या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Sunday 17 January 2016

वाटेवरले वारकरी

 आयुष्याच्या वाटेवर भेटणारे बरेचजण असतात , कुणी एकदा दिसतात पुन्हा कधीच न दिसण्यासाठी . कुणी सोबत चालतात आणि आपल्या मनाचा कप्पा व्यापतात कधी कळतंच नाही , कुणी अनेकवर्षानंतर अनापेक्षितपणे भेटतात आणि पूर्वीसारखी पुन्हा जवळची होतात . कुणी पूर्वी पाहिलेली , पण कधीच संवाद न केलेली , अशी भेटतात आणि आपलीशी होतात . कुणी हृदयात हळवी किनार ठेवून गेलेली पुन्हा समोर उभी ठाकतात आणि मनातील हुरहूर कधी काहूर होते कळतंच नाही . काही तर अशी असतात ,कि हृदय व्यापून आयुष्यभरासाठी ओरखडे ठेऊन जातात . आयुष्याच्या या अनोळखी वाटेवर उद्या काय असेल कुणाला कळलंय का कधी ? हो पण हे सारेजण जीवन विचारांनी, आचारांनी, अनुभवांनी  समृद्ध करून जातात काही सावल्या आणि पाऊलखुणा ठेवून ! असेही हे वाटेवरचे वारकरी माझ्या आयुष्याला नेहमीच शिकवत , समृद्ध करीत गेले . काहींनी हृदयाचे हळवे कोपरे असे व्यापले कि त्यांच्या आठवणी सुद्धा मला आनंदी करतात . हर्षाची ही मोरपिसे आयुष्यभर अशीच खोलवर मनात रुजवून , रुतवून घ्यावीत . काही न मागता देणारी अशीही नाती भेटली आणि काही कितीही घेऊन पुन्हा हात करणारी पण ! पण तरी दोन्हीत आनंद आहे खरंच आहे . अश्याच या वाटेवरच्या वारकऱ्यांना मी लिहिणार आहे . नव्हे लिहायला हवेच , कारण हे करताना त्यांनी दिलेले सुखदुःखाचे क्षण अनुभवताना आजच्या वेदना कमीच वाटतील हो न ?

भिजलेलं मन

तुझ्या असण्याने
गहिवरलेले आयुष्य
माझी मी उरलीच नव्हते
प्रत्येक क्षणावर
तुझीच मोहर
तुझ्याशी खेळलेला तो
नजरबंदीचा खेळ
शब्दांनी सजण्याआधी
संपलेली ती वेळ
उद्याची वचने
आजच घेतलेली
स्वप्नांची तोरणे
पापण्यात सजलेली
सुखाच्या वेलींनी
गाव माझं सजलेलं
प्रेमात तुझ्या
मन होतं भिजलेलं
  डॉ संध्या राम शेलार .

No comments: