या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Saturday 3 August 2013

टाकलेली

  “आई ssss”सापकन आसुडाचा दोर कांताच्या पाठीवर उठला , जिवाच्या आकांताने तिने आईला साद घातली . हौसा बाजूलाच उभी होती पण त्या भगताला  काही बोलायची तिची बिशाद नव्हती . कांताच्या एकेका हाकेला हौसाच्या जीवाची तगमग वाढत होती , उन्हात पाण्याबाहेर तडफडनाऱ्या माशासारखी . पोटात कालवाकालव व्हायची पण कांताच्या अंगातली ती हडळ बाहेर काढायची तर या भगताचे ऐकणे गरजेचे होते . आज ना उद्या कांता नीट होईन या आशेवर हौसाने आणि सदाने दवाखाना केला , ब्राम्हण सांगेन ते सर्व केले पण पोरीत काही बदल होत नव्हता . रोज ती घुम्यासारखी बसायची . घराचा एक कोपरा धरून निपचित पडून राहायची . तिला जेवणाची हौस ना कामाची . भावजया तिला दोन तीन दिवस कामाला पण घेऊन गेल्या तिचे मन रमेल म्हणून , पण कांतात काही बदल झाला नाही . खुरपायला पात धरली की तिथेच बसून राहायची , मातीला बघत पण पुढे सरकतही नव्हती आणि खुरपतही नव्हती . भावजया पण कंटाळल्या तिला समजावून . दुसऱ्याच्या रानात काम करायचे तर हिला समजावण्यात वेल दवडून चालत नव्हते , कारण मालकीण रागावण्याची भीती होती . दुसऱ्या दिवशी त्यांनी काही तिला नेली नाही . भाऊ नी वडील वेगळे खात होते ,शेजारीच राहत. पण जशी कांता आली तसं हौसाच्या जीवाला घोर लागला होता . कसे व्हायचे पोरीचे ही जर नाही नीट झाली तर , भाऊ भावजया आपल्या मागे थोडीच बघणार आहेत . नाही दारोदार हिंडावे पोरीने वेड्यासारखे ..असा विचार येताच तिच्या जीवाचा थरकाप होई . या विचारांनी घायाळ होत हौसा आणि सदा जे कोणी सांगतील ते उपचार कांतासाठी करत राहिले . आज तर कुणा एका शेजारणीने हा भगत आणला होता . त्याने मारून मारून कांताच्या अंगाचे कातडे सोलून काढले होते . कांता फक्त आई म्हणून विव्हळत होती कसला प्रतिकार मात्र करत नव्हती . जवळजवळ अर्धा तास हा कार्यक्रम चालला शेवटी कांता बेशुध्द होऊन खाली कोसळली .
      ती पडल्यावर शेजारणीसकट त्या भगताने काढता पाय घेतला . हौसा मात्र रडत होती , आरडून कांताला साद घालत होती .
कांते , ए कांते उठ की गं कांते sss” लेकीच्या वेदनेने माउलीच्या अंगाचे पाणी पाणी होत होते . तिचाही नाईलाज होता . अडाणीच होती ती म्हणून या अश्या लोकांवर ती विश्वास ठेवत होती आणि कांताच्या मानसिक वेदनेसोबत शारीरिक वेदना पण वाढवत होती . आणि आपण तीचा त्रास वाढवतो आहे हे बिचारीच्या गावीही नव्हते . सदाने मात्र पळत जाऊन गावातल्या एकुलत्या एक डॉक्टरला बोलावून आणले . डॉक्टर पण नवीनच होते . त्यांनी साधारण महिन्यापूर्वी या गावात भाड्याच्या खोलीत दवाखाना चालू केला होता . लांब गावाचे असल्याने कुणी नातेवाईक पण नव्हते त्यांचे या गावात . लग्न नव्हते झाले , एकटेच राहत . आई , वडील , भाऊ गावाला होते . घरमालक त्यांना खानवळ पुरवत होते . उंच , अंगाने सडपातळ असलेले डॉक्टर शांत , संयमी आणि दिसण्यात पण उजवे होते . गरीब घरचे असल्याने या गावाकडच्या लोकांच्या कष्टाची आणि दु:खाची पुरेपूर जाणीव त्यांना होती . दुपारी विरळाच असल्याने , डॉक्टर कसलेसे पुस्तक वाचत बसलेले . इतक्यात सदा आत धापा टाकत आला .
डॉक्टरसाहेब !आत येताच सदाने डॉक्टरांचे पायच धरले . मळकट धोतर आणि अंगात फक्त गंजी घातलेला सदा डॉक्टरांना ओळखीचा नव्हता . पण ते एकदम गडबडले कारण वडिलांच्या वयाचा माणूस आपले पाय धरतोय या जाणीवेने त्यांना ओशाळल्यासारखे झाले . त्यांनी त्याला उठवून शांत केले .
काय झाले बाबा ?” त्याला न्याहळत डॉक्टर बोलले .
माझी पोर बिनसूद झाली डॉक्टर , चला ना घरी पाहून घ्या तिला . आमी कसायानी तिला भगताच्या हवाली केली , त्यांनी मारून मारून तिला बिनसूद केली किवं . तुमी चला साहेब , बघा तिला . माज्या कांतिला वाचवा साहेब .एका दमात सदाने जे सांगता येईल ते सर्व सांगितले . केस सिरीअस आहे म्हटल्यावर डॉक्टरांनी गरजेचे सर्व सामान ब्यागेत घेतले आणि सायकल घेऊन सदासोबत चालू लागले .
      धुळीचा दहा मिनिटांचा रस्ता पार करत ते दोघे भर उन्हात टेकडीच्या पुढे असलेल्या घराजवळ आले . पूर्वेला तोंड करून रांगेत चार खोल्या होत्या . मातीच्या भिंतीवर पत्रे टाकलेले . पुढे शेणाने सारवलेले अंगण आणि त्याच्या पुढे काही फुलांची झुडपे होती . पटांगण स्वच्छ होते . त्यातल्या एका खोलीत सदाने डॉक्टरांना नेले . आत जाताच डॉक्टरांना एक तेलकट वास आला . त्या अंधाऱ्या खोलीत एका बारीक खिडकीतून थोडा उजेड आत येत होता . खिडकी बंद होती , हे दोघे आत येताच हौसाने पुढे होऊन खिडकी उघडली , आत लख्ख प्रकाश पडला . त्या उजेडात कांता खोलीच्या मध्ये बेशुद्धावस्थेत पडलेली . डॉक्टरांनी जवळ जाऊन तिची पल्स चेक केली . श्वासोच्छवास चालू होता पण ती वेदना देऊनही जागी होत नव्हती . डॉक्टरांनी कानाची पाळी दाबून पहिली पण कुठलाही रिस्पॉन्स त्या मुलीने दिला नाही . साधारण अठरा वर्षाची कांता मारामुळे लालेलाल झाली होती . चाफेकळी नाकाचा शेंडा लाल झालेला आणि चेहऱ्यावर माराच्या खुणा दिसत होत्या . तिचे ब्लडप्रेशर चेक करून डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिले . तिच्या चेहऱ्यावरची नजर हटणार नाही इतकी सुंदर होती ती , डॉक्टरांची नजरही तिच्या चेहऱ्यावर खिळून राहिलेली . किती सुंदर आहे ही , काय झाले असेल हिला ? असे अघोरी उपचार कुठल्या आजारासाठी करत असतील हिचे आई वडील ?तारुण्याच्या ऐन भरात अशी वेळ का यावी या मुलीवर ? एक ना अनेक प्रश्न डॉक्टरांच्या संवेदनशील मनाला पडत होते . थोड्या वेळात ती हातपाय हलवू लागली . जडावलेले डोळे उघड्तानाचा त्रास तिच्या चेहऱ्यावर उमटला आणि डॉक्टरांनी उसासा सोडला . जरा वेळात ती पूर्ण जागी होऊन उठून बसली तिच्या मनगटाला हात लावत डॉक्टरांनी पल्स पाहत तिला विचारले , “कसं वाटतंय कांता ?”
विस्फारित डोळ्यांनी कांताने डॉक्टरांनकडे पाहिले . चुळबुळ ती दुसरीकडे बघू लागली . हौसाने गद्गदा हलवत तिला विचारू लागली , “सांग गं कांते कसं वाटतंय त्ये ?”
बर आहे आई आता , पण हात दुखतोय .तिचे हे शुद्ध बोलणे ऐकून डॉक्टरांना आश्चर्य वाटले .
होईल ते पण ठीक , बाबा गोळ्या देतो चला माझ्याबरोबर . आणि हो कांता उद्या बाबांबरोबर तु दवाखान्यात ये , येशील ना ?”
डॉक्टरांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते तिचे , परत शून्यात नजर गेली , जणू सगळे हरवून बसली होती आयुष्यात …..
धाडते तिला उद्याला साहेब .हौसा सावरून घेत बोलली .
ब्याग आवरून डॉक्टर आणि सदा बाहेर आले . दोघे चालू लागले , डॉक्टरांच्या मनातले प्रश्नांचे मोहोळ मात्र काही केल्या पुन्हा उचल खात होते , शांत होण्याचे नावच घेत नव्हते . माणसाच्या आयुष्यात असे हरवलेपण का येत असेल ? फक्त दुसरयासाठीच जगायचे असते का ? स्वतःच्या जीवाचे , भावनांचे काहीच मोल असु नये ? का या मुलीच्या आयुष्यात जगण्यासारखे काही उरले नसेल ? पायातली जोडवीगळ्यातल्या काळ्या मण्यांची पोत तर सांगतेय हिचे लग्न झालेय , मग असा कुठल्या दु:खाचा सागर उरात साठवून आहे ती ? हिला मुले असतील की लगेच आली असेल ती माहेरी ? हिला टाकलेली तर नसेल नवऱ्याने  ? इतक्या सुंदर बायकोला एखादा माणूस कसा सोडू शकतो ? का मी हिचा इतका विचार करतोय ? प्रश्नांच्या या मालिकेचा स्फोट तर होणार होताच , निम्मे अंतर पर केले तेंव्हा डॉक्टरांनी सदाला विचारलेच , “ बाबा हे असे का झाले ? या मुलीला काही अडचण आहे का सासरी ?”
मावळतीला झुकलेल्या सूर्याकडे पाहत सदाने एक लांब सुस्कारा सोडला .
काय सांगू साहेब माज्या सोन्यासारख्या पोरीच्या जल्माची लक्तरं . किती म्हनुनश्यान कष्ट उपसलं या पोरास्नी वाढवाया . तीन पोरांच्या पाठीव चौथं होऊन दिलं वाटायचं पोरगीच व्हणार , तीन भावास्नी राखी बांधाया . नवसाने अशी लेक झाली साऱ्या वस्तीव उठून दिसायची . जी नको ती लाड केलं . कुणाच्या पोरी शाळेत जात नव्हत्या पर हिला मी खांद्याव घेवून जायचो . आठवी पातूर शिकावली . पोरगी आठवीतच भलीमोठी दिसाया लागली . त्यात देखणी बी लई . सोनगावच्या जाधवाच एक चांगलं स्थळ आलं . घरच चांगलं , पोरगा बी उठून दिसायचा संगतीच्या पोरांपारीस . कांतीला पाहिलं आन लगीच व्हय म्हणला . झटदिशी ठरलं आन झालं बी लगीन .सूर्य आता क्षितिजाच्या आड गेला होता . डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसत सदा पुन्हा सांगू लागला .
नव्या संसाराच कौतुक ते काय पहायचं , पावना बी जी नाय ती लाड करायचा . पहिल्या खेपला पोरगं झालं आन दुसऱ्या टायमाला पोरगी .
या मुलीला दोन मुले आहेत ?” डॉक्टरांनी आश्चर्याने विचारले .
व्हय साहेब दोन पोरं पर दोनी त्या कसयाने त्येच्याजवळ ठीवली हायत , एकजरी इकडं असतं ना तर पोरीचं असं नसत झालं बगा .दुसऱ्या खेपला आली ती बाळातीन व्हायला तर त्या कसयान दुसरी बाई बघितली . नुसती बघितली नाय तर लगीन बी उरकून घेतलं. तरी बी कांती म्हणायची मी तिथच राहते पर त्यो जुल्मीच व्हता , ही देखणी म्हणून नाय त्यो आळ घ्यायचा . म्हणायचा जा इथून राह्यचं नाय . दारू ढोसून मार  मार मारायचा , पोरांना उरास धरून ती कोपऱ्यात पडून रहायची .
डोळ्यात दाटून आलेले अश्रू आवरेनासे झाले सदाला , समोरचा रस्ता पुसट होत होता . धोतराच्या सोग्याने डोळे पुसून पुन्हा चालायचा . डॉक्टरांना आता खूप वाईट वाटू लागले . उगीच आपण या बाबांच्या जखमेची खपली काढली . किती दु:ख आहे बिचारयांच्या मनात , लाडकी लेक संपते आहे हे पाहताना खरंच किती तगमग होत असेल या दोन जीवांची
नका रडू बाबा , होईल सर्व ठीक , आपण उपचार करू तिचे . अजिबात काळजी करू नका उद्या घेऊन या तिला . तुम्हाला तुमची मुलगी पहिल्यासारखी करून देऊ .आपण काय  बोलून गेलो हे कळल्यावर डॉक्टर थोडे बावरल्यासारखे झाले . जास्त तर नाही ना या बाबांच्या आशा वाढवत ? या विचाराने त्यांचे मन धगधगू लागले . पण बाबांचा उजळलेला चेहरा पाहून त्यांना थोडे समाधान वाटले . पण पुढे सावरून घेत ते बोलू लागले .
मी काही देव नाही बाबा पण जितके काही ज्ञान आहे माझे या विषयात त्याचा पूर्ण आणि प्रामाणिक उपयोग करून मी या मुलीचे आजारपण कमी करण्याचा प्रयत्न करीन .तिला या भ्रमिष्ठ अवस्थेतून बाहेर काढीन .
त्या आडाणी सदाला डॉक्टर पुन्हा असे का बोलले हे उमगले नाही पण डॉक्टरांच्या रुपात त्याला एक आशेचा किरण दृष्टीस आला . अंधारात चाचपडणार्‍याला चकाकणारा काजवा दिसला तरी थोडा दिलासा मिळतो तसेच वाटले सदालाही ! कारण आता या चमत्कारांनीच काही होऊ शकते असे त्याला वाटायचे . डॉक्टरांची मात्र वेगळीच मनस्थिती होती , या गरीब लोकांना उगीच स्वप्नांचे इमले बांधून देऊन त्यांचे प्रश्न सुटत नाहीत . खरंच जर या मुलीसाठी काही करू शकलो तर ठीक आहे . शिवाय आपले ज्ञान काही तज्ञ मानसोपचारतज्ञासारखे नक्कीच नाही . म्हणूनच आपल्या मर्यादा ओळखून मघाशी जे एक पाउल मागे आलो याचा जराही पश्चाताप त्यांना वाटला नाही . उद्या कांताला घेऊन येतो असे सांगून सदा जायला निघाला पण गडबडीत तो डॉक्टरांना फी विषयी न विचारताच बाहेर गेला . काय हे लोक ? मी धावतपळत त्या बाबांबरोबर गेलो , दवाखाना बंद ठेऊन तर त्या बाबांनी फी विषयी विचारले पण नाही , आणि मी किती तळमळलो त्या मुलीसाठी ? हे लोक असेच फुकटे असणार . जर नव्हते पैसे तर कमीत कमी उद्या परवा देतो असे तरी सांगायचे होते . अशा विचारांत हरवलेले डॉक्टर खुर्चीत बसतच होते की सदा पुन्हा धावत आला .
माफी असा साहेब , मी आडाणी गडी पण गडबडीत तुमचा पैसा द्यायचा विसरून गेलो बगा , लई डोकं येडं झालं बगा या पोरीच्या कारणानी , माफी करा .काकुळतीने सदा बोलला आणि शंभरची नोट पुढे धरली . डॉक्टरांना कसेसेच झाले , आपण उगीच गैरसमज केला म्हणून त्यांची फी घेऊन उरलेले पैसे परत करत डॉक्टर बोलले , “तसे काही नाही बाबा , उद्याला तुम्ही येणारच होते मग मीही काही बोललो नाही .
