या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Tuesday 17 May 2011

एका लग्नाची गोष्ट

   एका लग्नाची गोष्ट, तसं पाहिलं तर प्रत्येक तरुण-तरुणीच्या मनातील एक उत्कंठेचा, जिव्हाळ्याचा क्षण. पण प्रत्येकाच्या आयुष्यात सुखच आणेल याची ग्वाही नाही. माझ्या या कथेतही असंच दुःख एका तरुणाच्या आयुष्यात या विवाहाने निर्माण केले आहे.
    पहाटेचे तीन झाले पण नानी काही झोपू शकल्या नव्हत्या. संसाराची गाडी अर्ध्यात सोडून नानांनी काढता पाय घेतला होता. या घटनेला अजून वर्ष व्हायचं आहे. चोरपावलांनी नानाच आजारपण कधी त्यांच्या संसारात दाखल झाल ते नानीला कळल नाही.दोन मुल मोठा संजू आणि छोटा विकास, नानाच कुकुटपालन,त्याबरोबर शेती, संजू आय आय टी करून नुकताच एका खासगी कंपनीत लागलेला, विकासच बारावीच वर्ष चांगल मजेत चालाल होतं. एक दिवस दुपारची वेळ अचानक नाना हाक मारू लागले, '' सुनिता, सुनिता ..'' नानी धावत बैठकीत आल्या.
''अरे देवा, काय झालं? असा का करता?'' हा हा म्हणता नानाचा भलामोठा देह धरणीला आडवा झाला. नानीनं मोठ्याने आवाज देऊन आण्णा, काकी, तात्या सर्वांना गोळा केलं. जीपमध्ये टाकून जवळच्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी पुढची चिठी दिली. तसाच पुण्याला, एका खासगी मोठ्या हॉस्पिटलात दाखल केलं. मेंदूच्या कॅन्सरच निदान झालं. केवळ आठ दिवसात नानांनी आटोपत घेतलं...
    नाना गेल्या पासून नानीने अनेक रात्री जागून काढल्या, पण आज झोप न येण्याच कारण वेगळाच, आज संजूच लग्न! वडील गेल्यानंतर वर्षभरात लग्न उरकायला भटजींनी सांगितलं म्हणून घाईने मुलगी बघून सहा महिन्यानंतर लगेच लग्नाची तारीख धरली. नानींना सुनेच्या येण्याचा आनंद वाटत होता पण नानांच्या नसण्याच दु:ख जास्त. संजू तर सैरभैर कुटुंबाची जबाबदारी, आणि जीवनातल्या त्या सुखद क्षणाचं स्वागत. सहजीवनातील स्वप्नसुंदरीच आगमन, आणि नानांच्या नसण्याच दु:ख. कश्यात बुडाव हेच त्याला कळत नव्हत. त्याने फक्त तीनदा शीतल बघितली होती. तशी शीतल नाकीडोळी नीटस, रंगाने उजळ, उंच, दहावी शिकलेली, पाहताच पसंत पडावी अशी. दोनतीनदा पाहिलेली तिची छबी संजूचे मन उजळून टाकत होती. स्वप्न सुखद करीत होती. 
    नानीने उठून अंघोळ करून चूल पेटवली. चहाच आधन ठेवलं. बाकीचे उठून आवरू लागले. लग्न साडेबाराच असल्याने लवकर निघणे गरजेचे होते. करावल्यांच्या बांगड्यांची किणकिण, धावपळ आणि बडबड साऱ्या घरात चैतन्य पसरवत होत्या. आण्णा कडाडले, ''ताई,माई संजूच आवरा, नवरदेवाची मळी काढा. साडेसहा वाजता नवरदेवाला न्यायला गाडी येणार आहे, तुमी पण आवरून तयार असा.'' तशी आणखीन धावपळ वाढली.
बरोबर वेळेला गाडी आली, लांबचा प्रवास असल्याने लवकर निघणे जरुरी होते. पहिल्या गाडीत संजुबरोबर २-३    करवल्या, ३-४ करवले , काकी, २ आत्या आणि एक मामा बसले. बाकी वऱ्हाड  बसने येणार होते. 
   नऊच्या दरम्यान पहिली गाडी कार्यालयात पोहचली. वधुकडच्या सुवासिनी पुढे होऊन वराला ओवाळत होत्या सनईच्या चौघड्यांच्या, फटाक्यांच्या आवजात वरपक्ष्याचे स्वागत झाले. वराचे मित्रमंडळ चेष्टा मस्करी करत होते. या चैतन्याने भरलेल्या वातावरणात कार्यक्रम पुढे सरकत होता. साखरपुडा सुरु झाला. प्रथमच वधु समोर आली मोरपंखी रंगाच्या जरीची किनार असलेल्या साडीत, नेटक्या मेकअप मध्ये शीतल खूप लोभसवाणी दिसत होती. संजूला तिला पाहताच अंगावरून हजारो मोरपीस फिरल्याचा भास झाला. विधी चालू असताना त्याच सर्व लक्ष शीतलकडेच, तिच्याबरोबरच्या सुखस्वप्नात विचारांच्या झोपाळ्यावर झुलत होतं. साखरपुडा आटोपला, नवरी दिलेली साडी नेसून आली. भटजींनी पूजा केली, पाच सुवासिनी पुढे होऊन नवरीची ओटी भरली. शीतलने वाकून सर्वाना नमस्कार केला.
    हळदीच्या कार्यक्रमाला सुरवात झाली. नंतरच वर्हाड आलं होतं. पांढरा कुर्ता पायजमा  टोपी आणि कपाळाचा गंध लावलेला संजू पाहून, आजीला नानाची आठवण झाली. तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू ओघळू लागले. संजू हुबेहूब पित्यासारखाच, नानाच पुढे बसल्याचा भास होई. हिरवी काठपदराची साडी नेसलेली शीतल नजर लागावी अशी छान दिसत होती,थोडी बावरलेली अधिकच रूप खुलवत होती. मोत्याच्या मुंडावळ्या लावलेली नवरा नवरी सगळ्यांच्या नजरा वेधून घेत होती. हळद लावायला सुरवात झाली प्रत्येक सुवासिनी येऊन आधी नवरदेवाला हळदी कुंकू लाऊन नंतर डोक्यावर  गालांना हाताना पायांना हळद लाऊ लागल्या.नंतर नवरीला तश्याच प्रकारे हळद लावत. विजुदादाच्या वहिनीने संजूच्या तोंडात हळद कोंबली मग काय सगळ्या करावाल्यांचा गोंधळच चालू झाला. जे ते एकमेकांना हळद लाऊ लागले.विजुदादाच्या वहिनीला तर सर्व कर्वल्यानी मागे पळून पळून हळद लावली. या मस्तीत नवरी मात्र जास्तच बावरायला लागली. पण शीतलची मोठी बहिण तिला सावरू लागली. संजूला थोडं खटकलं, तो मेहुणीला म्हणालाही,''मस्तीची सवय नाही का? आमच्याकड सगळ्यांना चेष्टा करायची सवय आहे, तुम्ही हि सवय करून घ्या.'' मेहुनीही म्हणाली,''नाही दाजी, होईल तिलाही सवय होईल.'' तिने वेळ निभाऊन नेली पण संजूच समाधान झालं नाही. या गडबडीत हळद संपली. 
   लग्नाची वेळ जवळ आल्याने, घाईत नवरदेवाचा संपूर्ण पोशाख केला. वेळ कमी असल्याने मांडवातील अंघोळीचा कार्यक्रम रद्द केला. नवरदेव सजून घोड्यावर चढला, त्याला मनातून सारख वाटत होतं हे घडलं ते नानीला सांगाव त्याची नजर नानीला शोधात होती पण त्या कुठे दिसल्याच नाही. घोड्यावर चढल्यावर ती एक अशाही मावळली. कुणाला काही सांगावे का नाही हे त्याला सुचेना. उगाच काही अडचण नसेल तर गैरसमज व्हायचा. नवरदेव मारुतीरायाच दर्शन घेऊन आला पण त्याच्या मनातील विचारांचं वादळ काही थांबल नाही. नाना असते तर त्याच मन भरून आल... 
    सनईच्या  सुरांमध्ये वधु वर लग्न मंडपात येऊन उभी राहिली. शीतल आता खूपच सुंदर दिसत होती आणि शांतपणे गालातल्या गालात मंद हसत होती. तिचा तो स्मितहस्यातली छबी बघून संजूच्या मनातील वादळ शांत झालं. त्याच त्यालाच शरमल्यासारख झालं. मंगलअष्टकांच्या मंगलमय गजरात आणि सनईच्या मंजुळ स्वरात  विवाह पार पडला. त्यानंतर सप्तपदी होम सर्व विधी आटोपले. विवाह पार पडला. 
     नवरीच्या पाठवणीची वेळ तशी प्रत्येक लग्नातील भावपूर्ण वेळ. ज्या घरी मुलगी लहानाची मोठी होते, सर्वांची लाडकी असते, तिच्या प्रत्येक इछ्या पूर्ण करण्यासाठी जीवच रान केलं जातं अशा घराला सोडून जाताना  प्रत्येक मुलगी साश्रूपूर्ण मनाने निरोप देत घेत असते. परत परत जाऊन आई वडील भाऊ बहिण  सर्वांच्या गळ्यात पडून रडत असते. शीतलने असं काहीच केलं नाही उलट मोठ्या बहिणीला ती सामानाबद्दल विचारात होती. दु:खाचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर नव्हता. सर्वांनाच आश्चर्य वाटलं. पण बोललं कुणीच नाही...
   नवरा नवरी परतीच्या वाटेला लागली. घरी आल्यावर दोघांच ओवाळून स्वागत करण्यात आल माप ओलांडून  नवरी आत आली. आत आल्यावर कावरी बावरी बघायला लागली. कोपर्यात घुसू लागली बहिणीला बिलगु लागली. नानीला थोडं विचित्र वाटू लागलं. जश्या बायका नवरी पाहायला येऊ लागल्या आणि गर्दी वाढु लागली तशी शीतल जास्त अस्वस्थ झाली आणि वेड्यासारखे हावभाव करू लागली. नानी घाबरल्याच, ''हिला काय झालं?'' विचारातच होत्या ती भांडे फेकून देऊ लागली. संजू नानीच ओरडण ऐकून धावतच आला. तत्क्षणी त्याला झालेल्या फसवणुकीची जाणीव झाली. नानी मटकन खाली बसल्या रडू लागल्या. तोपर्यंत शीतलच्या मोठ्या बहिणीने तिला दुसर्या खोलीत नेऊन एक गोळी देऊन शांत झोपवल. तिची मोठी बहिण बाहेर येऊन माफी मागू लागली, पण संजू नानी सर्वजण स्तभ्ध होती. त्यांच्यावर परत एकदा आभाळ कोसळलं होतं..........  
         

No comments: