच्या सोबत ,शांत व्हा !''
''धन्यवाद !'' इतकच बोलू शकली प्रतिभा , आणि डोळे पुसत बाहेर पाहू लागली. मनातलं काहूर मात्र अजून शांत होत नव्हत. आई आजारी पडली आणि सर्व कामे हि थोरली असल्यामुळे हिच्या अंगावर पडली ,पण तिने कधी ओझं मानलं नाही ,कर्तव्य समजून तिने सर्व जबाबदारी पेलली . काम बघून तिने पदवी संपादन केली . आईच आजारपण , प्रदीप आणि पल्लवीचे शिक्षण ,बाबांची नोकरी सगळं ती आत्मीयतेने करत होती ! स्वतासाठी मात्र तिच्या आयुष्यात जागा नव्हतीच ! इतर मुलींप्रमाणे तिला स्वप्नात राजकुमार कधीच दिसला नाही ! स्वप्न पडायला झोपच कधी पूर्ण झाली नाही...पदवी पूर्ण झाल्यावर तिला वाटायचं काहीतरी कोर्स करावा म्हणजे एखादी नोकरी बघता येईल ,तेव्हडाच हातभार ! आता पल्लावीची मदतही होत होती तिला, पण नियतीला काही वेगळच करायचं होतं...एक दिवस बाबा अपघातात गेले ...ती खूप खूप रडली ...प्रदीप ,पल्लवी आणि आई यांच्याकडे पाहून पुन्हा उभी राहिली ! बऱ्याच प्रयासाने तिला बाबांच्या जागी ,अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळाली ....पण रोज पुण्याला जा ये करावं लागणार होतं ! पण ती कुठल्या कष्टाला पाहून मागे फिरणार नव्हती !
''एक्सक्युज मी , हा घ्या चहा, पाणी देऊ का ?बर वाटतंय का आता ?''
''हो , बर वाटतय ,आणि नको आभारी आहे !''ती भानावर येत उत्तरली .
''अहो घाबरू नका ,मी काही गुंगीच औषध नाही देत तुम्हाला ,कमीत कमी समाजाचा रक्षक म्हणून तरी विश्वास ठेवा !''अमोल हसत बोलला .
''नाही हो ,तसं नाही पण मी चहा घेत नाही ,आणि मी कशाला अविश्वास दाखवेल ? उलट तुम्ही माझी खूप मदत केली आहे ,तुम्ही नसता तर ...''तिचे डोळे परत पाणावले .
''प्लीज रडू नका बुवा ,आणि एकदा चहा पिऊन तर बघा कसं फ्रेश वाटतंय ते .''
''बर घेते !'' हसत प्रतिभा उत्तरली.
''तुम्ही रोज अप डाऊन करता का ?''
''हो ''
''मी ,सुटी असल्यावर जातो घरी , तेव्हडाच आईला आनंद होतो , तू नाही आलास कि घर खायला उठत म्हणते !''
''तुम्ही कुठ असता ?''प्रतिभा कुतूहलाने विचारू लागली .
''शिवाजीनगर पोलीस स्टेशन !''
''काय , मीही तिथेच आहे ,वेधशाळेत क्लार्क आहे .''
''गुड , भेट होणार म्हणायचं आपली परत !''
''हो ''
''काही आक्षेप नसेल तर नाव समजेल आपलं?''
''नक्की , मी प्रतिभा,प्रतिभा कदम. ''
''छान !''मनाशीच हसत अमोल म्हणाला .
''काय ?''
'' काही नाही, कोण कोण आहे घरी ?''
''आई ,छोटा भाऊ प्रदीप ,बहिण पल्लवी ''
''वडील ?''
''ते सहा महिन्यापूर्वी अपघातात गेले .''
''ओ नो .''
.
.
.
मग दर शनिवारी ते एकत्र येऊ लागले आणि सोमवारी एकत्र जाऊ लागले!प्रतिभा अमोलच्या आई बाबांकडे जाऊ लागली .अमोलनेही तिच्या घरच्यांशी जवळीक केली . एका छोट्या ओळखीच्या बीजाचे रुपांतर प्रेमाच्या एका सुंदर वेलीत कधी झाले ते दोघांना उमगलेच नाही ...आज सुट्टी आहे म्हणून अमोलच्या आई तिच्या आईला भेटायला येणार होत्या . तिने हि गोष्ट फक्त आईला सांगितली होती .ती घर नीटनेटक आवरून आईजवळ बसली ,तितक्यात पल्लवी पळत आली ,''ताई अमोल आलेत !'' आणि एक चिमटा काढून वेडावत पळून गेली . त्यांच्यातल्या नात्याची चाहूल आता मुलांनाही लागली होती . आणि म्हणूनच आईला प्रतीभाच्या लग्नाची घाई झाली होती ,तसं ती म्हनालीही होती प्रतिभाला ! 
''येऊ का आत प्रतिभा ?''अमोलच्या आईच्या खणखणीत आवाजाबरोबर प्रतिभा घाईने बाहेर आली .
''या ना आई .''
''आणि मी '' अमोल पुढे होत बोलला. त्याला पाहून उगाचच रेल्वेचं इंजिनाची धडधड छातीत जाणवली, रोज ती त्याला भेटायची पण आजच्याइतकी अस्वस्थता तिला कधी जाणवली नव्हती. चहा -पाणी झालं,अमोलच्या आई तिच्या आईची चौकशी करत होत्या .इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या .अमोल मात्र एकटक तिच्याकडे पाहत होता आणि ती कधी नजर टाकत होती आणि कधी चुकवत होती ,पायाच्या अंगठ्याने उगाचंच फरशीवर घासत होती . 
''प्रतीभाची आई , मी आज वेगळ्याच कारणासाठी आले आहे .''
''बोला न ताई '' आईने अजीजीने विचारले .
''मी अमोलसाठी प्रतिभाला मागणी घालायला आले आहे  , हा पण तुम्हाला काही आक्षेप नसेल तर !''
''नाही हो , आक्षेप कसा असेल !''
प्रतिभा मात्र विस्मयाने अमोलकडे पाहू लागली ,हे होणार याची तिला कल्पना होती पण असं अचानक ...
    प्रदीप बाहेरून आला .आईने त्याला जवळ बोलावून दुपारचा प्रसंग सांगितला .सर्वांना तो खुश होईल अशी अपेक्षा होती पण तो काहीच बोलत नव्हता आणि खाली मान घालून बसला .प्रतिभा किचनमध्ये होती तिला ऐकू जाईल अस मोठ्याने प्रदीप आईला बोलू लागला ,''मला वाटलच हि असंच स्वार्थ साधणार ,तीच झालं ! आपलं काय ? बाबांच्या जागी हि लागली कामाला, लग्नानंतर पगार देणार नवऱ्याला , माझी पदवी झाली पण नोकरी नाही ,तुझं आजारपण काय करायचं सांग ?''
''अरे प्रदीप ,असं का बोलतो ? तिने काय असंच रहायचं का ? एकदा वय झालं कि कोण करणार ताईशी लग्न ? चांगल स्थळ आहे ! आणि लागेल कि तुला नोकरी ? ''
''कर काय करायचं ते , शेवटी मीच वाईट !भीक मागायला लागेल तेव्हा कळेल ?'' तावातावाने तो बाहेर निघून गेला . प्रतिभाचा सकाळपासून फुललेला चेहरा क्षणात काळवंडला. पुन्हा तोच प्रश्न तिला सतावू लागला.मीच का ? आज तिचे अश्रुही आटले होते . ज्यांच्यासाठी कधी सुखाला जवळ फिरकू दिल नाही ,त्यांनी असं बोलावं! का मला सुख लाभत नाही ? आता कुठे खळखळून हसायला शिकले होते तर ...क्षणात विचार आला सांगाव अमोलला नको म्हणून ...नको ते सुख मला ...फोन हातात घेतला ,तर अमोलचा एक मेसेज आलेला -
  Treat every one wid love ,
   Even those who hurt u ,
   Not b'coz they r not nice,
   Simply b'coz u r not bad....!!!
मेसेज वाचून तशीच उशीत डोक खुपसून रडू लागली...मनमोकळ ...तिने लगेच अमोलला फोन केला. 
''हेलो ''
''हाय स्विटी!''
''मी हि नोकरी सोडली तर चालेल ?''
''मीही तेच सांगणार होतो तुला ! आणि हो ती जागा प्रदीपला मिळवून देऊ म्हणजे त्याच्या नोकरीचा प्रश्न सुटेल !''
''थांक्यू अमोल ,आता माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे ...आता माझ्या आयुष्यात फक्त सुखच येणार आहे ...हो न अमोल ?''
अमोल काही अर्थबोध झाला नाही पण तो ठामपणे उदगारला ,''नक्की स्विटी ,अगदी नक्की ...मी तुला फक्त सुखच देणार आहे !''