      नुकतीच चैत्र पौर्णिमाहोऊन गेलेली . उन्हाची रखरख अंगाची लाही करत होती . पण तरी डौलाने झाडावर मिरवणारी चैत्रपालवी माणसाच्या मनाला थंडावा देत होती . दुपारी कुणी पेशंट नव्हते . डॉक्टर बाहेर उभ्या असलेला  कडूनिंब पाहत होते . पानांपेक्षाही जास्त असणारा तो पांढरट पिवळ्या रंगाच्या फुलांचा बहर खूप मनमोहक दिसत होता . त्या मोहराचा येणारा मंद वास , आत येणाऱ्या वाऱ्याच्या थंड झोताबरोबर येत होता . घामेजलेल्या शरीराला तेव्हडाच विसावा मिळायचा , पुन्हा मोकळा श्वास घेण्यासाठी ! पण डॉक्टरांना सकाळी खूप राग यायचा त्या मोहराचा , कारण गळून पडणारी फुले त्यांच्याच दारात पडत होती . रोज त्यांना ती स्वतःच साफसफाई करावी लागे . आता त्यांना ती गोष्ट आठवली आणि ते मनाशी हसू लागले . खरंच किती विचित्र आहे माणसाचे मन  , जी गोष्ट सकाळी त्रास देत होती ती आता ग्रीष्माच्या दुपारी आनंद देत आहे . किती या निसर्गाची किमया न्यारी , नको असणाऱ्या काही गोष्टी कधीतरी मनाला सुख देऊन गेल्या आहेत आणि भविष्यात देणार आहेत मग आज त्यांचा थोडा त्रास बाजुच्यानी काढायला काय हरकत आहे . या विचारांसरशी त्यांना कांताची आठवण झाली . का आली नसेल ती ? काही प्रोब्लेम तर नसेल झाला ? की ती मुलगीच यायला तयार नसेल ? काही असो पण खरंच किती दु:ख अनुभवते आहे ती या कोवळ्या वयात ...असे नशीब कोणाला न मिळो ...तसे पहिले तर कोण सुटलाय या दैवाच्या फेऱ्यातून , आपणही शेवटच्या वर्षाला असताना कोण कुठल्या त्या पोरीपायी आत्महत्या करण्याच्या विचारात होतोच की ...पण नशीब मोठे म्हणून देसाई सर भेटले . किती समजावले त्यांनी , आधी स्वतःसाठी जगावे मग दुसऱ्याचा विचार करावा . जीवन खूप सुंदर आहे . पुन्हा ते भेटेल की नाही याची कोणालाच कल्पना नाही , मग का असे गमवायचे ते अश्या लोकांसाठी जे आपला विचारही नाही करत ? त्यांच्या समजवण्याने आणि अथक प्रयत्नांनी तर आपण डिप्रेशन मधून बाहेर आलो . सुनीताची आठवण येताच डॉक्टर  मनाशीच हसले . किती वेडा होतो मी , माझ्याविषयी जराही विचार न करणाऱ्या त्या मुलीसाठी मी माझे जीवन संपवणार होतो . किती खुळचटपणा ! ती तिच्या आयुष्यात सेटल झाली असती पण आपल्या आई वडिलांचे किती हाल झाले असते . त्यांनी त्यांची आयुष्यभराची कमाई आपल्या शिक्षणासाठी संपवली होती . काय केले असते त्यांनी आपल्या मागे ? धन्य ते देसाई सर , त्यांच्या उपकारांचे ओझे उतरणे कठीण आहे . पण अश्या कांतासारख्या पेशंटला नीट करण्यास जरी यशस्वी झालो तरी थोडसे तरी उतराई होऊ त्यांच्या उपकारातून काल वाटायचे की का इतका विचार करतोय आपण या मुलीचा पण आता उमजते आहे की काही दिवसापूर्वी आपणही याच फेज मध्ये होतो म्हणून कदाचित तिच्याविषयी आस्था वाटतेय आपल्याला. का बरे आली नसेल ही कांता ? तिच्या बाबांनी तरी काही निरोप येऊन  सांगायचा होता .
     डॉक्टरांना  विचारांत वेळ कधी गेला हेच समजले नाही . डोक्यावरची तळपणारी उन्हे , पश्चिमेला झुकलेल्या सूर्यामुळे आता तिरपी होत सौम्यपणे दारातून आत येत गारव्याला पसरलेल्या कुत्र्यासारखी अंग टाकून टेबलावर पसरली होती .इतक्यात घरमालकिणीची हाक ऐकू आली .चहा साठी त्या बोलावत होत्या . येतो म्हणून उत्तरादाखल खिडकीतून आवाज देऊन डॉक्टरांनी सांगितले आणि मरगळलेल्या, बसून अवघडलेल्या शरीराला हातपाय ताणत , मोकळे करत खुर्चीतून उठले . मोरीत जावून बाद्लीतले थंड पाणी चेहऱ्यावर शिडकावले . त्या थंड स्पर्शाने उगीच अंग मोहराल्यासारखे झाले . अंगभर रोमांच उभे राहिले . उन्हाने तापलेले शरीर थंड करत अंगभर उठलेले शहारे पुन्हा शांत झाले . हातपाय पुसून तोंड पुसत ते बाहेरच्या खोलीत आले . सदा आणि कांता बाकावर येऊन बसले होते
कशी आहे बाबा मुलगी तुमची ? परत काही त्रास नाही न झाला ?” मनातील त्यांना पाहून झालेली खुशी जराही चेहऱ्यावर न दाखवता डॉक्टरांनी सदाला पाहत विचारले .
नाय काय तरास झाला साहेब , पर बोलत काय नाय , तिच्या आईन बळ बळ दोन घास खाया घातली . दुपारच्याला येणार व्हतो पर लई उन होतं , म्हनुश्यान तिची माय बोलली उन उतारलं न मग जा , म्हणून उशीर झाला .
डॉक्टरांना थोडे समाधान वाटले , उशिराचे कारण विचारायच्या आधीच समजले . कांता मात्र एकटक खाली पाहत होती . तिने एकदाही वर मान केली नाही की आपणहून या संभाषणात सहभागी झाली नाही नाही .

बर बाबा मी पाच मिनिटात आलो चहा घेऊन , आल्यावर निवांत बोलू . तुम्ही इथेच बसा . कुणी आले पेशंट तर बसून ठेवा , लगेच येतील असे सांगा .थोडक्यात इथे लक्ष ठेवा असे सांगून डॉक्टर मागच्या दाराने वर घरमालकांनकडे गेले . ते गेल्यावर कांता वर मान करून दवाखाना बघू लागली . सगळीकडे सामान नेटके लावलेले , टेबल पण स्वच्छ होते . फारशी अनेक दिवस न पुसाल्यासारखी मळकट दिसत होती . खोलीचे छत कौलारू असल्याने जाळ्याजळमटे त्यांची मालकी हक्क असल्यागत चिकटलेली होती . एकटा पुरुष इथे राहतो आहे याच्याच जणू खाणाखुणा दाखवत होती ती खोली . एका स्रीच्या हातांची तिला गरज आहे याची जाणीव सहज तिऱ्हाईताला व्हावी असेच खोलीचे रूप होते . माणूस तसं किती एकटा असतो ना ? जन्माला येताना आणि जाताना सुद्धा ! आयुष्याभरही एकटाच तर असतो , माणसांत हरवलेला एकटा ! जीवनातल्या प्रत्येक दु:खी वळणावर त्याची जाणीव आणखी पोखरून टाकते . सहजीवनाची ओढ यातूनच तर निर्माण होत नसेल ? पण या सहजीवनात ज्या कुणाच्या वाट्याला चांगला जोडीदार येतो त्याचे सहजीवन फुलते , बहरते . त्या सहजीवनातही वादळे येतात , नाही असे नाही , पण सामंज्यस्याने ती शांतही होतात . तिच्या बिचारीच्या वाट्याला मात्र तिला हवे ते सहजीवन आलेच नाही .तिची सामंज्यस्याची सर्व ओझी एकटीने उचलण्याची तयारी होती , पण तेही तिच्या नशिबी नव्हते . म्हणूनच कांता निराशेच्या गर्तेत कोसळत होती . तिला गरज होती एका हाताची , जो तिला मानसिक आधार देऊ शकणार होता . पण तो हात नवऱ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा असावा असे विचारही तिच्याभोवती कधी रेंगाळले नव्हते . नवराबायकोच्या नात्याशिवाय असलेले सहजीवन म्हणजे व्यभिचार ही कल्पना घेऊन जगात असलेला समाज तिच्याभोवती होता . तिचे तरी विचार यापेक्षा काय वेगळे असणार होते . शारीरिक गरजेच्या पुढे जाऊन काही  मानसिक गरजाही असतात ही कल्पना त्यांच्या मनाला कधी शिवली नव्हती . म्हणून मानसिक उपचार घेणारे लोक वेडे आणि असे उपचार देणारे डॉक्टर वेड्यांचे अशीच सर्वांची धारणा असे . अवतीभवती आता कांताची गणना पण वेडी म्हणूनच होऊ लागली होती . हौसा सदाला मात्र असे अजिबात वाटत नसे . त्यांनी कांताला लहानपणापासून पाहिले होते . वाढताना , खेळताना , हसताना , रडताना ,संकटांचा सामना करताना पण त्यांच्या दृष्टीने तिला तिच्या दु:खाने अबोल बनविले होते . तिच्या जगण्याला एखादे उदिष्ट हवे होते . तिची मुले जरी सोबत असती तरी ती इतकी व्यथित नसती बनली . आणि असे उद्दिष्ट मिळाले की रातराणी होऊन बहरणार होती , भोवतीच्या अंधारात सुगंध पसरणार होती. ….
                                                                                       क्रमशः

No comments: