या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Monday 19 December 2016

ती गाव सोडून जाते.....

“बाई ...ओ बाई ...लवकर बाहेर या , चौकात बघा काय गोंधळ चाललाय ?” नंदाबाईच्या हाकेसरशी मी पोळपटावरची चपाती , जिची तवा आ वासून वाट बघत होता , ती तशीच ठेवून बाहेर आले . लेकीला जाताना स्वयंपाक ओट्याकडे बोट दाखवले आणि नंदाबाईच्या मागे निघाले . सकाळची वेळ असल्याने लोकांच्या भानगडी करायला कुणाला अजिबात सवड नव्हतीच . मलाही शाळेत जायची घाई होतीच पण ताई सुट्टीला आली तशी ती मागचे सारे बघे मग थोडी स्वस्थता लाभे . खरं तर इतकच कारण नव्हतं तसं काम सोडून जायला पण काल सखू नंदा आणि माझ्याजवळ जे बोलली ते रात्रभर डोक्यात घुमत होते . त्यात नंदाची हाक आली म्हणजे नक्कीच सखूचे काही कारण होते , मनात घालमेल दाटली आणि तशीच साडीचा घोळही न सोडता नंदाच्या मागे धावले . धापा टाकीत तिथे पोहचलो खऱ्या परंतु सारं पाणी पुलाखालून गेलं होतं .
    आमदारसाहेबांच्या प्रयत्नातून साकार झालेला तो ग्रामपंचायतीच्या आणि सोसायटीच्या पुढ्यात शांतपणे विसावलेला तो सिमेंटचा चौक आज सखूच्या ओरडण्याने काहूर माजल्यागत नाचत होता . फिल्टर पाणी न्यायला आलेली चार दोन टाळकी गमजा बघत उभी होती . सकाळची वेळ म्हणून अजून ग्रामपंचायतीचे टाळे कडीलाच घुटमळत होते . चौकातल्या बंगल्यांची शांत संयमी दारे किलकिली होऊन पुन्हा निर्ढावलेला स्वर आळवीत बंद झाली . एक दोन घरांच्या दारात चार दोन मुंडकी मान हलवीत इकडे तिकडे पाहत राहिली , फक्त पाहतच राहिली . सखूची आर्त किंकाळी इमारतीच्या भिंतींवर आदळून पुन्हा तिच्याच घश्यात शिरू लागली . खताच्या गोणीची कळकटलेली पांढरी पिशवी कपड्यासाहित धुळीत लोळत होती आणि पिशवीची मालकीण नवऱ्याच्या लडखडत्या लाथांनी विव्हळत होती , सिमेंटच्या रस्त्याने सोलवटणारे अंग पुन्हा पुन्हा झाकीत होती . शुद्ध नसलेला नवरा आई बहिणीवरून कान करपवून टाकणारी शिवीगाळ करीत होता . सखुला रोज अवती भवती दिसणारी माणसे दुरूनच या नाट्याचा आस्वाद घेताना दिसत होती . त्यांच्या चेहऱ्यावर बुजत बुजत  झळकणारे ते हसू , नवऱ्याच्या लाथेपेक्षा जास्त रुतत होते काळजात तिच्या . तिचा केविलवाणा चेहरा पाहून मला भडभडून आले . मी आणि नंदाने आहे तसे जावून तिला कवळ घातली . नंदाच्या पाठीत सखूच्या दारुड्या नवऱ्याची लाथ बसली आणि नंदा चवताळलेल्या वाघिणीच्या आवेशात त्याच्यावर धावून गेली . तिच्या हातच्या दोन मुस्कटात खाऊन सखूच्या नवऱ्याचे  लटपटणारे पाय आभाळाकडे वळले आणि तो धडकन धूळ उडवत सिमेंटच्या रस्त्यावर आपटला .
“काय गं सखे , एका झापडीत ते माकड तोंड वर करून पडतंय आन तू त्याचा भर चौकात मार खाती ? तुलाच आक्कल नाही बघ ..आन बसती रडत .” नंदाबाई बोलली खरी पण जळणाऱ्याच्या बुडाच्या यातना त्यालाच कळतात . सखूच्या कुंकावरून ओघळणारी रक्ताची धार नाकाच्या शेंड्यावरून कोसळत मातीत मिसळत होती . आम्हा दोघींचा आधार मिळताच ती सावरून बसली ..डोळ्याचं पाणी तसच ठेवून पदराच्या टोकाने नाकावरची धार पुसू लागली . नंदा आणि मलाही तिची ही अगतिकता पाहून रडू आले . तिच्या कपाळाला चांगलीच खोप पडली होती आणि ती बिचारी खोप तिचा धर्म पाळत खळखळून वाहत पण होती . तिच्याच पदराने तिचे डोके आवळले आणि आधार देत तिला जवळच्या दवाखान्यात नेवू लागलो . शेजारीच बगळ्याच्या रंगाला लाजवील अशा पांढऱ्या शुभ्र कपड्यात गाव तंटामुक्ती अध्यक्ष दात काढीत आमच्याकडे पाहू लागला . त्याला आम्ही करीत आहोत हे त्याचे कर्तव्य आहे याचेही भान नव्हते . हाच पांढरा हत्ती एखाद्या पत्रिकेत नावापुढे ‘ तंटामुक्ती अध्यक्ष’ मोठ्या अक्षरात लिहित असेल ! अर्धवट शिक्षित आणि पैशाचा माज असलेली ही कोडगी जमात ! माझ्या डोक्यात मुंग्या तरातरा करू लागल्या ..
    ग्रामपंचायतीच्या गाळ्यात दुकान मांडून बसलेला तो गावचा एकमेव डॉक्टर , आम्ही सखुला नेऊन बाहेर बाकावर बसवले . मागून तिची लेक भावाला हाताला धरून आणि एका हातात तीच कळकटली पिशवी धरून आमच्या मागे आली . बाहेर पेशंटची चाहूल लागली म्हणून डॉक्टरसाहेब बाहेर आले खरे पण त्यांच्या येण्याने साऱ्या खोलीत आंबट वास हवेत एकरूप झाला . त्याचे तोल जाणारे पाय सांभाळत शेवटी तो खुर्चीत बसला . कदाचित त्याचे हे पहिलेच पेशंट असावे . सखुची जखम तशी खोलच होती . त्यात ठेचलेली असल्याने टाके टाकणे जमणार नाही म्हणून डॉक्टरांनी पट्टी बांधली आणि कसले इंजेक्शन देवून आम्हाला बाहेर काढले . लडखडत आत जाताना तो मला पैशांची आठवण करून द्यायचे मात्र बिलकुल विसरला नाही .
“शाळेत जाताना देऊन जाते !” या हमीवर त्याने पुन्हा आतल्या खोलीचे दार बंद केले . सखूच्या पदराला धरून बारकं पोरगं सारखं तिला हलवत होतं .
“काय झालं पोरा ? का आईला त्रास देतो ?” माझ्या शब्दाबरोबर ते गप्प झालं खरं पण त्याच्या बहिणीला छेडू लागलं . आजूबाजूची मानसं आमची वरात बघून हसत होती .
“बाई , शाळेत नाही जायचे का ? तुम्ही अशी गावकी करीत हिंडल्या तर पोरांना कोण शिकवणार ?” आणखी एक पांढरा हत्ती जाता जाता कुजक्या काटक्या उकरून गेला . मला त्याला उत्तर देणे जमणार नव्हतेच . शाळामास्तर म्हणजे साऱ्या गावाचा नोकर , नोकराची लाचारी माझ्या मेंदूत शिरली आणि उलटं उत्तर देण्याऐवजी मी लाचार हसून उत्तर दिले , “जायचे ना आता असेच , गावकी कसली दादा ? ती शेजारी आहे तर आणली होती दवाखान्यात ..”
“आं , तिचा नवरा का मेला का काय ?” त्याने पुन्हा कुजक्या काटक्या उधळल्या . आता मात्र माझा विवेक मला डिवचत होता , तरी लाचारी मेंदूला वेटोळे घालून बसली होती .
“मेला तरी बरं होईल बिचारीचं , कष्ट करून आणलेलं लेकरांच्या मुखात तरी पडेल , दादा त्याचंच करणं धरण आहे बघा हे . पडलाय चौकात उताणा पिऊन ..तिकडच चाललात तर दिसनच तुम्हाला ..” माझ्या या वाक्यावर तो ‘दादा’ जरा बावरला आणि कसनुसं हसत सरसर पुढे गेला , मान खाली घालून !
“बाई , खरं तर या पांढऱ्या टोप्यावाल्यांना एकदा फोकानी हाणल  पायजे ..यांच्या घोंगड्या गुत्त्यावाल्यांच्या खाली आन आपल्या यांच्या खाली ..मेल्यांना मोडणारं संसार नाय दिसत , त्यांचा मताचा शिक्का दिसतोय बगा ..”
“जाऊ दे नंदा , काही बोलू नको ..एकट्याच्या मुखाने रेटायचा विषय नाही हा ..” पंधरा वर्षाचा गावाचा अनुभव माझ्या तोंडातून बाहेर पडत होता . नंदा तरी कुठे नवीन होती . आमच्या घराला कशाची झळ नव्हती म्हणून आम्ही गप्प होतो . सखुसारखी एखादी भेटली कि मात्र याची तीव्रता मनाला पोखरत राहते .
“सखू , बाई शाळेत जायच्यात तू माझ्या घरी चल , पोरं खात्यान काय तरी आन मग बाई आल्यावर बघू काय करायचं ..” समोरच्याच्या अडचणी ओळखायला शाळा शिकावी लागत नाही , हेच खरे . नाही तर आडाणी नंदा हे बोललीच नसती . हृदय पवित्र असेल तर मनाच्या वेदना कळायला वेळ लागत नाहीच ! मंदिराच्या आत थंडावा बाहेरून नाही येत , तो आताच असतो !
“नको नंदाताई , म्या जाते माहेराला आता सरळ ..फकस्त रोडपातूर सोबत चला तुमी ..” इतकावेळ तोंड लावून गप्प बसलेली सखू कोणालाच अडचण व्हायला तयार नव्हती .
“आये , जेवाय दे ना ..भूक लागली ...” मघाशी गप्प झालेलं पोर आता रडू लागलं . त्या लहान जीवाला आईच्या वेदनांची झळ लागत नव्हती , इतकावेळ पोटात दडवलेली कळ मात्र त्याला आता स्वस्थ बसू देत नव्हती . सखू तशीच खाली बसली आणि रस्त्यावर लेकरांना पोटाशी धरून हंबरडा फोडून रडू लागली . इतकावेळ वळून बघणाऱ्या नजरा ,आमच्या नजरांसहित पाणावल्या . सखुला सावरीत कशीबशी नंदाच्या घरी आणली . नंदाने तिच्या लेकरांच्या पुढ्यात भांडी सरकवली . सखुला खा म्हणाली पण ओठांच्या खाली पाण्याचा घोट बळच तिने ढकलून दिला , ताट बाजूला सारून गुढग्यात डोके खुपसून हमसून हमसून रडू लागली . माझा पाय काही तिथून उचलेना . आकराची शाळेची घंटा जोरात किंचाळत होती , माझ्या मनात मात्र सखुचे हमसून रडणेच घुमत होते . तिच्याजवळून पाय निघत नव्हता . तिने मघाशीच माहेरी जाण्याचा निर्णय सांगितला होता , तसा तिने कालही सांगितला होताच परंतु आमच्या सांगण्याने तिच्या थोड्याफार आशा पल्लवित झालेल्या तिच्या काळ्याभोर डोळ्यात मी बघितल्या होत्या . आता मात्र विझलेले तिचे नेत्र फक्त आणि फक्त वाहत होते . माझा हात तिच्या डोक्यावरून फिरत होता , अनाहूतपणे !
“बाई , तुमचं सारं पटतं हो मला ..म्या कितीबी कष्ट करीन , माह्या लेकरांना शिकवीन . मलाबी कळतंय हिथं छपराच्या सावलीत राहीन , सवताचं घर हाय ..पर म्या आणल्यालं बी ह्यो पोरांचा बाप खाऊ देत नायी ..तुमीच सांगा पोरांच्या पोटात नसल तर शाळा व काय शिकत्यान लेकरं ? सांजसकाळी ह्यो ढोसून येणार ..हाय ते सारं गिळणार आन बदड बदड बदाडणार ..आजूबाजूची मानसं हासून गम्मत बघत्यात ..इदर्यावाणी शिव्या ऐकायला मिळत्यात नव्ह...बदडाया लागल्याव कुणी पुढं हून सोडवीत नाय ..कधी पोरं उपाशीच झोपत्यात ..माहेरात काय वेगळ नाय , तिथंबी कामच कराच पर केल्यालं पोटात जायीन हो बाई ! शाळाच नाय शिकायला मिळाची , पर शिकून बी कुठं प्वाट भरतंय का ? आणि तुमच्याइतुक शिकाय पैका तर पाहिजेन ..तुमी माझं लय केलं , कदी इसर नाय पडायचा पर ह्यो नवरा मरुस्तवर मला हिथं सुकानी खाऊन देचा नाय ...पोरं कळीत झाली कि इयीन पुन्हा ..आता मातुर मला जाया पायजेन ..” तिने माझा तिच्या डोक्यावरून फिरणारा हात ओठांना लावला आणि अश्रूंचा अभिषेक त्यावरू करू लागली . पोरांचं खाऊन झालं होतं . तिने ती मळलेली पिशवी उचलली , एका हाताने झटकली ...बारक्या पोराच्या नाकाचा शेंबूड पदराने पुसला आणि आमच्या पायाला हात लावून रस्त्याला लागली ....माझ्या डोक्यात मुंग्यांनी गर्दी केली , बधीर नजरेने मी तिच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे पाहत होते ....नंदाने हलवले आणि मी सावध झाले . तशीच घराकडे गेले . ग्लासभर पाणी घश्याखाली घातले . शाळेची पर्स उचलली आणि चालू लागले . मागून दीदी हाक मारीत होती , मी हात हलवून तिला आत जायला खुणावले आणि पुढे चालू लागले . पंचायतीसमोर सखूचा नवरा तसाच उताणा पडला होता , लघवी होऊन पायजमा ओला झाला होता . ऊन त्याच्या अंगावर नाचत होते आणि तो ? शाळेची घंटा कधीच झाली होती . मुख्याध्यापक काहीतरी बोलणार हे नक्की होते . आठवीवर पहिला तास होता आज , मुलांना मात्र बरे वाटले असेल ! वर्ग डोक्यावर घेतला असेल , त्यांचे बाप अजून गुत्त्यावर असतील आणि आया रानात पोहचल्या असतील . मुले मोठी होऊन गुत्त्यावर जातील आणि मुली नवऱ्याचा मार खाऊन रानात जातील ...माझ्यासारखे शिक्षक मात्र रोज शिकवतील ......
‘खरा तो एकची धर्म ...जगाला प्रेम अर्पावे ...’

आणि ‘ती’ ? ....ती गाव सोडून निघून जाईल ! 
         डॉ संध्या राम शेलार .

Friday 24 June 2016

उखडलेला मोगरा

“स्वप्ना , ए स्वप्ना ..उठ पाच वाजले !” आईच्या आवाजाबरोबर स्वप्नाची मधुर झोप चाळवली . अजून अंथरुणातून उठण्याची तिची मनिषा बिलकुल नव्हती . पाच दहा मिनिट तर ती नक्कीच पडू शकत होती . शेजारी कावेरी अजून गडद झोपेच्या आधीन होती . पहाटेचा तो थंडावा तसा दोन दिवसांनपासूनच जाणवत होता . मान्सूनच्या पावसाने जरी उशिरा हजेरी लावली होती तरी अगदी मनभरून तो कोसळत गेली चार दिवस सुखावून जात होता . तिच्या नाकात मोगऱ्याचा गंध हलकेच झोपेशी तादात्म्य पावत चालेल्या मनाला झोका देवून गेला . ती खडबडून जागी झाली आणि मुखमार्जन न करताच मळ्याच्या वाटेला लागली . मंद वाऱ्याची झुळूक सर्वांगाला स्पर्श करीत थरथरत गेली . मघापासून उठायला नकार देणारे , चवचवणारे अंग क्षणात मोकळे झाले ; तसं तिची पावले चपळतेने पडू लागली . चार पाच दिवसाच्या वरुणकृपेने पायवाटेच्या दुतर्फा बरेच गवत वाढले होते . नव्या कापडाचा हिरवा रंग जणू साऱ्या चराचराने धारण केला होता . नुकतेच रविराजाने दक्षिणायनात पाऊल टाकले होते म्हणून अजूनही त्याची लवकर उठण्याची सवय काही मोडली नव्हतीच ! आणि म्हणून सहा नव्हते वाजले तरी उजेडाने तमसाला चांगलेच पिदाडून लावले होते . कोवळ्या रूपाने अवतीर्ण होणारी ती हरिततृणे , कॉंग्रेसच्या तृणाचे ते हिरवे कोवळेपण , आघाडा , चीलाचं गवत , कुरमुडी , हरळ , चिकटा , टाकळा सगळ्यांची एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धाच जणू लागली होती . टाकळा मात्र साऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत सर्वत्र माजला होता . कॉंग्रेसच्या गवताची कुरघोडी मोडीत काढायला तो चांगलाच तयार झाला होता . कॉंग्रेसच्या गवताची गम्मत आजीने मागे एकदा सांगितली होती . हे विलायती गवत इतके कसे माजते आणि हा हा म्हणता मोठे कसे होते हेच कळत नाही . मागच्या वेळी आप्पांनी सारा बांध पेटवून दिला तरी राख आहे तोवरच ते पुन्हा उगवून आले . आजी म्हणते , “ती जातच इलायती , माजुरी ..विंग्रजांनीच आणली ती , इलायती गहू आला ..स्वस्तात आला मग काय मायबाप सरकारला हे ....दुवा, पर जशी मानसं सुधरीवली आणि त्यांच्यावर राज्य केलं या गोऱ्या साहेबांनी तसं बघा गहू दिला पर हे माजुरड तण बी दिलं बघा ..आसं माजी आई सांगायची..” तसे आजीला पण थोडेफार गोरे शिपाई आठवतात ,,पण त्या तिच्या बालपणीच्या आठवणी .
    पूर्वी कधीच्या अस्तित्वाच्या खुणा सांगत असलेल्या गुर्‍हाळाच्या विहिरीपर्यंत स्वप्ना आली पण अजून त्या कोवळ्या गवताचे कौतुक तिच्या मनाला बिलगून होतेच . विहिरीचा हौद थोड्या उंचावर असल्याने घरापासूनच तो दिसे , गुर्‍हाळ एका बाजूला मोडक्या छपराच्या खाली आधन ओतायचा हौद , पुढे मोठे चुल्वान , एका बाजूला डोक्याच्या वर जाईल अशी चिमणी वरच्या बाजूची काळवंडली काठ घेऊन उभी होती . बाहेरच्या बाजूने चिमणीच्या विटा आणि मातीचे पोपडे ढासळले होते . चिमणीच्या विरुध्द बाजूला असलेला चोथरीचा ढीग काळपटला होता , तसे आत उकरले तर अजूनही पांढरीतक चोथरी निघत असे . पूर्णपणे उखानलेला ओटा किती आत्मीयतेने स्वप्ना आणि कावेरीच्या मदतीने आईने सारवला होता . आजोबांच्या काळात गुऱ्हाळ बारा महिने चालू राही पण आता स्वप्नाच्या जन्माच्या वेळेपासून फक्त हिवाळ्याचे चार महिने खिर्चलाचा पट्टा चालू होई . ते चार महिने मानाने मिरवणारी भली दांडगी कढई ..एक हौद भरून रस त्यात मावायचा , हात्या , बादल्या , फावडा , झार्या , हागरं टाकायचं बारीक पत्र्याचं हौद ..सारं सारं चोथरीच्या खाली लपायचं . तिथून जाताना स्वप्नाच्या नाकात गुळाचा तो गोड वास शिरला आणि कढई उतरते आहे असा आवाज तिच्या कानात घुमू लागला , ‘धरली का ? सावध , कुंडली गवरदे हरी विठ्ठल , माउली श्री ज्ञानदेव तुकाराम.....पंढरीनाथ महाराज कि जय !’ या जयघोषाबरोबर इंजिनाच्या जवळचा लिंब थरथरल्याचा भास तिला झाला आणि विहिरीच्या कडेने ती पाटातचालू लागली . आता दोन चिंच , मेहंदीचे आत्याने लावलेले झुडूप , जांभळ आणि कवठ पार केली . पाटात जरी पाणी नव्हते खेळले तरी चिखल पायाला लागत होता , काळ संध्याकाळी झालेल्या पावसाचा तो प्रसाद होता . उंच गेलेल्या पिंपळाच्या खाली छोटे खुरुटले मोगऱ्याचे तेच झुडूप तिला उठल्यापासून साद घालीत होते .शुभ्र गोदडी पांघरून जणू ते झुडूप अजूनही निद्रेच्या आधीनच आहे असाच भास झाला तिला ..तीही असेच आप्पांच्या सफेद जुनेर धोतरापासून आजीने केलेली ती शुभ्र मऊ गोदडी बाजूला सारून आली होती . तिने लगबगीने फुले तोडायला सुरुवात केली . ओढणीत एक झोळी केली आणि त्यात तिची मोगऱ्याची सुगंधी रास विसावू लागली , जणू तीही तिची वाटच पहात होती .काल संध्याकाळी मळ्यात जाताना तिने एकमेकींच्या गळ्यात गळे घालून बसलेल्या त्या पाकळ्या कळी म्हणून मिरवताना पाहिल्या होत्या . त्याच पाकळ्या रात्रभर एकमेकींच्यातून उसवून एक सुंदर टपोरं , सुगंधित मोगऱ्याचं फुल झाल्या होत्या . उसवाताना किती वेदना झाल्या असतील न त्यांना ? पण हे फुललेलं त्याचं रूप कष्टातून , वेदनेतून साकारलेलं अद्वितीय रूप आहे ! हे दवबिंदू अशा असंख्य अक्रोशांचे तर अश्रू नसतील ?पण आक्रोशाने इतके विलोभनीय सौंदर्य निर्मित होत असेल तर तोही सृजनाचाच आक्रोश नाही का ? रात्रीतून या तारकांच्या शुभ्रराशी या छोट्याशा झुडुपावर अवतीर्ण इतक्या सहजतेने थोड्याच होतील ? त्या उत्तेजनकारक विचाराने अन सुवासाने ती क्षणभर दिग्मूढ झाली , एक सुगंधित लहर तिला रोमरोमात फुलवून गेली ..काही आठव मन:पटलावर उमटले आणि स्वप्नाच्या पावलांनी लज्जित नजरेने परतीचा मार्ग धरला . स्वतःला आवरत ..सावरत ती चालत होती . या मेहंदीने तर नसेल माझे मन ओळखले या विचारांनीच ती अर्धमेली झाली आणि त्या आठवांना बाजूला करण्याच्या प्रयत्नात घाईने पळूच लागली !
“स्वप्नाताई , किती गं चांगली आहेस माझी ताई ..उम्म्ह्ह...”म्हणत कावेरीने तिच्या हातातला एक गजरा काढून घेतला आणि तिला वेळावत निघून पण गेली .
“खरोखरची काऊ आहेस तू , आयितखाऊ काऊ ..” स्वप्नाने तिच्यासाठीही गजरा बनवला होताच , तशी ती रोज बनवे देखील पण कावेरी तिच्या लांबलचक , दाट गजर्‍यासाठीच हव्यास धरे आणि चलाखी करून तोच गजरा पदरात पाडून पण घेई . थोडावेळ स्वप्ना चरफडे पण थोडाच वेळ मग काऊच्या केंसात हेलकावणारा तोच गजरा पाहून तिचेही मन प्रसन्न होई ! लहान भावंडासाठी ताई हीही एक आईच तर असते !
   आज साऊ , रूपाताई , विनिता साऱ्या लवकर रस्त्याला लागल्या . कावेरी पण जाऊन त्यांना मिसळली . स्वप्ना मात्र थोडी मागे राहिली . ही घरून निघेपर्यंत बाकीच्या मुलींनी ओढा गाठला होता . खरे तर रोज स्वप्ना उशीर करेच आणि धावत जाऊन त्यांना सामील होई , पण आज तिच्या मनाने पावलांशी आणि उत्साहासोबत काडीमोड घेतली होती जणू . पुढे जाणाऱ्या बहिणी दिसत होत्या पण त्यांना जाऊन गाठण्याची उमेद मात्र मनात उमटत नव्हती . वस्तीपासून मोरवाडी फाटा अर्धा किलोमीटरवर होता . जरी तो राज्यमार्ग होता आणि त्याच रस्त्याने एस टी येई पण ती काही मधे अधे थांबत नसे . गावातून सुटली कि फाट्यावर तेही गर्दी नसेल तर ! म्हणून या मुलींना लवकर जाऊन बराच वेळ फाट्यावर थांबावे लागे . आधी सापडेल त्या वाहनाने जात साऱ्या पोरी पण एक वर्षापासून एस टी ने मुलींसाठी पास फुकट केला होता . एखादी छोटी योजना ग्रामीण स्रीसाठी शिक्षणाची कवाडे खुली करू शकते याची प्रचीती या योजनेने वर्षभरातच दिली होती . कारण ज्या गावातल्या मुली स्वप्नाच्या वर्गातल्या, खर्चामुळे पुढचे शिक्षण बंद करणार होत्या त्या साऱ्या आता शाळेत येत होत्या . कारण फी माफ आणि आता जाण्यायेण्यासाठी लागणारा खर्चही पास फ्री झाल्याने कमी झाला होता .
  स्वप्नाच्या बहिणी आता मागे वळून पाहत होत्या , पिंपळ आला लिमकर वस्तीचा तरी अजून ती ओढ्यापर्यंत पण आली नव्हती . कावेरीला वाटले उगीच ताईचा गजरा घेतला , कदाचित म्हणून तर ती रागावली नसेल ना ? पण स्वप्ना आज वेगळ्याच विचारांत होती ! आता ती आणि साऊ अकरावीला गेल्या होत्या . कॉलेज आणि भोवतीचे ते बदललेले वातावरण , त्यात सामावून जाने किती कष्टप्रद असते . आधीच्या कन्याशाळेजवळच होते जुनिअर कॉलेज , पण तरी आता शिक्षक , सहअध्यायी सारेच बदलले होतेच त्यात बर्याच मुली आधीच्या मैत्रिणी असल्या तरी बऱ्याच नवीनसुद्धा होत्या . आजूबाजूच्या गावांहून आलेले बरेच नवीन विद्यार्थी पण होते ,आणि त्यात भरीस भर मुलेही आता त्यांची सहअध्यायी होती ! एक वेगळाच नवखेपणा सर्वत्र भरला होता . तो हवासाच वाटत होता सर्वांनाच , कुणी निडरपणे कबूल करे तर कुणी मैत्रीण ते लपवून शहाजूकपणाचा आव आणे ..स्वप्ना बहुतेक दुसऱ्या गटात मोडत होती . पण शहाजूकपण नव्हते तिच्या वागण्यात तर एक भीती होती ..एक अनामिक भीती जी तिच्या सभोवतालच्या वातावरणाने मनात पेरली होती !
     ओढ्याजवळच्या गिरिणीच्या आवाजाने ती भानावर आली , अवतीभोवती पाहत अंग चोरून घेत उगीच बावरली ..काय पण विचार करते मी ! म्हणत अंगभर पसरलेला रोमांच लपविण्याचा खुळा प्रयत्न ती करीत राहिली . बरं झालं साऊ आणि बाकीच्या नाहीत इथे ...पण आई म्हणते मुलीचे शील काचेचे भांडे ! एकदा तडकले तरी पुन्हा नाही वापरता येत ..का ? मुलाचे असे का नसेल ? विक्रमदादाने तर किती दिवस त्या संगीला फिरवले आणि आता सुंदर अशी विभावहिनी त्याला मिळाली ! मग कुठे काय नुकसान झाले त्याचे ? जाऊ दे , नकोच हे विचार पण ..आपल्याला शिकायला पाहिजे, मोठे व्हायला पाहिजे ..किती मोठे नाव होते शिकून ! आपली ओळख सारा समाज मनात ठेवतो आणि स्वतःची कमाई वरून म्हणजे सारखे कुणावर अवलंबून नकोच राहायला . बाबा पण नाही का म्हणायचे , पोरींनो पोहायला शिका ..जरी एखादीच्या नशिबाने वाईट नवरा मिळाला , दिले ढकलून विहिरीत तरी जीव जगवता यायला हवा ..असेही जरी नाही मारले तरी स्वतःची उपजीविका करून तरी स्वतःचा जीव जगवायला हवाच ना ? नाहीतर जावे लागेल रानात खुरपे घेऊन , आईसारखे आणि काकीसारखे !
   इतकावेळ तरुण्यासुलभ भावनांनी ओतप्रोत स्वप्नाचे हृदय , शिक्षण आणि आईजवळ थांबले आणि पावलांचा वेग वाढला . स्वतःच्या विचारांना दुषणे देत ती झपझप चालत मुलींच्या घोळक्यात मिसळली पण मनाने अलिप्तच राहिली . फाट्यावर एक भला मोठा पिंपळ अनेक वर्षांपासून तटस्थ उभा होता . एका तिकोनावर उभा तो वृद्ध वृक्ष सहजतेने दोन माणसे सामावतील असा बुंधा असलेला त्या परिसरातील एकमेव वृक्ष होता . पिंपळपान पहायचे असेल तर आभाळाकडेच नजर फिरवावी लागे . निळ्याभोर पृष्ठावर ती विलोभनीय पोपटी पाने पाहणाऱ्याच्या डोळ्यांना शीतल सौख्य प्रदान करीत असत , वर्षानुवर्षे ! त्याची वाऱ्याच्या झोताने पडलेली पाने या साऱ्या शाळकरी मुलींच्या कौतुकाचा विषय बनत ..अशा कितीतरी पानांची जाळीदार पाने या विद्यार्थ्यांच्या पुस्तकातून तयार होत असत . कालौघात ती हरवून जात आणि पुन्हा नव्याने या मुलांच्या पुस्तकाचा आधार घेत तयार होत . थोडे पांढरट तपकिरी बुंधा दोन माणसांच्या पण कवळीत बसणार नाही इतका मोठा होता , त्याची पोपडा होऊन निघणारे सालीचे तुकडे काढले कि आत लोण्याला लाजवील असा बुंधा दिसे ..मऊ मऊ बुंधा , त्यावर बोटे फिरवताना मोरपंखाचा भास होई ! थोडे वर गेले बुंधा दोन फांद्यात विभागला गेला होता आणि तो इंग्रजी वाय चा आभास देई , त्याच्या लागुनच एक खोबण होती , जणू त्यातला डोळा काढून नेलाय कुणी ! त्या वृक्षाबद्दल अनेक दंतकथा त्या परिसरात ऐकायला मिळत आणि त्यात एक अशी होती कि , एक नाग नागिणीचे कुटुंब त्याच्या वरच्या खोबणीत, वर्षानुवर्षे आहे . त्याला कुणी डिवचले तर तो माणूस मरे ! स्वप्नाला ते आठवले त्या अश्वत्थ वृक्षाकडे पाहताना आणि तिच्या नखशिखांत थरार जाणवला तिला . ती आणि तिच्या या बहिणी कधीच त्याच्या सावलीला उभ्या राहत नसत . तिथेच शेजारी दहा पावलांवर एक कडूलिंबाचे , पिंपळाइतके मोठे नाही पण भरगच्च सावली देणारे ते झाड यांना जास्त प्रिय होते . तिथेच दगड मांडून त्या बसत लाल पिवळ्या एस टी ची वाट पाहत . परीक्षेच्या काळात तर पुस्तक वाचून जमिनीवर त्याची उजळणी करायला याच्या त्या नाजूक काड्यांचा बराच उपयोग होई , कारण तासभर तरी एस टी ची वाट या मुलींना रोज पहावी लागेच . कधी त्याच्या जखमातून निघणारा डिंक या पोरी कण कण साठवून ठेवत . स्वप्ना मात्र असं डिंक तिच्या नजरेला पडले कि लगेच तोंडात टाके . त्याची ती कडवट चव तिला भारी प्रिय होती , त्याचे दाट चिकटवून ठेवणे आणि प्रयासाने त्यांचे विलग होणे , हा खेळ साऱ्याच मुलांचा प्रिय खेळ पण स्वप्नाला त्याची चवच भारी वाटे . असं डिंक दिसले कि तिचे डोळेच चकाकत ! आज मुलींच्या कुठल्याच संभाषणात ती मनाने नव्हतीच . तेव्हढ्यास तेव्हढे उत्तर देऊन ती तिच्याच मनोभूमीत पुन्हा पुन्हा जात होती .
“ताई , गजरा घेतला म्हणून रागावलीस का गं ? तसं असेल तर नको तुझा गजरा मला ..” कावेरी नाटकी रुस्क्या स्वरात बोलली . तशा साऱ्या पोरी हसू लागल्या . स्वप्ना फक्त तिच्या केसांवरून हात फिरवत हसली .
  विचारांत तल्लीन स्वप्ना आज जास्तच मोहक दिसत होती . तो ड्रेसचा फिकट गुलाबी रंग तिला तिला खुलवत तर होताच पण लांब बाह्यांचा ब्लाउज आणि झिरमिळ्यांची ती कॉलर तिला जास्त मोहक करीत होती,भरीस भर म्हणून ती काही आठवून मनाशीच मधाळ हसत होती ..लाजेचे ते इंद्रधनू पाहून साऊ तिला म्हणालीही पण तिने लज्जित हास्याने तिच्याकडे पाहिले . साऊला मग अधिकच चेव आला आणि ती तिला छेडू लागली . इतक्यात ओढ्याच्या वर चढलेले ते एस टी चे लाल पिवळे धडधडणारे धड पाहून रूपाताईने साऱ्यांना इशारा केला आणि साऱ्या पोरी रस्त्याच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या . मोरवाडीच्या पोरापोरींचा गलकापण त्यात विलीन झाला . कुणीतरी एक उगीच स्वप्नाला खेटून वर चढला तशी स्वप्ना थरथरली आणि मागे झाली , रूपाताईच्या मागे अंग चोरून उभी राहिली आणि भेदरल्या नजरेने दाराकडे पाहू लागली . तसं ते पोरगं जास्तच चेकाळलं आणि दाट विचकावत तिच्याकडे पाहू लागलं ..त्याच्या तोंडातून कसलीतरी घाणेरडी लाळ गळतेय असेच वाटले स्वप्नाला जरावेळ ...मग तिने नजर फिरवली आणि रूपाताईला हलक्या आवाजात तक्रार करू लागली .
“स्वप्ना आपणच नाही पाहिले कोण पाहतेय तर थोडीच दिसणार आपल्याला असले किळसवाणे लोक ..तू नको बघूस ..असेही हत्तीने श्वानाचे भुंकणे नजरेआड करावे नेहमी !” रूपाताईच्या या समंजस समजावण्याने स्वप्नाच्या मनातील वादळ पळभरात शमले .आणि त्या गर्दीत ती एस टी त चढली , रूपाताईच्या मागोमाग !
   सकाळच्या गाडीला बसायला जागा मिळणे अशक्यप्रायच असे ,फक्त आत शिरायला मिळाले तरी धन्यता वाटे साऱ्यांनाच , कारण हा तालुक्याला जाताना शेवटचा थांबा ..बऱ्याचदा या मुलींना ओळखीचे ड्रायव्हरकाका असतील तर पुढच्या केबीनमध्ये बसायला जागा देत . स्वप्ना पाठीची ब्याग सावरीत आणि हातातले जरनल घट्ट पकडून एका हाताने शीटचा आधार घेत उभी होती तिच्याच बहिणी तिच्या आजूबाजूला होत्या . ती उभी असलेल्या शीटवर मात्र मुलेच बसली होती . या मुलींची अशी अवघडलेली अवस्था पाहून एकालाही वाटले नाही उभे राहून जागा द्यावी म्हणून ..आणि चुकून कधी असा अनोळखी तरुण पोरगा जागा देऊ लागला तरी रूपाताईचा स्पष्ट मेसेज होता कि बसायचे नाही ! तसं रूपाताईचे सांगणे या साऱ्याजणी ऐकायच्याच ! तसे पाहता या पुढेमागे , वरखाली उडणाऱ्या डब्यात स्वतःचे तटस्थ अस्तित्व शेवटपर्यंत टिकवून धरणे अशक्यच होते , मग कुणाचा कुणाला धक्का लागणे ठरलेले असे . तेंव्हा होणारी नजरानजर अपरिहार्य होती . अशा अनेक कडू आंबट ..गोड नाहीच ..प्रसंगाच्या प्रवासातून सुटका व्हायला दहा मिनिट तरी ठरलेले होते . एसटी च्या त्या दोन हाताच्या दारातून बाहेर पडणे म्हणजे एक दिव्यच असे , भराभर एकमेकांना घाईने किंवा मुद्दामहून एकमेकांना धक्का देत बाहेर पडणारे ते विद्यार्थी कोंडवाड्यातल्या मेंढरांसारखे बाहेर पडत . कधी एकमेकांना ढकलत तर कधी अलगद तरंगत बाहेरचे मोकळे आकाश प्राप्त होई !
   गर्दीतून बाहेर पडताना मात्र साऱ्या सख्या अलग होत आणि साऱ्या खाली येईपर्यंत आलेल्या त्यांची वाट पाहत बाजूला थांबत . स्वप्ना आज आधी उतरली , मघाशी लगट करणारं ते पोरगं जवळून काहीतरी बोलत जातंय असं वाटलं तिला पण तिने अजिबात त्याकडे दुर्लक्ष केले आणि खरोखर रूपाताईचा फोर्मुला काम करून गेला . खरंच किती सोपे असते एखाद्या ओंगळवाण्या कृतीला मात देणे ....प्रतिक्रिया न देऊनच समोरच्याची हार निश्चित करतो आपणच ! भरभर साऊ ,रूपाताई ,कावेरी आणि विनिता तिच्याभोवती गोळा झाल्या . थांब्यापासून कॉलेजचे पायी अंतर पाच मिनिटाचे , त्यात बाकीच्या गावांच्या एसटी आल्या असल्या कि त्याही मैत्रिणी सामील होत चालताना ...कावेरी आज स्वप्नाच्या सोबत चालत होती .
“ताई , ती पाण्याची टाकी किती गं उंच आहे , मला तर बाई भीतीच वाटते तिची ..वरून सारं गाव दिसत असेल नाही ..पण वर गेल्यावर भीती पण किती वाटत असेल गं ..” कावेरी रोज सभोवती नजर फिरवत चाले आणि सारा वृतांत कथन करीत पाऊल टाकत राही ..आज कशी कुणास ठाऊक ती पाण्याची टाकी मान वर करून पाहत होती .
“काऊ , अगं एक वर्ष झालं , त्या टाकीवरून एका प्रेमीयुगुलाने उडी मारून जीव दिला होता ..आहे ना ध्यानात ?” विनिता तिला आठवण करून देऊ लागली .
“हो गं , कसं त्यांना हे जीवन संपवावं असं वाटलं असेल गं ...नुकताच पालवलेला शेंडा असा हाताने खुडणे , कसे गं जमत असेल यांना ?” कावेरीचा कातर आवाज तिच्या काळजात चिरत शिरतोय असेच वाटले स्वप्नाला ..
“काऊ पुरे आता , बाकीचा अंक घरी गेल्यावर वाच ..” रूपाताईने इकडे तिकडे पाहत साऱ्यांनाच दटावले ..भरभर त्यांची पावले कॉलेजच्या दिशेने पडू लागली .
   जवळच्या मुली आधी येऊन मागची बेंच पकडत बसायला . उशिरा येणाऱ्यांना नाईलाजाने पुढच्या बेंचवर बसावे लागे आणि साऊ आणि स्वप्नाला तर रोजच उशीर होई ..एसटीच्या दिरंगाईमुळे ! आज स्वप्नाला नाईलाजाने पहिल्या बेंचवर कडेच्या बाजूला बसावे लागले . तिथे बसने कुठल्याच मुलीला आवडत नसे ..एक तर प्रत्येक शिक्षक तिथेच बघून शिकवत आणि जराही नजर इकडे तिकडे फिरवणे अशक्य होई ..आणि त्यात कहर असा कि शेजारी लागुनच मुलांची रांग असे ! आज पहिलाच तास लिहून देणाऱ्या सरांचा , बसायला आवराआवरी करेपर्यंतच सर हजर झाले आणि स्वप्नाची एकच  धांदल उडाली . तिने घाईने वही काढून लिहायला सुरुवात केली . कानात साठवत गेलेले शब्द लेखणीतून वहीवर उतरू लागले , काही शब्द अलगदपणे हवेत विरूनही जाऊ लागले . तसे ती जास्तच कण देऊन ऐकू लागली . लेखणी चपळतेने धावू लागली . या कर्ण आणि कराच्या स्पर्धेत तिचे पेन गळून खाली पडले , पदकमलांच्या आश्रयाला जाऊन ! ती ते पेन घ्यायला झुकली आणि ....ती नजर तिच्या आरपार शिरतेय असाच आभास तिच्या सर्वांगाला झाला ...पळभरापूर्वी स्थिर असलेले तिचे मन एका कटाक्षाने सैरभैर झाले . मघाशी सरांच्या शब्दांशी स्पर्धा करणारी लेखणी त्राण संपलेल्या जिवासारखी धडपडू लागली ..आता अनेक शब्द हवेतच विरून जाऊ लागले . रूपाताईचे बोलणे आठवले आणि तिच्या मनातील काहूर थोडे स्थिरावू लागले ..तिच्या मनाने त्या अक्षांचा चेहरा पहायचे ठरवले आणि लिहिताना आपसूक नजर तिकडे फिरली ..ते डोळेही तिलाच पाहत होते ..मघाच्या फाट्यावरच्या नजरेतले ते लाळघोटेपण नव्हतेच ते ..एक वेगळीच सौम्यता होती तिच्यात ..मनाला भुलवणारी शीतलता ...कोवळ्या तृणाला हिरवाईने दिलेली सौम्यता ... मोगऱ्याच्या गंधाने नासिकारंध्रातून शिरून मनाला मारलेल्या मिठीतली शीतलता ...थंडगार झुळकेने क्षणात मलीन तनाला उत्तेजित करणारी ती शीतलता ! रूपाताई ओंगळवाण्या कृतीला प्रतिक्रिया द्यायची नसते , पण मग या हव्याशा क्रियेला काय प्रतिक्रिया द्यायची गं ? खरंच सांगशील तू कि फटकारशील मला दुषणे देवून ? या भावनेला लाजेच्या , भीतीच्या पांघरुणाखाली असेच झाकून ठेवायचे का ? हे विचार मात्र स्वप्नाने माशी झटकावी असे झटकून टाकले !
   दिवसाच्या अखेरपर्यंत तिचा त्या डोळ्यांचा चेहरा मनात साठवायचा राहूनच गेला . नजरेत गुंतलेली नजर हटविण्यात तिचा क्षण संपत राहिला आणि एक गोड हुरहूर तनमनाला घेरून भिरभिरत राहिली ..तिच्याच भोवती ! कॉलेज सुटूनही तिची लागलेली तंद्री सुटत नव्हती . ती तशीच तिला घेऊन घरी आली , रोजचा दिनसमाप्तीला अंग वेढून टाकणारा थकवा आज पंख लावून उडून गेला होता . येऊन खायचे पण भान नव्हते तिला , तशीच थंडगार पाण्याचा शिडकावा चेहऱ्याला देऊन ती मोगऱ्याच्या कळ्या पाहायला धावत सुटली . आजपर्यंत मिटलेल्या पाकळ्यांच्या त्या कळ्यांचं कसलच कौतुक तिला नव्हतं , पण उमललेल्या या फुलाला आज कळीची ओढ लागली होती ..भूतकाळ उकरून आठवण्याची हौस माणसालाच असते नाही ! विहिरीपर्यंत जाऊपर्यंत तिला चांगलाच दम लागला ..चिंच , जांभूळ , मेहंदी , कवठ आणि हा आला पिंपळ ...पिंपळाच्या बुंध्याला विसावलेलं ते मोगऱ्याचं ..हे पहा झुडूप ..झुडूप ...झुडूप ...सकाळी तर इथंच होतं ? ? ?
“आई , ते ते झुडूप ..मोगरा ..” तिचा कातर आवाज आणि डोळ्यात गोठलेला बर्फ पाहायला कुणालाच वेळ नव्हता .
“काय बोलतेय स्वप्ना ..काय झालं तुला ..थांब जरा वेळाने बोलू . ती काकी तिथे रडून रडून दमली , काही खाल्लं नाही सकाळपासून , जा पाणी घेऊन जा . बरं झालं बाई ताईसाहेब आल्या नाहीतर तिला बघू का काम बघू हेच कळल नसतं बघ मला ..” आईच्या बोलण्याचा काहीच अर्थबोध होत नव्हता तिला . हातात दिलेला तांब्या तिने काकीच्या खोलीत नेवून ठेवला ..तसे हुस्मरणारे काकीचे शब्द तिच्या कानावर पडले , काकी आत्याच्या गळ्यात पडून रडून रडून सांगत होती .
“ताईसाहेब माझ्या बहिणीची एकुलती एक पोर होती हो ती , आपल्या स्वप्नाच्या तर वयाची ..कशी हो गेली ..त्या रांडामेल्यांचा कसा जीव झाला असेल तिला मारायचा ..सख्खा बाप लेकराच्या जीवावर उठला हो ..ताई आरडत होती बाहेरून पण कुणी कुणी नाही ऐकलं ..कवळी कळी उमलायच्या आधीच चिरडून टाकली या भुतांनी ..ताईसाहेब ..”
स्वप्नाच्या डोळ्यावरची तंद्री खाडकन उघडली ..उत्कर्षाला काकांनी मारली , जीवे मारली ..का ? त्यांचा तर किती जीव होता ..तिने सांगावे आणि त्यांनी द्यावे ..मला कावेरीला तिच्यासारखी एक पण वस्तू , कपडे मिळत नसत . शाळेत हुशार म्हणून होस्टेलला ठेवली होती ...मग काय झालं असेल ?
“ताई ,इकडे ये ना ..”म्हणून कावेरीने तिला ओढतच मागच्या अंगणात नेले . तिचा तो खुसफुस आवाज तिला उमजत नव्हता . ती कान देऊन ऐकण्याचा अट्टहास करीत होती पण तो काही स्वप्नाच्या मेंदूला भिडत नव्हता . ..त्यांना असे मागे जाताना पाहून आप्पांनी हाक दिली .
“ताई , काऊ अंधार झालाय आता थांबा , पोरीच्या जातीने दिवस मावळला कि घरात बसावं ..” तशा दोघी आत आल्या आणि आईला मदत करू लागल्या .
“वहिनी , कसा हो जीव धजला असेल त्यांचा ..घरात लेकराचा जीव घ्यायला ..” आत्या भाकरी करणाऱ्या आईला विचारात होती . आईने पोरींकडे नजर टाकत आत्याला गप्प केले .
“जा पोरींनो , अभ्यास करा ..भाकरी झाल्या कि बोलावीन जेवायला ..” आईने जवळजवळ ढकलूनच लावले कावेरीला . तशी धुसफुसत ती त्यांच्या खोलीत आली , स्वप्ना आधीच आली होती . दोघींनी डोळ्यापुढे पुस्तके धरली पण मन त्यात रमत नव्हते ..स्वप्नाच्या मनात विचारांची शृंखलाच तयार होत होती . उखडलेला मोगरा ...मेलेली उत्कर्षा ...
“ताई , तुला माहितय का ? अगं उत्कर्षा एका महाराच्या पोरासोबत पळून गेली होती ..आठ दिवसांनी पुण्याला एका झोपडपट्टीत सापडली दोघं ..त्याला मरोस्तोवर मारला आणि हिला उचलून आणली घरी ..काल रात्री काकांनी आणि आजीने गळा आवळून मारली तिला .” कावेरीने तिला कळलेली माहितीत स्वप्नाला पुरवली . विस्मयाने स्वप्ना काहीवेळ तिच्याकडेच पाहत राहिली ..
“तुला कुणी सांगितले ? काहीपण वावड्या नको उडवू ..” डोळ्यांनी दटावत ती कावेरीला बोलली खरी पण तिच्याही मनाला उत्कर्षाचे जाने काही केल्या पटत नव्हते ..काही विचीत्राचा वास तिला कधीचा घरभर पसरलेला जाणवत होताच ..
इतक्यात आईची हाक आली आणि दोघी जेवायला गेल्या ..घश्यात घुटमळत असलेला घास प्रत्येकजण बळेच घशाखाली उतरवत होता . काकीचे हुस्मरने अजूनही चालूच होते ..तसे आप्पा कडाडले .
“पुरे आता , कुळबुडव्यांना अशीच शिक्षा असते ..खानदानी मराठ्याने केले असते तेच साडूने केले .त्याच्या जागी मी पण तेच केलं असतं . म्हणून आता बास झालं रडणं , तुम्ही जगा बाकीच्यांना पण जगू द्या ...जेवा आता ..विखारी वेळ मुळासकट उपटायची असती ..” आप्पांनी घास तोंडात घातला . काकीचे हुस्मरने पळभरात शांत झाले . मघापासून फडफडणारा देव्हाऱ्यातला दिवा दार लोटून घेताच मंद जळत रहावा , तशीच भासली काकी स्वप्नाला !
  विचारांच्या एकमेकीत गुंतलेल्या कड्या उराशी घेवून स्वप्नाला झोपेचा थांग लागत नव्हता . कावेरी मात्र कधीच निद्रिस्त झाली होती ..बर्याच कालाने तिची नजर अंधाराच्या आधीन झाली .
  मोगऱ्याची कळी ...उखडलेलं मोगऱ्याचं झुडूप ....रडणारी काकी ...मोगऱ्याचं फुल ...ते शीतल डोळे ...मराठा ...कुळबुडवी उत्कर्षा ...मेलेली उत्कर्षा ........
घामाघूम झालेली स्वप्ना ताडकन उठून बसली ..पांढरी शुभ्र गोदडी तिने बाजूला केली . आणि हलकेच ओढणीने घाम पुसत ती उठून उभी राहिली . पांघरुणाची घडी करून तिने पायथ्याला ठेवली . कावेरी अजून झोपलेली होती ..मुखमार्जन न करताच ती मळ्याच्या वाटेकडे धावली .. ओटा ओलांडायच्या आधीच आईने हाक मारली ..
“स्वप्ना , नको जाऊ .कालच मोगरा उपटून काढला आप्पांनी ..रानात अडचण करतो म्हणून !” तशी स्वप्ना पाणावल्या डोळ्यांनी आईकडे बघू लागली . आईचे पण डोळे पाणावले ...
ती एकटक मळ्याकडे पहात राहिली ..नकोच तो डोळ्यांचा चेहरा बघायला ...त्याची जात वेगळी असली तर ?

               डॉ संध्या राम शेलार . 

Tuesday 3 May 2016

जात

प्रत्येक वेळी समाजाने एक समाज खलनायक म्हणून उभा केलाय . कधी ब्राह्मण , कधी मुस्लीम , कधी इंग्रज ...असे कितीतरी ! एखादा समाज खरंच इतका क्रूरकर्मा असतो का ? असेल तर का ? आणि ज्या एका काळात त्या त्या समाजाचे वर्चस्व कायम होते म्हणजे थोडक्यात तो सत्ताधीश राहिला त्या समाजातील साऱ्याच लोकांनी अन्यायाचा पाठपुरावा केला का ? जर ठराविक कट्टर असा वर्ग त्यात असेल तर काही प्रमाणात त्याच जातीतील सामान्य जीवन जगणारे लोकही त्यात होतेच ...हे वास्तव आहे . मग या वर्चस्व असलेल्या सामान्य वर्गाचा इतर समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय होता ? हा विचार कधीच कुणी करताना दिसत नाही .सरसकट त्या साऱ्या लोकांना एकाचा पारड्यात तोलले जाते आणि मग १०० मधील १० सत्ताधीश लोक अन्यायकारक आहेत मग बाकीचे ९० पण त्यात अक्षरशः भरडले जातात . प्रत्येक मनुष्यात एक वर्चस्ववादी मनीषा दडलेली असते . अगदी एखादा भिकारी सुद्धा जवळ बसलेल्या कुत्र्याकडे तुच्छतेने पाहताना दिसतो , असे का व्हावे ? भिकारी तर ना जातीने मोठा असतो ना पैशाने , तरीही तो त्याचे यत्किंचित अस्तित्व त्याच्यापेक्षा दुर्बल घटकावर वर्चस्व दाखवून तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो . हि वर्चस्वाची भावना प्रत्येक जीवात सुप्त किंवा प्रकट अवस्थेत आपण चहुबाजूला अनुभवतो . मग जे आपल्याही आत आहे ते न पाहता आपण खुशाल समोरच्या माणसाच्यातील तीच भावना ठळक करण्याचा प्रयत्न का करीत असतो ?  'आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट' हि म्हण जी सारखी कुणाच्या न कुणाच्या तोंडी असते किती सार्थ आहे .
       हे विचार मनात येण्याचे कारण , नागराज मंजुळे यांचा सैराट सिनेमा ! मी तो अजून पहिला नाही ! पण सोशल मिडीयावर फिरणाऱ्या बऱ्या वाईट पोस्ट वाचून उगीच एक  मराठा समाजाबद्दल लोकांच्या मनात असलेली तेढ चव्हाट्यावर आली आहे . मी जरी मराठा आहे तरी मला आमच्या समाजात खोलवर रुजलेल्या सरंजामशाही विचारांची खूप चीड आहे . पण म्हणून मी पूर्ण समाज धारेवर नाहीच धरू शकत . कारण त्यात ज्या  बाकीच्या चांगल्या सर्वसमावेशक वृत्ती आहेत मला नाही वाटत इतर कुठल्या वर्गात असतील . दोष , गुण हे सर्वच समाजाचा अविभाज्य भाग आहेत . त्याची तुलना चांगले वाईट या तराजूत व्हावी न कि हि जात ती जात अशी . याने फक्त जातीयवाद अधिक ठळक होत जातो आणि समाजमनावर बिंबवला पण जातो . मग इथे राजांचा , आंबेडकरांचा , फुलेंचा अपमान झाला आपण निषेध केला पाहिजे ..म्हणत ठराविक जात पुढे येणार नाही . कारण या सर्व महामानवांचे कार्य सर्व समाजासाठी होते ..प्रत्येक घटकाने या निषेधाचा भाग बनले तर आपोआप जात लयाला जाणार आहे . तिला रंगवून ती अधिक भडक करण्यापेक्षा त्या वृत्ती रंगवायला हव्यात . ते दोष रंगवायला हवेत . आणि याची खबरदारी प्रत्येक माणसाने घ्यावी ,तरच एक सर्वसंध राष्ट्र उदयाला येऊ शकते . नाहीतर या महामानवांनी ज्या सुदृढ समाजाचे स्वप्न पाहत  आयुष्य खर्ची घातले त्यांचे बलिदान व्यर्थ आहे .
                  डॉ संध्या राम शेलार .
हे सांगण्याचे कारण सैराट मध्ये पाटलांचे दुष्कृत्य दाखवताना  पार्श्वभूमीवर केलेला शिवाजी महाराजांच्या चित्राचा वापर ! राजे एका जातीसाठी कधीच मर्यादित नव्हते . बाकी चित्रपट शंभर नंबरी सोने आहे असे माझा चित्रपट पाहिलेला भाऊ संदीप सांगतो आणि fandry नंतर खरे पाहता मंजुळे यांच्या कामाची मीही चाहती आहे . 

Friday 19 February 2016

शिकवण

   मुलांची निरागसता ही एक दैवी देणगी म्हणावी का ? कि या भवतालचे वातावरण मनात न रुजल्याने झालेली एक चांगली गोष्ट म्हणावी ? दोन्ही गोष्टी  एकच कि ! निर्माता देताना सारे कोरे , निर्मळ आणि स्वच्छ देतो पण ही सुखासीनतेकडे झुकलेली मानवी जमात ते फक्त घाणरडे करण्याच्याच मागे लागली आहे का असे वाटावे इतके या निसर्गनिर्मित गोष्टींना गलिच्छतेकडे नेत आहे . बरे याच्यात त्यांची हानीच आहे पण ...ज्यांना समजले ते काही करत आहेत पण तितके पुरेसे नाही नक्कीच ! कारण चारजणांनी घाण करावी आणि एकाने काढावी असे आहे हे . असे विचार माझ्या मनात उगीच कधीच घिरट्या घालीत नाहीत ; प्रत्येक वेळी काही घडते आणि विचारांची शृंखला चालू होते ..आजही तसेच काहीसे झाले .
     शनिवार तसा माझ्यासाठी थोडा सुखाचा , कारण त्या दिवशी थोडे जास्तवेळ झोपायला मिळते , मुलांची सुट्टी अशी आईसाठी चांगली असते ..पण कसले सुख सहजी थोडेच लाभते ! मुले मात्र त्या दिवशी आवर्जून लवकर उठतात , निरागसता दुसरे काय ! माझी सकाळची घाई चालू होती . गेम खेळता खेळता (कॉम्पुटरवर ) आमचा चिरंजीव मागे आला ..मी चपात्या लाटत होते , म्हणजे त्याच्याकडे बघणेही शक्य नसते ..कान मात्र मोकळे असतात .
"मम्मी एक प्रश्न विचारू ?" सत्योम . आता काही वेगळे नको विचारायला या विचाराने मी काळजीत पडले . पण तरी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पहिले .
"अगं , मला एक सांग कि , जर मी प्रेसिडेंट झालो .." माझे डोळे आपोआप विस्फारले . अरे देवा हे काय नवीन आता ..
"अगं म्हणजे गेम मध्ये गं ! " त्याने लगेच स्पष्टीकरण दिले . तो पाचवीत गेल्यापासून त्याला माझ्या चेहऱ्यावरचे भाव कळू लागले आहेत . बऱ्याच गोष्टी तो बोलायच्या आधी ओळखतो .
"बर मग .." मला आता बोलण्याशिवाय पर्याय नव्हता . काम मात्र चालू ठेवले .
" अगं , समजा मी प्रेसिडेंट म्हणून दोन गोष्टीपैकी एक निवडायची असे झाले तर मी कुठली निवडावी हे सांग."
"बर , विचार त्या दोन गोष्टी .." माझी उत्कंठा थोडी ताणली गेली .
"म्हणजे बघ , एक निर्णय असेल कि भुकेलेल्यांना अन्न धान्याची सोय करणे आणि दुसरा निर्णय असेल कि क्यान्सरग्रस्तांना उपचार मोफत देणे ." अरे बापरे , बराच गहन प्रश्न आहे . या माझ्या सत्योमने जिथे भूक काय असते हेच अनुभवले नाही तिथे याला या गोष्टीचे गांभीर्य कुठून येणार ? पण माझ्या मनात एक विचार चमकून गेला , याच्याकडूनच उत्तर काढायचे कमीत कमी मला याची संवेदनशीलता लक्षात येयील ..
"बाळा , तूच सांग बरे तुला काय वाटते काय जास्त महत्वाचे ? भूक कि उपचार ?" त्याने जरा वेळ माझ्याकडे पहिले ..थोडावेळ तो तसाच विचार करीत राहिला , आता मला खात्री वाटू लागली  कि हा क्यान्सरला महत्व देणार ..
"मम्मी , मला वाटते आजाराने मरणाऱ्यापेक्षा भुकेने मरणे जास्त वाईट ! मग मी आधी भूक नाहीशी करेल .." माझे डोळे आता पाणावले होते . माझ्या मनासारखे उत्तर दिले म्हणून नाही तर त्याच्या आत दयेसोबत सद्सद्विवेक वाढीला लागलाय हे पाहून ..खरंच मी हे कधी त्याला शिकवले नाहीच , पण मग ही त्याची दृष्टी भोवताल पाहून निर्माण होतेय याबद्दल समाधान वाटले . मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवावा म्हणून हात पुढे केला , त्याच्या डोक्याला पांढरे पीठ लागेल म्हणून त्याने पटकन बाजूला सारला ; आणि खट्याळ हसून तो पळून गेला ..आताही त्याने माझ्या डोळ्यातील आनंद पहिला होता आणि ओळखलाही होता .
    मी मात्र विचारात गढून गेले . या निरागस मनावर संस्कार कसे करायचे हा प्रश्न मला नेहमी छळत राही , त्याबरोबर दुसरा प्रश्न मी याला चांगले संस्कार देऊ शकेल का ? मी त्याला समजवावे म्हणजे तो हे समजेल ? कुणाचे मार्गदर्शन घ्यावे ? कुठली पुस्तके वाचावी त्यासाठी ? अशा अनेक गोष्टी माझ्या मनात नेहमी येत . पण त्याच्या वडिलांना म्हटले तर म्हणत आपण करीत राहायचे ..आपल्याला कुणी कसे वागावे हे शिकवले का ? आपण शिकत गेलोच न ? मग कशाला असा विचार करते ..अहो पण ...आपल्याला कुठे इतकी समज होती या वयात , आणि किती चंचलता आहे त्याच्यात सहा महिन्याचा असल्यापासून ! किती प्रचंड उर्जा आहे त्याच्यात , ती जर चुकीच्या मार्गाकडे वळली तर ? ते हसत आणि निघून जात ..त्यांनी कसली खात्री होती मुलांबद्दल मला उमजत नव्हते ..गेम खेळायला मिळाली नाही तर सर्वांवर चिडणारा , धिंगाणा करणारा सत्योमच मला दिसत राही ..कधी कधी तो दादावर धावून पण जातो , मग मला जास्तच काळजी वाटते . पण आजचे हे शहाणपणा आणि विवेकबुद्धीने दिलेले उत्तर ऐकले आणि मन आनंदून गेले . एक थंड शिडकावा अंगभर पसरून गेला .
"मम्मी , अगं बाहेर बघ तुझे पक्षी कसे ओरडत आहेत .." तो बाहेर खेळून आत आला होता .
"अरे हो रे , मी विसरले आज त्यांना पाणी आणि चारा ठेवायला ..ठेवते बघ ."
"तू विसरली गं , पण त्यांचे पोट थोडेच विसरेल .." आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला . दोघांनी घाईने भांडे धुतले आणि त्यात पाणी टाकून थोड्या शिळ्या चपात्या चुरगळून शेजारी ठेवल्या ...लगेच चिमण्या , कावळे आणि नेहमी येतात ते एकदोन वेगळे पक्षी तिथे पाण्याभोवती आणि अन्नाभोवती जमा झाले !
                           डॉ संध्या राम शेलार .