Sunday 6 November 2011

काट्याच्या झाडावरचं फुल

           रुतणारे दगड आणि बोचणारे काटे संपतील का कधी? जीवनाशी पैजा  घेत चालतेच आहे एका निवाऱ्याची आणि निवांत विसाव्याची वाट बघत ..... देवालाही साकडं घातलं दे मला प्रेमाचा पाऊस ज्यात भिजून आत्तापर्यंतच्या वेदना ,थंडाव्यासाठी आसुसलेल्या, तुझा स्पर्श होताच उडून जाऊ दे त्या रुईच्या म्हातारीसारख्या माझ्या दृष्टीपलीकडे .........पण तोही नाही बरसला ....वाटल असेल काही काम माझ्याही पेक्षा गरजेच ...कदाचित माझ्याही वरचढ असेल त्याचं दु:ख ....परत येशीलच कि .... मी वाट पाहीन ...तसंही वाट पाहून मिळालेलं सुख किती गोड असतं ते त्या चातकानी सांगितलं होत मला ! या उल्हासित आठवाणे परत व्यापून टाकल मन माझं...बारा महिने नाही त्याही पेक्षा जास्त प्रतिक्षेची तयारी केली त्याने ! त्या रसभरीत स्वप्नांनी प्राण पेरले कणा कणात ! उद्या नक्की माझ्या दारात सुखाचं झाड उगवणार होत ! स्वप्नांच्या या गरुडावर स्वार होऊन कधीच गेलं ते विश्वाच्या भ्रमनासाठी! त्याला वरून सगळ सुजल सफल दिसत होत ! थंडगार आंब्याचं झाड , रसरसलेल्या फळांनी बहरलेलं, वाटलं जावं जवळ त्याच्या ...गेले तिथं एका फांदीवर विसावलेही ...भळभळ वाहणारी जखम तिथेही होती ...विचारलं त्या आंब्याच्या झाडाला ....इतका सुखी तू रसरसलेली फळ आणि थंड हिरवी पान काय दु:ख आहे तुला ? माझ्या फळांसाठी मारतात दगड मुलं आणि करतात रक्तबंबाळ मला .. या जखमा वागवत मीही मोठा झालो ! लहान असताना वाटायचं फळ आल कि काय सुख पण आता ....कधी फळे संपतील याची वाट पाहतोय .........डोळ्यांच्या कडा पुसत उठले ! परत जागेवर आले ...आता ठरवलंय नाही वाट पाहणार सुखाची ,प्रेमाची ....जर भेटणार असेल याहीपेक्षा मोठी वेदना तर नको कोसळू पावसा ...आज उमलेलं फुल उद्या सुकनारच कि ! म्हणून जगून घेणार आहे मी आज ....आता ठरवलंय त्या दगडांना आणि काट्यांना कवेत घेऊन खेळणार आहे त्या वाऱ्याशी ! आणि झेपावणार आहे आभाळाकडे त्यालाही कधीतरी दया येईलच कि ..........
         

Saturday 5 November 2011

पिसाळलेला

      धाय मोकलून रडत होती सुनिता .काय करणार कारभाऱ्याला काय बी उप्योग होणार नाही म्हनत्यात दागदर. आस कस होईल म्हणावं त्यास्नी? सकाली त चांगला व्हता पाणी गीलता नाय येत म्हणत व्हता . आस काय बाय बरलत सुनिनी आख्खा भिलवाडा गोला केला ....दिउरुसी म्हणत व्हता त्यो वड्याला गेला तवा त्या बुडून मेल्याल्या किसन्यानी त्येला झपाटला इयक कोंबड आन रोट टाकायला सांगितला त्ये बी केलं पर आज त्येस्नी पाणी बी गली उतरणा मग मालक ऐकना त्येनी गाडीवर टाकला नी दवा आणायला नेला पर आस कसं दागदर म्हनत्यात त्येचा उल्गाडा तिला होत न्हवता ती मोठ्यान रडून झुम्बरीच्या गळ्यात पडत व्हती आन कारभारी मातूर सव्ताला घरात डांबून घेऊन अंधारात जाऊन बसत व्हता . मधीच पाणी मागायचा नी कुणी गिलास फुड केला कि मोठ्यान आरडत दारामाग लपायचा.........
       म्हाद्या भिल कामाला वाघ गडी, पाहिल्यापास्न एकाच मालकाकड टिकून व्हता . मालक बी त्येच्यावर सगळ काम टाकून निर्धास्त व्हता .त्येच्या या इमानापायी मागल तवा मालक पैका देयचा. सुनी आन त्येची आय , कवा पटल नाय म्हणून मोठा पोरगा भाऊ झाला आन त्येनी वायली चूल मांडली . नन्तर त्येला मनी , संत्यु आन भिंगरी झाली . सगल्या पोरास्नी त्यो सालत धाडीत व्हता . सवता मरुस्तवर काम करायचा पर पोरास्नी कवा कुणाचा बांध चढू दिला नाय त्येनी .
        पंधरा दिस झालं उसाचं पाणी रातभर देऊन म्हाद्या घरी निगाला तवा कायतर पायास्नी मऊ लागलं कुई आवाज आला त्यो बी लई बारीक खाली नजर गिली त एक कुत्र्याच पिलू .. का कुणास माहित पर त्येला दया आली  नी त्येनी त्ये पिलू घरी नेलं त्येस्नी भाकर टाकली ,पाणी पाजल. भिंगरी पळत आली आन पिलासंग खेळाया लागली . भाऊ ,मनी बी गोला झाली . म्हाद्यानी तवर सगळ आवरून भाकर खाल्ली आन संग भांधून बी घीतीली . बाहीर आला त सगळी पोरं त्या कुत्र्याला छळीत व्हती त्येनी पोर हाकाल्ली पिलू झापाखाली झाकून कामाला गेला . दुपारी आला त मनिनी पिलू काढाल व्हतं पिलाच तंगड धरून वढीत व्हती त्ये पिलू मातर किविलवान क्या क्या करीत व्हतं . मनी तंगड वढायची आन संत्या कान वढायचा आता पिलू गुरगुर कराया लागल आन वाचकून संत्याला चावल संत्यानी सोडलं त मनिला चावल . मनिला चावल म्हणून महादूनी धरून फेकाया लागला त त्येला बी धरलं कि ! संत्यानी एक चिपाड आणल आन कुत्र्याला माराय लागला कसं बस सुनिनी त्ये सोडावल आन झापाखाली डालल. सगळी जिकड तिकड झाली . सुनिनी सांजच्याला झापाखाली थुडी भाकर आन पाणी सरकवलं . 
     सकाळ्च्याला सालत जायच्या आन कामाला जायच्या घाईत कुणी कुत्र्याकड फिरकल नाय आन कालचा राग आन भ्याबी होतंच कारण पिलू बारीक व्हतं पर लचक चांगलं मोठ काढाल व्हतं! सुनीच काम आवरलं , कुत्र्याच ध्यान झालं म्हनुन्श्यान झाप काढला त कुत्र गपगार , हलून बघितलं पर त्ये काय हलणा . दुपारी महादू आला त्येला दाखिवल . महादुला त्ये बघून घाम फुटला . त्येनी काय ते वलिकल . त्याच पायी मालकच घर घाटल आन मालाकाकून पैका घितला . मनी आन संत्याल्या संग घेऊन तालुक्याचा दवाखाना गाठला . पैका कमी पडला म्हणून त्येनी संत्या आन मनिला सुई घीतली त्यो मातूर तसाच आला . आज उद्या करून त्येची सुई घियाची राउन गिली . कामाच्या नादात त्यो बी इसरून गेला . 
       पाच दिसापासून त्यो खायचा कमी पडला . सुईच्या भ्यापायी इलाज कराय नको म्हणायचा . मालक सवता नेतो म्हणाला पर ह्यो काय गेला नाय . सुनिनी भगत बी केला पर म्हाद्या काय उलगडणा . दार लाऊन बसाय लागला ,पाणी घिना मग मालकांनी गाडीत टाकला आन दवाखान्यात नेला . गाडीत बसला पर डोळ् खुल करून उजेड त्येन बगितला नाय . दागदरनी तपासला आन सुनीला इचारल कुत्र चावल व्हत का ? सुनी म्हणली हाव चावल व्हत कि !  दागदरनी मालकाला आत बोलून सांगितलं त्यो पिसाळलेला हाय , एक दिवस फक्त !
         मालकांनी घरात आणून टाकला ,सुनीच्या हातात पैका ठीवला आन डोल्यास्नी पंच्या लाऊन निगुन गेल ...सुनी मातर आरडत व्हती , म्हाद्याला  भान नव्हत ,पोर टकामका बगत हुती आन भिलवाडा वाट बगत व्हता म्हाद्या कवा मरायचा ... त्येंना माहीत व्हत ह्यो चुकून आपल्याला चावला त आपल बी काय खर नाय . एक म्हातारी उठली आन दाराला भाहीरून कडी घातली आन सुनिजवळ येऊन बसली ....

Wednesday 2 November 2011

भारतीयाला अभिमान वाटावा अस काही

बऱ्याच दिवसानंतर एक चांगलं पुस्तक हाती लागल आहे 'किमयागार ' ! अच्युत गोडबोलेंनी पहिल्या लेखात प्राचीन भारताचे विज्ञानाला असलेले  योगदानाचे वर्णन केले आहे . त्यातील काही गोष्टी माहित आहेत पण त्याचा  पूर्ण इतिहास वाचताना आश्चर्य तर वाटतेच पण उस्तुकता ताणली जाते . आपल्या पूर्वजांचे हे विस्तृत ज्ञान तेही इतर जगाच्या आधी! अभिमान वाटतो .
    इ.स .पूर्व १५०० या सुमारास लिहिली गेलेली 'शल्वसुत्रे' या शल्वसुत्रांमध्ये पायथागोरसचा सिद्धांत लिहिलाय , पाय ची किंमत सांगितली आहे पण कारण दिलेलं नाही . महर्षी कणाद यांनी ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात अणुविषयी तर्क केले होते . शून्याची कल्पना भारताने जगाला दिली आहे ! पाचव्या शतकातील आर्यभट्ट यांनी पृथ्वी गोल आहे ,स्वताच्या अक्षाभोवती फिरते आणि सूर्याभोवतीहि फिरते हेही जगाच्या आधी सांगितलं विशेष म्हणजे पृथ्वीचा परीघ त्यांनी गणिताने काढला (३९७३६किमी) आज तो ३९८४३किमी इतका आहे ,याच्याही पुढे जाऊन एका वर्षात ३६५ दिवस ,६ तास ,१२ मिनिटे आणि ३० सेकंद असतात हेही काढाल होतं!
      याशिवाय १२ व्या शतकातील भास्कराचार्य यांचेही गणितात खूप मोठे योगदान आहे ! वैद्यकीय शाखेत आयुर्वेद तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेते ! वेदकाळातील विद्यापीठे ,तक्षशिला,नालंदा आणि वाराणसी !
        लेखकांनी याविषयी आनंद व्यक्त केला आहे पण यानंतर आतापर्यंत खुंटलेल्या प्रगतीबद्दल खेदही व्यक्त केला आहे ! 

Monday 17 October 2011

पत्रास कारण कि

                                                  //श्री//                             

१७/१०/२०११                                                                                          सौ गीतांजली शेलार 
सोमवार                                                                                                                सांजवेळ 


                                     आदरनीय,
                                                 माझ्या बाळाचे गुरुजन ,
                                                       स. न .वि .वि . पत्रास कारण कि ,
माझ्या हृदयातील ज्या लहरींच्या प्रेरणेने हृदयाची हालचाल चालू आहे त्या लहरींचा निर्माता, माझ्या संधीकाली असणाऱ्या आयुष्याचा आधार, माझ्या मनाचा आनंद असणारा माझा बाळ मी त्याच्या पुढील जडणघडणी करता तुमच्याकडे सोपवताना माझ्या मनातील माझ्या स्वप्नांची, माझ्या अपेक्षांची जी काही यादी म्हणा हव तर ती मी तुम्हाला सांगू इच्छिते, म्हणून तुमच्या अमूल्य अशा वेळेतील काही मिनिटे माझा हा पत्रप्रपंच वाचण्यासाठी द्यावा हि नम्र विनंती!
       माझ्या मनातील या ताऱ्याला, माझ्या आयुष्यातील स्वप्नांच्या या वेलीला आकाशाला गवसणी घालायची कला शिकवा !ज्यामुळे तो फक्त माझ्याच मनातील तारा न राहता समाज्यातील दीनदुबळ्या प्रत्येक घटकाच्या मनातील स्वप्नांचा वेलु बनेल ! त्याला बाराखडी शिकवताना क -कमळाचा ख -खगाचा आणि ग -गवताचा नक्की शिकवा,हे शिकवताना त्याला हा निसर्गच आपला निर्माता आहे याची अवहेलना करताना तुला तेवढच दु:ख होऊ दे जेव्हड तुला तुझ्या आई बाबाची अवहेलना होताना होईल हेही नक्की   शिकवा! फुलपाखरू जसं लहान मोठ्या प्रत्येक फुलातील मधुरस प्राशन करून आपल्या पंखांवर अनेक रंग घेऊन जशी आनंदाने बागडतात तसं प्रत्येक क्षणातील लहान मोठं सुख जगायचं कसं हे शिकवा म्हणजे त्याच आयुष्य फुलपाखराच्या पंखान्प्रमाणे विविधरंगी होईल ! 
        खळखळ वाहणारा निर्झर जसं त्याच्या शुद्ध पाण्याने काठावरील प्रत्येक सान थोराची तहान भागवण्यात धन्यता मानतो तसं यालाही प्रत्येक अबालवृद्धाची काठी होऊन सेवेच्या आणि प्रेमाच्या निर्मळ जलाने त्यांची तृषा शांत करताना निरपेक्ष भावना उरी कशी जपावी हे शिकवा ! नदी जसं डोंगराच्या कड्यावरून कोसळल्यानंतरहि तिचा प्रवाह अखंड चालू ठेवते आणि स्वताची वेदना उरी साठवून भोवताल हिरवाईच्या नवचैतन्याने नटवून पुढे चालत राहते तसं त्यालाही सांगा निराशेच्या गर्तेत गेल्यावरही स्वताच्या वेदनेच भांडवल न करता जवळच्या गरीबांच जीवन सुखाच्या हिरवळीने व्यापून टाक, स्वताचा प्रवास न थांबवता ! 
        पाखरू जसं दिवसभर चाऱ्यासाठी हिंडून सायंकाळी घरट्याकडे झेपावते तसं तुही संपूर्ण जगातील ज्ञान मिळवण्याच्या नादात स्व:तच्या  मूळ घरट्यात परतायचं असतं हे कधी विसरू नकोस! आणि तुझी ज्ञानार्जनाची भूक भागविण्यासाठी काही क्षणांसाठी दूर जाताना भांबावून जाऊ नये हेही शिकवा माझ्या पिलाला! डोंगर जसं वाऱ्यावादळात जराही विचलित न होता भक्कम राहतो तसं तुही या समाजाने निर्माण केलेल्या चक्रीवादळात हरवून न जाता बरोबरच्या आणखी चार जणांना घेऊन कसं तटस्थ रहायचं हेही नक्की शिकवा ! 
         त्याला हे सांगा कि फणसा नारळाप्रमाणे प्रत्येक माणसाच्या मनात असतो  एक हळवा गोडवा जो मिळवायचा असतो न थकता त्याचे काटे काढून व कडक करवंटी फोडून ! थकु नकोस हे करताना कारण कष्ट करून जी गोष्ट मिळवशील ती तुला फक्त सुख नाही देणार तर आत्मसुख देणार आहे ! कितीही छोटा जीव असलास तू, तरी तुझ्यासारख्यांना  एकत्र घेऊन कितीही मोठं कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असते आपल्यात! हे पटवून देताना मुंग्यांच्या एकीने कसं भलमोठ वारूळ तयार होत हेही दाखवा त्याला!
          त्याला शिकवा कितीही मोठा तरु बनलास समाजाच्या, दृष्टीने तरी वेलींनाअंगाखांद्यावर घेऊन त्यांनाही आकाशाजवळ नेऊन सोड त्या अशोकवृक्षाप्रमाणे !आणि त्याचवेळी तुझी मूळहि घट्ट कर जमिनीत त्या वटवृक्षाप्रमाणे!  त्याला शिकवा शोधायचं असत या निसर्गाच्या कुशीत लपलेल सत्य, जे आपल जीवन संमृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करेल ! त्याला हेही सांगा आपला निर्माता असणाऱ्या निसर्गाने बनविली आहे प्रत्येक गोष्ट माणसाच्या भल्यासाठी फक्त कसं ते आपण ओळखायच असत ! 
          माजलेल्या भल्यामोठ्या हत्तीला जसं छोटी मुंगी काबू करू शकते तसं तू कितीही लहान असलास तरी तुझी सत्याची आणि प्रेमाची ताकत अगडबंब अशा संकटालाही वेसन घालू शकते हे त्याला समजावून सांगा! 
तुम्हाला मी माझा संगमरवरी दगड सुपूर्द केला आहे त्याला तुम्ही पायरीचा आकार दिलात तर मी समजेन माझा बाळ ज्ञानेश्वर बनला म्हणून नक्की तुम्हाला दुवा देईन! त्यातून तुम्ही कळस घडवला तर मी समजेन तुम्ही तुकाराम घडवला आणि तुम्हाला दुवा देईन ! आणि तुम्ही त्याची मूर्ती घडवली तर मी समजेन तुम्ही राम ,कृष्ण किंवा शिवाजी राजे घडवलेत आणि तुम्हाला दुवा देईन ! 

                                                                                              -तुमची कृपाभिलाषी 
                                                                                                      सौ गीतांजली शेलार.

                                                                                          
                     

Wednesday 12 October 2011

माझी जगावेगळी प्रेमकहाणी !

     आज गजर होण्याच्या आधीच जाग आली. पहाटेचे साडे चार वाजले होते, उजाडायला अजून बराच वेळ होता म्हणून या कुशीवरून  त्या कुशीवर वळत होतो पण झोपेला काही माझ्या डोळ्यांचा पत्ता गवसत नव्हता! काळजी   मग ती येणाऱ्या सुखद क्षणाची असो अथवा लहान मोठ्या संकटाची, मनात तितक्याच ताकतीच काहूर निर्माण करायला पुरेशी असते. रात्री बापूंचा फोन आल्यापासून मनाची हर्षित अवस्था मित्रांपासून लपता लपत नव्हती, कशी लपेल मी कधीचा मनाशीच हसत होतो, जेवतानाही मन जेवणात नव्हतच! शेवटी न राहवून विलास म्हणालाच,''आम्हाला कळेल का या आनंदचे कारण?''
''अरे काही नाही उद्या बापू आणि दादा येणार आहेत दादाला मुलगी पाहायला आम्ही जाणार आहोत.''
'' तू असा काही वागतो आहेस कि मला वाटल तुलाच मुलगी पाहायची आहे!''
'' नाही रे, आमच्या चौघांच्या घरात हे नवीन माणूस म्हणजे थोडी उस्तुकता असणारच ना ? त्यात मला बहिण नाही, म्हणून रे बाकी काही नाही!''
       सगळ्यांच्या आधी उठून चहा, नाश्ता उरकून बसलो. बाल्कनीत येऊन बापू आणि दादाची वाट पाहत होतो. समोरच्या मोकळ्या मैदानात होस्टेलची मुलं क्रिकेट खेळत होती .
सुहास मला हाक मारत होता ''चल ना विकास''
''नको रे सुहास त्याची इस्री मोडेल कपड्यांची, आज वहिनी पाहायची आहे आम्हाला'' माझ्या आधी विलास उत्तरला. सगळे हसत निघून गेले . त्यांचा खेळ मी बाल्कनीतून बघत होतो..
''विकास ,ये विकास  आवरल का रे ''बापूंची हाक. मी वाकून बघितलं तर दोघेही आले होते मी धावत खाली गेलो दादाच्या मस्करीचा एकही चान्स मला सोडायचा नव्हता. गेल्या गेल्या दादाला मिठी मारली,''काय मग नवरदेव, चला लवकर वहिनी वाट पाहत असतील'' थोडसं हसून दादाने स्वताची सोडवणूक केली नि उत्तर न देता गाडीत जावून बसला. तो अबोल आहे पहिल्यापासून पण असं.....जाऊ दे न हा कदाचित लाजत असेल आणि आहे त्याचा स्वभाव नको त्या गोष्टीच ओझं मानगुटीवर घेऊन रडत बसण्याचा ... पण आज मात्र मी फुल मूडमध्ये होतो ... आज बापू नि आई कुणाच मी ऐकणार नव्हतो. माझी बडबड ऐकून बापू मनापासून दाद देत होते ...शेवटी त्यानीही हि वेळ आतुरतेने इच्छिली होतीच कि ...एक तास पूर्ण प्रवासात मी दादाची मस्करी करण्यात इतका दंग होतो कि त्याच्या काय भावना आहेत, काय स्वप्न आहेत हेही जाणून घ्यावं हे भान उरलं नाही. माणूस स्वानंदात इतका बुडून जातो कि समोरचं माणूस खरोखर आपल्या सुखात समाधानी आहे कि नाही याचा त्याला विचारही करावासा वाटत नाही मग तो तुमचा कुणीही असो...मी याला अपवाद कसा असेल!   
   आम्ही तिथे पोहचताच जंगी स्वागत झालं. हळूच दादाला कोपर मारला नि कुजबुजलो,''स्वागत जावईबापू!''
बैठकीची खोली नीटनेटकी सजवलेली, गर्भश्रीमंती प्रत्येक वस्तू पाहून लक्षात येत होती . चहापान झालं . मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम सुरु झाला . मुलीचा भाऊ तिला घेऊन बैठकीत येत होता सर्वांच लक्ष्य तिकडे नि मी दादाला कोपरखळ्या मारण्यात गर्क! मुलगी समोर येऊन बसत होती तो मी तिला पाहिलं नि हातभर वर उडालो...जो चेहरा मी गेली दोन वर्ष मनाच्या कोंदणात ठेऊन पूजत होतो नि माझ्या वहीत फक्त तिच्याच सौंदर्याच्या वर्णनाने पानेच पाने भरली होती, जी माझ्या हृदयातील मंदिरात स्थानापन्न झालेली देवता होती, जिच्यासाठी मी सर्वकाही विसरून तासन तास तिच्या फक्त एका दर्शनासाठी कॉलेजच्या गेटमध्ये बसून असायचो ती माझी स्वप्नपरी,माझी प्रिया, माझी ह्रिदयचोर कोमल होती.... माझ्या मनाच्या या देवतेला या क्षुद्र जीवाबद्दल काहीच माहित नव्हत मी आपला एकतर्फी प्रेमात आकंठ बुडालेला एक प्रेमवीर होतो ज्याचं प्रेम त्याच्या मनाच्या नि वहीच्या बाहेर कधी आलच नव्हतं...पण आज असं काही समोर उभं राहील हे माझ्या कधी स्वप्नीही नव्हतं! रात्रीपासून हवेत उडणारा मी धाडकन जमिनीवर आदळलो होतो .... अशा ब्रह्मसंकटात सापडलो होतो कि ....अचानक आलेल्या वळीवाने बहरलेला गुलमोहर लुटून नेला .......................मी मात्र न वर्णिता येईल अशा संभ्रमात अडकलो होतो.............
    त्यानंतर काय झालं, मी कसा घरी आलो ,दादा काय बोलला हे आठवत नाही. मी एका अशा अवस्थेत होतो कि दुसऱ्या दिवशी जरासा भानावर आलो .तोपर्यंत हे काय झालं , दादाऐवजी दुसरा कुणी असता तर भांडून,विनंती करून कसही मी तिला मिळवलच असतं पण जर दादाने होकार दिला तर? का देईल तो नकार? इतकी सुंदर, सालस मुलगी तो नको म्हणणार नाही ,आणि ती जर वहिनी म्हणून घरात आली तर मी स्वतःला संभाळू शकेल का ? बर झालं मी कुणालाही माझी हि प्रेमकहाणी सांगितली नाही. कमीत कमी मी एकटाच सहन करणारा असणार आहे..... हो पण आता माझ्या आयुष्यातील लग्न हि गोष्ट मी काढून टाकणार! तिच्याशिवाय दुसरी कुणी ....नाही विचारही मनात आणू शकत नाही ! काय करू ...माझ्या मनाची हि अवस्था कुणाला सांगू ! आईला ...नको ,कि बापूंना ...,कि विलासला ...नको बाहेरच्या माणसाला नको ..काय करू ...अस वाटत होतं डोक्याचे सगळे केस उपटून काढावेत ,भिंतीवर डोक आपटाव कि ....
    दिवसभर कॉलेजला गेलो नाही ,न जेवता तसाच पांघरुन घेऊन झोपून राहिलो . मित्रांनी कमेंट केल्या पण त्या समजण्याच्या पलीकडे मी गेलो होतो,शेवटी तीही कंटाळून कॉलेजला गेली. चारच्या दरम्यान बापूंचा फोन आला, त्यांनी जे सांगितलं त्याने मला काय कराव काही कळत नव्हत. दादा नाही म्हणत होता लग्न करायला, बापू सांगत होते त्याला समजाव म्हणून! आता मी कस समजावणार होतो देव जाणे ! दादा इतक्या सुंदर मुलीला का नाही म्हणत असेल? मी काल येताना काही बरळलो तर नाही? तसं बापूनी सांगितलं असत मला, काय झालं दादाला, कुणी दुसरी? त्याने मला सांगितलं असतं, कदाचित लाजला असेल, पण आईला नक्की सांगितलं असतं ...मला आनंद होत होता पण वाईटहि  वाटत होत तिला नकार कळल्यावर ती आमचा सर्वांचा तिरस्कार तर करणार नाही? एक ना अनेक शंका माझं मन पोखरत होत्या.
     दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या गेटमध्ये थांबायचं धाडस झालं नाही पण म्हणतात ना भित्यापाठी ब्रह्मराक्षस तसं ती माझ्या समोर आलीच! पण ती हवीशी वाटणारी एक रमणी होती , माझी? कोमल होती. पर्वाची ओळख लक्षात ठेऊन तिने एक हसरा कटाक्ष माझ्याकडे टाकला ,माझ्या शरीरात एक गोड ,हवीशी वाटणारी वेदना सरसरून अंगभर पसरली , क्षणभर कोमल मोरपीस चेहऱ्यावर फिरतोय असं भासलं ! भानावर आलो तर तिथ कुणीच नव्हत..मनाचं हे सुख क्षणभर राहील! वाटल तिला उद्या नकार कळला तर काय होईल ? देवाला माझी दया कधी येईल का ? तसाच परत होस्टेलला आलो . आपण कितीही अस्वथ असलो तरी जगापासून मनाची हि होरपळ लपवाविशीच वाटते, डोक्यावर पांघरून घेतलं कि कुणाला काही कळणार नाही असच वाटत  राहते ... पण लपवल्याने  प्रश्न अनुत्तरीत राहण्याची भीती जास्त ! जखमेची खपली न काढता कितीही औषध लावलं तरी जखम बरी थोडीच होणार आहे ,जखम बरी होण्यासाठी खपलीखालची ठसठसणारी घाण निघणे गरजेचे ! आईनेच हे कधीतरी सांगितलं होतं ! मी लगेच उठलो नि बापुना  फोन केला .
''बापू, मी बोलतोय, विकास''
''अरे हा बोल विकास, अरे हो तुला सांगायचं राहील ,अरे तुझ्या दादाने दुसरीच मुलगी पहिली आहे म्हणून तो लग्नाला नकार देत होता , सकाळीच आईला सर्व सांगितलं त्याने आणि फोटोहि दाखवला मुलीचा, सुरेख आहे मुलगी आणि शिकलेली सुद्धा , तीन वर्षापासून चाललय पण दादाने मागमूस लागू दिला नाही ,आईला आणि मला वाईट वाटल ...एव्हडे मैत्रीचे संबंध ठेऊन मुलांना आपण जवळचे वाटत नाही म्हणून ...पण जाऊ दे त्याचा आनंद तोच माझाही म्हणजे आपला सर्वांचा रे , तुला फोन करणार होतो पण म्हटल तू कॉलेजांत असशील ...बर तू का फोन केलास? ''
''.....''
''सांग न विकास , काय झालं ?''
'' काही नाही बापू , तुम्ही नकार कळवला ?''
''नाही , म्हटल प्रत्यक्ष जाऊन सर्व सांगाव नि झाल्या गोष्टीबद्दल माफी मागावी ''
''तुम्ही जायच्या आधी माझ्याकडे याल का ?''
''हो येईल बाळा, काही काळजीच नाही ना?''
''नाही बापू ,आल्यावर बोलेन मी ''
''ठेऊ मग ''
''हो ,आणि होस्टेलमध्ये या ''
''बर बर ''
फोन ठेवला पण डोक्यावरच भलमोठ ओझं कमी झाल्यासारख भासल ,पण आता पुढच्या मोठ्या परीक्षेची तयारी करायची होती ती म्हणजे बापूंना सर्वकाही खर सांगण्याची .....
       आजची सकाळ पावसात धुवून निघालेल्या झाडासारखी स्वच्छ, मोकळी वाटत होती . एक वेगळाच विश्वास मन भरून उरला होता ...मी आजची परीक्षा नक्की पास होणार ....कदाचित माझ्या अर्ध्या बोलण्याने बापू झोपू शकले नसावेत म्हणून लवकर उठून आठ वाजता होस्टेलच्या वेटिंगररूम मध्ये आल्याचे निरोप माळीकाकाने आणला. सर्व आवरून मी खाली गेलो ,बापू वाटच पाहत होते .
''चला बागेत बसू ''
''बोल विकास ,काय झालं आता रात्रभर मी आणि तुझी आई झोपलो नाही, काही आजारी नाहीस ना ? का कुणी त्रास देत तुला? परीक्षेच टेन्शन अजिबात घेऊ नकोस , एक ऐवजी दोन वर्ष लागू दे मी आहे ना , पण मुलांनी सुखी असाव एव्हडच वाटत रे , बोलं रे बोल आणखी उत्कंठा नको लावूस.''
'' नाही बापू माझी काही काळजी करू नका, आणि कॉलेजच म्हणाल तर मी नक्की चांगल्या मार्कांनी पास होणार आहे, पण आज मला काही मागायचं आहे ,आणि हो तुम्हीही तुम्हाला आवडल तर होकार द्या.''
''....बापू मला आपण पाहायला गेलेलो ना ती मुलगी आवडते ,दोन वर्षापासून मी तिच्यावर प्रेम करतो पण तिला काय कुणालाच सांगण्याच धाडस मला झालं नाही ,त्या दिवशी दादाची नवरी म्हणून तिला पाहिलं नि मी गळूनच गेलो , पण नन्तर कुणाला न सांगता मनात ठेवण्याचा निर्णय घेतला पण दादाचा नकार समजल्यावर  पुन्हा अस्वस्थ झालो नि विचार करून करून शेवटी तुम्हाला सांगण्याच ठरवल कारण तुम्हीच सांगता ना विचारल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत म्हणून ! बापू नकार सांगण्यापेक्षा तुमच्या लहान मुलासाठी मागणी नाही घालू शकत तुम्ही ! प्लीज बापू , हीच वेळ आहे तिला सांगण्याची कारण मी तिच्या समोर गेलो कि माझी वाचाच बंद होते ! तुम्ही माझे वडील तर आहात पण माझे मित्रही आहात ,तुम्हीच मला या संभ्रमातून बाहेर काढू शकता ! कराल ना बापू एव्हड ,प्लीज मला समजून घ्याल ना ?''
बापू उठले नि मला कडकडून मिठी मारली ,नि डोळ्याच पाणी पुसत म्हणाले ,'' मलाही ती मुलगी सून म्हणून आवडली होती रे, पण तुला कुठल्या तोंडाने विचारावे हेच कळत नव्हत , वाटल तु काही वेगळा विचार तर करणार नाहीस, पण त्या विधात्यालाच काळजी रे सगळ्याची! माझ्या मनातल बोललास बाळा ,मनातल बोललास! आत्ता जातो नि त्यांना सांगून येतो .''
मी गपकन वाकलो नि बापूंचे पाय धरले , त्यांनी परत मला उराशी कवटाळल . परत यायला उशीर झाल्याने , फोन करूनच बापुंनि त्यानीही हि गोष्ट आनंदाने स्वीकारल्याच सांगितल .....
     आज आवरून कॉलेजच्या गेटमध्ये बसलो, ती  येण्याच्या दोन तास आधी ! ती ...आली....एक हसरा  कटाक्ष ....मी घायाळ ..........ती लाजली नि क्लास पर्यंत जाईपर्यंत खाली घातलेली मान वर केली नाही !  विलास ,सुहास सर्वजण प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहत होते ,पण मी मात्र ..............................................     

Monday 26 September 2011

आण्णांच्या आंदोलनाने मला काय दिले?

  ''मम्मी , ए मम्मी मला न स्केल घ्यायची आहे पैसे दे न दादाजवळ.'' उठल्यापासून सत्योमच एकच मागण चालल होत. मी मात्र त्या दोघांचे आणि सारिका आत्याचा डबा करण्याच्या घाईत होते. ते झाल नि डबे , बाटल्या भरून सत्योमला अंघोळ घालायला गेले. परत त्याची भुणभुण चालू झाली. खर तर दादा सांगत होता पहिलीत स्केल लागत नाही, उगाच हि मुल मारामाऱ्या करतात, म्हणून मी दुर्लक्ष्य करत होते पण तो काही केल्या मागणी मागे घेत नव्हता. शेवटी मी शेवटच अस्र बाहेर काढल हात वरचा खाली येईपर्यंत बाळ कडाडला,''बघ आ मम्मे मी उपोषण करीन!'' मला हसाव कि रडावं हेच कळेना. दादाला पैसे दिले नि छोटी स्केल घ्यायला सांगितली.
     नेहमी स्वताच्या मागण्या रडून, आदळ आपट करून मान्य करून घ्यायचा प्रसंगी तोड फोड करायची वेळ आली तरी करायचा. पण आजचा हा अवतार बघून मी निशब्द झाले. आण्णांच आंदोलन जेव्हापासून चालू होत तेव्हापासून आमचा news chanal बंद नव्हता. त्यात आमची चर्चाही तो ऐकत असे. मुलांच्या मनात घर करून बसलेल्या या गोष्टी अचानक अश्या पुढे येतात कि आपण निरुत्तर होऊन जातो.
     आण्णांच्या आंदोलनाने देशाला काय दिल यापेक्षा तरुणांना, उगवत्या पिढीला एक नवी दिशा दिली. ती अशी कि फक्त हिंसाचाराने प्रश्न सुटत नाहीत तर ते वाढत जातात अनेकदा मनुष्यहानी, वित्तहानीहि  होते, देशाच तसच आंदोलनकर्त्याचहि न भरून येणार नुकसान होत. या उलट अहिंसेच्या मार्गाने जरी काही मिळाल नाही तरी काही हानी तर होत नाही. गांधीजींनी दाखवलेला हा अहिंसेचा मार्ग आपण जरी विसरलो होतो तरी आण्णांनी तो परत दाखउन दिला आहे,आणि यशस्वी झालेला सर्व जगाने पाहिला आहे. म्हणून  आण्णांनचे शतश: आभार ! 

Sunday 25 September 2011

वयनीमाय

      हवेतला गारवा उगाचच अंगाला झोंबत होता. न्याहारीची वेळ झाली तरी उन वर यायचं नाव घेत नव्हत. पण शेवन्ताच्या अंगणाला आज निराळाच रंग होता. तसं पहिल तर अंगण घराच्या आतल वातावरण कस आहे याचच प्रतिबिंब! स्वच्छ सारवलेला ओटा, उजव्या हाताला छपरात दोन गाया एक वासरू टाकलेली मक्याची कुटी चघळत होती. घासाच ओझ ओट्याजवळच्या बदामाच्या झाडाखाली पडलेल. शेवंता घरातलं काम उरकून बाहेर गुरांना पाणी ठेवायला आली. गायांच्या पुढ बादली ठेऊन ती जरा झाडाच्या सावलीत ओट्यावर टेकली. मागच्या आठ दिवसाची तगमग आता कुठ शांत होती. मनाच्या पाखराला सदान चांगलीच येसण घातली, ती पण प्रेमाने समजावून! आणि विशेष म्हणजे थोडाही धाक न दाखवता. सदाची हीच सामंजस्याची भाषा, प्रेमाचे शब्द शेवंता आणि त्याला आता पर्यंत एकमेकांशी घट्ट बांधून आहेत. नवरा बायकोच नातं असच जितक लांब ढकलू तेवढ जोरात परत एकमेकांजवळ ओढून आणत. पृथ्वी जस सूर्याभोवती गुरुत्व-आकर्षानामुळ फिरत राहते तस! एक अशीच ओढ यांनाही बांधून होती. 
         मोटर चालू होती म्हणून शेवंता आज विहिरीवर कपडे धुवायला गेलेली. शेजारची ताईबाई संग होतीच. त्यांच्या दोघींमधी शेजारणी असून कधी भांडण नव्हती, एकमेकीची मदतच करायच्या! हौदाच्या कडांवर मोठाल दगड असल्यान कपडे धुवायला सोप जायचं. वीजमंडळाच्या कृपेची फक्त गरज असायची! 
'' शेवन्ते परभू लई दिस झाल आला नाय ग.''
'' ताई, मास्तर हाय त्यो, सवड तर पायजेन, त्यामधी माधुरीची बी शाळा असतीया, एक दिस सुटी असली तरी आठ दिसाचा राडा आवरायला अख्खा दिस संपतो. लागून सुट्या आल्या कि येत्यानच कि !''
''बघ शेवन्ते, तुमी पाठच्या दीर ,नंदला मोठ करायच म्हनुनशान पोटपाणी पिकू दिल न्हाय! म्हातारपणी ह्यांनी सांभाळ केला तर ठीक न्हायतर अवघड होऊन जायचं!''
''न्हाय ताई, माजी पोर तशी न्हायत ,ती कावा बी अंतर नाय देयची.''
''परभू हाय तुजा पर माधुरी हाय का ?''
''नाय ग ताई गुणी पोर हाय ती बी .''
''चांगल हाय पर तू आपली जपून आस . काय कुणाचा भरवसा नाय बग कुणाची मती कवा बदलल सांगण अवगड हाय, चल येते मी झाल माज .''
      ताईबाई गेली पण शेवन्ताच डोक मात्र बधीर झाल. संशयाची ठिणगी एकदा पडली कि वनवा पेटवल्याशिवाय   गप्प होत नाही. एकदा का वनवा पेटला कि घरच्या घर उध्वस्त झालीच म्हणून समजा. कळत असूनही संशयाच्या या वारूला कुणी लगाम घालू इच्छित नाही हि सगळ्यात मोठी शोकांतिका! मग या संशयाने अगदी आई मुलाच्या नात्याचा बळी घेतला तरी यांना चालतो. आणि या विखारी रोपाला खत पाणी घालायला बाकीचे टपलेले असतातच. माणूस क्षणाच नात वर्षानुवर्षे जपलेल्या नात्याला गिळंकृत करताना पाहूच कसा शकतो? शेवंता मात्र गलबलून गेली होती. जेवानावरच मन उडून गेल होत. सदा येई पर्यंत तिचा जीव शांत होणार न्हवता. कारण त्याने लग्नाआधी नसबंदी केली नसती तर एखाद पोर मला बी झाल असत माझा खरा गुन्हेगार तोच आहे. शेवन्ताच अंग थरथर कापत होत. सदा आल्यावर त्याला किती दोष देऊ नि किती नको अस तिला झाल होत. हातान या माणसान आपल्या आयुष्याच वाटोळ करून घेतलय आता म्हातारपणी कुणाच्या तोंडाकड बघायचं? एक न अनेक शंका तिला घायाळ करत होत्या. दु:खाची नुसती चाहूल माणसाला हतबल का बनवत असेल? ते होणार कि नाही हेही त्यांना माहित नसत, पण मरण यायच्या आधीच खड्डा घेण्याची सवयच बनून गेली आहे. उद्याच्या दु:खाच्या चाहुलीने आपण आपल आज संपवतो आहे हेही यांना का कळत नाही देवच जाणो? 
      सदा आला पण शेवंता एक शब्दहि का बोलत नाही याचा काही अंदाज त्याला येईना. थोडा गोडीन तिच्याजवळ गेला पण तीन असा काही त्याला झिडकारला कि त्याच डोकच बधीर झाल. जाताना तर सगळ ठीकठाक होत मग अस अचानक दोन तासात काय घडल? आता काय करायचं? ओरडल तर परस्थिती आणखी बिघडणार थोड कुरवाळच पाहिजे हे त्याने उमजून घेतलं.
''शेवन्ते काय न सांगता तू आजूक माजा किती जीव जाळणार हैस? सांगती का जाऊ लांब कुठतरी? परत त्वांड नाय दाखीव्णार तुला.''
आता मात्र जीव्हारी बाण लागला. शेवंती ढसाढसा रडायला लागली त्याच्या गळ्यात पडून आणि विहिरीवर झालेली हकीगत सांगितली. सदा लागला हसायला. ''हे तुज ना शेवन्ते उद्याच्याला जेवण मिळल का नाय ह्या विचारांनी आजच उपाशी राहण्यासारक झाल! तुला ग कश्याला काळजी पायजे याची. मी हाय ना कुणी नसाल तरी, आन समजा तू आजच मरून गेल्यावर?''  सदा परत मोठ्यान हसायला लागला. शेवंती मात्र जास्तच भडकली,''माज डोक तळ्याव नाय आन तुमालाव कश्याची मस्करी सुचती ? जावा तीकड नका बोलू माज्यासंगत.'' सदान तिला जवळ घेत तिला समजावल.
''शेवन्ते आग कुत्र्याच्या पिलाला जीव लावला त ते बी आपल्या माग पळत! ह्यो तर माजा पाठचा भाऊ हाय. आणि मला सांग तू बी पोटच्या पोरापरीस जास्तच जीव लावला नव्ह परभुला मंग तुज्या संस्काराव तुज इस्वास का त्या ताय्बायवर सांग बर मला? आन माधुरी बद्दल बी तू शंका कशी घेऊ शकती तीन बी तुजी किती सेवा केली बर तू आजारी होती तवा! लोकाची असली तरी चार बुक शिकल्याली समंजस पोर हाय ती ! आशी उगाच डोक्यात राख कश्यापरीस घालती, येवड सांगून तुला पटत नसल चल चार दिस त्येन्च्यासंग राहून तू अनुभव घेऊन बग मंग तर झाल. उरिक लवकर आजच या शंकला चुलीत घालू .'' 
   शेवंता लगबगीने उठली, परभूकड जायचं म्हणून ती गरबडीने  मळ्यात जाऊन मिरच्या, वांगी, शेपू-चुक्याची भाजी, पेरू ,आन बरच काही घेऊन आली. दोनच्या गाडीने दोघ पर्भूकड रवाना झाली. पोहचायला पाच वाजले. माधुरी नुकतीच आली होती. दादा नि वयनीमायला बघून तिला तिचा आनंद लपवता येन अवघड होऊन बसल, आत येताच ती दादाच्या पाया पडली आणि वयनीला जाऊन बिलगली, लई दिवसांनी आई दिसल्यावर जस लेकरू बिलगत तशी! सदा शेवन्तिकड बघत होता, नजरानजर होताच शेवंती वरमली. त्यांना  चहा पाणी देऊन माधुरी स्वय्पाकाला लागली, शेवंता लुडबुड करू लागली पण माधुरीन तिला हाताला धरून बाजूला बसवल. तासाभरात परभू आला त्याला अचानक आलेले दादा, वयनीमाय बघून इतका आनंद झाला कि दोघांना कुठे ठेऊ कुठे नको अस झाल . त्याचं ते प्रेम बघून शेवंता मात्र आतल्या आत खजील होत होती. तिला धरणी माय ठाव दे अस झाल तिची चुलबुल बघून सदा मनातल्या मनात हसत होता पण त्याला ते लपवता येत नव्हत. जेवण आटोपल्यावर ती माधुरी जवळ बोललीच,''तुला कधी अस वाटल नाय आपल्या नवऱ्याची दादा वयनी आपण कश्यापरीस त्येंच करायचं .''
''वयनीमाय, तुमाला  जर तवा वाटल असत तर मला आता तस वाटल असत. ज्या मावलीने बारीक दीर,नणंद सांभाळण्यासाठी आपल् पोट पाणी पिकू दिल नाही त्या माउलीची अशी अवहेलना केली तर प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा माझी पाप धुऊ शकणार नाही !''
''बस बस माधुरी, तुला हे सांगितलं कुणी?''
''तुमच्या लाडक्या पर्भून! आणि हो लग्नाआधीच कबुल करून घेतल कि माझ्या दादाला आणि वयनीमायला अंतर द्यायचं नाही! या अटीवर तर यांनी लग्न केल माझ्याबरोबर!''
आज शेवन्ताला जन्मच सार्थक झाल अस वाटायला लागल. सगळ भरून पावलो आता देवाकड काही मागण नाही! माणूस सुख शोधत उर फुटेपर्यंत धावतो पण त्याच्याजवळ लपलेल सुख त्याला दिसत नाही त्या कस्तुरी मृगसारख! 
   शेवंतान सगळ सदाला सांगितलं! तिचे डोळे तिच्या नकळत वाहत होते पण आनंदाने ! 
''पण परभू सारख तुमी लगणा आधी मला इस्स्वसात घेतलं असत त जमल नसत का ?'' लाडिक गुश्यात शेवंता बोलली.
''तवा आजाच्यासारक लग्नाआगुदार भेटली आसती तर सांगितलं आसत कि!'' मिस्कीलपने सदा बोलला. लाजत शेवंती त्येच्या कुशीत शिरली. ति आता निश्चिंत झाली!
         बदामच्या झाडाखाली बसून एक निश्चय शेवन्ताने आज केला,'' परत आसा येडेपणा नाय करायचा, माज्या पर्भूबद्दल शंका म्हंजी देवाबद्दल शंका!''                  

Monday 19 September 2011

श्रद्धांजली

चार दिवसापूर्वी माझ्या सासरच्या नात्यातील एका आजींच अचानक अल्पश्या आजाराने निधन झालं. तसं पाहिलं तर जन्ममरण हे कुणासाठी थांबलेल किंवा चुकलेल नाही पण काही व्यक्ती अस आयुष्य जगलेल्या असतात कि हि त्यांच्या जाण्याची घटना तिऱ्हाईत मानसाला अस्वस्थ करून जाते. या आजींच्या बाबतीत असाच काहीस घडल. परिसरातील त्यांना ओळखणारी जवळजवळ सर्वचजन तळमळली, त्यात मीही आलेच. त्या खूप जवळच्या नव्हत्या पण त्यांनी आमच् नातं जवळच बनवलं होतं. जितक्यावेळा त्या भेटल्या तेव्हा त्या आपलेपणाने जिव्हाळ्याने बोलल्या! गुलाबाच्या फुलासारखं काट्याच्या वेदना स्वत:जवळ ठेऊन भोवताल सुगंधित करणाऱ्यांपैकी त्या एक ! आयुष्यभर फक्त दु:ख सोसनाऱ्या, कुटुंबाची सर्व जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या, स्वताची दु:ख कधीच त्यांनी  दया किंवा मदत मिळवण्यासाठी वापरली नाहीत.
   लग्न झाल्यानंतर एक मुलगा आणि मुली पदरात टाकून जोडीदार अर्ध्यावर टाकून देवाला प्रिय झाले. नंतर छोट्या दीर जावांना सांभाळत आणि स्वताची मुले सांभाळत संसार पुढे नेला. मुलाच लग्न केलं तेही लहान तीन मुलं आणि शांत संय्यमी सून ठेऊन देवाला प्रिय झाले. पुत्रवियोग सहन करत नातवंड मोठी केली व्यवहार कुशलतेने , कष्टाने शेती करून इतर दीरानच्या बरोबरीला संसार नेऊन ठेवला. हे करत असताना सर्व नातेवाईकांच्या सुख दु:खात त्या सहभागी झाल्या. जळणाऱ्या ज्योतीसारख वेदना सहन करत प्रकाश मात्र सर्वाना दिला . दारातल्या तुळशी सारखं आयुष्य जगत तुळशीच्या ओट्यावर मृत्यूला त्यांनी जवळ केलं !
 मी कविता करत नाही पण त्यांच्यासाठी सुचलेल्या या ओळी खाली देत आहे.

             एक आत्मा आयुष्यभर फक्त दु:ख झेललेला
             कधीचा एक अश्रू तिने पापण्यांवर पेललेला
             अश्रुना मुभा नव्हती गालावर ओघळून मुक्त होण्याची
             त्या आत्म्याला ताकत हवी होती फाटलेलं आभाळ पेलण्याची

             उन पडलं वादळ आलं पाऊस आला
             पिलांना पंखाखाली घेणारी पक्षीण ती
             आयुष्यातील दु:खांसमोर
             दत्त म्हणून उभी ठाकनारी वाघीण ती

             रडण्याला आणि दु:खाला
             तिनं कधीच बळ बनू दिल नाही
             हसण्याणचं मानसं जिंकायची
             जिंकायच्या दिश्याही दाही

             अश्या या छत्रछायेला आपण
             जरी आज पारखे झालो
             नजर तिची घारीची तशीच आहे
             आपण मात्र नतमस्तक होऊन वाकलो.

Thursday 8 September 2011

देवदूत

 गाठ मग ती शरीराच्या कुठल्याही भागात असो मनपटलावर एक भीतीची लकेर उमटवून जाते. असाच प्रसंग काल  परवा मीही अनुभवला. कॅन्सर विषयी भीती सर्वांच्या मनात असते आणि तस काही आपल्याला होऊ शकत अशी जाणीव जरी झाली तरी मन सैरभैर होऊन जात सगळ जग अचानक भकास वाटू लागत, जीवनात भरलेला सुगंध अचानक वार्याच्या झोताबरोबर उडून जातो. असा प्रसंग शत्रूलाही लाभू नये इतपर्यंत भावना मन व्यापून टाकतात.
   वीस दिवस झाले असतील साधारण एकाएकी एक गाठ जाणवली. वेदना नव्हती पण गाठ तशी मोठी होती . आता कळली किती दिवसापासून असेल सांगण जरा कठीणच कारण वेदना नव्हती . चाचपून पाहिलं इतर ठिकाणी हलत होती पण खालच्या बाजूने चिकटलेली भासली.दहा दिवस थोडीफार औषधे घेऊन बघितली पण काहीच फरक नाही मग डॉक्टरांना दाखवायचं ठरलं वेळे प्रमाणे रुबी हॉस्पिटलच्या कॅन्सर विभागात पोहचलो डॉ अनुपमा माने यांना दाखवायचं ठरलं डॉ बाह्य रुग्ण तपासणी विभागात होत्या माझ्या अगोदर एक आजी होत्या कदाचित त्यांच्या त्या जुन्या पेशंट असतील. डॉ बाहेर आल्या त्या आजींची स्मित करत विचारपूस केली अर्ध्या तासात परत येते ऑपरेशन आहे सांगून निघून गेल्या . वेळ लागेल म्हणून चौफेर नजर फिरवली . एक मुलगी तिच्या आई वडिलांसोबत होती डोक्याला भुवयांना अजिबात केस नव्हते कदाचित किमो थेरपी चालू असावी आई वडील तिला हव नको ते विचारत होते पण चैतन्य हरवलेला तिचा चेहरा अंगावर शहारे उभे करत होता! माझ्या ह्यांनी हि गोष्ट ओळखली आणि ते माझ मन त्यांच्या बोलण्यात गुंतवण्याचा असफल प्रयत्न करू लागले!                                                                                
    तिच्या शेजारी एक जोडप बसलेलं यजमान एकदम शरीराने मनाने खचलेले आणि शेजारी बसलेली बायको डोळ्याच्या कडेपर्यंत आलेले अश्रू गालावर ओघळू न देण्याच्या असफल प्रयत्नात! काही लोकांच्या चेहऱ्यावर नीट झाल्याच समाधान आणि काहीतरी अवयव गमावल्याच दु:ख दोन्ही भावना एकत्रित लपंडाव खेळताना! कुणाच्या नाकात असलेली नळी काहींना त्यांच्या पासून किळस आल्यामुळे दूर बसण्यासाठी प्रेरित करत होती त्याच वेळी माझ मन मात्र यांचे आता किती दिवस राहिले असतील या विचाराने गर्भ गळीत झालेले! मन खिन्न होत आज मी सुपात असेल नि उद्या या जात्यात आले तर ? शरीरात एक वेदना पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत विजेसारखी चमकून गेली डोळे मिटून मी यांचा हात पकडला. 
  आमचा नंबर आला आत जाताच एका गोड स्मितहास्याने डॉक्टरांनी आमच् स्वागत केल . माझ्या थोडा जीवात जीव आला . त्यांनी शांतपणे सर्व रिपोर्ट पहिले नि काही प्रश्न विचारले त्या मधेच स्मित करत शांतपणे विचारत होत्या . माझ्या मनावरचा ताण हळू हळू कमी होत होता . तपासून झाल्यावर त्यांनी विशेष नाही यावर शिक्कामोर्तब केल पण भविष्यात त्रास नको म्हणून काही तपासण्या करून आपण ती गाठ काढून टाकू असा सल्ला दिला. त्यांनी जराही न वैतागता (नाही तर काही डॉक्टरांना प्रश्न विचारणारे पेशंट नको असतात ) अगदी प्रेमाने प्रत्येक शंकेच निरसन केल.दोन दिवसापूर्वी आम्ही ती गाठ काढून टाकली . आज मन आणि शरीर या दोनही वरचा ताणरूपी पडदा हटला आहे . मन प्रसन्न आहे. याच सर्व श्रेय जात माझ्या अस्थिर मनस्थित साथ देणाऱ्या माझ्या यजमानांना, माझ्या कुटुंबियांना आणि देवदूत होऊन भेटलेल्या डॉ अनुपमा माने यांना! डॉ मानेन सारखे देवदूत माझ्या सारख्या संभ्रमात असणाऱ्या प्रत्येक पेशंटला भेटोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !   

Sunday 4 September 2011

शिक्षक दिन

    आज सकाळपासून सत्योमचा गृहपाठ करून घ्यायचं हे लक्षात होतच कारण दोन दिवसाच्या  सुटीनंतर सोमवारची शाळा त्याच्या आठवणीत आणून द्यावी लागते. दादाला विचारल तर तो म्हणाला कि शिक्षक दिनाच कार्ड करायला सांगितलं आहे. त्या दोघांनी कार्ड करायला घेतली पण मी मात्र माझ्या शाळेच्या आठवणीत हरवले. 
    तस चौथीच्या अगोदरच विशेष काही आठवत नाही पण काही कविता त्याही नाचून गाऊन म्हणत असू म्हणून. खऱ्या आठवणी पाचविपासुनच्या! पाचवीत आलो पण शिक्षक मात्र तेच कारण आमच्या गावात सातवीपर्यंत शाळा होती मग पहिलीपासून सातवी पर्यंत एकच वर्ग शिक्षक! आमचे काळदाते गुरुजी! प्रत्येक विध्यार्थ्याच प्रेमाने त्यांनी नामकरण केलेल. ते जेव्हड मन लाऊन शिकवत तितक ते विद्यार्थ्याला समजून घेत. त्यांच्या प्रत्येक चांगल्या वाईट हालचालींवर लक्ष ठेवत. माझ नाव त्यांनी चिंधी अस ठेवलेल कारण माझ नाव ( माहेरच )  संध्या म्हणून संधी -चिंधी अस! त्यांच्या ह्या नामकरणाचा कधी राग नाही आला तितका जीव ते आम्हाला लावत आईच्या ममतेने जपत! तेव्हा बाक नव्हते बसायला एकामागे एक जमिनीवर बसाव लागत असे. एकदा ते इतिहास शिकवत होते मी मात्र माझ्या पुढे बसलेल्या मुलीची वेणी घालत होते ! त्यांनी हे बघितलं मला जवळ बोलावलं हात पुढे करायला लावला जोरात छडी मारली. त्यावेळी मी त्यांना विनवत  होते गुरुजी मला मारू नका माझ लक्ष आहे तुम्ही पाहिजे ते विचारा पण कश्याच काय त्यांना राग अनावर झाला होता. मारल्यावर मग मला विचारल माझ बरोबर उत्तर ऐकून ते मात्र अस्वस्थ झाले. शाळा सुटल्यावर जवळ बोलून त्यांनी हात हातात घेतला म्हणायला लागले लक्ष देत जा! चिंधे जास्त लागल नाही ना ? त्यावेळी त्यांचे डोळे पानवले होते! तेव्हा पासून मी कधी तास चालू असताना कुणाची वेणी घातली नाही ! सातवीत असताना काळदाते गुरुजींची बदली झाली तेव्हा निरोप समारंभाच्या भाषणात प्रत्येक विध्यार्थी रडत रडत भाषण करत होता! अश्या शिक्षकांची शिक्षक दिनी तर नक्कीच आठवण होते.     

Friday 19 August 2011

पठ्ठी

   ''मरण येत नाही, म्हणून जगतेय!'' असे वाक्य अनेकांच्या तोंडी येत. खरोखर ते हतबल असतात का ? जगणं इतकं अवघड असू शकतं ? तसं पाहिलं तर कितीसं दु:ख आपण सहन करत असतो! कदाचित हो कदाचित नाही! दु:ख असताना मृत्यू कवटाळंण जितकं सोपं तितकं ते पार करून जाण अवघड! आणि ज्याला अवघडाची आस तो माणूस! मग आपण माणूसपण कस सोडू शकतो ? ज्या स्रिया पोटच्या पिलाला आपल्याबरोबर बळी द्यायला तयार होतात त्यांच्यासाठी............
     मळलेले कपडे पण वास न येणारे, केस विंचरलेले चेहरा काळाच पण धुतलेला, पदर खांद्यावर पण पूर्ण छाती पूर्णपणे न झाकणारा, मांडीवरची पोर साधारण पाच सहा महिन्याची. जवळच पाच वर्षाची दुसरी पोर. ''नंबर आला तुमचा चला ताई'' गडबडीने उठून आत केबिन मध्ये गेली. डॉक्टरांनी तपासून औषधे लिहून दिली अन ती बाहेर आली. ''औषध निम्मीच का आणलीत ताई?'' ''पैसा कमी हाय'' ''मग डॉक्टरांना सांगा'' ती परत आत गेली. 
     ''सगळी औषध घेतली नाहीस तर तुझ बाळ कस नीट होणार ताई? आधीच ते जास्त आजारी आहे, त्याला औषध लागतीलच.'' डॉक्टर.
     ''काय करू ताई, आठ दिसाच खाय प्यायचं सामान  भरून जे बाकी राह्यलं तेच्यामंदी हीच औषध आली''  
     ''तुझा नवरा कुठाय, बोलव त्याला'' 
     ''ताई हि पोरगी झाली त्यो मला सोडून गेला दुसरी बाई घेऊन, मी बा जवळ हाय तिथबी साव्तर आय हाय, उसतोडीच काम त्येंच्या संग करते, ती म्हणती दवा पाण्याला कुठून पैसा देऊ तीन पोर आन चौथी मी त्ये खायला तरी किती जनस्नी देणार आन त्यावर दवा म्हंजी लई झाल. आठ दिस झाल पोर आजारी हाय, आज पैस दिलं म्हणून आले.'' 
       डॉक्टरांना कससच झाल नि त्यांनी त्यांच्या जवळची औषधे त्या बाईला दिली.
    ''फी देऊ नको बाहेर मी सांगते त्यांना.''
    ''लई उपकार झाल ताई''
    ''मुलींच्या शिक्षणाचं काय'' दयेपोटी डॉक्टरांनी चौकशी केली.
    '' त्ये कस जमल ताई? आमी आठ नऊ महीन इकडच असतु. माझ्या या मोठ्या पोरीला आश्रम शाळेत घेतील काव ताई?''
    ''घेतील ना ती सहा वर्षाची होऊ दे नंतर टाक आश्रम शाळेत.''
     ती बाहेर गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात डॉक्टर म्हणाले ''पाठ थोपटली पाहिजे पठ्ठीची! अवघडलेल जगण तिनी सोप केलय!''   

Wednesday 10 August 2011

मनात रुतलेले क्षण


 
        '' आई गं '' आनंद असो वा वेदना हे दोन शब्द ज्याच्या ओठी येत 
नसतील असा माणूस विरळ. प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात मोठी जागा 
कुणाची असेल तर ती आईची! प्रत्येक सुखाची पायरी आईपासून सुरु 
होते आणि दु:खाचा शेवट आईपाशी होतो. मनाच्या कुठल्या कोपर्यात 
दडली आहे इतर वेळी समजणार नाही पण सुख-दु:खाच्या वेळी ''आई गं '' 
हे दोन शब्द जिव्हेला कधी सजवून गेले ते कळतच नाही. आईबद्दल 
लिहिण्यासाठी शब्द जरी अपुरे नसतील तरी वेळ मात्र अपुरी आहे .(आत्ता तरी )       
        पायात रुतलेला काटा जसा घर करून जसा घर करून जातो तसे मनाला रुतलेला क्षणहि तसाच . पायाच कुरूप कमीत कमी भरून निघत, औषधउपचारांनी बरही होतं पण मनाची ती वेदना अचानक उद्भवली की.......
       त्या दिवशी mathचा तास संपायला उशीर झाला पळतच प्रयोगशाळेत गेले सगळेजण आले होते पण सर् अजून दिसत नव्हते. हायस वाटलं. सगळ्या मुली टेबलाजवळ बसलो. माधुरी कुठाय म्हणेपर्यंत धावत येणाऱ्या बाईसाहेब दिसल्या ''आई गं '' नेहीमिप्रमाणे ठेचाळली. ''लागल नाही ना'' नेहमीची सर्वांची प्रतिक्रिया! बर तरी हिच्या आई आमच्याच शाळेत होत्या!
     ''ये खरच आई किती नकळत येत ना?''इति सारिका.
     ''स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी,'' उमा.
     '' कुणाची आई कितीही वाईट असुदे मुलांसाठी ती सर्वस्व असते,'' मोहिनी.
     ''माझी आई जीवाची सखी,'' वैशाली.
    ''हमारी अम्मी की तो बातही अलग अम्मी की जान है हम,'' शबाना.
    ''माझ्या सर्व समस्यांच समाधान आहे आई,'' मी
    दीपा मात्र तोंड लपून बसलेली. सारीकाने  हलवलं पोरीच्या डोळ्यात पाणी! सगळ्यांच्या नजरा दिपावर खिळल्या. कुणाला अर्थबोध होत नव्हता.नेहमी जिच्या चेहऱ्यावर हास्य विलसत असतं ती दीपा आज रडत होती सर्वजनी आश्चर्याने बघत होत्या. तिने मनसोक्त रडून घेतल चेहरा लालबुंद झाला. हुसमरत ती बोलली ................
    ''मला आईच नाही गं!''