या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Sunday 8 April 2012

पाऊस पडून गेल्यावर

  पाऊस हि जशी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची गोष्ट तसे पाऊस पडून गेल्यावर भेटणारा निसर्ग माझा सगळ्यात जीवश्चकंठश्च सखा ..खूप खूप आवडीचा ...अनेकदा खूप आतुर असते मी त्याला भेटायला ...जणू तो गवसल्यावर मी पुन्हा उमलून येणार आहे ...आणि तसे होतेही , मन असे भरून येते उत्साहाने कि सर्व भोवताल सुख पेराल्यासारखा भासतो ...प्रेमाच्या स्पर्शासाठी आसुसलेली मने जशी मोहरून जातात ...धुंद होतात ...सर्व जगाला विसरून स्वत:मध्ये हरवून जातात ..त्यांना काही सोयरसुतक राहत नाही कुणी काय बोलेल याचे ...तशी मी विसरून जाते स्व आणि विरघळून जाते त्या मनमोहन निसर्गात ...
   अजून छान आठवते मला, शाळेतून आल्यावर पाऊस पडलेला असेल तर जेवणाच सुद्धा भान नाही तशीच उधळायचे म्हणा न ...पश्चिमेला चालत राहायचे ...उजाड माळरान पण त्या वरुणाने त्यालाही असे स्वच्छ केलेले कि पिवळ्या पडलेल्या त्या गवताच्या काड्या चक्क सोनेरी दिसायच्या आणि त्याच्यावर पडलेल्या त्या सूर्यकिरणांनी पुन्हा प्रकाश परावर्तीत करत आहेत असे भासायचे .. अनेकदा कुणाचा दागिना पडला असे वाटून मी त्यांना हातात पण घेवून पाहायची ..त्या काड्यांचा मऊ लीचापिचा स्पर्श मला अनेकदा त्यांना परत परत उचलण्यासाठी भाग पडायचा ...कितीदा मी पुन्हा पुन्हा फसायचे, त्यावर पडलेले ते थेंब मला अंगठीतले खडे भासायचे.
    काही ओघळी वाहत असायच्या तर काही वाहिलेल्या पाण्याचे ठसे दाखवायच्या ...माझी मीच विचार करायचे पाण्याचे कुठे ठसे असतात का, आणि मनाशीच हसायचे ...पण त्या खुणा असतात हि गोष्ट जशी मोठी होत गेले तशी उलगडली ..गढूळ पाणी आधीच वाहून गेलेले असायचे आणि आता स्वच्छ ,नितळ पाणी बघितले कि ओंजळ भाराविशी वाटायची ,वाटले ते केले नाही तर ते लहानपण कसले ? मग चप्पल काढून हळूच त्या पाण्यात पाय घालायचे ,ती मऊ माती जणू पायाला मखमल भासायची , मग त्या ओघळीने पुढे पुढे चालत जायचे सावकाश त्या मऊ मखमलीचा स्पर्श अनुभवत काहीतरी वेगळे वाटायचे ...अंगभर शहारा आणायचा तो स्पर्श ..मऊ मातीचा सुगंधी स्पर्श ..
      धूतलेल्या गवतासारखे धुतलेले दगड आणि लहान मोठ्या शिळा पण जवळ बोलवायच्या मला ..बघ मीही सुंदर आहे म्हणून ! त्या हिरव्या पिवळ्या गवतातले ते काळे दगड वेगवगळ्या आकारांचे - कुणी पूर्ण गोल तर कुणी वरून चपटे जणू बसायला तयार झाले आहेत ते .. मग खेळ सुरु व्हायचा या दगडावरून त्या दगडावर ... ते दगड पण साडीवरच्या बुंदक्याप्रमाणे वाटायचे


   पहिल्या पावसात ते शिवार धुतलेले पिवळे वस्र पांघरल्यासारखे वाटायचे मग दिवस थोडा कलला कि केशरी पिवळा एकत्र झालेल्या त्या रंगाला अजून काही उपमा मला तरी सुचली नाही पण डोळे दिपून जायचे , आणि वेड लागायचे त्या रंगांना डोळ्यात साठवायचे ...नंतरच्या पावसात मात्र धरती जणू ते पिवळे वस्र फेकून हिरवे नेसायची ...त्या हिरवाईवर उडणारी फुलपाखरे ...त्यांच्या मागे पळणे ...त्यांच्या पंखांचे रंग पहायचे आणि ते मोजायचे ..पुन्हा नवे फुलपाखरू ..पुन्हा नवे रंग ..नुकतीच उमलेली ती रानफुले इतकी लोभस असायची कि कोशातून आताच बाहेर आली आहेत आणि उत्सुकतेने या अतिसुंदर दुनियेला अनिमिष नेत्रांनी न्याहाळत आहेत ,जणू हे जग आताच नव्याने बनले आहे फक्त त्यांच्यासाठी ! मग मलाही त्या फुलांच्या विविधतेचे खूप नवल वाटायचे ..काही लाल ,गुलाबी ,जांभळी ,पांढरी ,पिवळी .... काही लहान अगदी डोळे जवळ नेवून पाहायला लागायची तर काही मोठी ..काही कानातल्या कुड्या बनायची तर काहींच्या बुंध्याचा रस गोड लागायचा ..काही फुलांना एकत्र गुंफून वेणी बनायची तर काहींना एकात एक करून छान चक्र बनायचे ...
       किती नवलाई आहे हि! सुखाच्या राज्याची जणू राणी बनायचे मी त्या नाविण्यात हरविलेली ..त्यापासून दूर ओढणारी प्रत्येक व्यक्ती मला शत्रू वाटायची .. तोच तो मावळणारा दिवस ...आवडायचा पण त्याने तिथेच  थांबावे असे वाटायचे , पण तो कसला थांबतो ...तेंव्हा मात्र त्याचा खूप खूप राग यायचा ...माझा तो शत्रू बनायचा ..आणि अंधाराला मग तो पाठवून द्यायचा या माझ्या स्वर्गाला झाकायला ...

2 comments:

Panchtarankit said...

कलियुगाचा महिमा न्यारा . चंगळवाद व भोगवादी संस्कृती मध्ये खेळ झाला दुय्यम
आणि पैसा झाला मोठा .

Nitin Samant said...

नावाप्रमाणेच रचना आहे 'पाऊस पडून गेल्यावर..'डोळ्यासमोर चित्र उभे राहते. मस्त आहे.
माझा ब्लॉग http://adf.ly/BukZb