Sunday 14 February 2016

माणूस असणं

“राधे , ए राधे ....कुठे मेलीस गं  रांडे ...तुझं मढ बसवलं ..तुझी आय येणार का बाप गं ? कोण ह्यो शेणकुर करणार ..श्याण पार xxx आलं न ढोरांच्या ..”  आक्काबाईने सुनेच्या अंगावरचं घोंगड फेकून दिलं . ग्यानबा आणि राधा बावचळून उठली खरी पण कपड्यांची आवराआवर करताना दोघांची चांगलीच बेंबळ झाली . आक्काबाईला एकच पोरगा , ग्यानबा ..चार महिन्यापूर्वी त्याचं लग्न झालेलं , शेजारच्याच जामगावच्या राधेसोबत . आक्काबाईला ग्यानबा झाला आणि तिचा नवरा कुठे गेला कुणालाच तपास नाही वीस वर्ष तिने लोकांची मजुरी करून पैशाला पैसा जोडला , दोन खोल्यांचं घर बांधून घेतलं , पत्र्याचंच घर पण नेटकं ! गावातून शिंदे वस्तीकडे जाताना कच्च्या रस्ताच्या वरच्या अंगाला ..पूर्वेकडे घराचं दार , दारात तीन चार ढोरं होती , दुभती गाय एकच आणि ती पण गावरान , मग काय दूध घरचं टाकून डेरीला घालणे शक्यच नव्हते , एक लिटर दुधातून डेरीला काय देणार ? जसा ग्यानबा कळीत झाला तसा त्याने शाळा सोडून ढोरांच्या मागे हिंडणे चालू झाले . आक्काबाईला पण त्याच्या न शिकण्यावर आक्षेप नव्हताच , उलटपक्षी तो लवकर हाताखाली आला यातच तिला आनंद होता . घराच्या चार ढोरांच्या जोडीला आणखी काही ढोरांच्या राखोळ्या तिने मिळवल्या , त्यांचे महिन्याचे पैसे ती घेऊ लागली आणि अशा प्रकारे ग्यानबाचे ज्ञान सोडून कष्ट करणे चालू झाले . पैशाने पैसा जोडत आक्काबाईनेही काही उभेच केले , आणि तेही तिच्या लाडक्या ग्यानबासाठी ! झोपडीचे घर झाले ..एक दुचाकी दारात आली ..वर्षानुवर्षे पाण्याआभावी पडीक असलेली जमीन बागायती व्हावी म्हणून आक्काबाईने एक विहीरही खणून घेतली पण तीही पावसातच ओली राही ..मग चार पाच महिन्याच्या पाण्यावर जेव्हडी तरकारी होई तेव्हडीच ती ग्यानबाला हाताशी घेऊन करे , या तिच्या कष्टांवर आज ती गरिबांच्या यादीतून मध्यमवर्गीय गटात आली होती . तिच्या या धोरणी आणि कष्टाळू वृत्तीचे सर्व गावाला कौतुक होतेच पण तिच्या भांडकुदळ आणि कडक स्वभावाची झळ न लागलेला गावकरी सापडणे थोडे अशक्यप्राय होते .
“आगं आई ...अशी गं काय करती ..तिला बरं नाही म्हणून झोपली ती ..रातभर तापानी फणफणत होती ..आता कुठं डोळा लागला व्हता बघ ..” ग्यानबाच्या या बोलण्यात आईच्या अशा वागण्याबद्दलची नाराजी स्पष्ट दिसत होती ..
“आहाहा ..मोठा आला बायकुचा पुळका करणारा ..आई कधी आजारी म्हणून नाय दिसली रं तुला ..आन मेल्या तिला रांडला ताप व्हता मंग मुडद्या तुला उठाया काय रोग आलाता व्हय ..बसतो आपला बायकुच्या उबला दिवस वर आला तरी ..” आक्काबाईचं डोकं जास्तच भडकलं आणि नाही ते ती बोलून गेली ..बोलल्यावर जीभ दाबून उपयोग नव्हता , जर तिने माघार घेतली तर अशीच सून डोक्यावर वरवंटा फिरवणार या भीतीने तिला अनेक दिवस ग्रासले होतेच त्यात आज हा असा उलटून बोलतो , नक्की राधाच हे शिकवते त्याला , याची खात्री झाली आक्काबाईला ..तशीच तडतडत ती तिथून निघून गेली ..जातानाही तिने सुनेच्या आईबापाचा उद्धार करणे सोडले नव्हतेच ..
  दोन तीन दिवस असेच धुसफुसत गेले आणि एके दिवशी सकाळीच आक्काबाईची धाकटी पुण्याची बहिण आली . येताच तिने आक्काबाईला मिठी मारली आणि दोघी बहिणी हमसून रडू लागल्या . ग्यानबा आणि राधेला याचा काहीच उलगडा होत नव्हता ..घाईने ती पाणी घेऊन आली ..आणि त्या मावससासूच्या पुढे तिने तांब्या धरला . विमलबाईने तो घेतला , खाकरून खोकरून तिने गुळणा केला आणि तोंडावरून पाण्याचा हात फिरवून तिने नाक तोंड वाकडे करत राधेच्या हाती ठेवला . तिचे असे बघणे पाहून राधा पटकन घरात शिरली आणि चहापाण्याला लागली , स्वयपाक करणेही चालूच होते . ग्यानबाला मात्र पुण्याची विमलमावशी पाहून भलताच आनंद झाला आणि तो नेहमीप्रमाणे तिच्या पिशव्या उचकू लागला .
“आक्का तुझं प्वार एव्हडा वाढला पण एरंडच बघ ..लगीन झालं तरी त्याची पहिली खोड काय गेली नाय ..” हसून कौतुकाने भेळीचा पुडा त्याच्या हातात ठेवत मावशी त्याला जवळ घेऊन गालगुच्च धरू लागली . ग्यानबाने चलाखीने तिच्या हातात्तून सुटका केली स्वतःची आणि तसाच पळत आत गेला . एका परातीत भेळ सोडली आणि त्याने ओट्यावर बसून आक्का मावशीच्या पुढे खायला चालू केले . इतक्यात राधा चहा घेऊन आली आणि लग्नात आलेले ते नवे कप चहाने भरून त्या तिघांपुढे मांडले . आक्काबाई डोळे वटारून राधेकडे पाहत काही खुणावू लागली . राधेने ते लगेच ओळखले आणि गडबडीने मावशी आणि आक्काच्या पाया पडली ..
“राहू दे बघ पोरी , तू पाया नाय पडली तर माझं पाय नाय सुजायचं बघ ..इतकीच नेमाची होती तर आल्या आल्या कळू नाय व्हय ..” तिच्या डोक्यावर आशिर्वादाऐवजी अशी मुक्ताफळे उधळत हात मात्र ठेवला . राधेने ग्यानबाकडे पाहिले आणि तशीच आत गेली . आनंदाने फुललेला ग्यानबाच चेहरा असा पडलेला पाहून दोघी बहिणींच्या पोटात कालवले ..
“ग्याना , लेकरा आमी का वैरी हाव तुझे , पर या नव्या पोरींच्या सांगण्यानी कितीतरी संसार वाया जात्यात बघ ..आन तुझ्या आईला जर का तिनी नाय पाह्यलं  , तर कोण हाय तिचं ? तूच सांग बाबा ..म्हणून अशी परक्याची पोर लेकरं होऊनश्यान आपली होऊसतर आपणच दापया हवी बघ . आन आमचं काय सुदिक म्हणणं नाय , तू तुझा जीव लाव पर आक्का दापती तिला तर आक्काचा तेव्हडा वचक राहू दे पोरा नायतर वावडी होऊन कधी संसार तुझ्या भोळ्या माणसाचा उडून जाईल ते बी उमगणार नाही बघ ..” त्याच्या जवळ बसत विमलमावशीने डायरेक्ट मुद्याला हात घातला . कारण आक्काबाईने तिला फक्त ग्यानबाला समजून सांगायला निरोप देवून बोलावली होती . आणि तीही तिचे काम करण्यात बरीच यशस्वी झाली होती . भावनिक साद घालून दोघी बहिणींनी ग्यानबाला चांगलेच गोल केले , तशा त्या वाईट नव्हत्याच , दोघीही प्रेमळ होत्या , त्यांचे जीव लावणेच आजवर ग्यानबाने अनुभवले होते म्हणून आईचे  त्या दिवशीचे  वागणे पाहून तोही बराच बावरला होता . आणि आज या दोघी बहिणी समाज्याचे अनुभव सांगून त्याला शहाणे करीत होत्या (की कान फुंकत होत्या ?) त्यांच्या वांझ भीतीपायी ! राधेचा कानोसा घेत दोघींनी त्याची समजूत (?) काढली आणि दोघी बहिणी निश्चिंत होऊन हसल्या . त्यांचे हसणे पाहून ग्यानबाला काहीतरी खुपले पण त्याच्या आईची बऱ्याच दिवसानंतर अशी हसरी मुद्रा पाहून तोही सुखावला .
   त्या दिवशी आपले कार्य समाप्त करून विमलमावशी गेली खरी पण ग्यानबा मात्र राधेपासून जरा फटकून वागू लागला ..आईच्या समोर तरी ..आक्काबाईला पण आपली ही मोहीम यशस्वी झाल्याचा परिपूर्ण आनंद देत राहिला ..नवऱ्याचे वागणे बघून राधा जरा धास्तावली होती ..
“आक्काबाई ...” मोठी आरोळी देत रखमाबाई ओट्यावर बसती झाली . हातातली परडी खाली ठेवत पुन्हा एकदा तिने आरोळी दिली , “अंबाबाईचा जोगवा ssss” राधा आवाज ऐकून धावतच बाहेर आली आणि परडीवाली , गळ्यात कवड्यांच्या माळा घातलेली बाई बघून ती धावतच आत जावून दोन्ही हातात मावेल इतके पीठ घेऊन आली . तिने परडीच्या लहान टोपलीत पीठ घातले आणि त्या बाईला वाकून नमस्कार करती झाली ..आक्काबाईच्या सुनेच्या या शहाणपणाने ती बाई बरीच सुखावली ...
“वर्सात कृष्ण बागडू दे अंगणात ..” म्हणून तोंडभरून आशीर्वाद दिला . इतक्यात आक्काबाईपण धावतच आली शेजारच्या घरून , ग्यानबा कधीच ढोरांच्या मागे गेला होता .
“गुरुमाउली .......”म्हणून आक्काबाईने लगोलग पाय धरले रखमाबाईचे ..आक्काबाईच्या डोईवर हात ठेऊन काही आशिर्वादाचे शब्द पुटपुटत गुरुमाउलीने डोळे मिटून घेतले ..
“गुरुमाई , एक सांगणं होतं ..” घाबरत , रखमाबाईच्या ध्यानस्त मुद्रेकडे पाहून लाचार शब्दात आक्काबाईने प्रश्न केला . रखमाबाईने हळूच पापण्या उघडल्या आणि नजरेनेच काय असा प्रतिप्रश्न केला .
“माई . सहा महिने झालं ..सूनचा महिना एळेला हजर होतुय , आता तिच्यासंगच्या पोरी पोटुशी हायेत ..” रखमाबाईने मान हलवली आणि हवेत बोटे फिरवली ..थोडा वेळ तशीच बसून राहिली .
“हुं ..हुं ...” असा आवाज करीत रखमाबाई घुमू लागली आणि आणि आक्काबाई अशी बावरली की तिला काही सुचेना आधी ..घुमण्याचा आवाज वाढू लागला .आता घुमणारी रखमाबाई हात एकमेकांत घट्ट करून जागेवरच डुलू लागली . जोराने मानेला झटके देवू लागली . तोवर पळत जाऊन आक्काबाई पंचपाळ घेऊन कुंकू रखमाबाईच्या कपाळाला लावण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत राहिली ..शेवटी तिने ते लावलेच , जवळच्या परडीला हळद कुंकू वाहून तिने आणि राधेने मनोभावे परडी आणि रखमाबाईला नमस्कार केला ..त्या डोके वर करताच थोडी शांत झालेली रखमा पुन्हा जोराने घुमू लागली . हात खाली वर करीत राहिली , परंतु तिने एकमेकांत घट्ट रुतवलेली बोटे मात्र सोडली नाहीतच पण ती जास्त घट्ट करीत गेली .. मानेला झटका देऊन रखमाने केसांचा अंबाडा कधीच मोकळा केला होता . पुढे मागे उडणारे ते केस , तो घुमण्याचा आवाज , गुढग्यावर येवून पुन्हा खाली पडणे , कपाळाला पसरून लागलेले ते कपाळभर कुंकू याने साधारण पन्नाशीची , म्हातारपणाकडे झुकलेली ही काळीसावळी रखमा अधिकच भयंकर दिसू लागली . भेदरलेली राधा मागे सरू लागली तसे आक्काबाईने तिला पुढे ओढून घेतले आणि पाया पडायला खुणावले ..बिचारी राधा , सासूचे मोठे डोळे आणि रखमाचा हा अवतार पाहून ती पुरतीच घाबरली . तरी ती रखमाच्या पायाशी झुकली ..रखमा आता अधिकच घुमत राहिली ..हा सारा प्रकार पाहून आजूबाजूच्या बायका गोळा झाल्या आणि त्याही रखमाचे पाय धरू लागल्या , कुणी कुंकू लावू लागल्या .
“गुरुआई ...माझ्या घरचा वंश कधी वाढल ..” शेवटी आक्काबाईने धाडस करून विचारले ...
“हुं ...हुं ...हुं ...आक्के ...हुं ..हुं ..तुझी सून ...हुं हुं हुं ...मावलाया वलंडून गेली हाय ..हुं हुं हुं ...त्यांचा कोप हाय ..हुं हुं हुं ..तिच्या माहेरच्या ...हुं हुं हुं ..मावलाया लई कडक हायेत ..हुं हुं हुं ..तिथं गावाच्या वरच्या बाजूच्या वढ्यात हायेत ...हुं हुं हुं हुं ..तिला इचार गिल्ती का तिकडं ..हुं हुं हुं हुं  ..” आक्काबाईने सुनेकडे पाहिले , राधेने मान हलवली ..आणि आक्का पुन्हा रखमाच्या पायावर पडली ..
“गुरुआई ,  चूक झाली तिच्याकडनं ..माफी करा ..लेकरू हाय ..अल्लड हाय चुकायचं ..तुम्ही आय हाय सरव्यांची ..उपाय सांगा ..पर नाडू नगा माझ्या पोरीला ..” आणि आक्का पटापट रखमाचे पाय धरू लागली ..राधा मात्र पुरती गोंधळली होती , तिची ही कडक सासू क्षणात मऊ लोण्याचा गोळा झाली होती . तिच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव दाटले आणि अनिमिष नेत्रांनी ती पुढचे नाट्य पाहू लागली ..तिने अनेकदा अशा घुमणाऱ्या बायका मरीबाईच्या पुढं पहिल्या होत्या पण अशी बोलणारी जोगवेकरीन ती प्रथम पहात होती .
“हुं हुं हुं ......” करीत रखमा जास्तच घुमू लागली आणि आक्का जास्तच भेदरली ..पुन्हा आक्काने रखमाचे पाय घट्ट धरले आणि तिला विनवणी करू लागली . आपल्या कडक सासूला असे नम्र होताना पाहून राधा मात्र मनातून आनंदित झाली होती ..
“हुं हुं हुं ...आक्के ...हुं हुं हुं ...मावलायांच्या सवास्नी घाल ..हुं हुं हुं ...तेबी तिथं जावून ...हुं हुं हुं हुं ...ह्या महिन्यात करशील तर पुढच्या महिन्याला सून बाहेर बसायची नाही ...हुं हुं ....” एक लिंबू हातात देत आक्का तिच्या पटापट पाया पडत राहली ..आणि बोटांनी गुंतलेल्या हातात लिंबू फोडून रखमा हळू हळू शांत होत गेली ...जसे सारे संपले तशा बायका पांगल्या आणि अवघडलेली रखमा स्वतःला आवरून पुन्हा पुढच्या घरी गेली ...आरोळी देत ..
“अंबाबाईचा जोगवा ..” आक्का आणि राधा मात्र एकमेकींकडे पाहत राहिल्या ..
   सारे सोपस्कार करून दोघी सासूसुना आल्या ..राधा आनंदात होती कारण तीन चार महिन्यातून ती माहेरी गेली होती . आक्का मात्र महिना पालटण्याची वाट बघू लागली . राधा तिच्या वेळेला पुन्हा बाहेर बसली ..आणि आक्काने डोक्याला हात लावला ..वर्ष झाले ग्यानबाच्या लग्नाला परंतु राधेच्या महिन्याची तारीख मात्र बदलत नव्हती ..प्रत्येक वेळी ती बाहेर बसली की आक्काबाई कपाळ झोडू लागली ..हळूहळू ती राधेवर चिडून जाऊ लागली . ग्यानबा नाही पाहून ती तिला मारूही लागली . ग्यानबा आता सोबत्यांची लेकरे घेऊन उबगला होता , त्याला स्वतःचे लेकरू हवे होते ! तो आता राधेपासून दुरावत गेला ..आणि त्यांच्यातला हा दुरावा वाढल्याने ..राधाही सुकून गेली . महिना काही चुकत नव्हता आणि तिचा महिना आला की कुणी मेल्यासारखी दोघांची तोंडे पाहून राधा कोमेजू लागली . सासूचा जाच होताच आता नवऱ्याचा वाढू लागला ..रखमा येत होती , जोगवा मागत होती पण आक्का गुरुमाई ला दोष न देता राधेलाच त्रास देत होती ..नवेनवे सारे उपाय करून झाले ..राधाने या जाचाने अन्नपाणी कमी केले तशी आल्या वेळी टचटचलेली राधा अधिकच कमजोर झाली आणि सारखी आजारी पडू लागली .. मुलाची आशा सोडाच पण राधीचा दवाखानाच या माय लेकरांच्या नाकी नऊ आणू लागला . आक्काबाई दिवसरात्र स्वतःच्या आणि ग्यानबाच्या प्रारब्धाला कोसत होती . आला दिवस जात होता . आताशा राधीच्या आई बापाचे येणे पण कमी झाले . हळूहळू राधा औषधाशिवाय अंथरुणात तळमळू लागली , आक्काबाई काय तिला दवाखाना दाखवत नव्हतीच ...राधेची शरीरयष्टी अधिकच खालावली . एक दिवस स्वयपाकाच्या जागी चालेल्या मायलेकरांच्या गोष्टी राधेने ऐकल्या आणि त्याच जागी ती बसली . तिचे भविष्यच अंधारात घिरट्या मारू लागले आणि अशक्त राधी कधी त्याच जागी बेशुद्ध झाली हे कुणालाच कळले नाही .
“अंबाबाईचा जोगवा ....” एक हाक तिच्या कानी पडली आणि ती उठून बसली , म्हणजे कालपासून ती त्याच जागी पडली होती ! तिने तोंडाला पाणी लावले आणि बाहेर आली अजूनही रखमा आणि तिची सासू एकमेकींच्या कानाला लागून काही बोलत होत्या . तिने स्वतःचे आवरून अंघोळ केली , बाहेर आली तरी दोघी काही बोलत होत्या . अंघोळ करून ती परडीच्या पाया पडली , \रखमा आणि आक्काबाईच्या पण ...दोघींनी तिच्याकडे लक्ष दिलेच नाही ..काही मनात ठेवून ती निश्चयी मुद्रेने आत मात्र गेली . तिच्या उजळलेल्या चेहऱ्याचे आकलन मात्र कुणालाच झाले नाही आणि तिची ती शांत मुद्रा पाहून दोघीही बावरल्या ...
    त्यानंतर तीन चार दिवस राधा बरीच उत्साही दिसत होती . तिच्यातील या बदलाने मायलेकरांच्या कपाळाला आठ्या पडत होत्या ..त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या मनसुब्यांवर पाणी तर पडणार नाही ही काळजी दोघांना सतावत होती . आता राधा रोज स्वयपाक , घरकाम करू लागली . त्यांच्या टोमण्यांना न जुमानता खाऊ लागली . तशी दोघा मायलेकरांची घालमेल वाढू लागली ..
“राधे ..इकड यी ...” ग्यानबाने जोरात हाक मारली . राधा त्याला जेवायला वाढून नुकतीच बाहेर कपडे वाळायला घालत होती .तिलाही भूक लागली होती म्हणून घाईने आवरत होती . तेवढ्यात ग्यानबाची हाक ऐकून ती आत पळत आली ..तिला पाहताच तिच्या नवऱ्याने भांडे कोपऱ्यात भिरकावले ..आणि कडाडला .
“रांडीचे , तुला मीठ किती टाकायचं हे बी कळत नाही का ?” आणि तो पुढे होऊन खरकट्या हाताने तिला बडवू लागला . ती तशीच बाहेर धावली , सासूला येताना पाहून त्याच जागी ओट्यावर बसली , नवरा चुलीचं लाकूड पाठीत घालणार तोच तिने रखमाबाई सारखी बोटे एकमेकांत गुंतवली आणि गुढग्यावर येऊन घुमू लागली ...
“हुं हुं हुं ......” आक्काबाई धावतच ओट्यावर आली आणि घरातून पंचपाळ घेऊन आली . तिला कुंकाचा मळवट भरू लागली ..पण हलणारी राधा तिला आवरत नव्हती . थोडी शांत होत राधेने कुंकू लावून घेतले . आणि पुन्हा जोराने घुमू लागली . इतक्यात साऱ्या शेजारणी धावतच आल्या . ग्यानबा रखमाबाईला बोलवून आणायला गाडीवर गेला . पाचच मिनिटात रखमा तिथे परडी घेऊन हजार झाली ..आणि राधेच्या अंगातील देव पाहून गालात हसली ...
“ देवा ...काय चुकलं माकलं सांगा ..” रखमा राधेच्या पायावर झुकली . राधा आता जास्तच जोराने घुमत होती सारे केस फिसकटून तिच्या चेहऱ्यावर आले होते .
“देवा माफी करा ..चुकी सांगा ..” रखमा आणि आक्का दोघी तिला विनवत होत्या ...
“हुं हुं हुं ....रखमे ...हुं हुं हुं ..”
“जी देवा ..”
“हुं हुं हुं तुला कसली विद्या दिली म्या आन त्वा गं द्वाडानी काय केलं ..”
“सांगा देवा ..चूक आसल तर माफी करा ..”
“हुं हुं हुं ..तुला देव कळना ..हुं हुं ..त्याची परडी आणल्यापरीस ती नीट व्हत नाय ..तुला कळाया नको ..हुं हुं हुं”
“चुकलं आई ..उपाय सांगा ..”
“हुं हुं हुं ..राधीची परडी आणा ..हुं हुं हुं ..”
“आई , तुमी सांगा ते करू ..”आक्काबाई पुढे होऊन म्हणाली . राधीच्या अंगात जास्तच जोर आला ..
“हुं हुं हुं ..आक्के ...”
“आई सांगा , चुकी माफ करा ..” आक्काबाई विनवणी करू लागली . ग्यानबा एका बाजूला बसून सारे विस्फारित डोळ्यांनी पाहत होता .
“हुं हुं हुं ..राधीचा देव केल्याशिवा तिला प्वार व्हणार नाय ..हुं हुं हुं ..”
“तुमी सांगला त्या करीन आई ..”
“हुं हुं हुं ...परडी आण आधी , देवधर्म कर ..हुं हुं हुं...” आक्काबाई हात जोडून राधेच्या पुढे बसली होती .
“हुं हुं हुं ..तिलाबी प्वार होईन ..हुं हुं हुं पर दम धरा ...हुं हुं हुं ..”
“जी आई ...”
“आधी देव करा ...हुं हुं हुं ..” राधेने जोराचा आवाज केला आणि ती पुन्हा जोराने घुमू लागली .आता मात्र रखमा पुढे आली , तिने राधाच्या हाती लिंबू दिले , राधेने ते एका दाबत चुरा करून टाकले ..आणि हळूहळू शांत होत गेली ...ती तशीच खाली कोसळली . आक्काबाई , रखमाबाई पुढे झाल्या आणि तिच्या केसांना आवरू लागल्या ...झोपेचे सोंग घेतलेली राधा मात्र मनात हसत होती , आणि रखमा पण !
      डॉ संध्या राम शेलार .

ही कथा लिहिताना एक कविता मनात घर करून होती .
  माणूस असणं
तू मला दगड म्हणालास
परी मी दुभंगले नाही
मग मी छिन्नी हातोडा झाले
आणि सोलत बसले स्वतःला
रंग , रूप , आकार येईपर्यंत
आता तू मला देवी म्हणतोस
आणि रोज फुलं वाहतोस
माझं माणूस असणं
कधी मान्यच नाही का तुला ?
  - किरण केंद्रे .
किती सार्थ शब्द आहेत ..आजही ग्रामीण भागात असलेल्या शोषित स्रीला असाच देवाचा आधार घेऊन जगावे लागते आहे . आणि जेंव्हा अशी असहाय स्री असे कर्मकांडाचे मार्ग निवडते तेंव्हा मला तिचा आदर वाटतो ..कारण निराधार अशी ती अबला देव जरी तारून नेत नसला तरी त्याचे नाव मात्र तिला तारून नेते ..ग्रामीण जीवनातील ही अंधश्रद्धा संपवायची असेल तर आधी स्री शिक्षण झाले पाहिजे आणि स्रीशोषण थांबले पाहिजे !

            -डॉ संध्या राम शेलार .