या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Wednesday 3 December 2014

मुंगसा मुंगसा ...

आज सकाळी थंडीने कुडकुडत होता तरी सत्योम जास्तच बोलत होता . बोलले तर तो थांबतच नाही आणि नाही बोलले तर मग शंकित होतो आणि सारखा विचारत राहतो .. ‘का ग मम्मी तू रागावलीस का ?’ म्हणून मग बोलावेच लागते . आज त्याला काय आठवले माहित नाही पण अचानक मुंगसाची आठवण झाली . तो अर्धवट वाक्य बोलत होता . मुंगसा ...काहीतरी असेच .
 त्यावरून माझे मन अचानक भूतकाळात भटकंती करू लागले . तसे आमचे सर्व भावंडाचे बालपण खूप आनंदात गेले . शेतकरी तरी सुसंकृत आणि आर्थिक दृष्ट्या सर्वसाधारण म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबात झालेला जन्म ..तसे काही कमी नाही आणि अवांतर जास्त पण मिळत नव्हते . प्राथमिक गरजा तेव्हढ्या पूर्ण होत . आमचे आजोबा आणि त्यांचे तीन भाऊ जेंव्हा वेगळे झाले तेंव्हा ते सर्व गाव सोडून रानात राहू लागले . रानही जवळच्या कर्जत बहिरोबावाडी रस्त्यावर .. म्हणून मग वाडीतून कर्जतला जाताना रोडच्या दोन्ही बाजूला त्यांनी घरे बांधली . वाडीचे अंतर एक ते दीड किमी आणि कर्जत पाच किमी . आम्ही सातवीपर्यंत वाडीच्या केंद्रशाळेत जात असू . तीन चार घरची मुले म्हणजे बराच मोठा ग्रुप तयार होई . कुणी लहान कुणी मोठे ...सगळ्यात मोठे जे कुणी असेल ते ग्रुप चे नेतृत्व करी . मग गप्पा गोष्टी करीत आम्ही सारे शाळेत जात असू . सकाळी साडेसात ते दुपारी बारा आणि दुपारी अडीच ते सायंकाळी पाच ..असे चार वेळा दिवसातून हे दीड किमी अंतर आम्ही येत जात असू . शिस्त बाकी शिस्त असे . वाहतुकीचा रस्ता असूनही कधी कुणाला अपघात झालेला आठवत नाही . वाहतूक चालू असेल तर एका बाजूने सारे चालत . पण तरी या शिस्तीखाली आमचे बालपण दबलेले मला आठवत नाही . आम्ही तितक्या गमतीही करत असू ..म्हणून या इतके अंतर पार करून शाळेत जाण्याचा कुणाला कधी कंटाळा आला नाही .. ती आमच्यासाठी एक आनंदाची पर्वणी असायची . म्हणून आजही त्या गमती आठवल्या कि आपोआप ओठांवर हसू आल्याशिवाय राहत नाही ...
  आज ते सारे आठवायला कारण मुंगुस ! आम्ही शाळेत जात असू तेंव्हा साधारण रोज एखादे तरी मुंगुस दिसे . आणि मग ज्या कोणाला दिसे तो मुलगा मुलगी सर्वाना थांबावी आणि म्हणे ‘ मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला रामाची शप्पत .’ आणि आश्चर्य असे कि ते मुंगुस असे बोलल्यावर तोंड दाखवल्याशिवाय पुढे जात नसे ! याचे खूप आश्चर्य मला आजही वाटते . अनेक प्रश्न आजही पडतात . इतके घाईने पळणारे मुंगुस असे अचानक का थांबत असेल ? त्याला आम्ही इतक्या लहान आवाजात बोललो तरी कसे ऐकू जात असेल ? बर जरी योगायोग म्हणावा तर हा योगायोग साधारण रोजच का घडत असेल ? पण आम्ही इतकी भावंडे मोठी झालो कुणी हे कोडे उलगडले असेल असे मला तरी नाही वाटत ..
   मी सत्योमला सकाळी अंघोळ घालताना हि आठवण सांगितली .
“आम्ही लहानपणी शाळेत जात असू न तेंव्हा मुंगुस दिसले कि आम्ही म्हणायचो ‘मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला रामाची शप्पत ..’ आणि मग ते किती घाईत असले तरी तोंड दाखवल्याखेरीज पुढे जात नसे !”
“का ग मम्मी ते तोंड दाखवत असे ?”
“त्याला रामाची शप्पत घातली म्हणून .”
“मग म्हणून का दाखवी ?”
“तो रामाचा भक्त असेल .”
“मग सापाला जर शंकराची शप्पत घातली तर साप पण तोंड दाखवील का ?”
“....”
“आणि मग तुम्ही त्याला रामाची शप्पत घालून तुमचे काही काम का करून घेत नव्हते ?”
“......”
“जसे कि होमवर्क ...”
आता मात्र मला हसू आवरणे अशक्य होते ...

खरंच त्या वेळी आम्ही लहान होतो पण तेंव्हा कुणालाच कधी सुचले नाही हे मुंगुस इतके ऐकते तर आपण आपला होमवर्क याच्याकडून करून घ्यावा ..... 

Monday 13 October 2014

चंद्रकोर

गगनी बघ कशी ही चंद्रकोर जागलेली 
नक्षीदार तारकांनी रंगावली सजवली 
बगिचात रातरानी लाजुन ही बहरली 
पाहुनी तयांना प्रीतफुले मनी उमलली 

हलकेच भास झाला तुझाच सभोवताली 
अन रोमरोमी माझ्या किती कुसुमे फुलली 
आभास कि सत्य सारे माझेच मला कळेना 
तुझ्याच जाणिवेने हृदयात ताण भरली 

हलकेच गार वारा अंगावरी पसरला 
दाबून ठेवलेला मग श्वासही उसवला 
अंगांग नाचते हे , मयुरासहि लाज आली 
तव परिसस्पर्शाने मम कांती स्वर्ण झाली

न कळे उभयतांना कधी चांदण्या निवाल्या 
आंबूस अंग आणि मनकळ्या निर्माल्य झाल्या 
ओलांडूनी बघ धरेला हि चंद्रकोर गेली 
उधळीत केशरी पुष्पे , पूर्वेस प्रभा आली …  
                                  -संध्या § . 


Monday 11 August 2014

माझ्या जीवनाची साठवण

तू आणि तुझी आठवण
माझ्या जीवनाची साठवण
तुझ्या परिसस्पर्शाने,
 मंतरलेले ते क्षण
माझ्या अंतरात जपलेली ,
 मधुर ती ताण
तुझ्या शब्दांचे ,
हळुवार कवण
व्यापून आहेस आयुष्य ,
तूच माझा साजन
आरपार काळजात ,
तुझे नजरबाण
अंगभर फुलवती ,
शहारयांचे रान
आजही डोळे आहे ,
तुझ्याच वाटेस लावून
तुजपाशी अंत जीवनाचा ,जगणे
होवून तुझ्या पदी धुलीकण
तू आणि तुझी आठवण
माझ्या जीवनाची साठवण ....

                                             - संध्या §

Wednesday 6 August 2014

रिती

गडद आमवसेच्या रात्री
डोळ्यात रुतणारया  त्या काळोखात
पायवाटेत वाकड्या सरळ रेषा ,
कधी टोचतही होते चिमुकले काटे
आणि कधी रक्ताचे ते दवायेव्हडे थेंब,
वेडा प्रयत्न करत होते ,
ती कोरडी रेती भिजवण्याचा !
पण ,
एक वेगळाच हर्ष ह्रदयात उचंबळून येत होता
काहीतरी रिते होत होते ,
रक्ताच्या त्या प्रत्येक थेंबाबरोबर ...
आयुष्यभर मनात रुतलेले ते अपरिमीत ,अगणित
काही अपमानित , तर काही बोचरे क्षण!
पावले तशीच पुढे जात होती ....
रिती होत होती ...
त्यांना त्या काळ्याकुट्ट अंधारात ,
दोन चिमुकल्या , मिनमिनत्या चांदण्या दिसत होत्या ,
तुझेच दोन आर्जवी नेत्र ते .....
रिती होउन तुझ्याकडे बोलावत होते ....
आणि मीही धावत होते ...रिती होउन!
                                                -संध्या§

Thursday 3 July 2014

रात्रीचे प्रेमगीत

दिस संपला संपला
रात निजली निजली
आळवाच्या पानावर
सुखे सजली सजली


किर्र किर्र काजव्यांची
पानापानात भरली
भेदरली हि पाखरे
खोप्याखोप्यांनी दडली 


धरा गगन कशी ही
एका रंगात नाहली
विसरून तुझे माझे
एकमेकात विरली  


प्रीत पाहुनी तयांची
चंद्रचांदणे हसली
शुभ्र किरणे धरेच्या
गाली सजली सजली


अंग चोरून चोरून
पानेफुलेही लाजली
प्रणयाच्या खेळामध्ये
सारी अवनी नाहली
               -संध्या §

Monday 23 June 2014

गुरु !

    काही क्षण असे येतात , क्षणात  संपूनही  जातात , कधी संपले हे कळायच्या आत ते भूतकाळ होतात . असे काही निखारे पदरात टाकून जातात कि का झाले ? कसे झाले ? असे केले असते तर टाळले गेले असते का ? मला आज सुचते आहे तेंव्हा का नसेल सुचेल ? प्रश्न आणि अनेक उत्तरे परंतु ती उत्तरे द्यायची वेळही निघून गेलेली ! पण ती वेळच अशी येते कि सारी बुद्धी त्यावेळी निकामी होती काय ? किंवा कसली अशी भूल पडली त्या वेळी ? या प्रश्नांनी आधी मन हैराण होते आणि मग उदासीन ! उदासी इतकी अमर्याद असते कि आपल्या जीवनाला निरर्थक ठरवण्यापर्यंत मनाची मजल जाते .
     खरच जीवन निरर्थक आहे का ? कुणाच्या जीवनातील अस्तित्वामुळे त्याला अर्थ येतो का ? कुणाच्या नाराज होण्याने ते तिथेच थांबते का ? या प्रश्नांची उत्तरे नाहीपाशी येऊन थांबतात ! जर याचे उत्तर नाही आहे तर जीवनातील अर्थ म्हणजे काय ? तो त्याला कसा द्यायचा ? हि विद्या या मनुष्याला कोण शिकवणार ? कि जीवनाच्या शेवटीच हे सत्य उमगणार का ? आणि जर तेंव्हा हे कळणार असेल कि आपण का जगतो तर तेंव्हा वेळ निघून गेलेली असेलच न ?
   हे जीवनाचे सार , सत्य वेळेआधी उलगडणे हि आजच्या तरी काळाची गरज झाली आहे ...समाजात कलीने पाय रोवलेले असताना या आयुष्याच्या नावेला पैलतीर दाखवणारा असा एकच  आहे आणि तो आहे तो परमात्मा ! पण तो भेटणार कसा ? अनेक तपे करूनही त्याची प्राप्ती नाही ! पण त्याच दयाळू ईश्वराने हे ज्ञान उलगडून दाखवले गीतेमध्ये ! तीच गीता माणसाला  जीवनाचा खरा अर्थ सांगते . जे अनेक प्रयोगांनी शास्त्रज्ञांना उमजले नाही ते गीता सांगते . पण गीतेचे हे क्लिष्ट ज्ञान मराठीत समजावले ते जगद्गुरू ज्ञानेश्वर माउलींनी ! आणि तेच अमृत अनुभव सामान्यजनांना भरवले ते गुरूंनी !
    मी माझे रोजचे काम आणि नाती सांभाळण्यात अशी कसरत करत होते कि त्यापलीकडे काही विश्व आहे हेच जणू काही मला ज्ञात नव्हते . परमेश्वराची आराधना करायची ती आपली भौतिक सुखे प्राप्त करण्यासाठी इतकेच मी करत होते . हे प्राप्त झाले कि ते दे म्हणून त्याची आराधना , उपास ,यात्रा यातच जीवन  अडकून पडलेले . हे करत असताना देवाने मला हे दिले नाही म्हणून त्याचा दु:स्वास करण्यापर्यंत मन धजले . पण या कर्मकांडातून बाहेरचा मार्ग दाखवला आमच्या परमपूज्य गुरूंनी ! ह.भ.प. गोरखनाना शेलार ! आम्ही त्यांना फक्त नाना म्हणायचो . तसे पहिले तर त्यांचे फक्त एकच प्रवचन मी ऐकले . ते भेटले मला ते प्रत्येक वेळी पेशंट म्हणून . पण त्या काही मिनिटांच्या भेटीत ते असे काही सांगत कि ते मनाला स्पर्शून जाई . प्रत्येक वेळी असे काहीतरी शिकवून जात , कि त्या वेळी ते उमजत नसे परंतु जेंव्हा निवांत त्यांच्या बोलण्याचा विचार करत बसे तेंव्हा कळायचे कि नाना आपल्याला शिकवून गेले !
    मागच्या गुरुपौर्णिमेच्या वेळी माझी मनोमन खूप इच्छा होती कि नाना सर्वांना अनुग्रह देतात मग मी पण या वेळी घेणार . बाकीच्या जाणाऱ्यांना मी मला न्या म्हणून सांगितलेही परंतु गाडी दारात आली आणि माझ्याकडे  डिलेव्हरीसाठी एक पेशंट आली . मन खूप हिरमुसले , परंतु मी न जाता ते पेशंट पहिले . त्यानंतर साधारण दोन दिवसांनी नाना आजारी असल्याने आमच्याकडे आले . मी मनातील खंत बोलून दाखवली . मला अनुग्रह हवा होता . नानांनी बाकीच्या गोष्टी बोलून झाल्यावर शेवटी सांगितले तुमची हि सेवा हीच ईशसेवा आहे ! त्या वेळी मला काही समजले नाही , परंतु रात्री झोपेची आराधना करत असता तो प्रसंग पुन्हा आठवला आणि मला माझा अनुग्रह मिळाला !
    त्यानंतर बऱ्याचदा ते घरी आले अनेक विषयांवर चर्चा झाली . मी एक ज्ञानेश्वरीची प्रत आणली होती आणि देव्हाऱ्यात ठेवली होती . ती नानांनी पहिली . आम्ही त्यांना विचारत होतो काय वाचत जाऊ म्हणून , त्यांनी सांगितले ज्ञानेश्वरी ! नाही जमले वाचायला तर फक्त रोज एकदा डोके टेकवा त्यावर !
    मला नेहमी आश्चर्य वाटे कि एक सोफ्टवेअर इंजिनिअर या मार्गाकडे वळू शकतो आणि तेही त्यामध्ये इतके गाढ ज्ञान संपादन करू शकतो तेही नोकरी सांभाळून !
    एका दशक्रिया विधीला गेले असता तिथे मला एक हरिपाठाचे एक पुस्तक भेट मिळाले . मी या आधी हे पुस्तक पाहिलेही नव्हते , फक्त ऐकून होते . ते त्या वेळी मी तसेच ड्रोवर मध्ये टाकले , नंतर अश्याच एका निवांत वेळी मी वाचू लागले . जास्त काही समजत नव्हते परंतु वाचले . नंतर नाना सर्दी आहे म्हणून दवाखान्यात आले . त्या वेळी नानांनी विचारले काही वाचता का ? त्यांना नमस्कार करत मी म्हटले नाना हरिपाठ वाचते पण समजत नाही .. नाना बोलले कि समजत नसेल तरी वाचत राहा ...नक्की समजेल . ते त्यांचे शेवटचे शिकवणे ठरले . त्या आजाराने ए आर डी एस चे रूप घेतले आणि त्यातच नानांची प्राणज्योत मालवली . ....
                      माझिया मनीचा जाणोनिया भाव तो  करी उपाव गुरुरावो //१ //
                       आवडीचा मंत्र सांगितला सोपा / जेणे नोहे गुंफा कोठे काही //२//

Thursday 20 March 2014

काजळाची माया


काजळाची माया
मजवर भारी
उरात भिंगरी
भिरभिरे

वेदनेची फुले
अंगोअंगी झुले
मन कोमेजले
अश्रू ढाळी

विरहाचा शाप
असे मला खास
पिडेचाही वास
माझ्या जीवी

खुपणारे काटे
वाट हि सोडीना
आशा हि सुटेना
विषयांची

भीतीचा अंगार
काळीज हे पोळी
संशयकल्लोळी
लाही लाही

देवा तूच आता
शेवटची आस
थांबवी विनाश
संसाराचा
            -संध्या §.

Thursday 13 February 2014

प्रेमाची कविता

प्रेमाची कविता लिहिता हात आजही थरथरतात
मनात दाटलेले सारे मेघ डोळ्यातून पाझरतात
संस्कारांची अवजड ओझी , त्यातच तुझी प्रेमळ हाक
कर्कच्च बंध तोडून धावलेली पावले आठवतात
                     
                          *****

भिंतींना शोधत शोधत पायात गुंतलेली ती नजर
डोईवर विसावलेला दूर करून तो डोईजड पदर
तुझ्या प्रीत अर्णवात, क्षणात उसळणारी मी लहर
नाही रे नाही , झाले खाक तरी नसे मज तुझा विसर .

                         *****

                                         -संध्या §.